Tuesday, January 19, 2021

साम्यवाद आणि भंपकपणा: मोदी, हिटलर, आणि फॅसिझम

आपण अनेकदा बघतो की डावे आणि इतर विरोधक मोदीजी त्यांच्या मनासारखे वागत नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवताना हिटलर आणि फॅसिस्ट म्हणतात. असं म्हणताना हिटलरला सरकटपणे फॅसिस्ट (Fascist) ठरवलं जातं. हे कितपत सत्य आहे? मुळात हे बरोबर आहे की नाही? हिटलर खरंच फॅसिस्ट होता का? बहुतांश लोकांना या शब्दांचा अर्थ किंवा फरकच  मुळात कळत नसतो ही डाव्यांनी निर्माण केलेल्या इंग्रजीत ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो त्याची कमाल आहे.

चला, काही मूलभूत तथ्यांकडे आपण पाहू. 

(१) हिटलरच्या पक्षाचं नाव होतं National Socialist German Workers' Party (जर्मन नावः Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei किंवा NSDAP).
(२) मुसोलिनीच्या पक्षाचं नाव होतं National Fascist Party (इटालियन नाव: Partito Nazionale Fascista, PNF).

लोकांना आपल्याकडे फॅसिस्ट म्हटलं की हिटलर का आठवतो? हिटलर हा प्रत्यक्षात सोशलिस्ट अर्थात समाजवादी असताना फॅसिस्ट कसा? 

इथे जरा वेगळ्या पद्धतीने विचार करुन बघूया.

दुसरं विश्वयुद्ध जिंकणार्‍या दोस्त राष्ट्रांमधला एक देश होता USSR -यूनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक्स. इथे सोशलिस्ट अर्थात समाजवादी या शब्दाला महत्त्व आहे, कारण तो रशियन विस्तारवादाचं द्योतक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकायला काढलेला एक ब्रँड आहे. 

आता पुन्हा हिटलर सोशलिस्ट होता या मुद्द्याकडे येऊ. हिटलर सोशलिस्ट होता आणि रशियन सोशलिस्ट होते तर दोघं युद्धात विरुद्ध पक्षात कसे? हिटलर जरी सोशलिस्ट असला तरी त्यात त्याची स्वतःची अशी राजकीय आणि आर्थिक विचारसरणी होतीच की. Gottfried Feder नामक एक व्यक्ती त्याचा आर्थिक सल्लागार होता, आणि त्याचं Manifesto for abolition of interest slavery हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. अर्थात, हिटलर हा पूर्णपणे फेडेरच्या सल्ल्याने चालत असे असं नाही, त्याचे इतर सल्लागार होतेच. एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करु इच्छितो की इथे ना हिटलरचं समर्थन आहे ना फेडेरचे. इथे फक्त लक्षात आणून द्यायचा उद्देश आहे की ज्यू लोकांच्या खर्‍या खोट्या 'व्याजखोर सावकारी पाशा'विरोधात त्याने जर्मनीत रान उठवून जर्मन जनतेला त्यांच्याविरुद्ध भडकावण्यात तो यशस्वी ठरला होता. आता ज्यू लोक खरंच व्याजखोर होते का याचा आत्ता इथे पुरावा सादर करणं अवघड आहे, पण पूर्ण युरोपात ज्यू आपल्या व्याजखोर सावकारीसाठी बदनाम होते हे मात्र तत्कालीन संदर्भ आणि साहित्यातून आपल्याला दिसतं. याचं ठळक उदाहरण म्हणजे शेक्सपियरने देखील आपल्या 'मर्चंड ऑफ व्हेनिस' या नाटकातला शायलॉक हा खलनायक ज्यूच दाखवला होता.

आता सोशलिझमकडे परत येऊया. हिटलरच्या पक्षाच्या नावात समाजवादी हा शब्द होता आणि आपल्या घोषणापत्रात त्या पक्षाने समाजवादाच्याच मार्गाने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हिटलर स्वतःला खराखुरा समाजवादी म्हणवून घ्यायचा आणि रशियाच्या समाजवादाला 'बोल्शेविक कम्युनिझम' असं म्हणून हिणवायचा. असं असलं तरी साम्यवाद्यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी शय्यासोबत करण्यात कुठलाच विधीनिषेध बाळगला नाही. 

इथे डावे/साम्यवादी यांचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल आणि ते म्हणजे आपल्या विचारसरणीला पर्याय किंवा प्रतिस्पर्धी उभा राहू न देणं. हिटलरला सुद्धा सोशलिस्ट म्हणून म्हणून प्रसिद्धी मिळाली असती तर रशियन ब्रँडच्या सोशलिझमला अर्थात समाजवादाला एक पर्याय उपलब्ध झाला असता. रशियाने आपल्या ब्रँडच्या सोशलिझमचं मार्केटिंग केलं असतं आणि हिटलरने आपल्या ब्रँडच्या समाजवादाची टिमकी वाजवली असती. डाव्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजूही मंजूर नसतात (अगदी भारतात सुद्धा जे वेगवेगळे कम्युनिस्ट पक्ष आणि गट आहेत, त्यांच्यातही जी फूट पडलेली आहे, ती याच स्वरूपाची आहे). म्हणून मग त्यावेळच्या ताकदवान रशियाप्रणित समाजवाद्यांनी हिटलरला फॅसिस्ट लेबल लावून टाकलं. अर्थात हिटलर आणि मुसोलिनी यांची दुसर्‍या विश्वयुद्धात महाविनाशआघाडी झाल्यामुळे तसा प्रचार करणं हे रशियाप्रणित डाव्यांना सोपंही गेलं. त्यात भर म्हणजे साम्यवादी रशियाचं आणि हिटलरप्रणित समाजवादाशी असलेल्या वैराचं युद्धात रुपांतर झालं ते त्याने रशिया आणि जर्मनीमधे झालेला अनाक्रमणाचा करार मोडून थेट रशियावर हल्ला चढवल्यावर. पुढे विश्वयुद्धात दारूण पराभव झाल्याने जर्मन जिथे स्वतःला नाझी म्हणवून घ्यायला लाजत आणि मुख्य म्हणजे घाबरत होते तिथे साम्यवादी रशियाचा हा प्रचार रोखायची इच्छा होणे तर सोडाच आणि संधी सुद्धा कुणालाच मिळाली नसली तर आश्चर्य नव्हतं. 


इथे नाझी लोकांची भलामण करण्याचा हेतू नाही. फक्त डाव्यांच्या कंपूतील विसंवाद आणि शत्रुत्व दाखवायला वरील उदाहरण दिले. नाझी लोकांनी की पापं केली आहेत त्याबद्दल त्यांना मिळालेल्या शिक्षा सुद्धा सौम्यच म्हणायला हव्यात. 

Umberto Eco नामक एक प्रसिद्ध कम्युनिस्ट 'विचारवंत' होऊन गेले. त्यांनी फॅसिझमची १४ लक्षणे लिहीली आहेत. Ur-Fascism अशा नावाने शोध घेतल्यास सहज सापडतील. ती वाचली आणि एकंदर साम्यवादाचा इतिहास बघितला तर नाझी आणि साम्यवादी हे सरळसरळ एकाच माळेचे मणी असल्याचं लक्षात येईल. लालभाई असोत की हिरवे, तुम्हाला पर्याय मिळू देत नाहीत. तुमच्याकडे जी व्यवस्था आहे तिचे दोष सतत तुमच्या पुढ्यात उगाळत राहतील. तुम्हाला सतत उचकवत राहतील की तुमच्या समस्येचे कारण तुम्ही स्वीकारलेली व्यवस्था आहे आणि ती उलथवून लावणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांची व्यवस्था स्वीकार केलीत की तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. त्यांची व्यवस्था आल्यावर तुमच्या समस्या जराही सुटल्या नाहीत आणि तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत केलीत तर चक्क तुम्हालाच एक समस्या ठरवून संपवलं जाईल. कारण आम्ही समस्या संपवतो हे ते नेहमी गर्वाने सांगत असतात (गंमतीची गोष्ट अशी की समाजवाद/साम्यवाद स्वीकारलेल्या एकाही देशाचं आजवर भलं झालेलं नाही उलट तो देश आर्थिक खड्ड्यातच गेलेला आहे ही गोष्ट वेगळी).  

रशियन डाव्यांचं पाप हे आहे की फॅसिझमला लक्ष्यस करण्याच्या नादात त्यांनी राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीला सुद्धा जवळजवळ एखाद्या गुन्ह्यासारखं बदनाम केलं. पण मग मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट का म्हणतात? सोपं आहे. हिटलरच्या जर्मनीचा नाझी पक्ष आणि इटलीच्या मुसोलिनीचा फॅसिस्ट पक्ष हे दोन्ही प्रखर राष्ट्रवादी आणि देशभक्त होते. यातूनच प्रेरणा घेऊन मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं जातं, कारण मोदी हे इतर पंतप्रधानांपेक्षा कडक शिस्तीचे आणि प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रभक्त आहेत, तसंच ते जनतेतही या ना त्या कारणाने राष्ट्रभावना जागृत करत असतात. आजही कुणाचा आवाज बंद करायचा असेल तर त्याला फॅसिस्ट म्हटलं की गप्प करता येतं. एखादा फारच चिवट निघाला तर तू राष्ट्रवादी आहेस म्हणजे तू फॅसिस्ट आहेस हे सिद्ध झालं असं होतं. थोडक्यात, राष्ट्रवाद हा फॅसिझ्मला जोडणे आणि त्या अनुषंगाने नॅरेटिव्हची मांडणी करण्यात डाव्यांनी इतरांवर घेतलेली आघाडी लक्षणीय आहे. कम्युनिस्ट किती नीच असतात हे या उदाहरणावरुन आपल्याला लक्षात येईल. या बाबतीत कम्युनिष्ठांची स्पर्धा फक्त कौमनिष्ठच करु शकतात.

तात्पर्यः आता कुणी मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं की हिटलर आणि मुसोलिनीच्या पक्षांची पूर्ण नावे आणि सोवियत रशियाचे पूर्ण नाव तोंडावर फेकून मारा. 

पुढच्या लेखात फॅसिझमबद्दल विस्ताराने पाहूया.

© मंदार दिलीप जोशी

ता.क.: हिटलर आणि शिस्त आणि राष्ट्रवाद यांबद्दल उहापोह करणारा आणखी एक लेख इथे वाचता येईल.

Friday, January 15, 2021

डावे डोनाल्ड ट्रंप यांच्या मागे हात धूवून का लागले आहेत?

डावे डोनाल्ड ट्रंप यांच्या मागे हात धूवून का लागले आहेत? ― याचं सरळ सोपं उत्तर हे आहे की डोनल्ड ट्रम्प पैसेवाले आहेत आणि डाव्यांच्या विरोधात राजकारणात उतरण्यासाठी पैसा खर्च करायला स्वतःच्या खिशात हात घातला आहे. हाच पैसा त्यांनी डाव्यांसाठी खर्च केला असता तर जॉर्ज सोरॉस सारखे ते ही डाव्यांच्या गळ्यातले ताईत बनले असते. डोनाल्ड ट्रम्प हा माणूस राजकारणात 'बाहेरचा माणूस' आहेत. अर्थात, राजकारण हा व्यवसाय नाही. ट्रम्प हे एक असे व्यावसायिक आहेत ज्यांनी खड्ड्यात जाऊ पाहणारा देश बघून सात्त्विक संतापाने राजकारणात उडी घेतली. राजकारणात उतरण्यासाठी नितांत आवश्यक अशी अर्थशक्ती त्यांच्याकडे होती, आणि ती देशासाठी खर्च करावी अशी इच्छा होण्याइतकी प्रखर देशभक्ती सुद्धा. (कृपया पक्षनिधी साठी देणग्या वगैरे गप्पा इथे नकोत, इंग्लंड आणि अमेरिकेत राजकारणात निवडणुका कशा होतात त्याचा अभ्यास करा आणि मग बोला).

अमेरिकन जनतेला हीच गोष्ट आवडली. ट्रम्पने लोकांना पैसे वाटले नाहीत, की लोकांकडून मतं विकत घेतली नाहीत. पण त्यांनी दिलेली, "Let's Make America Great Again" ही घोषणा लोकांच्या हृदयाला भिडली आणि त्यांच्यातल्या देशभक्तीला आणि २०१६ मध्ये त्यांना मत दिलं कारण त्यांना खरंच अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवायचं होतं. 

डाव्यांना एक गोष्ट सहनच होत नाही आणि ती म्हणजे अवहेलना. ट्रम्प मिडियाच्या प्रभावाखाली कधीच आले नाहीत, उलट ते माध्यमक्षेत्रातल्या मोठमोठ्या ब्रँडना त्यांची लायकी दाखवून देत असत. त्यांचीही ट्रम्प यांच्यावर खुन्नस आहेच.

काही दिवसांपूर्वी एक माहिती मिळाली की भारतात कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे नाहीत, तर हसरत मोहानी होते आणि त्यांच्या नजरेत कम्युनिझम हा उपरवाला नसलेला शांतीधर्मच होता आणि अवहेलना झाल्यावर शांतीधर्म कसं प्रत्युत्तर देतो हे वेगळं सांगायला नको. औरंगजेबाला सरमदने आदर दाखवला नाही म्हणून त्याने सरमदचं डोकं कलम करवलं होतं. 

ट्रम्प यांच्याशी या गोष्टींचा संबंध इतकाच की डावे अशा व्यक्तीला सहनच करु शकत नाहित आणि त्याला संपवून दहशत निर्माण करण्याकडेच त्यांचा कल असतो. हत्या शरीराचीच होईल असं नाही, 

माणसाचा आत्मा आणि त्याची कीर्ती या दोन्हीची हत्या करणे यात डाव्यांचा हातखंडा आहे. आत्म्याला नाही मारु शकले तरी एखाद्या माणसाला सार्वजनिक जीवनातून संपवून त्याची कीर्ती नष्ट करणे याला डाव्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वं असतं. भारतात काही राजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही ढळढळीत उदाहरणे आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक धक्का देऊन आत्महत्या करायला प्रवृत्त करायचे नक्की प्रयत्न होतील आणि त्याला सामाजिक न्याय नामक गोंडस नावही दिलं जाईल. ट्रम्प यांच्यासाठी काम केलेले किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेले लोक यांची यादी बनवून त्यांना त्रास देण्याच्या धमक्या सुरु झालेल्याच आहेत.

माणसाला मृत्यूपेक्षा जास्त भय असतं दारिद्र्य आणि चारित्रहननाचं. ट्रम्प यांना बरबाद केल्यावर 'डाव्यांशी पंगा घेण्याचा परिणाम काय होतो बघा' असं सांगून इतर श्रीमंत व्यावसायिकांना धमकावलं जाईल. 

German Propoganda Pamphlet Image from WW2

सोबत जोडलेलं चित्र म्हणजे दुसर्‍या विश्वयुद्धातलं जर्मन सैन्यविभागाचा प्रसिद्धी विभागाचं पत्रक आहे. यात पहिल्या विश्वयुद्धात अपंगत्व आलेला एक सैनिक भीक मागताना दाखवला आहे. दिसायला तो सफरचंद विकतोय, पण तो इतका दीनवाणा होऊन त्याची सफरचंद विकत घेण्याची विनवणी करतो आहे की ते सेल्स पिच न वाटता 'वाईच दे गं माय' असं आर्जव अधिक वाटतं आहे. हे आणि अशी अनेक पत्रके दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना हतोत्साहित करायला त्या काळी जर्मनीकडून पसरवली गेली. त्यांचा उद्देश एकच गोष्ट ठसवणे हा होता, की 'देशासाठी लढून शेवटी तुमची ही अवस्था होईल आणि तुम्ही भिकेला लागाल, म्हणुन देश वगैरे खड्ड्यात गेलं, लढून काहीच फायदा नाही.' 

याचा ट्रम्प यांच्याशी काय संबंध हे कळलंच असेल तुम्हाला. 

डाव्यांचे मनसूबे उघडउघड कळत आहेतच, पण आता ते विफल करणे या करता मात्र अमेरिकन जनतेकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

तिथे जे व्हायचं ते कळेलच, आपल्याला इथे मात्र सद्ध्याच्या सरकारच्या बाजूने कंबर कसून उभं रहावं लागेल. ट्रम्प यांच्या पराभवानंतर इथल्या डाव्यांना आणि शांतीदूतांना जरा जास्तच उत्साह निर्माण झाला आहे. भारताला आपलं भविष्य सुरक्षित करायचं असेल प्रत्येक निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा लागेल आणि प्रत्येक पाऊल आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकावे लागेल. 

🖋️ मंदार दिलीप जोशी

Sunday, January 10, 2021

शहरी नक्षलवाद आणि डाव्या पत्रकारांचा कावेबाजपणा

अजित गोगटे नामक 'जेष्ठ पत्रकारांनी' लिहिलेला कुबेरी थाटाचा एक मानवतावादी अग्रलेख आजच वाचनात आला. कुबेरांना सहसा न जमलेला प्रकार मात्र प्रस्तुत पत्रकार महाशयांनी आपल्या लेखातून करून दाखवला आहे. कुबेर आपल्या अग्रलेखात दर दोन वाक्यांनी कोलांट्याउडी मारतात, पण गोगटेंनी आपले खरे रंग शेवटच्या वाक्यपर्यंत थांबण्याची हुशारी दाखवली आहे.

कैद्यांना मिळाला सुखाने घरी मरण्याचा हक्क!

मरणासन्न कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यासंबंधी एका कोर्टाच्या मानवतावादी निर्णयावरून बेतलेला या विषयाचा उहापोह केल्याचा देखावा करणारा हा अग्रलेख असला तरी तो लिहिणाऱ्या अजित गोगोटे महाशयांचा मूळ उद्देश लेखाच्या शेवटच्या वाक्यात उघडा पडतो. 

शेवटच्या वाक्यात ते म्हणतात, "पण निदान कागदोपत्री तरी एवढी कणव आणि माणुसकी दाखविणाऱ्या त्याच केंद्रीय गृह मंत्रालयाने भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेल्या प्रा. वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या दोन आरोपींच्या बाबतीत मात्र जी निर्दयता दाखविली ती अनाकलनीयच म्हणावी लागेल."

मरणासन्न असलेल्या सर्वसामान्य कैद्यांना आणि वरावरा राव आणि स्टॅन स्वामी यांच्यासारख्या अत्यंत धोकादायक शहरी नक्षलवाद्यांना एकाच रांगेत बसवणे ही गोगटे साहेबांसाठी खूप सोपी व सामान्य गोष्ट असावी.

किंबहुना जगण्याची आशा नसलेल्या कैद्यांची व्यथा आपण मानवतावादी भूमिकेतून मांडत आहोत असा आव आणूनच हा लेख लिहिला असावा असा संशय येतो, नव्हे आपली खात्रीच होते. तसं करण्याच्या नादात या दोन शहरी नक्षलवाद्यांना स्वतःच मरणासन्न असल्याचे ध्वनित करून त्यांच्याबद्दल अज्ञ वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करणे हा मूळ हेतूच या शेवटच्या वाक्याच्या समर्थनार्थ लिहिला आहे असे वाटू लागते.

एखाद्या साध्या केसमध्ये सवलत मिळवायची आणि मग तोच न्याय या शहरी नक्षलवाद्यांना लावायला सरकारला भाग पाडायचं हा डाव्यांचा डाव असणारच आहे, त्याला समर्थन म्हणून असले लेख प्रसवणे हे कार्य कर्तव्य समजून केले असले तर त्यात आश्चर्य काय? नाहीतरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजतागायत आधी घोटाळ्याची आखणी करायची आणि मग तिच्यावर सरकारी योजनेचे आवरण चढवून आपल्यासमोर सादर करण्याची परंपरा आपल्याकडे आहेच.

या दोघांच्या शारीरिक अवस्थेचे वर्णन गोगटे साहेब "दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या.." असे करतात. क्षणभर असे गृहित धरू की हे दोघे खरंच मरणासन्न आहेत, पण त्यामुळे बहुसंख्य शांतताप्रिय जनतेला, गंभीर आरोपांत तुरुंगात असलेल्या वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन शहरी नक्षलवाद्यांच्या जहरी व कावेबाज विचार व शिकवणीमुळे निर्माण झालेला, होत असलेला, व होऊ शकणारा असलेला धोका हा कुठेही कमी होत नाही. कारण स्वतः सशस्त्र होऊन मैदानात उतरत नसले तरी इतरांची माथी भडकावून हातात शस्त्र घेऊन ४ महिन्याच्या बालकापासून निरपराध वृद्धांपर्यंत, व सशस्त्र दलांपासून पोलिसांपर्यंत कुणाचाही कशाही प्रकारे मुडदा पाडण्याला मार्गदर्शन करणारी, प्रोत्साहन देणारी, व अशा घटनांचे निर्लज्ज समर्थन करणारी ही विचारसरणी आपल्या शहरातल्या घरात राहून, विद्यापीठात शिकवत असताना, पुस्तके व इतर साहित्य निर्माण करत असताना आपले विषारी व विखारी विचार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पसरवण्याची ठाम शक्यता असते. 

म्हणूनच मरणाच्या दारात असलेल्या सर्वसामान्य कैद्यांना लावले जाणारे मानवतावादी निकष हे अशा प्रकारच्या वैचारिक अतिरेक्यांना लावता येत नाहीत. गोगटे साहेब शेवटच्या परिच्छेदाची सुरवात या वाक्याने करतात, "मृत्यू डोळ्यांपुढे दिसत असताना अनामिक भीतीने मनाची घालमेल होणाऱ्या माणसाला विशेष प्रेमाची व आश्वासक समुपदेशनाची गरज असते." मात्र त्यांना ज्या दोघा 'आजारी' व 'वयोवृद्ध' शहरी नक्षलवाद्यांचा पुळका आला आहे त्यांच्या विचारांनी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन हातात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे घेतलेल्या नक्षलवाद्यांनी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अशा निरपराध जनतेची हत्या केली व करत आहेत त्या लोकांचा विचार केला आहे काय? निव्वळ पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन एखाद्या कुटुंबप्रमुखाला त्याच्या घरातून अपहृत करून जेव्हा नक्षलवाद्यांच्या 'जन अदालत' मध्ये उभं केलं जातं तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या 'मृत्यू डोळ्यांपुढे दिसत' नसतो काय? नक्षलवाद्यांच्या तावडीतून पळून गेलेल्या ताती आयतुवर राग काढायला त्याच्या चार महिन्याच्या बाळाची त्याच्या आईच्या हातातून खेचून तिच्यासमोरच त्याची लोखंडी सळ्यांनी निर्घृण हत्या होत असताना त्या माऊलीला आपल्या पोटच्या गोळ्याचा 'मृत्यू डोळ्यांपुढे दिसत' नसेल काय? त्याला त्याला तसंच पुरलं जात असताना काय वाटलं असेल तिला? इतकेच नव्हे, तर आजवर भूक लागणे ही एकमेव वेदना अनुभवणाऱ्या त्या तान्ह्या बाळाला आपल्याला नेमकं काय होत आहे ज्यामुळे या वेदना आपल्या वाट्याला येत आहेत हे कळलं तरी असेल का? अशा हत्यांच्या कृतीला आपल्या विचारांनी सक्रिय पाठिंबा देणाऱ्या व नक्षलवाद्यांशी असे सहकार्य मरेपर्यंत करत राहू शकणाऱ्या या शहरी नक्षलवाद्यांना गोगटे साहेब कोणत्या आधारावर घरी सोडायला समर्थन देतात हे अनाकलनीय आहे. या बळी पडलेल्या निरपराध जनतेबद्दल 'या शहरी नक्षलवाद्यांना घरी सोडावे' हे निर्लज्ज प्रतिपादन म्हणजेच यांचे 'विशेष प्रेम' व मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना द्यावयाला यांच्याकडे असलेले 'आश्वासक समुपदेशन' म्हणावे काय? मग अशा कैद्यांना घरी का सोडावे, व त्यांना सुखाने मरण्याचा हक्क तरी का मिळावा?

सबब, अशा प्रकारची पत्रकारिता ही एखाद्या न्यायालयाच्या एखाद्या स्तुत्य वाटणाऱ्या निर्णयाच्या आडून शहरी नक्षलवाद्यांची व पर्यायाने सशस्त्र नक्षलवाद्यांची व अराजकतेची आणि लोकशाही व्यवस्थेविरुद्ध हिंसक उठावाची भलामण करणारी असल्याने महाराष्ट्र टुडे या संकेतस्थळाला निव्वळ 'अजित गोगटे हे त्यांचे स्वतंत्र मत असून, त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.', असं म्हणून पळ काढता येणार नाही. एरवी उत्तमोत्तम लेखांची मनमानी काटछाट करणाऱ्या संपादकांना शेवटचे वाक्य उडवून लेखक महाशयांची व पर्यायाने स्वतःच्या डाव्या विचारसरणीची झाकली मूठ सव्वालाखाची ठेवता आली असती. मात्र जगभर होत असलेल्या घातक अशा डाव्या उन्मादात हात धुवून घेण्याची उबळ प्रस्तुत संकेतस्थळाच्या चालकांना आवरता आली नसेल तर ते समजण्यासारखे आहे.

म्हणूनच कायद्याच्या कचाट्यात पकडल्या जाणाऱ्या उपरोल्लेखित दोन्ही शहरी नक्षलवाद्यांबरोबरच विविध न्यायालयांच्या निर्णयांचा आधार घेऊन व मानवतावादी भूमिकेच्या आडून अप्रत्यक्षपणे नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या अशा विचारसरणीच्या घटिंगणांवर व त्यांच्या राष्ट्रघातक विचारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या संकेतस्थळांवर लक्ष ठेवणे व वेळोवेळी त्यांना व अशा इतरांना जरब बसेल अशी कारवाई करणे हे राज्य व केंद्र सरकारांनी गुप्तहेर व इतर योग्य त्या खात्यांमार्फत करणे हे राष्ट्रीय सुरक्षितता व देशाच्या एकटा व अखंडतेच्या दृष्टीने आवश्यक ठरते.

©️ मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ. १२, शके १९४२