Sunday, August 14, 2022

हे मातृभू

बरेच दिवस हे रूपांतर करायचं मनात होतं पण अनेकांच्या स्टोरीमध्ये राझी चित्रपटातील "ए वतन, मेरे वतन" हे गाणं ऐकून अचानक स्फुरलं आणि लिहून टाकलं. ते गाणं कितीही सुश्राव्य असलं तरी त्याचा चित्रपटातला संदर्भ आठवून आपल्या स्वातंत्र्यदिनी ते वाजावं हे कुठेतरी खटकत होतं. चित्रपटात पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शाळेत बसवलेल्या मुलांच्या गाण्याचा उपयोग आपला स्वातंत्र्यदिन साजरा करताना होऊ नये असं वाटतं. असंही उर्दू हा प्रकार डोक्यात जातो माझ्या. तर, नमनाला घडाभर तेल झाल्यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रस्तुत आहे या गाण्याचे संस्कृतप्रचुर मराठी रूपांतर. 

मूळ गाण्याच्या चालीवर मनातल्या मनात म्हणून पहा. आवाज चांगला असलेल्या कुणी हे गायचं मनावर घेतलं तरी त्यासाठी अनुमतीची आवश्यकता नाही, लेखनश्रेय दिले तरी पुरेसे आहे. 

हे मातृभू

हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू, मम मातृभू

तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला
तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला

विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू 

रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जरी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू 

सुजलाम रहा तू, सुफलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू

हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू














© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. ३, शके १९४४

Sunday, August 7, 2022

पुस्तक परिचय – स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी

एप्रिलमध्ये रामकथामाला, चित्र ज्ञानेश्वरी या पुस्तकांच्या लेखिका सौ Deepali Patwadkar यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी" हे पुस्तक भेट दिले.

साक्षात दीपालीताईंची भेट आणि वर पुस्तकांच्या खजिन्यात भर टाकायला मिळालेले हे रत्न याने तो दिवस सार्थक झाला!


टीप: मागे भिंतीवर दिसणारी चित्रे दीपालीताईंनीच काढलेली आहेत!

पुस्तक वाचून बरेच दिवस झाले असले तरी त्याबद्दल लिहायला ऑगस्ट अर्थात श्रावण उजाडला.  मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही पण मला काय वाटलं ते व्यक्त करतो. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर चर्च आणि मिशनरी यांच्या कारवायांवर अशा एखाद्या पुस्तकाची गरज होती आहे हे पुस्तक ती नक्कीच पूर्ण करते.

सेक्युलर व्यवस्था म्हणजे separation of Church and Government याचा अर्थ आपण असा घेत होतो की चर्चच्या कारवायांत तिथल्या राज्यकर्त्यांचा सहभाग नसावा. पण चर्च आणि मिशनरी आणि व्यापारी कंपन्या, ब्रिटिश आणि सरकार, हे सगळे वेगवेगळे नसून चर्च आणि मिशनरी यांना युरोपातील सरकारे, राजे महाराजे आणि व्यापारी कंपन्या यांचा पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य होते हे या पुस्तकातून स्पष्ट होते.

किंबहुना सुरवातीचा थोडाच काळ वगळला तर वसाहतवादाच्या हेतूंपैकी नेटिव्ह जनतेला धर्मांतर करून ख्रिश्चन करणे हा वसाहतवादाचा अविभाज्य भाग होता ही बाब हे पुस्तक सप्रमाण सिद्ध करते. इतकेच नव्हे तर एतद्देशीय जनता आणि संस्कृतींच्या बाबतीत ब्रिटिश राज्यकर्त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीचा होता की १७७० ते १९४४ पर्यंत साथीच्या रोगांनी आणि घडवून आणलेल्या दुष्काळांत अंदाजे १३ कोटी भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर सांपत्तिक, संस्कृतिक, आणि मानवी जीवनाची मिशनरी आणि ब्रिटीशांनी जितकी हानी केली आहे त्याची गणती होऊच शकत नाही.

हे पुस्तक लहान असले तरी एक लहानसा बॉम्ब आहे, कारण यात प्रत्येक मुद्दा हा संदर्भासकट येतो. तसेच, शेवटी असलेली परिशष्टे ही परिपूर्ण आणि माहितीचा खजिना आहेत.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना या पुस्तकाबद्दल जास्तीतजास्त जागृती होणे आवश्यक आहे.

हे पुस्तक भारतीय विचार साधनाच्या संकेतस्थळावर इथे उपलब्ध आहे.

🖊️ मंदार दिलीप जोशी
श्रावण शु दशमी, शके १९४४

Friday, August 5, 2022

साम्यवाद: तोंडओळख आणि उहापोह भाग १

The conflict between communism and freedom is the problem of our time. it overshadows all other problems. this conflict mirrors our age, its toils, its tensions, its troubles, and its tasks. on the outcome of this conflict depends the future of all mankind.

साम्यवाद आणि स्वातंत्र्य यातील संघर्ष हा आपल्या काळातली अशी समस्या आहे जी इतर सगळ्या समस्यांना झाकोळून टाकते. हा संघर्ष आपल्या कालखंडाचा आणि त्यातल्या आपल्या कष्टांचा आरसा आहे. या संघर्षाचा निकाल काय लागतो त्यावर समस्त मानवजातीचे भवितव्य अवलंबून आहे.  

George Meany
President, AFL-CIO

[अमेरिकेच्या कामगार नेत्यांत विसाव्या शतकातील एक प्रमुख नेते म्हणून ज्यांचे नाव आजही मानाने घेतले जाते ते हे जॉर्ज मीनी. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जॉर्ज तरूण वयात प्लंबर झाले. सुमारे बारा वर्षांनंतर त्याचा कामगार संघटनेत प्रवेश झाला.  त्यांनी द्वितीय विश्वयुद्धात अमेरिकेच्या राष्ट्रीय युद्ध कामगार संघटनेत (National War Labor Board) अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे (American Federation of Labor) प्रतिनिधित्व केलं. १९५२ ते १९५५ या काळात त्यांनी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे अध्यक्षपद भूषवले. या संघटनेचे अमेरिकेतल्याच काँग्रेस ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन्स Congress of Industrial Organizations (CIO) यात विलिनीकरण होणे ही त्यांचीच कल्पना. विलिनीकरण झालेल्या AFL–CIO या संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी पुढील २४ वर्ष भूषवले. कामगार चळवळ ही सचोटीपूर्ण आणि भ्रष्टाचारमुक्त असावी यावर त्यांचा भर असे. अनेक वर्ष कामगार नेता असूनही जॉर्ज हे घोर साम्यवाद विरोधी होते.]

आपल्यापैकी अनेकांचा असा समज आहे की साम्यवादी पक्ष आज फक्त केरळात सत्तेत आहेत, म्हणजे साम्यवादाचा प्रभाव आकुंचन पावत आहे आणि साम्यवादाचा पराभव झालेला आहे किंवा होत आलेला आहे. पण परिस्थिती तशी नाही. एखादा विषाणू अर्थात व्हायरस ज्याप्रमाणे स्वतः स्वतंत्रपणाने काही करु शकत नाही आणि त्याला वाढायला आणि पसरायला मानवी शरीर लागते, त्याच प्रमाणे सम्यवाद हा स्वतःच्या पक्षाच्या सत्तेत असण्यावर अवलंबून नसून थेट सत्तेत नसतानाही विविध विचारधारांच्या पक्षांत शिरून ते पक्ष आणि विचारधारा आतून पोखरून टाकण्याचे काम करत असतो. अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात. ती ही माणसेच असल्याने कधीकधी आपल्या वागण्याबोलण्यातून काही गोष्टी वेळोवेळी उघड करत असतात, त्यामुळे अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात. 

अमेरिकेचा सांस्कृतिक आणि पर्यायाने सामाजिक र्‍हास हा अशाच आतून पोखरल्या गेलेल्या पक्षांच्या मार्फत घडवून आणला गेलेला आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात बघायला गेलं तर दुर्दैवाने हा रोग आज आपल्या देवघर, कपड्यांचं कपाट, आणि शयनगृहातही पोहोचलेला आहे (कसा ते पुढे पाहूच). तो आणखी पसरायला नको असेल, आणि अमेरिकेचा झाला तसा र्‍हास भारताचा व्हायला नको असेल तर साम्यवाद आणि त्याचे ज्ञात आणि अज्ञात जन्मदाते आणि पुरस्कर्ते यांची तोंडओळख करुन घेणे गरजेचे आहे. हा भाग मुद्दाम लहान ठेवला असून पुढच्या भागात कार्ल मार्क्स कोण होता? साम्यवादाचा तो जन्मदाता होता की त्याच्या आधी अनेक वर्ष जी विध्वंसक प्रवृत्ती बोकाळलेली होती तिला त्याने तात्त्विक मुलामा दिला आणि भरपूर लेखन केलं जे साम्यवादाचा आधार बनलं? साम्यवाद म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाची उत्तरे पाहू. पुढच्या भागात आद्य साम्यवादी, साम्यवादाचा जन्मदाता ज्याला म्हटलं जातं तो कार्ल मार्क्स आणि ज्याच्या जीवावर तो जगत असे त्या फ्रेडरिक एन्गल्स यांची ओळख करुन घेऊ.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण शु. ८, शके १९४४


Monday, August 1, 2022

खर्रा इतिहास: सिलसिला ए मुरब्बा

विकेंड हिस्टोरियन लोकांच्या नादाला लागू नका. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला याचा आमच्याकडे पुरावा आहे. एकदा काय झालं की साधूवृत्तीच्या जिल्लेइलाही औरंगजेब सरांच्या सैन्य अभ्यासात लाडके थोरले बंधू दारा शिकोह अपघाती मरण पावल्यापासून औरंगजेब सर फार म्हणजे फार दु:खात होते. त्यांचं चित्र काढायला छानसा चित्रकारही मिळेना. मग शहेनशहा औरंजेब सरांनी एक आयडीया केली. ती काय ते पुढे कळेलच.

असेच काही दिवस गेल्यावर, आणि दिवस गेल्यावर, बेगम साहेब गच्चीत फेरफटका मारत असताना त्यांना महालातल्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीच्या खिडकीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. नीट लक्ष देऊन ऐकले असता एक लहान मुलगा  "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे रडता रडता म्हणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खरं म्हणजे बेगम पहिल्या मजल्यावर जायला घाबरायच्या. त्याचं काय झालं की एकदा जिल्लेइलाही औरंगजेब सरांचे मरहूम अब्बाहुजूर.... असो. तो विषय पुन्हा केव्हातरी. 

तर धीर एकटवून त्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीत डोकावल्या. तिथे दारा शिकोहचा थोरला सुलेमान एका बरणीकडे पाहून मोठमोठ्याने "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे म्हणत रडत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन बघतात तो काय, त्या बरणीत मरहूम भाऊजींचे शिरकमल...नको कमळ नको...आपण डोकं म्हणूया. तर मरहूम भाऊजींचं डोकं एका रसायनात घालून ठेवलेलं दिसलं. ते पाहताच बेगमना परवाच कोकण सुभ्यातून सरदार जोशुद्दीन आणि सहस्त्रबुद्दीन यांनी पाठवलेल्या कैर्‍यांचे गोड काय करायचे या प्रश्नावरचा उपाय सापडला.  

"कोण आहे रे तिकडे?" असा चारपाच वेळा आवाज देऊनही कुणी ओ देत नाही म्हणून भडकलेल्या बेगमसाहेबांना आपण अजून पहिल्या मजल्यावरच आहोत याचं भान आलं आणि त्यांनी सुलेमानलाच ती बरणी घेऊन बावर्ची खान्यात पाठवलं. तिथेही लोक "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे किंचाळू लागले. बेगम मागोमाग तिथे पोहोचल्या आणि खानसाम्याला नेमकं काय करायचं आहे ते समजावून सांगितलं. 

आणि अशा रीतीने "म्म्म्म्म्म्म अब्बा" या उद्गारांचा मुरांबा असा मुघली अपभ्रंश होऊन तो शब्द मान्यता पावला. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला असल्याचे या गोष्टीवरुन सिद्ध होते. हा खरा इतिहास तुम्हाला कुणीच सांगणार नाही. 

#म्हैत_नसलेला_औरंग्या #सिलसिला_ए_मुरब्बा #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास

मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ८४०, ओळ ८

© मंदार दिलीप जोशी