Tuesday, February 25, 2020

त्यांना घरं का मिळत नाहीत - उपकथानक

काही दिवसांपूर्वी मित्र ब्रिजेश मानव राणा यांना आलेल्या एका भूत बंगल्याबद्दलचा अनुभव मांडला होता. सुरवात करण्यापूर्वी सांगतो की मागील लेख वाचून मला अनेकांनी फोन, व्हॉट्सएप, व फेसबुकवर आपापले अनुभव सांगितले. ते पाहून मनातली उरलीसुरली शंकाही संपली.

तुम्हाला आठवत असेल तर मागील लेखात ब्रिजेशही म्हणाले होते की त्या घरातल्या मुलांशी मैत्री झाल्यावरही त्यांच्या मित्रमंडळींपैकी कुणीच तिथे पाणी सुद्धा पीत नसे, पण ते मात्र तिथे पाणी पीत व त्याचे त्यांना परिणामही भोगायला लागले. त्या लेखाचा विषय वेगळा असल्याने त्यांनी तो पुन्हा केव्हातरी त्याबद्दल सांगू असं सांगितलं होतं, तो ही अनुभव आज तुमच्यापुढे मांडत आहे.

माझ्या शेजार्‍याच्या बंगल्यातून 'भूत' गेलं होतं आणि त्य घरातल्यांना येणारे भलतेसलते अनुभव येणं सुद्धा थांबलं होतं. पण फक्त मी त्यांच्या घरचं पाणी पीत असे म्हणून...

रात्री मी गाढ झोपेत असताना मधेच आपण एखाद्या काळोख्या खोल विहीरीत पडत आहोत असा मला भास होत असे. माझा मेंदू मला सांगायचा की अरे तू घरी बिछान्यावर झोपलेला आहेस, पण पडत असताना खाली गार गार वारा लागतो आहे असं स्पष्टपणे जाणवत असे. कितीही प्रयत्न केले तरी उठता येत नसे. असा काही वेळ गेल्यावर कधीतरी वाटत असे की आता तळ आलाय आणि आपण जोरदार आपटणार, तेवढ्यात खडबडून जाग यायची आणि उठल्यावर सर्वांगाला दरदरून घाम फुटलेला असायचा. हे पहाटे साधारण १ ते २ च्या मधे होत असे. हे प्रकार दर दोन ते चार महिन्यांनी व्हायचे पण हळूहळू असे अनुभव आलेल्या दोन रात्रींमधला काळ कमी होऊ लागला.

आता हा प्रकार दर ४-५ दिवसांनी होऊ लागला. आईने कुठलाही उपचार करायचं शिल्लक ठेवलं नव्हतं. भारताच्या उत्तर भागातला एकही वैद्य तिने शिल्ल्क ठेवला नसेल. भयंकर कडू औषधे आणि काढे घेऊन झाले, पण काहीही परिणाम झाला नाही. या प्रकारांना घाबरून मी रात्री झोपायलाच घाबरत असे. डोळे लाल दिसायचे पण शरीराला थकवा जाणवत नसे.

त्या वर्षी मी झज्जर पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेतला आणि तिथल्या हॉस्टेलवर राहू लागलो. पण तिथेही तोच प्रकार. सलग पाच-सहा दिवस झोपेची बोंब. रात्र रात्र मी बाहेर भटकत असे, पण जागेपणी काहीच त्रास झाला नाही.

झज्जरहून घरी येण्याचे दोन मार्ग होते, एक म्हणजे झज्जर ते सोनीपत थेट बसने आणि दुसरा म्हणजे झज्जर ते बहादुरगड, बहादुरगड ते नरेला, आणि नरेला ते सोनीपत ट्रेनने. दुसरा मार्ग लांबचा असला तरी मधे आराम करायला वेळ मिळायचा म्हणून मी याच मार्गाने यायचो.

एक दिवस असाच परतत असताना नरेला स्टेशनवर ट्रेन सुटायला खूप उशीर झाला. नरेला फक्त दोन प्लॅटफॉर्म असणारं एक लहानसं स्टेशन आहे. दुपारची वेळ होती, स्टेशनवर शुकशुकाट दिसला म्हणून इकडेतिकडे पाहिलं तर लांब एका झाडाखाली बरेच लोक जमलेले दिसले. मी तिथे पोहोचेपर्यंत ह्या गर्दीचा केंद्रबिंदू असलेल्या एका माणसाने आपलं चंबुगबाळं आवरायला सुरवात केली होती. फिरते वैदू असतात तसा तो इसम दिसत होता. इतके उपाय करुन झालेत तर यालाही सांगू म्हणून मी मला होत असलेला त्रास त्याला  सांगितला. आजूबाजूला पाहून तो किंचित हसला. मी तिथे पोहोचल्यापासून सुरु झालेलं आजूबाजूच्या कुत्र्यांचं भुंकणं माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण त्याने ते अचूक हेरल्याचं त्याच्या नजरेत दिसलं.

"येत्या गुरूवारी माझ्याकडे ये", तो म्हणाला.

"पण तुमचा पत्ता..."

"धान्य बाजारात विचार, छोटे पंडितजी कुठे राहतात, कुणीही सांगेल." तो उत्तरला.

नरेला स्टेशन लहान असलं तरी तिथला धान्य बाजार त्या काळी आशिया खंडातला सगळ्यात मोठा धान्य बाजार होता, आताचं ठाऊक नाही, कदाचित अजूनही तो आपला रुबाब टिकवून असेल.

घरी येऊन आईला विचारलं तर ती म्हणाली ये जाऊन.

छोटे पंडितजींचं ठिकाण नरेला धान्य बाजारापासून अर्धा किलोमिटरवर होतं. तिथे पोहोचल्यावर एका घरी एका शेठजींना विचारल्यावर ते म्हणाले की पंडितजी इथेच पुढच्या खोलीत राहतात. त्यांचे आभार मानून मी त्या खोलीत शिरलो. ती खोली म्हणजेधान्याच्या एका मोठ्या कोठारासारखी होती, आणि छोटे पंडितजी एका कोपर्‍यात निरंजन लावून बसलेले होते. मी त्यांना नमस्कार केला, तसं मला त्यांनी खुणेनेच बसायला सांगितलं. दोन मिनिटांनंतर त्यांनी एका कागदाच्या चिठोर्‍यावर बोटानेच काहीतरी लिहीलं आणि मला तो चिठोरा दिला. झोपताना उशाखाली ठेव असं बजावून पुढच्या शनिवारी यायला सांगितलं आणि मला निरोप दिला.

त्यांनी सांगितल्यासारखं मी केलं, आणि पुढचा पूर्ण आठवडा शांत झोप लागली. किंबहुना इतकी शांत झोप मला कधी लागल्याचं आठवत देखील नाही. ठरल्याप्रमाणे पुढच्या शनिवारी मी परत त्याच घरी, त्याच खोलीत पोहोचलो. छोटे पंडितजी तिथेच कोपर्‍यात निरंजन लावून बसले होते. त्यांनी माझ्याकडून कागद घेऊन तो निरंजनाच्या ज्योतीवर जाळला. कागदाचा तेवढा कपटा जळायला मिनिटभर सुद्धा लागलं नसतं तिथे तो कागद जवळजवळ २० मिनिटं जळत होता. हे काहीतरी भलतंच होतं.काअ

कागद पुर्ण जळाल्यावर त्यांनी मला निरोप दिला.

घरून निघताना आईने मला त्यांना दक्षिणा म्हणून अर्पण करण्याकरता काही पैसे आणि कापड दिलं होते. ते त्यांना देऊ लागताच त्यांनी घ्यायला साफ नकार दिला आणि सांगितलं या कापडाचं तूच काहीतरी शिवून घाल.

पंडितजींचा आशीर्वाद म्हणून मी त्या कापडाचे कपडे शिवून वापरू लागलो.

त्या आठवड्यात लागलेली शांत झोप तशीच पुढेही लागली. आता मी पूर्ण 'बरा' झालो होतो.

साधारण महिन्याभरानंतर पुन्हा माझ्या गाडीला उशीर झाला, ते ही तब्बल दोन तास. म्हटलं अनायसे वेळ आहे तर छोटे पंडितजींकडे चक्कर टाकून येऊया, त्यांचा आशीर्वादही मिळेल.

त्या घरी पोहोचल्यावर पुढच्या खोलीत बघितलं तर कुणीच नव्हतं. फक्त गव्हाची पोतीच पोती होती तिथे. मी त्या शेटजींना विचारलं की छोटे पंडितजी कुठे गेले? त्यावर मला मिळालेलं उत्तर बुचकळ्यत टाकणारं होतं. शेटजी म्हणाले, "कोण छोटे पंडितजी, इथे कुणी पंडित नाही राहत."

"अहो पण जेमतेम महिन्याभरापूर्वी तुम्हालाच विचारलं होतं आणि तुम्हीच म्हणालात ते तिथे पुढच्या खोलीत राहतात", मी म्हणालो.

"अहो मी तुम्हाला आधी कधीच भेटलो नाही. त्या खोलीचं म्हणाल तर ती खोली फक्त कोठार म्हणून वापरली जाते आणि तिथे कुणी पंडितजी वगैरे राहत नाही आणि आधीही राहत नव्हतं. कदाचित तुम्ही पत्ता चुकला असाल, दुसरीकडे चौकशी करा."

आता मला काही कळायचं बंद झालं होतं. घरी येऊन आईला झालेला प्रकार सांगितला. आई विचारात पडली आणि मग म्हणाली, असेल कुणी पवित्र आत्मा (तिला spirit guide म्हणायचं असावं)तुझ्यासाठी खास आलेला.  मला कळेना, पूर्ण शुद्धीत असताना माझ्या डोळ्यांसमोर सगळं घडलं आणि आता जाऊन बघतो तर काहीच न घडल्यासारखं सगळं दिसत होतं.

तेच घर, तेच शेठजी, तीच ती बाहेरची खोली, पण छोटे पंडितजी गायब आणि असं कुणी अस्तित्वातच नसल्याचा त्या शेठजींचा दावा.अस

असं कसं होईल?

🖋️  मंदार दिलीप जोशी
फाल्गून शु २, शके १९४१

सहाय्य: श्री ब्रिजेश राणा व श्री आनंद राजाध्यक्ष

No comments:

Post a Comment