Tuesday, October 20, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: खुनशी ज्योती बसू

भारताचे एक प्रसिद्ध जलतरणपटू होते मिहीर सेन. त्यांचा एक कपड्यांचा कारखाना होता. साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी त्यांचा प्रचार करण्याचा आग्रह केला. मिहीर सेन यांनी आपण भांडवलशाहीचे समर्थक असल्याचं सांगत त्यांना नकार दिला. ज्योती बसू नाराज झाले.

या नंतर मिहीर सेन यांच्या कारखान्यात कामगारांच्या कटकटी सुरू झाल्या. बघता बघता ते दिवाळखोरीत निघाले. याची परिणिती म्हणून त्यांना स्मृतिभ्रंश झाला आणि ११ जून १९९७ वयाच्या ६६व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. याचा जबर धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी पाच वर्षांनी मरण पावल्या.

त्यांच्या मुलीने काही सांगितलेल्या या आठवणी सोबत जोडलेल्या फोटोत.

🖌️ मंदार दिलीप जोशी

Monday, October 19, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: स्वातंत्र्य आणि आझादी यातला फरक - स्पार्टाकस

आज स्पार्टाकस या सिनेमाबद्दल बोलूया. स्पार्टाकस ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. रोमन साम्राज्यात गुलाम असलेल्या स्पार्टाकसने इतर गुलामांना उचकावून सोबतीला घेऊन बंड केलं आणि अनेक विजयही मिळवले. वेगळं राज्य स्थापन केल्यावर ते टिकवायला जी दृष्टी लागते ती नसल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, पण तो सरते शेवटी रोमन साम्राज्याकडून पराभूत झाला आणि त्याला क्रॉसवर लटकवलं गेलं.

Spartacus

त्याकाळी गुलाम विकले जायचे आणि त्यांना पैसे देऊन स्वतंत्र सुद्धा केलं जाऊ शकायचं. शेवटच्या दृश्यात स्पार्टाकसच्या पत्नीला असंच स्वतंत्र केलं गेलं आहे आणि ती त्यांच्या बाळाला घेऊन क्रॉसवर लटकावलेल्या स्पार्टाकसचा निरोप घ्यायला आली आहे. मृत्यूच्या जवळ जात असलेल्या स्पार्टाकसला ती त्यांचं बाळ दाखवत म्हणते की बघ स्पार्टाकस, हा तुझा मुलगा आहे, आणि तो स्वतंत्र आहे. हे दृश्य इतक्या प्रभावीपणे चित्रित करण्यात आलं आहे की ती हे बोलत असताना त्या बाळाच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळेच आनंदी भाव दिसल्याचा भास झाला, जणू त्याला कळत होतं काय चाललंय ते.

स्वतंत्र असणं म्हणजे काय, ते या दोन मिनिटांच्या दृश्यात समजतं. पूर्ण सिनेमा बघितला होता, त्यामुळे हे दृश्य जास्तच परिणाम करून गेलं. पहिल्यांदा बघितल्यावर जो आणि जसा परिणाम माझ्यावर तेव्हां झाला होता तसाच आजही होतो.

स्पार्टाकस सिनेमा याच नावाच्या कादंबरीवर बेतला होता. सिनेमाची पटकथा आणि कादंबरी या दोन्हीचे लेखक होते हॉवर्ड फास्ट. अत्यंत यशस्वी लेखक असलेल्या हॉवर्ड यांना साहित्य आणि सिनेमा क्षेत्रात खूप मागणी होती, आणि या मागणीची किंमत ते पुरेपूर वसूल करत असत. आपल्या आयुष्यात त्यांनी खूप वैभव कमावलं आणि ऐशआरामात जगले. आता कष्ट केले की त्याचे पैसे मिळायलाच हवेत, पण मग हे मुद्दाम सांगायचं प्रयोजन काय? तर, हॉवर्ड फास्ट साहेब घनघोर साम्यवादी अर्थात कम्युनिस्ट होते. पण नंतर स्टालिनची कृष्णकृत्ये पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला.

आपल्या The Naked God: The Writer and the Communist Party आत्मचरित्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं ― There was the evil in what we dreamed of as Communists: we took the noblest dreams and hopes of mankind as our credo; the evil we did was to accept the degradation of our own souls—and because we surrendered in ourselves, in our own party existence, all the best and most precious gains and liberties of mankind—because we did this, we betrayed mankind, and the Communist party became a thing of destruction.

स्पार्टाकस सिनेमा तिकीटबारीवर अत्यंत यशस्वी ठरला, आणि त्याला चार ऑस्कर पुरस्कारही मिळाले. आलम दुनियेतल्या कम्युनिस्टांनी स्पार्टाकसला आपला हिरो, आपला आयकॉन बनवला नसता तरच नवल होतं. आजही स्पार्टाकस वामपंथी लोकांसाठी आयकॉन आहे. डाव्यांनी या कादंबरीचा अनेक भाषांत अनुवाद देखील करवला. भारतात 'अमृतराय' यांनी त्याचा 'आदिविद्रोही' नावाने हिंदीत अनुवाद केला आणि तो डाव्यांच्या 'हंस प्रकाशनाने प्रकाशित केला. नेटवर शोधल्यास पीडीएफ चकटफू उपलब्ध आहे, त्यात हॉवर्ड फास्ट साहेबांचे रसभरीत गुणवर्णन केलेलं आहे. त्यात त्यांच्या कलाकृतींचा उल्लेखही आहे, पण उल्लेख गायब आहे तो त्यांच्या ऐशआरामी आयुष्याचा. इतकंच काय, त्यांच्या - द नेकेड गॉड या आत्मचरित्राचाही उल्लेख केलेला नाही. आश्चर्य वाटलं? नाही, कदाचित उल्लेख केला असता तरच आश्चर्य वाटलं असतं. संपूर्ण सत्य सांगतील तर ते कम्युनिस्ट कसले?

या सगळ्याचं सार इतकंच की वामपंथ आणि प्रत्येक वामपंथी हा गुलामीचा कडवा विरोधक असतो, पण हे त्यांचे निव्वळ दाखवायचे दात असतात. नाहीतर त्यांनी 'प्रत्येक मनुष्य हा त्या दयाळू शांतीदेवाचा गुलाम आहे' हे सांगणाऱ्यांना पाठिंबा दिला नसता. जी विचारधारा स्वतःला त्यांच्या शांतीदेवाची आणि त्या शांतीदेवाचा प्रेषित मानणाऱ्या व्यक्तीची गुलाम मानते, आणि स्वतःसकट पूर्ण जगावर ती गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असते, त्याच विचारधारेची पाठराखण हे गुलामीचे स्वघोषित विरोधक डावे कसे काय करू शकतात?!

१९४७ साली आपण 'स्वतंत्र' झालो, आपल्याला 'आझादी' नाही मिळाली ― ती मिळाली पाकिस्तानला, जिथे त्याच विचारधारेची सत्ता आहे.

आपला वारसा स्वातंत्र्याचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेला देवी मानून लिहिलं ―
जयोsस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे।
स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुतां वंदे।

हिंदुत्वाची अधिष्ठात्रीच मुळात स्वतंत्रता आहे. आपण स्वतंत्र आहोत, राहू, आणि आपला देशही स्वतंत्र राहील आणि ते राखणे हेच आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आम्ही ईश्वराला मानतो, आपापल्या इष्टदेवतेचे आम्ही भक्त आहोत, आणि कुणाला देव मानायचा नसेल तर तसे न मानायलाही स्वातंत्र्य आहे.... पण गुलाम किंवा बंदे नाही म्हणजे नाहीच!

जाता जाता, स्पार्टाकसच्या त्या प्रसिद्ध शेवटच्या दृश्याची ही लिंक, अवश्य पाहून घ्या. ही लिंक काम करत नाहीशी झाली तर हे दृश्य युट्युबवर कुठेही या सिनेमाच्या व्हिडिओवर उपलब्ध असेलच. 

🖌️ मंदार दिलीप जोशी


Wednesday, October 14, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: एका मृत्यूलेखाची(!) चिरफाड

सर्वप्रथम मार्क्सवासी झालेल्या मार्क्सवादी कम्युमिस्ट पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्या दातार बाईच्या आत्म्याला (असलाच तर) कम्युनिस्टेश्वर शांती किंवा सद्गती देवो अशी प्रार्थना.

Marxist Communist Party of India leader Usha Datar

ही पोस्ट वाचण्याअगोदर (१) आणि (२) हे दोन लेख वाचा, पार्श्वभूमी समजायला सोपं जाईल; किंवा पोस्ट वाचल्यावर वाचा, तरीही चालेल. या दोन बहिणी आणि त्या दोन बहिणींच्यात साम्य दिसू शकेल. फरक इतकाच, की त्यातल्या एकीला उपरती झाली पण बाटगे जोरात बांग देतात या उक्तीनुसार आयात तत्वज्ञानाने आंधळे झालेल्या एत्तद्देशीय कम्युनिस्टांना आणि फेमिनाझी मंडळींना कधीच होणार नाही.

ही बातमी म्हणजे फक्त मृत्यूबद्दलची बातमी नाही तर मेंदूची कवाडे उघडी ठेवल्यास कम्युनिस्ट (साम्यवादी) आणि स्त्रीवादी चळवळीचा भंपकपणा आणि धोका समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त अशी बातमी आहे. 

(१) कला क्षेत्रातील कम्युनिस्ट प्रभावः या बाईंच्या बहिणीचे लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या.

आता "नाटककार" व "विचारवंत" हा एकच माणूस कसा असू शकतो? हा एक भयंकर मोठा विनोद आहे. कारण हे म्हणजे बद्धकोष्ठ आणि जुलाब यांच्यावर घेतली जाणारी औषधे एकदम घेतल्यासारखे आहे. तर ते असो. 

(२) या सगळ्या कम्युनिस्ट आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या सगळ्यात आधी अत्यंत सुस्थितीतील किंवा श्रीमंत पुरुषांशी स्वतःचं लग्न वगैरे उरकून मोकळ्या होतात, मुलं वगैरे होऊ देतात आणि मग इतर भोळ्याभाबड्या (की बावळट) तरुण पिढीला, प्रामुख्याने तरुणींनाच, पुरुषी वर्चस्ववाद (patriarchy) वर दुगाण्या झाडणारी प्रवचने देऊन त्यांची आयुष्य नासवायची कामे करायला सुरुवात करतात. त्याला फोडणी म्हणून #SmashBrahminicalPatriarchy असेल तर आणखी उत्तम. 

म्हणजे:

  • पुरुष कसे वाईट!
  • लग्न काय फक्त मुलं होण्यासाठी करायची का? 
  • मुलगा आणि मुलगी समान आहेत तर इतक्या मुली का होऊ द्यायच्या?
  • बायका म्हणजे काय मुलं होण्याचा कारखाना आहेत का?
  • मुळात लग्नच कशाला करायचं?
  • तुमचं शरीर ही तुमची मालमत्ता आहे तिचा उपभोग कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं (ma life ma body) - यात आयरनीच्या देवाला वाहिलेली ठिणगी म्हणजे म्हणजे पुरुषी वर्चस्ववादाला झुगारुन द्यायची भाषा करायची आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देऊन स्वतःचं शरीर कुणालाही वापरू द्यायला प्रोत्साहन द्यायचं हे यांचं धोरण.

पार्श्वभूमी समजली असेल तर आता मूळ बातमीकडे वळूया. या बाईंच्या बहिणीचं लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या. त्यांच्या प्रभावाने या दातार बाई सुद्धा "पुरोगामी" चळवळीत काम करु लागल्या. 

आता दैवदुर्विलास बघा. सर्वसाधारणपणे जुन्या काळी आपल्याला असं दिसतं की पहिली मुलगी झाली तर मुलगा होण्यासाठी आणखी दोन किंवा तीन 'चान्स' घेतले जायचे. त्यामुळे आपल्याकडे तीन बहिणीच असणे किंवा तीन किंवा चार बहिणींच्या पाठीवर एक भाऊ हे सर्रास होतं. जुन्या काळातली सामाजिक परिस्थिती वेगळी असल्याने मी यावर चांगलं किंवा वाईट अशी कोणतीच टिप्पणी करणार नाही. पण याला प्रतिगामी, बुरसटलेले विचार, पुरुषी वर्चस्ववादाचं प्रतीक वगैरे हिणवणार्‍या आणि मुख्य म्हणजे उठल्या बसल्या जेन्डर इक्वालिटीच्या (gender equality) गप्पा ठोकणार्‍या 'पुरोगामी' लोकांनीही त्याच वाटेवर जावं हे डाव्या/कम्युनिस्ट लोकांचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल. कारण त्या काळात दातार बाईंनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते, म्हणजेच  त्या काही अगदीच अडाणी अशिक्षित नव्हत्या. तरीही 'स्त्री मुक्ती' चळवळीत सक्रीय असलेल्या या पुरोगामी बाईंना तीन मुली असणे म्हणजे आपण 'हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला' या म्हणीचे ठळक उदाहरण आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण' ही म्हण वापरणार होतो पण कम्युनिस्ट लोकांचा ब्रह्म वगैरे गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांना हे कितपत झेपेल याची शंकाच आहे.

तर, पैसेवाले नवरे गटवायचे, व्यवस्थित मुलं वगैरे होऊ द्यायची - थोडक्यात स्वतःची आयुष्य व्यवस्थित स्थिरस्थावर वगैरे करुन घ्यायची आणि मग आपल्या सडलेल्या डाव्या, कम्युनिस्ट विचारांनी समाजाला नासवायला सुरवात करायची. लोकांना दाखवायला घरकामगार संघटना, बालहक्क हक्क लढा, दारुमुक्ती आंदोलन वगैरे जोडधंदे करायचे. 

आणि एके दिवशी मरायचं आणि "वैकुंठ" नामक स्मशानभूमीत "अंत्यसंस्कार" करुन घ्यायचे. 

अनेक बाबी वैय्यक्तिक म्हणून सोडून दिल्या तरी देहदान करायला हरकत नव्हती, जुन्या काळच्या ग्रॅज्युएट व्यक्तीला मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र या बाबतीत माहिती नसेलच असे नाही. म्हणजे हे लोक मरतानाही आपला भंपकपणा दाखवायला कमी करत नाहीत. शेवटी 'वैकुंठ' नामक ठिकाणी 'अंत्यसंस्कार' करुन घेतलेच ना?!

आहे की नाही गंमत?!

असो. good communist is a dead communist हे मात्र खरं.

© मंदार दिलीप जोशी
अधिक अश्विन कृ १२, शके १९४२

Monday, October 12, 2020

छोटे स्थानिक व्यवसाय आणि आपण: हिंदू अर्थव्यवस्था - भाग ३

Keep it Simple, Stupid!

तंत्रज्ञानाचा वापर या अनुषंगाने एक वेगळा मुद्दा मांडू इच्छितो. तुम्ही व्यवसाय करताना तंत्रज्ञानाचा उपयोग करत असलात तर गोष्टी साध्या सोप्या ठेवा. संभाव्य गिर्‍हाईकांना तुम्ही तंत्रज्ञान वापरून बनवलेल्या संकेतस्थळे किंवा अ‍ॅप वापरताना आरामात खरेदी करता आली पाहीजे. 

दोन अनुभव सांगतो. माझा एक परिचिताचा सेंद्रीय शेती व शेतमाल विक्रीचा व्यवसाय आहे. आता एका शहरात व्यवसाय करायचा म्हटल्यावर अमुक ठिकाणी विक्री होणार इथवर ठीक आहे, पण आता ही ठिकाणे ठरणार कशी, तर आजूबाजूच्या लोकांचा अंदाज घ्यायचा, पुरेशी लोकं सेंद्रीय शेतमाल घ्यायला तयार असली की त्यांनी मागणी नोंदवायची, मग ते ठिकाण ड्रॉप पॉइंट ठरणार. हे किती कटकटीचं आहे! एक तर हा सेंद्रीय शेतमालाची किंमत जास्त, लोकं याकडे आकर्षीत कशी होणार? त्यापेक्षा सरळ ट्र्क घेऊन सोसायटीच्या बाहेर यायचं, ज्याला घ्यायचं तो घेईल. शिवाय भाजी घेताना समोर ज्या भाज्या दिसतील त्यापैकी माणूस ठरवतो कुठल्या घ्यायच्या ते. काही दिवस आधी यादी तयार करुन मग भाज्या नाही घेता येत. 

पण नाही, आमच्या सोसायटीसाठी व्हॉट्सप ग्रूप बनवून झाला आणि एकही प्रतिसाद आला नाही. गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यावर कोण प्रतिसाद देणार? लोकांनी किंमतीची कारणे सांगून काढता पाय घेतला.

दुसरा अनुभव. तोच परिचित. कोकणी व इतर स्वदेशी उत्पादनांसाठी एक अ‍ॅप बनवण्यात आलं. म्हटलं बरं झालं आता अ‍ॅप हाताशी असेल तर उत्तम. पण हाय रे कर्मा. आधी अ‍ॅप डाऊनलोड करायचं, मग त्यात नाव, पत्ता, फोन ही माहिती भरायची. इथवर ठीक. पण मग तुम्ही राहता त्या भागातला 'प्रतिनिधी' तुमच्याशी संपर्क साधणार आणि तुम्हाला अ‍ॅपचा अ‍ॅक्टिव्हेशन कोड देणार. मग तुम्ही अ‍ॅप वापरू शकता. पण का ही गुंतागुंत पुन्हा? अ‍ॅमॅझॉन किंवा इतर अ‍ॅप्स सारखं सोपं का नाही बनवता येत? एक तर पत्ता नोंदवायचा असतोच, तिथे राज्य आणि शहरांचे ड्रॉप-डाऊन बॉक्स आहेतच (जिथे तुम्ही वस्तू पोहोचवू शकता त्याची मर्यादा तिथेच वापरकर्त्याला दिसते), त्यामुळे त्या त्या विभागातल्या प्रतिनिधीने अ‍ॅपचा अ‍ॅक्टिव्हेशन कोड देण्यात काहीही अर्थ नाही. फार फार तर अ‍ॅटोमेटीक पाठवता येणारा ओटीपी ठीक. पुढे काही समस्या आल्यास प्रतिनिधीशी संपर्क साधणे ठीक, पण अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट करायला प्रतिनिधीने फोन करण्यात काय हंशील?

म्हणजे आधी अ‍ॅपशी मारामारी करा, मग फोन येणार तो सुद्धा वाट्टेल तेव्हा, मग अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हेट होणार. मग वस्तू दिसणार. मग त्या मागवणार. कशाला हे सव्यापसव्य? सरळ अ‍ॅप डाऊनलोड करुन हव्या तितक्या डिव्हाईसेसवर इन्स्टॉल करुन एकच खातं तयार करुन हवं तेव्हा ऑर्डर करण्याची सोय देणं इतकं अवघड आहे का? 

हे इतकं पोटतिडकीने लिहीण्याचं कारण म्हणजे बाबांनो संभाव्य ग्राहकांकडे ऑनलाईन खरेदी करताना वेळ आणि संयम अजिबात नसतो. त्यात तुम्ही अशा पद्धतीने गोष्टी गुंतागुंतीच्या करुन ठेवल्यात तर लोक वैतागून नाद सोडून देतात.

म्हणूनच तंत्रज्ञान वापरणार असाल तर गोष्टी साध्या, सोप्या, आणि खरेदीसाठी सुलभ ठेवा. तरच लोक तुमच्या उपक्रमाकडे आकर्षित होतील. 

थोडक्यात Keep it Simple, Stupid! 

🖋️  मंदार दिलीप जोशी

ता.क. इथे stupid हे व्यक्तीला नसून वृत्तीला म्हटले आहे. तेव्हा राग मानू नये. 

भाग १भाग २

Monday, October 5, 2020

मालिका आणि जाहिरातींतून केलं जाणारं ब्रेनवॉशिंग

कीर्तन ऐकून कुणी संत होत नाही आणि सिनेमा आणि मालिका बघून वाया जात नाही अशा लाडक्या ओळी आळवणार्‍यांनी ही खरी गोष्ट वाचा. 

माझ्या परिचयाच्या एक काउन्सिलर आहेत. फेसबुक फ्रेंड आहेत व नंतर त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट झालेली आहे. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे ही माझा नेहमीचा त्रागा किंवा बाजारगप नाही. अजूनही असे किस्से ऐकले आहेत, पण हा एका समुदेशकाकडून प्रत्यक्ष ऐकल्याने मांडतो. 

अग्गंबाई सासूबाई इफेक्ट -
सप्टेंबर २०२० मधली गोष्ट आहे. एका वयस्कर बाईंशी त्यांचं फोनवर बोलणं होत असे. आपण त्यांना मिसेस क्ष म्हणूया. तर मिसेस क्ष यांना दोन मुली, दोन्ही लग्न होऊन अमेरिकेत. २ वर्षांपूर्वी मिसेस क्ष यांच्या नवर्‍याला देवाज्ञा झाली. अमेरिकेत सुद्धा मराठी वाहिन्या दिसतात, त्या बघून मुलींचा यांना सल्ला की आई तू लग्न कर. आम्ही इथे लांब आहोत, आमचा काहीच प्रश्न नाही. घर, संपत्ती वगैरेंचं तू काहीही कर, आम्हाला काहीही नही दिलंस तरी चालेल. 

हे सतत ऐकून मिसेस क्ष हैराण आहेत. त्यांचं म्हणणं असं की त्यांचा संसार खूप चांगला झाला. मान्य आहे की या वयात सोबत हवीशी वाटते, एकटेपणा जाणवतो. त्यासाठी नोकरीकरणार्‍या मुली पेइंग गेस्ट म्हणून ठेवू शकते. पण सतत लग्न कर लग्न कर हा लकडा कशाला लावायचा. अरे मला नाही करायचं लग्न. म्हातारपणातला एकटेपणा घालवायला लग्न किंवा  त्याच अर्थाची सोबत हवी हे सतत ऐकून वैताग आला आहे! पुन्हा लग्न न करणं हा माझा वैयक्त्तिक निर्णय आहे, तुम्हाला माझी काळजी घ्यायचा कंटाळा आला असेल तर थकल्यावर वृद्धाश्रमात जाऊन राहीन. 

खूप बोलत होत्या. समुपदेशक बाईंनी सांगितलं की त्या खूप बोलत होत्या. समुपदेशक बाईं म्हणाल्या ते ही पटण्यासारखं आहे, की आईच्या एकटेपणाची इतकी काळजी वाटते तर एका मुलीने यावं भारतात परत, घ्यावी आईची काळजी. मुलगी, नातेवंडे सोबत असली की एकटेपणा कुठल्याकुठे पळून जाईल.

अग्गंबाई सासूबाई मध्ये विषय काय, मांडतात काय! प्रेक्षकांत कुणी अशी एकटी माणसे असतील तर त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा विचार नाही. उतारवयात लग्न करुच नये असं नाही, पण ते इतक्या जोरकसपणे ठसवलं जात आहे की उपरोक्त मिसेस क्ष यांच्या मुलींसारखे लोक मालिका  पाहून आईवडिलांना पिडत बसतात. 

आता कोलगेटच्या जाहिरातीकडे वळू. याबद्दल बोलावं असं वाटत होतं पण पुन्हा भावनेच्या भरात वाहून जाणारे लोक विषय आणि वस्तुस्थिती समजून न घेता, "उतारवयात सोबत असली तर गैर काय" अशी तलवार घेऊन येतील म्हणून बोललो नव्हतो. पण पुन्हा त्याच समुपदेशक बाईंची पोस्ट मदतीला धावून आली. म्हटलं आपलेच विचार एक अनुभवी समुपदेशक मांडत असेल तर त्याला अर्थातच वैधता प्राप्त होते. गेले कित्येक दिवस हॅमर केल्या जाणार्‍या त्या कोलगेट टूथपेस्टच्या जाहीरातीत एक वयस्कर बाई आपल्या मुला-बाळांसह एका रेस्टॉरंटमध्ये बसली आहे. तिथे एक वयस्कर माणूस येतो आणि तिच्या खांद्याभोवती हात वेढून उभा राहतो. मुलं चमकतात. ती हातातली अंगठी दाखवून सूचित करते की लग्न/साखरपुडा उरकला आहे. त्यावर मुलांना आश्चर्य वाटण्याऐवजी ती एकदम खूष होतात. 

म्हणजे कुणी कोणत्या वयात लग्न करावं हा माझ्या चर्चेचा विषय नाहीच. पण वाढत्या वयात सोबत म्हणून लग्न हा एकमेव पर्याय असल्याचं वेगवेगळ्या माध्यमांतून ठसवलं जातंय आणि जनता त्यातल्या 'उदात्त' वगैरे भावनांनी उचंबळून येत आहे. 

ज्याची जी गरज तो ते वागेल, त्यात आक्षेप, हरकत घेण्यासारखं नाही हे सांगायला, शिकवायला हवंच. ती काळाची गरज आहे. 

पण हे असं फसवं उदात्तीकरण आणि प्रचार कशाला? इतकी आपल्या आई-वडिलांची किंवा इतर वयस्कर नातेवाईकांची काळजी असेल तर काढा थोडा वेळ त्यांच्यासाठी, न्या त्यांना आपल्याबरोबर बाहेर फिरायला, जेवायला, ललित कार्यक्रमांना. एखादा रविवार घरी घालवा त्यांच्या संगतीत, त्यांना आवडतात त्या गोष्टींत वेळ घालवा त्यांच्याबरोबर. लग्न-लग्न काय लावलंय? तरूण माणसांना सांगायचं 'लग्न हे आयुष्याचं अंतिम ध्येय नसतं' वगैरे आणि वयस्कर माणसांना सांगायचं 'हाच पर्याय आहे.'

पूर्वी कसं मुलगी उजवली की आपण सुटलो असं वाटायचं काही पालकांना, तसं आता 'जोडीदार मिळाला की आपली जबाबदारी संपली' असं सांगतायत का? एक संसार करताना भरपूर तडजोडी केलेल्या असतात दोघांनीही. आता वाढत्या वयात पुन्हा तेच - असं वाटू शकतं ना कुणाला?  जेष्ठ नागरिकांच्या समस्या कमी नाहीत. त्यात आता या मालिका पाहून प्रत्यक्ष आयुष्यातले सल्ले देत सुटणार्‍या आणि मनस्तापात भर घालणार्‍या लोकांची भर पडली आहे.

सामाजिक आशय वगैरे ठीक आहे, पण .....

बाकी, कीर्तन ऐकून कुणी संत होत नाही आणि सिनेमा बघून वाया जात नाही अशा लाडक्या ओळी आळवणार्‍यांच्या विचारांना माझी श्रद्धांजली.

© मंदार दिलीप जोशी

तळटीपः
(१) पूर्ण पोस्ट वाचून मग(च) मत व्यक्त करावे.
(२) पोस्टमधलं एक वाक्य नीट वाचा "ज्याची जी गरज तो ते वागेल, त्यात आक्षेप, हरकत घेण्यासारखं नाही हे सांगायला, शिकवायला हवंच. ती काळाची गरज आहे." आणि मग तलवार काढा.

Tuesday, September 29, 2020

समाजवाद अर्थात फुकटेगिरी भाग ३: द शोशँक रिडेम्प्शन, समाजवाद, आणि आपण

तेवीस वर्षांचा चार्ल्स एच बेकर नामक अमेरिकन गब्रू जवान The Seattle, Lake Shore and Eastern Railway (SLS&E) वॉशिंगटन राज्यातल्या सिएटल परगण्यातील खाजगी रेल्वे कंपनीत एक सिव्हिल अभियंता होता. कामाच्या तपासणीला जायचा तेव्हा गाडी the Snoqualmie Falls या निसर्गरम्य धबधब्याच्या शेजारून जायची. त्या धबधब्याकडे पाहून चार्ल्स फक्त मोहरून गेला नाही, त्याच्या मनात एक व्यवसायाची कल्पना आली. 

आपल्या वडिलांकडून त्याने कर्ज घेतलं आणि एक कंपनी स्थापन केली. कंपनीने तो धबधबा आणि आसपासची जमीन सरकारकडून खरेदी केली. नशीबाने तेव्हा तिथे कुणी केजरीवाल किंवा राहुल गांधी जन्माला आला नव्हता मोदींनी विकला अशी बोंब ठोकायला म्हणुन चार्ल्सला हे सोपं गेलं असावं.

तर, चार्ल्सने तिथे जगातलं पहिलं जलविद्युत प्रकल्प उभारला, तो पण खाजगी. त्याने AC पद्धती स्वीकारली आणि सिएटल शहराला ती वीज विकू लागला. हा जलविद्युत प्रकल्प सुरु झाला जुलै ३१, १८९९ रोजी. हा प्रकल्प आजही सुरू असून वीज विकतो आहे, कालानुरुप काही बदल झाले असतील तेवढेच. 

आपण त्यानंतर अठ्ठेचाळीस वर्षांनी आपण स्वतंत्र झालो आणि न्हेरूंच्या सरकारने नियम केले की:

  • वीज फक्त सरकार तयार करुन विकू शकतं.
  • रेल्वे फक्त सरकारीच असावी.
  • टेलीफोन कंपन्या फक्त सरकारीच असाव्यात.
  • विमान कंपन्याही सरकारीच हव्यात.

याचा परिणाम काय झाला? जुन्या भारतात फोन सेवा, बँक सेवा, वीज ही काय दर्जाची होती हे एकदा आठवून पहा. स्वातंत्र्योत्तर वीज ही एक चैन होती, रेल्वेत आपण गुराढोरांसारखा प्रवास केला, टेलिफोन मिळणं म्हणजे लॉटरी होती, आणि विमानप्रवास ही चैन ठरली. नोकर्‍यांचं म्हणाल तर त्यावरुन होणारी हाणामारी आणि गोळीबार आजही राजस्थानच्या हायवेवर सुरु आहे. आणि आज आपण अमेरिकेच्या तूलनेत १/३० एवढे गरीब आहोत. 

१९४७ साली आपण राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण सत्ता गेली इंग्रजांच्या अनौरस वारसांकडेच. त्यांनी आणला समाजवाद आणि मग आपण आर्थिकदृष्ट्या त्याच्या पूर्ण आहारी गेलो. भारताला गरीब देश म्हणत असतील तर आपल्या गरीबीचं खरं कारण सबकुछ सरकार का असे बिनडोक आणि घातक धोरण हे आहे. सरकारने उद्योग चालवले खरे पण त्यामुळे ना गरीबांचे भले झाले ना सरकारला पैसे मिळाले. समस्त बाबू लोकांचे उखळ मात्र पांढरे झाले. अत्यंत भ्रष्ट, नगण्य उत्पादनक्षमता असलेले अनेक पांढरे हत्ती जन्माला घालून भारताची परिस्थिती अधिकच खालावण्याला हे समाजवादी धोरण जबाबदार आहे. आजही अनेक व्यवसाय एक तर सरकारच्या ताब्यात आहेत किंवा सरकारच्या शक्य तितक्या खात्यांकडून शंभरावर ना हरकत प्रमाणपत्रे किंवा परवानग्या लागतात. आणि या सगळ्यातून आम्हाला मुक्ती द्या असं कुणीही म्हणत नाहीये.

१९९४ साली हॉलिवूडमध्ये The Shawshank Redemption नावाचा एक जबरदस्त चित्रपट येऊन गेला. प्रस्तुत लेखाच्या संदर्भात कथेच्या खोलात जाण्यात अर्थ नाही, पण त्यात एक उपकथाभाग असा येतो की पन्नास वर्ष तुरुंगात काढल्यानंतर पॅरोल मिळालेला ब्रुक्स बाहेरच्या जगाशी स्वतःला जुळवून घेण्यास अपयशी ठरतो, आणि एक दिवस नैराश्याने गळफास लावून आत्महत्या करतो.

Shawshank Redemption

परवा मोदींनी कृषी क्षेत्राला मुक्त केलं तर वर्षानुवर्ष सरकारी कायदे आणि नियमांच्या पिंजर्‍यात काढलेले लोक एकदम रस्त्यावर आले, "ओ मोदी बाबा आम्हाला पिंजर्‍याशिवाय करमत नाही. आम्हाला पुन्हा आत टाका." मग एकच मोडका ट्रॅक्टर दोनदा दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाळण्याची नाटकं झाली. कामगार कायद्यात सुधारणा केली तर पुन्हा मोदी हाय हाय सुरू.

समाजवाद नेहमीच दीनदुबळ्यांना मदत करण्याच्या नावाखाली सगळ्यांनाच दीन आणि दुबळा करुन टाकतो. आणि कहर म्हणजे आपल्या आजच्या वैचारिक चर्चेची (intellectual discourse) अवस्था ही आहे की तथाकथित उच्चवर्णीयांपैकी शंभर जणांना भारताला ग्रासणार्‍या दहा समस्यांबद्दल विचारलं तर शंभरापैकी शंभर जणांच्या यादीतली पहिली समस्या ही आरक्षण असेल आणि इतर शंभर जणांना विचारलं तर 'अमक्यांनी आमच्यावर ५००० वर्ष अन्याय केला' ही.  

कसे पुढे जाणार आपण?

© मंदार दिलीप जोशी
अधिक अश्विन शु. १३, शके १९४२