Wednesday, May 27, 2015

नावात काय आहे? सगळंच!

नावात काय आहे असं तुकाराम महाराज म्हणून गेलेच आहेत. काय म्हणता? शेक्स्पिअर म्हणाला असं? अहो शेक्स्पिअर काय तुकाराम काय शेवटी नावंच ना? तरी कोण म्हणालं ते महत्वाचं आहे म्हणता? तसं बरोबरच आहे तुमचं.

हे पाल्हाळ लावायचे कारण म्हणजे नुकतंच एका लग्नात एक नातेवाईक भेटले आणि कौतुकाने अरबस्थानातल्या इजिप्तमध्ये नोकरी निमित्त असलेल्या त्यांच्या मुलाने आपल्या दुसर्‍या मुलीचे नाव 'सायरा' असल्याचे सांगू लागले. मी मनात म्हटलं (आम्ही मनातच म्हणायचे) "सायरा? एका हिंदू कुटुंबातल्या मुलींच नाव सायरा? मोठी झाल्यावर काय म्हणायचं तिला? सायरा बानू? खिक्क्. अरबस्थानात असली मुसलमानी नावं ठेवायची सक्ती आहे का? की मुसलमानी नावं ठेवायचं कबूल कबूल कबूल केल्याशिवाय मुलं होऊ देत नाहीत तिथे? नशीब मुलगा नाही झाला नाहीतर त्याचं नाव महंमद ठेवलं असतं तुम्ही! नाहीतरी मागे एक नाटक येऊन गेलंच होतं बेगम बर्वे. म्हणजे आडनाव हिंदू आणि नाव किंवा संबोधनार्थी पदवी म्लेंच्छ. आनंद आहे."

हिंदू आई वडिलांना आपल्या मुलामुलींची नावं ठेवताना यवन किंवा म्लेंच्छ नावांना वाढत्या प्रमाणात शरण का जावं लागत आहे हे आकलनाच्या पलिकडचं आहे. एकीकडे वेगवेगळे सुंदर अर्थ असलेल्या संस्कृतप्रचूर नावांकडे अनेकांचा कल वाढत असल्याचे दिसत असताना आश्चर्यकारकरित्या बरेच आईवडील आपल्या मुलामुलींची नावे ख्रिस्चन आणि मुसलमान पद्धतीने ठेवत आहेत. हे अत्यंत क्लेषकारक आहे. आता हे मान्य आहे की आपल्या अपत्याची नाव काय ठेवावी हा ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे, तरीही हिंदू म्हणून अशी नावे ठेवण्याकडे आज कमी प्रमाणात का होईना पण वाढता असलेला कल हे लक्षण आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याचे मानावे की अक्कल गहाण टाकून व्यक्तीस्वातंत्र्य या शब्दाचा भलताच अर्थ लावल्याचे?

एकदा एका कीर्तनकाराचे कीर्तन ऐकण्याचा योग आला असता त्याने हिंदूंबद्दल मांडलेली मते विचारप्रवृत्त करुन गेली.  एखाद्या हिंदूकडे बघितलं असता तो हिंदू आहे याचे कोणतेही लक्षण त्याच्या वेशभूषा किंवा दिसण्यावरुन जाणवत नाही. अर्थात इतर धर्मीयांकडे पाहून प्रत्येक बाबीचे तितकेच कट्टर अनुकरण आपल्याला शक्य आणि योग्य नसले, तरी प्रत्येक बाबीचं अंधानुकरण करणंही तितकंच धोकादायक आणि मूर्खपणाचे आहे.धर्मो रक्षति रक्षितः अशी एक म्हण आहे. अर्थ असा की जो धर्माचे रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. तेव्हा आपण आपल्याच धर्माला, संस्कृतीला अशा प्रकारे हरताळ फासला, तर इतरांना आपला आदर करण्याची काहीच गरज भासणार नाही.

या संदर्भात एक बातमी आठवली. आयर्लंडनं समलिंगी जोडप्यांच्या लग्नांना परवानगी नुकतीच परवानगी दिल्याचे वाचनात आले. पाश्चात्य तसेच देशी वृत्तमाध्यमांनी याची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आणि जाता जाता भारतासारख्या धार्मिक बाबींत संकुचित दृष्टी बाळगणार्‍या देशाने यातून बोध घ्यावा, असा पांडित्यपूर्ण सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.

पण दोनेक वर्षांपूर्वी सविता हालाप्पनवार नावाची एक अडलेली गरोदर स्त्री याच कॅथलिक आयर्लंडमध्ये रुग्णालयात दाखल झाली होती. तिचं मूल गर्भातच गेलं होतं, आणि तिचा जीव वाचवण्यासाठी तिला मोकळी करणं आवश्यक होतं. पण गर्भपात करण्यास आमचा धर्म मान्यता देत नाही म्हणून ते डाॅक्टर्स नुसते तमाशा बघत बसले तीन चार दिवसांनी जंतुसंसर्ग होऊन तीळ तीळ झिजून ती मेली, पण या तथाकथित उदारमतवादी आयर्लंडच्या लोकांच्या दगडी मनांना पाझर फुटला नाही. बायबलमधे समलिंगी संबंधांच्या विरुद्ध स्पष्ट ताशेरे आणि खुद्द देवाने शिक्षा केल्याचे दाखले आहेत. अडलेल्या बाईची सुटका केल्याबद्दल देवानं रागावल्याचे वा त्यानं शिक्षा केल्याचे नाहीतच. पण लक्षात कोण घेतो? भारतात हे झालं असतं तर आधी नातेवाईकांनी, आणि तिथून वाचले तर वृत्तमाध्यमांनी या डाॅक्टर्सचा जीव घेतला असता. पण तसे होत नाही, भारतात अशा परिस्थितीत कोणताही डाॅक्टर धार्मिक तत्त्वांपायी अडलेल्या बाईचा जीव घेत नाही.

अधिक विषयांतर न करता या या मामल्याचे एक तात्पर्य लक्षात घेऊया ते असे की पाश्चात्य देशांत आणि एकंदरित फारिनमधे होणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असते, असे नाही. तेव्हा तिचा अंगीकार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. काही बाबतीत आपण त्यांच्यापेक्षा बरेच उजवे असू शकतो आणि आहोत. आज जगभरात भारतीयांना जो मान आहे तो बहुतांश प्रमाणात हिंदू आहोत म्हणूनच आहे. आपल्या अनेक पद्धतींना आणि प्रथांना आपणच जपायला हवे कारण ती आपली ओळख आहे, आणि आपली नावं हा आपल्या हिंदू असण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा आईवडील आपल्या अपत्याचे नाव ठेवतात, तेव्हा त्या बाळाचे व्यक्तिमत्व घडायला सुरवात होण्याची आणि त्याची आपली अशी एक ओळख निर्माण होण्याची एक सूक्ष्मशी सुरवात असते. ती ओळख एक हिंदू म्हणून जपली जावी या करता आपण देशात असलो किंवा परदेशात असलो तरी नावं ठेवताना ती आपल्याच  संस्कृतीशी नातं सांगणारी असावीत याची काळजी घेणं आवश्यक आहे.

आपला बाह्यावतार आपल्याला बदलत्या काळानुसार आणि सोयीनुसार बदलावा लागला, तरी वर म्हटल्याप्रमाणे हिंदू असल्याच्या सगळ्याच चिन्हांना अशा प्रकारे तिलांजली देण्याची आवश्यकता नाही. "आमचं मूल आहे, आम्ही काहीही नाव ठेऊ" अशी स्वत्वहीन भूमिका घेणे हे हिंदूंसाठी अंतिमतः घातक ठरेल. व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क नाव निवडण्याच्या बाबतीत अवश्य गाजवावा, पण तो गाजवायला पर्याय म्हणून असंख्य हिंदू नावे उपलब्ध आहेत. तेव्हा हिंदू म्हणून आपला स्वाभिमान जपा.

हिंदू आईबाबांनो आपल्या मुलांची हिंदू पद्धतीने नावे ठेवा.

--------------------------------------------------------------------------------------------------
श्रेयनिर्देशनः या लेखनात उल्लेख केलेला आयर्लंडच्या सविता हालाप्पनवार या मृत्यू पावलेल्या महिलेचा किस्सा आमचे फेसबुकवरचे मित्रवर्य श्री कृष्णा धारासुरकर यांच्या एका टिप्पणीतून घेतला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
जेष्ठ शुक्ल ९, शके १९३७
----------------------------------------------

1 comment:

  1. हिंदूंना धर्माभिमान शिकवावा लागतो हेच खरं…

    ReplyDelete