Tuesday, January 6, 2026

पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक

२०२४ ची लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक असावी. मतदान केंद्राच्या आसपास गाड्या लावण्याची सोय नव्हती, म्हणून आम्ही काही अंतरावरच्या एका गल्लीत एका बंगल्यासमोर गाडी लावली आणि घाईघाईत मतदानाला गेलो. मतदान करून आल्यावर गाडी काढायला जाताच बंगल्याच्या बागेतून झाडांना पाणी घालत असलेल्या एका इसमाचा एक अत्यंत उर्मट स्वरात आवाज आला, "इथे कुठे गाडी लावलीत, पाटी दिसली नाही का इथे गाडी लावू नये अशी?" 

आधी खरंच पाटीकडे लक्ष गेलं नव्हतं. "अरेच्या, मला खरंच दिसली नाही पाटी....सॉरी हं, चूकच झाली." असं म्हणून तिथून निघालो.

अर्धांगिनीला आश्चर्य वाटलं, "तुम्ही पटकन सॉरी का म्हणालात? कसा उद्धटपणे बोलत होता तो माणूस! तिथे गाडी लावायला अशी बंदी करता येते का?"

मी तिला म्हटलं, "त्याने पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घातला होता, आणि तो नळीने झाडांना पाणी घालत होता म्हणून." 

सौ म्हणाली, "म्हणजे?"

"म्हणजे त्या माणसाकडे पाहून मी cost-benefit analysis केला. तो भव्य कपाळ असलेला माणूस पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घालून झाडांना पाणी देत होता याचा अर्थ तो पूर्णपणे निवांत होता आणि त्याच्याकडे भरपूर वेळ होता. त्याच्याशी उलट उत्तरं करायला, वाद घालायला सुरवात केली असती तर त्याचं काहीच गेलं नसतं, आपल्याला पुढे ज्या कामांना जायचं होतं ती लांबली असती. सुट्टी असल्याने आजूबाजूचे बंगलेवाले निवांत असणार, ते ही आपल्याशी भांडायला आले असते आणि आपला आणखी वेळ वाया गेला असता. आपला मूड खराब झाला असता, शिवाय त्यांचं मतपरिवर्तन झालं नसतं ते नसतंच. म्हणून त्या काकांना सरळ सॉरी म्हणून टाकलं. भांडण होईल या अपेक्षेने सरसावून पुढे आलेल्या त्या माणसाचा फुगा तिकडेच फुस्स झाला आणि तो इसम गप बसला. चरफडण्यापलीकडे त्याच्या हातात काही उरलं नाही. अर्थात नेहमीच सॉरी म्हणायचं असतं असं नाही, तर कधीकधी साफ दुर्लक्ष करून हसून निघून जायचं असतं."

मागच्या रविवारी एकाचा मेसेज आला, की "बघ रे तुझ्यावर एकाने पोस्ट लिहिली आहे. खूप पर्सनल झालाय तो माणूस. खाली कमेंट्स पण तशाच आहेत. तू उत्तर दिलं पाहिजेस!" मी त्याला टाळायचा बऱ्यापैकी प्रयत्न केला, पण त्याने खूप आग्रह केल्यावर मी त्याला वरचा किस्सा सांगितला.

आणि म्हटलं, त्या माणसाने पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घातलाय. आणि कमेंटकर्ते नळीने बागेला पाणी देतायत. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे, पण आधीपासूनच बाजू ठरवून टाकलेल्या आणि मला व्हिलन घोषित केलेल्या कावीळ पीडित जनतेशी मी तिथे जाऊन कितीही वाद घातला तरी उपयोग नाहीये, आणि मी यांच्याइतका रिकामXX नाहीये. तेव्हा त्याला पट्ट्या पट्ट्यांची अर्धी चड्डी आणि बिनबाह्यांचा गंजीफ्रॉक घालून निवांत बोंबलू दे, मी हसून दुर्लक्ष करणार, I can't afford to waste time to fill their free time.

त्याला समजलं असावं. 

🖊️ मंदार दिलीप जोशी
पौष कृष्ण ३/४, शके १९४७ | अंगारक संकष्ट चतुर्थी

 

Saturday, December 27, 2025

ब्राह्ममुहूर्त

दिवसभराच्या कामात काही सुधारणा हव्या असतील किंवा त्रुटी राहिल्या असतील तर मला ते अचानक साधारण अशाच वेळी आठवतं. खूप वर्षांपूर्वी मी एकदा रात्री अडीच वाजता उठून ऑफिसमध्ये फोन करून रात्रपाळीवर असलेल्या एकाला मला लक्षात आलेली त्रुटी सांगितली आणि वेळीच दुरुस्त करून घेतली. ती क्लायंटच्याही सहज लक्षात आली नसती इतकी छुपी गडबड होती.

रात्री जवळ वही आणि पेन ठेवायची सवय लावून घेतली पाहिजे. मोबाईल उघडायचा नाही, कागदावर कल्पना लिहायच्या.

थोडासा वेगळा मुद्दा आहे, पण आपण जेव्हा हाताने लिहितो तेव्हा ते मनातल्या मनात म्हटलं जातं, वाचलं जातं, मेंदूत प्रक्रिया होते त्यामुळे लक्षात चांगलं राहतं. एका प्रोजेक्टच्या वेळी मुख्य काम सुरू करण्याआधी एक चेकलिस्ट मी कागदावर लिहून जवळ ठेवली आणि त्यात पाहून काही गोष्टी आधी तपासून घेत असे. ही सवय लावल्यापासून लक्षणीय प्रगती जाणवली. इतकी की आता या गोष्टी अगदी अंगवळणी पडल्यासारख्या तपासल्या जातात.

 ©️ 🖊️ मंदार दिलीप जोशी
पौष शु. ७, शके १९४७




Saturday, February 15, 2025

मर्यादा/लिमिट - भाग २

एखाद्या गोष्टींचं अती जेव्हा होतं तेव्हा ते सुरूच होऊ नये यासाठी काय केलं जातं किंवा जात नाही ते महत्वाचं ठरतं. 

कुणीतरी तथाकथित विनोदवीर काही अश्लील विधान करतो तेव्हा तो जितका दोषी असतो त्यापेक्षा अधिक दोषी तो समाज किंवा ती व्यवस्था असते जी अशा प्रकारांना सुरवातीलाच मुळापासून उपटून फेकत नाही. एका बोधकथेतील आईचे कान चावणारा खूनी मुलगा तसं करण्याचं कारण हेच देतो की आई तू मला पहिला गुन्हा केलास तेव्हाच कानफटात का ठेऊन दिली नाहीस? एखादा मुलगा जेव्हा शिवराळ होतो तेव्हा त्यामागे त्याच्या पहिल्या भेंचोदला बापाने किंवा आईने त्याच्या न ठेऊन दिलेली थोतरीत असते. 

म्हणूनच आपण लिहिलेले चार शब्द जेव्हा चारशे किंवा चार हजार लोक वाचतात आणि ते विचार स्वीकारतात, आपल्याला इथला सेलिब्रिटी ताई किंवा दादा मानतात, आणि आपल्याला या किंवा इतर काही कारणांनी मान देतात, मग आपली लायकी असो किंवा नसो, काहीही लिहिण्या किंवा बोलण्याआधी किमान हजारदा विचार करून मगच लिहावं हे योग्य. 

(अर्थात, तसं लिहिण्याबोलण्यामागे तुमचा वेगळा अजेंडा असेल तर गोष्ट वेगळी. म्हणजेच, आपण समतावादी, समरसतावादी हिंदुत्ववादी असल्याचा मुखवटा पांघरून काही उजव्या/हिंदुत्ववादी गटात घुसून हळूहळू आपले विषारी विचार पसरवण्याची आणि या योगे समाज नासवण्याची तुमची मनीषा असल्यास वरच्या प्रवचनाला काहीही अर्थ नाही.)

करून करून भागल्यावर, तारुण्य ओसरू लागल्यावर मागणी कमी झाल्याचं लक्षात येताच देव देव करणाऱ्या एखाद्या चामडीविकू बॉलिवूड कलाकार किंवा अर्धवेश्या पॉर्नस्टारची तुलना चिखलात कमळ उगवावं तसं आपल्या आयुष्याचं सोनं करणाऱ्या एखाद्या थोर संताशी केली जाते, तेव्हा भावविभोर होऊन माना डोलावण्यापेक्षा तिथल्यातिथे तसे विचार मांडणाऱ्या व्यक्तीला रोखणे गरजेचे ठरते. असो, तर, जेव्हा एखाद्या चामडीविकू बॉलिवूड कलाकार किंवा अर्धवेश्या पॉर्नस्टारची तुलना एखाद्या थोर संताशी केली जाते, तेव्हा भावविभोर होऊन माना डोलावण्यापेक्षा तिथल्यातिथे तसे विचार मांडणाऱ्या व्यक्तीला रोखणे गरजेचे ठरते. पण गंमत अशी आहे की सॉफ्ट टार्गेट असलेल्या अशा विनोदवीरांना हाणायला आपले शूरवीर पुढे असतात, पण आपल्या आवडत्या सोशल मिडिया सेलिब्रिटींना बोलायला अनेकांची जीभ कचरते. 

समाजमनाला प्रभावित करू शकणाऱ्या लोकांनाही नीट पारखून घ्यायचं सोडून, आणि सातत्याने पारख करत राहण्याचं सोडून, नको त्या लोकांना त्यांनी वाट्टेल ते विचार ओकल्यावरही "ते म्हणतायत म्हणजे बरोबरच असेल" असे अडाणी विचार करून डोक्यावर चढवून संस्कृती नासवण्याचं पाप ज्यांच्या माथी आहे, त्यांनीच मराठी काय किंवा हिंदी काय किंवा कुठल्याही भाषेतल्या विनोदवीरांनी मर्यादा ओलांडल्यावर झालेल्या क्लेशाचं अपश्रेय घ्यावं.

माणूस सुधारू शकतो, वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, अशा अर्थाचीही विधाने बघितली. याला भोळसटपणा म्हणायचं की बावळटपणा याचा निर्णय होत नाहीये. बरं तसं झालेलं आहे, पण ते दिवस आता राहिलेत का? मुळात तसं व्हायला आधी पाटी कोरी असावी लागते, घरच्यांनी सांगावं लागतं की हे चूक आहे करु नको. त्याच ठिकाणी अंधार असेल तर?

नुकताच सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ बघितला. इथे क्रिकेट हा विषय आवडीचा नसला तरी तो त्यात काय म्हणतो ते वाचा. सचिन म्हणाला की एका सामन्यात तो आणि व्हि व्हि एस लक्ष्मण फलंदाजी करत असताना धाव घेताना झालेल्या गैरसमजामुळे, किंबहुना लक्ष्मणच्या चुकीमुळे सचिन धावचित झाला. सहकार्‍यांकडून सर्वोच्च खेळाची अपेक्षा ठेवणार्‍या सचिनला त्यावेळी लक्ष्मणच्या कृतीबद्द्लची आपली नाराजी लपवता आली नाही. नंतर घरी आल्यावर त्याच्या भावाने म्हणजे अजितने त्याला समोर बसवून सांगितलं, की "अरे बाबा ही काय प्रतिक्रिया होती? तू बाद झालेलाच होतास, पण लक्ष्मण अजूनही फलंदाजी करायची होती तेव्हा तू त्याला अपसेट करुन गेलास." नंतर सचिनने लक्ष्मणशी बोलून दिलगिरी व्यक्त केली. 

वाल्याच्या घरच्यांनी त्याच्या पापांत सहभागी व्हायला नकार दिला, तेव्हा त्याला शहाणपण आलं आणि त्याचा वाल्मिकी झाला. असे कुटुंबीय, असे अजितदादा तेंडुलकर, आता उरलेत का? मग उगाच मॉरल हाय ग्राऊंड घेऊन हा सुधारेल ती सुधारेल अशी प्रवचने देण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा आपली मुलं असं काही करत नाहीत ना याकडे लक्ष द्या. मुलं अनुकरणप्रिय असतात असं म्हणतात, त्यामुळे "If a thousand people do a foolish thing, it's still a foolish thing." यातल्या थाऊझंडपेक्षा आपले आईवडील वेगळे आहेत हे मुलांना आपल्या वागण्याबोलण्यातून जाणवू द्या. अशा गोष्टी बघण्यात आल्या तर त्याला अनवधानाने का होईना आपण हसून आणि टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत नाही ना हे पहा. कारण एखादा सेलिब्रिटी जेव्हा शिव्या खातो तेव्हा त्यापेक्षा अधिक दोषी तो समाज किंवा ती व्यवस्था असते जी अशा प्रकारांना सुरवातीलाच मुळापासून उपटून फेकत नाही.

(इट टेक्स अ व्हिलेज टू रेज अ चाईल्ड अशी एक आफ्रिकन म्हण आहे. त्या अनुषंगाने "कुटुंबीय" या शब्दाकडे पहावे.)

मर्यादा/लिमिट - भाग १

© मंदार दिलीप जोशी





Monday, May 20, 2024

एक खविता

Ironyच्या देवा तुला चेक चेक वाहू दे
लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे

लेऊ लेणं मजबूरीचं, प्रिंट होईना त्या पासबुकचं
जीणं होऊ अकाउंटचं, साहेब मातुर माझ्या देवा जागेवरी
असू दे ए ए ए, लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे

म्याडमच्या हातातली स्लिप व्हावी वर खाली
एफडी आरडी जाईल आली किरपा तुझी टोकनच्या पुकार्‍यासंगं
गाऊ दे ए ए ए, लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे 

काम थोडं, चेंगट भारी, ब्रांच ही भली बुरी
स्टँप बसेल अर्जावरी, काउंटर काउंटर पळायाला, अंगी बळ
येऊ दे ए ए ए, लंच टाईमगत माया तुझी आम्हावरी राहू दे

- मंदार दिलीप जोशी (एक खातेदार)

तळटीपा:

(१) स्टेट बँक ऑफ इंडीया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना समर्पित.
(२) *खविता = (खातेदाराची कविता, किंवा खवट कविता असंही म्हणू शकता, गिव्हन द फॅक्ट द्याट इट इज रिटन बाय पुणेकर)
(३) काऊंटर नंबर १३ आणि ६ यात माझं बॅडमिंटनचं शटलकॉक झालं होतं तेव्हा स्फुरलेलं विडंबन.




Friday, May 3, 2024

नॉस्टेल्जिया: खुंटी, पगडी, भाषा, आणि संस्कृती

हल्ली जुन्या पद्धतीची घरे आणि अशा खुंट्या दुर्मीळच झाल्या आहेत. विशेषतः आमच्या भागात निसर्ग वादळामुळे घरांचे मोठे नुकसान झाल्यावर अनेकांनी नवीन पद्धतीने घरे बांधून घेतली आहेत. 

केळशीला एका जुन्या दुरुस्त केलेल्या घरात मात्र खुंटीवर टांगलेली ही पगडी पाहून मागे एकदा इथेच एक गोष्ट वाचली होती त्यात "खुंटीवर पगडी दिसत नाही" म्हणजे व्यक्ती घरी नसणे हा अर्थ अभिप्रेत असतो असं दिलेलं होतं ते आठवलं. 

ती पूर्ण गोष्ट अशी: एकदा एक इंग्रज लोकमान्य टिळकांना म्हणाला," मला उत्तम मराठी येते तर मला मराठी माणूस का म्हणत नाही?" टिळक म्हणाले,"वेळ आली की सांगेन." एकदा टिळकांनी त्या इंग्रजाला आगरकरांच्या घरी जाऊन बोलावून आणण्यास सांगीतले. तो घरी गेला तेव्हा आगरकरांची पत्नी म्हणाली, "खुंटीवर पगडी दिसत नाही." तो म्हणाला,"पगडी नको, आगरकर घरी आहेत का?" त्या म्हणाल्या, "दरवाजात चपला दिसत नाहीत." परत त्याने विचारले, "मॅडम, आगरकरांचा भेटायचे आहे" त्या जरा चिडून म्हणाल्या, "कोपर्‍यात काठीही नाही." काठी ऐकल्यावर तो इंग्रज सुसाट धावत टिळकांकडे येऊन म्हणाला," आगरकरांची बायको वेडी आहे का?" आणि त्याने काय घडले ते सांगीतले. टिळक हसत म्हणाले," म्हणून तुला मराठी माणूस म्हणता येणार नाही. मराठी स्वच्छ समजण्यासाठी मराठी आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो."

© मंदार दिलीप जोशी
चैत्र कृ १०, शके १९४६

Sunday, March 17, 2024

खर्रा इतिहास: हकीकत-ए-शिरा

शहेनशहा जलालुद्दीन अकबर यांच्या इतक्या बायका आणि अंगवस्त्रे होती की जहांपन्हांना एक एक्सेल वर्कबुक मेनटेन करावं लागे. त्यात तीन वर्कशीट होत्या. एक वर्कशीट पट्टबेगम आणि तिचे तपशील, म्हणजे भाऊ किती, इतर सासुरवाडीकडची मंडळी किती, वगैरे वगैरे. दुसर्या वर्कशीटमधे इतर बायका आणि त्यांचे असे तपशील. तिसरी वर्कशीट अंगवस्त्रांसाठी. तेव्हा कुठे सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, नखरे वगैरे लक्षात राहत. अर्थात हे एक्सेल वर्कबुक सुद्धा बिरबलानेच त्यांना तयार करुन दिले होते. 

त्यामुळे एक बातमी ऐकल्यावर बिरबल वैतागला. बातमी अशी होती की जिल्लेइलाहीहीही बादशहा जलालूद्दीन म. अकबर सरांच्या सतराव्या पत्नी बेगम साहिबा बेगम शोधाबाई जलालूद्दीन अकबर यांना दिवस गेले. म्हणजे त्या गरोदर राहिल्या. म्हणजे त्यांना मूल होणार असे समजले. हल्ली सगळं सांगावं लागतं. 'अम्मी कुठे कडमडते' या मालिकेतल्या अम्मीचा दुसरा शोहर मेला आणि मालिकेची वेळ बदलली यामुळे त्या अंमळ मूड-ए-नासाज होत्या. त्यामुळे ही बातमी शाही हकीम यांनी त्यांना दिल्याने त्यांना बहुत खुशी झाली. म्हणून बिरबल मात्र एक्सेल शीट पुन्हा अपडेट करावी लागणार म्हणून वैतागला. तर ते असो.

बिरबलावर वैतागण्याचे आणखी प्रसंग येणार होते. जसा काळ सरकू लागला तसं शोधाबाई साहेबांना डोहाळे लागायला सुरवात झाली. एक दिवस त्यांनी जि. ज.म.अकबर सरांकडे सांस्कृतिक खात्याचे मंत्री बिरबल यांना बोलावणं पाठवा असा हट्ट केला. 

बिरबल येताच शोधाबाई साहिबांनी त्याच्याकडे प्रश्न केला की तुमच्याकडे तो गोड पदार्थ करतात तो कोणता? उस दिन पूजा के बाद तुम लाय थे?!" बिरबलाच्या बायकोलाही त्याच सुमारास दिवस गेले होते त्यामुळे डोहाळेही तसेच लागल्याचे ऐकून तो हबकला.  

"मेरी माँ करती है, और उसकू संयावक कहते हैं बेगम साहिबा और वो करने में बहुत कष्ट होते हैं. खाने में भी जड होता हय, आपको झेपेगा नहीं."

"ऐसा कैसा झेपेगा नहीं, ये अकबर सर की होनेवाली औलाद हय उसकू सब झेपेगा, माझ्यात पण लढवैय्या रक्त है, मेरेकू शिरा चाहीये म्हणजे चाहीयेच. साक्षात बेगम साहिबांचा हुकूम आहे." बेगम शोधाबाई कडाडल्या.

बिरबलाने जिल्लेईलाही अकबर सरांकडे एक कटाक्ष टाकला. ते आपला कशाशी संबंध नसल्यागत किताब-ए-चेहरावर सर्फिंग करण्यात मशगुल होते. त्यांना बिरबलाने किताब-ए-संदेश वर मेसेज पाठवल्यावर त्यांचं लक्ष गेलं. त्यांनी उत्तरादाखल शांतपणे एका वाळवंटी ग्रुपची लिंक बिरबलाला पाठवली. आपल्या आईची संयावंक रेसिपी  या वाळवंटी लोकांनी चोरल्याचं आणि नावही बदलल्याचं पाहून त्याला अंमळ मौज वाटली. पण बेगम साहिबांचा हट्ट आहे तो पुरवावाच लागणार हे त्याला उमगलं.

शेवटी बिरबलाने आपल्या आईला बेगम साहिबांची मागणी सांगितली. आईला बरंच वाटलं, ती म्हणाली "अरे पंडित तुम चिंता मत करो. किताब-ए-चेहरावर एक ग्रुप आहे थुईथुई स्वयंपाकघर तिथे साथ आली आहे संयावक खायची, तिथे कुणाला पोस्ट टाकायची उबळ आली की माझ्याकडेच ऑर्डर येते". बिरबलाची चिंताच मिटल्याने तो आनंदित झाला. 

त्याच्या आईने पटकन यंत्र-ए-भागमभाग अर्थात मोबाईल हातात घेतला आणि ग्रुपवर "बाजारात रवा संपला आहे, ब्लॅक मार्केटमधून घ्यावा लागेल. तेव्हा, ऑर्डर देताना वाढीव दरांची नोंद घ्यावी." अशी पोस्ट टाकली. लगोलग ग्रुप अडमीन मोहतरमा यांनी "थीम बंद करत आहोत" म्हणून पोस्ट टाकली. तर ते असो.

बिरबलाच्या आईने चांगला वीस-पंचवीस किलो संयावक करून बिरबलाच्या हस्ते बेगम साहिबा शोधाबाईंकडे पाठवला. इतका संयावक पाहून बेगम साहिबा आश्चर्यचकित झाल्या. त्या बिरबलाला म्हणाल्या, "बिरबल आम्ही तुमच्यावर और तुमच्या वालिदा साहिबा यांच्यावर बहुत खुश आहोत. त्यामुळे आम्ही या पदार्थाला त्यांचं नाव देणार."

"वो यंव त्यंव नाम हमकू मालूम नहीं. तुम्हारी 'माँ' ने हा पदार्थ 'खंडी'भर पाठवून आमच्या मनात 'शिर'ल्या, त्यामुळे आजपासून या पदार्थाचे नाव शिरा, मा-खंडी-शिरा."

तेव्हापासून याला माखंडी शिरा म्हणतात. पुढे उरलेल्या शिऱ्यात बेगम साहिबांच्या कारट्याने शू केल्याने त्या भागाला मुतांजन असेही म्हणू लागले. पण हा इतिहास तुम्हाला ट्रोलिस्थान सरकारचे हस्तक आणि विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
सहाय्यक विषवमन ओकरी आणि टिमटिम बकरीपांडे
पान ७८६, ओळ ८

#खाखा_ए_हावरटी #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी