Saturday, December 22, 2018

रवांडातील वांशिक नरसंहारात चर्चचा सहभाग: भाग १ - आफ्रिकेतली गोष्ट

लहानपणी घरात मोठी माणसं काही महत्त्वाचं बोलत असली आणि आम्ही लहान मुलांनी मधेच "काय झालं, काय झालं" असा भोचकपण केला, की मोठी माणसं आमची ब्याद टळावी म्हणून "काही नाही, आफ्रिकेतली गोष्ट आहे" असं म्हणत असत आणि आम्ही तिथून सुरक्षित अंतर लांब जाईपर्यंत पुन्हा बोलणं सुरु करत नसत. तेव्हापासून आफ्रिका म्हणजे काहीतरी गूढ, अनाकलनीय असा समज मनात रुजला तो रुजलाच.

हळू हळू मोठं होता होता एक एक गोष्टी समजत गेल्या आणि या खंडाबद्दलचं कुतूहूल वाढतच गेलं. शाळेत असताना जगाचा नकाशा बघताना आफ्रिका खंडाच्या नकाशाने लक्ष वेधून घेतलं. असं काय होतं त्या नकाशात?  अनेक देशांमधली आंतरराष्ट्रीय सीमारेषा ही अक्षरशः फुटपट्टीने सरळ रेषा आखावी तशी सरळ आहे आणि अनेक ठिकाणी चक्क नव्वद किंवा पंचेचाळीस अंशाचे कोन दिसून येतात. पाश्चात्य देशांनी चर्चच्या सहाय्याने जगभरात ज्या पाचर मारून ठेवल्या आहेत त्यापैकी सगळ्यात भयानक आपल्याला आफ्रिका खंडात आढळतात.

गेल्या एका लेखात पंतप्रधान मोदींनी रवांडा देशाला त्यांच्याच गिरिन्का योजने अंतर्गत तिथूनच २०० गायी खरेदी करुन गरीब कुटुंबांना देण्याकरता भेट दिल्या त्याबद्दल लिहीलं होतं. या दौर्याहच्या निमित्ताने रवांडाबद्दलचं कुतुहूल पुन्हा जागृत झालं. या आधी एक हॉटेल रवांडा नामक चित्रपट येऊन गेला होता, पण तेव्हा तो काही ना काही कारणाने बघता आला नव्हता. तो ही या निमित्ताने पाहून घेतला.

या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदींनी ज्या अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या त्यातली एक म्हणजे किगाली वंशहत्या स्मारकाला दिलेली भेट. रवांडात झालेला हा वंशविच्छेदाचा प्रयत्न म्हणजे बहुसंख्य हुटू जमातीने अल्पसंख्य टुट्सी जमातीचे केलेले भयानक वांशिक हत्याकांड होय. तब्बल शंभर दिवस चाललेल्या या हत्याकांडात आठ लाख टुट्सी अणि मवाळ हुटूंना आपले प्राण गमवावे लागले होते. हे हत्याकांड म्हणजे बहुसंख्यांना डावलून सातत्याने अल्पसंख्यांकांना लांगूलचालन केले की एक ना एक दिवस बहुसंख्य जनतेचा जो स्फोट होतो त्याचे प्रातिनिधिक उदाहरण मानले पाहीजे. या हत्याकांडाचे बरेचसे तपशील तेव्हा प्रकाशित झालेल्या आणि वृत्तवाहिन्यांमध्ये दाखवलेल्या बातम्यांच्या माध्यमातून जगभर पोहोचले देखील होते. दुर्दैवाने एक गोष्ट मात्र मुद्दामून पुढे येऊ दिली गेली नाही आणि ती म्हणजे या हत्याकांडात असलेला चर्चचा सक्रीय सहभाग. हो, सक्रीय सहभाग. ही गोष्ट अगदी चर्चने या हत्याकांडातील सहभागाबद्दल २० नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर माफी मागितल्यानंतरही बेमालूमपणे दडपून टाकण्यात माध्यमे यशस्वी झाली.

आफ्रिकेचा इतिहास हा अनेक टोळ्यांचा इतिहास आहे. अनेक लहान लहान राज्य आणि त्यांचे राजे किंवा प्रमुख यांचा इतिहास आहे (जुन्या हिंदी चित्रपटातले 'कबीले के सरदार' डोळ्यापुढे आणा). आफ़्रिकेतील टोळ्या हे प्रकरण आपल्या आकलनशक्तीच्या पलिकडचे आहे. त्यांना अशा प्रकारे देशात विभागून वर उल्लेख केल्याप्रमाणे कृत्रीम आणि विचित्र सीमारेषा आखणं हा पाश्चात्यांचा अमानुषपणा होता. कारण या टोळ्या जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांची संस्कृती सामायिक होती. पण आधी जर्मनी आणि मग बेल्जियम या वसाहतवादी राज्यकर्त्यांनी त्यांच्यात हेतूपुरस्सर दुहीचे वीष कालवले. याचाच अर्थ, आपण समजतो तसे ते वीष परंपरागत नाही.

रवांडा हा देश जर्मनीच्या ताब्यात असलेल्या पूर्व आफ्रिकेच्या भागातला एक देश. १८९४ ते १९१८ पर्यंत जर्मनीच्या ताब्यात असलेला रवांडा पहिल्या महायुद्धात झालेल्या जर्मनीच्या पराभवानंतर शेजारच्या बुरुंडी सकट बेल्जियमची वसाहत बनला. इथूनच खर्याव अर्थाने या देशाच्या ससेहोलपटीला सुरवात झाली आणि रवांडाच्या इतिहासातल्या सगळ्यात भयानक वंशविच्छेदी दंगलींचा पाया रचला गेला. त्यावेळी रवांडाच्या लोकसंख्येपैकी हुटू जमातीची टक्केवारी ८५% आणि टुट्सी जमातीचे १५% लोक होते. सातत्याने बहुसंख्य हुटू जमातीला डावलून अल्पसंख्य टुट्सी जमातीला सगळीकडे प्राधान्य दिलेले होते. अल्पसंख्य असूनही टुट्सी जमातीचा सरकारमधे दबदबा होता आणि सरकारमधील प्रमुख पदांवर त्यांचीच नेमणूक होत असे. अर्थातच बहुसंख्य हुटू हे विकासाच्या पटलावर फार मागे फेकले गेलेले होते. बेल्जियन मंडळींनी या गोष्टीचा फायदा घेत अल्प्संख्य टुट्सीना हाताशी धरून त्यांच्या मार्फत चर्चच्या माध्यमातून रवांडावर  राज्य करायला सुरवात केली. बेल्जियन राज्यकर्त्यांनी हुटू आणि टुट्सी यांच्यात आधीच धगधगत असलेल्या असंतोषाला आणखीच खतपाणी घालून दोघांमधली दरी सांधायच्या ऐवजी आणखी मोठी करण्याकडे भर दिला. याकरता त्यांनी हुटू आणि टुट्सी यांच्यात शारीरिक उंची, आकार, आणि नाकाची ठेवण यात असलेल्या नैसर्गिक फरकाच्या आधाराने भेदभाव करायला सुरवात केली.

टूट्सी जमातीत शिक्षणाचं प्रमाण भरपूर असल्याने आपल्या आसपास आणि जगात काय चाललंय याबद्दल चांगलीच जागरुकता होती तसेच नवनवीन कल्पना आणि विचारधारांबद्दल वाचन होते. यापैकी टुट्सींना साम्यवादी विचारसरणी अधिक भावली व अधिकाधिक टूट्सी त्याकडे आकर्षित होऊ लागले. साम्यवादी विचारसरणीत धर्माला स्थान नसल्याने (आठवा: धर्म ही अफूची गोळी वगैरे वगैरे) या गोष्टीमुळे चर्च हादरले आणि त्यांनी साम्यवादाला सैतानी, ख्रिस्ती विरोधी आणि निषिद्ध घोषित केले.

आतापावेतो साम्यवादी विचारसरणीने टुट्सी लोकांत चांगलाच जम बसवला होता. आता रवांडाला एक स्वतंत्र साम्यवादी देश घोषित करावे म्हणून टुट्सी लोकांनी अनेक जोरदार निदर्शने करायला सुरवात केली. आता मात्र बेल्जियन राज्यकर्त्यांचा संयम संपला आणि त्यांनी टुट्सी जमातीबरोबर असलेले संबंध तोडले व बहुसंख्य हुटू जमातीला हाताशी धरले. फार मोठा काळ टुट्सींच्या वर्चस्वाखाली होरपळलेल्या हुटूंनी पलटवार करायला सुरवात केली नसती तरच नवल होतं. आता परिस्थिती उलट झाल्याने टुट्सींची अवस्था बिकट व्हायला सुरवात झाली. अशातच १९५९ साली हुटूंनी मोठा उठाव केला आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक टुट्सींनी देशाबाहेर पलायन केले. मोठ्या प्रमाणावर टुट्सींना निर्वासित व्हावे लागल्यामुळे रवांडात आधीच अल्पसंख्य असलेल्या टुट्सींची संख्या आणखी रोडावली. एकोणिसशे साठच्या सुरवातीला म्हणजेच १९६१ साल येईपर्यंत हुटूंनी रवांडाच्या टुट्सी राजाला पदच्युत करुन रवांडाला प्रजासत्ताक घोषित केलं. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून १९६२ साली बेल्जियमने औपचारिकरित्या रवांडाला स्वातंत्र बहाल केलं.

देश स्वतंत्र झाला असला तरी त्यानंतरही रवांडात वांशिक हिंसा थांबली नाहीच. १९७३ साली हुटू जमातीतले मेजर जनरल जुवेनाल हबयारीमाना (Juvenal Habyarimana) सत्तेवर आले आणि पुढची दोन दशके त्यांनी रवांडावर राज्य केले. १९५९ साली झालेल्या उठावामुळे आणि सातत्याने होणार्याआ वांशिक हिंसाचारामुळे टुट्सी आजूबाजूच्या काही देशात परागंदा झालेले होते. त्यांच्यापैकी युगांडात पळालेल्या काहीनी रवांडीज पेट्रिओटिक फ्रन्ट अर्थात Rwandan Patriotic Front (RPF) नामक बंडखोरांची सेना स्थापन करुन १९९० साली रवांडावर आक्रमण केले. हे युद्ध तब्बल तीन वर्ष चालले. याचा उद्देश अर्थातच हुटूंची सत्ता उलथून टाकण्याचा होता. १९९३ साली राष्ट्राध्यक्ष जुवेनाल हबयारीमाना यांनी चर्चच्या मर्जीविरुद्ध जात आरपीएफचे नेते पॉल कगामे (Paul Kagame) यांच्याशी शांततेचा करार केला. हा करार अरुशा शांतता करार या नावाने ओळखला जातो. या कराराअंतर्गत एक काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात येऊन त्यात टुट्सींचा सहभाग असणार होता. या करारामुळे हुटूंमधला जहाल गट भडकला आणि त्यांनी या कराराविरोधात उठावाची तयारी केली. अध्यक्ष हबयारीमाना यांनीही परिस्थितीचा अंदाज घेऊन Interahamwe नामक एका हुटू बंडखोर गटाच्या स्थापनेत सहकार्य केले. Interahamwe गटाचा एकमेव उद्देश हुटू जमातीला संपवणे हाच आणि इतकाच होता. या गटाची स्थापना केल्याने आफ्रिकेच्याच नव्हे तर संपूर्ण जगात सगळ्यात क्रूर आणि अमानुष म्हणून ओळखलेल्या गेलेल्या वांशिक नरसंहाराचा पाया रचला गेला होता.


टुट्सींवर सूड उगवायची संधीच शोधणार्‍या हुटू बंडखोरांना आयतं निमित्त मिळालं ते हबयारीमाना प्रवास करत असलेलं विमान पाडलं गेल्याने. हबयारीमाना यांचं विमान विद्यमान अध्यक्ष पॉल कगामे यांच्या आदेशावरुन पाडलं गेलं असा हुटू बंडखोरांनी आरोप केला आणि टुट्सी लोकांवर भयानक अत्याचार सुरु केले. टुट्सींच्या रक्ताला चटावलेल्या हुटूंनी पुढचे शंभरावर दिवस टुट्सींची अक्षरशः कत्तल केली. आरपीएफने प्रतिकार सुरु केलेलाच होता. शेवटी आरपीएफने राजधानी किगालीवर ताबा मिळवल्यावरच परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली. या नंतर अध्यक्ष पॉल कगामे यांनी रवांडामध्ये पुन्हा अशा प्रकारच्या वांशिक नरसंहाराची पुनरावृत्ती होऊ नये या करता आधीच्या सरकारने केलेल्या चुका टाळून आणि सुधारुन अनेक चांगले निर्णय घेतले. वांशिक संघर्ष टाळण्याकरता घेतलेल्या या निर्णयांपैकी सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे चर्च आणि मशीदींवर धडक कारवाई सुरु करणे.

चर्चचे राज्यकारभारवरील नियंत्रण आपण या भागात वाचलं. पण चर्चचा रवांडातील नरसंहारातील प्रत्यक्ष सहभाग होता तरी कसा? याबद्दल पुढच्या भागात.

© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष पौर्णिमा शके १९४०

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे व माहितीपट
(२) https://bit.ly/2EH9ixH


No comments:

Post a Comment