Showing posts with label मालिका. Show all posts
Showing posts with label मालिका. Show all posts

Tuesday, April 13, 2021

मालिका, शब्द, आणि आपण

एका समूहावर कुणीतरी प्रश्न विचारला होता, तो साधारणपणे असा होता की त्रागा वगैरे ठीक आहे पण या मालिकांचा मनावर आणि प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम होतो का?

तर नक्कीच होतो. या संदर्भात विचार करत असताना मला कुणीतरी शेअर केलेली प्राजक्ता कणेगावकर यांची पोस्ट आठवली. त्यात त्यांनी मारी कॉंडो म्हणून एक जगप्रसिद्ध कन्सल्टंट आहे त्यांच्या बाबतीत लिहिलेला तपशील आठवला. 

"मारी कॉंडो लोकांना घर कसं आवरावं याचं कन्सल्टेशन देते. तिचं यावर एक छान पुस्तकही आहे, ज्यात तिने एक अप्रतिम किस्सा सांगितला आहे. एका क्लायंटचं घर तिनं छान आवरुन दिलं. काही दिवस गेल्यानंतर तिला क्लायंटचा फोन आला की घरात अशांत वाटतंय. मारी जरा चक्रावली. कारण असं याआधी कधी झालं नव्हतं. ती क्लायंटच्या घरी पोचली तेव्हा तिलाही घरातून अशांत व्हाईब्ज जाणवल्या. तिने घरभर हिंडून पाहिलं. पसाऱ्याचा प्रश्नच नव्हता. शेवटी तिने घरातली कपाटं उघडली. मग तिला कळलं की अशांततेचं मूळ कुठे आहे ते. प्रत्येक कपाटातल्या प्रत्येक वस्तूवर, स्टोरेजचे बॉक्सेस, बरण्या, कंटेनर्सवर लेबल्स लावलेली होती. स्वयपाकघरात तर प्रत्येक भांड्यावर डब्यावर लेबल चिकटवलेलं होतं."

"मारीने ती सगळी लेबल्स काढायला लावली. तिने पुढे असं लिहिलं आहे की शब्द प्रत्यक्ष उच्चारला गेला नाही तरी तो वाचला जातो. नजर त्याची दखल घेते. मेंदू त्याचं प्रोसेसिंग करतो. ही जी प्रक्रिया अव्याहत चालू असते, त्याने नाद होतो, आवाज होतो, त्याने शांतता ढवळली जाते. घरात पसारा असेल तर हे शब्द ऐकू येत नाहीत कारण बाकीच्या गोष्टींच्या नादामध्ये त्यांचे नाद लपून जातात (पण असतात). घर रिकामं झाल्याने त्यांचा नाद, आवाज अधिक सुस्पष्ट ऐकू येऊ लागला इतकंच. त्यामुळे तिने लेबल्स काढली. क्लायंटने नंतर तिचं म्हणणं मान्य केलं."

सतत शब्द आदळत असतात आपल्यावर सगळीकडून. मालिकांतून तर आपल्यावर दुहेरी अत्याचार होत असतो, दृक्श्राव्य असा. अत्यंत हीन दर्जाचे संवाद असलेल्या, ज्यांत सतत कटकट, भांडणे, कारस्थाने, कुणीतरी कुणावर तरी सतत खार खाऊन आहे, सतत अतिरेकी आणि विकृत हावभाव करणाऱ्या आणि विचित्र कपडे वापरणाऱ्या व्यक्तिरेखा ज्यांत आहेत अशा मालिकांचा भडीमार इच्छुक प्रेक्षकांवर आणि अनिच्छेने बघणाऱ्या कुटुंबियांवर सुरू असतो. अनेक जण यावर अनेक उपाय सुचवत असतात त्यातला एक की आपण दुसऱ्या खोलीत जाऊन बसावं... मारी कॉंडोने पुस्तकात सांगितलेला किस्सा आठवला तर यातली गडबड लक्षात येते. ती म्हणजे दुसऱ्या खोलीत बसलं तरी घरात तो नाद जाणवत राहतोच. याच नकारात्मक नादाचा परिणाम हा कळत नकळत बघणाऱ्या प्रेक्षकांवर होतच असतो आणि त्याचा परिणाम इतरांशी त्यांच्या असलेल्या वागण्यात झाल्याचं दिसून येतं.

एका मालिकेत मामा आणि भाचीचं प्रेम प्रकरण दाखवलं होतं. आता यात एक गोम आहे. हे देशातल्या काही भागांत सामान्य आहे. पण सगळ्याच भागात नाही. पण याच्या पासून सुरवात करत हळू हळू हे इतर नात्यांपर्यंत वाढवत नेलं जाऊ शकतं. उद्या सख्खे भाऊ बहीण प्रेमात पडताना दाखवले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

कारण जवळजवळ प्रत्येक वाहिनीवर एखादी तरी मालिका अशी आहे की जिच्यात एखादी वाईट किंवा विचित्र गोष्ट (aberration) समाजात घडत असेल तर ती तशीच म्हणजे सामान्य किंवा नॉर्मल नाही हा संदेश जाण्याऐवजी त्याचं अशा प्रकारे सामान्यीकरण (normalisation) आणि त्या गोष्टीला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जोमाने सुरू आहे.

एका मालिकेत विवाहबाह्य संबंधांचं चित्रण होतं. मालिकेबाबत जास्त चर्चा नको, पण घटस्फोट देऊन नवऱ्याला लाथ मारून बाहेर काढायच्या ऐवजी जिच्याशी लफडं असतं त्या बाईला धडा शिकवायच्या नावाखाली तिच्याबरोबर एकाच घरात राहणारी बायको आणि तिला साथ देणारी सासू दाखवून झीने नक्की काय साधलं? विवाहबाह्य संबंध असतात समाजात, पण नवरा त्याच्या लफडयाबरोबर त्याच घरात एकाच बेडरूममध्ये राहतो आणि बायकोही मुलाबरोबर आणि सासुसासऱ्यांबरोबर त्याच घरात हळदीकुंकू, त्या लफडयाची चेष्टा करत मजा मजा करत राहतात हे काहींना बघायला विनोदी वाटत असलं तरी हे एका सामाजिक विकृतीचं उदात्तीकरण नव्हे का?

दुसऱ्या एका वाहिनीवर उंच, गोरी आणि सुंदर मुलगी आणि बुटका आणि अत्यंत सामान्य दिसणारा, फारसा कर्तबगार नसणारा मुलगा अशी जोडी दाखवली आहे. आणखी एका मालिकेत एक लग्नाळू मुलगा घरातल्या मोलकरणीशी सूत जमवून लग्न करताना दाखवला आहे.

ज्या सुबोध मालिकेची इथे अजूनही यथेच्छ चेष्टा सुरू असते, त्यात तरी वेगळं काय दाखवलं आहे? श्रीमंत पण चाळीशी केव्हाच उलटून गेलेल्या विधुराच्या जवळजवळ गळ्यात पडून लग्न जमवणारी विशीतली तरुणी. उद्या चांगल्या घरातल्या तरुणींना आपल्या आसपास एखाद्या बऱ्यापैकी पैसेवाल्या पण वयाने पंधरा वीस वर्षे मोठ्या असलेल्या पुरुषाला पत्नीवियोग झाल्याचं समजल्यावर त्या पुरुषात त्या मुली आपला भावी नवरा पाहू लागल्या तर त्याला जबाबदार असणाऱ्या कारणांत या मालिकांचा नंबर नक्कीच वरचा असेल.

मागे एका तरुणांच्या मालिकेत मुलं आणि मुली एकाच घरात भाड्याने राहत असल्याचं दाखवलं होतं. ही मुलं प्रामाणिक, उद्यमशील वगैरे दाखवण्याच्या आडून असं मुलामुलींनी एकत्र राहणं हे सामान्य असल्याचं किंवा सामान्य असायला हवं असं सुचवण्यात मालिकेने कोणतीही कसर सोडलेली नव्हती.

तीच तीच सासू सुनेची भांडणं दाखवून कंटाळा आला म्हणून की काय एकाच कुटूंबातले बाकीचे सदस्य पण एकमेकांच्या विरोधात उठता बसता सतत कारस्थानं करत असताना दाखवले जाऊ लागले. एकमेकांचा सत्यानाश करण्याच्या जेवढ्या योजना दर क्षणाला त्यांच्याकडे बनत असतात तेवढ्या तर राजकारणातले लोक सुद्धा करत नसतील. एका मालिकेत तर आजी नातवाचा जीव घ्यायला तत्पर असल्याचं दाखवलं होतं. त्याच मालिकेत बहीण बहिणीचा जीव घ्यायचा प्रयत्न करते, भाऊ भावाचा, आणि बरंच काही.

संत तुकाराम हा चित्रपट पाहून कुणी संत होत नाही, आणि एखादा डाकूपट पाहून कुणी दरोडेखोर होत नाही हे वाक्य डायलॉग म्हणून तोंडावर मारायला ठीक आहे, पण दृश्य माध्यमांचा परिणाम जनमानसावर किती होतो याची प्रत्यक्ष उदाहरणे आजूबाजूला घडताना पाहिलेली आहेत.

धर्मेंद्रचा जुगनू चित्रपट दोन डझन वेळा पाहून त्यातल्या दरोड्याच्या दृष्याबरहुकूम तसाच दरोडा आपण घातल्याची कबूली आरोपींनी पोलिसांना दिली होती. सैराट सिनेमा प्रदर्शित झाल्यावर नुकतंच मिसरूड फुटलेल्या अनेक किशोरवयीन मुलांनी घरातून पळून गेल्याच्या बातम्यांत वाढ झालेली होती.

सिनेमाचा परिणाम जो आणि जेवढा होतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक मालिकांत होतो, आणि होतही आहे. रोज त्याच गोष्टींचा मारा सुरू असतो, आणि कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी संपूर्णपणे तो यशस्वी होत नाही. दुर्दैवाने अशा मालिकांचा प्रेक्षकवर्ग अशा पिढीतला आहे की जी स्वतः कर्तबगार आहे पण मनोरंजनासाठी म्हणून सुरवात करून त्याचं व्यसन कधी झालं हे तिला कळलेलंच नाही.

समाजात संस्कृती, प्रकृती, आणि विकृती हे एका विशिष्ट प्रमाणात असतात. प्रमाण व्यस्त झालं तरी शेवटी विकृती ही विकृतीच राहते. दुर्दैवाने मालिकांत मात्र या विकृती किंवा विचित्र गोष्टींचं सामान्यीकरण सुरू असल्याचं दिसतं. याला हळूहळू प्रतिष्ठा प्राप्त होईल. एक प्रकारचं ब्रेनवॉशिंगच आहे, आणि त्यातून आपण लवकरात लवकर बाहेर पडायलाच हवं.

न्यायदेवता आंधळी असते कारण तिला निष्पक्षपणे विचार करायचा असतो, तसंच पण जरा वेगळ्या अर्थाने घराबद्दल म्हणायचं झालं तर वास्तूही आंधळ्या व्यक्तीसारखी असते, तिला हे कळत नसतं की आवाज कोणाचे आहेत, खरे आहेत की खोटे आहेत, टिव्हीतून येत आहेत की प्रत्यक्ष माणसांच्या तोंडून. म्हणून आपण घरात निव्वळ काय बोलतो इतकंच नव्हे तर टीव्हीवर काय बघतो हे देखील तितकंच महत्वाचं ठरतं.

स्टुडिओत आठ आठ तास घोटवून घेतलेल्या गाण्याला आपण गायकांची....नव्हे स्पर्धकांची गायकी समजतो आणि अर्धवट ज्ञानाने पिवळे झालेले परीक्षक ज्या तोंड फाटेस्तोवर स्तुतीपर स्क्रिप्टेड प्रतिक्रिया देतात त्यांना खरं समजतो, आणि कोण जिंकणार हे ही आधीच ठरलेलं असलं तरी खरोखर सुंदर गाणारा स्पर्धक जिंकला/ली नाही तर वाईटही वाटून घेतो आणि त्यावर हिरीरीने चर्चाही करतो. हा ही एक प्रकारचा नकारात्मक नादच नव्हे का?! शिवाय, आपण दर्जेदार गायनाला मुकतो आहोत आणि गेली अनेक वर्ष आपली अलिखित राष्ट्रीय पॉलिसी असलेले दोन शब्द 'चलता है' छाप गायकीचा सदोष नाद आपल्या मनात साठवत जात आहोत.

गेमिंग अर्थात कॉम्पुटर/मोबाईल गेम्समध्ये जी मानसशास्त्रीय क्लृप्ती वापरली जाते तीच थोड्याफार फरकाने मालिकांत वापरली जाते. गेमिंगमध्ये कितीही अवघड गेम असला तरी खेळणाऱ्या व्यक्तीला अधूनमधून लहानसहान विजयांचं गाजर दाखवून सतत गेम खेळायला भाग पाडलं जातं, तसंच मालिकांच्या जवळजवळ प्रत्येक भागाच्या शेवटी उद्या म्हणजे पुढच्या भागात काय होणार आहे याचं औत्सुक्य चाळवून त्यावर विचार करण्यास आणि पुन्हा पुढे बघण्यास प्रवृत्त केलं जातं. 

मालिकांच्या बाबतीत एका मानसशास्त्रज्ञाचं विधान आठवलं, ते हे की मालिका या चित्रपटापेक्षा जास्त धोकादायक असतात कारण त्याने मनाला क्लोजर मिळत नाही. सिनेमात कथेचं वर्तुळ पूर्ण झाल्याने प्रेक्षकांना क्लोजर मिळतं, ते असंख्य भाग असलेल्या मालिकांतून मिळणं अशक्य असतं. क्लोजर न मिळाल्याने मानसशास्त्रीय विसंगती निर्माण होते आणि त्यातूनच सतत तोच नकारात्मक नाद मनात घेऊन आपण दिवसाचा शेवट करत असतो. काम कितीही असो किंवा नसो आजकाल जाणवणाऱ्या प्रचंड स्ट्रेस किंवा मानसिक थकव्याचं हे देखील एक मोठं कारण आहे असं वाटतं.

यातून बाहेर कसं पडायचं हा मात्र अवघड प्रश्न आणि खोल विषय आहे. मालिका नव्हत्या तेव्हा लोक जे करत होते ती परिस्थिती आणि सामाजिक वातावरण आज उरलेलं नाही आणि आज ही अवस्था आहे की मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष देण्यापेक्षा, त्यांच्याशी संवाद वाढवण्यापेक्षा इतरांची आई काय करते आणि आपल्या फिटनेसची काळजी करण्यापेक्षा मालिकेतल्या वजनदार मुलीचं लग्न का ठरत नाही याची काळजी लोक जास्त करत असतात. 

कणेगावकर त्यांच्या लेखात पुढे एक उदाहरण देताना म्हणतात की "सप्तशतीमध्ये शु़ंभ दैत्याच्या मृत्युसमयाचं वर्णन करताना एक खूप सुंदर वाक्य वापरलं आहे. दिग्जनित शब्द शांतावला असं. इथे शब्द कोलाहल या अर्थी वापरला आहे. Sound is indestructible असं असलं तरी शब्द शांतवण्यासाठी प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधणं म्हणूनच फार गरजेचं झालं आहे."

तर असा मार्ग शोधण्यासाठी गुढीपाडवा हा त्याची सुरवात करण्याचा दिवस ठरो अशा तुम्हाला या सणाच्या निमीत्ताने खूप शुभेच्छा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
चैत्र शुक्ल प्रतिपदा, शके १९४३ अर्थात गुढीपाडवा

Tuesday, August 18, 2020

रात्रीस खेळ चाले, कोकण, आणि मी

ही मालिका २९ ऑगस्टला निरोप घेते आहे त्या निमित्ताने...

मुळात आधीपासून ग्रामीण भागात आणि विशेषतः कोकणात संध्याकाळ झाली की एकदम सामसूम होतं. रस्त्यावर चिटपाखरूही दिसत नाही. आतासारखी सगळीकडे वीज नसल्याने पूर्वी दोन घरातलं अंतर कितीही असलं तरी रात्रीच्या भयाण शांततेत दार प्रत्यक्ष वाजवून माणूस बाहेर आल्याशिवाय शेजार आहे हे जाणवत देखील नसे; आताही फार फरक पडलेला नाही, पण अनेक घरात आलेल्या मठ्ठ खोक्यामुळेही लोक एकमेकांना भेटायला फार बाहेर पडत नसावीत. तर, संध्याकाळी दिवेलागणीनंतर करण्यासारखं काही नसल्याने मुलांचे अभ्यास, जेवणं, आणि झोप यांच्यात मध्ये भरपूर वेळ मिळे. दिवसा ज्याकडे लक्षही जात नसे असे एखादे झाड रात्री उगाचच भयानक वाटतं. 

मुबलक प्रमाणात असलेली झाडं झुडपं आणि पानाफांद्यातून रात्री डोकावणारा चंद्रप्रकाश आणि वीज आल्यानंतरच्या काळात रोजच चाललेला बल्बच्या प्रकाशाचा खेळ त्या वातावरणाच्या गूढतेत आणखीच भर टाकतो. कोकणातल्या गावांत अनेक गल्ल्या आणि आळ्यांत खांबांवरून जे दिवे सोडलेले असतात त्यांचे काम म्हणजे परिसर उजळून टाकणे हे नसून तो खांब तिथे आहे हे वाटसरूंना दाखवण्यापूरते मर्यादित असते. त्यामुळे दोन खांबांच्या मधला भाग लोक घाबरत घाबरतच पार करतात. 

त्यामुळे मग वेळ घालवायला म्हणा किंवा आलेले खरे खोटे अनुभव वाटून घ्यायला म्हणा असंख्य भूतकथांचा जन्म झाला यात नवल नाही. याला वर वर्णन केल्याप्रमाणे असलेल्या कोकणातल्या नीरव शांततेची आणि भरपूर आणि दाट वृक्षसंपदेची फोडणी मिळाली आणि खऱ्या खोट्या असंख्य भुतांनी गोष्टीरुपाने वावरायला सुरवात केली.

काही काळापूर्वी कोकणातल्या भुतांचे प्रकार वाचले होते ते जसे आठवतात तसे देतो आहे:

वेताळ, ब्रह्मग्रह, समंध, देवचार, मुंजा, खवीस, गिऱ्हा, चेटकीण, झोटिंग, वीर, बायंगी, जखीण, हडळ, म्हसोबा, लावसट, भानामती, चकवा, वगैरे. यांची वर्णने देत बसत नाही कारण फेसबुकवर किंवा नेटवर इतर ठिकाणी शोधल्यास सहज सापडेल.

लहानपणी आजी आजोबांनी भरपूर भुतांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक गंमतीशीर गोष्ट म्हणजे "रामाच्या देवळासमोर एक बाई राहते, तिचा दरवाजा वाजवल्यावर ती बसल्याजागेवरून लांबूनच हात लांब करून दार उघडते" ही होती. गंमतीशीर अशाकरता म्हणालो की तेव्हा जाम तंतरली असली तरी नंतर रामाच्या देवळसमोर भूत कसं राहील असं आजीने विचारल्यावर आजोबा आपली खेचत होते हे लक्षात आलेलं. तरीही त्या घरासमोरून जाताना काही दिवस घाबरायला व्हायचंच!

मी मूळचा कोकणचा असल्यामुळे कोकणावर भयंकर प्रेम आहे हे वेगळं सांगायला नकोच. पूर्वी पडघवली वगैरे मालिकांतून कोकण दर्शन झालं खरं, पण तरी कोकणाला टीव्हीवर पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्याने तो अनुशेष कोण भरून काढणार हा प्रश्न होताच. अशात #झी_मराठी वर #रात्रीस_खेळ_चाले सुरू झाली आणि आता मजा येणार असं वाटू लागलं. पण झीवरच्या इतर (म्हणजे जवळपास प्रत्येक) मालिकांसारखीच आरंभशूर झालेल्या या मालिकेने नंतर कंटाळवाणं केलं. एखादा विषय सुरू केल्यावर त्याचं पुढे काहीही होताना न दाखवता विसरून जाणं आणि शेवटी प्रत्येकावर का संशय आहे याची कारणे देऊन शाळेत आदा मादा कोण पादा केल्यागत त्यातल्या एकीला अटक करणं यामुळे मालिकेने खूपच अपेक्षाभंग केला. पात्रयोजना जरी चपखल असली तरी यामुळे शेवटी शेवटी वैताग आला होता. त्यात मालिकेतले क्वचितच दिसणारे आणि कपाटातून बाहेर येणारे अण्णा ही माझी विशेष आवडती व्यक्तिरेखा.

ही मालिका परत सुरू होणार म्हटल्यावर फार आशा नव्हतीच पण उत्तम अभिनय, मागल्या सीझनमधे गंडलेलं कथानक सुधारून ओघवती कथावस्तू देणे, उत्कृष्ट पात्रनिवड यांनी या मालिकेच्या आधी काय घडते हे दाखवणाऱ्या सीझनने म्हणजेच प्रिक्वेलने खूप मजा आणली. अगद कमी फुटेज किंवा लहानात लहान व्यक्तीरेखाही लक्षात राहते. मुख्य म्हणजे या मालिकेतले कलाकार कपडे घालतात ते आवडले. म्हणजे इतर मालिकांसारखं संडासात जाताना लग्नाला निघाल्यासारखे कपडे घालणे किंवा नखशिखांत नट्टापट्टा केला असतानही "अभी तैय्यार होके आती हूं" म्हणणे नसायचे. कुठेही नाव ठेवायला जागा नाही.

अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा अतिशयोक्तीपेक्षाही जास्त भडक असल्याने पटत नव्हतं, पण असे लोक खरंच अस्तित्वात असल्याचं काही जणांनी किस्से सांगितले त्यातून कळलं. ही भूमिका साकारणारे श्री माधव अभ्यंकर यांच्याशी फेसबुकवरच बोलताना त्यांनीही असली माणसं अस्तित्वात असतात असं सांगितलं होतं. ते खरं असेल तर अवघड आहे.

<< माझं आधीचं मत हे होतं: अगदी अनेक जुन्या हिंदी सिनेमातले व्हिलनही कुटुंबवत्सल दाखवले आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एखादा माणूस कितीही संतापी, विक्षिप्त, तिरसट, बाई आणि बाटलीत गुरफटलेला, लोकांना फसवून त्यांच्या जमिनी लाटणारा, वगैरे सगळे वाईट धंदे करणारा असला तरी तो शेवटी प्रॉपर्टी आणि पैसा जमवतो कुणा करता, तर आपल्या कुटुंबाकरताच. मग हा माणूस याला मारीन, गोळी घालीन, घराबाहेर काढीन, वगैरे करून शेवटी घरी कोण शिल्लकच उरलं नाही तर एवढी संपत्ती काय वर घेऊन जायची आहे का? म्हणूनच अण्णा नाईक ही व्यक्तिरेखा एका मर्यादेपलीकडे पटत नाही. या सगळ्याचा लेखक व दिग्दर्शकांनी विचार करायला हवा होता.) >>

बाकी अण्णा नाईक यांच्या भूमिकेत श्री माधव अभ्यंकर आणि पांडूच्या भूमिकेत प्रल्हाद कुडतरकर रॉक्स! आपण फॅन!! नेने वकील (शेवटच्या काही भागांत कलाकार बदलले, ते ही छानच, पण माझे आवडते दिलीप बापटच), शेवंता (अपूर्वा नेमलेकर). सदा, वच्छी आणि आबा, शोभा, काशी, माई (शकुंतला नरे), रघूकाका (अनिल गावडे), दत्ता (सुहास शिरसाट), माधव (मंगेश साळवी), छाया (नम्रता पावसकर), सरिता (प्राजक्ता वाड्ये) आणि इतर सगळेच उत्तम. अधुनमधुन दिग्दर्शकाला ही गूढकथा आहे की रात्रीस खेळ चाले ऐवजी दिवसा केलेले चाळे (सॉफ्ट पॉर्न) दाखवायचे आहेत याचा गोंधळ झाल्यासारखं वाटत होतं, पण ठीक आहे.

©️ मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. द्वादशी, शके १९४२

टीपः रात्रीस खेळ चाले चे Meme: या मालिकेने मीम साठी अनेक फोटो मिळवून दिले. Zee5 App किंवा ब्राउझर वरून Zee5 वर मालिकेचा एखादा भाग सुरू असताना हवा तो क्षण किंवा पात्रांच्या चेहऱ्यावर हवे ते भाव आले की मी तो क्षण साधून स्क्रीनशॉट काढतो आणि वापरतो. असे अनेक फोटो/स्क्रीनशॉट माझ्या संग्रही असतात व एखादा विनोद सुचला की त्यातला एखादा काढून वापरतो. नेटवर असलेले आयते फोटो काही कामाचे नसतात कारण काही अपवाद वगळता मराठीत अजून Still Photography पुरेशी फोफावलेली नाही. म्हणून हे फोटो मालिकेच्या निर्मात्यांकडेही सापडणार नाहीत. त्यामुळे एखादा विनोद सुचल्यास त्याची मीम करायला मला ५ मिनिटेही लागत नाहीत.

Thursday, July 23, 2020

"तुम्ही बघता कशाला?" आणि "जीवावर उदार होणारे कलाकार"

[काही लोकांना #त्रागा / मालिकांवरच्या पोस्ट दिसल्या की लगेच "तुम्ही बघता कशाला?" असले अतार्किक प्रश्न घेऊन लोक परत परत हजर होतात. आमच्या वेळेचा कसा सदुपयोग करायचा ते आम्हाला उत्तम समजतं, आणि टीव्ही समोर बसून सगळ्या मालिका बघू लागलो तर नोकरी/व्यवसाय सोडून घरी बसायला लागेल. घरी किंवा शेजारी नुसतं इकडून तिकडे गेलं टीव्ही असलेल्या खोलीतून तरी सगळ्या मालिकेचा फील येतो. एकाच घरात राहताना कान आणि डोळे बंद करुन बसता येत नाही, अगदी दुसरी खोली असेल तरीही. शिवाय, एका मिनीटाची जाहीरात जरी बघितली तरी मालिकेत काय चाललं आहे ते स्पष्ट कळतं. तेव्हा "तुम्ही बघता कशाला?" याला उत्तर एकच, "तुम्ही त्रागा दिसला की त्याच पोस्ट का वाचता? दुर्लक्ष करा!"]



अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देणार्‍या कला क्षेत्रातल्या लोकांनी हे समजून घ्यावं की आम्हाला हे माहीत आहे की आर्थिक गरजा कुणाला चुकल्या नाहीत, शेवटी पोटासाठी करावं लागतं, त्यामुळे तुम्ही फालतू मालिकेत टुकार भूमिका करत असाल तर त्यात गैर काही नाही...पण मग टीका सहन करायला तयार राहावं माणसाने. दुर्लक्ष करता येत नसेल तर काही लोक सरळ ब्लॉक करुन मोकळ्या होतात, तसंही करायला हरकत नाही. अग्गंबाई सासूबाई वगैरे सारख्या भंगार मालिकेत काम केल्यावर काय स्तुतीसुमने उधळायची का लोकांनी तुमच्यावर? एकदा तुम्ही कॅमेर्‍यासमोर आलात की दिसणार्‍या आणि ऐकू येणार्‍या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याचा प्रेक्षक म्हणून आम्हाला अधिकार आहे. आम्ही नाटकाची व सिनेमाची तिकिटे, केबलचे पैसे, आणि वीज खर्च करतो.

कलाकार किंवा तत्सम लोक म्हणजे काही सैनिक, वैद्यकीय व्यावसयिक व कर्मचारी, पोलीस बँक कर्मचारी, जीवनावश्यक वस्तूंची ने आण करणारे वाहतुक व्यवसायिक वगैरे नाहीत जीवावर उदार व्हायला. कुणीतरी जीव धोक्यात घालून केलेलं काम आम्ही मनोरंजन म्हणून बघू इतक्या कोत्या आणि असंवेदनशील मानसिकतेचे आम्ही वाटलो का? रसिकांवर कसले उपकार करत आहात तुम्ही? तुम्ही ज्या व्यवसायात राहून पैसा कमावत आहात तोच मुळात लोकाश्रित आहे. लोकांचे उपकार आहेत तुमच्यावर. पैसा फेको तमाशा देखो. तुमच्या मालिका बंद झाल्या तर रसिक दुसरे मार्ग शोधतील (किंबहुना शोधतातच). तुम्ही काहीही तुमचं आयुष्य धोक्यात घालून करत नाही आहात हे, पैसे घेताय त्याचे निर्मात्याकडून. तेव्हा आमच्यासाठी जीवावर उदार होत आहात या गैरसमजातून कलाकारांनी लवकरात लवकर बाहेर आलं तर बरं. या असल्या मालिकांपेक्षा खाली डोंबारी आला तर त्याचा खेळ बघेन मी. तो खरं तर जीव धोक्यात घालतो दोरीवर चालून.

आणखी एक, "तुमच्या कामाचा असा जाहीर पंचनामा केला तर चालेल का?" असा बावळट प्रश्न एके ठिकाणी वाचला. आमचं काम जितक्या लोकांसमोर आम्ही करतो तितक्या लोकांसमोर आमच्या कामाचं नियमित मूल्यमापन होत असतं. आम्ही ऑफिसात काय काम करतो, कसं करतो म्हणजे पद्धत काय, आमच्या कामाचा इतरांवर काय परिणाम होतो याचा दर तीन, सहा, किंवा बारा महिन्यांनी आमच्या ठराविक बॉस समोर मूल्यमापन उर्फ पंचनामा होत असतो. अधुनमधून टोचायला मॅनेजर लोक असतातच. शिवाय कॉलवर क्लायंट आमची जी शाळा घेतो ती वेगळीच. तेव्हा असा बावळट प्रश्न पुन्हा विचारू नका. तेव्हा चूक झाली की किंवा अपेक्षित काम नाही झालं की लोक आम्हाला नावं ठेवतातच. कलाकार म्हणजे कुणीतरी परग्रहावरचे आहात हा समज दूर करा.

बाकी तुमच्या इतर मतांबद्दल निकोलस टालेब यांनी लिहीलेली वाक्ये जशीच्या तशी द्धृत करतो आहे, ती हॉलीवुडच्या कलाकारांबद्दल लिहीली असली तरी ती सगळ्याच कलाकारांना लागू पडतात:

1) To understand why what happens in Hollywood is irrelevant to the rest of humans: 1) How many ACTORs do you have among your friends? 2) How many ACTOR friends do your friends have? Actors rarely mix with real people.

2) Romans banned actors from marrying, even mixing with citizens. Same dynamics in modern times, but self-inflicted: engineers can mix w/gynecologists... actors stay with actors. Look at the funerals of "gens du spectacle".

3) I do not know many industries where people are hired either
a) on looks, or
b) ability to impersonate what one is not.

4) Actors should not be the ones lektchuring the rest of us on ethics & morality. They also have a tendency to conflate virtue and its external manifestation, given that everything in their world is appearance. 

5) And for the slow thinkers on the thread, you don't see gynecologists or train engineers lektchuring the rest of the world on virtue. Actors do. Gabish?

6) Remember: actors are trained to not seem stupid.

7) Now a harder questchon: what is the proportion of actors who voted for Hilary Monsanto-Malmaison?

8) OK, let me be blunt. How many professions do you know, other than the ones where physical attributes are essential, where the modus "sleep your way up" prevails?

© मंदार दिलीप जोशी
- एक अत्यंत संतापलेला प्रेक्षक

तळटीपः यातली काही वाक्ये काही मित्रांच्या पोस्ट व टिप्पण्यांतून घेतली आहेत, टंकायचा कंटाळा म्हणून. श्रेय न दिल्यास रागवू नये.