Thursday, October 27, 2022

परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे

प्रत्यक्ष आयुष्यात बहुसंख्य हिंदूंनी पुन्हा कुंकु/टिकली/गंध लावायला सुरवात करायला हवी असं नेहमी वाटत असे. मी स्वतः पाश्चात्य कपडे घालूनही मी रोज गंध लावून ऑफिसात जायचो, अजूनही जातो. खरं तर या कपड्यांना सोयीचे/नियमांअंतर्गत मोडणारे कपडे असं म्हणायला हवं. कारण कॉर्पोरेट ऑफिसात धोतर नेसून जाता येत नाही. पण अनेक ठिकाणी कुठल्याही कपड्यांसोबत कुंकू/टिकली-टिळा लावण्यावर बंधन नाही. इस्रोचे अवकाश शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन हे ही कामावर नियमित गंध लावून जात असत. जेव्हा ऑफिसात स्त्रिया टिकली लावून येतात तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व हे फक्त कॉर्पोरेट न राहता त्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते आणि एक प्रकारचं तेज चेहर्‍यावर असल्याचं भासतं. 

प्रत्यक्ष जगण्यात हिंदुत्वाची प्रतीके आणि चिह्ने आपण श्रद्धेने, अभिमानाने, आणि नियमितपणे अंगावर ल्याली पाहीजेत. या विषयावर मी माझ्या पद्धतीने काम करायला सुरवात केली होती आणि पुढेही करत राहीन. पण काल मला एका फेसबुक मैत्रिणीचे संदेश आले (चित्र १) आणि फेसबुकवर आपला वेळ अगदीच वाया जात नाही हे पटलं. कुंकू/टिळा/गंध हे कालबाह्य नाही तर अभिमानाने मिरवावे असे सांस्कृतिक, धार्मिक चिन्ह आहे हे विशेषतः तरुणांच्या मनावर ठसवले गेले पाहीजे. इथे मी कुंकू/टिकली लावण्यामागे विज्ञान, आज्ञाचक्र वगैरे बाबींबद्दल बोलत नाही कारण गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होतील. 
























एक आक्षेप समोर आला की पाश्चात्य कपड्यांवर कुंकू/टिकली लावण्याचा आग्रह बरोबर नाही. पण कुंकू-टिळा हे कपड्यांवर अवलंबून ठेवून आपण त्याचा परीघ मर्यादित करत आहोत. हे लिहीत असताना पाश्चात्य कपड्यांवर म्हणजे जीन्स-टीशर्टवर टिच्चून टिकली लावून फिरणारी एक फेसबुक अविवाहित भगिनी आठवली. तिची पोस्ट सोबत जोडली आहे, अर्थातच नाव झाकून. ती काही हिंदू धर्मातली पंडित नाही, पण तिच्या मनात जी विचारांची सुस्पष्टता आहे ती मला क्वचितच इतर लोकांच्यात दिसते (चित्र २ आणि ३). 





































पोस्टच्या सुरवातीला ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला ती विवाहित आहे आणि घरातली कर्ती स्त्री आहे. नवरा-बायको आणि एक मूल असं कुटुंब आहे. याचा अर्थ  किमान तीन जणं या विचारांनी प्रभावित झाले आहेत किंवा होतील. ते कदाचित इतरांना प्रभावित करतील. यालाच हिंदीत ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणत असावेत.

तुमच्यापैकी कुणी या बाबतीत समविचारी असेल तर मी एकटा काय करु शकतो किंवा शकते असा विचार करुन हताश होऊ नका. मात्र जे कराल त्याला भगवंताचे अधिष्ठान असावे.  

सामर्थ्य आहे चळवळीचे  जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (दा. २०.४.२६)

आपण सूज्ञ आहात, बहुत काय लिहीणे!

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. द्वितिया, शके १९४४


Thursday, October 6, 2022

बॉयकॉट बॉलीवूड आणि युद्धभूमीची निवड

#BoycottBollywood चळवळीला मूर्खात कसं काढायचं याचा आदिपुरुषचा ट्रेलर आणि त्यानंतर सुरु झालेलं प्रिमॅच्युअर रावणदहन हा एक वस्तुपाठ आहे. आत्तापर्यंत सैफचा रावण आणि त्याची मापं काढणार्‍या पोस्टी येऊन गेल्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी रावणाला ठेवण्यात चित्रपटामागच्या शक्ती यशस्वी झाल्या. एकूण पोस्ट्सपैकी ९५% पोस्ट या रावणावर होत्या.

आणि हिंदुत्ववादी / #BoycottBollywood वाले या गुगलीवर त्रिफळाचित झाले.

हा गुगली कसा?


पहिल्या फोटोकडे बघा. तुम्हाला तो आवडलेला नाही, कारण नेहमी, म्हणजे लागोपाठ सिनेमा मागून सिनेमात, नराधम, दुष्ट, अत्याचारी खलनायक मंडळींना नेहमी विभूती, गंध इत्यादी हिंदू प्रतीकं लावलेलं का दाखवायचं? आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.


आता दुसर्‍या फोटोकडे बघा. तुम्हाला तोही आवडलेला नाही, कारण तुमचा व्हिलन कितीही दुराचारी, अत्याचारी, बलात्कारी, थोडक्यात नीचपणाचा कळस असला तरी तो तुम्हाला म्लेंछवेषात वेड्याबिद्र्या पक्ष्यावर आरुढ होऊन आलेला चालणार नाही. आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.

अरे मग तुम्हाला हवंय तरी काय? फक्त बॉयकॉट बॉयकॉट करत आऊटरेज करायचंय? — हे मी नाही म्हणत, बॉलीवूडने तुमच्यावर फेकलेली Strawman Argument आहे. Strawman Argument म्हणजे तुमच्या मुद्द्याला खेचून दुसर्‍या टोकाला नेत "तुम्हाला असं म्हणायचंय का?" या पातळीवर चर्चा आणून ठेवणे. समजा तुम्ही म्हणालात की प्रदूषण कमी होणार्‍या गाड्यांची निर्मिती वाढली पाहीजे, तर समोरचा म्हणतो "म्हणजे काय आता बैलगाड्यांनी प्रवास करायचा का?" याला म्हणतात Strawman Argument. यात आता तुम्ही स्वतःचा मुद्दा बाजूला ठेवून त्याने मांडलेल्या दुसर्‍या टोकाच्या मतावर वाद घालू लागता. तर ते असो.

कथेचा नायक, श्रीराम कसे असले पाहीजेत, माता सीता कशी दाखवली पाहीजे, महाबली हनुमान कसे दिसले पाहीजेत यावर चर्चा फिरण्याऐवजी, चर्चा ही अधर्माचा पुतळा म्हणता येईल अशी व्यक्ती, ज्याच्या निर्दलनासाठी आणि धर्मसंस्थापनेकरता प्रत्यक्ष भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला तो राक्षसराज रावण कसा होता आणि कसा दाखवला पाहीजे यावर केंद्रित झाली. सर्वांनी रावणाच्या गुणांची यादी सादर करुन झाली. थोडक्यात, ही चर्चा "आमचा व्हिलन किनै..." याच भोवती फिरत राहिली.

Saif Ali Khan says Adipurush will ‘humanise’ Raavan, ‘justify his abduction of Sita’ - सैफ एका मुलाखतीत म्हणाला की आदिपुरुष सिनेमा रावणाचा 'मानवी चेहरा' समोर आणेल, सीताहरण योग्य कसं हे सिद्ध करेल.

पण अश्शी कश्शी हेअरस्टाईल रावणाची, अश्शी कश्शी मुघली दाढी रावणाची असं म्हणत, तुम्ही नाई म्हणजे नाही सहन करणार. तुम्ही म्हणणार की आमचा व्हिलन किनै विभूती लावायचा, आमचा व्हिलन किनै वेदविद्या पारंगत होता, आमचा व्हिलन किनै वीणा वाजवायचा, आमचा व्हिलन किनै शिवभक्त..... ब्लाह ब्लाह ब्लाह. मुघल असो वा राक्षस, दोघांचेही वर्तन तसेच होते आणि दोघेही संपवण्याच्याच लायकीचे हे आपण लक्षात घेतलंच नाही.

उद्या सैफने येऊन विचारलं की "तुमचा व्हिलन इतका यंव आणि त्यंव होता, मग तो वाईट कसा? उगाच आला सिनेमा झोडप, आला सिनेमा झोडप करताय!" असं म्हणत आपली, म्हणजे बॉयकॉट गँगची अक्कल काढली तर पुढच्या वेळी आपण गोंधळून नेमका कोणता मुद्दा उचलावा या गडबडीत पुढचा सिनेमा काही कोटी कमावून जाईल.

थोडक्यात, तुम्ही युद्धभूमी चुकीची निवडली या वेळी "खलनायक कसा असायला हवा" ही. हरकत नाही. 
युद्धभूमीची निवड करता यायला हवी. फार लांब नको जायला, पेशवे बाजीराव यांना पालखेडचा विजय कशामुळे मिळाला हे लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. दुर्दैवाने आपण पराभवातूनही शिकत नाही आणि शत्रू आपल्या विजयांचा अभ्यास करुन आपल्याला नंतर व्यवस्थित खिंडीत गाठतो.

पुढच्या वेळी लक्षात ठेवा.

प्रांजळ कबूली: सुदैवाने माझं अकाउंट रिस्ट्रिक्टेड होतं नाहीतर मलाही पोस्टी टाकायचा मोह आवरला नसता, तेव्हा मी जखमी होऊन संघाच्या बाहेर बसलेल्या, आणि त्यामुळे तटस्थ विचार करायची संधी मिळालेल्या खेळाडूसारखा आहे.

© मंदार दिलीप जोशी
विजयादशमी, शके १९४४