Thursday, March 28, 2019

सबद सबद हर कोई कहे

अधूनमधून कधीतरी ऑनलाईन वैफल्याचा किंवा वैराग्याचा झटका येतो आणि असा विचार येतो की आपण जे फेसबुकवर राजकीय, धार्मिक, विनोदी पोस्ट करत असतो किंवा Meme टाकत असतो, किंवा क्वचित कौटुंबिकही पोस्ट करत असतो, ते टाकू नये, काय फायदा?

अशाच मनस्थितीत असताना एका व्यक्तीच्या वॉलवर काहीतरी विपरीत घडल्याचं वाचलं जातं. इनबॉक्समध्ये चौकशी केल्यावर कळतं त्या व्यक्तीच्या बाबांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ती व्यक्ती म्हणते की माझे बाबा आजारी असताना मी काही वेळा तुझ्या राजकीय आणि विनोदी दोन्ही पोस्ट त्यांना मी वाचून दाखवत असे. तुझ्या विनोदी पोस्ट ऐकून आणि Meme त्यांना दाखवल्यावर ते माझ्याबरोबर खूप हसायचे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायचं श्रेय तुला जातं. तुझ्याच एका पोस्टमुळे बाबा गेल्यावर आईच्या चेहर्‍यावरचं लोपलेलं हसू परत आलं आणि आई पुन्हा आनंदी दिसू लागली (तिचे शब्द - she became jovial). त्याबद्दल तुझे खरंच आभार आहेत.

गंमत म्हणजे या व्यक्तीला मी कधी भेटलोही नाहीये आणि ऑनलाईन वगळता ओळखही नाही. पण बोलून दाखवणारी ही पहिलीच व्यक्ती भेटली आहे. असा आनंद नकळत किती जणांना वाटला गेला असेल ते त्या गजाननालाच माहीत. तो सुखकर्ता तो दु:खहर्ता. तोच कर्ता तोच करविता.

संत कबीरांचे शब्द आहेत:
सबद हर कोई कहे
सबद के हाथ न पांव
एक सबद औषध करे
एक सबद करे घांव

किती खोल अर्थ भरलेला आहे या दोह्यात!  बाहेरून घरी आलेल्या नवरा, बायको, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, दीर, सासू, सासरे, मित्र, मैत्रीण, किंवा अगदी शेजार्‍यालाही अशा कुणालाही तो एकदम ताजातवाना दिसत असला तरी "कसे आहात? दमलेले दिसता? आराम करा जरा." असं म्हणालात तर ती व्यक्ती आणखी प्रसन्न होईल आणि दमलेली असेल तर खरंच ताजेतवाने वाटू लागेल. अर्थात, "एक सबद औषधि करे". एक शब्द औषधासारखा काम करतो. मात्र हे औषध एकदाच लावून भागत नाही. ते वारंवार लावावं लागतं. हेच मनाचं औषध.

एक सबद करे घाव...पण घाव घालायला मात्र एखादाच शब्द पुरतो. गजाननाकडे प्रार्थना आहे की माझ्याकडून वापरले गेलेले सबद 'एक सबद औषध करे' असे आनंद देणारेच असूदेत.  आणि चुकूनही स्वतःहून 'एक सबद करे घांव' होऊ नये.

आणि अशा रीतीने ऑनलाईन वैफल्य, वैराग्य चुलीत घालून मी परत फेसबुकवर, सोशल मिडीयावर तुम्हाला 'पिडायला' हजर!




© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ ८, शके १९४०

Monday, February 11, 2019

का रे भुललासी वरलिया रंगा: अमोल पालेकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रवचन

कालच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकरांनी चित्रकार कै. प्रभाकर बर्वे यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात भलतीच टेप वाजवल्याने आयोजकांनी त्यांना विषयाला धरून बोलायचा आग्रह केला यावरून देशात गदारोळ उडाला (देशात म्हणजे ज्यांना याची काही पडली आहे अशा विश्वात, बाकी आमच्या कामवालीला अमोल पालेकर कोण हे ही माहीत नाही. तर ते असो). अमोल पालेकरांच्या कृत्याचं मुद्देसूद खंडन ते सात्विक संतापातून प्रच्छन्न शिवीगाळ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर उमटल्या.
खूप पूर्वीपासून रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांबद्दल आपल्याकडे प्रचंड गैरसमज दिसून येतात.



यातला प्रमुख गैरसमज असा की विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरातल्या, जातीधर्माच्या, आणि बुद्धीच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या व्यक्तींना आपण सर्वज्ञ समजण्याची चूक करत आलो आहोत. त्यातही तथाकथित कलात्मक चित्रपटांबाबत ते सत्य दाखवतात हा आणि त्यात 'अभिनय' करणारे लोक म्हणजे बुद्धिजीवी आहेत हा सगळ्यात मोठा गैरसमज. गरीब आणि मध्यमवर्गांचं प्रतिबिंब दिसेल असे सिनेमे असतील तर मग काही विचारायलाच नको, लोकांनी डोक्यावर घेतले होते असे सिनेमे. उगाच नाही विक्रमी 'शोले' समोर 'गोलमाल'ने टिच्चून धंदा केला.

याबाबत नसीम निकोलस तलेब या मूळच्या लेबनीज अमेरिकन असलेल्या लेखक, विद्वान, सांख्यिकी तज्ञ, अर्थतज्ज्ञ, शेअर बाजार व्यापारी, वगैरे बरंच काही असणाऱ्या या विचारवंताचे विचार वाचण्यासारखे आहेत. नट नट्यांच्या विषयीचे त्यांचे विचार हे प्रामुख्याने हॉलीवूड अर्थात अमेरिकन चित्रपट उद्योगाशी संबंधित असले तरी कलाकारांची मानसिकता आणि समज ही नेहमीच स्थलातीत असल्याने भारतवर्षातील कुठल्याही चित्रपट उद्योगाला लागू होतात.

तलेब म्हणतात की "चित्रपटसृष्टीत काय घडतं याचा आणि आपण सर्वसामान्य लोक यांचा काहीही संबंध नसतो. तलेब  आपल्याला दोन प्रश्न विचारतात: एक तुमच्या मित्रपरिवारात किती अभिनेते आहेत? किती अभिनेते तुमच्या मित्रांचे मित्र आहेत? यात अस्तित्व आणि प्रचलन (presence and prevalence) यात गल्लत करू नये. काही अपवाद वगळता नटनट्या सामान्य लोकांत मिसळत नाहीत."

"रोमन साम्राज्यात तर नटांना लग्न करायलाही बंदी होती, इतकंच नव्हे तर त्यांना सर्वसामान्य जनतेशी मिसळायलाही बंदी असे. तुम्हाला एखादा स्त्रीरोगतज्ञ आणि इंजिनियर, गवंडी आणि वाहनचालक एकमेकांत मिसळताना दिसतील, पण अभिनेते हे त्यांच्याच जगात मशगुल दिसतात. किती क्षेत्र अशी आहेत जिथे लोकांना त्यांच्या दिसण्यावर आणि आपण जे नाही त्याचा अभिनय करण्यावर काम दिलं जातं? किती क्षेत्रात शरीराचा 'वापर' हा वर चढण्याकरता केला जातो?"

"इतर क्षेत्रातले लोक, उदाहरणार्थ स्त्रीरोगतज्ञ किंवा रेल्वे अभियंते, आपल्याला नैतिकतेची प्रवचनं देताना दिसत नाहीत. खरं तर बाह्य दिसणे यावरच ज्यांचं सगळं जग अवलंबून आहे अशा या प्रत्यक्ष वर्तन आणि वैयक्तिक मते यांच्यात प्रचंड तफावत असलेल्या या लोकांना आपल्याला नैतिकतेचे धडे देण्याचा काहीही अधिकार नाही."
मात्र नटनट्या हीच गोष्ट प्रत्येक सार्वजनिक मंचावर वारंवार करताना दिसतात आणि भोळसट (की बावळट?) लोक त्याला तितक्याच सातत्याने भुलताना दिसतात. याचं कारण म्हणजे नटनट्यांना आपला मंदपणा बाहेर दिसू नये याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यामुळे ते काहीही बडबडले तरी एखादा अत्यंत बुद्धिमान आणि विचारी माणूस आपल्याशी संवाद साधतो आहे असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरतात.

हा कार्यकारणभाव लक्षात घेतला की पैसे टाकून बनवलेला सिनेमा आणि विचारवंतांचा अभिनय करायला वर्षानुवर्ष पोसलेल्या नटनट्यांची अशी हंगामी वक्तव्य यात फारसा फरक उरत नाही हे आपल्याला समजतं.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यातल्या बहुतेकांचा स्वभाव मुळातच विकृत आणि द्वेषाने भरलेला असतो आणि त्याला अनेक वर्ष पद्धतशीर खतपाणी मिळालेलं असतं.

म्हणूनच मग जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, पांढऱ्या केसांचा/ची, भलंमोठं कुंकू लावलेली, दाढीवाला, अशी कोणतीही आजी किंवा माजी नटमोगरी किंवा टोणगा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुता, वगैरे पढवलेली 'पेड' वाक्य बोलताना दिसले की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कारण 'बनवलेला' सिनेमा कुणी बघायलाच गेलं नाही तर तो आपटतो, आणि यांच्या वक्तव्याला भाव दिला नाही की ते हवेत विरून जातं.

आपण फार मनावर न घेता एवढंच लक्षात घ्यायचं ―
तो धंदा असतो आणि हा सुद्धा, फक्त चेहऱ्याला रंग फासून ज्या बाजारात बसायचं त्याचं ठिकाण प्रत्येक पटकथेच्या मागणीनुसार वेगळं असतं इतकंच.



©️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. पंचमी शके १९४०

तळटीप: अपवादांनी वरील विवेचन स्वतःवर ओढवून घेऊ नये.

Thursday, January 17, 2019

वामपंथी भारत विखंडन ४ - कम्युनिस्टांचं आणि पितृसत्ताक पद्धतीचं एवढं काय हो वाकडं?


राजीव मिश्रांची ही पोस्ट वाचल्यावर आधी फारशी पटली नाही, कारण अनुभव त्याच्या बरोबर उलट होते. मात्र ही पोस्ट पुन्हा पुन्हा वाचल्यावर आणि बराच विचार केल्यावर त्यातला मतितार्थ लक्षात आला. अर्थात पोस्टमधे काही मुद्द्यांचा राजीवजींनी उल्लेख केलेला नाही, पण एका जुन्या लेखाची आठवण झाल्यावर ट्युब पेटली.


साम्यवादी फ्रैंकफर्ट स्कूलचा विद्वान मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम्म याच्या म्हणण्यानुसार - "आईच्या प्रेमाच्या बरोब्बर विरुद्ध वडिलांचं प्रेम असतं. वडिलांचं प्रेम हे 'अटी आणि नियम लागू' यात मोडतं. यातला सगळ्यात त्रासदायक प्रमार हा की वडिलांचं प्रेम मिळायला मुलांना त्याच्या लायक बनावं लागतं. जर तुम्ही ऐदी आणि नालायक निपजलात तर तुम्हाला वडिलांचं प्रेम मिळत नाही....पण काही झालं तरी आईचं प्रेम मात्र मिळतंच.
हे एक अचानक केलेलं निरीक्षण नव्हे, तर साम्यवादाच्या संपूर्ण विचारसरणीच्या केंद्रस्थानी असलेला हा विचार आहे. फ्रैंकफर्ट स्कूलच्या विचारवंतांचं आयुष्य बघितलं तर एकाचंही आपल्या बापाशी पटलं नाही. जवळजवळ सगळी श्रीमंत बापाची बिघडलेली कार्टी होती. त्यांच्यापैकी एकालाही कामधंदा करायची कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. सगळेच्या सगळे बापाच्या पैशावर ऐश करण्यात धन्यता मानत असत. या सगळ्यांच्या तीर्थरुपांना असं वाटत असे की आपल्या मुलाने काहीतरी कामधंदा करावा, पण हे मात्र आपल्या कष्टाने यशस्वी आणि श्रीमंत झालेल्या बापाचा दुस्वास करत.

यांच्या ऐश करण्याला काही मर्यादाच नव्हत्या. रंडीबाजी, दारूबाजी आणि सर्व प्रकारची व्यसने असलेले, आणि उपजिविकेसाठी काम करणं म्हणजे काहीतरी क्षुद्र प्रकार आहे असं समजणारे हे सम्यवादी विद्वान, आपल्या दैनंदिन खर्चाचे पैसे मात्र त्याच बापाकडून घ्यायचे. जर्मनीने युद्धात पडणे, लढणे, हरणे, आणि त्यानंतर कर्ज, गरीबी आणि मंदीत बुडणे या प्रकारांचा कुठलाही विपरीत परिणाम न झालेल्या गर्भश्रीमंत ज्यूंच्या या नतद्रष्ट अवलादी होत. यांचं आयुष्य म्हणजे ऐषआरामाच्या एका गटारगंगेतून न्हाऊन पुन्हा दुसर्या ऐषारामाच्या गटारगंगेत उडी हेच होतं. यातूनच साम्यवाद्यांच्या क्रिटिकल थिअरीचा जन्म झाला ज्यात pratyek समाजात मान्यता असलेल्या प्रत्येक संस्कार आणि मर्यादा यांना तिलांजली देण्याचा पुरस्कार केला गेलेला आहे.
अशा नालायकांना बापाचं प्रेम कसं मिळणार होतं? वेगळं सांगायला नको की आपापल्या बापांशी यांचे संबंध ताणलेलेच होते.

समाजात विकृत लोकांचं एक वैशिष्ट्य आसतं - जे मला मिळालं नाही ते इतरांनाही मिळू नये. साम्यवाद हा एक प्रकारची विकृती असल्यामुळे त्यांनी कुटुंबव्यवस्था आणि प्रामुख्याने पितृसत्ताक पद्धतीचा सर्वनाश हेच आपलं ध्येय मानलं.

अपवाद आहेत, शिस्त हा प्रकार आपल्याकडे प्रामुख्याने वडिलांकडूनच येतो. उदाहरणादाखल सातच्या आत घरात आलं नाही तर आई भुवया उंचावून तुमच्याकडे बघेल, दहाच्या आत आलं नाही तर जेवलात का विचारेल, आणि बारा वाजून गेले तर तुमच्या खोलीत येऊन येऊन तुमच्या डोक्यावरुन हात फिरवून झोपल्याची खात्री करेल. पण वडिलांना मात्र या उशिराचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही केलेल्या कृत्यांची कारणं ही वडिलांना पटावी लागतात, अर्थात वडील accountability मागतात. याचा अर्थ वडिलांचं हृदय तुमच्यासाठी तुटत नाही किंवा त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं नाही, पण वडील त्याही आधी तुमच्या कृत्यांच्या परिणामांचा विचार करत असतात.
जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, खर्या खोट्या अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्या दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या कुठल्याही व्यक्तीला 'हिटलर' हे संबोधन वापरलं जाऊ लागलं, अगदी आपल्या वडिलांनाही. हीच कल्पना वडील आणि मुलांचे संबंध बिघडवायला उपयोग केली गेली.

म्हणूनच म्हणतो, ज्या मुलांना लहानपणी वडीलांचं प्रेम मिळत नाही, ते पुढे जाऊन साम्यवादी  होतात. शिस्त महत्त्वाचीच, पण आपल्या मुलांवर हातचं न राखता प्रेम करा, धपाटा घालणार्‍या हाताला गोंजारण्याचंही भान असू द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर करु नका, नाहीतर पोरगं कधी टुकडे टुकडे गँगवाल्या कम्युनिस्ट गँगमधे जाईल सांगता येणार नाही.

© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ११, शके १९४०