Saturday, December 31, 2022

खर्रा इतिहासः ख्रिसमस ट्री - एक मुघल शोध

 आपण हिंदूस्थानात मोठमोठ्या टूर्स काढत असूनही दीवान-ए-खास मधे आपल्या कामाची पुरेशी चिन्हे (souvenir) नाही अशी जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सरांना अलीकडे (म्हणजे हल्ली, कुणाकडे असं नव्हे. चावट कुठले) खंत लागून राहिली होती. बेगम शोधाबाईंच्या नादाने एक दोन मराठी मालिकांचे बघून त्यांना "प्रेझेंटेशन" द्यायची हुक्की आली होती पण त्यांच्या दिमाग-ए-मस्तिष्कचे जे विचार करण्याचे काम त्यांनी ज्या बिरबलाला औटसोर्स केले होते त्याने बादशहासरांना आवरलं म्हणून बरं झालं. 

पण अकबर सर सुद्धा कधीकधी विचार करत असत. जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सर हिंदूस्थानात जिथे जिथे टूर घेऊन गेले होते तिथल्या स्थानिक झाडांची रोपे कुंडीत आणून दीवान-ए-खासमधे ठेवण्याची सूचना त्यांनी बिरबलाला केली. पण अकबर सरांना नुसतीच झाडं बघवेनात. त्यांनी बेगम शोधाबाईंना सांगून त्या झाडांवर चायनीज प्रवासी फुं-कून-पी आणि दी-वे-लाऊ यांनी बादशहा सरांना भेट दिलेले एक हजार दिवे त्या झाडांना लावून टाकले. पण ते दिवे चायनीज असल्याने त्यातले फक्त सातशेसहाईंशीच दिवे पेटले. शोधाबाईंना चिंता लागून राहिली पण बिरबलाने त्यांना "तसे बादशहा जिल्लेइलाही अकबर सरांचेही दिवे फारसे पेटत नसल्याने काही कळणार नाही" असा दिलासा दिला.

प्रचंड थंडीला कंटाळून युरोपियन प्रवासी रिका-म-टेकडोस्की एकदा डिसेंबरात दिल्लीत आला असताना त्याने दरबारात ही रोषणाई बघितली अ‍ॅंड रेस्ट इज हिस्टरी. अशा रीतीने ख्रिसमस ट्रीची परंपरा युरोपात प्रचलित झाली. 

पण हा खर्रा इतिहास युरेशियन विकेंड इतिहासकार तुम्हाला कधी सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
पान ६६६, ओळ ८

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

🖋️ मंदार दिलीप जोशी






Sunday, December 18, 2022

प्रारब्ध

एक व्हिडिओ बघितला ज्यात एक ताई राजकीय बंदचा भाग म्हणून दुकान बंद करायला आलेल्या काही तरुणांना समजावत आहेत. त्याच ताईंच्या फेसबुक पोस्टवर जी मंडळी गरळ ओकत असतात, त्यांच्या पोस्टवर आलेल्या घाणेरड्या भाषेतल्या टिप्पण्या वाचून लहानपणी आजोबा सांगायचे ती गोष्ट आठवली.

खूप पूर्वी एका आटपाट गावात एक म्हातारा-म्हातारी आणि त्यांचा मुलगा रहायचे. बिचारे इतके गरीब होते की दिवस दिवस उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. एकदा काय झालं की गरिबीमुळे त्रासून त्यांनी भगवान शकरांकडून वर प्राप्त करून घेण्यासाठी तप करायचं ठरवलं आणि तिघेही ध्यान लावून बसले.

कैलासावरून त्यांचं तप बघत असलेल्या पार्वतीमातेला त्यांच्यावर दया आली आणि त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, "अहो, बघा ना, हे तिघे किती घोर तप ठरत आहेत. तुम्ही यांना वर का नाही देत?"

शिवशंकर हसून म्हणाले, "प्रिये, प्रारब्ध. मी वरदान दिल्याने काहीही होणार नाही. या जन्मात जे विधीलिखित आहे ते त्यांना भोगावंच लागेल."

पण पार्वतीमाता पडल्या आई. लगेच चिडून म्हणाल्या, "ते मला काही माहीत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन एक एक वर देऊन या. माझ्याच्याने यांचे कष्ट बघवत नाहीत. जाताय ना?!"

अखंड सृष्टीच्या मातेचं म्हणणं ऐकून भगवान शंकर तिघांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याकडे वर मागावा असं सांगितलं.

सर्वात आधी म्हातारीने वर मागितला. ती म्हणाली, "हे भोळ्या शंकरा, तुम्ही मला मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी जशी होते तशी करा."

भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच म्हातारीचं रूपांतर एका सुंदर षोडशवर्षीय नवरीत झालं.

हे पाहून म्हातारा भडकला. रागाने लालबुंद होऊन शंकराला म्हणाला, "हे भगवान, या मूर्ख बाईला जराही अक्कल नाही. मी वर मागतो की हिला कुत्री करा."

म्हाताऱ्याचं ऐकून भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच त्या नवतरुणीचं रूपांतर एका कुत्रीत झालं.

मग भगवान शंकरांनी त्या मुलाला वर मागायला सांगितलं. मुलगा विचारात पडला. आपल्या आईला या अवस्थेत पाहून त्याला अपार दुःख होत होतं. त्याने पटकन हात जोडले आणि शंकरांना विनंती केली, "हे देवाधिदेव, माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं करा."

भगवान शंकर "तथास्तु" म्हणाले आणि शांतपणे परत कैलासाकडे प्रस्थान करते झाले. परत आल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि पुन्हा ध्यानात गेले.

तसं या गोष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे पण हजारो वर्षांपासून परमेशवराच्या अवतारांपासून ते ऐतिहासिक काळातील थोर मंडळी आणि संत परंपरेतील महान लोक जे शिकवून गेलेत ते वाचून समजून वागण्याची अक्कल जर नसेल तर अशा बैलबुद्धीच्या लोकांना कितीही सांगितलं, तरी शेवटी प्रारब्धात असेल तसेच ते वागणार.

असे लोक कधीही बेकायदेशीरपणे रस्त्यावर चादरी अंथरून जागा बळकावलेल्या असतात त्यांना मुक्त करण्याचा उपक्रम राबवत नाहीत कारण अशा ठिकाणी काही सत्कार्य करण्याची हिंमत तर नसतेच, पण आदेशही नसतो. शिवाय नेहमी आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या घटकांवरच दमबाजी केली जाते (अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजपुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बलघातकः।) आणि त्याला आधार म्हणून काल्पनिक ऐतिहासिक अन्यायाची भावनिक फोडणी त्याला दिली जाते. अशी अरेरावी केल्यावर लोक आपल्याला घाबरतात हे एकदा कळलं की ती करणारे त्या राजकीय उतरंडीत जितक्या खालच्या पायरीवर असतील तितका त्यांचा इगो जास्त फुगतो आणि सुखावतो. मुख्य म्हणजे इतर काहीही रचनात्मक न करता उपद्रवमूल्य दाखवायला दिवसाचे काही ठराविक म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपये मिळाले तर कोण थोर पुरुषांची शिकवण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करेल? त्याला कुवत लागते आणि असल्यास बुद्धी वापरावी लागते, आणि तेवढे कष्ट घेण्याची यांची तयारी नसते. त्यापेक्षा वरून पैसे आणि आदेश आला की असली कामे ठरत फिरण्यात धन्यता वाटत असेल तर नवल काय?

तस्मात, व्हीडीओतल्या त्या ताईंनी ज्या आईच्या मायेने त्या मुलांना समजावलं ते त्यांचं कृत्य अत्यंत स्तुत्यच आहे. पण... असो. आपण आशा सोडू नये, एखादा तरी या घाणीतून बाहेर पडला तरी आपलं यश समजायचं. बाकी भगवान शकरांवर सोडून देऊया.

हर हर महादेव 🙏🏻

राजकीय बंद


🖋️ मंदारपंत जोशी

Friday, December 16, 2022

खाण तशी माती: देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम

खाण तशी माती अशी एक म्हण आहे मराठीत, त्याची आठवण झाली. 

देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम चा डँबिसपणा पहिल्या फोटोत दिसेलच. तिचे तीर्थरूपही काही कमी नाहीत. त्यांनी तर प्रचंड मोठा घोटाळा केलेला आहे. घोटाळे म्हणायला हवं.

या इसमाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे व  आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांबरोबर काढलेले फोटो दाखवून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी व्यक्ती असल्याचे भासवून: 

(१) International Youth Committee (IYC) च्या नावे देशी आणि विदेशी विद्यार्थ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत.

(२) हे साहेब तीस्ता सेटलवाडचे पुर्वोत्तर भारतीय घोटाळाबंधू असून दंगलग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर स्त्रोतांद्वारे आणि दानाद्वारे कोट्यावधी रुपये जमवले आहे.

(३) या साहेबांवर २०१६ची एक गुन्हेगारी केस प्रलंबित असून मुख्य न्याय दंडाधिकारी, इम्फाळ पूर्व यांनी त्याला फरार घोषित केलं होतं.

आणि देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया म्हणते आम्ही गरीब. 

Licypriya Kangujam KKSingh


सोशल मिडियाने बातम्या समपातळीवर आणून ठेवल्या आहेत (created a level playing field). खाती ब्लॉक करणे वगैरे प्रकार असले तरी एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता तपासणे अगदी सोपे झाले आहे. डाव्यांचा सोशल मिडियावर नियंत्रण आणण्याचा आग्रह असण्याचं कारण हेच आहे की "अरेच्या, तुम्हाला खरं कळतं, आणि तुम्ही ते जगाला सांगता पण?" थोडक्यात, सोशल मिडिया नसता, तर हे लोक आपल्याला वर्षानुवर्ष असंच येडे बनवत राहिले असते.


🖊 मंदार दिलीप जोशी

Wednesday, November 30, 2022

डोंबलाचे शेळीब्रिटी

शुक्रवारी २६ तारखेला सकाळी दापोलीला गाडीने चाललो होतो. मुर्डीचा चढ चढत असताना एके ठिकाणी गाडी डावीकडे घेऊन त्या निमुळत्या आणि खड्डेयुक्त रस्त्यावर एका गाडीला जायला जागा करून देताना अचानक त्या गाडीवाल्याने माझं लक्ष वेधून घ्यायला जोरात हॉर्न वाजवला. मी काच खाली केली तर त्याने विचारलं, "मंदार जोशी ना?"

मी दचकून म्हटलं हो.

"हांsssss मला वाटलंच, फेसबुक फोटो वरून ओळखलं मी!"

हे कमाल आहे, आता लोक चालत्या गाडीतून पण ओळखू लागले 😁

पण कसं आहे, की आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन सेलिब्रिटी आहोत, आपल्याला चार लोकं ओळखतात, अशा समजुतीत राहून डोक्यात कधी हवा जाऊ देऊ नये.

फार पूर्वी धर्मेंद्रची एक मुलाखत वाचली होती. त्यात त्याने एक किस्सा सांगितला होता तो जसा आठवेल तसा सांगतो. तो एकदा एकटाच गाडी चालवत आपल्या गावाकडे चालला होता. वाटेत त्याला एक खेडूत रस्त्याने चालत असलेला दिसला. आपण त्याला लिफ्ट देऊ, मग तो आपल्याला धर्मेंद्रने कशी लिफ्ट दिली हे सगळ्यांना सांगेल वगैरे मनात मांडे खाऊ लागला. धर्मेंद्रने गाडीत बसायला सांगितल्यावर तो बसला, पण गाडीत तो काहीच बोलेना. धर्मेंद्रने बळंच विचारलंन तेवढ्या प्रश्नांची त्याने थोडक्यात उत्तरे दिली इतकंच. त्याचं ठिकाण आल्यावर त्या खेडुताने मला इथे उतरवा असं सांगितलं.

धर्मेंद्रने गाडी थांबवल्यावर त्या खेडुताने खिशातून दोन रुपयाची नोट काढली आणि धर्मेंद्रच्या हातात ठेऊन शांतपणे आपल्या मार्गाने निघून गेला.

माझ्याही बाबतीत असंच एकदा झालं होतं. एकदा केळशीच्या उत्सवाला बाहेरगावाहून आलेल्या एक बाई मला शोधत असल्याचं समजलं, ब्लॉग लिहिणारे मंदार जोशी आलेत का असं विचारत होत्या. एका काकांनी आमची भेट घालून दिली. पुढचा काही वेळ मी हवेत होतो.

उत्सवात जो गोंधळ असतो त्यात एकाचा आवाज आणि उच्चार मला फार आवडतात म्हणून मी नेहमी पहिल्या रांगेत समोर बसत असे. त्यामुळे तो गाववाला मला ओळखतो असा माझा समज होता. एकदा प्रसादाचं जेवण आटपल्यावर तो जरा टेकला होता तिथे जाऊन मी ओळखीचं हास्य केल्यावर त्या व्यक्तीने मला विचारलं,

"कुणाकडे उतरलात?" 😁

तस्मात, फार हवेत उडू नये. ब्रह्मांडात जिथे आपली सूर्यमाला एवढूशी आहे, तिथे तुम्ही आम्ही कोण?

🖋️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, November 1, 2022

खर्रा इतिहास: फटाक्यांचा शोध

जिल्लेइलाही बादशहा जलालूद्दीन अकबर साहेब एकदा जश्न-ए-दिवटे निमित्त काय खास गोष्ट करावी असा आपल्या दिमाग-ए-मस्तिष्क मध्ये विचार करत बसले होते. ही गोष्ट त्यांना फार नवीन होती. पण वतीने विचार करणारा बिरबल काशीयात्रेला सुट्टीवर गेल्याने त्यांना हे काम करण्यास आत्मनिर्भर होणे जरुरीचे होते. या आधी मुल्क-ए-हिंदुस्थानात कुणीही केली नसेल अशी धमाल उडवून द्यावी आणि आवामचे दिल आपल्याबद्दलच्या मोहोब्बत ने भरून टाकावे असे त्यांना वाटत होते. 

काहीतरी कल्पना मिळेल म्हणून त्यांनी टीव्ही लावला. #झीट_मराठी नावाच्या वाहिनीवर कुठलीतरी आजी आपल्याच नातवाला विहिरीत ढकलून कसे ठार मारायचे असा विचार करत असलेली दिसली. बादशहा सलामतांना ती कल्पना फारशी पसंद आली नाही. मग त्यांनी चॅनल बदलला. #ठार_प्रवाह वर एक सासू आपल्या सुनेला शिऱ्यात विष घालून मारायची योजना आखत असल्याचे त्यांना दिसले. माणसं मारायचे हे असले अहिंसक प्रकार पाहून त्यांना बहुत गुस्सा आला. बादशहा सलामत जिल्लेइलाही जलालूद्दीन अकबर साहेबांच्या चौतीसाव्या बेगम साहिबांच्या वालीदा अर्थात बादशहांच्या सासूबाई #सोनी_मराठी बघत असलेल्या त्यांना दिसल्या. त्या वाहिनीवर एक इसम खोटं नाव सांगून लग्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना दिसलं. "सरळ उचलायचं ना" असं उद्गारल्यावर चौ.बे.वा. दचकल्या आणि त्यांनी चॅनल बदलला. #कलर्स_मराठी वर एक वस्ताद चाळे नामक नट "मला हे पसंत नाही" "मला ते पसंत नाही" असं ओरडत सगळीकडे आग लावत सुटलेला त्यांना दिसला. ही कल्पना मात्र त्यांना आवडली. त्यांनी लगेच चॅनलला फोन लावून वस्ताद चाळेला पाठवून द्या असा हुकूम सोडला.

"ए वस्ताद, बादशहांनी तुला लाल किल्ल्यावर बोलावले आहे" असं म्हटल्याबरोबर त्याने स्वतःची दाढी कुरवाळत खर्जातला आवाज लावून "पण माझी तर आधीच लाल आहे" अशी त्याच्या स्वभावाला अनुसरून आगाऊ टिप्पणी केली. मग बादशहांच्या सैनिकांनी त्याच्या तशरीफ वर काष्ठप्रहार करून ती आणखी लाल केली आणि वस्तादला बादशहा हुजुरांसमोर घेऊन गेले. 

बादशहा ज.म.अकबर सर त्यावेळी तुडुंब खाऊन झोपले होते. अलीकडे (म्हणजे कुणाकडे असे नव्हे, पलीकडच्या उलट) त्यांचे पोट जरा नासाज राहत असे. अशातच ते कुशीवर वळले आणि नेमकं त्याच वेळी त्यांच्या सतराव्या बेगम साहिबांच्या वालीद साहेबांनी दिलेल्या हवाबाण हरड्यांनी करामत दाखवली. ते पाहून वस्ताद चाळेच्या डोक्यात किडा वळवळला. "असं अनेकदा होतंय का?" नाक मुठीत धरलेल्या सैनिकांना त्याने लगेच सवाल पुसला. "हुजुरांना असा त्रास होतो कधी कधी, झोपेतच औषधांचा परिणाम होतो". काही नतद्रष्ट मित्रांच्या नादाने वस्ताद चाळेने एकदा नॅशनल जियोग्राफिकवर बघितलेला एक रिऍलिटी शो त्याला आठवला. सैनिकांकडून मशाल मागून घेत तो बादशहांच्या तशरीफमागे स्वस्थपणे उभा राहिला. त्याला फार वाट बघावी लागली नाही. हवाबाण हरड्यांनी लगेच पुन्हा आपला प्रभाव दाखवला, पण या वेळी जळती मशाल असल्याने ढुsssम्म असा स्फोटक आवाज होऊन मोठा जाळ झाला आणि बादशहा सलामत पटकन जागे होऊन पळत सुटले. 

आणि अशा प्रकारे कन्ट्री-ए-हिंद मध्ये फटाक्यांचा शोध लागला. पण हा इतिहास तुम्हाला विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ६७

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी

Thursday, October 27, 2022

परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे

प्रत्यक्ष आयुष्यात बहुसंख्य हिंदूंनी पुन्हा कुंकु/टिकली/गंध लावायला सुरवात करायला हवी असं नेहमी वाटत असे. मी स्वतः पाश्चात्य कपडे घालूनही मी रोज गंध लावून ऑफिसात जायचो, अजूनही जातो. खरं तर या कपड्यांना सोयीचे/नियमांअंतर्गत मोडणारे कपडे असं म्हणायला हवं. कारण कॉर्पोरेट ऑफिसात धोतर नेसून जाता येत नाही. पण अनेक ठिकाणी कुठल्याही कपड्यांसोबत कुंकू/टिकली-टिळा लावण्यावर बंधन नाही. इस्रोचे अवकाश शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन हे ही कामावर नियमित गंध लावून जात असत. जेव्हा ऑफिसात स्त्रिया टिकली लावून येतात तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व हे फक्त कॉर्पोरेट न राहता त्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते आणि एक प्रकारचं तेज चेहर्‍यावर असल्याचं भासतं. 

प्रत्यक्ष जगण्यात हिंदुत्वाची प्रतीके आणि चिह्ने आपण श्रद्धेने, अभिमानाने, आणि नियमितपणे अंगावर ल्याली पाहीजेत. या विषयावर मी माझ्या पद्धतीने काम करायला सुरवात केली होती आणि पुढेही करत राहीन. पण काल मला एका फेसबुक मैत्रिणीचे संदेश आले (चित्र १) आणि फेसबुकवर आपला वेळ अगदीच वाया जात नाही हे पटलं. कुंकू/टिळा/गंध हे कालबाह्य नाही तर अभिमानाने मिरवावे असे सांस्कृतिक, धार्मिक चिन्ह आहे हे विशेषतः तरुणांच्या मनावर ठसवले गेले पाहीजे. इथे मी कुंकू/टिकली लावण्यामागे विज्ञान, आज्ञाचक्र वगैरे बाबींबद्दल बोलत नाही कारण गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होतील. 
























एक आक्षेप समोर आला की पाश्चात्य कपड्यांवर कुंकू/टिकली लावण्याचा आग्रह बरोबर नाही. पण कुंकू-टिळा हे कपड्यांवर अवलंबून ठेवून आपण त्याचा परीघ मर्यादित करत आहोत. हे लिहीत असताना पाश्चात्य कपड्यांवर म्हणजे जीन्स-टीशर्टवर टिच्चून टिकली लावून फिरणारी एक फेसबुक अविवाहित भगिनी आठवली. तिची पोस्ट सोबत जोडली आहे, अर्थातच नाव झाकून. ती काही हिंदू धर्मातली पंडित नाही, पण तिच्या मनात जी विचारांची सुस्पष्टता आहे ती मला क्वचितच इतर लोकांच्यात दिसते (चित्र २ आणि ३). 





































पोस्टच्या सुरवातीला ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला ती विवाहित आहे आणि घरातली कर्ती स्त्री आहे. नवरा-बायको आणि एक मूल असं कुटुंब आहे. याचा अर्थ  किमान तीन जणं या विचारांनी प्रभावित झाले आहेत किंवा होतील. ते कदाचित इतरांना प्रभावित करतील. यालाच हिंदीत ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणत असावेत.

तुमच्यापैकी कुणी या बाबतीत समविचारी असेल तर मी एकटा काय करु शकतो किंवा शकते असा विचार करुन हताश होऊ नका. मात्र जे कराल त्याला भगवंताचे अधिष्ठान असावे.  

सामर्थ्य आहे चळवळीचे  जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (दा. २०.४.२६)

आपण सूज्ञ आहात, बहुत काय लिहीणे!

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. द्वितिया, शके १९४४


Thursday, October 6, 2022

बॉयकॉट बॉलीवूड आणि युद्धभूमीची निवड

#BoycottBollywood चळवळीला मूर्खात कसं काढायचं याचा आदिपुरुषचा ट्रेलर आणि त्यानंतर सुरु झालेलं प्रिमॅच्युअर रावणदहन हा एक वस्तुपाठ आहे. आत्तापर्यंत सैफचा रावण आणि त्याची मापं काढणार्‍या पोस्टी येऊन गेल्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी रावणाला ठेवण्यात चित्रपटामागच्या शक्ती यशस्वी झाल्या. एकूण पोस्ट्सपैकी ९५% पोस्ट या रावणावर होत्या.

आणि हिंदुत्ववादी / #BoycottBollywood वाले या गुगलीवर त्रिफळाचित झाले.

हा गुगली कसा?


पहिल्या फोटोकडे बघा. तुम्हाला तो आवडलेला नाही, कारण नेहमी, म्हणजे लागोपाठ सिनेमा मागून सिनेमात, नराधम, दुष्ट, अत्याचारी खलनायक मंडळींना नेहमी विभूती, गंध इत्यादी हिंदू प्रतीकं लावलेलं का दाखवायचं? आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.


आता दुसर्‍या फोटोकडे बघा. तुम्हाला तोही आवडलेला नाही, कारण तुमचा व्हिलन कितीही दुराचारी, अत्याचारी, बलात्कारी, थोडक्यात नीचपणाचा कळस असला तरी तो तुम्हाला म्लेंछवेषात वेड्याबिद्र्या पक्ष्यावर आरुढ होऊन आलेला चालणार नाही. आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.

अरे मग तुम्हाला हवंय तरी काय? फक्त बॉयकॉट बॉयकॉट करत आऊटरेज करायचंय? — हे मी नाही म्हणत, बॉलीवूडने तुमच्यावर फेकलेली Strawman Argument आहे. Strawman Argument म्हणजे तुमच्या मुद्द्याला खेचून दुसर्‍या टोकाला नेत "तुम्हाला असं म्हणायचंय का?" या पातळीवर चर्चा आणून ठेवणे. समजा तुम्ही म्हणालात की प्रदूषण कमी होणार्‍या गाड्यांची निर्मिती वाढली पाहीजे, तर समोरचा म्हणतो "म्हणजे काय आता बैलगाड्यांनी प्रवास करायचा का?" याला म्हणतात Strawman Argument. यात आता तुम्ही स्वतःचा मुद्दा बाजूला ठेवून त्याने मांडलेल्या दुसर्‍या टोकाच्या मतावर वाद घालू लागता. तर ते असो.

कथेचा नायक, श्रीराम कसे असले पाहीजेत, माता सीता कशी दाखवली पाहीजे, महाबली हनुमान कसे दिसले पाहीजेत यावर चर्चा फिरण्याऐवजी, चर्चा ही अधर्माचा पुतळा म्हणता येईल अशी व्यक्ती, ज्याच्या निर्दलनासाठी आणि धर्मसंस्थापनेकरता प्रत्यक्ष भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला तो राक्षसराज रावण कसा होता आणि कसा दाखवला पाहीजे यावर केंद्रित झाली. सर्वांनी रावणाच्या गुणांची यादी सादर करुन झाली. थोडक्यात, ही चर्चा "आमचा व्हिलन किनै..." याच भोवती फिरत राहिली.

Saif Ali Khan says Adipurush will ‘humanise’ Raavan, ‘justify his abduction of Sita’ - सैफ एका मुलाखतीत म्हणाला की आदिपुरुष सिनेमा रावणाचा 'मानवी चेहरा' समोर आणेल, सीताहरण योग्य कसं हे सिद्ध करेल.

पण अश्शी कश्शी हेअरस्टाईल रावणाची, अश्शी कश्शी मुघली दाढी रावणाची असं म्हणत, तुम्ही नाई म्हणजे नाही सहन करणार. तुम्ही म्हणणार की आमचा व्हिलन किनै विभूती लावायचा, आमचा व्हिलन किनै वेदविद्या पारंगत होता, आमचा व्हिलन किनै वीणा वाजवायचा, आमचा व्हिलन किनै शिवभक्त..... ब्लाह ब्लाह ब्लाह. मुघल असो वा राक्षस, दोघांचेही वर्तन तसेच होते आणि दोघेही संपवण्याच्याच लायकीचे हे आपण लक्षात घेतलंच नाही.

उद्या सैफने येऊन विचारलं की "तुमचा व्हिलन इतका यंव आणि त्यंव होता, मग तो वाईट कसा? उगाच आला सिनेमा झोडप, आला सिनेमा झोडप करताय!" असं म्हणत आपली, म्हणजे बॉयकॉट गँगची अक्कल काढली तर पुढच्या वेळी आपण गोंधळून नेमका कोणता मुद्दा उचलावा या गडबडीत पुढचा सिनेमा काही कोटी कमावून जाईल.

थोडक्यात, तुम्ही युद्धभूमी चुकीची निवडली या वेळी "खलनायक कसा असायला हवा" ही. हरकत नाही. 
युद्धभूमीची निवड करता यायला हवी. फार लांब नको जायला, पेशवे बाजीराव यांना पालखेडचा विजय कशामुळे मिळाला हे लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. दुर्दैवाने आपण पराभवातूनही शिकत नाही आणि शत्रू आपल्या विजयांचा अभ्यास करुन आपल्याला नंतर व्यवस्थित खिंडीत गाठतो.

पुढच्या वेळी लक्षात ठेवा.

प्रांजळ कबूली: सुदैवाने माझं अकाउंट रिस्ट्रिक्टेड होतं नाहीतर मलाही पोस्टी टाकायचा मोह आवरला नसता, तेव्हा मी जखमी होऊन संघाच्या बाहेर बसलेल्या, आणि त्यामुळे तटस्थ विचार करायची संधी मिळालेल्या खेळाडूसारखा आहे.

© मंदार दिलीप जोशी
विजयादशमी, शके १९४४

Wednesday, September 14, 2022

खर्रा इतिहास: किस्सा ए तालीम

शहजादा असताना औरंगजेब साहेबांना लहानपणापासून शिक्षणात फार रस नव्हता. व्होकेशनल कोर्सेस करण्याकडे त्यांचा अधिक कल असे. मग कुठल्यातरी वर्गात शिवणकामाचा तास सुरु असेल तिथे जाऊन टोप्या वीण, कुठे रफू कर, साडी फेड्....आपलं सॉरी...साडीला फॉल पिको कर, असे उद्योग चालत. मग ते तलवारबाजी शिकले. एकाच घरातल्या सगळ्याच भावांनी मुलुखगिरी करुन कशी चालेल म्हणून ते आपला भाऊ दाराला "दारा, शाळेत शिको" "दारा शिको" असे सतत म्हणत असत. त्यावरुनच भावाचे नाव पुढे दारा शिकोह पडले. पण हा इतिहास विकेंड इतिहासकार तुम्हाला सांगणार नाहीत.



#किस्सा_ए_तालीम
मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
प्रस्तावना: विषवमनुद्दीन खान फोदरी
पान २६, ओळ ४

#म्हैत_नसलेला_औरंग्या #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी




Tuesday, September 13, 2022

वाहवत जाण्याआधी - २: केरळ मॉडेलचे अनाठायी कौतुक

तर मेहेरबान, कदरदान, आणि ईमोशनल साहिबान,

 आज फेसबुकवर एक गंमत वाचली. त्या <पोस्टचा गोषवारा तपशील न गाळता आधी देतो>

देशांत सगळीकडे झाले तसे कैनाकारी, जि. अलाप्पुळा, केरळ येथेही लॉकडाऊनमुळे अकरावीचे बोर्डाचे पेपर रद्द करावे लागले (कैनाकारी म्हणजे छोटं बेटंच असल्याने कुठेही जायला फेरीबोटी व्यतिरिक्त पर्याय नाही.). नंतर पेपरच्या नव्या तारखा जाहीर झाल्या तेव्हा लक्षात आलं की लॉकडाऊनमुळे शाळेत तिथे राहणारी सतरा वर्ष वयाची सॅन्ड्रा बाबू ही मुलगी परीक्षा देऊ शकणार नाही. तिचे आई-वडील रोजंदारीवर काम करणारे मजूर. त्यांनी 'स्टेट वॉटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट'ला विनंती केली, आणि शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवशी केरळ स्टेट वॉटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटनं बंदी असताना पण अलप्पुळाच्या MN ब्लॉक ते कोट्टायमच्या कांजीराम पर्यंत (जवळजवळ ३० किमी) एका मुलीच्या परीक्षेसाठी चक्क ७० जणांची फेरी बोट सर्व कर्मचार्‍यांसह चालवली. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजता पेपर संपेपर्यंत बोट तिथंच थांबून राहायची, आणि तिला परत घेऊन यायची. जाण्या-येण्याचं तिकीट ₹१८. परतीची फेरी करायला चार हजार खर्च येतो. पण केरळ सरकारनं एका मुलीसाठी हा खर्च सोसला. दुसरीकडं महाराष्ट्रात १० लाख मुलांच्या परीक्षा रद्द केल्यात. म्हणूनच केरळची साक्षरता भारतात सगळ्यात जास्त आहे. कोरोना त्यांनाही होता, अडचणी त्यांनाही होत्या. पण मार्ग काढता येणं गरजेचं असतं.

जपानमध्ये एक मुलगी एका स्टेशनवरून रेल्वेनं शाळेत ये-जा करत होती. जपान सरकारनं त्या मुलीसाठी ते स्टेशन तीन वर्षं सुरू ठेवलं होतं...

देश असे घडत असतात.

केरळ मध्ये सॅन्ड्रा ला शाळेपर्यंत नेण्यात ज्या कोणाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभाग होता, त्या सगळ्यांना प्रणाम... 


<पोस्टचा गोषवारा संपला.>

देशातलं उदाहरण देऊन भागलं नाही म्हणून पोस्टमधे जपानला घुसवलंय. तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपानने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे, मग एका मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाची सोय जपान करु शकलं नसतं का? का अशा शेंड्या लावायला जातात कय माहित. असो, पण आपण फॉरेनपेक्षा केरळच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करु.

विल स्मिथने क्रिस रॉकला मारलेली झापड 'बायकोच्या सन्मानार्थ' होती या भाकडकथेवर ज्यांचा विश्वास बसतो त्यांचा या भावनिक गोष्टींनी भारावून जाऊन व्यावहारिक कंगोर्‍यांकडे दुर्लक्ष होणार यात शंका नाही. पण त्यापलीकडे जाऊन माझ्या काही शंका व मुद्दे आहेत त्या मांडतो. 

(१) एवढा हजारोंचा खर्च करण्यापेक्षा त्या मुलीची परीक्षेच्या कालावधीसाठी परीक्षा केंद्राच्या जवळपास राहण्याची सोय करता आली असती ना? सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या ओळखीने (कोण रे तो दहशत म्हणतोय? लब्बाड!) कुठेही सुरक्षित जागी स्वस्तात, खरं तर फुकटातही, रहायची सोय झाली असती. 

तर, अशा प्रकारे सोय झाली असती तर सरकारचा, म्हणजे पर्यायाने करदात्यांचा खर्च पण कमी झाला असता आणि आणि जाण्यायेण्याचा वेळही वाचला असता. तोच वेळ तिला अभ्यासाला मिळाला असता आणि परीक्षा केंद्र जवळच असल्यामुळे कोरोनाकाळात रोज बोटीने जाण्यायेण्याचा ताण तिला सोसावा लागला नसता. तिची परीक्षा ताणविरहित पार पडली असती.

(१) (अ) खरं म्हणजे चर्चनेच आपल्या लेकराची परीक्षा केंद्राच्या जवळपास राहण्याची सोय करुन द्यायला हवी होती. पण त्यांची भूमिका फक्त  धर्ममत परिवर्तन करण्यापुरती असावी, बाकी 'सारी प्रभूची लेकरे' वगैरे वचने नंतर विसरायची असतात असं त्यांना वाटतं का? शंका घ्यायला जागा आहे.

(२) सकाळी अकरा वाजल्या पासून दुपारी पेपर संपेपर्यंत म्हणजे चार वाजेपर्यंत बोट तिथंच थांबून राहायची कारण बाकी फेर्‍या मारायला परवानगीच नव्हती. मग थांबून राहिली यात कौतुक कसलं?

(३) रिकामी बोट असली तरी तिकीट काढायला कंडक्टर लागतोच, तसेच निघताना आणि पोहोचताना जी काळजी घ्यावी लागते आणि कामे करावी लागतात ती करायला आणि चालकाला सहाय्य करायला माणसे लागतातच. मग संपूर्ण क्रू होता यात आश्चर्य काय?

यातल्या मुद्दा क्रमांक एक अ सकट दुसर्‍या आणि तिसर्‍या मुद्द्यांकडे "असेल काही कारण" म्हणून दुर्लक्ष केलं तरी पहिला मुद्दा उरतोच. पण... पण... पण...

  • तशी सोय केली असती तर "बघा बघा आम्ही एका मुलीच्या परीक्षेसाठी किती खर्च सोसला!" आणि "बोट कशी थांबून राहिली" हे रोमँटिसाईझेशन कसं करता आलं असतं? (माणसाने किती narcissistic असावं याला काही मर्यादा?)
  • तशी सोय केली असती तर करदात्यांच्या पैशाने प्रसिद्धी कशी करता आली असती? (कुणाला रे केजरीवालची आठवण झाली? लब्बाड!)
  • बाकी ठिकाणी परीक्षा रद्द केली आणि केरळच्या कम्युनिस्ट सरकारने एका मुलीसाठी बोट चालवली असा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना असं संधीसाधू शरसंधान कसं करता आलं असतं?

तेव्हा, खर्च टाळता येणे सहज शक्य असताना मुद्दाम भरमसाठ खर्चं करुन वर "शिक्षणाला आम्ही कित्ती कित्ती महत्त्व देतो" म्हणून केरळची साक्षरता भारतात जास्त आहे ही मखलाशी करण्यात काय अर्थ आहे? (बरं, ती मुलगी आधीच साक्षर होती हं. साक्षर असण्यासाठी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण व्हावं लागतं हे अजब तर्कट आहे).

यावरुन एक आठवण झाली. जॉर्ज फर्नांडीस यांनी संरक्षणमंत्री असताना कुणालाही बंगल्यात प्रवेश करण्यास धाक वाटू नये म्हणून बंगल्याचे गेट पाडून टाकले होते म्हणेपण एक पाटी लावून कायम गेट उघडून ठेवलं असतं तरी चाललं असतं, आहे ते पाडून आर्थिक नुकसान करणं हे समाजवादी आणि डावेच जाणोत.

कारे भुललासी वरलिया अंगा? दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. 

© मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ. तृतिया, शके १९४४

Sunday, September 4, 2022

धर्मः लवचिकता आणि सोय

खूप पूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली होती. लिहायला कारण असं झालं की सणवार सुरु होण्याआधीच आणि सुरु असताना कर्मकांडांच्या अनुषंगाने अनेक नकारात्मक पोस्ट दृष्टोत्पत्तीस पडल्या. त्या लिखाणाचा साधारण सूर असा की 'मी अमुक व्रतवैकल्ये आणि/किंवा उपास करत नाही, त्यातलं अमुक करत नाही, तमुक करणार नाही, इत्यादी.  त्यावर मी काय लिहीलं होतं ते या लेखनाच्या शेवटी पाहूया.

या गणेशोत्सवाच्या दरम्यानही असं काही लिखाण दिसलं ते वाचून लिहिल्यावाचून राहावलं नाही. अर्थात कुणी काय केलं हा वैय्यक्तिक प्रश्न आहे पण सार्वजनिक पटलावर अशा गोष्टींचं समर्थन दिसलं तर त्यावर भाष्य करणे अपरिहार्य आहे. तसेच, या लेखनातून व्यक्तीवर नव्हे तर प्रवृत्तीवर टीका आहे, किंबहुना टीका करण्याचा नव्हे तर प्रबोधन हाच हेतू आहे. त्यामुळे राग मानू नये. समाजमाध्यमांवर लिहीणार्‍या सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तींनी, आपल्या लिखाणात व्यक्त केलेल्या विचारांना वाचक सकारात्मक प्रतिसाद देत असतील तर अशा लोकांना स्खलनशील वर्तनाला प्रवृत्त न करता धर्मपालनाकडे कसे नेता येईल हे बघितले पाहीजे. मार्ग कठीण आहे, पण दुर्दैवाने लोक वाचून लगेच मान हलवतील असं लिखाण करण्याकडे अनेकांचा कल होत चालला आहे असं दिसल्याने हे लिहीणे भाग आहे. 

K N Krishna Bhat

धर्माची अनेक अंगे असतात, त्यातच कर्मकांड हे एक अंग आहे. धर्माचा र्‍हास घडवून आणायचा झाला की त्यातली अशी अंगे निवडून स्खलनशील मनुष्यस्वभावाला भावेल अशा प्रकारे ती कशी गरजेची नाहीत हे दाखवायचं आणि त्या शब्दांना अपमानकारक पद्धतीने सातत्याने वापरून ते शब्द ऐकताच सामान्यजनांच्या मनात आपल्याच धार्मिक बाबींबाबत चीड उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण करायची ही डावे आणि हिंदूद्वेष्ट्यांची जुनी कार्यपद्धती आहे. असेच दोन शब्द म्हणजे सनातनी आणि कर्मकांडं हे होत. सनातनी म्हणजे धर्माचे काटेकोर पालन करणारा अथवा  करण्याकडे कल असलेला तसेच कर्मकांड म्हणजे आपल्या धार्मिकतेचे ऐहिक प्रकटीकरण किंवा परमेश्वराशी जोडले जाण्याचा एक मार्ग होय.   

आपला धर्म लवचिक आहे. कर्मकांडांच्या संदर्भात याचा अर्थ असा की एखादी प्रथा, परंपरा, नेम आपण पाळत असू आणि एखाद्या वेळी जर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ती प्रथा, परंपरा, नेम पाळणे अशक्य असेल तर त्याने आपल्याला दोष लागत नाही किंवा इतरही काही बिघडत नाही. तिथे ताठरपणा दाखवण्यात अर्थ नसतो कारण ती आपत्कालीन परिस्थिती असते. 

मात्र कर्मकांड ज्याला जमतं त्यानेच करावं, ज्याला जमत नाही त्याने करू नये. आपल्या सोयीने खंड पाडला तरी देव समजून घेईल, भाव हवा, या सगळ्या आपल्या मनाच्या धारणा आहेत, खेळ आहेत, बाकी काही नाही, कारण ते आपल्या सोयीचं आहे. प्रत्यक्षात मात्र नियम म्हणजे नियम असतो. सगुण उपासना आणि कर्मकांड हे हातात हात घालून जाणारे विषय आहेत. ज्यांना कर्मकांडातला कर्मठपणा झेपत नाही, त्यांनी तो करू नये, इतकी साधी गोष्ट आहे. पण आपल्याला झेपत नाहीत त्या गोष्टी अर्धवट करून, मध्येच खंडित करून, त्याचं लंगडं समर्थन करू नये, तेव्हा सामान्य विचारी व्यक्तीने इतका शहाणपणा तरी दाखवायला हरकत नसावी.

उदाहरणार्थ, गणपती बसवणे हे आजीवन करायचे व्रत आहे. मनात आलं तेव्हा फिरायला गेलो आणि मनात आलं तेव्हा बसवला, असं करायला तो काही करमणुकीचं साधन नाही. जेव्हा संस्कृती आणि ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, तेव्हा जे लोक ते आजीवन करतात, पाळतात, त्यांच्याकडून ते कार्य होतं. नाहीतर नाही केलं तरी चालतंय, असे म्हणणारे अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे काळाच्या ओघात अनेक गोष्टी हरवून गेल्या आहेत. धर्माच्या लवचिकतेचा अर्थ ज्याला जेवढे झेपेल तेवढेच करावे. गणपती अखंडित बसवता येणार नसेल तर त्या मार्गाला जाऊच नये, एवढी साधी गोष्ट आहे. मग नित्यपूजा तुम्हाला जशी आणि जेवढी आणि जेव्हा करायची आहे, त्यात तुम्हाला मुभा आहेच की. पण सगळ्याच गोष्टी फक्त आपल्या मनाप्रमाणे आणि सोईप्रमाणे करायला हे काही सहलीचे नियोजन नाही. काही लोक सुरवातीला उत्साहाने दहा दिवस बसवतात, मग झेपत नाहीसे झाल्यावर सात दिवस, पाच दिवस करता करता दीड दिवसावर येतात, मग न बसवण्यासाठी आज काय फिरायला गेलो, उद्या काय महत्त्वाची व्यावसायिक मिटींग होती, अशी काहीही हास्यास्पद कारणे चालतात. ज्यांच्याकडे ठराविक धार्मिक कार्ये ठराविक दिवशी होतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं की सणासुदीचे दिवस म्हणजे फिरायला जाण्याचे दिवस, पार्टी करण्याचे दिवस, सिनेमे बघण्याचे दिवस, खेळायला जाण्याचे दिवस ही अत्यंत घातक कल्पना आहे. आपल्याच पिढीने अशी गैरवर्तणूक केली तर पुढच्या पिढीला पूजा करणे, गणपती बसवणे किंवा इतरही काही नियम पाळणे, म्हणजे अनावश्यकच वाटणार यात शंकाच नाही. 

आपल्या योजनांत व्यत्यय यायला सणवार हे काही अचानक येत नाहीत, त्यांचे दिवस ठरलेले असतात. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे आता आपल्याला पुढील कित्येक वर्षांच्या सणावारांच्या तारखा कळू शकतात. अशा वेळी काही ठरवून करायची असलेली कामं तारखा पाहून करता येतात. नियम पाळणे, व्रतपालन करणे यांना दुराग्रह, ताठरपणा असली स्वतःच्या मनाला शांती देणारी नावं दिली म्हणून आपली चूक झाकली जात नाही. कुठल्याही परिस्थितीत नियम पाळणे याला दुराग्रह म्हणत नाहीत, निश्चय आणि व्रताचरण म्हणतात. व्रत ज्याला जमते त्यानेच करावे, बाकीच्यांनी या भानगडीत पडून परंपरा कमकुवत करण्याचे आणि बिघडवण्याचे काम करू नये. आणि केले तर हे काय चालतं, ते काय चालतं, अशा पद्धतीचे लंगडे स्पष्टीकरण तर मुळीच देऊ नये. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा अचानक आलेल्या अडचणीमुळे खंडित झाल्या तर इलाज नसतो. आजारपण, जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतात. घरी पण पूर्वनियोजन करतांना त्या अनुषंगाने करणं अपेक्षित असतं. देव रागवत नाही, शिक्षा करत नाही हे खरंच आहे. पण आपण केलेले, घालून घेतलेले नियम आपणच काटेकोर पाळणं हितकर. त्यामुळे आज काय फिरायला गेलो, उद्या काय ऑफिसची पार्टी होती, तेरवा आणखी काही, अशा सबबी लंगड्याच असतात.

धर्मात आध्यात्मिक प्रगती सर्वतोपरी आहे असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी हे समजून घ्यावं की 'आपण नेम/कर्मकांड भाव म्हणून पाळावीत सोय म्हणून नव्हे' ही गोष्ट लक्षात येणे हा आध्यात्मिक प्रगतीचाच अविभाज्य भाग असतो. आपल्या सोयीने धर्मकार्य करायची आणि सोयीने खंडित करायची यात आपण आपल्याच नैतिक अधःपतनाला हातभार लावत असतो. मग कसली आध्यात्मिक प्रगती घेऊन बसलात?

आपण अमुक अमुक करत नाही किंवा अमक्या कार्यात क्षुल्लक कारणाने खंड पडला याचं समर्थन करायला समाजमाध्यमांवर कुणाला मोठमोठे लेख लिहावे लागत असतील तर त्याचे दोनपैकी एक अर्थ होऊ शकतो. एक तर आपण जाज्ज्वल्य हिंदुत्ववादी असलो तरी त्याचवेळी किती लिबरल आहोत हे सांगायला सवंग लोकप्रियतेचा आधार घ्यायचा असतो..... किंवा जे असं करतात त्यांचं मन त्यांना खात असतं पण आपण केलं ते कसं बरोबर हे सांगून आणि लोकांची मान्यता मिळवून आपली अपराधीपणाची भावना शमवण्याचा तो प्रयत्न असतो. मन खात राहणं हे काही केवळ अपराध भावनेने होत नाही. आपल्या हातून राहिलं याची हूरहूर, रुखरुख असतेच आणि ते अतिशय साहजिक असतं. अपराधीपणा म्हणा किंवा रुखरुख म्हणा किंवा आणखी काही म्हणा, समाजमाध्यमांवर लोकांचं समर्थन मिळवण्याने जो बूंद से गयी वो लाईक और बदाम से परत नहीं आती.

मी व्रतवैकल्ये व उपास यांच्यासंदर्भात आधी लिहीलं होतं, तेच सर्व कर्मकांडांच्या बाबतीत लागू आहे की ज्यांना करायचे आहेत त्यांनी करावं, ज्यांना करायचं नाहीत त्यांनी ते करू नयेत. पण 'अमुक अमुक केलं नाही किंवा करत नाही' हे लोकांना दाखवायला लहान ते लघुनिबंधाइतकी लांबी असलेले लेख का लिहिता? आज आपण धर्मपालनाच्या बाबतीत तरुण पिढीला नावे ठेवतो, पण तरीही अनेक तरूण तरुणी प्रथा, परंपरा पाळायला उत्सुक आहेत; एखादा केलेला नेम पाळला की त्यांना आनंद देऊन जातो. त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक काही लिहीता येत नसेल तर नकारात्मक तरी लिहू नका. अशा नकारात्मक लेखबाजीने ज्यांना करायची इच्छा आहे त्यांची उत्सुकता व इच्छा तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मारत आहात.

सार हे की परंपरा पाळतांना 'आपल्या सोयीला' प्राधान्य नसावं. ती खंडित करण्यासाठी तसंच प्रबळ आणि अपरिहार्य असं कारण असलं पाहिजे, इतकंच. करायचं नसेल, करु नका. केलंत तर निष्ठेने करा. आणि खंडित केलंतच तर त्याचं केविलवाणे जाहीर समर्थन करू नका.

एक मित्र म्हणतो: With Hindus, it seems the pattern is always towards 'reforming' the religion to suit one's own cravings and convenience, rather than reforming oneself, by using the disciplines of the religion. And I suppose such lack of discipline and commitment, is presented as being "Spiritual but not religious" or "Progressive Scientific temper" etc. Well I can't say I am disciplined either. But I totally own up, I am just lazy, indolent etc., I will try to do better, but will never need the religion to be 'reformed', to fit my fecklessness.

हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे हे वाक्य अनेकदा पळवाटेसारखं वापरलं जातं, कारण धर्मपालन करायचं नसेल तिथे इतर मुद्द्यांच्या अभावी हे एक लक्षवेधक आणि दुर्दैवाने टाळ्या मिळवणारं वाक्य झालं आहे. जिथे धार्मिक बाबींच्या अनुषंगाने हिंदूंमधे नेहमी स्वतःच्या लालसापूर्ती आणि सोयिस्कर वर्तनाला पूरक असं समर्थन धर्मातून मिळवता आलं नाही की धर्मातच त्या अनुसार "सुधारणा घडवून आणणे" याकडे कल दिसतो. आणि मग याच बेशिस्त आणि लेच्यापेच्या वागण्याचे प्रकटीकरण्गं "आध्यात्मिक, पण धार्मिक नव्हे" आणि "प्रगतीशील वैज्ञानिक दृष्टिकोन" वगैरे शब्दांत केले जाते. गंमत म्हणजे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे असाल तर आत्मिक प्रगती घडवून आणाल, काहीतरी बिघडलेली वस्तू असल्यासारखं धर्माला सोयीस्करपणे वाकवून घेणार नाही. कर्मकांडांना कालसुसंगत करण्याच्या नादात आपण काळाबरोबर वाहवत जात नाही ना हे आपल्याच मनाला वारंवार विचारणे योग्य ठरेल.

मी ही माणूसच आहे, माझ्याकडून चुका होत असतील तर त्या सुधारण्याकडे माझा कल असला पाहीजे. प्रगती करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील, पण माझ्यातले दोष सुधारण्याऐवजी त्यांना पूरक असं धर्माला मी कधीही वाकवणार नाही.

तेव्हा जे करायचं ते निश्चयावर दृढ राहून करावं. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे 'उपासनेला दृढ चालवावे'. 

© मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ४, शके १९४४

आभार: परिज्ञा भीमाशंकर पुरी, सौ. राधा मराठे

तळटीपः माणसाने एकदा पायरी ओलांडली की पुढे अंत नाही. आपण घसरतो म्हणजे काय, आपली लिमिट काय यावर विवेचन करणारा एक जुना लेख आहे तो अवश्य वाचावा. 

Sunday, August 14, 2022

हे मातृभू

बरेच दिवस हे रूपांतर करायचं मनात होतं पण अनेकांच्या स्टोरीमध्ये राझी चित्रपटातील "ए वतन, मेरे वतन" हे गाणं ऐकून अचानक स्फुरलं आणि लिहून टाकलं. ते गाणं कितीही सुश्राव्य असलं तरी त्याचा चित्रपटातला संदर्भ आठवून आपल्या स्वातंत्र्यदिनी ते वाजावं हे कुठेतरी खटकत होतं. चित्रपटात पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शाळेत बसवलेल्या मुलांच्या गाण्याचा उपयोग आपला स्वातंत्र्यदिन साजरा करताना होऊ नये असं वाटतं. असंही उर्दू हा प्रकार डोक्यात जातो माझ्या. तर, नमनाला घडाभर तेल झाल्यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रस्तुत आहे या गाण्याचे संस्कृतप्रचुर मराठी रूपांतर. 

मूळ गाण्याच्या चालीवर मनातल्या मनात म्हणून पहा. आवाज चांगला असलेल्या कुणी हे गायचं मनावर घेतलं तरी त्यासाठी अनुमतीची आवश्यकता नाही, लेखनश्रेय दिले तरी पुरेसे आहे. 

हे मातृभू

हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू, मम मातृभू

तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला
तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला

विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू 

रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जरी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू 

सुजलाम रहा तू, सुफलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू

हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू














© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. ३, शके १९४४

Sunday, August 7, 2022

पुस्तक परिचय – स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी

एप्रिलमध्ये रामकथामाला, चित्र ज्ञानेश्वरी या पुस्तकांच्या लेखिका सौ Deepali Patwadkar यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी" हे पुस्तक भेट दिले.

साक्षात दीपालीताईंची भेट आणि वर पुस्तकांच्या खजिन्यात भर टाकायला मिळालेले हे रत्न याने तो दिवस सार्थक झाला!


टीप: मागे भिंतीवर दिसणारी चित्रे दीपालीताईंनीच काढलेली आहेत!

पुस्तक वाचून बरेच दिवस झाले असले तरी त्याबद्दल लिहायला ऑगस्ट अर्थात श्रावण उजाडला.  मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही पण मला काय वाटलं ते व्यक्त करतो. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर चर्च आणि मिशनरी यांच्या कारवायांवर अशा एखाद्या पुस्तकाची गरज होती आहे हे पुस्तक ती नक्कीच पूर्ण करते.

सेक्युलर व्यवस्था म्हणजे separation of Church and Government याचा अर्थ आपण असा घेत होतो की चर्चच्या कारवायांत तिथल्या राज्यकर्त्यांचा सहभाग नसावा. पण चर्च आणि मिशनरी आणि व्यापारी कंपन्या, ब्रिटिश आणि सरकार, हे सगळे वेगवेगळे नसून चर्च आणि मिशनरी यांना युरोपातील सरकारे, राजे महाराजे आणि व्यापारी कंपन्या यांचा पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य होते हे या पुस्तकातून स्पष्ट होते.

किंबहुना सुरवातीचा थोडाच काळ वगळला तर वसाहतवादाच्या हेतूंपैकी नेटिव्ह जनतेला धर्मांतर करून ख्रिश्चन करणे हा वसाहतवादाचा अविभाज्य भाग होता ही बाब हे पुस्तक सप्रमाण सिद्ध करते. इतकेच नव्हे तर एतद्देशीय जनता आणि संस्कृतींच्या बाबतीत ब्रिटिश राज्यकर्त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीचा होता की १७७० ते १९४४ पर्यंत साथीच्या रोगांनी आणि घडवून आणलेल्या दुष्काळांत अंदाजे १३ कोटी भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर सांपत्तिक, संस्कृतिक, आणि मानवी जीवनाची मिशनरी आणि ब्रिटीशांनी जितकी हानी केली आहे त्याची गणती होऊच शकत नाही.

हे पुस्तक लहान असले तरी एक लहानसा बॉम्ब आहे, कारण यात प्रत्येक मुद्दा हा संदर्भासकट येतो. तसेच, शेवटी असलेली परिशष्टे ही परिपूर्ण आणि माहितीचा खजिना आहेत.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना या पुस्तकाबद्दल जास्तीतजास्त जागृती होणे आवश्यक आहे.

हे पुस्तक भारतीय विचार साधनाच्या संकेतस्थळावर इथे उपलब्ध आहे.

🖊️ मंदार दिलीप जोशी
श्रावण शु दशमी, शके १९४४

Friday, August 5, 2022

साम्यवाद: तोंडओळख आणि उहापोह भाग १

The conflict between communism and freedom is the problem of our time. it overshadows all other problems. this conflict mirrors our age, its toils, its tensions, its troubles, and its tasks. on the outcome of this conflict depends the future of all mankind.

साम्यवाद आणि स्वातंत्र्य यातील संघर्ष हा आपल्या काळातली अशी समस्या आहे जी इतर सगळ्या समस्यांना झाकोळून टाकते. हा संघर्ष आपल्या कालखंडाचा आणि त्यातल्या आपल्या कष्टांचा आरसा आहे. या संघर्षाचा निकाल काय लागतो त्यावर समस्त मानवजातीचे भवितव्य अवलंबून आहे.  

George Meany
President, AFL-CIO

[अमेरिकेच्या कामगार नेत्यांत विसाव्या शतकातील एक प्रमुख नेते म्हणून ज्यांचे नाव आजही मानाने घेतले जाते ते हे जॉर्ज मीनी. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जॉर्ज तरूण वयात प्लंबर झाले. सुमारे बारा वर्षांनंतर त्याचा कामगार संघटनेत प्रवेश झाला.  त्यांनी द्वितीय विश्वयुद्धात अमेरिकेच्या राष्ट्रीय युद्ध कामगार संघटनेत (National War Labor Board) अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे (American Federation of Labor) प्रतिनिधित्व केलं. १९५२ ते १९५५ या काळात त्यांनी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे अध्यक्षपद भूषवले. या संघटनेचे अमेरिकेतल्याच काँग्रेस ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन्स Congress of Industrial Organizations (CIO) यात विलिनीकरण होणे ही त्यांचीच कल्पना. विलिनीकरण झालेल्या AFL–CIO या संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी पुढील २४ वर्ष भूषवले. कामगार चळवळ ही सचोटीपूर्ण आणि भ्रष्टाचारमुक्त असावी यावर त्यांचा भर असे. अनेक वर्ष कामगार नेता असूनही जॉर्ज हे घोर साम्यवाद विरोधी होते.]

आपल्यापैकी अनेकांचा असा समज आहे की साम्यवादी पक्ष आज फक्त केरळात सत्तेत आहेत, म्हणजे साम्यवादाचा प्रभाव आकुंचन पावत आहे आणि साम्यवादाचा पराभव झालेला आहे किंवा होत आलेला आहे. पण परिस्थिती तशी नाही. एखादा विषाणू अर्थात व्हायरस ज्याप्रमाणे स्वतः स्वतंत्रपणाने काही करु शकत नाही आणि त्याला वाढायला आणि पसरायला मानवी शरीर लागते, त्याच प्रमाणे सम्यवाद हा स्वतःच्या पक्षाच्या सत्तेत असण्यावर अवलंबून नसून थेट सत्तेत नसतानाही विविध विचारधारांच्या पक्षांत शिरून ते पक्ष आणि विचारधारा आतून पोखरून टाकण्याचे काम करत असतो. अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात. ती ही माणसेच असल्याने कधीकधी आपल्या वागण्याबोलण्यातून काही गोष्टी वेळोवेळी उघड करत असतात, त्यामुळे अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात. 

अमेरिकेचा सांस्कृतिक आणि पर्यायाने सामाजिक र्‍हास हा अशाच आतून पोखरल्या गेलेल्या पक्षांच्या मार्फत घडवून आणला गेलेला आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात बघायला गेलं तर दुर्दैवाने हा रोग आज आपल्या देवघर, कपड्यांचं कपाट, आणि शयनगृहातही पोहोचलेला आहे (कसा ते पुढे पाहूच). तो आणखी पसरायला नको असेल, आणि अमेरिकेचा झाला तसा र्‍हास भारताचा व्हायला नको असेल तर साम्यवाद आणि त्याचे ज्ञात आणि अज्ञात जन्मदाते आणि पुरस्कर्ते यांची तोंडओळख करुन घेणे गरजेचे आहे. हा भाग मुद्दाम लहान ठेवला असून पुढच्या भागात कार्ल मार्क्स कोण होता? साम्यवादाचा तो जन्मदाता होता की त्याच्या आधी अनेक वर्ष जी विध्वंसक प्रवृत्ती बोकाळलेली होती तिला त्याने तात्त्विक मुलामा दिला आणि भरपूर लेखन केलं जे साम्यवादाचा आधार बनलं? साम्यवाद म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाची उत्तरे पाहू. पुढच्या भागात आद्य साम्यवादी, साम्यवादाचा जन्मदाता ज्याला म्हटलं जातं तो कार्ल मार्क्स आणि ज्याच्या जीवावर तो जगत असे त्या फ्रेडरिक एन्गल्स यांची ओळख करुन घेऊ.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण शु. ८, शके १९४४


Monday, August 1, 2022

खर्रा इतिहास: सिलसिला ए मुरब्बा

विकेंड हिस्टोरियन लोकांच्या नादाला लागू नका. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला याचा आमच्याकडे पुरावा आहे. एकदा काय झालं की साधूवृत्तीच्या जिल्लेइलाही औरंगजेब सरांच्या सैन्य अभ्यासात लाडके थोरले बंधू दारा शिकोह अपघाती मरण पावल्यापासून औरंगजेब सर फार म्हणजे फार दु:खात होते. त्यांचं चित्र काढायला छानसा चित्रकारही मिळेना. मग शहेनशहा औरंजेब सरांनी एक आयडीया केली. ती काय ते पुढे कळेलच.

असेच काही दिवस गेल्यावर, आणि दिवस गेल्यावर, बेगम साहेब गच्चीत फेरफटका मारत असताना त्यांना महालातल्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीच्या खिडकीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. नीट लक्ष देऊन ऐकले असता एक लहान मुलगा  "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे रडता रडता म्हणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खरं म्हणजे बेगम पहिल्या मजल्यावर जायला घाबरायच्या. त्याचं काय झालं की एकदा जिल्लेइलाही औरंगजेब सरांचे मरहूम अब्बाहुजूर.... असो. तो विषय पुन्हा केव्हातरी. 

तर धीर एकटवून त्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीत डोकावल्या. तिथे दारा शिकोहचा थोरला सुलेमान एका बरणीकडे पाहून मोठमोठ्याने "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे म्हणत रडत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन बघतात तो काय, त्या बरणीत मरहूम भाऊजींचे शिरकमल...नको कमळ नको...आपण डोकं म्हणूया. तर मरहूम भाऊजींचं डोकं एका रसायनात घालून ठेवलेलं दिसलं. ते पाहताच बेगमना परवाच कोकण सुभ्यातून सरदार जोशुद्दीन आणि सहस्त्रबुद्दीन यांनी पाठवलेल्या कैर्‍यांचे गोड काय करायचे या प्रश्नावरचा उपाय सापडला.  

"कोण आहे रे तिकडे?" असा चारपाच वेळा आवाज देऊनही कुणी ओ देत नाही म्हणून भडकलेल्या बेगमसाहेबांना आपण अजून पहिल्या मजल्यावरच आहोत याचं भान आलं आणि त्यांनी सुलेमानलाच ती बरणी घेऊन बावर्ची खान्यात पाठवलं. तिथेही लोक "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे किंचाळू लागले. बेगम मागोमाग तिथे पोहोचल्या आणि खानसाम्याला नेमकं काय करायचं आहे ते समजावून सांगितलं. 

आणि अशा रीतीने "म्म्म्म्म्म्म अब्बा" या उद्गारांचा मुरांबा असा मुघली अपभ्रंश होऊन तो शब्द मान्यता पावला. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला असल्याचे या गोष्टीवरुन सिद्ध होते. हा खरा इतिहास तुम्हाला कुणीच सांगणार नाही. 

#म्हैत_नसलेला_औरंग्या #सिलसिला_ए_मुरब्बा #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास

मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ८४०, ओळ ८

© मंदार दिलीप जोशी




Tuesday, June 21, 2022

मिथुनदांची हास्यजत्रा - जीने की आरझू

एक सपेरा असतो तो राकेश रोशनच्या एरियात ट्रेसपासिंग करत असतो. त्याला राकेश रोशन 'वा' करतो म्हणून तो बीन बजाके त्याच्या पाळीव नागाला राकेश रोशनवर सोडतो. 

मग राकेश रोशन ओरडून त्याच्या ओळखीच्या...दिल करकचून थाम के बैठीये...हत्तीला बोलावतो. इतके इच्छाधारी नाग आहेत म्हणून प्रेक्षकांना बोअर होऊ नये म्हणून एक इच्छाधारी हत्ती आणलाय.

तर तो इच्छाधारी हत्ती नागाला सोंडेने लांsssब फेकून देतो आणि सपेऱ्याला ढिशुम करतो. 

इतकंच नव्हे, मेहेरबान कदरदान, दिल करकचून थाम के बैठीये, तो हत्ती त्या सपेऱ्याच्यात हातातली 'बीन' घेऊन स्वतः वाजवतो आणि आपल्या दोस्तीतल्या नागाला सपेऱ्यावर सोडतो आणि तो नाग त्या सपेऱ्याला चावून खतम करतो. 

मात्र तो सपेरा मरण्याच्या आधी आपल्या मुलाला म्हणजे मिथुन चक्रवर्तीला लांबलचक भाषण देतो. त्यावेळी तिथे त्यांची फॅमिली फ्रेंड रती अग्निहोत्री असते. मिथुन पण नाग असतो म्हणे आणि त्याने कुणा बाईला "प्यार केला" तर त्याच्या विषाने ती मरेल त्यामुळे किसीसे प्यार मत करना असं सांगून तो सपेरा (एकदाचा) मरतो. 

मिथुनला अचानक आठवतं की आपण मघाशी रानात शेण खायला गेलो होतो तेव्हा बिंदीया गोस्वामीला 'प्यार करून' आलोय. तो धावत जातो तेव्हा बिंदीया गोस्वामी काळीनिळी होऊन मरून पडलेली असते.

पुढे ऐका. दिल करकचून थाम के बैठीये. बिंदीया गोस्वामी राकेश रोशनची बहीण असते. आणि रती अग्निहोत्री आणि राकेश रोशनचं लफडं असतं.

आहेकिनै मज्जा.

मग मिथुनने आणखी एकीला प्यार करून निळी केल्यावर राकेश रोशनला संशय येतो आणि दोघांची हाणामारी होते. मिथुन मनुष्यरूपातच राकेश रोशनला चावायला जातो (शी घाणेरडा) तर राकेश रोशन बाजूला झाल्यामुळे चुकून एका केळीच्या झाडाला चावतो आणि ते झाड निळं पडतं. हे पाहून मी उगाचच हातातलं केळं खाली ठेवलं.

नंतर हृतिकचे पप्पा आणि रती अग्निहोत्री यांचं एक द्वंद्वगीत असतं. त्यात हत्तीला कंपनी म्हणून एक साक्षर माकड पण असतं. राकेश रोशनच्या वतीने परस्पर, त्याने काहीही न सांगता ते माकड हत्तीच्या अंगावर "मुझे माफ करो" असं लिहून रतीला दाखवून येतं. मग रती पाघळते. नंतर मिथुनला रती अग्निहोत्रीवर प्यार आता हय तेव्हा रतीचे साक्षर माकड मिथुनवर मुंगूस सोडतं आणि रतीला वाचवतं. 

 इंग्रजीत Arjoo ऐवजी ArZOO का लिहिलंय ते तेव्हा मला कळलं. या स्टेजला मला वाटून गेलं की सिनेमा संपता संपता पेंग्विन पण येऊन जाईल. पण तसा काही चिमित्कार बघायला नाही मिळाला.

शेवटी एकदा शंकराच्या देवळातला नाग मिथुन चक्रवर्तीला चावतो आणि त्याला पूर्णपणे माणसात आणतो आणि सिनेमा संपतो. 

🖋️ मंदार दिलीप जोशी

Saturday, May 28, 2022

पॉर्नः समाजस्वास्थ्य पोखरणारी कीड

सेक्स, मैथून, कामप्रेरणा, अशी विविध नावे आणि विशेषणे असणारी ही भावना पोटाच्या भुकेइतकीच आदिम आणि नैसर्गिक आहे. पण इतर कुठल्याही भुकेसारखी किंवा भावनेसारखीच ही भावना अनिर्बंध होऊन चालत नाही. आयुष्याच्या व्यवस्थापनात कामेच्छेचेही नियमन एक अविभाज्य अंग आहे. कामभावनेची कमतरता किंवा अभाव आयुष्याचे, शुष्क वाळवंट करते तर कामेच्छेचा अतिरेक ही व्यक्तीच्या आयुष्यात भयंकर वादळे घेऊ येतो, तसेच त्याची न झालेली पूर्तता फक्त त्या व्यक्तीलाच नव्हे तर इतरांनाही त्रासदायक ठरते. 'अती तिथे माती' ही म्हण इथे चपखल लागू होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अर्थातच वाईट, म्हणूनच टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती होणे यापेक्षा मध्यममार्ग साधणे हे अर्थातच आवश्यक आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक संस्कृतीने मनुष्याच्या कामवर्तन नियंत्रित करायचा सल्ला दिला आहे. विशेषतः भारतीय संस्कृती कामभावनेचे अनैसर्गिक दमन किंवा स्वैराचार ही दोन्ही टोके टाळून नियमन करण्यावर भर देते. वात्स्यायनापासून ते डॉ सिगमंड फ्रॉइडपर्यंत अनेकांनी या विषयावर संशोधन, लेखन केलेलं आहे. मानवाला पुढे घेऊन जाणारी ही भावना आहे. तथापि, लैंगिक जीवनाचा उहापोह इतका व्यापक विषय या लेखाचा नाही.   

आपण या लेखात वाचणार आहोत ते जगात सर्वाधिक उलाढाल असलेल्या आणि सामाजिक आरोग्याला पोखरून टाकत असलेल्या एका 'इंडस्ट्री' बाबत. ती इंडस्ट्री आहे पॉर्नोग्राफी अर्थात पॉर्न म्हणून ओळखले जाणारे मनोरंजनाच्या क्षेत्रातले आघाडीचे क्षेत्र. रेल्वे/बस स्थानकांवर मिळणारी बारीकशी पिवळी पुस्तके असोत वा मोबाईलच्या एखाद्या 'लपलेल्या कप्प्यात' ठेवलेल्या क्लिप्स. आज पॉर्न व्यवसाय जगात जवळपास सर्वदूर पसरला आहे. इंटरनेटवरील वरील विविध संकेतस्थळे याबाबत आघाडीवर आहेत. फार कशाला? 'सनी लिओनी' या नावाचा गुगलवर सगळ्यात जास्त धांडोळा घेतला जातो ही सत्यपरिस्थिती आहे. बहुतांशी या संकेतस्थळांचा उपयोग स्व-समाधानासाठी केला जातो. 

Pornhub

अमेरिकन फिल्म इंडस्ट्री अर्थात हॉलीवूडपेक्षाही तिथल्या पॉर्न क्षेत्राची कमाई जास्त आहे. इतकंच नव्हे, तर गुगलची 'सेवा' घेणार्‍या लोकांपेक्षा पॉर्नहब (Pornhub) आणि xvideos या आघाडीच्या दोन पॉर्न संकेतस्थळांना भेट देणारे लोक संख्येने जास्त आहेत. या संकेतस्थळांच्या दर्शकांची संख्या नेटफ्लिक्स वा अन्य तत्सम ओटीटी प्लॅटफॉर्महुन अधिक आहे यावरुन याची व्याप्ती लक्षात यावी. आपल्याकडे अनेक गोष्टींची सुरवात ही युरोप आणि अमेरिकेतून आलेल्या अनेक गोष्टींच्या अंधानुकरणाने होते. मनुष्यस्वभाव हा स्खलनशील असल्याने प्रामुख्याने सामाजिक व नैतिक अधःपतन घडवून आणणार्‍या गोष्टींचे इथे झटपट अनुकरण होत असल्यास नवल नाही. जगभरात लोकप्रिय (?) होत असलेल्या या क्षेत्राचे चाहते भारतातही मुळीच कमी नाहीत. गुगल ट्रेन्ड्सचा मागोवा घेतला, तर जागतिक स्तरावर पॉर्न साईट्स बघण्यात भारताचा तिसरा क्रमांक असून शहरांचा विचार केला तर संपूर्ण जगात नवी दिल्ली, मुंबई, आणि पुणे ही शहरे पॉर्न कंटेंट आणि साईट्स शोधण्यात (highest search volume) शिखरावर आहेत. पॉर्नहब या पॉर्न संकेतस्थळाच्या एका अहवालानुसार या साईटचे भारतातले अर्धे वापरकर्ते ही साईट प्रामुख्याने आपल्या मोबाईलवर बघतात, आणि या संकेतस्थळाचा वापर करणार्‍या भारतीयांपैकी महिलांची संख्या लक्षणीय, नेमकं सांगायचं तर ३०% आहे. मात्र केवळ नेटवर पॉर्न पाहण्यापर्यंतच आता भारतीय मर्यादित राहिलेले नसून तसा कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा आपल्या देशात एक मोठा व्यवसाय बनला आहे. 

याच संदर्भात शोध घेत असता People vs Larry Flynt हा एक अप्रतीम इंग्रजी चित्रपट बघायला मिळाला. याच चित्रपटामुळे माझा हा लेख लिहीण्याआधी प्रचंड गोंधळ झाला होता. आधीच वूडी हॅरलसनच्या अभिनयाच्या प्रेमात असल्याने आणि त्याचं यातलं मधलं जबरदस्त काम मनात कोरलं गेल्याने या चित्रपटाचा बर्‍यापैकी प्रभाव मनावर होता. त्याच बरोबर मूळ विषय खूप गंभीर असल्याने लेख हा चित्रपटाचं समीक्षण वाटू नये याची काळजी घ्यायला लागणार होती. लिहीत गेलं की गोंधळ दूर होईल असे वाटले आणि झाले देखील तसेच. असो, पुन्हा विषयाकडे वळूया. 

Playboy Penthouse Hustler

या चित्रपटाचा 'नायक' लॅरी फ्लिन्ट हा अमेरिकन पॉर्न क्षेत्रातील एक आघाडीची असामी होती. नेमकं सांगायचं तर लॅरी फ्लिन्ट हा पॉर्नच्या दुनियेत नेहमीच पहिल्या ५० च्या यादीत असायचा. आपण पॉर्न क्षेत्रातल्या पैशाबाबत बोलत आहोत तर याच्या कमाईकडे पाहूया. एकट्या १९९८ या वर्षी फ्लिन्टनं ५१,११२ मासिकं आणि ७,८१२ पॉर्न चित्रपट यातून एका वर्षात १३ कोटी डॉलर्स कमावले होते. "प्लेबॉय" आणि "पेंटहाऊस" या मासिकांशी स्पर्धा करण्यासाठी "हसलर" (Hustler) मासिक काढणारा, “हस्टलर एंपायर”चा सर्वसर्वा फ्लिंट प्रौढांसाठी असलेल्या अनेक वेबसाईटसचा गर्भश्रीमंत मालक होता. या मागचा इतिहास मोठा रंजक आहे. १० फेब्रूवारी २०२१ रोजी तो मरण पावला तेव्हा तो सुमारे ४० ते ५० कोटी डॉलर्सची संपत्ती मागे सोडून गेला. कहर म्हणजे या माणसाची व्हीलचेअर सोन्यानं मढवलेली होती [मार्च १९७८ मधे ग्विनीट काऊंटी न्यायालयाबाहेरच (Gwinnett County Courthouse) एकानं त्याला गोळी घातल्यावर त्याचं कमेरपासून खालचं शरीर लुळं पडलं आणि लॅरीला कायमचं अपंगत्व आलं).

पुढे वाचण्याआधी आपल्याकडे काही वर्षांपुर्वी पेप्सी आणि कोकाकोला या शीतपेयंच्या कंपन्यांत रंगलेलं जाहीरात युद्ध आठवा. तर, खास अमेरिकन शौकीन पण उच्चभ्रू वर्ग डोळ्यांसमोर ठेऊन ह्यू हेफनर (Hugh Hefner) या प्रकाशकाने १९५३ साली प्लेबॉय मासिक सुरु केलं. बॉब गुचिओनी (Bob Guccione) याने 'प्लेबॉय' ला स्पर्धा म्हणून १९६९ साली 'पेंटहाऊस' हे मासिक काढलं. 'प्लेबॉय' चा लोगो होता 'बनी'. पेंटहाऊसची जाहीरात अशी होती की एका रायफलच्या निशाण्यावर असलेलं एक 'बनी' आणि “आम्ही सशाच्या शिकारीला निघालो आहोत” हे घोषवाक्य. ही जाहीरात खूप गाजली. या दोन्ही मासिकांची लोकप्रियता शिखरावर असताना लॅरी फ्लिन्ट या धन्य पुरुषाने १९७४ साली “हस्टलर” हे मासिक सुरु केलं तेव्हा त्याने घोषवाक्य वापरलं - “एनीवन कॅन बी अ प्लेबॉय अ‍ॅन्ड हॅव अ पेंटहाऊस बट इट टेकस अ मॅन टू बी अ हस्टलर” (Anyone can be a playboy and have a penthouse but it takes a man to be a hustler!). प्लेबॉयचा बनी, आणि बनीची शिकार करु बघणारं पेंटहाऊस या दोन्हींची एकाच वाक्यात शिकार करणारं हे घोषवाक्य शौकिनांनी डोक्यावर घेतलं यात नवल नाही. इथेही लॅरीचा मनुष्यस्वभावाचा दांडगा अभ्यास म्हणा किंवा पैसा कुठून ओढता येईल याबाबतची हुशारी म्हणा, हे नक्कीच दिसून येतं. एक जण घसरला तर मी त्याही पेक्षा जास्त कसा घसरू शकतो हे दाखवण्यातही आजही अहमहमिका लागलेली दिसते त्याचा मुकुटमणी हा लॅरी होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अश्लीलतेच्या उंबरठ्यावर रेंगाळणारी अनेक इन्स्टा रील्स आठवून बघा. हा सगळा इतिहास संक्षिप्त स्वरूपात बघायचा असेल तर “पीपल व्हर्सेस लॅरी फ्लिंट” हा चित्रपट अवश्य पहावा. 

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे पॉर्न कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा भारतात आता एक मोठा व्यवसाय बनला आहे. नजिकच्या भूतकाळात डोकावलं तर या क्षेत्राकडे लोकांचं लक्ष जाण्याचं कारण राज कुंद्राला अटक झाली ही घटना होय,. आर्थिक गुन्हेगारीत प्रतिष्ठित असामी गुंतल्या असण्याचे आता लोकांना नवीन नाही पण या क्षेत्रात असं काही घडलं की देशातल्या भोळ्या(!) जनतेला आजही आश्चर्य वाटतं, आणि यावर जनसामान्यांत होणार चर्चा विनोद आणि मीम आणि अर्थातच ट्रोलिंग इथवर मर्यादित राहते. प्रत्यक्षात ही पाळेमुळे किती खोल गेली आहेत आणि कोण कोण लोक यात सहभागी आहेत याचा अंदाजही लावणे अवघड आहे. तुम्हाला आठवत असेल तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर उठलेल्या धुरळ्यात या क्षेत्राकडे आणि सहभागी व्यक्तींकडे अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निर्देश केला होता. चित्रपट क्षेत्रातील पैसा मोठ्या प्रमाणात पॉर्न आणि त्यानंतर देहविक्रयाच्या क्षेत्रातून येत असल्याचे संबंधित व्यक्तींकडून खाजगी चर्चेत आणि युट्यूबवर असलेल्या मुलाखतींतून अनेकदा कळतं. चित्रपट क्षेत्रात असलेल्या लोकांच्या दृष्टीने मात्र हे सारे नित्यनेमाचं असतं. अचानक राज कुंद्रासारखी मोठी नावे समोर आल्यावर सामान्य वाचक/नागरिकाला धक्का बसतो इतकेच काय ते अप्रूप! आधीपासूनच पॉर्न क्षेत्रात कार्यरत असूनही कुंद्रा प्रकरणात आपल्याला गोवले गेल्याचा आरोप झोया राठोड आणि शर्लिन चोप्रा नामक दोन नट्यानी केला होता ही मोठी गंमतच आहे. कहर म्हणजे गहना वसिष्ठ नामक नटीने तर यात काहीच गैर होत नसल्याची बतावणी केली होती! पॉर्न क्षेत्र हे इंटरनेटच्या आणि कॅमेरा असलेल्या मोबाईलच्या महापुरामुळे आता फार वेगळ्या पातळीवर आणि घराघरांत पोहचलं आहे.

टिकटॉकसारख्या एपवरून जे काही दाखवलं जाऊ लागलं ते अती होऊन पाणी डोक्यावरुन चालल्यामुळेच त्यावर शासनाकडून बंदी आणली गेली, आणि एका जनहित याचिकेचा परिणाम म्हणून २०१५ साली ८५७ पॉर्न वेबसाईट्सवरदेखील बंदी आणायचा निर्णय झाला. आता मोदी सरकारने बंदी घातल्यावर त्याला विरोध हा झालाच पाहीजे हा अलिखित नियम असल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयात कडाडून विरोध झाला. अनेक 'वापरकर्ते' तर पूर्वसूचना न देता अशी बंदी घातलीच कशी म्हणून बाह्या सरसावून सरकारला जाब विचारू लागले. एकीकडे चाइल्ड पॉर्नोग्राफीवर सरकार पुरेशी कारवाई करत नसल्याचं सांगत सरकारला झापणार्‍या सर्वोच्च न्यायालयाने संविधनाच्या २१व्या अनुच्छेदाकडे (वैय्य्क्तिक स्वातंत्र्याचा हक्क - right to personal liberty) बोट दाखवत बंदी कायम ठेवण्याबाबत अंतरिम आदेश द्यायलाही नकार दिला. पॉर्न साईट्स बघता येणे हा आपला हक्क आहे हे सांगत एका इसमाने या बंदीच्या निर्णयाला चक्क हिटलरशाही, एड्स किंवा कॅन्सर किंवा एखाद्या साथीच्या रोगहून वाईट अशा विशेषणांनी संबोधलं. 

अशी बंदी अस्तित्वात जरी आली तरी प्रत्यक्षात मात्र अशी बंदी केवळ कागदोपत्री राहते आणि हे गैरप्रकार सुरूच असतात. पूनम पांडे वा गुंजन अर्स यांसारख्या नट्या त्यांच्या वैयक्तिक एपवरून या प्रकारचे व्हिडीओ शेयर करत असतात. यात कित्येकदा अधिकचे पैसे मोजून 'प्रायव्हेट कॉल'चा पर्याय दिला जातो. आपल्या मेहनतीचे पैसे अशा गोष्टींवर उडवणाऱ्यांची संख्या पाहता पॉर्न हे मोठे व्यसन झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.

वैद्य परीक्षित शेवडे म्हणतात, की "अगदी रोजच्या रुग्णांतही या व्यसनाची चटक लागलेले आणि त्यामुळे एकीकडे मानसिक-शारीरिक आरोग्य हरवत असलेले तरुण हे आमच्यासाठी नित्यअनुभव होऊ लागले आहेत." त्यातच लॉकडाऊनकाळात या क्षेत्राला भरपूर झळाळी आल्याचे चित्र आहे. विशेषतः उत्तर भारतातील गावांतील जोडपी विविध मंचावरून 'Pay per view' तत्वाने आपल्या प्रणयक्रीडेचा बाजार मांडण्याची संख्या या काळात लक्षणीयरीत्या वाढल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर येत आहे. कॅमेरा असलेला मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन या मूलभूत सुविधा असल्या की घराघरांतून असे कंटेंट तयार होऊ लागले आहेत. यात थेट पॉर्न यात मोडणारं कंटेन्ट जसं आहे तसंच सॉफ्ट पॉर्न आणि नैतिकतेची ऐशीतैशी करणारे व्हिडिओ देखील आहेत. कित्येकदा पौगंडावस्थेतील किशोर-किशोरीदेखील यात आपला सहभाग नोंदवत असल्याचे चित्र आहे. कंटेन्ट बनवणार्‍यांना पैसे कमावण्याचे तर बघणार्‍यांना स्वस्तात 'देशी पॉर्न' बघण्याचे अगदी सहजसोपे साधन सापडल्याची भावना आहे! 

कोणत्याही सूज्ञ समाजासाठी हे हितकारक लक्षण नव्हे. या क्षेत्रात बराच काळ काम करून त्यातून बाहेर पडलेल्या जगभरातील कित्येक कलाकारांनी यामागचे भयाण अनुभव कथन केले आहेत. वर्षाला ९७०० कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या पॉर्न इंडस्ट्रीमागचं वास्तव किती भीषण आहे याची आपण कल्पनाही करु शकत नाही. या कलाकारांच्या पॉर्न कारकीर्दीचा कालखंड फक्त सुमारे ३ महिने ते १ वर्ष इतकाच असतो. पौगंडावस्थेतल्या एका वर्षात त्या मुलीचं आयुष्य भकास झालेलं असतं. तिला व्यसनाधीनतेपासून नैराश्यापर्यंत अनेक त्रास सतावत असतात. थोडक्यात, अशा मुली (आणि मुलंही) शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उध्वस्त झालेली असतात. औषधे, शस्त्रक्रिया यांचा वारेमाप आणि घातक वापर या क्षेत्रात सर्रास होतो. पडद्यावर पाहत असलेली चित्रे ही सर्वसामान्य असल्याचा गैरसमज डोक्यात भिनल्याने सामान्य तरुण तरुणीदेखील त्याच संकल्पनांना बळी पडून आपल्या आरोग्याचे नुकसान करतात ही वस्तुस्थिती आहे. प्रजननसंस्था वा संबंधित अवयवांबाबतचे गैरसमज, त्यांचा आकार वाढवण्यासाठीची व्यर्थ धडपड इथपासून ते आत्मघातकी व्यसनाधीनता; इतकी की त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही विचार डोक्यात नाही, स्त्रीदेहाला केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे हे प्रकार तरुणांत लक्षणीयरीत्या वाढत आहेत. या विकृतीला वाट मिळवून देण्यासाठी कोणता थर गाठला जाऊ शकतो/जातो याची कल्पनाही न केलेली बरी. केवळ तरुणच नव्हे तर वयस्क व्यक्तींतही हे वेड जोर पकडू लागले आहे. एका डीसीपीने महिला अधिकाऱ्यासोबत तिचा सहा वर्षांचा मुलगाही सोबत असताना केलेले चाळे पुष्कळ गाजले होते. विवाहबाह्य संबंध हाही याच प्रश्नाचा उपप्रश्न झाला आहे. आपल्या पैशांच्या जोरावर वयाने आपल्या स्वतःच्या मुलीएवढ्या असणाऱ्या मुलींना नादी लावून त्यांच्या आयुष्याचा सत्यानाश करण्याचे प्रकारही समाजात वाढलेले दिसतील. विशेष म्हणजे या प्रकारांत नेहमी मुली अगदी निष्पापच असतील असेही नाही! घडत असलेल्या प्रकाराची पूर्ण जाणीव असूनही काहीतरी खूळ डोक्यात भरवून घेऊन त्यादेखील आपले नुकसान आपल्या हातांनी करून घेत असतात. यातील कित्येकजणी अगदी कळत नकळत ड्रग्स आणि वेश्याव्यवसायात खेचल्या जातात. पर्यटन अधिक असलेल्या भारतातील राज्य/ठिकाणांमध्ये अशा बाबी अगदी मध्यमवर्गीयांच्या घरातून घडत असल्याचे चित्र आहे.

Billie Eilish

जेम्स बाँड चित्रपट मालिकेतल्या ताज्या 'नो टाईम टू डाय' या चित्रपटाचं शीर्षक गीत गाणारी बिली एलिश (Billie Eilish) हिने गेल्याच वर्षी म्हणजे ती फक्त एकोणीस वर्षांची असताना दिलेल्या  एका मुलाखतीत वयाच्या अकराव्या वर्षी पॉर्न चित्रफिती बघायची सवय लागल्याने तिच्या मनावर काय परिणाम झाला हे सांगितलं होतं. आपल्या आयुष्यातील त्या कालखंडाकडे वळून बघताना बिली म्हणते, "पॉर्न हे स्त्रियांसाठी अत्यंत अपमानास्पद प्रकार आहे. मी तेव्हा खूप पॉर्न बघत असे आणि त्या प्रकाराने माझ्या डोक्यावर बर्‍यापैकी परिणाम झाला. पॉर्न बघितल्याची आणि त्यात गुंतल्याची मला लाज वाटते." स्त्रियांच्या शरीराचं अवास्तव चित्र उभं करणार्‍या पॉर्न चित्रपटांवर टीका करताना बिली पुढे म्हणते की "पॉर्नची लोकप्रियता पाहून मला अनेकदा माझा राग आवरणं अवघड होऊन बसतं. पॉर्न बघणं हे ठीक आहे असं मला एकेकाळी वाटायचं हे आठवलं की अनेकदा स्वतःचाच राग येतो. स्त्रीची योनी ज्या प्रकारे या चित्रपटांत दाखवली जाते ते साफ खोटं आहे. कुठल्याही स्त्रीची योनी अशी दिसत नाही. स्त्रीचे शरीर असं दिसत नाही." 

आपले अनुभव सांगताना बिली म्हणाली की पॉर्न बघण्याच्या सवयीमुळे तिचं भावविश्व उध्वस्त झालं आणि याचा तिच्या खाजगी संबंधांवरही परिणाम झाला. "संभोग करण्याच्या सुरवातीच्या काही वेळा मी अशा गोष्टींना नाही म्हणू शकले नाही की ज्या मला आतून कळत होतं की अनैसर्गिक आहेत, चूक आहेत, पण पॉर्न बघण्याचा परिणाम म्हणून मला असं वाटत असे की या गोष्टींचं मला खरं तर आकर्षण वाटलं पाहीजे. बराच काळ कुणी आवडणं आणि त्याच्याशी प्रेमाचं नातं जोपासणं हे माझ्यासाठी अवघड होऊन बसलं होतं. यामुळे एकटीनेच आयुष्य काढावं लागतं की काय असंही अनेकदा वाटत असे. पण मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं आहे." 

घराघरांत अगदी लहान वयापासूनच हातात मोबाईल देण्याची सवय असल्याने नेमके कोणत्या वयात काय पाहिले जात आहे यावर कोणाचेही नियंत्रण नसते. पर्यायस्वरूप हे प्रकार आणखीच खोलवर पसरत राहतात. शृंगाराचे भारतीय संस्कृतीला कधीही वावडे नव्हते. याच देशात कामशास्त्राचा पुरातन इतिहास आहे, हलेबीड-खजुराहो आहे, शृंगार रस हा साहित्यातील नवरसांतील एक असून महाकवी कालिदासाच्या लिखाणात त्याची पुरेपूर पखरण आहे. मात्र हा शृंगार उत्कट आहे; उत्तान नव्हे! त्यालाही स्थल-काळाची बंधने आहेत. विवाहयोग्य झालेल्या स्त्री-पुरुषांनी कामशास्त्र अभ्यासावे असे स्वतः वात्स्यायनांनी लिहून ठेवले आहे. थोडक्यात वयाचा विचारही तेथे आहे. शृंगार आणि बीभत्सपणा यांतील सीमारेषाच पुसून टाकणारे क्षेत्र म्हणजे पॉर्न असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच हा विषय चर्चेला घेण्यापासून टाळण्याची आपली प्रवृत्ती असते. मात्र सुरुवातीलाच योग्य लक्ष दिल्यास पिटीकेचा भगंदर होणे टळू शकते. समस्या आणि तिचा विस्तार लक्षात घेतला तरच त्याचे उपचार सापडू शकतात. 

ही समस्या मुळात सुरू कुठून होते माहित आहे? उत्तर तुमच्यापैकी अनेकांना आवडणार नाही. आज उद्भवणार्‍या अनेक लैंगिक समस्यांचे आणि पसरलेल्या विकृतींचे मूळ हे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे हे आहे. आज फेसबुक आणि व्हॉट्सपवर अनेक जणी आपले फोटो टाकत असतात. अनेक वेळा फिल्टर वापरून मूळ सौंदर्यात भरच पडत असते. नित्यनूतन प्रोफाईल फोटो टाकण्या पुरुषही मागे नाहीत. व्यायामशाळेत जाणारे काही शरीरसौष्ठवपटू आपले सिक्स पॅक्स दाखवत बनियनमधले फोटो टाकत असतातच. याचा पॉर्नशी काय संबंध असं संतापून विचारण्याआधी लक्षात घ्या, की सुरवात वरवर निरुपद्रवी वाटणार्‍या गोष्टीतून आणि कृतीतूनच होत असते. हे उदाहरण देण्यामागचं कारण पुढच्या काही परिच्छेदात सांगतोच. आज या गोष्टी व्यक्तीस्वातंत्र्यात मोडत असल्या तरी याचे परिणाम अतिशय हळू होत जात पुढे अनेक लहानमोठ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी होण्यापर्यंत जाऊ शकतात. 'अति तिथे माती' ही म्हण आपल्याला काही नवीन नाही. सोशल मिडियाचा अतिरेकी वापर टाळा. बदाम खाऊन फायदा आहे, चांगल्या फोटोंवर रेंगाळून ते वाटण्यात नव्हे.

तर, स्त्रीपुरुषांमधला मानसिक व शारीरिक भेद लक्षात घेता आज वैवाहिक जीवनात भेडसावणार्‍या दोन प्रमुख लैंगिक समस्यांचा विचार करताना इथे फक्त 'स्त्रीदर्शन' याबाबतीत इथे विचार करणार आहोत. आजच्या घडीला वैवाहिक आयुष्यात आढळणार्‍या दोन प्रमुख लैंगिक समस्या पुढीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे वैवाहिक आयुष्यात 'शरीरसंबंध ठेवताना प्रत्यक्ष मीलन होण्यापूर्वीच वीर्यस्राव होणे (premature ejaculation)'. आणि दुसरी म्हणजे सतत पॉर्नचा वापर केल्याने उदभवणारी पुरुष नपुंसकता!! दोन्ही समस्यांचा एकत्रित विचार करुया.

कारणे अनेक असली तरी विस्तारभयास्तव आज आपण यातील केवळ एका अतिशय महत्त्वाच्या कारणाकडे पाहूया. ते कारण म्हणजे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे. आयुर्वेद वा योगशास्त्रासह कित्येक भारतीय शास्त्रांनी निव्वळ दर्शनच नव्हे तर 'स्त्रीस्मरण' हे देखील शुक्रस्खलन होण्याचे कारण सांगितले आहे. 'शरीराबाहेर पडणे' ही शुक्राची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, मात्र शरीरातील अखेरचा आणि सर्वोत्तम धातू असल्याने असे सतत होत राहणे आरोग्यास हितकर नसल्याचे आयुर्वेदाचे मत आहे. सध्याच्या काळात समयपूर्व वीर्यस्राव ही समस्या वेगाने वाढत असल्याचा वैद्यांचा प्रत्यक्ष उपचार करत असतानाचा अनुभव आहे. सतत शरीरसंबंधांचा विचार करत राहणे या गोष्टीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. कामेच्छा चाळवणाऱ्या गोष्टींचे वाढते प्रमाण हे यामागील महत्वाचे कारण. पॉर्न फिल्म्सपासून ते आजकाल साबण वा अगदी चहाच्या जाहिरातींपर्यंत सर्वत्र स्त्रियांचे उपभोग्य वस्तू म्हणून अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने केले जाणारे प्रदर्शन हेदेखील यास कारणीभूत आहे. वैद्यपंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांसारखे ज्येष्ठ वैद्य आपल्या ग्रंथात म्हणतात की "ही परिस्थिती पुढे इतके गंभीर स्वरूप प्राप्त करते की काही रुग्णांत केवळ स्त्रीचा आवाज ऐकून वा अगदी पैंजणांचा आवाज ऐकूनही वीर्यस्राव होऊ लागतो." वैद्यांनी अशा प्रकारच्या कित्येक केसेस हाताळल्यावर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लहानपणापासून कळत नकळत झालेला चुकीच्या जाहिरातींचा मारा आणि ही अडचण सांगण्यासाठी योग्य वेळी कोणीही योग्य व्यक्ती उपलब्ध नसणे. प्रसारमाध्यमांतील आक्रमक जाहिरातींबाबत इथे मांडलेले मत ज्यांना मान्य होणार नाही त्यांनी याबाबत मानसशास्त्र या विषयातील नामवंत वैज्ञानिक नियतकालिकांतील संशोधने जरूर अभ्यासावी. 'परदेशात असं काही का होत नाही?' असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यांना बापड्यांना कदाचित परदेशातील एकंदरीत सांस्कृतिक रचना आणि त्यांच्या समस्या यांबद्दल माहितीच नसावी. अर्थात या समस्येकरता केवळ प्रसारमाध्यमे दोषी आहेत असे माझे मत नसून आपले हरवत चाललेले नियंत्रण हे सर्वाधिक कारणीभूत आहे. वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असल्यास, आणि एकंदरच शरीर व मनाचा विचार करताना वैय्यक्तिक आयुष्य आरोग्यपूर्ण ठेवायचं असल्यास आपला सोशल मिडियात असणारा अतिरेकी वावर (आणि वापर), भडक जाहिराती, आणि साहित्य यांपासून दूर राहणे तसेच आवश्यकता भासल्यास वंध्यत्व विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने आयुर्वेदीय उपचार व ध्यान इत्यादींची मदत घेणे हे लाभदायक उपाय आहेत हे कायम लक्षात ठेवावे.

पुरुष नपुंसकतेचा विचार करताना आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया. आयुर्वेदानुसार तेरा शारीरिक प्रक्रियांचा उल्लेख 'अधारणीय वेग' यांमध्ये केलेला आहे. अधारणीय वेग म्हणजे अडवू नयेत अशा शारीरिक क्रिया. उदा. लघवी वा शौचाची भावना. शुक्राचा समावेशदेखील या तेरा वेगांत केलेला आहे. थोड्क्यात; शुक्रवेगाची इच्छा झाल्यास ती टाळू नये. मात्र असे सांगतानाच 'वेगान् न उदीरयेत।' म्हणजेच या क्रिया बळजबरीनेदेखील करू नयेत असेही आयुर्वेद बजावतो. खरी गोम इथेच आहे!

बहुतांशी वेळेस उत्तेजना मिळवण्यासाठीच पॉर्नचा वापर होतो. थोडक्यात; इथे शुक्रवेग 'उत्पन्न केला जातो'. स्वाभाविकपणे या क्रियेचे दूरगामी दुष्परिणाम होत असतात. यातील सगळ्यात प्रमुख दुष्परिणाम म्हणजे पुरुषांच्या जननेंद्रियाचे कार्य योग्य पद्धतीने न झाल्याने उद्भवणारे नपुंसकत्व. स्त्रियांमध्येही कामेच्छा कमी होण्यासारखे दुष्परिणाम या सवयीमुळे होऊ शकतात. आयुर्वेदाचे मत पटत नसेल तर 'सायकॉलॉजी टुडे' हे नामांकित मनोवैज्ञानिक नियतकालिक काय सांगते पहा. [Robinson, Marnia, and G. Wilson. "Porn induced sexual dysfunction: A growing problem “, í." Psychology Today, July 11 (2011).]. बिनवैद्यकीय संदर्भ म्हणून पॉर्नलँड हे गेल डाईन्स लिखित पुस्तक वाचण्यासरखे आहे. 

या संशोधनानुसार आज जगभर या समस्येने गंभीर रुप धारण केलेले असून; वयाच्या २० व्या वर्षांपासूनच पुरुष जननेंद्रियाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याने नैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यास अशा व्यक्तींमध्ये असमर्थता दिसून येते. आयुर्वेदीय सिद्धान्त आज जगभरात आपले महत्व दाखवत आहेत त्याचा आणखी एक पुरावा. याशिवाय आजकाल 'एव्हिडन्स बेस्ड रिसर्च' आहे का? असं विचारण्याचं फॅड असल्याने हे उदाहरण सहज नमूद करत आहे.

यावर उपाय काय? पॉर्न बघणे या व्यसनापासून दूर जाण्यासाठी पुन्हा आयुर्वेदही फायदेशीर आहे. आयुर्वेद व्यसन सोडवण्याची जी प्रक्रिया सांगतो तीच यासाठी उपयुक्त आहे. ती म्हणजे अपथ्याचा क्रमाक्रमाने त्याग करणे. हा क्रम पादांश अर्थात एक चतुर्थांश असा असतो. १/४ - १/४ या क्रमाने हे व्यसन सोडवावे लागते. (ही संकल्पना शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांकडून नीट समजावून घ्यावी.) सोबत ध्यानधारणा, योग आणि व्यायाम यांचा आधार घ्यावा. एकदम सोडायला गेल्यास चिडचिड, अन्य व्यसनांकडे ओढ अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात.

आपल्या आंबटचवीच्या शौकाचा अतिरेक करून आयुष्याची माती करून घेऊ नका इतकीच प्रामाणिक इच्छा.

----------------------------------------------------------------

संदर्भ श्रेयः'या लेखातील वैद्यकीय संदर्भ वैद्य परीक्षित शेवडे यांच्या सौजन्याने' इतकंच श्रेय मर्यादित ठेवू इच्छित नाही. कारण इतक्या संवेदनशील विषयावरचे वैद्यकीय आणि तत्सम संदर्भ गोळा करा, मग ते तपासून घ्या, आणि तदतर ते टंकलिखित करा हे आणि इतके माझे कष्ट वाचवण्याचं मोठं काम डॉ शेवडेंच्या लेखनाने करुन ठेवलंच होतं. मी फक्त ते वेळोवेळी जमवत गेलो आणि ते संदर्भ लेखाच्या प्रवाहीपणाला धक्का लागू न देता योग्य ठिकाणी बसवले इतकंच. 

----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ, १३, शके १९४४

Monday, April 11, 2022

मखत्राता श्रीराम

काल रामनवमी होती. रामरक्षा स्तोत्रात श्रीरामांना मखत्राता म्हटलं गेलंय. मखत्राता या शब्दाचा अर्थ यज्ञाचा त्राता असा आहे. 


आता हा शब्द आजच्या परिप्रेक्ष्यात समजून घेऊया.

यज्ञाला त्राता म्हणजे रक्षणकर्ता असण्याची आवश्यकता का भासावी? कारण काही लोकांना त्याचा ध्वंस करण्यात खूप रस होता. यज्ञात असं काय बरं होतं की ज्या कारणे त्यांचा ध्वंस करायला संख्याबळ आणि शस्त्रदल घेऊन यावं लागत होतं?

कारण यज्ञ म्हणजे फक्त त्यात वस्तू टाकून जाळणे इतकंच नव्हतं तर यज्ञातून काही फळे मिळत असत ज्यायोगे यज्ञ करणाऱ्यांचे सामर्थ्य वाढत असे. आता मानवांनी यज्ञ करून सामर्थ्य प्राप्त केलं तर ते दानवांना कसं मानवावं बरं? माणसे लढाऊ वृत्तीची होणे हे दानवांना झेपण्यासारखे नव्हतेच. म्हणूनच यज्ञांचा विध्वंस करायला यायचे. आणि म्हणूनच मखत्राता असण्याची आवश्यकता असायची.

याला मानवी स्वभावाच्या सार्वत्रिक आणि सर्वकालिक परिप्रेक्ष्यात बघा. हे तत्व पुराणकथेपुरते मर्यादित नाहीये, आजही तितकंच महत्वाचं आहे. अशांतीदूत हे तेच मखध्वंसी दानव आणि डावे त्यांचे शुक्राचार्य आहेत.

मखत्राता असण्याची गरज तेव्हा होती, आज आहे, आणि उद्याही असणार आहे... आणि आता कुणीही अवतार घेऊन येणार नाहीये.

तुझमें राम, मुझमें राम, सबमें राम समाया
फिर क्या हिंमत किसीकी जो हमें मारने हात उठाया?

पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

Friday, April 1, 2022

खर्रा इतिहास: अकबरानेच लावला होता एक एप्रिलचा शोध, कहाणी ऐकून व्हाल थक्क

 म. ज. अकबर सर तरुण असताना एकदा बागेत फिरायला गेले. फिरत असताना त्यांना एक युवती त्यांच्या दृष्टोतपत्तीस पडली. तिच्या सौंदर्याने ते मोहित झाले आणि येऊन बादशहा जिल्लेइलाही हुमायूं यांना म्हणाले की हिला उचलू का? 

बादशहा जिल्लेइलाही जहांगीर यांनी लहानग्या जलालुद्दीनला समजावले की बाळा आधी प्रेमाने मागणी घालून पाहू, नाहीच ऐकलं तर उचलायची तयारी आहेच! मग मुघल बादशहांच्या शेहजाद्यांना शोभेल असे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आणि जडजवाहीर, पैसे वगैरे घेऊन मुलीकडे पोहोचले. मुलीला ही सोयरिक मान्य नव्हती पण तिच्या भावाने म्हटलं तू आत्ता राडे करु नको आपण आधी मिळतंय ते पदरात पाडून घेऊ बाकी मी बघतो. "हमारी एक अट हय!" भाऊ शिष्टमंडळाच्या प्रमुखाला म्हणाला. आता हा ऐन वेळी नको म्हणाला तर काय करायचं या विचाराने शिष्टमंडळातल्या जेष्ठ दाढीच्या हृदयाचा ठोका चुकला. बादशहा याचं जे काही करायचं ते करतील पण आधी आपलीच पाळी यायची. तो म्हणाला "ते प्री-वेडिंग शूट वगैरे काही होणार नाही. जे काही शूटींग करायचं ते निकाह नंतर शहजाद्याला करु दे. आधी काही जमायचं नाही." 



"अश्लील! अश्लील!!" शिष्टमंडळात गदारोळ झाला. "अरे क्या हुआ, उसमें क्या अश्लील हय? मैने बोला वो कॅमेरामन को लेकर झाड को लटकनेका प्री-वेडिंग करते हैं ना वो नहीं करनेका. थेट शादी में मिलेंगे". आता कुठे जेष्ठ दाढीचे फुदकणारे हृदय जागेवर बसले. मुलीच्या भावाने घातलेली अट अगदीच सौम्य होती. 

होता होता निकाहचा दिवस उजाडला. इकडे शहजदा जलालुद्दीनला मनातल्या मनात गुदगुला होत होत्या. अखेर पलीकडच्या दालनातून विचारणा करणारा आवाज ऐकू आला, "बेटी क्या तुम्हे शहजादा अकबर वल्द बादशहा जिल्लेइलाही हुमायूं वल्द बादशहा जिल्लेइलाही बाबर से निकाह कबूल है?" याच्या उत्तरादाखल मंजुळ आवाजात "हां, कबूल है" असा आवाज येताच अकबराला भावना आवरेनात. पण निकाह नंतर आम्ही तुम्हाला दख्खनमध्ये फिरायला पाठवू तोवर सबर करा असं बादशहा शहनशहा-ए-आलम जिल्लेइलाही हुमायूं सर म्हणाले. त्या अनुसार दख्खनमध्ये असलेल्या बंगल्यावर दोघांना पाठवण्यात आले. निकाह झाल्यावर मुलाला व नवरीला फिरायला पाठवण्याची कल्पना बादशहा हुमायूं सरांचीच. हुमायूं सरांनी आपल्या बेगमला  खिडकीतून चांद दाखवला होता तेव्हापासून हुमायूं नावाचा हनीमून असा अपभ्रंस झाला. (हे अ‍ॅडिशनल ज्ञान ठेऊन घ्या).

पहिल्याच रात्री घुंघट उचलल्यावर तरुण शहजादा जलालुद्दीन जोरात किंचाळला. समोर जलालुद्दीन ने उद्यानात बघितलेली मुलगी नसून भलतीच कुणीतरी आणा कयूब नावाची वेडसर, मुलगी होती. जलालुद्दीनला गुस्सा आला आणि वेडाच्या भरात "शोधा, शोधा, त्या मुलीला शोधा" असं म्हणाला. पण त्या मुलीचा परिवार तोवर सगळा पैसाअडका घेऊन भारताबाहेर कधीच पसार झाला होता! मग हुमायूं सर म्हणाले, की पदरी पडलं पाक झालं समजून हिला नांदव. आपण सुंदर मुली काय असल्या सत्तावन्न शोधू. शेवटी शहजादा अकबर शांत झाला, पण पुढे बराच काळ तो रात्रीत "शोधा, शोधा" बडबडत असे. म्हणून त्या मुलीचे नाव रंगेबिरंगी इतिहासात "शोधा अकबर" म्हणून प्रसिद्ध झाले.

ज्या दिवशी आपण उल्लू बनल्याचे अकबराच्या लक्षात आले तो दिवस एक एप्रिलचा होता. आपण एकटेच का फूल व्हावे, समस्त हिंदूस्थान आणि जगाने एक दिवस का होईना फूल व्हावे म्हणून एक एप्रिल हा दिवस फूल्स डे म्हणून साजरा करण्याचे शाही फर्मानानुसार जाहीर झाले. 

पण संघी चड्डीवाले हा इतिहास तुम्हाला सांगणार नाहीत. 

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ ५

© मंदार दिलीप जोशी


Thursday, March 31, 2022

वाहवत जाण्याआधी - १: ऑस्करचा फज्जा

तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान,

थोडक्यात पार्श्वभूमी अशी की ऑस्कर सोहळ्यात क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक विनोद केला आणि मग विल स्मिथने स्टेजवर जाऊन क्रिसला ठोसा मारला. हे झाल्या झाल्या अखिल सेंटीमेंटल जगताला पान्हा फुटला आणि या गोष्टींवर चर्चा लगेचच सुरु झाल्या: (१) विल स्मिथभोवती बायकोच्या सन्मान रक्षणार्थ दिवे ओवाळणे [बघा शिका काहीतरी असे टोमणे बोनस म्हणून] (२) कशावरही विनोद करता काय, मग अस्संच पाहीजे बरी अद्दल घडली छाप पोस्ट आणि ट्विट (३) मिसेस स्मिथ यांना असलेला आणि केस गळण्यासाठी/कापण्यासाठी कारणीभूत ठरलेला अ‍ॅलोपेसिया एरेटा नामक रोग. 

ज्यांना स्त्री सन्मान वगैरे वगैरे वरुन फार पुळका आलेला होता त्यांच्यासाठी प्रामुख्याने ही पोस्ट आहे, आणि इतरांसाठीही. इथे मी मिस्टर व मिसेस स्मिथ यांचे खाजगी आयुष्य, त्यांचे लग्न, लफडी यात अजिबात जात नाहीये. काही संवेदनशील भावनिक मुद्दे (Emotional trigger points) असतात. त्यात 'स्त्रियांचा सन्मान' म्हटलं की खेळण्याला चावी दिल्यागत सगळ्यांचे व्हर्च्युअल अश्रू वाहायला लागतात तसे ते इथेही वाहू लागले. म्हणूनच म्हणतो, विल स्मिथने हे बायकोच्या सन्मानाच्या रक्षणासाठी उत्स्फूर्तपणे केलं आणि सगळं खरोखरच घडलं असं मनापासून वाटणाऱ्यांना साष्टांग दंडवत आहे. दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. 

गेली अनेक वर्ष ऑस्कर सोहळा हा गोरे विरुद्ध काळे, मग ट्रम्प विरुद्ध बाकी सगळे या Wokeपणा आणि भंपकपणाने ओसंडून वाहत असल्याने तो सोहळा बघणं सोडून कित्येक वर्ष झाली. म्हणूनच ऑस्कर सोहळा कधी आहे वगैरे माझ्या गावीही नसतं तसं यंदाही नव्हतं. या वर्षी ठोसा कांड झाल्याने विलने क्रिसला मारलेल्या ठोशाचे फोटो आणि त्यावरच्या भावनिक भाष्याने ओथंबून वाहणार्‍या पोस्ट सगळीकडे दिसू लागल्याने सगळे कळलं की आज ऑस्कर सोहळा आहे म्हणजे तेव्हा, २७ मार्चला होता. मात्र सिनेक्षेत्राचा नीचपणा ठावूक असल्याने आणि अशा गोष्टींच्या बाबतीत 'लॉजिकल' विचार करायला शिकल्याने हा स्टंट आहे हे लगेच लक्षात आलं होतं पण कारण हे ऑस्करची घटती लोकप्रियता असावं असं आधी वाटलं. नंतर एकाने आणखी एक कारण सांगितलं आणि ते जास्त संयुक्तिक वाटलं. आज तर त्याचे पुरावेच मिळाले. कारण कोणतं ते सोबतच्या चित्रांतून दिसेलच, त्यामुळे वेगळं सांगायला नको.

क्रिस रॉकला ठोसा मारल्यावर कळवळायच्या ऐवजी तो अजिबात न बिचकता पुढे डायलॉगबाजी पण करतो (याला लोकांनी अभिनय म्हटलं, पण खरा ठोसा खाल्ल्यावर काय होतं ते अमिताभ बच्चनला जाऊन विचारा), त्यामुळे खरं तर सिनेमा ऐवजी याच सीनला ऑस्कर द्यायला हवा होता.

तर मेहेरबान, ऑस्करचे कदरदान, आणि ईमोशनल साहिबान पेश है अनेकांच्या फुग्याला टाचणी. यातल्या दोन लिंक म्हणजे फायझरची स्वतःची त्यांच्याच संकेतस्थळावरची प्रेस रिलीज आहे आणि दुसरी एक ट्विट आहे.

पुन्हा ठळक मुद्दे देतो:
(१) फायझर ट्रायल घेत असलेले एक औषध अ‍ॅलोपेसिया एरेटाच्या औषधोपचारांसाठी असणे

















(२) फायझर ऑस्करच्या स्पॉन्सर्स पैकी एक असणे




(३) क्रिस रॉकने विल स्मिथच्या बायकोच्या केसांवरुन एक अप्रत्यक्ष विनोद करणे

(४) मग विल स्मिथने क्रिसला ठोसा मारणे (क्रिस अजिबात न कळवळणे वगैरे पुनरुक्ती करत नाही)


(५) नेमकं विल स्मिथच्या बायकोला अ‍ॅलोपेसिया एरेटा असणे आणि त्यावर समाजमध्यमांवर भावनिक पूर येणे

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. चतुर्दशी, शके १९४३


ता.क. कुठल्याही रोगाचा अशा रीतीने जाहीर वापर करुन घेणार्‍या हॉलीवूड आणि फायझरसकट सर्व संबंधितांना माझा सविनय आक् थू!