Friday, September 25, 2020

काही नाही, इ-शाळा चालली आहे!

प्रसंग एकः

"अरे, मल्हारचं नाव घेतल्यावर मल्हारनी बोलायचं, बाकीचे कशाला बोलताय?"

- हे बोलताना शिक्षिकेने प्रचंड संयम ठेवल्याचं आवाजात आणलेल्या सुलोचनाबाईं इतक्या आर्ततेवरुन स्पष्ट कळत होतं. पण मुलं आर्तता वगैरे समजण्याच्या पलिकडे गेलेली असतात. 

मी शिक्षक झालो नाही तेच बरं आहे. "अरे काय वर्ग आहे की मासळी बाजार?" असं खेकसलो असतो. 

प्रसंग दोनः मराठीचा तास.

"बाई मी भूप राग म्हणून दाखवू?" असं अनेकदा ऐकल्यावर... "हं आता समीर भूप राग म्हणून दाखवतोय हं, ऐका रे सगळ्यांनी समीरचं!" असं "आलीया भोगासी" च्या चालीवर ताई म्हणतात.

मग समीर भूप राग म्हणतो. सगळे टाळ्या वाजवतात. मग समीर म्हणतो, "बाई आमचे आठ राग शिकून झालेत." आता बाईंच्या आणि बाकी औरंगजेबांच्या पोटात गोळा येतो. तरी आणखी एक दोन जणं नरडं साफ करुन घेतातच. एक जण पियानो वाजवतो. कार्टं पियानो वाजवत असताना मला, "बाई मी 'चलो इक बार फिर से, अजनबी बन जायें हम दोनो' म्हणू का?" असं विचारण्याची सुरसुरी येते पण मी ती "असं मुलांच्या वर्गात घुसू नये" असं स्वतःला मनातल्या मनात बजावून आवरतो. 

त्यात आवाज ब्रेक होत असतो. तरी सगळं झाल्यावर एक जण मधेच, "बाई मी अमुक वाजवू?" असं विचारतो. नेमका तेव्हा आवाज ब्रेक होत नाही. त्यामुळे शिक्षिका, "वाजव बाबा!" म्हणतात. आता शिक्षिकेच्या आवाजात हताशपणा दिसू लागतो. पुन्हा आवाज ब्रेक व्हायला लागतो त्यामुळे तो नक्की काय वाजवतो आहे कळत नाही. एक जण, "चायला काय चाललंय" असं वैतागून म्हणतो. तेव्हा नेमका आवाज व्यवस्थित येत असल्याने ते सगळ्यांना नीट ऐकू जातं, आणि "कोरोना जाऊदे आणि हा शाळेत येऊदे मग बघतो" असं तो वाजवणारा मनातल्या मनात म्हणतो.  

तेवढ्यात एक जण, "ताई मला साप खूप आवडतात" असं म्हणतो. इ-शाळा असली, तरी बाई बसल्या जागी दचकतात. तरीही "हो का, वा वा, छान छान" असं म्हणतात. तेवढ्यात कुणीतरी, "ए घाणेरड्यांनो" असं म्हटलेलं स्पष्ट ऐकू येतं. 

सुमारे पावणेचार वाजता "बाई मला भूक लागली मी जेवायला जाते" असं गीता नामक एक कन्या विव्हळते. मागून गीताच्या आईचा पार बाहेरच्या खोलीतून आलेला "पय्चक्" असा आवाजही नीट ऐकू येतो. "अरे गीता असं काय ते करायचं" असं म्हणून बाई तिला जाऊ देतात. जाऊ न देऊन सांगतात कुणाला?!

"आता आपण थांबू" बाई म्हणतात.

"बाई मी एक कविता म्हणून दाखवू?" असं महेश नामक एक पिल्लू म्हणतं. आता मात्र ताईंचा संयम संपतो. "आता महेश कविता म्हणतोय मग आपण थांबणार आहोत आज", बाई ठणकावतात. महेश कविता म्हणत असताना मध्येच कुणीतरी "पॅयँsssssssss" अशी सायरन वाजवतो. महेशची कविता म्हणून संपते, आणि ताई पटकन सेशन संपण्याच्या बटणावर क्लिक करतात.

आणि अशा रीतीने "मराठीचा तास" संपतो आणि माझ्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

© मंदार दिलीप जोशी

टीप: शाळा आणि इतर संदर्भ दिलेले नसले तरी नावं बदलली आहेत.

तुम्हीही जेक गार्डनर

जेक Gardner ही व्यक्ती कोण होती? तुम्हाला त्याचं नाव माहीत असणं का आवश्यक आहे? 

जेक गार्डनरचा अमेरिकेतील ओमाहामध्ये एक बार होता. मे महिन्यात एकदा त्याच्या बार मध्ये ब्लॅक लाईवज मॅटर (Black Lives Matter) वाले घुसले आणि नासधूस करायला सुरुवात केली. त्याच्या वडिलांना त्यांनी मारहाण केली. 

तो मागच्या खोलीतून बाहेर आला आणि ओरडून सांगितलं की आत्ताच्या आत्ता थांबा आणि चालते व्हा. लोकांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. त्याने खिशातून पिस्तुल काढली आणि हवेत दोन बार उडवले. आता लोकांनी त्याला खाली पाडलं. तो ओरडू लागला की मला सोडा, मला सोडा. आता जीवावर बेतणार असं वाटल्याने त्याने त्याला खाली पाडून दाबणाऱ्या एकावर गोळी झाडली, त्यात तो माणूस मेला.

CCTV मध्ये पूर्ण घटना चलचित्रमुद्रित झाली होती. पब्लिक प्रोसिक्युटरने ते पाहून निर्णय घेतला की जेकने स्वसंरक्षणार्थ गोळी चालवली असल्याने केस होऊ शकत नाही.



BLM वाल्यांनी बोंबाबोंब केली आणि एक नवाच प्रोसिक्युटर आणला गेला. त्याने एका न्यायाधीशाकडून जेकच्या अटक वॉरंटवर सही करून घेतली.

जेकने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली.


जेकने कायदेशीर कारवाईत त्याला लोकांकडून पैशाची मदत व्हावी  म्हणून GoFundMe वर खातं  उघडलं होतं, जे BLM वाल्यांनी बंद करायला लावलं. 

तुम्ही तुमचा जीव देऊन सुद्धा डाव्यांचं समाधान करू शकत नाही.

एकदा स्वतःलाच पीडित घोषित करायचं म्हणजे सहानुभूती मिळते, आणि डावे म्हणतात की जे पीडित असतात त्यांना कायदा पाळायची गरज नसते. हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (उदा. गरीब बिचारा भाडेकरू, कुठे जाईल)

डावे म्हणतात तुम्हाला तुमच्या संपत्तीचं रक्षण करायचा अधिकार नाही, हे तुम्ही मान्य केलेलं आहे. (कारखाना जाळला कामगारांनी, पण शोषक आहे कारखाना मालक!).

आता डावे म्हणू लागलेले आहेत की त्यांच्यातल्या पीडितांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला तुमच्या जीवाचं रक्षण करायचाही अधिकार नाही. 

आणि त्यांच्या मते पीडित कोण आहेत? ज्यांना त्यांनी पीडित असल्याचं सर्टिफिकेट वाटलं आहे ते.

दंगलखोर, अतिरेकी यांना कायदेशीर पाठबळ देण्यासाठी पैसे कुठून येणार? तर तुमच्या खिशात हात घालून तुमच्या कष्टाच्या कमाईतून दिलेल्या करांवर डल्ला मारून. पण तुम्हाला कायदेशीर मदत लागली त्यासाठी तुम्ही लोकांकडून दानमार्गाने पैसे गोळा करायचे ठरवलेत तर तुम्हाला ते ही करू दिलं जाणार नाही.

तुम्ही तुमची नैतिकता इतरांना ठरवू दिलीत, तर तर तुमची जीवनकथा एक दिवस तुमचा नरबळी घेऊनच संपेल हे नक्की. 

वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळे कायदे ही व्यवस्था तुम्ही मान्य केलीत, तर 'त्यांना' हवा म्हणून तुमच्याविरुद्ध काय कायदा निर्माण होईल याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. 

मागे घरकाम करणार्‍या एका बाईंचा व्हिडीओ फिरत होता, ज्यात तिला तीन पाचशेच्या नोटा म्हणजे पंधराशे हे कळत होतं, पण वर तीनशे म्हणजे एकूण अठराशे हे कळत नव्हतं म्हणे. त्या व्हिडिओत ती सरळ सरळ जास्त पैसे उकळायला बघत होती, आणखी पाचशे असं काहीतरी म्हणत. त्या बाईबद्दल अनेकांना सहानुभूतीचा पुळका आला  होता. तो व्हिडिओ खरा असेल आणि त्या बाईंची कटकट बंद व्हावी म्हणून त्या तरुणांनी तिला अठराशे पेक्षा एक रुपयाही जास्त दिला असेल, तर त्यांनी उद्या आपल्या सगळ्या संपत्तीवर पाणी सोडायला तयार रहावं.

कारण वामपंथ हा एक असा साप आहे की ज्याला कितीही दूध पाजलंत तरी तो एक दिवस तुम्हाला डसणारच आहे, गिळणारच आहे. 

If you are not ready to surrender everything, do not surrender anything.

आता तुम्हाला जेक गार्डनरचं नाव ठावूक असणं का आवश्यक आहे?

कारण तुम्हीही जेक गार्डनर आहात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
अश्विन शु. ९, शके १९४२