Friday, August 28, 2026

गिरीश ठाकरे की उद्धव कुबेर: टोमण्यांचा बाजार

काळ बदलतो, माणसे बदलतात, संपादक बदलतात. पण काहींची भूमिका मात्र बदलत नाही. संकट कोणाचेही असो, त्यातून राजकीय किंवा वैचारिक पोळी भाजण्याची संधी दिसली की ती सोडायची नाही असंच त्यांनी ठरवलेलं असतं, किंबहुना तोच अजेंडा असतो.

गिरीश कुबेरांनी नव्याने शेण खाल्लं आहे अशी खबर मिळाली आणि नाईलाजाने आजचा लोकसत्ताचा ऑनलाईन अग्रलेख वाचला. कुबेर महाशयांनी पुन्हा एकदा आपल्या संपादकीय लेखणीचा वापर करून आपल्या नीचपणाचा प्रत्यय दिलेला आहे. विषय तिबेट-नेपाळमध्ये आलेल्या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीचा असला तरी कुबेरांचा रोख अर्थातच आपत्तीमध्ये सापडलेल्या माणसांकडे नसून सद्गुरूंकडे आहे आणि त्याच्या आडून हिंदू धर्माकडे आहे.

काय योगायोग आहे नाही?

डोंगर कोसळले, रस्ते आणि पूल वाहून गेले, संपर्क तुटला, माणसे बेपत्ता झाली, कुणाचा कुणाशी संपर्क नाही, कुणाचे कुटुंबीय, निकटवर्तीय आपल्या माणसाची वाट पाहत आहेत आणि अशा परिस्थितीत एखाद्या संपादकाला मात्र टोमणेबाजीसाठी एक उत्तम संधी दिसते. कुबेरांना ही संधी सोडवली नाही.

संकटात अडकलेली माणसे त्यांच्या दृष्टीने माणसे नसावीत. ती सद्गुरूंच्या अनुयायांचा निव्वळ एक आकडा असावा. त्यामुळे त्यांच्या मागे असलेली कुटुंबे, त्यांची चिंता, त्यांची भीती, घरात फोन वाजला की धडधडणारे काळीज, 'आपला माणूस सुखरूप आहे का?' या एका प्रश्नाभोवती अडकलेले त्यांचे जग—या सगळ्याचा विचार करण्याची गरजच कुबेरांना वाटत नाही.

कारण त्यांना अग्रलेख लिहायचा आहे. ही त्यांच्यासाठी गरळ।ओकण्याची एक सुसंधी आहे.

आणि अग्रलेखही कसला? 'गुरूच ब्रह्मा आणि विष्णू असतील तर भक्तांना नेपाळात वणवण करण्याची गरजच काय होती' असा अत्यंत समयसूचक टोमणा मारणारा!

अहो कुबेर महाशय, माणसे संकटात सापडली आहेत. माणसे. जिवंत हाडांमांसाची माणसे. हा काही सद्गुरूंच्या आध्यात्मिक सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठी आयोजित केलेला कार्यक्रम नाही. तिथे गेलेला प्रत्येक माणूस तुमच्यासारखा वैचारिक मैथुनयुक्त संपादकीय लिहिणारा नाही. तो कुणाचा मुलगा आहे, कुणाची मुलगी आहे, कुणाचा नवरा आहे, कुणाची पत्नी आहे, कुणाचा बाप आहे, कुणाची आई आहे. आणि सध्या कुणीतरी त्याची वाट पाहत बसले आहे. हे साधे भान ठेवण्यासाठी फार मोठा आध्यात्मिक गुरू होण्याची गरज नाही. साधा माणूस असणे पुरेसे आहे.

पण कदाचित इथेच गडबड आहे.

संकटात सापडलेल्या माणसांविषयी कणव वाटण्यापेक्षा त्यातून आपल्या वैचारिक शत्रूवर एक टोमणा मारण्याची संधी साधणे ही जर पत्रकारितेची नवी व्याख्या असेल तर लोकसत्ताने ती स्पष्टपणे सांगावी. म्हणजे तुमच्यात किमान माणुसकी शिल्लक आहे अशी कुणालाही पुसटशीही शंका देखील येणार नाही. आणखी गंमत म्हणजे अग्रलेखाच्या शेवटी या सगळ्या टोमणे-टवाळीनंतर अचानक त्यांच्या सुखरूप परतीची इच्छा व्यक्त केली आहे.

'असो' म्हणून! व्वा! म्हणजे आधी दोन परिच्छेद अत्यंत विकृत असुरी आनंद व्यक्त करणारी "रग्गड यात्रा आणि यात्रेकरू" मेल्याचा आनंद व्यक्त करणारी "कशी मज्जा झाली" छाप गरळ ओकून झाल्यावर, शेवटी 'असो, ते सुखरूप परत येवोत' अशी औपचारिक सहानुभूती दाखवायची. पण ही सहानुभूती नसते कुबेर महाशय. हा सोपस्कार असतो. जनाची नाही, मनाचीही नाही, पण आपल्याला पगार देणाऱ्याने पार्श्वभागावर लाथ मारून हाकलून देऊ नये याची केलेली ती तजवीज असते.

आणि म्हणूनच हा अग्रलेख वाचताना सर्वात जास्त खटकते ती त्यातील सद्गुरूंवरील टीका नव्हे. कुणाला सद्गुरू मानायचे, कुणावर श्रद्धा ठेवायची, कुणाला ढोंगी समजायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यावर टीका करायची असेल तर करा. भरपूर करा. अग्रलेखामागून अग्रलेख लिहा. पण माणसे संकटात असताना तरी ही उबळ आवरा. अवघड आहे तुमच्यासाठी, पण प्रयत्न करा.

पत्रकारितेला भूमिका असू शकते, विचार असू शकतात, पूर्वग्रहही कदाचित असू शकतात. पण माणुसकीचा अंतर्भाव असणे ही फार मोठी मागणी नाही. आणि हो, 'असंतांचे संत' लिहून नंतर त्याचे शेपूट पायात घालून मागे घेणाऱ्या संपादकाने माणुसकीवर धडे देण्यापूर्वी आपल्या जुन्या (चोरलेल्या सुद्धा) अग्रलेखांकडे एकदा पाहिले तरी बरे.

कारण लोक सद्ध्या फक्त शाब्दिक झोडपून शांत बसत आहेत, पण उद्या कुणाच्या संयमाचा बांध फुटला तर तुम्हाला महागात जाईल.

🖊️ मंदार दिलीप जोशी
श्रावण पौर्णिमा, शके १९४८


No comments:

Post a Comment