Wednesday, July 29, 2026

कावळा: भाग ३ — नेहमीच्या आजी

सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका (कावळा: भाग १कावळा: भाग २)

---------------------

याला मी गंमतीने आजी म्हणतो. आमची काकूआजी २०२३ साली गेली आणि तेव्हापासून हा यायला लागला त्यामुळे. अर्थात कावळा आहे की कावळी आहे कळायला मार्ग नाही.


याचं एक वैशिष्ट्य म्हणजे तो जिथे खाण्याचं स्टीलचं छोटं भांडं बाल्कनीच्या रेलिंगला अडकवलेलं असतं तिथे येऊन काव काव करत नाही. तो खिडकीपाशीच येतो, तिथे बसतो, आणि मग आत बघत पुकारा चालू करतो. मग मी भांड्यात भात "वाढायचा," मग या आजी तिथे येऊन खाणार. आणि खाताना बघायचं नाही, नाहीतर आजी उडून जाणार. 


तळटीपः कावळ्यात आत्मा नसतो माहित आहे, मी फक्त गंमतीने आजी म्हणतो.


© मंदार दिलीप जोशी
गुरुपौर्णिमा, शके १९४८

Tuesday, July 28, 2026

कावळा: भाग २

सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका. (कावळा: भाग १भाग ३ - नेहमीच्या आजी)

---------------------

ओंकारेश्वरला एका दहाव्याला गेलो होतो तिथे आधी एक कुटूंब पिंडाला कावळा शिवण्याची वाट बघत होतं. आता ते पिंड असं असतं की खाली अगदी छोटी गव्हाची पोळी ते पिंड राहील इतपतच आकाराची असते आणि त्यावर पिंड ठेवलेलं असतं (पिंड घरंगळत पडू नये आणि एखाद्या स्टँडवर ठेवावं तशी स्थिरता यावी म्हणून). तसं त्या आधी आलेल्या कुटुंबाने त्यांचं पिंड तिथे एका चौथर्‍यावर ठेवलेलं होतं. काही वेळाने एक कावळा आला आणि त्या पिंडाखालची फक्त पोळी घेऊन गेला. मग काही वेळाने दुसरा कावळा आला आणि त्या पिंडाला म्हणजे भाताला शिवला. 

हे असं का नाही माहित. हा शंभर टक्के योगायोग असू शकतो. काही लोक म्हणतील काही कावळ्यांना पोळी आवडते, काहींना भात. काहींना दोन्ही चालतं. कावळ्यांचाही मूड असेल, कधी पोळी कधी भात. 

मला मात्र हे विलक्षण वाटलं की एका कावळ्याने वरचा सहज खाता येईल असा भात सोडून खालची पोळी खेचून घेण्याचे कष्ट का घ्यावेत आणि मी ज्या दहाव्यासाठी गेलो होतो त्या पिंडाला शिवायला कावळा आला त्याने थेट पिंडालाच का चोच लावली असेल या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडे नाहीत.











© मंदार दिलीप जोशी
आषाढ शु. चतुर्दशी, शके १९४८


कावळा: भाग १

सांगोवांगीच्या गोष्टींवर अवलंबून न राहता स्वतःच्या अनुभव मांडणारी "कावळा" या विषयावरची एक छोटेखानी लेखमालिका. (कावळा: भाग २कावळा: भाग ३ - नेहमीच्या आजी)

Wednesday, February 25, 2026

आनंदी आनंद गडे, शक्यतो ठेवा स्वतःकडे: भाग १

मित्रयादीतील आणि हे वाचणाऱ्या सर्व प्रजननक्षम वयातील महिलांना हात जोडून नम्र विनंती. इथे तुम्ही मी तुमच्या पुढ्यात साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो आहे अशी कल्पना केलीत तरी चालेल.

मातृत्व ही स्त्रीला परमेश्वराने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे. एका जीवाला जवळपास नऊ महिने उदरात हळूहळू वाढताना अनुभवणे ही गोष्ट आम्हां पुरुषांच्या नशिबात नाही. गर्भसंस्कार या गोष्टीवर विश्वास असेल तर तुम्ही नऊ महिन्यांत काय अचाट कार्य करणार आहात त्याची कल्पना करा.

इतकं पाल्हाळ लावणं आवश्यक होतं, आता पोस्टच्या मूळ मुद्द्यांकडे येतो. 

(१) एखादं सत्कार्य म्हटलं की ज्याप्रमाणे ते सफल होण्यासाठी कुटुंबीय, नातलग, आणि हितचिंतक यथाशक्ती, यथामती सहाय्य करतात, त्याचप्रमाणे एखादी चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात घडते आहे याची असूया बाळगणारेही अस्तित्वात असतात, ते येनकेनप्रकारेण नकारात्मक भावना प्रक्षेपित करत असतात.

(२) इतर अनेक बाबींसारखी गरोदर असणे ही बाब अत्यंत खाजगी असते. तुम्हाला झालेला कुठलाही आनंद हा सगळ्यांना कळवायची इच्छा समाजमाध्यमांच्या म्हणजे सोशल मिडीयाच्या काळात होणे स्वाभाविक आहे, तरीही काही इच्छांना मुरड घालावी अशी माझं तरी प्रामाणिक मत आहे.

(३) आम्हाला नाही बघायचे असले फोटो, तुम्ही गरोदर आहात आणि मूल जन्माला घालणार आहात याबद्दल निश्चितच आनंद आहे, पण नका दाखवू वाढलेलं पोट. मातृत्व सुंदर आहे, पण पोट दाखवत फिरणं विचित्र दिसतं. इनबॉक्समध्ये फक्त "जेवलीस का?" हा प्रश्न आला की फणकाऱ्याने सात्विक संताप दाखवता ना, मग आख्खी दुनिया आपल्या पोटाकडे कशा नजरेने बघत असेल याचा तरी विचार करा. हल्लीचा काळ हा "खाजगी है तो सेफ है" असा आहे.

मातृत्व सुंदर आहे… पण काही क्षण खाजगी ठेवलेलेच अधिक सुरक्षित.

फुकटचे सल्ले:

(१) आणखी थोडं स्पष्ट बोलायचं तर मूल झाल्यानंतरही किमान तीन महिने याची वाच्यता कुठेही करूच नये, अर्थात कार्यालयीन नियमांचे पालन करावं लागतं त्या औपचारिकता पूर्ण करायला लागतात त्या गोष्टींव्यतिरिक्त.

(२) लहान मुलांचे फोटो तर कुठेही टाकू नये, अजिबातच. (हे मी घरीही सांगत आलोय.)

या अनुषंगाने नुसते स्वतःचे तरी फोटो टाकावेत का, किती टाकावेत, इत्यादी अनेक विषय मांडता येतील, पण पोस्टचा विषय फक्त बेबी बम्प दाखवणारे फोटो न टाकण्याबद्दल आहे. 

अतिशय पोटतिडकीने लिहीतो आहे, कुणी अशा पोस्ट टाकल्या असतील तर राग न मानता क्षमा करावी आणि जमल्यास पोस्ट उडवाव्या अशी वरीलप्रमाणे नमस्कार घालून विनंती.

काय आहे, की एकदा बघितलेली गोष्ट Unsee करता येत नाही. त्यामुळे, "तुम्हाला काय करायचंय, नसेल आवडत तर स्क्रोल करा!" अशी टिप्पणी करायचा मोह झाल्यास माझाही तुम्हाला तोच सल्ला असेल. 



इतकं वाचल्याबद्दल अभिनंदन. जय श्रीराम 🙏🏻

🖊️ मंदार दिलीप जोशी
फाल्गुन शु. ७, शके १९४७

Tuesday, January 27, 2026

सारे प्रवासी सुट्टीचे

गेल्या जूनपासून वैयक्तिक तसेच कार्यालयीन व्यग्रतेमुळे कोकणात गावी नियमित फेऱ्या मारायला जमलं नव्हतं. शिवाय काही कामं होण्यासाठी प्रत्यक्ष जाणं अपरिहार्य असतं. सुट्ट्याही फारशा शिल्लक नसल्याने गर्दीचा धोका पत्करून जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे गावी जायचं ठरवलं.

शनिवारी सकाळी सव्वासातला निघालो, तरी आख्खे पुणे कोकणात निघाल्यागत अक्षरशः बंपर-टू-बंपर ट्रॅफिक!  माणगाव येईपर्यंत क्लच-ब्रेक-एक्सलरेटर करता करता पायाचे तुकडे पडले. एक मित्र ठाण्याहून एसटीने निघून माणगावला भेटणार होता तो ही ट्रॅफिकमध्ये अडकल्याने त्याची वाट बघत तासभर थांबलो आणि मग जेवून निघालो तर पुढे तोच प्रकार. शेवटी मंडणगडला पुन्हा खायला थांबावं लागलं इतकी दमून भूक लागली होती. आणि "मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच" करत करत गावी पोहोचलो तेव्हा साडेतीन झाले होते.

जाताना ठिकठिकाणी सुयोग्य जागा हेरून गाड्या थांबवून गर्दी करून सेल्फ्या घेणं आणि जागोजागी असलेल्या हॉटेल्स, ढाबे, आणि टपऱ्यांची दाटी यामुळे ट्रॅफिकमध्ये भर पडली ती वेगळीच. एवढं पुरेसं नव्हतं म्हणून घसरून पडलेल्या दुचाक्या आणि एक दोन ठिकाणी चारचाक्यांमधले प्रवासी एकमेकांच्या सत्तावीस पिढ्यांचा उद्धार करताना दिसले. त्यामुळे बघ्यांचा उत्साह दुणावून मागून येणाऱ्या गाड्यांचा आणखी खोळंबा.

आज येताना तीच गत, पण सकाळी निघाल्याने संध्याकाळचं पूर्ण भरातलं परतीचं ट्रॅफिक लागलं नाही हेच काय ते सुख.

काही काम असेल तर ठीक आहे, पण जोडून सुट्ट्या आल्या की लोक असे झुंडीने बाहेर पडतात की आपण कोकणात गेलो नाही किंवा फिरायला गेलो नाही तर भारताचा GDP खड्डयात जाईल की काय!

तीन दिवस घरी तंगड्या वर करून पडलात तर नेमकं काय बिघडणार आहे? हवं तर सुट्टी एन्जॉय करायला जे करता ते घरी करा रे! घरात राहणं इतकं नकोसं का होतं? काय तर म्हणे रिलॅक्स व्हायला जातो. तीनपैकी जवळपास दोन दिवस प्रवासात घालवून कसले डोंबलाचं रिलॅक्स होणार आहात? स्वतःच्या रिलेक्सेशनची वाट, इतरांच्या डोक्याला ताप, पोलिसांना त्रास आणि या सगळ्याचा स्ट्रेस घेऊन मंगळवारी कामाला जाणार!

लॉजिकची xx xxx.

ताम्हणी घाटातील ट्रॅफिक


यासंबंधात काही मुद्दे एके ठिकाणी वाचले ते योग्य वाटतात (अनावश्यक भाग संपादित):

आजचं धकाधकीचं, त्रस्त करणारं जीवन लक्षात घेऊनही मनात काही प्रश्न उभे राहिले.

१. मालकीचं घर घेऊन आश्वस्त जीवन जगता यावं यासाठी माणूस अविश्रांत श्रम करतो, ते घर हवं तसं सजवूनही घेतो. मग ४ दिवस सुटी मिळाली तर या घरात राहायला नाखुष का असतो? आनंद घ्यायला बाहेर का पडावंसं वाटतं? आणि त्यासाठी इतका त्रास का सहन करायचा? वर्षातून एकदा नीट नियोजन करून १०-१५ दिवस सुटी घेऊन बाहेर फिरायला जातातच माणसं. ते पुरेसं नसतं, म्हणून असं धावतात का?

२. बाहेर जाऊनही काही लोक लॉग ईन असतात असं कानावर आलं. मग घरात राहून ते करता येत नाही का?

३. बाहेर गेलं की स्वयंपाकाला सुटी मिळते, जी घरच्या बाईसाठी आवश्यक असते. पण घरी राहून बाहेरून पार्सल मागवता येतं. वेळ, शक्ती, पेट्रोल आणि पैसा खर्च करून, प्रदूषण वाढवून बाहेरच का जायचं असतं?

४. अशी ५-५ दिवस सलग सुटी मिळाल्यामुळे किती ऑफिसेसमधली किती कामं रखडत असतील आणि त्याचा एकूण कामावर कसा आणि किती परिणाम होत असेल?

५. अ. अशा वेळी स्थानिक पोलीस यंत्रणेवर किती असह्य ताण येत असेल. सुटी दूर, नेहमीच्या कितीतरी पट अधिक काम आणि मनस्ताप.

५. आ. सध्याच्या अत्यंत अस्वस्थ सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत पोलिसांवर असा ताण येणं योग्य ठरेल का?

५. इ. समाजकंटकांना घातपात घडवून आणायला ही सुसंधी आपणच देत नाही आहोत का?

५. ई. सगळेच काही स्वतःचं वाहन वापरत नसतील. मग अशा वेळी एसटी सारख्या यंत्रणांवर सुद्धा ताण येतच असेल. प्रवासाचा वेळ लांबून पुढचं सगळं वेळापत्रक कोलमडत असेल. आणि त्यासाठी पुन्हा प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया झेलाव्या लागत असतील.

स्वतःमधून बाहेर पडून आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करणं खरंच इतकं कठीण, अशक्य असतं का?

जानेवारी महिन्यात नवीन दिनदर्शिका आली की तेव्हाच सुट्या कळलेल्या असतात. थोडं नियोजन करून ही सुटी घरीच कुटुंबासह आनंदात घालवणं खरंच इतकं नकोसं, कठीण झालंय?

कुठे जातोय, काय करतोय त्याचं भान हरवलंय. “आजचा दिवस जगून घ्या, उद्या कुणी पाहिलाय?” या विचाराचा असह्य, घातकी अतिरेक होतोय.

©️🖊️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. १, शके १९४७

Saturday, January 24, 2026

खर्रा इतिहास: नस्ल-ए-सायकिल

पहिली सायकल स्पर्धा अकबराने सुरू केल्याचा पुरावा. यात शहेनशहा जलालूद्दीन मो. अकबर सर जिंकल्याने या स्पर्धेत सहभागी झालेला इराणचा शहा त्यांच्यावर जळायचा. विकेंड इतिहासकार हे AI असल्याचा कांगावा करतील पण haters gonna hate.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
सहाय्यक विषवमन ओकरी आणि टिमटिम बकरीपांडे
पान ४२०, ओळ १२

#तुझ्यायची_अकबरी #नस्ल_ए_सायकिल

© मंदार दिलीप जोशी