Tuesday, October 31, 2023

मर्यादा पुरुषोत्तम

चित्रसेन स्वर्गात अर्जुनाला नृत्य आणि संगीताचं शिक्षण देत असताना ते बघत असलेली उर्वशी अर्जुनावर भाळली. अर्जुनावर अनुरक्त झालेल्या उर्वशीला अर्जुन म्हणाला की आमच्या एका पूर्वजाशी म्हणजेच महाराज पुरुरवा यांच्याशी विवाह करुन तुम्ही आमच्या वंशाचा जो सन्मान केलात, आमची वंशवृद्धी केलीत त्यामुळे तुम्ही मला मातेसमान आहात. त्यामुळे इतर कुठल्याही स्वरूपात मी तुम्हाला पाहू शकत नाही. 

इंग्रजीत एक म्हण आहे, "Hell hath no fury like a woman scorned." अर्जुनाच्या नकाराने क्षुब्ध झालेल्या उर्वशीने त्याला शाप दिला की तू कायम नपुंसक राहशील. यावर इंद्राने तिला शाप एक वर्षापर्यंत मर्यादित करण्याचा आणि ते एक वर्ष अर्जुनाला निवडण्याची मुभा देण्याचा सल्ला दिला. अर्जुनाने ते एक वर्ष म्हणून अज्ञातवासाचं एक वर्ष निवडलं. 


अज्ञातवासात अर्जुनाने बृहन्नडेचं रूप घेतलं आणि विराट राजाची कन्या उत्तरा तिला संगीत व नृत्याचं शिक्षण दिलं. अज्ञातवासाच्या शेवटी जेव्हा सर्व पांडव आपल्या मूळ रूपात प्रकट झाले तेव्हा विराट राजाने अर्जुनापुढे आपल्या कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. पण अर्जुनाने त्याला नकार दिला. 

आता अर्जुनाने नकार का दिला याकडे लक्ष द्या. अर्जुनाने उर्वशीच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिला त्याचं कारण आठवलं तर याचंही कारण आपल्या लक्षात येईल. 

अर्जुन विराट राजाला म्हणाला की त्याने उत्तराला संगीत व नृत्याचं शिक्षण दिलं, म्हणजे तो तिचा गुरु होता. आणि शिष्या ही मुलीसारखी असते. पण तुम्ही उत्तराचा विवाह माझा पुत्र अभिमन्यू याच्याशी करा. मग अभिमन्यू आणि उत्तरा यांचा विवाह संपन्न झाला.


विचार करा. आजच्या भाषेत ज्याला हॉट म्हणतात तशी अप्सरा तुमच्यावर अनुरक्त होते आणि तुम्ही तिला तिने तुमच्या एका पूर्वजाशी लग्न केलं म्हणून आईसमान म्हणता आणि नकार देता.

पुढे एक राजा आपल्या सुंदर मुलीचं स्थळ तुम्हाला सुचवतो आणि तुम्ही म्हणता तुम्ही तिचे गुरु असल्याने ती तुम्हाला मुलीसमान आहे म्हणून तुम्ही नकार देता, आणि तिचं लग्न आपल्या मुलाशी लावून देता.

आज शक्य आहे का ते? पण ‘चालतंय’ नावाखाली हवं ते करायचं. जाहिरात, मालिका, आणि सिनेमाच्या माध्यमातून आपल्यावर हे बिंबवण्याचा प्रयत्न सुरु आहे की कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी म्हणजे खूप लहान किंवा वयाने मोठी असली तरी हल्ली लग्न केलेलं/जमवलेलं चालतं आणि करावं(च). आठवा: अनिल कपूर आणि श्रीदेवीचा 'लम्हें' हा चित्रपट. अनिल कपूरचं श्रीदेवीवर प्रेम असतं पण तिचं दुसर्‍यावर. तिच्याशी लग्न होऊ शकत नाही म्हणून हा पुढे तिच्यासारख्याच दिसणर्‍या तिच्या मुलीशी लग्न करतो. मराठीत 'तुला पाहते रे' आणि हिंदीत 'दिल सम्हल जा जरा' आणि स्त्री व पुरुष यांच्या भुमिकांची अदलाबदल असलेला 'आप के आ जाने से' या मालिकांची उदाहरणे आहेत.

महाभारतातील किंवा कुठल्याही धर्मग्रंथातील व्यक्तींबाबत व्हॉट्सॅप फॉरवर्डेड विनोद ढकलणे आणि त्यावर हाहा करणे याला अजिबात अक्कल लागत नाही. पण मूळ संदर्भ तपासून त्या व्यक्ती किती धार्मिक होत्या आणि धर्मपालन करताना विशिष्ट परिस्थितीत स्त्रीकडे आई आणि मुलगी म्हणून बघायची दृष्टी त्यांना कशी होती यात त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे हे आपल्या ध्यानात येतं. 

इथे अर्जुनाचं वय नेमकं किती ते सोडा. पण तुम्हाला तुमच्या वयाच्या ४०-४५ वर्षी, २५च्या आसपास वय असलेल्या मुलीमधे स्वतःची मुलगी किंवा बहीण दिसत नसेल आणि फक्त मादीच दिसत असेल तर तुमच्या मेंदूत काहीतरी फार मोठी गडबड आहे हे नक्की (मग दादा/ताई/काका/मामा करायची गरज आहेच असं नाही). ती गडबड एक तर जनुकीय किंवा संस्कारांशी संबंधित तरी आहे किंवा तुम्ही ज्या वातावरणात वाढलात त्याच्याशी तरी. 

तस्मात्, धर्ममार्गावर चाला.

बास, बाकी काही नाही.

🖊️ मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ३, शके १९४५

-----------------------------------------------------------------
टीपः
(१) वरील ४५-२५ ही वये ही प्रातिनिधिक म्हणून घेतली आहेत. अक्षरशः घेऊ नये.
(२) या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये

माझा एक लांबचा भाऊ आहे, जॉब प्रोफाइल आयटी सपोर्ट अशी आहे. 

मी त्याला कधी फोन केला की तो नेहमीच माझी जी काही शंका असेल तिचं निरसन करायचा, अगदी कितीही क्षुल्लक असेल तरी. मी एकदा त्याला सहज विचारलं की अरे बाबा तुला डिस्टर्ब होत नाही ना? तुला नक्की वेळ असतो ना?

मग एकदा त्याने त्याची प्रोफाइल मला समजावून सांगितली. मला वाटलं बऱ्यापैकी रिलॅक्स काम आहे. तो म्हणाला की अरे हे जे तुला रिलॅक्स वाटतं तेच मुळात प्रमुख काम आहे. एखादी घटना (incident) घडली की त्याला प्रतिसाद (response) देणं हे तुलनेने सोपं आणि तितकं स्ट्रेसवालं नाहीये. कारण काय करायचं हाच माझा विषय असल्यानं मला आधीपासूनच माहीत आहे किंवा नंतर मार्ग काढता येतो.  

पण आता काय घडेल, आता काही घडेल का, कधी घडेल, याची वाट बघत बसणं आणि त्या दडपणाखाली राहणं हेच सगळ्यात ताण देणारं असतं. 

नेहमीच्या आयुष्यात पण असंच असतं, वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध घडली की आपलं मन त्याला त्या त्या पध्दतीनं प्रतिसाद देतं. पण तीच गोष्ट गॅसवर असली म्हणजे अनिश्चित असली की तो कालावधी भयंकर कठीण असतो. 

अशा वेळी मला नेहमीच रामरक्षा फार मोठा आधार वाटत आलेली आहे. त्यामुळे काही घडत नाही तोवर...

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि। श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥

जय श्रीराम मित्रों 🙏🏻

🖊️ मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. २, शके १९४५

Monday, October 9, 2023

अंतर न देणे

 


दुर्मिळ दोस्त झाले


 

प्राजक्त

लहानपणी आईला पूजेला लागायची तेव्हा सोसायटीच्या कम्पाउंडमध्येच असलेल्या प्राजक्ताच्या झाडाची फुलं भरपूर मिळायची म्हणून आणायचो, आणि इतर पर्यायही कमी होते.

प्राजक्त

पण मला प्राजक्ताची फुलं वेचावीशी वाटत नाहीत आताशा. असं वाटतं की सडा पडला असेल तिथे उभं रहावं, तो गंध नाकावाटे मनात भरून घ्यावा. नुकताच पाऊस पडून गेला असेल तर अत्युत्तम.

जसं आपण अथर्वशीर्षात "त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं‌ चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम्" म्हणत असताना तंद्री लागते, किंवा आरती संपल्यावर भान हरपून "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, नमः पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय!" अशी अनेक देवतांची आणि संतांची नावे एकत्र घेताना आपण जी दैवी अनुभूती येते, अगदी तशीच भावना मृदगंध मिसळलेला प्राजक्ताच्या फुलांचा सुवास नाकावाटे थेट नेणिवेत पोहोचतो तेव्हा निर्माण होते.

म्हणूनच कदाचित, मला प्राजक्ताची फुलं वेचावीशी वाटत नाहीत आताशा. बास बाकी काही नाही.

🖊️ मंदार दिलीप जोशी
भाद्रपद कृ १०, शके १९४५