Friday, June 26, 2020

अँटीहीरो आणि आपण

चित्रपटांतून कुकर्म अर्थात चोरी, दरोडेखोरी, स्मगलिंग, माफिया इत्यादी कृत्ये करणार्‍यांना किंवा आपल्याला हवं ते वाट्टेल त्या मार्गाने मिळवणारा नायक म्हणून प्रस्तुत केलं जाण्याची सुरवात खरं तर खूप पूर्वी झाली. ढोबळ मानाने सांगायचे झाले तर ही सुरवात अशोक कुमार नायक असलेल्या किस्मत (१९४३) या सिनेमापासून झाली असं म्हणता येईल. मात्र त्या वेळी जेवणात मीठ असावं इतकं अशा सिनेमांचं प्रमाण होतं. या प्रकाराला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली ते मात्र अमिताभ बच्चनच्या अँग्री यंग मॅन सिनेमांनी. 

त्या काळात बॉलीवूड पुर्णपणे दाऊद आणि अंडरवर्ल्डच्या ताब्यात केलेलं नव्हतं तेव्हा किमान जे काही निर्माण व्हायचं त्याचा दर्जा उत्तम असायचा आणि म्हणूनच या प्रकाराला प्रतिष्ठा मिळण्यातून एक साध्य झालं की सामान्य जनतेच्या मनातलीही डॉन किंवा भुरट्या चोर्‍या करणार्‍याबरोबरच मोठे गुन्हे करणारा गुन्हेगार या प्रकाराबद्दल भीतीयुक्त तिरस्कार या भावनेची जागा कुतुहूलयुक्त आकर्षणाने घेतली. हे का झालं, याचा शोध घ्यायचा तर या चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांच्या नावांचा शोध घ्या, त्यांची पार्श्वभूमी तपासा म्हणजे तुम्हाला याचं रहस्य उलगडेल. चित्रपटसृष्टी पूर्णपणे माफियामय झाल्यावर त्याना दर्जाशी काही देणंघेणं उरलं नाही, कारण जो परिणाम पापभीरू जनतेच्या मनावर करायचा होता तो आधीच करुन झाला होता. उदाहरणादाखल शोले, डॉन, आणि परवाना या तीन सिनेमांबद्दल वाचा. 

गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाबरोबरच उद्योजक हे रक्तपिपासू, दुष्ट, स्वार्थी लोक असे रंगवले गेले. जुन्या काळचे, म्हणजे अगदी कृष्णधवल काळापासूनचे सिनेमे पाहिले तरी नायक हे गरीब पण मनाने उदार. उलट मारवाडी पोषाखातले, सेठ धरमदास किंवा तत्सम सूचक नावे असलेले वगैरे नाव असणारे व्हिलन, गोरगरीबांना लुटणारे असेच दाखवले गेले. हिंदी चित्रपटांतून भारतीय/हिंदू संस्कृतीचे विकृत दर्शन आणि शांतीदूतांचे उदात्तीकरण हा संबंधित पण मोठा विषय आहे, त्या संदर्भात इथे वाचता येईल.. 

कट टू १९९० दशकः 
"हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार आहेत. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्‍या महिलांच्या तोंडून हे असले उदगार निघावेत हा उपरोल्लेखित उदात्तीकरणाचाच परिणाम म्हणावा लागेल.

जे निर्माते "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद करतात तो अंशतः बरोबरच आहे, पण 'लोकांना काय हवं' या पेक्षा 'लोकांना काय चालतं ते आम्ही देतो' हे सत्याच्या अधिक जवळ जाणारं आहे. आणि लोकांना ते चालावं याची पार्श्वभूमी ऐंशीच्या दशकातच तयार करण्यात आली हे आपण विसरता कामा नये. प्रत्येक माणसांत करड्या छटा असतात असं गोंडस पण फसवं कारण देऊन गुन्हेगारीला वलय आणि सामाजिक स्वीकारार्हता प्राप्त करुन देण्यात आली.

हरणमार्‍या सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!! काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं (यातून तो निर्दोष बाहेरही पडला). नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शो यामधून झळकला आणि आजही उजळ माथ्याने वावरतो आहे.

पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी चवीने त्यांचे सिनेमे बघितले हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्‍यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची हा सर्वस्वी आपला दोष आहे. 

कट टू २०२०:
कै. सुशांत सिंगच्या निमिताने आज करण जोहर, सलमान, शाहरुख या सगळ्यांना आपण लक्ष्य करतो आहोत, पण ही सगळी आपली आणि आपल्या आधीच्या पिढीची अपत्ये आहेत एवढं ध्यानात आलं तरी पुरे. पूर्वी सोशल मिडीया नसल्याने या गोष्टी किंवा या मागचा पॅटर्न सहज लक्षात येत नसे, पण आता हिरवे आणि लाल सगळेच तर्क आणि पुराव्यानिशी उघडे पडत असताना आपल्याकडे ते कारण नाही. आजही आपण तेच करणार असू तर आपल्यासारखे मूर्ख आपणच.

✒️ © मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. ५/६, शके १९४२

युवराजांच्या पणजोबांचे 'उद्योग' आणि चीन

आज चीनबद्दल बोलताना आपण नेहरूंना दोष देतो आणि त्यावर काँग्रेसी चवताळताना दिसतात. 

प्रख्यात लेखक भैरप्पा यांच्या आवरण कादंबरीत एक सुंदर वाक्य आहे त्या वाक्याचा उत्तरार्ध आजच्या कोंग्रेसींना बरोब्बर लागू ठरतो. भैरप्पा आवरणच्या प्रस्तावनेत् म्हणतात., "मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्यांशी नातं जोडून आपण त्यांचेच वारसदार या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारी स्विकारावी लागेल". आवरणमध्ये मांडलेला हा मुद्दा किती यथार्थ आहे हे आपल्याला रोजच्या जीवनात सतत जाणवते, विषेशत: राजकीय घडामोडींचे विश्लेषण करताना. आधी इंग्रजांनी आणि मग नेहरूप्रणित समाजवादाने प्रभावित लोकांनी आपल्या लोकांचे केलेले ब्रेनवॉशींग किती खोलवर भिनले आहे आणि आपले सध्याचे (अ)राजकारणी आणि संभावित निधर्मीवादी, मार्क्सवादी, साम्यवादी, आणि निर्भीड (!) व निष्पक्ष (!!) पत्रकार देखील हेच धोरण कसे राबवत आहेत हेच "आवरण" वाचताना आपल्याला ठायी ठायी आठवत राहतं. इथे पु. ल. देशपांडेही आठवतात. त्यांच्या म्हैस कथेत, "बसच्या धक्क्यामुळे बहुतेक मंडळी 'होय होय होय होय, नाय नाय नाय नाय', म्हणजे साधारणत: भारताच्या परराष्ट्रीय धोरणासारखं..." हे वाक्य तुम्हाला आठवत असेलच. 

या अनुषंगाने नेहरूंच्या चुकांचा पाढा आज वाचला जाणार असेल तर ते योग्यच आहे. भोगविलासी, अप्रामाणिक, व अकार्यक्षम माणूस सर्वोच्च निर्णयस्थानी असल्याचा परिणाम फक्त परराष्ट्र धोरणाचा बट्ट्याबोळ होण्यापुरता एवढाच मर्यादित नसतो. नेहरूंकडे बहुमत होते. सर्व जनतेचा विश्वास होता. देशाची उद्योग धोरणे काय असावीत हे त्यांच्या हातात होते. त्यांनी जाणीवपूर्वक बेंगरूळ समाजवादाचीकास धरली आणि भारतातल्या खाजगी उद्योगांचा गळा घोटायचा अव्यापारेषू व्यापार केला. सबकुछ सरकार का असे बिनडोक आणि घातक धोरण अवलंबले.

भारतात उद्योजकांची कमतरता कधीच नव्हती.  अगदी चाणक्याच्या काळापूर्वीपासून शून्यातून अफाट पैसे मिळवणारे उद्योजक भारताने पाहिले आहेत. जुन्यापद्धतीच्या व्यापारात, औद्योगिक क्रांती झाल्यावर नव्या उत्पादनाच्या व्यापारात भारताने अनेक कल्पक, प्रतिभावान व्यावसायिक घडवले. बिर्ला, टाटा हे पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेले उद्योजक आहेत. पण नेहरूंच्या भोंगळ धोरणाप्रमाणे उद्योजक हे रक्तपिपासू, दुष्ट, स्वार्थी लोक असे रंगवले गेले. उलट उद्योगपती मात्र कपाळावर गंध लावणारे, मारवाडी पोषाखातले, स्थूल, सेठ धरमदास वगैरे सूचक नावे असणारे व्हिलन, गोरगरीबांना लुटणारे असेच दाखवले जायचे.
 
पण हे अत्यंत घातक धोरण होते. सरकारने उद्योग चालवले खरे पण त्यामुळे ना गरीबांचे भले झाले ना सरकारला पैसे मिळाले. समस्त बाबू लोकांचे उखळ मात्र पांढरे झाले. अत्यंत भ्रष्ट, नगण्य उत्पादनक्षमता असलेले अनेक पांढरे हत्ती जन्माला घालून भारताची परिस्थिती अधिकच खालावण्याला हे समाजवादी धोरण जबाबदार आहे.  त्याकरता नेहरू हा एकमेव माणूस आणि त्याचे चमचे जबाबदार आहेत.  नेहरु कन्येने हेच धोरण आणखी चार पावले पुढे नेऊन आणखी वाटोळे केले. त्यात चीनने युनियनबाजीला प्रोत्साहन देऊन उद्योगांची जी वाट लावली ती रोखण्याचा कुठलाही प्रयत्न नेहरू संस्कृतीतल्या काँग्रेस कडून झाला नाही. 

जुन्या भारतात फोन सेवा, बँक सेवा, वीज ही काय दर्जाची होती हे एकदा आठवून पहा. आज बीएसएनएलच्या पतनावर नक्राश्रू ढाळणार्‍या लालभाईंना हे सांगा. यामुळेच आपण समस्त जगाच्या कित्येक दशके मागे फेकलो गेलो आहोत.

कितीतरी उद्योजकांना जाचक धोरणांपायी सिंगापूर, थायलंड वा अन्य देशात उद्योग न्यावे लागले. तिथे ते यशस्वीही झाले पण त्यात नुकसान झाले ते भारताचेच .

भारतात अत्यंत अतर्क्य कायदे करून उद्योगांच्या गळ्याला नख लावण्याचे प्रकार झाले आहेत. परकीय चलनावर अतिरेकी निर्बंध, कंपनीने किती फायदा करावा ह्यावर निर्बंध, परकीय गुंतवणूकीवर अत्यंत जाचक निर्बंध - ह्या सगळ्यामुळे आपले अतोनात नुकसान झालेले आहे.

नेहरुच्या समाजवादामुळे पाया भक्कम झाला असे म्हणणे म्हणजे बिन लादेनने विमानाने वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दोन बिल्डिंग उडवून नव्या इमारतींचापाया भक्कम केला म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे.

होते ते उद्योग नष्ट करुन त्याजागी पांढरे हत्ती बनवून देशाच्या कमकुवत आर्थिक स्थितीला अधिकच खिळखिळी बनवण्याचे कधीही समर्थन करता येणार नाही.

ह्याकरता लोकांचा नेहरूंवर रोष असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. त्यात काँग्रेसप्रणित राजीव गांधी फाउंडेशनने थेट चीनकडून देणग्या स्वीकारल्याचे आज उघड होत असताना कोंग्रेसच्या युवराजांना नेहरूंच्या पापांपासून लांब पळता येणारच नाही.

✒️ © मंदार दिलीप जोशी (🗒️ संपादित)
आषाढ शु. ५/६, शके १९४२