Thursday, May 23, 2019

पुन्हा एक वार, आलं मोदी सरकार !

मी काही काळापूर्वी एक पोस्ट टाकली होती त्यात म्हटलं होतं की माझं प्राधान्य हिंदुत्व व हिंदुत्वाधारित विकास आहे. पुढे म्हटलं होतं त्याचा भावार्थ असा होता की जरी असं असलं तरी पूर्ण विचारांती मी याच मतावर पोहोचून ठाम आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व व विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्णयप्रक्रिया व वेग इत्यादी परिप्येक्ष्यांतून पूर्ण बहुमताने निवडून आलेले भाजप सरकार हाच २०१९ला योग्य आणि एकमेव पर्याय आहे.

या पाच वर्षात मला काय मिळालं, हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. माझे जवळचे आणि कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे की एखाद्या गोष्टीची सत्यता आणि देशासाठी असलेलं महत्त्व पटलं की खिशाला खार लाऊन आणि आपला वेळ खर्च करुनही मी अनेक गोष्टी करतो. त्यामुळे मोदींनी माझ्या खिशात किती पैसे टाकले हा विचार मी करत नाही, करणार नाही.

तरीही एक सांगू इच्छितो. प्रधानमंत्री आवास योजना, आयुषमान योजना यातून सहाय्यता मिळालेले माझ्या जवळच्या मित्रपरिवारात, सहकर्मचार्‍यांत, आणि वैय्यत्तिक ओळखीत आहेत. एक लक्षात घ्या, हा फक्त पैसा नाही. पैसा काय सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तुम्हालाही. पण जेव्हा आत्यंतिक गरज असताना मदत मिळते तेव्हा त्याची किंमत ही आभाळाहून जास्त असते. एक रुपया मदत पाठवली तर त्यातले जेमतेम पंधरा पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात हे दिवस आपण बघितलेले असताना आता तो आख्खा रुपया थेट लाभार्थींच्या खात्यात, मग ते शहरी असोत किंवा शेतकरी, पोहोचणारे दिवस आपण बघत आहोत याचं श्रेय निर्विवादपणे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनाच जातं.

या परिप्येक्षातून आयकर रिटर्न्स भरणार्‍यांच्या संख्येत या पाच वर्षात भरीव वाढ झालेली आहे या गोष्टीकडे बघणे गरजेचे आहे. सामान्यतः मेहनतीने पैसा कमावणार्‍या जनतेला कर द्यायला हरकत नसते, पण त्या पैशाचं पुढे काय होतं किंवा कररूपी पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही याची चिंता त्याला अधिक असते. हां, सरकारचा दट्ट्या असतोच, पण जबरदस्तीपेक्षा सरकारप्रती असलेला विश्वास हा अधिक प्रभावी ठरतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हा विश्वास देशाच्या जनतेत रुजवल्यामुळे लोकांची कर भरण्याकडे कल वाढत चालला होता, आणि त्याचीच परिणिती रिटर्न्स वाढण्यात झाली.

हिंदुत्वाचं म्हणाल तर मुळात तुमच्यातच एकी नसेल तर मोदी काय "गुंडाळून ठेवतो मी संविधान, लगेच हिंदूराष्ट्र घोषित करतो, आणि धरुन हाणतो म्लेंछांना आणि यवनांना" असं म्हणावं अशी अपेक्षा आहे का? त्यांच्यावर किती आणि कसा दबाव आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? एखादी योजनेसाठी चार कागद लागत असतील तर म्लेंच्छ आठ घेऊन पोहोचतो, प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जाऊन योजनेची सगळी माहिती घेतल्यावर. आणि हिंदू घरी बसून मला काहीच कसं माहीत नाही, मोदींनी पोहोचवली का नाही माहिती अशी किरकिर करतो. भांडण झालं की पाच मिनिटात शंभर लोक गोळा करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? नसेल तर आधी निर्माण करा आणि मग मोदी अमुक का करत नाहीत आणि तमुक का करत नाहीत याच्या चर्चा करा.

दुसरी गोष्ट, आजवर ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं "Wearing your Dharma on your sleeve" असं  कुणी केल्याचं स्मरतं का? निवडणुका असो किंवा नसो, सातत्याने भगवी वस्त्रे आणि स्थानिक वेषभूषा करुन देवदर्शनाला जाणारा पंतप्रधान कुणी बघितला होता का? हिरव्यांची जाळीदार टोपी घालायला नकार देणारे मोदीजी आवर्जून कुठलीही निवडणूक नसताना स्वतः गंगा आरती साठी जाताच, पण सोबतच्या परदेशी पाहुण्यांनाही घेऊन जातात. उघडपणे हिंदू संस्कृती व धर्माबद्दल आदर व्यक्त करतात. हिंदू संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेला योग आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस म्हणून साजरा केला जाण्याचं श्रेय कुणाला याचा विचार हिंदूंनी अवश्य करावा. निवडणुका आल्यावर राजकारणाचा भाग म्हणून आपले ख्रिस्ती आणि पारशी मूळ लपवून आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत देवळादेवळातून हिंडणार्‍या आणि नंतर ते सोंग साफ विसरणाऱ्या राहुल गांधीच्याच इटालियन मोतोश्रींनी हिंदूंच्या मुळावर येणार्‍या आणि हिंदूंच्या सत्यानाशाचे थेट कारण ठरणारा कायदा करण्याचं ठरवलं होतं, हे हिंदूंनी विसरू नये. हा विषय मोठा आहे, विस्तृतपणे पुन्हा केव्हातरी बोलू .

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन गळे काढणार्‍या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या बायकोची आणि आईची काहीही तक्रार नसताना आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या दोघीही राजकारणात नसताना अकारण प्रत्येक वादात त्या दोघींना ओढलं तेव्हा मोदींनी एक चकार शब्द काढला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या भ्रष्टाचाराचा विषय काढल्यावर राहुल गांधी यांना ते आपले पिताजी असल्याची आठवण झाली आणि त्यांनी पुन्हा मोदींच्या कुटुंबियांबद्दल उद्गार काढले. बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पाच वर्ष देशाचे पंतप्रधान असताना इतर कुणाच्या घरच्यांनी महाल बांधले असते. पण नरेन्द्र दामोदरदास मोदी हा इसम खरंच वेडा म्हटला पाहीजे, कारण या सतरा वर्षात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदाचा एक रुपयाही अनुचित फायदा झालेला नाही. या उलट उत्पनाचं काही साधन नसताना राहुलच्या इटालियन मम्मीची संपत्ती इंग्लंडच्या राणीशी स्पर्धा करतानाही दिसली. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या बचतीतली मोठी रक्कम जो माणूस सरळ दान करुन टाकतो, अशा माणसाला वेडा नाही तर काय म्हणावं? आधी केले, मग सांगितले ही म्हण या बाबतीत स्वतः जगत आहेत हे सगळा देश उघड्या डोळ्यांनी बघत होताच.

संरक्षणाच्या बाबतीतही मोदींनी देशाला नाराज केलं नाही. आधी पाकिस्तानात शरीफ महाशयांची अचानक भेट घेऊन टीकेचे धनी झालेले मोदी हे टीकाकारांना कळलेच नाहीत असे म्हणावे लागेल. नंतर पाकिस्तानची कशी ठासली हे सगळ्यांना ठाऊकच आहे. राफेल खरेदीत विरोधकांनी अनेक अडथळे आणूनही मोदी डगमगले नाहीत. आता मात्र ते लवकर पार पडावं ही इच्छा.

या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवाद हा होता. हा एक शब्द नव्हे, राष्ट्रवादात राष्ट्र सर्वप्रथम, विकास, प्रगती, संरक्षण या सगळ्या गोष्टी येतात. ज्या राष्ट्रवादाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या वृत्तीच्या थोबाडीत मारणारा हा निकाल आहे. क्रिकेटचा सामना असूनही तो सोडून अनेक लोकं लोकसभा टीव्ही लोक बघत बसायचे हा आणखी एक मोठा बदल आपण बघितला.

मी काही राजकीय विश्लेषक नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. त्यामुळे या लेखनात अनेक तृटी असू शकतात, त्याबद्दल आधीच क्षमस्व. आणखी बरंच आहे बोलण्यासारखं, लिहीताही येईल, पण सद्ध्या जरा भावुक झालोय. २०१४ पेक्षा आताच्या निवडणुकीत मोदी सरकार यावं याबद्दल भावना तीव्र होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्याने डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. आतापर्यंत बरंच लिहिलं, बरंच वाचलं, बर्‍याच चर्चा केल्या. यापुढेही हे होईलच, पण तूर्तास सद्ध्या आपला निरोप घेतो. आता वाट पाहूया "मैं नरेन्द्र दामोदरदास मोदी, इश्वर को साक्षी रखके शपथ लेता हूं कि...." हे शब्द कानावर पडण्याची.

समारोप करतो या प्रार्थनेने:

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्।
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये॥

अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्, सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्।
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत्॥

समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्।
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्॥

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्, विधायास्य धर्मस्य संरक्षणम्।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥

भारत माता की जय ! जय श्रीराम !

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. पंचमी शके १९४१

2 comments:

  1. संघ आणि समितीची प्रार्थना यापुढे तरी सगळ्या विद्यार्थ्यांना अर्थासह मुखोद्गत होवो यासाठी आपण प्रयत्न करु या. तोही आपल्या देशाच्या उज्वल भवितव्याला हातभार ठरेल.

    ReplyDelete
  2. >>हा फक्त पैसा नाही. पैसा काय सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तुम्हालाही. पण जेव्हा आत्यंतिक गरज असताना मदत मिळते तेव्हा त्याची किंमत ही आभाळाहून जास्त असते.
    -- अगदी अगदी

    ReplyDelete