Showing posts with label विनोदी लेख. Show all posts
Showing posts with label विनोदी लेख. Show all posts

Sunday, March 17, 2024

खर्रा इतिहास: हकीकत-ए-शिरा

शहेनशहा जलालुद्दीन अकबर यांच्या इतक्या बायका आणि अंगवस्त्रे होती की जहांपन्हांना एक एक्सेल वर्कबुक मेनटेन करावं लागे. त्यात तीन वर्कशीट होत्या. एक वर्कशीट पट्टबेगम आणि तिचे तपशील, म्हणजे भाऊ किती, इतर सासुरवाडीकडची मंडळी किती, वगैरे वगैरे. दुसर्या वर्कशीटमधे इतर बायका आणि त्यांचे असे तपशील. तिसरी वर्कशीट अंगवस्त्रांसाठी. तेव्हा कुठे सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नखरे वगैरे लक्षात राहत. अर्थात हे एक्सेल वर्कबुक सुद्धा बिरबलानेच त्यांना तयार करुन दिले होते. 

त्यामुळे एक बातमी ऐकल्यावर बिरबल वैतागला. बातमी अशी होती की जिल्लेइलाहीहीही बादशहा जलालूद्दीन म. अकबर सरांच्या सतराव्या पत्नी बेगम साहिबा बेगम शोधाबाई जलालूद्दीन अकबर यांना दिवस गेले. म्हणजे त्या गरोदर राहिल्या. म्हणजे त्यांना मूल होणार असे समजले. हल्ली सगळं सांगावं लागतं. 'अम्मी कुठे कडमडते' या मालिकेतल्या अम्मीचा दुसरा शोहर मेला आणि मालिकेची वेळ बदलली यामुळे त्या अंमळ मूड-ए-नासाज होत्या. त्यामुळे ही बातमी शाही हकीम यांनी त्यांना दिल्याने त्यांना बहुत खुशी झाली. म्हणून बिरबल मात्र एक्सेल शीट पुन्हा अपडेट करावी लागणार म्हणून वैतागला. तर ते असो.

बिरबलावर वैतागण्याचे आणखी प्रसंग येणार होते. जसा काळ सरकू लागला तसं शोधाबाई साहेबांना डोहाळे लागायला सुरवात झाली. एक दिवस त्यांनी जि. ज.म.अकबर सरांकडे सांस्कृतिक खात्याचे मंत्री बिरबल यांना बोलावणं पाठवा असा हट्ट केला. 

बिरबल येताच शोधाबाई साहिबांनी त्याच्याकडे प्रश्न केला की तुमच्याकडे तो गोड पदार्थ करतात तो कोणता? उस दिन पूजा के बाद तुम लाय थे?!" बिरबलाच्या बायकोलाही त्याच सुमारास दिवस गेले होते त्यामुळे डोहाळेही तसेच लागल्याचे ऐकून तो हबकला.  

"मेरी माँ करती है, और उसकू संयावक कहते हैं बेगम साहिबा और वो करने में बहुत कष्ट होते हैं. खाने में भी जड होता हय, आपको झेपेगा नहीं."

"ऐसा कैसा झेपेगा नहीं, ये अकबर सर की होनेवाली औलाद हय उसकू सब झेपेगा, माझ्यात पण लढवैय्या रक्त है, मेरेकू शिरा चाहीये म्हणजे चाहीयेच. साक्षात बेगम साहिबांचा हुकूम आहे." बेगम शोधाबाई कडाडल्या.

बिरबलाने जिल्लेईलाही अकबर सरांकडे एक कटाक्ष टाकला. ते आपला कशाशी संबंध नसल्यागत किताब-ए-चेहरावर सर्फिंग करण्यात मशगुल होते. त्यांना बिरबलाने किताब-ए-संदेश वर मेसेज पाठवल्यावर त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी उत्तरादाखल शांतपणे एका वाळवंटी ग्रुपची लिंक बिरबलाला पाठवली. आपल्या आईची संयावंक रेसिपी  या वाळवंटी लोकांनी चोरल्याचं आणि नावही बदलल्याचं पाहून त्याला अंमळ मौज वाटली. पण बेगम साहिबांचा हट्ट आहे तो पुरवावाच लागणार हे त्याला उमगलं.

शेवटी बिरबलाने आपल्या आईला बेगम साहिबांची मागणी सांगितली. आईला बरंच वाटलं, ती म्हणाली "अरे पंडित तुम चिंता मत करो. किताब-ए-चेहरावर एक ग्रुप आहे थुईथुई स्वयंपाकघर तिथे साथ आली आहे संयावक खायची, तिथे कुणाला पोस्ट टाकायची उबळ आली की माझ्याकडेच ऑर्डर येते". बिरबलाची चिंताच मिटल्याने तो आनंदित झाला. 

त्याच्या आईने पटकन यंत्र-ए-भागमभाग अर्थात मोबाईल हातात घेतला आणि ग्रुपवर "बाजारात रवा संपला आहे, ब्लॅक मार्केटमधून घ्यावा लागेल. तेव्हा, ऑर्डर देताना वाढीव दरांची नोंद घ्यावी." अशी पोस्ट टाकली. लगोलग ग्रुप अडमीन मोहतरमा यांनी "थीम बंद करत आहोत" म्हणून पोस्ट टाकली. तर ते असो.

बिरबलाच्या आईने चांगला वीस-पंचवीस किलो संयावक करून बिरबलाच्या हस्ते बेगम साहिबा शोधाबाईंकडे पाठवला. इतका संयावक पाहून बेगम साहिबा आश्चर्यचकित झाल्या. त्या बिरबलाला म्हणाल्या, "बिरबल आम्ही तुमच्यावर और तुमच्या वालिदा साहिबा यांच्यावर बहुत खुश आहोत. त्यामुळे आम्ही या पदार्थाला त्यांचं नाव देणार."

"वो यंव त्यंव नाम हमकू मालूम नहीं. तुम्हारी 'माँ' ने हा पदार्थ 'खंडी'भर पाठवून आमच्या मनात 'शिर'ल्या, त्यामुळे आजपासून या पदार्थाचे नाव शिरा, मा-खंडी-शिरा."

तेव्हापासून याला माखंडी शिरा म्हणतात. पुढे उरलेल्या शिऱ्यात बेगम साहिबांच्या कारट्याने शू केल्याने त्या भागाला मुतांजन असेही म्हणू लागले. पण हा इतिहास तुम्हाला ट्रोलिस्थान सरकारचे हस्तक आणि विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
सहाय्यक विषवमन ओकरी आणि टिमटिम बकरीपांडे
पान ७८६, ओळ ८

#खाखा_ए_हावरटी #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी



Friday, June 9, 2023

खर्रा इतिहासः मंगळवारचे व्रत करणारा शहेनशहा

एकदा बादशहा सलामत जिल्लेइलाही शहेनशहा-ए-(पाव)हिंद सुबह-ए-सजदा औरंगजेब सर सैन्यासहवर्तमान जंगलातून निसर्ग सौंदर्य न्याहाळत चालले असता त्यांना एके ठिकाणी वेगळेच निसर्गसौंदर्य दिसले. बादशहा सलामत सौंदर्यस्थळांचा फारच आदर करित. अनेकदा एकांतात...असो. त्यामुळे त्यांनी आपल्या सरदारांना आणि वजीर-ए-आजमला "इथेच तंबू टाका. आम्ही शिकार करुन येतोच" अस हुकूम दिला, आणि शहेनशहा सर त्या सौंदर्यस्थळांचा मागोवा घ्यायला एकटेच निघाले. त्यांना ग्रूप अ‍ॅक्टिव्हिटी आवडत नसे असे काही विकेंड इतिहास्यकारांचे यांचे फावल्या वेळेतले संशोधन सांगते. असो.

तर, बादशहा सलामत असेच एकटे निघाले असता ते सौंदर्यस्थळ त्यांच्या नजरेच्या टप्प्यात असले तरी नीट न्याहळण्यासाठी हाताच्या टप्प्यात येईना. सौंदर्यस्थळ पुढे औरंगजेब सर मागे सौंदर्यस्थळ पुढे औरंगजेब सर मागे असा खेळ बराच काळ चालला. शेवटी ते सौंदर्यस्थळ तलावात शिरले आणि औरंगजेब सरांना हुरुप आला. लगेच त्यांनी तलावावर चेक इन करत भुर्जपत्रावर "फीलिंग हॉट विथ समवन अननोन" असं स्टेटस लिहून ते ही त्या तलावात शिरले. 

लेकिन बदनसीबी! ते सौंदर्यस्थळ पोहत पोहत तलावाच्या दुसर्‍या टोकाला पोहोचले आणि अदृश्य जाहले. इकडे औरंगजेब सरांना पोहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले आणि उपरवाल्याचा धावा करु लागले. आणि काय आश्चर्य, तिकडून त्यांना हत्तींची एक झुंड पाणी प्यायला तलावाच्या दिशेने येताना दिसली. बादशहा सलामतांनी हातात घेतलेली एक लहान फांदी उंच धरली आणि हत्तींच्या दिशेने आरडाओरडा करायला सुरवात केली. त्यातल्या हत्तींच्या टीम लीडरने ती फांदी धरली आणि खेचायला सुरवात केली. बादशहा सरांनी पटकन संधी साधली आणि तलावाबाहेर आले. गणपती म्हणजे गणांचा पती म्हणजेच उपरवाल्याने त्या हत्तींना आपली जान वाचवायला पाठवले असे वाटून त्यांनी त्या हत्तींचा सन्मान करायचे ठरवले. पण छावणीपर्यंत हत्तींना एकट्यानेच कसे नेणार अशी रास्त शंका आल्याने (ते बीरबल नसला तर कधी कधी स्वतःच्या दिमाग-ए-मस्तिष्कचा वापर सुद्धा करीत असत) त्यांनी तिथलीच माती वापरून हत्तींच्या मुंडक्याची एक प्रतिकृती बनवली आणि आपल्याबरोबर छावणीत व तिथून दिल्लीला घेऊन गेले. 

तर, ही घटना घडली तो दिवस मंगळवारचा (الثلاثاء) असल्यामुळे बादशहा सलामत जिल्लेइलाही शहेनशहा-ए-(पाव)हिंद सुबह-ए-सजदा औरंगजेब सरांनी मंगळवारी उपास करायला सुरवात केली व दर मंगळवारी ते मनोभावे (मनोभावे म्हणजे मनापासून, औरंगजेब सरांना दाढी होती म्हणून अनंत भावेंचे कुणी नव्हेत) त्या गणपतीसमोर बसत. तसेच त्या दिवशीची आठवण म्हणून त्या फांदीच्या झाडाची वीणा तयार करुन घेतली होती ती खाजवत.... माफी असावी.....वाजवत बसत. आपण मौसिकीच्या विरोधात असल्याने कुणाला ती वाजवलेली कळू नये म्हणून त्यांनी खोली आवाज-ए-बंद अर्थात साउंड प्रूफ करुन घेतली होती. 

पण हा इतिहास तुम्हाला विकेंड इतिहास्यकार सांगणार नाहीत.

औरंग्या-ए-सनातनी
पान ४८८८, ओळ २४
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद: मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
प्रस्तावना: विषवमनभर ओकरी

#तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी

Monday, January 16, 2023

खर्रा इतिहासः मुघल - अरबस्थ बामण

 मुघल हे खरे तर अरबस्थ बामण. भारतीय बामण मुंज झाल्यावर डोक्यावर शेंडी ठेवायचे. आबा भटाचे पणजोबा अण्णा भट यांनी शहेनशहा बाबराला आयडिया सांगितली की इकडच्या बामणांपेक्षा तुम्ही वरचढ दिसणे अपेक्षित आहे तेव्हा तुम्ही डोक्यावर शेंडी न ठेवता हनुवटीवर ठेवा आणि मिशी कापून टाका. तेव्हापासून मुघल बिनमिशीचे दाढी ठेऊ लागले. 


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान २७८६, ओळ ६
 #तुझ्यायची_अकबरी  #आबा_भट_भारीच_खट

🖋️ मंदार दिलीप जोशी

Saturday, December 31, 2022

खर्रा इतिहासः ख्रिसमस ट्री - एक मुघल शोध

 आपण हिंदूस्थानात मोठमोठ्या टूर्स काढत असूनही दीवान-ए-खास मधे आपल्या कामाची पुरेशी चिन्हे (souvenir) नाही अशी जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सरांना अलीकडे (म्हणजे हल्ली, कुणाकडे असं नव्हे. चावट कुठले) खंत लागून राहिली होती. बेगम शोधाबाईंच्या नादाने एक दोन मराठी मालिकांचे बघून त्यांना "प्रेझेंटेशन" द्यायची हुक्की आली होती पण त्यांच्या दिमाग-ए-मस्तिष्कचे जे विचार करण्याचे काम त्यांनी ज्या बिरबलाला औटसोर्स केले होते त्याने बादशहासरांना आवरलं म्हणून बरं झालं. 

पण अकबर सर सुद्धा कधीकधी विचार करत असत. जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सर हिंदूस्थानात जिथे जिथे टूर घेऊन गेले होते तिथल्या स्थानिक झाडांची रोपे कुंडीत आणून दीवान-ए-खासमधे ठेवण्याची सूचना त्यांनी बिरबलाला केली. पण अकबर सरांना नुसतीच झाडं बघवेनात. त्यांनी बेगम शोधाबाईंना सांगून त्या झाडांवर चायनीज प्रवासी फुं-कून-पी आणि दी-वे-लाऊ यांनी बादशहा सरांना भेट दिलेले एक हजार दिवे त्या झाडांना लावून टाकले. पण ते दिवे चायनीज असल्याने त्यातले फक्त सातशेसहाईंशीच दिवे पेटले. शोधाबाईंना चिंता लागून राहिली पण बिरबलाने त्यांना "तसे बादशहा जिल्लेइलाही अकबर सरांचेही दिवे फारसे पेटत नसल्याने काही कळणार नाही" असा दिलासा दिला.

प्रचंड थंडीला कंटाळून युरोपियन प्रवासी रिका-म-टेकडोस्की एकदा डिसेंबरात दिल्लीत आला असताना त्याने दरबारात ही रोषणाई बघितली अ‍ॅंड रेस्ट इज हिस्टरी. अशा रीतीने ख्रिसमस ट्रीची परंपरा युरोपात प्रचलित झाली. 

पण हा खर्रा इतिहास युरेशियन विकेंड इतिहासकार तुम्हाला कधी सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
पान ६६६, ओळ ८

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

🖋️ मंदार दिलीप जोशी






Tuesday, November 1, 2022

खर्रा इतिहास: फटाक्यांचा शोध

जिल्लेइलाही बादशहा जलालूद्दीन अकबर साहेब एकदा जश्न-ए-दिवटे निमित्त काय खास गोष्ट करावी असा आपल्या दिमाग-ए-मस्तिष्क मध्ये विचार करत बसले होते. ही गोष्ट त्यांना फार नवीन होती. पण वतीने विचार करणारा बिरबल काशीयात्रेला सुट्टीवर गेल्याने त्यांना हे काम करण्यास आत्मनिर्भर होणे जरुरीचे होते. या आधी मुल्क-ए-हिंदुस्थानात कुणीही केली नसेल अशी धमाल उडवून द्यावी आणि आवामचे दिल आपल्याबद्दलच्या मोहोब्बत ने भरून टाकावे असे त्यांना वाटत होते. 

काहीतरी कल्पना मिळेल म्हणून त्यांनी टीव्ही लावला. #झीट_मराठी नावाच्या वाहिनीवर कुठलीतरी आजी आपल्याच नातवाला विहिरीत ढकलून कसे ठार मारायचे असा विचार करत असलेली दिसली. बादशहा सलामतांना ती कल्पना फारशी पसंद आली नाही. मग त्यांनी चॅनल बदलला. #ठार_प्रवाह वर एक सासू आपल्या सुनेला शिऱ्यात विष घालून मारायची योजना आखत असल्याचे त्यांना दिसले. माणसं मारायचे हे असले अहिंसक प्रकार पाहून त्यांना बहुत गुस्सा आला. बादशहा सलामत जिल्लेइलाही जलालूद्दीन अकबर साहेबांच्या चौतीसाव्या बेगम साहिबांच्या वालीदा अर्थात बादशहांच्या सासूबाई #सोनी_मराठी बघत असलेल्या त्यांना दिसल्या. त्या वाहिनीवर एक इसम खोटं नाव सांगून लग्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना दिसलं. "सरळ उचलायचं ना" असं उद्गारल्यावर चौ.बे.वा. दचकल्या आणि त्यांनी चॅनल बदलला. #कलर्स_मराठी वर एक वस्ताद चाळे नामक नट "मला हे पसंत नाही" "मला ते पसंत नाही" असं ओरडत सगळीकडे आग लावत सुटलेला त्यांना दिसला. ही कल्पना मात्र त्यांना आवडली. त्यांनी लगेच चॅनलला फोन लावून वस्ताद चाळेला पाठवून द्या असा हुकूम सोडला.

"ए वस्ताद, बादशहांनी तुला लाल किल्ल्यावर बोलावले आहे" असं म्हटल्याबरोबर त्याने स्वतःची दाढी कुरवाळत खर्जातला आवाज लावून "पण माझी तर आधीच लाल आहे" अशी त्याच्या स्वभावाला अनुसरून आगाऊ टिप्पणी केली. मग बादशहांच्या सैनिकांनी त्याच्या तशरीफ वर काष्ठप्रहार करून ती आणखी लाल केली आणि वस्तादला बादशहा हुजुरांसमोर घेऊन गेले. 

बादशहा ज.म.अकबर सर त्यावेळी तुडुंब खाऊन झोपले होते. अलीकडे (म्हणजे कुणाकडे असे नव्हे, पलीकडच्या उलट) त्यांचे पोट जरा नासाज राहत असे. अशातच ते कुशीवर वळले आणि नेमकं त्याच वेळी त्यांच्या सतराव्या बेगम साहिबांच्या वालीद साहेबांनी दिलेल्या हवाबाण हरड्यांनी करामत दाखवली. ते पाहून वस्ताद चाळेच्या डोक्यात किडा वळवळला. "असं अनेकदा होतंय का?" नाक मुठीत धरलेल्या सैनिकांना त्याने लगेच सवाल पुसला. "हुजुरांना असा त्रास होतो कधी कधी, झोपेतच औषधांचा परिणाम होतो". काही नतद्रष्ट मित्रांच्या नादाने वस्ताद चाळेने एकदा नॅशनल जियोग्राफिकवर बघितलेला एक रिऍलिटी शो त्याला आठवला. सैनिकांकडून मशाल मागून घेत तो बादशहांच्या तशरीफमागे स्वस्थपणे उभा राहिला. त्याला फार वाट बघावी लागली नाही. हवाबाण हरड्यांनी लगेच पुन्हा आपला प्रभाव दाखवला, पण या वेळी जळती मशाल असल्याने ढुsssम्म असा स्फोटक आवाज होऊन मोठा जाळ झाला आणि बादशहा सलामत पटकन जागे होऊन पळत सुटले. 

आणि अशा प्रकारे कन्ट्री-ए-हिंद मध्ये फटाक्यांचा शोध लागला. पण हा इतिहास तुम्हाला विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ६७

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी

Wednesday, September 14, 2022

खर्रा इतिहास: किस्सा ए तालीम

शहजादा असताना औरंगजेब साहेबांना लहानपणापासून शिक्षणात फार रस नव्हता. व्होकेशनल कोर्सेस करण्याकडे त्यांचा अधिक कल असे. मग कुठल्यातरी वर्गात शिवणकामाचा तास सुरु असेल तिथे जाऊन टोप्या वीण, कुठे रफू कर, साडी फेड्....आपलं सॉरी...साडीला फॉल पिको कर, असे उद्योग चालत. मग ते तलवारबाजी शिकले. एकाच घरातल्या सगळ्याच भावांनी मुलुखगिरी करुन कशी चालेल म्हणून ते आपला भाऊ दाराला "दारा, शाळेत शिको" "दारा शिको" असे सतत म्हणत असत. त्यावरुनच भावाचे नाव पुढे दारा शिकोह पडले. पण हा इतिहास विकेंड इतिहासकार तुम्हाला सांगणार नाहीत.



#किस्सा_ए_तालीम
मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
प्रस्तावना: विषवमनुद्दीन खान फोदरी
पान २६, ओळ ४

#म्हैत_नसलेला_औरंग्या #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी




Monday, August 1, 2022

खर्रा इतिहास: सिलसिला ए मुरब्बा

विकेंड हिस्टोरियन लोकांच्या नादाला लागू नका. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला याचा आमच्याकडे पुरावा आहे. एकदा काय झालं की साधूवृत्तीच्या जिल्लेइलाही औरंगजेब सरांच्या सैन्य अभ्यासात लाडके थोरले बंधू दारा शिकोह अपघाती मरण पावल्यापासून औरंगजेब सर फार म्हणजे फार दु:खात होते. त्यांचं चित्र काढायला छानसा चित्रकारही मिळेना. मग शहेनशहा औरंजेब सरांनी एक आयडीया केली. ती काय ते पुढे कळेलच.

असेच काही दिवस गेल्यावर, आणि दिवस गेल्यावर, बेगम साहेब गच्चीत फेरफटका मारत असताना त्यांना महालातल्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीच्या खिडकीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. नीट लक्ष देऊन ऐकले असता एक लहान मुलगा  "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे रडता रडता म्हणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खरं म्हणजे बेगम पहिल्या मजल्यावर जायला घाबरायच्या. त्याचं काय झालं की एकदा जिल्लेइलाही औरंगजेब सरांचे मरहूम अब्बाहुजूर.... असो. तो विषय पुन्हा केव्हातरी. 

तर धीर एकटवून त्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीत डोकावल्या. तिथे दारा शिकोहचा थोरला सुलेमान एका बरणीकडे पाहून मोठमोठ्याने "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे म्हणत रडत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन बघतात तो काय, त्या बरणीत मरहूम भाऊजींचे शिरकमल...नको कमळ नको...आपण डोकं म्हणूया. तर मरहूम भाऊजींचं डोकं एका रसायनात घालून ठेवलेलं दिसलं. ते पाहताच बेगमना परवाच कोकण सुभ्यातून सरदार जोशुद्दीन आणि सहस्त्रबुद्दीन यांनी पाठवलेल्या कैर्‍यांचे गोड काय करायचे या प्रश्नावरचा उपाय सापडला.  

"कोण आहे रे तिकडे?" असा चारपाच वेळा आवाज देऊनही कुणी ओ देत नाही म्हणून भडकलेल्या बेगमसाहेबांना आपण अजून पहिल्या मजल्यावरच आहोत याचं भान आलं आणि त्यांनी सुलेमानलाच ती बरणी घेऊन बावर्ची खान्यात पाठवलं. तिथेही लोक "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे किंचाळू लागले. बेगम मागोमाग तिथे पोहोचल्या आणि खानसाम्याला नेमकं काय करायचं आहे ते समजावून सांगितलं. 

आणि अशा रीतीने "म्म्म्म्म्म्म अब्बा" या उद्गारांचा मुरांबा असा मुघली अपभ्रंश होऊन तो शब्द मान्यता पावला. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला असल्याचे या गोष्टीवरुन सिद्ध होते. हा खरा इतिहास तुम्हाला कुणीच सांगणार नाही. 

#म्हैत_नसलेला_औरंग्या #सिलसिला_ए_मुरब्बा #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास

मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ८४०, ओळ ८

© मंदार दिलीप जोशी




Friday, April 1, 2022

खर्रा इतिहास: अकबरानेच लावला होता एक एप्रिलचा शोध, कहाणी ऐकून व्हाल थक्क

 म. ज. अकबर सर तरुण असताना एकदा बागेत फिरायला गेले. फिरत असताना त्यांना एक युवती त्यांच्या दृष्टोतपत्तीस पडली. तिच्या सौंदर्याने ते मोहित झाले आणि येऊन बादशहा जिल्लेइलाही हुमायूं यांना म्हणाले की हिला उचलू का? 

बादशहा जिल्लेइलाही जहांगीर यांनी लहानग्या जलालुद्दीनला समजावले की बाळा आधी प्रेमाने मागणी घालून पाहू, नाहीच ऐकलं तर उचलायची तयारी आहेच! मग मुघल बादशहांच्या शेहजाद्यांना शोभेल असे एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले आणि जडजवाहीर, पैसे वगैरे घेऊन मुलीकडे पोहोचले. मुलीला ही सोयरिक मान्य नव्हती पण तिच्या भावाने म्हटलं तू आत्ता राडे करु नको आपण आधी मिळतंय ते पदरात पाडून घेऊ बाकी मी बघतो. "हमारी एक अट हय!" भाऊ शिष्टमंडळाच्या प्रमुखाला म्हणाला. आता हा ऐन वेळी नको म्हणाला तर काय करायचं या विचाराने शिष्टमंडळातल्या जेष्ठ दाढीच्या हृदयाचा ठोका चुकला. बादशहा याचं जे काही करायचं ते करतील पण आधी आपलीच पाळी यायची. तो म्हणाला "ते प्री-वेडिंग शूट वगैरे काही होणार नाही. जे काही शूटींग करायचं ते निकाह नंतर शहजाद्याला करु दे. आधी काही जमायचं नाही." 



"अश्लील! अश्लील!!" शिष्टमंडळात गदारोळ झाला. "अरे क्या हुआ, उसमें क्या अश्लील हय? मैने बोला वो कॅमेरामन को लेकर झाड को लटकनेका प्री-वेडिंग करते हैं ना वो नहीं करनेका. थेट शादी में मिलेंगे". आता कुठे जेष्ठ दाढीचे फुदकणारे हृदय जागेवर बसले. मुलीच्या भावाने घातलेली अट अगदीच सौम्य होती. 

होता होता निकाहचा दिवस उजाडला. इकडे शहजदा जलालुद्दीनला मनातल्या मनात गुदगुला होत होत्या. अखेर पलीकडच्या दालनातून विचारणा करणारा आवाज ऐकू आला, "बेटी क्या तुम्हे शहजादा अकबर वल्द बादशहा जिल्लेइलाही हुमायूं वल्द बादशहा जिल्लेइलाही बाबर से निकाह कबूल है?" याच्या उत्तरादाखल मंजुळ आवाजात "हां, कबूल है" असा आवाज येताच अकबराला भावना आवरेनात. पण निकाह नंतर आम्ही तुम्हाला दख्खनमध्ये फिरायला पाठवू तोवर सबर करा असं बादशहा शहनशहा-ए-आलम जिल्लेइलाही हुमायूं सर म्हणाले. त्या अनुसार दख्खनमध्ये असलेल्या बंगल्यावर दोघांना पाठवण्यात आले. निकाह झाल्यावर मुलाला व नवरीला फिरायला पाठवण्याची कल्पना बादशहा हुमायूं सरांचीच. हुमायूं सरांनी आपल्या बेगमला  खिडकीतून चांद दाखवला होता तेव्हापासून हुमायूं नावाचा हनीमून असा अपभ्रंस झाला. (हे अ‍ॅडिशनल ज्ञान ठेऊन घ्या).

पहिल्याच रात्री घुंघट उचलल्यावर तरुण शहजादा जलालुद्दीन जोरात किंचाळला. समोर जलालुद्दीन ने उद्यानात बघितलेली मुलगी नसून भलतीच कुणीतरी आणा कयूब नावाची वेडसर, मुलगी होती. जलालुद्दीनला गुस्सा आला आणि वेडाच्या भरात "शोधा, शोधा, त्या मुलीला शोधा" असं म्हणाला. पण त्या मुलीचा परिवार तोवर सगळा पैसाअडका घेऊन भारताबाहेर कधीच पसार झाला होता! मग हुमायूं सर म्हणाले, की पदरी पडलं पाक झालं समजून हिला नांदव. आपण सुंदर मुली काय असल्या सत्तावन्न शोधू. शेवटी शहजादा अकबर शांत झाला, पण पुढे बराच काळ तो रात्रीत "शोधा, शोधा" बडबडत असे. म्हणून त्या मुलीचे नाव रंगेबिरंगी इतिहासात "शोधा अकबर" म्हणून प्रसिद्ध झाले.

ज्या दिवशी आपण उल्लू बनल्याचे अकबराच्या लक्षात आले तो दिवस एक एप्रिलचा होता. आपण एकटेच का फूल व्हावे, समस्त हिंदूस्थान आणि जगाने एक दिवस का होईना फूल व्हावे म्हणून एक एप्रिल हा दिवस फूल्स डे म्हणून साजरा करण्याचे शाही फर्मानानुसार जाहीर झाले. 

पण संघी चड्डीवाले हा इतिहास तुम्हाला सांगणार नाहीत. 

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ ५

© मंदार दिलीप जोशी


Wednesday, February 23, 2022

वाचनप्रेमी तालिबान - लोकशाहीचा मार्ग पुस्तकातून: एक छापण्याआधीच मागे घेतलेला एक लघु अग्रलेख किंवा संपादकांचे मनोगत

तालिबान म्हणजे विद्यार्थी असे आम्ही म्हणालो होतो तेव्हा अमानुष बहुमताने निवडून आलेल्या सद्ध्याच्या राज्यकर्त्यांच्या समस्त पाठीराख्यांनी आमच्यावर जहरी टीका केली होती. पाठीराखे हा शब्द आम्ही विचारपूर्वक वापरला त्यास कारण की भक्त शब्द वापरला तर भलतीच नामुष्की ओढवण्याची भीती. मागे घेतला तरी ते आपल्याला विसरू देत नाहीत. अग्रलेख विसरू देत नाहीत तर एखादा शब्द विसरू देण्याची शक्यता अंमळ धूसरच.

Reader Taliban

तर विषय असा की हातात बंदुका आहेत आणि त्यात हजार लानते पाठविण्यालायक गोळ्याही आहेत, आणि ज्या प्रमाणे नागपूरवरून आदेश येताच शाखांत अंमलबजावणी होते त्याच प्रमाणे वरिष्ठांचे आदेश येताच धार्मिक शिस्तीची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सज्ज असलेले हे शस्त्रसज्ज योद्धे कार्यतत्परही आहेत. मात्र, असे असतानाही आपल्या ज्ञानप्राप्तीच्या लालसेचे दमन न करता मिळालेल्या अल्प फावल्या वेळात, म्हणजे शिस्तीची अंमलबजावणी करताना डोकी उडविण्यापासून फुरसत मिळताच, वाचनालयात जाऊन स्वतःचे डोके मात्र पुस्तकात खुपसण्याची संधी सोडत नाहीत. काही खवचट लोक म्हणतीलही की हे फक्त चित्रे बघत आहेत, पण शेवटी भाषा ही चित्रांमधूनच निर्माण होते ना? आपल्या संस्कृतीत मनुष्य नेहमी विद्यार्थी असतो आणि त्याने सतत वाचन, मनन ठरत रहाणे आवश्यक आहे त्याचेच हे दुसरे रूप नव्हे काय? प्रस्तुत छायाचित्रात मागे फिरत असलेला इसम हा अशाच प्रकारे मनन करत असल्याचे आपल्याला दिसते. आपल्याला काय वाचायचे आहे हे सुद्धा विचारपूर्वकच ठरवले पाहिजे ही प्रगल्भ जाणीव त्याचे ठायी आहे हे तो आपल्या या कृतीतूनच दाखवून देत आहे. मग आपण ते आणि आपण असा भेदभाव का करावा?

पण अशा प्रकारे भेदभाव करावा असे प्रोत्साहनच सद्ध्याच्या प्रस्थापित राजवटीकडून मिळालेले दिसते. त्यातूनच मग कुणी काय पेहराव करावा इथपासून कुणी काय बोलावे हे काही मूठभर लोक ठरवू पाहतात. पण मूठभर लोकच शांततेने क्रांतीही घडवू शकतात हीच आशा आपल्याला या छायाचित्रातून दिसते. उद्या, परवा, तेरवा, पुढच्या वर्षी किंवा काही दशकांत या दोन वाचनप्रेमी जिज्ञासू युवकांसारखीच सवय आणखी काही युवकांना लागेल व संपूर्ण तालिबानी राजवट ही याच ज्ञानलालसेने रासवट शिस्तीतून बाहेर येऊन लोकशाहीवादी विचार आपल्या मनात रुजवेल अशी आम्हांस खात्री वाटते.

पुढे आपल्याकडचे मूठभर लोक सत्तेत टिकल्यास सद्ध्याच्या आपल्या प्रस्थापित राजवटीला तालिबानकडूनच अशा अभ्यासू, ज्ञानाधिष्ठित लोकशाहीची शिकवण घेण्याची वेळ आली तर मात्र त्यांच्या पाठीराख्यांच्या समाजमाध्यमांवरच्या कोलांट्याउड्या व डिलीट झालेली विचारमौत्तिके बघण्यास मात्र आपल्यासारख्या लोकशाहीप्रेमी व कन्हैया, मेवानी, व राऊत यांच्या भारतात पुरोगामी लोकांस मौज वाटणार हे निश्चित.

- पिरिष गुबेर
संपादक, ओकसत्ता

© मंदार दिलीप जोशी
माघ कृ. ४, शके १९४३







Monday, February 14, 2022

खर्रा इतिहास: इष्क-ए-हिंद-ए-दिन अर्थात व्हॅलंटाइन डे

शहेनशहा जलालुद्दीन अकबर यांच्या इतक्या बायका आणि अंगवस्त्रे होती की जहांपन्हांना एक एक्सेल वर्कबुक मेनटेन करावं लागे. त्यात तीन वर्कशीट होत्या. एक वर्कशीट पट्टबेगम आणि तिचे तपशील, म्हणजे भाऊ किती, इतर सासुरवाडीकडची मंडळी किती, वगैरे वगैरे. दुसर्या वर्कशीटमधे इतर बायका आणि त्यांचे असे तपशील. तिसरी वर्कशीट अंगवस्त्रांसाठी. तेव्हा कुठे सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नखरे वगैरे लक्षात राहत. अर्थात हे एक्सेल वर्कबुक सुद्धा बिरबलानेच त्यांना तयार करुन दिले होते. 

एकदा सहज विचार करत बसले असता जलालुद्दीन सरांच्या मनी आले की मुघल सलतनतीत एखादा तरी प्रेम दिवस असावा. पण आता इतक्या बायका आणि अंगवस्त्रे असताना बादशहा हुजूरांचा रोजच प्रेमदिवस असे. त्यांची अडचण त्यांनी (पुन्हा) बिरबलालाच सांगितली. बिरबलाने त्यांना अरबस्थानातील प्राचीन पीर संत वळवळताहेन या थोर इश्वरी पुरुषाबद्दल सांगितले. "शहेनशहा साहेब, आपण आपल्या वर्षातील प्रत्येक दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा करावा, पण इंग्रजी क्यालेंडरातील चौदा फेब्रुवारी हा दिवस सरजमीन-ए-हिंदूस्थानात प्रेम दिवस म्हणून साजरा करावा. 

"पण चौदा फेब्रुवारीच का?" जहांपन्हांनी पुन्हा अजागळ शंका विचारलीच. 

"सारख्या मालिका पाहून तुम्हाला काही सुचत नाहीसे झाले आहे झालं जहांपन्हा. मालिका सुरु असतील तेव्हा तुम्ही दीवान-ए-खास सोडून दीवान-ए-आम मध्ये बसून आवामच्या तक्रारी ऐकत चला, डोक्याची मंडई कमी होईल." बिरबल वैतागून म्हणाला.

मालिकांचा उल्लेख बिरबलाने करताच "आमच्या दुखत्या नसीवर बोट ठेवायला आम्ही तुला फर्मावलेले नाही. तेव्हा आमच्या समस्येवर तोडगा सांग पटकन", असं शहेनशहा उद्गारले.

"अहो बादशहा साहेब, चौदा फेब्रुवारी हा संत वळवळताहेन याचा स्मृतिदिन. तसेच आपल्या पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस कधी येतो सांगा बरं?"

मागच्या वेळी पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस विसरल्याने त्यांनी आख्खी "अम्मी कुठे कडमडते" मालिका सोबत बसवून बघायला लावली होती त्याची याद येऊन बादशहा कळवळले. तेव्हापासून पट्टबेगम साहिबांचा वाढदिवस हा चौदा फेब्रुवारीला येत असल्याचे त्यांच्या मश्तिष्कच्या 'गहराईयां'त कोरले गेले होते.

बिरबलाच्या हुशारीवर बादशहा मनातल्या मनात खुष झाले आणि त्यांनी फरमान सोडून चौदा फेब्रुवारी हा इष्क-ए-हिंद-ए-दिन म्हणून घोषित केला. त्याचा पुढे अपभ्रंश शाखावाल्यांनी वळवळताहेन दिन असा केला.

हा खर्रा इतिहास हे संघी चड्डीवाले तुम्हाला कधी सांगणार नाहीत. 

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४४४४, ओळ २३

#इष्क_ए_हिंद_ए_दिन #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी







Friday, February 11, 2022

खर्रा इतिहासः अफझलखान कसा मेला?

आपल्या मुलाची मुंज प्रतापगडाच्या पायथ्याशी करण्याचा अफजलखानाचा मानस होता म्हणून गागाभट्ट गुरुजी यांना डेप्युटशनवर पाठवावे अशी विनंती करायला खान आला होता. दुर्दैवाने त्याला ब्रेन ट्यूमरचा हार्ट ऍटॅक आला आणि त्यात तो गेला. 

अफझल-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४२०, ओळ २७

© मंदार दिलीप जोशी






खर्रा इतिहासः शाईस्तेखानाची बोटे का तुटली?

 शाईस्तेखानास भाषांतराचे वेड होते. उत्तमोत्तम धार्मिक ग्रंथांचे तो रेमिंगटन टाईपरायटरवर फारसीत भाषांतर करत असे. दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका त्याचे टाइपिंग सुरूच असायचे. एकदा असाच लाल महालात बसून भगवद्गीतेचे भाषांतर टंकलिखित करत असताना स्वराज्यातून त्याला नजराण्यातून भेट मिळालेला गोदरेज टाईपरायटर नजरेस पडला. त्यावर अतिशय झटपट टाइपिंग होत असल्याचे लक्षात आल्याने त्याने अधिकच जोमाने टाइपिंग सुरू ठेवले, दुर्दैवाने त्याच टाईपरायटरमध्ये त्याचा हात अडकून तीन बोटे तुटली. 

औरंग्या-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान १८८४, ओळ २२

© मंदार दिलीप जोशी

Shaista Khan



खर्रा इतिहासः जगन्नाथ यात्रा आणि अकबर

एकदा दक्षिण सफरीवर असताना बादशहा अकबराच्या बग्गीचा टायर पंक्चर झाला. नेहमीचा अब्दुल पंक्चरवाला हग यात्रेला गेल्याने अंमळ अडचणच झाली. मग अकबराने भगवान जगन्नाथाचा धावा सुरू केला. अचानक देवळातून एक शेंडीधारक इसम आला व त्याने बग्गीच्या चाकाचे पंक्चर काढून दिले. तुला पैसे देतो असं अकबर म्हणाला पण तो इसम पैसे न घेता परत गेला आणि पुन्हा सापडलाच नाही. आपल्या मदतीला भगवान जगन्नाथच धावून आले असं समजून बादशहा अकबराने जगन्नाथ यात्रा सुरू केली.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ६६६, ओळ ११

© मंदार दिलीप जोशी

Akbar praying






खर्रा इतिहासः मुमताज बेगम आणि ताज महाल

मुमताज बेगम निष्णात रांगोळी काढणारी होती. ती अस्थम्याची रुग्ण सुद्धा होती. तिला शाहजहान म्हणायचा सुद्धा की प्रिये, रांगोळी नाकातोंडात गेली तर तुला अस्थम्याचा ऍटॅक येईल. पण ती सोळाव्या वेळी गरोदर असताना आपल्या पहिल्या डिलिव्हरीच्या म्हणजे मुलाच्या लग्नात स्वतः जातीने रांगोळी काढायला बसली होती. दुर्दैवाने बादशहा शाहजहान सरांची भीती खरी ठरली आणि रांगोळी तिच्या नाकातोंडात जाऊन दम्याचा विकार बळावून त्यात ती गेली. तिचे अत्यसंस्कार यमुनेच्या काठी करण्यात येऊन तिच्या अस्थी ताज महालात ठेवण्यात आल्या आहेत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ८७

© मंदार दिलीप जोशी


Mumtaj Begum and Taj Mahal



खर्रा इतिहासः कोजागिरी पौर्णिमा आणि अकबर

आजच्याच रात्री बादशहा हुमायूंने बाळ अकबराला सोन्याच्या चषकातून दुध पाजले होते. त्यात हुमायूं जायफळ टाकायला विसरल्याने बाळ जलालुद्दीन जागाच राहिला. म्हणून हुमायुं अकबराला म्हणाला "कोजागरती" म्हणजे "का रे (दिवट्या) जागा आहेस?" (माझा पुढचा प्लॅन बोंबलला ना. बेगम, तुम्ही झोपा). अशा रीतीने हा उत्सव सुरु झाला.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४८८, ओळ २४

© मंदार दिलीप जोशी





खर्रा इतिहासः छठ पूजेची सुरवात

 एकदा यमुनेच्या काठी सूर्याला अर्घ्य देत उभा असताना बादशहा जलालूद्दीन महंमद अकबराला "बचाओ बचाओ" अशी हाक ऐकू आली. लांब कुणीतरी नदीत बुडत असल्याचं अकबराला दिसलं. बादशहाने आजूबाजूला बघितलं आणि आपल्या अधिकाऱ्यांना विचारलं की किसीको तैरना आता हय क्या? पण तो समय त्यांचे घसे ओले करण्याचा असल्याने सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या ठिकाणी पोहोचायला ओला बुक केल्यामुळे स्वतःला ओलं करून घ्यायला कुणी तयार होईना, त्यामुळे आम्हाला पोहोणे को नाही आता असं ठोकून ते मोकळे झाले. आता आलमपनाह स्वतः कसे उडी मारणार एवढ्यात त्यांना मागून कुणीतरी धक्का दिला आणि ते पाण्यात पडले, आणि पडल्यावर हातपाय मारू लागले. त्यांना काही कळण्याच्या आत ते बुडणाऱ्या माणसाजवळ पोहोचले सुद्धा होते. शेवटी त्या माणसास धरून त्यांनी किनाऱ्यावर आणले तेव्हा लक्षात आले की हा साला...अंहं...ही शिवी नव्हे बरं... हा इसम त्यांचा सालाच होता. म्हणजे धक्का देणाऱ्या बेगम शोधाबाईच होत्या!! 

बादशहांनी रागे भरू नये म्हणून बेगम साहिबांनी फुलांनी भरलेलं ताट त्यांच्यासमोर धरलं तर आलमपनाह चिडले आणि "हट" असं म्हणून ते ताट उडवलं, तेव्हा सगळी फुले यमुनेत जाऊन पडली. शोधाबाई साहिबांना हा कसलातरी संकेत वाटला आणि बादशहा सलामत "छठ" म्हणाले असं वाटून तेव्हापासून साला प्रकरण थंड झाल्यावर बादशहा अकबरांची परवानगी घेऊन सर्वप्रथम "छठ पूजेला" सुरवात केली.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ६६६, ओळ ६

© मंदार दिलीप जोशी




खर्रा इतिहासः नेहरू आणि सावरकर भेट

ग्रामोफोनवर चोरून ऐकत असताना चाल आवडल्याने भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना एकदा 'जयोस्तुते' लाईव्ह ऐकायची लहर आली. लागलीच त्यांनी मुंबईला सावरकरांना फोन लावला, तो साधारण आठवडाभराने लागला. नेहरू म्हणाले, "स्वातंत्र्यवीर, अब हमारा कोई भरवसा नहीं. आज है उद्या नहीं. जाने से पहले एक बार जयोस्तुते गाना लाईव्ह सूनना है."

[म्हातारचळ लागलेलं दिसतंय, असं म्हणून] सावरकरांनी ताबडतोब शेजारची चार कार्टी गोळा केली आणि गाणं बसवून घेतले. अखेर तो दिवस उजाडला. पंडित नेहरू लहानग्या इंदिरेसह सावरकरांच्या घरी आले. कार्ट्यांनी जबरदस्त गाणे म्हटले. दोघांना गाणं इतकं आवडलं की 'सागरा प्राण तळमळला' आणि इतर अनेक गाण्यांची फर्माईश नेहरूंनी केली आणि पोरांनी ती म्हटली. 

पंडितजी साश्रूनयनांनी सावरकरांना म्हणाले देखील, "स्वातंत्र्यवीर, हमसे बडी गलती हो गयी, हमने तुमकू बहुत त्रास दिया. अब हम तुमकू भारतरत्न देना चाहते हैं." 

यावर सावरकरांनी [काय पण रत्न आहे असे उद्गार काढून] विनम्रपणे त्यास नकार दिला. म्हणून मग नाईलाजाने नेहरूंनी ते भारतरत्न स्वतःलाच ठेऊन घेतलं. 

हा इतिहास हे चड्डीवाले संघी तुम्हाला सांगणार नाहीत.

- सिमसिम मरुदे
जमात-ए-पुरोगामी टाईम्स कडून प्रमेय चिरडकरसह



Friday, September 25, 2020

काही नाही, इ-शाळा चालली आहे!

प्रसंग एकः

"अरे, मल्हारचं नाव घेतल्यावर मल्हारनी बोलायचं, बाकीचे कशाला बोलताय?"

- हे बोलताना शिक्षिकेने प्रचंड संयम ठेवल्याचं आवाजात आणलेल्या सुलोचनाबाईं इतक्या आर्ततेवरुन स्पष्ट कळत होतं. पण मुलं आर्तता वगैरे समजण्याच्या पलिकडे गेलेली असतात. 

मी शिक्षक झालो नाही तेच बरं आहे. "अरे काय वर्ग आहे की मासळी बाजार?" असं खेकसलो असतो. 

प्रसंग दोनः मराठीचा तास.

"बाई मी भूप राग म्हणून दाखवू?" असं अनेकदा ऐकल्यावर... "हं आता समीर भूप राग म्हणून दाखवतोय हं, ऐका रे सगळ्यांनी समीरचं!" असं "आलीया भोगासी" च्या चालीवर ताई म्हणतात.

मग समीर भूप राग म्हणतो. सगळे टाळ्या वाजवतात. मग समीर म्हणतो, "बाई आमचे आठ राग शिकून झालेत." आता बाईंच्या आणि बाकी औरंगजेबांच्या पोटात गोळा येतो. तरी आणखी एक दोन जणं नरडं साफ करुन घेतातच. एक जण पियानो वाजवतो. कार्टं पियानो वाजवत असताना मला, "बाई मी 'चलो इक बार फिर से, अजनबी बन जायें हम दोनो' म्हणू का?" असं विचारण्याची सुरसुरी येते पण मी ती "असं मुलांच्या वर्गात घुसू नये" असं स्वतःला मनातल्या मनात बजावून आवरतो. 

त्यात आवाज ब्रेक होत असतो. तरी सगळं झाल्यावर एक जण मधेच, "बाई मी अमुक वाजवू?" असं विचारतो. नेमका तेव्हा आवाज ब्रेक होत नाही. त्यामुळे शिक्षिका, "वाजव बाबा!" म्हणतात. आता शिक्षिकेच्या आवाजात हताशपणा दिसू लागतो. पुन्हा आवाज ब्रेक व्हायला लागतो त्यामुळे तो नक्की काय वाजवतो आहे कळत नाही. एक जण, "चायला काय चाललंय" असं वैतागून म्हणतो. तेव्हा नेमका आवाज व्यवस्थित येत असल्याने ते सगळ्यांना नीट ऐकू जातं, आणि "कोरोना जाऊदे आणि हा शाळेत येऊदे मग बघतो" असं तो वाजवणारा मनातल्या मनात म्हणतो.  

तेवढ्यात एक जण, "ताई मला साप खूप आवडतात" असं म्हणतो. इ-शाळा असली, तरी बाई बसल्या जागी दचकतात. तरीही "हो का, वा वा, छान छान" असं म्हणतात. तेवढ्यात कुणीतरी, "ए घाणेरड्यांनो" असं म्हटलेलं स्पष्ट ऐकू येतं. 

सुमारे पावणेचार वाजता "बाई मला भूक लागली मी जेवायला जाते" असं गीता नामक एक कन्या विव्हळते. मागून गीताच्या आईचा पार बाहेरच्या खोलीतून आलेला "पय्चक्" असा आवाजही नीट ऐकू येतो. "अरे गीता असं काय ते करायचं" असं म्हणून बाई तिला जाऊ देतात. जाऊ न देऊन सांगतात कुणाला?!

"आता आपण थांबू" बाई म्हणतात.

"बाई मी एक कविता म्हणून दाखवू?" असं महेश नामक एक पिल्लू म्हणतं. आता मात्र ताईंचा संयम संपतो. "आता महेश कविता म्हणतोय मग आपण थांबणार आहोत आज", बाई ठणकावतात. महेश कविता म्हणत असताना मध्येच कुणीतरी "पॅयँsssssssss" अशी सायरन वाजवतो. महेशची कविता म्हणून संपते, आणि ताई पटकन सेशन संपण्याच्या बटणावर क्लिक करतात.

आणि अशा रीतीने "मराठीचा तास" संपतो आणि माझ्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

© मंदार दिलीप जोशी

टीप: शाळा आणि इतर संदर्भ दिलेले नसले तरी नावं बदलली आहेत.

Thursday, May 7, 2020

गणिती कलोपासनेचा निर्घृण अंत (अर्थात एक न छापताच मागे घेतलेला अग्रलेख)

लहानगा रियाझ सकाळी उठला तो ठो ठो आवाजानेच. त्याचे अब्बू त्याला सांगत होते की तू झोप, बाहेर नेहमीचीच गडबड सुरु आहे. पण निरागस रियाझला त्याची बालसुलभ उत्सुकता स्वस्थ बसू देईना. कालच त्याने खिडकीतून हळूच वाकून तिकडून इकडे येणार्‍या तीन हजार सातशे शहाऐंशी आणि पलिकडे जाणार्‍या पाच हजार आठशे बहात्तर गोळ्या मोजल्या होत्या. सरळमार्गी रियाझ नाईकुला गणिताची आवड निर्माण झाली ती अशी. त्याच्या घरच्यांचं त्याला प्रोत्साहन होतंच. त्याचे अब्बू त्याच्या अम्मीला त्याच्या छोटे छोटे शेणगोळे कसे मोजायचे ते शिकवलं होतं. एकदा एका शेणगोळ्यात अम्मीची पिन अडकली असे समजून निरागस रियाझने ती काढून अम्मीला दिली आणि शेणगोळाच तो असं म्हणून खिडकीतून बाहेर फेकून दिला. पण खालून अचानक मोठ्ठा आवाज झाला आणि अचानक ठो ठो ठो असे लहान आवाज पटापट येऊ लागले. अब्बू म्हणाले ते बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. तेव्हापासून रियाझला गोळ्या मोजण्याची आणि पर्यायाने गणिताची आवड निर्माण झाली. रियाझला चित्रकलेचीही आवड होती ति त्याने कशी जोपासली ते पुढे येईलच.

सनदी लेखपाल असलेल्या याकुब मेमन याचा त्याने आदर्श ठेवला व मोठा झाल्यावर गावातील इतर मुलांनाही गणिताची आवड निर्माण व्हावी असा ध्यास त्याने घेतला. पण फक्त गोळ्या मोजून त्याचे समाधान होईना. प्रत्येक गोष्टीच्या सम....सॉरी.... उगमाशी जायचे बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळाले होते. म्हणूनच आपला उगम कुठून झाला असाही प्रश्न त्याला पडत असे. पण त्याला निर्माण झालेल्या या सायंटेफिक टेंपरबद्दल पुन्हा केव्हातरी. तर, त्या गोळ्या येतात कुठून आणि सोडल्या जातात कुठून याचा शोध घ्यायचे त्याने ठरवले. मुळातच काश्मीरी जनता परस्पर सहकार्यासाठी प्रसिद्ध. तेव्हा त्याच्या या शिक्षणाची जबाबदारी गावातील जेष्ठांनी घेतली व बाहेरून काही शिक्षक मागवले. त्या शिक्षकांनी रियाझला बंदूक म्हणजे काय, त्यातून गोळ्या कशा बाहेर पडतात, त्या माणसाला लागल्यावर काय होते, त्या का चालवाव्यात वगैरे आवश्यक आणि फुटकळ माहिती दिली.  काश्मीरी लोकांचे आणि या बाहेरून आलेल्या शिक्षकांची सामाजिक जाणीव आपल्याला वाखाणलीच पाहीजे. कारण बाहेरचे निष्ठूर जग पदोपदी धनाची हाव ठेऊन पैसे मागत असताना आणि समाजकार्याचीही किंमत वसूल करत असताना रियाझला निर्माण झालेल्या बालसुलभ उत्सुकता शमवायला व त्याच्या गणिती ज्ञानार्जनासाठी दिलेल्या या शिक्षणासाठी मात्र त्या अमूर्त निर्गुण निराकार इंटानॅशनल शाळेच्या शिक्षकांनी एकही पैसा घेतला नाही. उलट बाहेरून आलेल्या या शिक्षकांनी त्याच्या अब्बू आणि अम्मीला या दिव्य कार्यासाठी तुमचा रियाझ आता आमचा (विद्यार्थी) झाला असे सांगून स्वतःहून पैसे दिले. 

रियाझला चित्रकारही व्हायचं होतं हे आपल्याला विदीत आहेच. विशेषतः गुलाबाच्या पाकळ्यांचे चित्र काढून त्यात लाल रंग भरायला त्याला फार आवडत असे. पण आपली ही आवड जोपासत असताना खूप वेळ वाया जात आहे असे त्याच्या लक्षात आलं. तसेच फक्त वेडीवाकडी चित्रे काढून देशविदेशात प्रदर्शने भरवण्यातही त्याला रस नव्हता. यावर त्याच्या शिक्षकांनी त्याला एक नामी युक्ती सुचवली. निर्जीव कागदावर त्याहून निर्जीव रंग भरण्यापेक्षा त्याने त्याच्या गणिती ज्ञानाच्या ध्यासापोटी मिळवलेले गोळ्या सोडायचे ज्ञान वापरून सजीव माणसांतच लाल रंग भरावेत असे त्यांनी सुचवले. मग सुरु झाला रियाझचा गणिती कलोपासनेचा रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रवास.

हळूहळू रियाझ मोठा होत होता. त्याला आता मिसरुड फुटलं होतं. आता रियाझचं गणित इतके पक्के होऊ लागले होते की तो दुसर्‍यांच्या बंदुकीतून सुटलेल्या गोळ्याच काय त्याने स्वतः बंदुकीतून सोडलेल्या गोळ्या देखील त्याला मोजता येऊ लागल्या होत्या. आता त्याच्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेने शिक्षक पाठवायचे कमी करुन पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझर पाठवणे सुरु केले होते. त्या पर्यवेक्षकांना रियाझची गोळ्या मोजण्याची विलक्षण बुद्धीमत्ता खूप भावली, कारण त्यांनी गणिती सरावासाठी तसेच प्रत्यक्ष प्रयोगासाठी पुरवलेल्या गोळ्यांचा हिशेब त्यांना शाळेच्या मुख्याध्यापकांना देणे सोयीचे ठरू लागले. परिणामी शिक्षण व प्रत्यक्ष प्रयोगाकरता शाळेने करावयाचा पुरवठा भरमसाठ वाढला. 

रियाझने आता तारुण्यात पदार्पण केलं होतं. नाकाखाली असलेल्या मिसरुडाबरोबर तो आता हनवटीवरही डौलदार दाढीसंभार बाळगू लागला होता. रियाझने आता अनेक मुलांना आपल्या पंखाखाली घेऊन त्यांच्याही अनौपचारिक शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. कधी तो एकटाच तर कधी त्या मुलांन घेऊन तो इंटरनॅशनल शाळेत शैक्षणिक सहलींन जात असे. हळुहळू रियाझने आपल्यासारखे अनेक जण गणितात तयार केले. पण आता त्या शाळेला रियाझने पुस्तकी ज्ञानातले लक्ष कमी करुन प्रत्यक्ष प्रयोगांकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे वाटू लागले. रियाझही एव्हाना फक्त थिअरीला कंटाळला होताच. रियाझचे शिक्षक ज्या शाळेतून यायचे त्या शाळेची एक शाखा होती हिजबुल मुजाहिदीन अर्थात पवित्र योद्धे. या शाखेच्या प्रमुखपदी त्याची नेमणूक करण्यात आली. आता त्याने भारतीय बंदुकधारी सैन्य, इतर नागरिक, दुकानदार, अशा सजीवांसमोर आपल्या गणिती कलोपासनेचे रक्तरंजित....सॉरी हं.....रंगरंजित प्रयोग सुरु केले. 

पण २००२...सॉरी...२०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांनंतर कलेचा व गणिताचा र्‍हास सुरु झाला व सायंटेफिक टेंपर नसलेल्यांची चलती सुरु झाली. आपल्याकडे असहिष्णुता तेव्हापासूनच आणखी वाढली. याचेच पर्यावसान आधी बुरहान वाणी नामक मुख्याध्यापकपुत्राच्या प्राणोत्क्रमणात झाले. पण एवढ्यावर समाधान मानतील ते भारतीय बंदुकधारी सैन्याधिकारी कसले. रियाझ नाईकूला आपल्या कलेचे प्रात्यक्षिक आपण कसे दाखवले याचा व आपल्या गणिती ज्ञानाचा व कलोपासनेचा साप्ताहिक हवाल त्याला आपल्या निर्गुण निराकार इंटरनॅशनल शाळेच्या शिक्षकांना शुक्रवारी नजिकच्या प्रार्थनास्थळात द्यावयाचा होता. पण आधी काहीतरी भव्यदिव्य कार्य ताबडतोबीने करावयास हवे म्हणोन तो बुधवारी बाहेर पडला आणि घात झाला. तो कुठे आहे याचा सुगावा सैन्याला लागला व त्याला भारतीय बंदूकधारी सैन्याने त्याच्याच कलोपासनेचे प्रयोग त्याच्यावरच करुन त्याला या भौतिक जगातून कायमचे नाहीसे केले. 

जा रियाझ जा, या जगात, ज्या देशात तुझ्या कलेची कदर नाही अशा देशात राहून अवहेलना झेलण्यापेक्षा त्या तुझ्या निर्गुण निराकार निर्मात्याकडे जा. तिथे तुझ्या गणिती कलोपासनेचे तुला निश्चितच बक्षिस मिळेल. तुझे गणित चांगले असल्यामुळे तुला बहात्तर पर्यंत आकडे नक्की मोजता येतील असा आम्हाला विश्वास आहे. तुझा उगम कुठे झाला हे ही तुला तिथेच समजेल. 

#वक्रोक्ती #Sarcasm

 

Riyaz Naikoo Encounter: Hizbul Mujahideen Chief Riyaz Naikoo, Most ...


© पिरिष गूबेर (मंदार दिलीप जोशी)

Wednesday, September 6, 2017

मोबाईल, बायको, पर्स, आणि आपण

मनुष्यास स्थितप्रज्ञ या पातळी पर्यंत पोहोचायचे असल्यास दोनच मार्ग उपलब्ध आहेत.

एक साड्यांच्या दुकानात सेल्समनची नोकरी करावी आणि दुसरा म्हणजे आठवड्यातून एकदा बायकोच्या किंवा आईच्या ज्या पर्समधे मोबाईल वाजतोय त्याच पर्समधून फोन वाजायचा थांबायच्या आत काढून पलिकडच्या माणसाला हेलो म्हणून दाखवण्याचा सराव करावा.

साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे अवघड वाटत असल्यास दुसर्‍या पर्यायाचे अवलोकन करा.

मोबाईल फोन हा घरी असताना पर्समधे का ठेवला जातो हे मला न उमगलेलं कोडं आहे. आणि ठेवला तर ठेवला तो नवरे लोकांना का काढायला सांगतात हे दुसरं कोडं.

आधीच पर्समधे इतक्या वस्तू असतात की फोन वाजला की आकाशवाणी झाल्यासारखा अष्टदिशांनी आवाज येतोय असं वाटत राहतं. मग आपण घराच्या आकारमानानुसार स्वयंपाकघर, दिवाणखाना, बेडरूम, इतकंच काय बाथरूम सुद्धा फिरून येतो. नेमका कुठल्या पर्समधे फोन ठेवलाय हे आठवलं आणि मोबाईल शोधायला पर्स उघडली तर त्यातल्या पिना, पेन्सिली, एक बॉलपेन, एक मार्कर पेन, एक शाळेच्या काळापासून जपलेलं शाईचं पेन, लिप बाम, पेन बाम, खडू, मुलांचे क्रेयॉन, आपण मोबाईल शोधायला आत हात घालताच बोटांचा कचकावून चावा घेत मिटणार्‍या केसांच्या जादुई क्लिपा, टोकदार कानातली, गळ्यातले साधे, मोत्याचे, अमेरिकन असे वगैरे किमान चार पाच प्रकारची गळ्यातली, शँपूची पाकिटं, घरापासून किमान १० किलोमीटरवर असणार्‍या लेडीज टेलरच्या दोन अश्मयुगीन पावत्या, आधी हात आणि मग बेसावध राहिल्यास आपलंच तोंड काळं करणारी काजळाची कांडी, पॉकेट श्रीमद्भगवतगीता (बेटा, तुम्हारा इस पर्स में क्या है? जो था वो कल नहीं रहेगा, जो नहीं था वो कैसे मिलेगा, वगैरे), स्क्रू ड्रायव्हर (हो, हा पण निघाला होता एकदा. कशाला काय विचारता? नवर्‍याचे स्क्रू टाईत करायला ख्या ख्या ख्या), आणि आपण पर्समधे हात घातलाय की मुंग्यांच्या वारुळात असा प्रश्न डावा अशा वस्तू म्हणजे सुटे मोती, वावडिंग, बॉल बेअरिंग, वेलची, लवंगा इत्यादी वस्तूंचे अडथळे पार करुन मोबाईल पर्यंत पोहोचेपर्यंत तो वाजायचा बंद झालेला असतो.

ह्या, त्यात काय, कोणाचा आहे ते पाहून परत फोन करु असं आपण म्हणतो आणि कॉल हिस्टरीत जातो. नेमका तो नंबर साठवलेला नसतो. मग बायको, "काय हो, तुम्हाला इतकं नाही जमत!" असं म्हणत हातातून मोबाईल घेते आणि त्या नंबरला बिंधास्त फोन लावते. तो नेमका तिच्या बालमैत्रिणीने घेतलेला नवा नंबर असतो. "बघा, इतक्या वर्षांनी केलाय पमीने फोन, मी लावला नसता तर आणखी किती काळाने तिने केला असता कोण जाणे" असं आपल्याला पुन्हा ऐकावं लागतं.

नेमका अशा वेळी आपला फोन वाजतो आणि पलिकडे बायकोची सासू किंवा आपली सासू यांच्यापैकी एक जण असते. आपल्याला मोबाईल तिसरा हात असल्यासारखा जवळ ठेवायची सवय असल्याने उचलावाच लागतो आणि बायकोच्या बालमैत्रिणीशी (तिच्या - आपलं नशीब कुठलं इतकं चांगलं? - तिच्या) गप्पा संपेपर्यंत आपल्या फोनवर पलिकडे आपली सासू असल्यास "तुमची मुलगी कित्ती दमते हो कश्शा कश्शाला म्हणून वेळ नसतो तिला" अशी कौतुकं सांगत आणि बायकोची सासू असल्यास पटकन विषय बदलत "अगं आई आज मन्याने काय कमाल केली माहित्ये शाळेत" या ट्रॅकवर गाडी नेत काही वेळ काढावा लागतो. सुमारे असंख्य मिनीटांनी बालमैत्रिणीशी बोलून झाल्यावर बायको फोन ठेवते आणि आपली सासू असल्यास, "अहो काय हे, आधी नाही का सांगायचं आईचा फोन होता. काहीतरी महत्त्वाचं बोलायचं असेल म्हणून इतका वेळ थांबली ती! आता तिची औषधांची वेळ आहे, उचलेल की नाही कोण जाणे फोन, काय बरं काम असेल?!" असं म्हणत फोन लावते आणि तिची सासू असल्यास, "दमले बाई, उद्या सकाळी लगेच करते फोन, आता झोपल्याही असतील सासूबाई" असं म्हणत सुस्करा सोडते.

स्थितप्रज्ञ होण्याकरता साड्यांच्या दुकानात सेल्समन होणे त्यापेक्षा सोपं वाटू लागतं.

-----------------------------------------------------------------
या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी