Tuesday, February 2, 2021

समानतेचं मिथक

एका स्वतंत्र समाजात आपण आपल्या क्षमतेच्या आणि योग्यतेच्या बळावर जे मिळवायचं ते मिळवू शकतो. आता हे मात्र खरं की सगळ्यांच्या क्षमता आणि योग्यता वेगवेगळ्या असल्याने सगळ्यांच्या कर्तृत्वाचा परीघही वेगवेगळा असू शकतो.

स्वातंत्र्य आणि असमानता हातात हात घालून येतात. मात्र प्रत्येक गुलाम हा समान असतो. समाजवाद हा तुम्हाला गुलाम बनवतो.

आपल्या पुलंचे अंतु बर्वा म्हणतात त्याप्रमाणे:

"अहो, कसला समाजवाद! समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून... म्हणून काय थोट्या पांडूच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणारेत काय? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय? तो तसाच राहायचा! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं दोंद आत नाही गेलं! हे डावंउजवं राहायचंच समाजात! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं, हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

आणि साम्यवाद हा गुलामी चांगली कशी हे मनावर बिंबवतो. आपण हलाखीच्या जगण्यातून वर आलं पाहिजे हा विचार तुमच्या मनात येऊच न देता आपण हलाखीत आहोत म्हणजे इतरांनाही त्याच पातळीवर आणण्याची वृत्ती तुमच्यात साम्यवाद बाणवतो. 

मग चित्रात दाखवल्याप्रमाणे काम करायची क्षमता नसेल तर कामच नको ही वृत्ती अखेर तुम्हाला भिकेला लावते.

प्रेरणा: डॉ राजीव मिश्रा

🖋️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, January 19, 2021

साम्यवाद आणि भंपकपणा: मोदी, हिटलर, आणि फॅसिझम

आपण अनेकदा बघतो की डावे आणि इतर विरोधक मोदीजी त्यांच्या मनासारखे वागत नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवताना हिटलर आणि फॅसिस्ट म्हणतात. असं म्हणताना हिटलरला सरकटपणे फॅसिस्ट (Fascist) ठरवलं जातं. हे कितपत सत्य आहे? मुळात हे बरोबर आहे की नाही? हिटलर खरंच फॅसिस्ट होता का? बहुतांश लोकांना या शब्दांचा अर्थ किंवा फरकच  मुळात कळत नसतो ही डाव्यांनी निर्माण केलेल्या इंग्रजीत ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो त्याची कमाल आहे.

चला, काही मूलभूत तथ्यांकडे आपण पाहू. 

(१) हिटलरच्या पक्षाचं नाव होतं National Socialist German Workers' Party (जर्मन नावः Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei किंवा NSDAP).
(२) मुसोलिनीच्या पक्षाचं नाव होतं National Fascist Party (इटालियन नाव: Partito Nazionale Fascista, PNF).

लोकांना आपल्याकडे फॅसिस्ट म्हटलं की हिटलर का आठवतो? हिटलर हा प्रत्यक्षात सोशलिस्ट अर्थात समाजवादी असताना फॅसिस्ट कसा? 

इथे जरा वेगळ्या पद्धतीने विचार करुन बघूया.

दुसरं विश्वयुद्ध जिंकणार्‍या दोस्त राष्ट्रांमधला एक देश होता USSR -यूनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक्स. इथे सोशलिस्ट अर्थात समाजवादी या शब्दाला महत्त्व आहे, कारण तो रशियन विस्तारवादाचं द्योतक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकायला काढलेला एक ब्रँड आहे. 

आता पुन्हा हिटलर सोशलिस्ट होता या मुद्द्याकडे येऊ. हिटलर सोशलिस्ट होता आणि रशियन सोशलिस्ट होते तर दोघं युद्धात विरुद्ध पक्षात कसे? हिटलर जरी सोशलिस्ट असला तरी त्यात त्याची स्वतःची अशी राजकीय आणि आर्थिक विचारसरणी होतीच की. Gottfried Feder नामक एक व्यक्ती त्याचा आर्थिक सल्लागार होता, आणि त्याचं Manifesto for abolition of interest slavery हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. अर्थात, हिटलर हा पूर्णपणे फेडेरच्या सल्ल्याने चालत असे असं नाही, त्याचे इतर सल्लागार होतेच. एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करु इच्छितो की इथे ना हिटलरचं समर्थन आहे ना फेडेरचे. इथे फक्त लक्षात आणून द्यायचा उद्देश आहे की ज्यू लोकांच्या खर्‍या खोट्या 'व्याजखोर सावकारी पाशा'विरोधात त्याने जर्मनीत रान उठवून जर्मन जनतेला त्यांच्याविरुद्ध भडकावण्यात तो यशस्वी ठरला होता. आता ज्यू लोक खरंच व्याजखोर होते का याचा आत्ता इथे पुरावा सादर करणं अवघड आहे, पण पूर्ण युरोपात ज्यू आपल्या व्याजखोर सावकारीसाठी बदनाम होते हे मात्र तत्कालीन संदर्भ आणि साहित्यातून आपल्याला दिसतं. याचं ठळक उदाहरण म्हणजे शेक्सपियरने देखील आपल्या 'मर्चंड ऑफ व्हेनिस' या नाटकातला शायलॉक हा खलनायक ज्यूच दाखवला होता.

आता सोशलिझमकडे परत येऊया. हिटलरच्या पक्षाच्या नावात समाजवादी हा शब्द होता आणि आपल्या घोषणापत्रात त्या पक्षाने समाजवादाच्याच मार्गाने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हिटलर स्वतःला खराखुरा समाजवादी म्हणवून घ्यायचा आणि रशियाच्या समाजवादाला 'बोल्शेविक कम्युनिझम' असं म्हणून हिणवायचा. असं असलं तरी साम्यवाद्यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी शय्यासोबत करण्यात कुठलाच विधीनिषेध बाळगला नाही. 

इथे डावे/साम्यवादी यांचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल आणि ते म्हणजे आपल्या विचारसरणीला पर्याय किंवा प्रतिस्पर्धी उभा राहू न देणं. हिटलरला सुद्धा सोशलिस्ट म्हणून म्हणून प्रसिद्धी मिळाली असती तर रशियन ब्रँडच्या सोशलिझमला अर्थात समाजवादाला एक पर्याय उपलब्ध झाला असता. रशियाने आपल्या ब्रँडच्या सोशलिझमचं मार्केटिंग केलं असतं आणि हिटलरने आपल्या ब्रँडच्या समाजवादाची टिमकी वाजवली असती. डाव्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजूही मंजूर नसतात (अगदी भारतात सुद्धा जे वेगवेगळे कम्युनिस्ट पक्ष आणि गट आहेत, त्यांच्यातही जी फूट पडलेली आहे, ती याच स्वरूपाची आहे). म्हणून मग त्यावेळच्या ताकदवान रशियाप्रणित समाजवाद्यांनी हिटलरला फॅसिस्ट लेबल लावून टाकलं. अर्थात हिटलर आणि मुसोलिनी यांची दुसर्‍या विश्वयुद्धात महाविनाशआघाडी झाल्यामुळे तसा प्रचार करणं हे रशियाप्रणित डाव्यांना सोपंही गेलं. त्यात भर म्हणजे साम्यवादी रशियाचं आणि हिटलरप्रणित समाजवादाशी असलेल्या वैराचं युद्धात रुपांतर झालं ते त्याने रशिया आणि जर्मनीमधे झालेला अनाक्रमणाचा करार मोडून थेट रशियावर हल्ला चढवल्यावर. पुढे विश्वयुद्धात दारूण पराभव झाल्याने जर्मन जिथे स्वतःला नाझी म्हणवून घ्यायला लाजत आणि मुख्य म्हणजे घाबरत होते तिथे साम्यवादी रशियाचा हा प्रचार रोखायची इच्छा होणे तर सोडाच आणि संधी सुद्धा कुणालाच मिळाली नसली तर आश्चर्य नव्हतं. 


इथे नाझी लोकांची भलामण करण्याचा हेतू नाही. फक्त डाव्यांच्या कंपूतील विसंवाद आणि शत्रुत्व दाखवायला वरील उदाहरण दिले. नाझी लोकांनी की पापं केली आहेत त्याबद्दल त्यांना मिळालेल्या शिक्षा सुद्धा सौम्यच म्हणायला हव्यात. 

Umberto Eco नामक एक प्रसिद्ध कम्युनिस्ट 'विचारवंत' होऊन गेले. त्यांनी फॅसिझमची १४ लक्षणे लिहीली आहेत. Ur-Fascism अशा नावाने शोध घेतल्यास सहज सापडतील. ती वाचली आणि एकंदर साम्यवादाचा इतिहास बघितला तर नाझी आणि साम्यवादी हे सरळसरळ एकाच माळेचे मणी असल्याचं लक्षात येईल. लालभाई असोत की हिरवे, तुम्हाला पर्याय मिळू देत नाहीत. तुमच्याकडे जी व्यवस्था आहे तिचे दोष सतत तुमच्या पुढ्यात उगाळत राहतील. तुम्हाला सतत उचकवत राहतील की तुमच्या समस्येचे कारण तुम्ही स्वीकारलेली व्यवस्था आहे आणि ती उलथवून लावणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांची व्यवस्था स्वीकार केलीत की तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. त्यांची व्यवस्था आल्यावर तुमच्या समस्या जराही सुटल्या नाहीत आणि तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत केलीत तर चक्क तुम्हालाच एक समस्या ठरवून संपवलं जाईल. कारण आम्ही समस्या संपवतो हे ते नेहमी गर्वाने सांगत असतात (गंमतीची गोष्ट अशी की समाजवाद/साम्यवाद स्वीकारलेल्या एकाही देशाचं आजवर भलं झालेलं नाही उलट तो देश आर्थिक खड्ड्यातच गेलेला आहे ही गोष्ट वेगळी).  

रशियन डाव्यांचं पाप हे आहे की फॅसिझमला लक्ष्यस करण्याच्या नादात त्यांनी राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीला सुद्धा जवळजवळ एखाद्या गुन्ह्यासारखं बदनाम केलं. पण मग मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट का म्हणतात? सोपं आहे. हिटलरच्या जर्मनीचा नाझी पक्ष आणि इटलीच्या मुसोलिनीचा फॅसिस्ट पक्ष हे दोन्ही प्रखर राष्ट्रवादी आणि देशभक्त होते. यातूनच प्रेरणा घेऊन मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं जातं, कारण मोदी हे इतर पंतप्रधानांपेक्षा कडक शिस्तीचे आणि प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रभक्त आहेत, तसंच ते जनतेतही या ना त्या कारणाने राष्ट्रभावना जागृत करत असतात. आजही कुणाचा आवाज बंद करायचा असेल तर त्याला फॅसिस्ट म्हटलं की गप्प करता येतं. एखादा फारच चिवट निघाला तर तू राष्ट्रवादी आहेस म्हणजे तू फॅसिस्ट आहेस हे सिद्ध झालं असं होतं. थोडक्यात, राष्ट्रवाद हा फॅसिझ्मला जोडणे आणि त्या अनुषंगाने नॅरेटिव्हची मांडणी करण्यात डाव्यांनी इतरांवर घेतलेली आघाडी लक्षणीय आहे. कम्युनिस्ट किती नीच असतात हे या उदाहरणावरुन आपल्याला लक्षात येईल. या बाबतीत कम्युनिष्ठांची स्पर्धा फक्त कौमनिष्ठच करु शकतात.

तात्पर्यः आता कुणी मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं की हिटलर आणि मुसोलिनीच्या पक्षांची पूर्ण नावे आणि सोवियत रशियाचे पूर्ण नाव तोंडावर फेकून मारा. 

पुढच्या लेखात फॅसिझमबद्दल विस्ताराने पाहूया.

© मंदार दिलीप जोशी

ता.क.: हिटलर आणि शिस्त आणि राष्ट्रवाद यांबद्दल उहापोह करणारा आणखी एक लेख इथे वाचता येईल.

Friday, January 15, 2021

डावे डोनाल्ड ट्रंप यांच्या मागे हात धूवून का लागले आहेत?

डावे डोनाल्ड ट्रंप यांच्या मागे हात धूवून का लागले आहेत? ― याचं सरळ सोपं उत्तर हे आहे की डोनल्ड ट्रम्प पैसेवाले आहेत आणि डाव्यांच्या विरोधात राजकारणात उतरण्यासाठी पैसा खर्च करायला स्वतःच्या खिशात हात घातला आहे. हाच पैसा त्यांनी डाव्यांसाठी खर्च केला असता तर जॉर्ज सोरॉस सारखे ते ही डाव्यांच्या गळ्यातले ताईत बनले असते. डोनाल्ड ट्रम्प हा माणूस राजकारणात 'बाहेरचा माणूस' आहेत. अर्थात, राजकारण हा व्यवसाय नाही. ट्रम्प हे एक असे व्यावसायिक आहेत ज्यांनी खड्ड्यात जाऊ पाहणारा देश बघून सात्त्विक संतापाने राजकारणात उडी घेतली. राजकारणात उतरण्यासाठी नितांत आवश्यक अशी अर्थशक्ती त्यांच्याकडे होती, आणि ती देशासाठी खर्च करावी अशी इच्छा होण्याइतकी प्रखर देशभक्ती सुद्धा. (कृपया पक्षनिधी साठी देणग्या वगैरे गप्पा इथे नकोत, इंग्लंड आणि अमेरिकेत राजकारणात निवडणुका कशा होतात त्याचा अभ्यास करा आणि मग बोला).

अमेरिकन जनतेला हीच गोष्ट आवडली. ट्रम्पने लोकांना पैसे वाटले नाहीत, की लोकांकडून मतं विकत घेतली नाहीत. पण त्यांनी दिलेली, "Let's Make America Great Again" ही घोषणा लोकांच्या हृदयाला भिडली आणि त्यांच्यातल्या देशभक्तीला आणि २०१६ मध्ये त्यांना मत दिलं कारण त्यांना खरंच अमेरिकेला पुन्हा ग्रेट बनवायचं होतं. 

डाव्यांना एक गोष्ट सहनच होत नाही आणि ती म्हणजे अवहेलना. ट्रम्प मिडियाच्या प्रभावाखाली कधीच आले नाहीत, उलट ते माध्यमक्षेत्रातल्या मोठमोठ्या ब्रँडना त्यांची लायकी दाखवून देत असत. त्यांचीही ट्रम्प यांच्यावर खुन्नस आहेच.

काही दिवसांपूर्वी एक माहिती मिळाली की भारतात कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे नाहीत, तर हसरत मोहानी होते आणि त्यांच्या नजरेत कम्युनिझम हा उपरवाला नसलेला शांतीधर्मच होता आणि अवहेलना झाल्यावर शांतीधर्म कसं प्रत्युत्तर देतो हे वेगळं सांगायला नको. औरंगजेबाला सरमदने आदर दाखवला नाही म्हणून त्याने सरमदचं डोकं कलम करवलं होतं. 

ट्रम्प यांच्याशी या गोष्टींचा संबंध इतकाच की डावे अशा व्यक्तीला सहनच करु शकत नाहित आणि त्याला संपवून दहशत निर्माण करण्याकडेच त्यांचा कल असतो. हत्या शरीराचीच होईल असं नाही, 

माणसाचा आत्मा आणि त्याची कीर्ती या दोन्हीची हत्या करणे यात डाव्यांचा हातखंडा आहे. आत्म्याला नाही मारु शकले तरी एखाद्या माणसाला सार्वजनिक जीवनातून संपवून त्याची कीर्ती नष्ट करणे याला डाव्यांच्या दृष्टीने जास्त महत्त्वं असतं. भारतात काही राजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही ढळढळीत उदाहरणे आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक धक्का देऊन आत्महत्या करायला प्रवृत्त करायचे नक्की प्रयत्न होतील आणि त्याला सामाजिक न्याय नामक गोंडस नावही दिलं जाईल. ट्रम्प यांच्यासाठी काम केलेले किंवा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेले लोक यांची यादी बनवून त्यांना त्रास देण्याच्या धमक्या सुरु झालेल्याच आहेत.

माणसाला मृत्यूपेक्षा जास्त भय असतं दारिद्र्य आणि चारित्रहननाचं. ट्रम्प यांना बरबाद केल्यावर 'डाव्यांशी पंगा घेण्याचा परिणाम काय होतो बघा' असं सांगून इतर श्रीमंत व्यावसायिकांना धमकावलं जाईल. 

German Propoganda Pamphlet Image from WW2

सोबत जोडलेलं चित्र म्हणजे दुसर्‍या विश्वयुद्धातलं जर्मन सैन्यविभागाचा प्रसिद्धी विभागाचं पत्रक आहे. यात पहिल्या विश्वयुद्धात अपंगत्व आलेला एक सैनिक भीक मागताना दाखवला आहे. दिसायला तो सफरचंद विकतोय, पण तो इतका दीनवाणा होऊन त्याची सफरचंद विकत घेण्याची विनवणी करतो आहे की ते सेल्स पिच न वाटता 'वाईच दे गं माय' असं आर्जव अधिक वाटतं आहे. हे आणि अशी अनेक पत्रके दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांना हतोत्साहित करायला त्या काळी जर्मनीकडून पसरवली गेली. त्यांचा उद्देश एकच गोष्ट ठसवणे हा होता, की 'देशासाठी लढून शेवटी तुमची ही अवस्था होईल आणि तुम्ही भिकेला लागाल, म्हणुन देश वगैरे खड्ड्यात गेलं, लढून काहीच फायदा नाही.' 

याचा ट्रम्प यांच्याशी काय संबंध हे कळलंच असेल तुम्हाला. 

डाव्यांचे मनसूबे उघडउघड कळत आहेतच, पण आता ते विफल करणे या करता मात्र अमेरिकन जनतेकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

तिथे जे व्हायचं ते कळेलच, आपल्याला इथे मात्र सद्ध्याच्या सरकारच्या बाजूने कंबर कसून उभं रहावं लागेल. ट्रम्प यांच्या पराभवानंतर इथल्या डाव्यांना आणि शांतीदूतांना जरा जास्तच उत्साह निर्माण झाला आहे. भारताला आपलं भविष्य सुरक्षित करायचं असेल प्रत्येक निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यावा लागेल आणि प्रत्येक पाऊल आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकावे लागेल. 

🖋️ मंदार दिलीप जोशी

Sunday, January 10, 2021

शहरी नक्षलवाद आणि डाव्या पत्रकारांचा कावेबाजपणा

अजित गोगटे नामक 'जेष्ठ पत्रकारांनी' लिहिलेला कुबेरी थाटाचा एक मानवतावादी अग्रलेख आजच वाचनात आला. कुबेरांना सहसा न जमलेला प्रकार मात्र प्रस्तुत पत्रकार महाशयांनी आपल्या लेखातून करून दाखवला आहे. कुबेर आपल्या अग्रलेखात दर दोन वाक्यांनी कोलांट्याउडी मारतात, पण गोगटेंनी आपले खरे रंग शेवटच्या वाक्यपर्यंत थांबण्याची हुशारी दाखवली आहे.

कैद्यांना मिळाला सुखाने घरी मरण्याचा हक्क!

मरणासन्न कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यासंबंधी एका कोर्टाच्या मानवतावादी निर्णयावरून बेतलेला या विषयाचा उहापोह केल्याचा देखावा करणारा हा अग्रलेख असला तरी तो लिहिणाऱ्या अजित गोगोटे महाशयांचा मूळ उद्देश लेखाच्या शेवटच्या वाक्यात उघडा पडतो. 

शेवटच्या वाक्यात ते म्हणतात, "पण निदान कागदोपत्री तरी एवढी कणव आणि माणुसकी दाखविणाऱ्या त्याच केंद्रीय गृह मंत्रालयाने भीमा-कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेल्या प्रा. वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या दोन आरोपींच्या बाबतीत मात्र जी निर्दयता दाखविली ती अनाकलनीयच म्हणावी लागेल."

मरणासन्न असलेल्या सर्वसामान्य कैद्यांना आणि वरावरा राव आणि स्टॅन स्वामी यांच्यासारख्या अत्यंत धोकादायक शहरी नक्षलवाद्यांना एकाच रांगेत बसवणे ही गोगटे साहेबांसाठी खूप सोपी व सामान्य गोष्ट असावी.

किंबहुना जगण्याची आशा नसलेल्या कैद्यांची व्यथा आपण मानवतावादी भूमिकेतून मांडत आहोत असा आव आणूनच हा लेख लिहिला असावा असा संशय येतो, नव्हे आपली खात्रीच होते. तसं करण्याच्या नादात या दोन शहरी नक्षलवाद्यांना स्वतःच मरणासन्न असल्याचे ध्वनित करून त्यांच्याबद्दल अज्ञ वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करणे हा मूळ हेतूच या शेवटच्या वाक्याच्या समर्थनार्थ लिहिला आहे असे वाटू लागते.

एखाद्या साध्या केसमध्ये सवलत मिळवायची आणि मग तोच न्याय या शहरी नक्षलवाद्यांना लावायला सरकारला भाग पाडायचं हा डाव्यांचा डाव असणारच आहे, त्याला समर्थन म्हणून असले लेख प्रसवणे हे कार्य कर्तव्य समजून केले असले तर त्यात आश्चर्य काय? नाहीतरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजतागायत आधी घोटाळ्याची आखणी करायची आणि मग तिच्यावर सरकारी योजनेचे आवरण चढवून आपल्यासमोर सादर करण्याची परंपरा आपल्याकडे आहेच.

या दोघांच्या शारीरिक अवस्थेचे वर्णन गोगटे साहेब "दोन वयोवद्ध व गंभीर आजारी असलेल्या.." असे करतात. क्षणभर असे गृहित धरू की हे दोघे खरंच मरणासन्न आहेत, पण त्यामुळे बहुसंख्य शांतताप्रिय जनतेला, गंभीर आरोपांत तुरुंगात असलेल्या वरावरा राव आणि स्टॅन स्वामी या दोन शहरी नक्षलवाद्यांच्या जहरी व कावेबाज विचार व शिकवणीमुळे निर्माण झालेला, होत असलेला, व होऊ शकणारा असलेला धोका हा कुठेही कमी होत नाही. कारण स्वतः सशस्त्र होऊन मैदानात उतरत नसले तरी इतरांची माथी भडकावून हातात शस्त्र घेऊन ४ महिन्याच्या बालकापासून निरपराध वृद्धांपर्यंत, व सशस्त्र दलांपासून पोलिसांपर्यंत कुणाचाही कशाही प्रकारे मुडदा पाडण्याला मार्गदर्शन करणारी, प्रोत्साहन देणारी, व अशा घटनांचे निर्लज्ज समर्थन करणारी ही विचारसरणी आपल्या शहरातल्या घरात राहून, विद्यापीठात शिकवत असताना, पुस्तके व इतर साहित्य निर्माण करत असताना आपले विषारी व विखारी विचार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पसरवण्याची ठाम शक्यता असते. 

म्हणूनच मरणाच्या दारात असलेल्या सर्वसामान्य कैद्यांना लावले जाणारे मानवतावादी निकष हे अशा प्रकारच्या वैचारिक अतिरेक्यांना लावता येत नाहीत. गोगटे साहेब शेवटच्या परिच्छेदाची सुरवात या वाक्याने करतात, "मृत्यू डोळ्यांपुढे दिसत असताना अनामिक भीतीने मनाची घालमेल होणाऱ्या माणसाला विशेष प्रेमाची व आश्वासक समुपदेशनाची गरज असते." मात्र त्यांना ज्या दोघा 'आजारी' व 'वयोवृद्ध' शहरी नक्षलवाद्यांचा पुळका आला आहे त्यांच्या विचारांनी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन हातात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे घेतलेल्या नक्षलवाद्यांनी लहान बालकांपासून ते वृद्धांपर्यंत अशा निरपराध जनतेची हत्या केली व करत आहेत त्या लोकांचा विचार केला आहे काय? निव्वळ पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरुन एखाद्या कुटुंबप्रमुखाला त्याच्या घरातून अपहृत करून जेव्हा नक्षलवाद्यांच्या 'जन अदालत' मध्ये उभं केलं जातं तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या 'मृत्यू डोळ्यांपुढे दिसत' नसतो काय? नक्षलवाद्यांच्या तावडीतून पळून गेलेल्या ताती आयतुवर राग काढायला त्याच्या चार महिन्याच्या बाळाची त्याच्या आईच्या हातातून खेचून तिच्यासमोरच त्याची लोखंडी सळ्यांनी निर्घृण हत्या होत असताना त्या माऊलीला आपल्या पोटच्या गोळ्याचा 'मृत्यू डोळ्यांपुढे दिसत' नसेल काय? त्याला त्याला तसंच पुरलं जात असताना काय वाटलं असेल तिला? इतकेच नव्हे, तर आजवर भूक लागणे ही एकमेव वेदना अनुभवणाऱ्या त्या तान्ह्या बाळाला आपल्याला नेमकं काय होत आहे ज्यामुळे या वेदना आपल्या वाट्याला येत आहेत हे कळलं तरी असेल का? अशा हत्यांच्या कृतीला आपल्या विचारांनी सक्रिय पाठिंबा देणाऱ्या व नक्षलवाद्यांशी असे सहकार्य मरेपर्यंत करत राहू शकणाऱ्या या शहरी नक्षलवाद्यांना गोगटे साहेब कोणत्या आधारावर घरी सोडायला समर्थन देतात हे अनाकलनीय आहे. या बळी पडलेल्या निरपराध जनतेबद्दल 'या शहरी नक्षलवाद्यांना घरी सोडावे' हे निर्लज्ज प्रतिपादन म्हणजेच यांचे 'विशेष प्रेम' व मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना द्यावयाला यांच्याकडे असलेले 'आश्वासक समुपदेशन' म्हणावे काय? मग अशा कैद्यांना घरी का सोडावे, व त्यांना सुखाने मरण्याचा हक्क तरी का मिळावा?

सबब, अशा प्रकारची पत्रकारिता ही एखाद्या न्यायालयाच्या एखाद्या स्तुत्य वाटणाऱ्या निर्णयाच्या आडून शहरी नक्षलवाद्यांची व पर्यायाने सशस्त्र नक्षलवाद्यांची व अराजकतेची आणि लोकशाही व्यवस्थेविरुद्ध हिंसक उठावाची भलामण करणारी असल्याने महाराष्ट्र टुडे या संकेतस्थळाला निव्वळ 'अजित गोगटे हे त्यांचे स्वतंत्र मत असून, त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.', असं म्हणून पळ काढता येणार नाही. एरवी उत्तमोत्तम लेखांची मनमानी काटछाट करणाऱ्या संपादकांना शेवटचे वाक्य उडवून लेखक महाशयांची व पर्यायाने स्वतःच्या डाव्या विचारसरणीची झाकली मूठ सव्वालाखाची ठेवता आली असती. मात्र जगभर होत असलेल्या घातक अशा डाव्या उन्मादात हात धुवून घेण्याची उबळ प्रस्तुत संकेतस्थळाच्या चालकांना आवरता आली नसेल तर ते समजण्यासारखे आहे.

म्हणूनच कायद्याच्या कचाट्यात पकडल्या जाणाऱ्या उपरोल्लेखित दोन्ही शहरी नक्षलवाद्यांबरोबरच विविध न्यायालयांच्या निर्णयांचा आधार घेऊन व मानवतावादी भूमिकेच्या आडून अप्रत्यक्षपणे नक्षलवादाचे समर्थन करणाऱ्या अशा विचारसरणीच्या घटिंगणांवर व त्यांच्या राष्ट्रघातक विचारांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेल्या संकेतस्थळांवर लक्ष ठेवणे व वेळोवेळी त्यांना व अशा इतरांना जरब बसेल अशी कारवाई करणे हे राज्य व केंद्र सरकारांनी गुप्तहेर व इतर योग्य त्या खात्यांमार्फत करणे हे राष्ट्रीय सुरक्षितता व देशाच्या एकटा व अखंडतेच्या दृष्टीने आवश्यक ठरते.

©️ मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ. १२, शके १९४२

Wednesday, December 30, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: कामगार युनियन हेच गरीबांचे मारकेरी

साम्यवाद गरिबांसाठी काम करण्याचं दिवास्वप्न दाखवून गरिबांनाच कसं संपवतो, त्याचं हे उदाहरण:

राजस्थानातल्या गंगानगरमध्ये पूर्वी असलेल्या थापर ग्रुपच्या जेसीटी कापड गिरणीची ही गोष्ट आहे.

एके काळी थापर ग्रुपने स्थापन केलेली ही उत्तर भारतातील सर्वात संपन्न अशी कापड गिरणी होती आणि त्यात जेसीटी नामक कापडाचा ब्रँड बनत असे. जेसीटीचे कॉटन कपडे संपूर्ण भारतात प्रसिद्धी पावले. गंगानगर जेसीटी अशी कापड गिरणी होती ज्यात पूर्ण कापड युनिट होतं, म्हणजे तिथे कापूस एकदा कारखान्यात गेला को तिथेच जिनिंग, प्रेसिंग नंतर तिथल्या युनिटमध्येच धागा बनत असे आणि त्यापासून तिथेच कापड तयार होत असे. थोडक्यात, कापूस अंदर डालो आणि कपडा बाहर निकालो असला परिपूर्ण प्रकार होता.

जेसीटी दणक्यात सुरू होती.

मग बिहार आणि बंगालमधून आलेल्या कामगारांनी तिथे कामगार युनियन स्थापन करायला सुरवात केली. रोजचा सूर्य उगवायचा तोच एखाद्या संप, आंदोलन, किंवा टाळेबंदीची परिस्थिती घेऊनच.

काॅमरेड नेता हन्नान मोल्ला सारख्या नेत्यांचा तिथे वावर, येणंजाणं सुरू झालं, आणि त्याच्या वरदहस्ताने काॅमरेड हेतराम सारख्या नेत्यांचा उदय झाला. कॉम्रेडांच्या भल्या आणि बऱ्याचशा बुऱ्या मागण्या पुरवता नाकी नऊ आलेल्या थापर ग्रूपने जेसीटीचा गाशा गुंडाळला. यात कुणाचं भलं झालंही असेल पण संप करणाऱ्या आणि 'अन्यायी' शेटजींच्या विरोधात घोषणा देणाऱ्या गरीब कामगारांची मात्र वाट लागली, ते देशोधडीला लागले.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सत्यानाश झाला ते वेगळंच.

जेसीटी मिल्स गंगानगर

साम्यवाद हेच करतो. नाहीतर एकेकाळी म्हणजे इंग्रजांच्या काळात भारताची प्रतिराजधानी म्हणून ओळखलले जाणारे कोलकाता शहर आज इतक्या दैन्यावस्थेत कसे?

आज शेजारचा टीचभर बांगलादेश कापडनिर्मितीत भारताच्या पुढे निघून गेला आहे. अगदी हॉलिवूडच्या चित्रपटांत सुद्धा हेटाळणीच्या सुरांत हा होईना शेजारच्या बांगलादेशची प्रसिद्दी तिथे बनणाऱ्या कपड्यांसाठी आहे.

©️ मंदार दिलीप जोशी 
मार्गशीर्ष शु पौर्णिमा, शके १९४२

Friday, December 4, 2020

कोटीच्या कोटी उड्डाणे

युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार (Global Teacher Award) काल जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.

ज्या स्टिफन फ्राय मार्फत हा पुरस्कार दिला गेला, तो अभिनेता असण्याबरोबरच इंग्लंडमधल्या मजूर पक्षाचा (Labour Party) चा सक्रिय सदस्य आहे. 

थोडक्यात समाजवादी, डाव्या विचारांचा.

स्टिफन फ्रायच्या विकीवर अधिक "रोचक" माहिती वाचायला मिळेल.

वार्की फाउंडेशन ही सनी वार्की या नॉन रेसिडेंट दुबईस्थित भारतीयाने स्थापन केलेली संस्था आहे. हा केरळी ख्रिश्चन आहे. ही संस्था अंडरप्रिविलेज्ड मुलांना मिळणाऱ्या "शिक्षणाचा दर्जा उंचावण्याकरता" काम करते. जगभरातल्या विकसनशील देशातील शेकड्यानी शिक्षक या संस्थेत प्रशिक्षण घेतात. 

याच सनी वार्कीने काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या बिल क्लिंटन यांच्या क्लिंटन फाउंडेशनला सहा मिलियन डॉलर्सची देणगी जाहीर केली

सद्ध्या याच डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बिडेन आणि कमला हॅरीस राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत. पक्ष कुठलाही असो, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण फारसं बदलत नाही. पण डेमोक्रॅटिक पक्ष हा जरा जास्त पाकिस्तान धर्जिणा आहे आणि हॅरीस यांची काश्मीरबद्दलची मते गुगल करू शकता.

हा पक्ष थोडक्यात थोडक्यात समाजवादी, डाव्या विचारांचा.

आता पुरस्काराबद्दल जरासे. या पुरस्काराचे काही विजेते व्हॅटिकनला पोप महाशयांना भेटायला गेले. आता पोप महाशयांचा आणि शिक्षण क्षेत्राचा काय संबंध?


आता बिंदू जोडा. केरळी ख्रिश्चन > दुबई > प्रचंड रकमेचा पुरस्कार > जाहीर करणारा डाव्या विचारांचा अभिनेता > डाव्या विचारांच्या क्लिंटन फाउंडेशनशी लागेबांधे >  व्हॅटिकन-पोप.

सहज एक विचार आला. आधी अचानक भारतीय ललना जागतिक सौंदर्य स्पर्धांमध्ये विजेत्या ठरू लागल्या, आता अचानक गेली काही वर्षे बौद्धिक क्षेत्रांतील पुरस्कार मिळू लागलेत. गंमतच आहे एकूण. 

पुन्हा एकदा डिसले सरांचे अभिनंदन. हिंदू संस्कृती व भारतीय हितसबंधांना कुठेही धक्का न लावता ते या पुरस्काराच्या रकमेचा विनिमय करतील अशी भाबडी आशा बाळगायची का? 

©️ मंदार दिलीप जोशी
कार्तिक कृ ४, शके १९४२


Thursday, November 19, 2020

वरावारा राव: शहरी नक्षलवादाचा खुनशी चेहरा

जे या प्रोफेसर वरावारा राव नामक इसमाला ८१ वर्षांचा कवी म्हणून सहानुभूती गोळा करू पाहतात, तो किती निर्लज्जपणे आणि मुख्य म्हणजे थंडपणे नागरिक आणि सशस्त्र दलाच्या हत्यांचं समर्थन करतो आहे बघा. 

अशा लोकांना तत्काळ मृत्युदंड देण्यासाठी कायद्यात तातडीने सुधारणा केली जायला हवी.

©️ IDream Telugu News ला दिलेल्या मुलाखतीचा काही भाग.


🖋️  मंदार दिलीप जोशी

Monday, November 2, 2020

शॉन कॉनरी - झाले बहु होतील बहु परी यासम हाच अर्थात नोबडी डझ इ़ट बेटर

कुठल्याही मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वडिलांकडून काही गोष्टींचा वारसा मिळतोच. स्थावर जंगम मालमत्ता ही झाली संपत्तीची गोष्ट, पण इतरही अनेक गोष्टी असतात. आमच्या तीर्थरुपांकडून चार प्रमुख गोष्टींचा वारसा मिळाला तो म्हणजे शिस्त व वक्तशीरपणा, व्यवस्थितपणा, वाचनाची आवड, आणि जेम्स बाँड.

त्या काळात रंगीत टीव्ही घेऊन तसा काही काळ लोटला होता, आणि मग आमच्याकडे आला होता व्हीसीपी अर्थात व्हिडिओ कॅसेट प्लेअर. त्यावर अनेक दर्जेदार सिनेमे बघायला मिळाले पण नंतर बाबांनी रांग लावली ती जेम्स बाँडच्या सिनेमांची. व्हिडिओ कॅसेट भाड्याने देणार्‍या दुकानांतून कॅसेट आणून बघितलेला जेम्स बाँडचा बघितलेला पहिला सिनेमा म्हणजे You Only Live Twice हा मात्र जेम्स बाँडचा पहिला नव्हता. मात्र त्यात खोटं मरुन पुन्हा जिवंत झालेल्या शॉन कॉनरीचं कमांडर बाँडचं नौसैनिकाच्या गणवेशातलं देखणं रुपडं मनात भरलं ते कायमचंच. यानंतर मनात ठसलेलं दृष्य म्हणजे १९६२ साली आलेला पहिल्या बाँडपटातलं डॉक्टर नो मधलं जेम्स बाँड त्याचा प्रसिद्ध "माय नेम इज बाँड, जेम्स बाँड" हा संवाद म्हणतो ते दृश्य.


इंग्लंडची लोकं बाकी काही करोत न करोत बोलबच्चन या प्रकारात वाकबगार आहेत. नाव आणि ००७ या कोड नंबर सकट काहीच सिक्रेट नसलेला हा सिक्रेट एजंट कदाचित एरवी हास्यास्पद ठरला असता, पण संबंधितांनी हे रसायन असं काही जुळवून आणलं की आज सहा दशके व्हायला आली तरी इंग्रजी सिनेरसिकांवरचे त्याचे गारूड अजूनही कायम आहे. या रसायनाने सिनेरसिकांवर खोल परिणाम केला त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे अर्थातच शॉन कॉनरी. त्याने घातलेल्या पायावर इतर नटांनी कळस चढवला नाही पण इमारतीचा विस्तार मात्र नक्कीच केला. खरं तर हे वाक्य, 'जेम्स बाँड नामक इमारतीचा शॉन कॉनरीने सुरवातीलाच कळस निर्मिल्यामुळे इतरांना पायापर्यंत जाण्यापलिकडे आणि कळसाला शोभेलसं आपलं काम हवं याकडे लक्ष देण्यापलीकडे काही करण्यासारखं काम उरलं नाही' असं असायला हवं.

'जेम्स बॉण्ड'चा जनक इयान फ्लेमिंग हा कट्टर ब्रिटिश परंपरेचा पाईक होता तसेच दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश रॉयल नौदलात नोकरी करताना त्याने युद्धभूमीवरील साहसाचाही अनुभव घेतला होता. त्यामुळे जेम्स बाँड या व्यक्तीरेखेला त्याने 'ब्रिटिश'च रंगविणे साहजिकच होते. डॉक्टर नो या पहिल्या बाँडपटासाठी डेव्हिड निव्हेन या ब्रिटिश अभिनेत्याची त्यामुळेच निवड करण्यात आली होती. पण निव्हेन यानी 'मी या भूमिकेसाठी वयामुळे योग्य वाटत नाही...' (त्यावेळी ते ५२ वर्षांचे होते) असे सांगून नकार दिल्यावर मग पुन्हा सुरु झालेल्या शोधात शॉन कॉनेरी ह्या स्कॉटिश अभिनेत्याची निवड झाली. आणि पुढे इतिहास घडला.

शॉन कॉनरी बाँड सर्वाधिक लोकप्रिय का करु शकला केला याला अनेक कारणे आहेत. शॉनचे व्यक्तिमत्व आणि ब्रिटिश मर्दपाणाची त्याने पडद्यावरची बदललेली व्याख्या ही त्यातली प्रमुख कारणे होती. शॉन कॉनरीच्या बाँडमध्ये ब्रिटिशांच्या ठायी असलेला एक प्रमुख गुण म्हणजे देशाबद्दल आणि राज्यकर्त्यांबद्दल असलेला आत्यंतिक प्रामाणिकपणा हा प्रकर्षाने दिसतो. त्याच बरोबर एमआय-५ आणि बॉसने नेमून दिलेली कामगिरी कसलाही विधीनिषेध न बागळगता आणि प्रसंगी घालून दिलेला प्रत्येक नियम मोडून पार पाडणे, स्त्रीसंग करतानाही आपण हे देशासाठी करतो आहोत याचं भान बाळगणे (थंडरबॉलमधला एक संवाद आठवा: All I did was for King and Country) आणि त्यामुळे त्याच्या रंगेलपणाला आलेली एक ग्लॅमरस झळाळी ही वैशिष्ट्येही शॉन कॉनरीच्या बाँडने प्रेक्षकांच्या मनावर ठसवली. एखादा नट म्हणजे अभिनयाचं विद्यापीठ आहे असं म्हटलं जातं, त्याच धर्तीवर शॉन कॉनरी हा बाँडची भूमिका करणार्‍या प्रत्येक नटासाठी नक्कीच ती कशी करावी हे शिकवणारं अभिनयाचं विद्यापीठ ठरला हे नक्की.

नट पडद्यावर काय बोलतो हे संवाद लेखक ठरवत असेल, पण शॉन कॉनरी ज्या पद्धतीने अगदी मिष्किल संवाद अत्यंत गंभीरपणे म्हणायचा त्याला तोड नव्हती. याचं उदाहरण म्हणून डॉक्टर नो मधलं एकच दृश्य पुरेसं आहे. त्याला विमानतळावर घ्यायला पाठवलं आहे असं भासवणार्‍या ड्रायव्हर-कम-गुंडाला ठार करुन त्याची बॉडी त्याच गाडीत टाकून जेम्स बाँड ब्रिटिश दूतावासासमोर गाडी उभी करतो आणि दाराशी उभ्या असलेल्या गार्डला "गाडी लाव" असं निष्काळजीपणे सांगून तसंच पुढे ड्रायव्हरच्या मृतदेहाकडे अंगुलीनिर्देश करत "याच्यावर लक्ष ठेव, कुठे पळायला नको" असं सांगतो हा संवाद शॉन ज्या पद्ध्तीने म्हणतो ते बघा म्हणजे मी काय म्हणतो आहे त्याची खात्री पटेल.

अभिनयाचा फार विस्तीर्ण परीघ नसतानाही रसिकांच्या मनावर एका व्यक्तिरेखेमुळे इतकी खोल छाप पाडणारा शॉन कॉनरी हा एक विरळा अभिनेता होता हे मात्र खरेच. शॉन कॉनरीच्या जेम्स बाँडपलीकडे भूमिका गाजल्या तरी तो आज प्रामुख्याने ओळखला जातो तो जेम्स बाँडमुळेच. बाँडपलीकडे त्याने केलेल्या मला आवडलेल्या भूमिका म्हणजे:

(१) मध्ययुगीन ख्रिस्ती चर्चेसच्या काळात घडलेली खुनांची मालिका एक प्रवासी प्रिस्ट (मंक) कसा यशस्वीरीत्या उलगडतो त्याची चित्तथरारक गोष्ट. हू-डन-इट छापाचा चित्रपट. यातली मध्यवर्ती भूमिका अर्थातच शॉन कॉनरीने साकारलेली त्या प्रवासी मंकची.

(२) या लेखात दुसरा असला तरी बाँडपट वगळता शॉनची मला सर्वाधिक आवडलेली भूमिका म्हणजे 'मॅन हू वूड बी किंग' हा जबरदस्त चित्रपट. यात सहाय्यक अभिनेता म्हणून शॉन ज्याला जवळचा मित्र मानत असे असा आणखी एक ताकदीचा अभिनेता मायकल केन आणि शॉन यांनी जी धमाल उडवून दिली आहे त्याला तोड नाही.

(३) एकाच वेळी सुंदर, गोड, आणि मादक वाटणार्‍या कॅथरीन झेटा-जोन्स बरोबर प्रेक्षकांना पटावा असा या वयात देखील रोमान्स करणारा शॉन कॉनरीचा धाडसी चोर ज्यात आहे तो 'एन्ट्रॅपमेन्ट'.

(४) शामळू निकोलस केज हा ज्या सिनेमात शॉन कॉनरीच्या छत्रछायेत चक्क अ‍ॅक्शन हीरो वाटून जातो तो 'द रॉक' हा चित्रपट. गंमत म्हणजे यात त्याने तारुण्यात अमेरिकेने अटक केलेल्या ब्रिटिश गुप्तहेराची भूमिका केली आहे.

(५) 'द हंट फॉर रेड ऑक्टोबर' या चित्रपटातला शॉनने साकारलेला अमेरिकेकडे 'डिफेक्ट' होऊ इच्छिणारा रशियन आण्विक पाणबुडीचा कॅप्टन.

(६) 'द अन्टचेबल्स' मधला शॉनने रंगवलेला तडफदार धाडसी कॉन्स्टेबल. 

जाता जाता पुन्हा जेम्स बाँडकडे वळूया. 'ऑन हर मेजेस्टीज सिक्रेट सर्विस' मध्ये लेझन्बीने चित्रपटाचा असा काही चुथडा केला होता की त्या व इतर काही कारणांनी जॉर्ज पुढचे बाँडपट करणार नाही हे नक्की झाल्यावर, आणि जॉन गॅविन या ००७च्या भूमिकेसाठी निवड झालेल्या नटाबद्दल युनायटेड आर्टिस्ट्स या स्टुडियोतले बॉसेस साशंक असल्याने पुन्हा शॉन कॉनरीला 'जेम्स बाँडच्या भुमिकेसाठी 'डायमंड्स आर फॉरेव्हर'मध्ये पुन्हा पाचारण करण्यात आलं. या चित्रपटाने चक्क बाँडपटांच्या यादीतील सर्वाधिक गल्ला जमवणार्‍या यादीत चक्क तिसर्‍या क्रमांकावर उडी घेतली. इतकंच नव्हे तर नियमित बाँड फ्रॅन्चायझीचा भाग नसलेल्या पण कादंबरीतून चित्रपटनिर्मितीचेहक्क ज्याच्याकडे होते त्या केव्हीन मॅक्लॉरी (Kevin McClory) ने 'थंडरबॉलचा' रिमेक 'नेव्हर से नेव्हर अगेन' असं बारसं करुन केला तो त्यावेळी तब्बल ५३ वर्ष वयाच्या शॉनला घेऊनच.

सर्वोत्कृष्ठ बाँड कुठला यावर माझी काही मित्रांशी चर्चा झाली. त्यात जॉर्ज लेझन्बीला ताबडतोब निकालात काढण्यात आले. रॉजर मूरचा मिश्किल बाँड अनेकांना प्रिय असला तरी टीकाकार आणि खुद्द रॉजर मूर साहेबांनीच कबूल केल्याप्रमाणे कधी डावी भुवई उडवणे तर कधी उजवी भुवई उडवणे यापलीकडे त्यांचा अभिनय बाँडपटात तरी कधी दिसला नाही असं अनेकांचं मत पडलं. टिमथी डॅल्ट्न हा व्यक्तिश: मला खूप आवडत असला तरी बाँडला अतिगंभीर करण्याचा दोष त्याला लागू शकतो. पिअर्स ब्रसनन हा सर्वोत्कृष्ठ बाँड आहे असं एका मित्राचं मत आहे आणि ते पटण्यासारखं असलं तरी त्याच्यात बाँडला लागणारा जो निष्ठूरपणा असतो तो पुरेसा दिसत नाही हे माझं मत. आणि डॅनियल क्रेगबद्दल न बोललेलं बरं, त्याच्यावर तर चक्क craignotbond क्रेग नॉट बाँड अशी त्याला बाँडची भूमिका मिळू नये किंवा मिळालेली रद्ध व्हावी म्हणून मोहीम चालवायला स्वतंत्र संकेतस्थळच उघडलेलं होतं. आमच्या घरी तो 'चम्या दिसतो' यावर एकमत आहे.

यातलं चूक किंवा बरोबर हे बाजूला ठेवून या मतमतांरांमध्ये इतकं वैविध्य का आहे याचं कारण शोधाताना पुन्हा पुन्हा आपण शॉन कॉनरीपाशीच येऊन थांबतो. याचं गारूड इतकं आहे की माझ्या मुलालाही सिनेमातलं इंग्रजी अजिबात कळत नसताना हार्ड् डिस्कवर शॉन कॉनरी वगळून दुसर्‍या कुणाचाही बाँडपट लावला तरी "बाबा हा अ‍ॅक्टर नको तो आधीचा लावा" असं म्हणावंसं वाटतं यातच सारं आलं.

अशा या अपरिमित आनंद देणार्‍या, सिनेरसिकांच्या मनातील एकमेव जेम्स बाँड असलेल्या आणि शेवटपर्यंत स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या शॉन कॉनरीला श्रद्धांजली.

© मंदार दिलीप जोशी

टीपः यात मला काय वाटतं इतकंच लिहीलेलं आहे. कारण शॉन कॉनरीचा प्रवास हा कामगार, बॉडी बिल्डर, मॉडेल, ते अभिनेता हा कसा झाला हे अनेक ठिकाणी अनेक वेळा आधीच नोंदवलं गेलं असल्याने त्यात नवीन काहीच नाही.

Saturday, October 24, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: निरुपम सेनच्या कर्माची फळे

सैनबारी हे नाव ऐकलंय? सैनबारी हे कम्युनिस्टांनी केलेल्या एका घृणास्पद हत्याकांडाबाबत कुप्रसिद्ध आहे.

१७ मार्च १९७० रोजी झालेल्या या हत्याकांडात प्रणब आणि मलय या दोन भावांची कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी ― हो, कम्युनिस्टांचे असतात ते कायम कार्यकर्तेच, मग किती का मुडदे पाडेनात; आणि संघाचे सेवाभावी स्वयंसेवक असले तरी ते असतात कायमच गुंड ― तर, या दोन भावांचा CPI (M) च्या कार्यकर्त्यांनी घरात घुसून खून केला. त्यानंतर घरातल्या भातात प्रणब आणि मलय यांचे रक्त मिसळले आणि अशा प्र्कारे रक्ताने माखलेला भात त्या दशतवाद्यांनी त्यांच्या आईच्या मुखात कोंबला. याच घटने दरम्यान त्यांनी रेखा रानी सेन या महिलेचे पती श्री नब कुमार सेन यांचे डोळे धारदार शस्त्रांनी खाचेतून बाहेर काढले. याच हल्ल्यात या मुलांच्या शिकवणी घ्यायला आलेल्या जितेन्द्रनाथ राय या शिक्षकाचीही त्याच धारदार शस्त्रांनी हत्या केली. कम्युमिस्ट दहशतवाद्यांनी श्री नब कुमार सेन यांचीही वर्षभराने हत्या केली.

आपल्या दोन तरुण मुलांची डोळ्यांदेखत झालेली हत्या आणि तद्नंतर भोगावा लागलेला हा प्रसंग यांचा त्या माऊलींवर काय मानसिक आघात झाला असेल याची आपल्याला कल्पनाही येऊ शकणार नाही.

या भावांच्या हत्येच्या पवित्र लाल कार्याचे नेतृत्व करत होते CPI (M) चे 'कार्य'कर्ते निरुपम सेन.

असा हा निरुपम सेन तीन वेळा आमदार म्हणून पश्चिम बंगालच्या विधानसभेवर निवडून गेला आणि त्याने चक्क दोन वेळा वाणिज्य व उद्योग मंत्रीपदही भूषवले.

पण निरुपम सेन या दहशतवाद्याला त्याच्या कर्माची फळे ही अखेर भोगावी लागलीच. कायदेशीर नव्हे पण कम्युनिस्ट न मानत असलेल्या परमेश्वराचा त्यांच्यावर २०१३ साली आघात झाला. मेंदूत झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांना आंशिक स्वरुपात त्यांचे अर्धांग लुळे पडले. दोन-तीन वर्षांनी त्याच्या परिस्थितीत आणखी बिघाड होऊन त्याला हर्निया झाला. आधीच पक्षाघातामुळे (paralysis) शारीरिकदृष्ट्या संपूर्णपणे परावलंबी आयुष्य जगत असलेल्या निरुपम सेन याची अवस्था आणखी बिकट झाली.

Nirupam Sen in his youth, and now in September 2018

या फोटोत निरुपम सेन यांचा तेव्हाचा अंगात रग असलेला आणि सप्टेंबर २०१८ मधला रोगग्रस्त अवतार तुम्हाला दिसेल. अशा रुग्णांची अगदी रोजची नित्यकर्मे करतानाही प्रचंड फरफट होते आणि असे जगणे जे इतके वेदनादायी असते की त्यापेक्षा मरण बरे अशी इच्छा जवळजवळ रोज होते पण मरण येत नाही. 

सप्टेंबर २०१८ साली सैनबारी हत्याकांडाबद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हाच त्या हल्लेखोरांचा म्होरक्या निरुपम सेनला असेच आणि याच स्थितीत दीर्घायुष्य मिळावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली होती, पण पाच वर्ष मरणयातना भोगल्यावर मृत्यूला त्यांची दया आली असावी, कारण त्यानंतर तीनच महिन्यांनी या यातनांतून त्याची कायमची सुटका झाली. कोलकाता इथल्या सॉल्ट लेक मधल्या एका "खाजगी" रुग्णालयात "कम्युनिस्ट पार्टी" ऑफ इंडिया मार्कसिस्ट म्हणजे CPI (M) चे दहशतवादी/कार्यकर्ता२०१८ निरुपम सेन २४ डिसेंबर २०१८ रोजी मेला. 

म्हणजे आजारी असल्यावर साम्यवादी राज्यात असलेल्या खाजगी रुग्णालयात त्याने उपचार करुन घेतले. यात काही नवीन नाही, भंपकपणा ही  कम्युनिस्टांची उज्ज्वल परंपराच आहे. ताजे उदाहरण म्हणजे केरळचे साम्यवादी मुख्यमंत्री पिनारयी विजयन हे उपचारांसाठी भांडवलशाही असलेल्या अमेरिकेत जात असतातच. 

कर्मायत्तं फलं पुंसां बुद्धिः कर्मानुसारिणी |
तथापि सुधिया भाव्यं सुविचार्यैव कुर्वता ||

अर्थात: माणसाची बुद्धी [प्रारब्ध] कर्माला अनुसरून चालते. [तसंच वागण्याची आपल्याला इच्छा होते.]; आपण पूर्वी जे केलेल असतं, त्याप्रमाणेच फळे भोगावी लागतात [असं असलं तरीही] माणसानी कुठलही काम करताना नीट विचार करूनच काय ते करावं. [प्रारब्धाप्रमाणे घडेल असं म्हणून निर्बुद्धपणे वागू नये.]

टीप: सेन कुटुंबीय काँग्रेस समर्थक होते, आणि त्याचीच शिक्षा कम्युनिस्ट 'कार्यकर्त्यांनी' त्यांना दिली. हा इतिहास जे एन यु मध्ये जाऊन कम्युनिस्टांचीच पिलावळ असलेल्या 'भारत तेरे तुकडे होंगे' गँगचे समर्थन करणाऱ्या आणि अटकेत असलेल्या/उजळ माथ्याने फिरणार्‍या शहरी नक्षलवाद्यांची पाठराखण करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना माहित नसेलच असं नाही, पण निदान आपला नेता कसा आपल्याच जीवावर उठलेल्या लोकांचं समर्थन करतो आहे हे काँग्रेस कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन राष्ट्रवादी शक्तींना बळ द्यावे.

©️ मंदार दिलीप जोशी 
निज अश्विन शु ७, शके १९४२


Tuesday, October 20, 2020

साम्यवाद आणि भंपकपणा: खुनशी ज्योती बसू

भारताचे एक प्रसिद्ध जलतरणपटू होते मिहीर सेन. त्यांचा एक कपड्यांचा कारखाना होता. साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी त्यांचा प्रचार करण्याचा आग्रह केला. मिहीर सेन यांनी आपण भांडवलशाहीचे समर्थक असल्याचं सांगत त्यांना नकार दिला. ज्योती बसू नाराज झाले.

या नंतर मिहीर सेन यांच्या कारखान्यात कामगारांच्या कटकटी सुरू झाल्या. बघता बघता ते दिवाळखोरीत निघाले. याची परिणिती म्हणून त्यांना स्मृतिभ्रंश झाला आणि ११ जून १९९७ वयाच्या ६६व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. याचा जबर धक्का बसलेल्या त्यांच्या पत्नी पाच वर्षांनी मरण पावल्या.

त्यांच्या मुलीने काही सांगितलेल्या या आठवणी सोबत जोडलेल्या फोटोत.

🖌️ मंदार दिलीप जोशी

Monday, October 19, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: स्वातंत्र्य आणि आझादी यातला फरक - स्पार्टाकस

आज स्पार्टाकस या सिनेमाबद्दल बोलूया. स्पार्टाकस ही एक ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. रोमन साम्राज्यात गुलाम असलेल्या स्पार्टाकसने इतर गुलामांना उचकावून सोबतीला घेऊन बंड केलं आणि अनेक विजयही मिळवले. वेगळं राज्य स्थापन केल्यावर ते टिकवायला जी दृष्टी लागते ती नसल्याने म्हणा किंवा इतर काही कारणांनी म्हणा, पण तो सरते शेवटी रोमन साम्राज्याकडून पराभूत झाला आणि त्याला क्रॉसवर लटकवलं गेलं.

Spartacus

त्याकाळी गुलाम विकले जायचे आणि त्यांना पैसे देऊन स्वतंत्र सुद्धा केलं जाऊ शकायचं. शेवटच्या दृश्यात स्पार्टाकसच्या पत्नीला असंच स्वतंत्र केलं गेलं आहे आणि ती त्यांच्या बाळाला घेऊन क्रॉसवर लटकावलेल्या स्पार्टाकसचा निरोप घ्यायला आली आहे. मृत्यूच्या जवळ जात असलेल्या स्पार्टाकसला ती त्यांचं बाळ दाखवत म्हणते की बघ स्पार्टाकस, हा तुझा मुलगा आहे, आणि तो स्वतंत्र आहे. हे दृश्य इतक्या प्रभावीपणे चित्रित करण्यात आलं आहे की ती हे बोलत असताना त्या बाळाच्या चेहऱ्यावर सुद्धा वेगळेच आनंदी भाव दिसल्याचा भास झाला, जणू त्याला कळत होतं काय चाललंय ते.

स्वतंत्र असणं म्हणजे काय, ते या दोन मिनिटांच्या दृश्यात समजतं. पूर्ण सिनेमा बघितला होता, त्यामुळे हे दृश्य जास्तच परिणाम करून गेलं. पहिल्यांदा बघितल्यावर जो आणि जसा परिणाम माझ्यावर तेव्हां झाला होता तसाच आजही होतो.

स्पार्टाकस सिनेमा याच नावाच्या कादंबरीवर बेतला होता. सिनेमाची पटकथा आणि कादंबरी या दोन्हीचे लेखक होते हॉवर्ड फास्ट. अत्यंत यशस्वी लेखक असलेल्या हॉवर्ड यांना साहित्य आणि सिनेमा क्षेत्रात खूप मागणी होती, आणि या मागणीची किंमत ते पुरेपूर वसूल करत असत. आपल्या आयुष्यात त्यांनी खूप वैभव कमावलं आणि ऐशआरामात जगले. आता कष्ट केले की त्याचे पैसे मिळायलाच हवेत, पण मग हे मुद्दाम सांगायचं प्रयोजन काय? तर, हॉवर्ड फास्ट साहेब घनघोर साम्यवादी अर्थात कम्युनिस्ट होते. पण नंतर स्टालिनची कृष्णकृत्ये पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला.

आपल्या The Naked God: The Writer and the Communist Party आत्मचरित्रात त्यांनी स्पष्टपणे लिहिलं होतं ― There was the evil in what we dreamed of as Communists: we took the noblest dreams and hopes of mankind as our credo; the evil we did was to accept the degradation of our own souls—and because we surrendered in ourselves, in our own party existence, all the best and most precious gains and liberties of mankind—because we did this, we betrayed mankind, and the Communist party became a thing of destruction.

स्पार्टाकस सिनेमा तिकीटबारीवर अत्यंत यशस्वी ठरला, आणि त्याला चार ऑस्कर पुरस्कारही मिळाले. आलम दुनियेतल्या कम्युनिस्टांनी स्पार्टाकसला आपला हिरो, आपला आयकॉन बनवला नसता तरच नवल होतं. आजही स्पार्टाकस वामपंथी लोकांसाठी आयकॉन आहे. डाव्यांनी या कादंबरीचा अनेक भाषांत अनुवाद देखील करवला. भारतात 'अमृतराय' यांनी त्याचा 'आदिविद्रोही' नावाने हिंदीत अनुवाद केला आणि तो डाव्यांच्या 'हंस प्रकाशनाने प्रकाशित केला. नेटवर शोधल्यास पीडीएफ चकटफू उपलब्ध आहे, त्यात हॉवर्ड फास्ट साहेबांचे रसभरीत गुणवर्णन केलेलं आहे. त्यात त्यांच्या कलाकृतींचा उल्लेखही आहे, पण उल्लेख गायब आहे तो त्यांच्या ऐशआरामी आयुष्याचा. इतकंच काय, त्यांच्या - द नेकेड गॉड या आत्मचरित्राचाही उल्लेख केलेला नाही. आश्चर्य वाटलं? नाही, कदाचित उल्लेख केला असता तरच आश्चर्य वाटलं असतं. संपूर्ण सत्य सांगतील तर ते कम्युनिस्ट कसले?

या सगळ्याचं सार इतकंच की वामपंथ आणि प्रत्येक वामपंथी हा गुलामीचा कडवा विरोधक असतो, पण हे त्यांचे निव्वळ दाखवायचे दात असतात. नाहीतर त्यांनी 'प्रत्येक मनुष्य हा त्या दयाळू शांतीदेवाचा गुलाम आहे' हे सांगणाऱ्यांना पाठिंबा दिला नसता. जी विचारधारा स्वतःला त्यांच्या शांतीदेवाची आणि त्या शांतीदेवाचा प्रेषित मानणाऱ्या व्यक्तीची गुलाम मानते, आणि स्वतःसकट पूर्ण जगावर ती गुलामी लादण्याचा प्रयत्न करत असते, त्याच विचारधारेची पाठराखण हे गुलामीचे स्वघोषित विरोधक डावे कसे काय करू शकतात?!

१९४७ साली आपण 'स्वतंत्र' झालो, आपल्याला 'आझादी' नाही मिळाली ― ती मिळाली पाकिस्तानला, जिथे त्याच विचारधारेची सत्ता आहे.

आपला वारसा स्वातंत्र्याचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वतंत्रतेला देवी मानून लिहिलं ―
जयोsस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे।
स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुतां वंदे।

हिंदुत्वाची अधिष्ठात्रीच मुळात स्वतंत्रता आहे. आपण स्वतंत्र आहोत, राहू, आणि आपला देशही स्वतंत्र राहील आणि ते राखणे हेच आपले प्रथम कर्तव्य असले पाहिजे. आम्ही ईश्वराला मानतो, आपापल्या इष्टदेवतेचे आम्ही भक्त आहोत, आणि कुणाला देव मानायचा नसेल तर तसे न मानायलाही स्वातंत्र्य आहे.... पण गुलाम किंवा बंदे नाही म्हणजे नाहीच!

जाता जाता, स्पार्टाकसच्या त्या प्रसिद्ध शेवटच्या दृश्याची ही लिंक, अवश्य पाहून घ्या. ही लिंक काम करत नाहीशी झाली तर हे दृश्य युट्युबवर कुठेही या सिनेमाच्या व्हिडिओवर उपलब्ध असेलच. 

🖌️ मंदार दिलीप जोशी


Wednesday, October 14, 2020

साम्यवाद अर्थात भंपकपणा: एका मृत्यूलेखाची(!) चिरफाड

सर्वप्रथम मार्क्सवासी झालेल्या मार्क्सवादी कम्युमिस्ट पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्या दातार बाईच्या आत्म्याला (असलाच तर) कम्युनिस्टेश्वर शांती किंवा सद्गती देवो अशी प्रार्थना.

Marxist Communist Party of India leader Usha Datar

ही पोस्ट वाचण्याअगोदर (१) आणि (२) हे दोन लेख वाचा, पार्श्वभूमी समजायला सोपं जाईल; किंवा पोस्ट वाचल्यावर वाचा, तरीही चालेल. या दोन बहिणी आणि त्या दोन बहिणींच्यात साम्य दिसू शकेल. फरक इतकाच, की त्यातल्या एकीला उपरती झाली पण बाटगे जोरात बांग देतात या उक्तीनुसार आयात तत्वज्ञानाने आंधळे झालेल्या एत्तद्देशीय कम्युनिस्टांना आणि फेमिनाझी मंडळींना कधीच होणार नाही.

ही बातमी म्हणजे फक्त मृत्यूबद्दलची बातमी नाही तर मेंदूची कवाडे उघडी ठेवल्यास कम्युनिस्ट (साम्यवादी) आणि स्त्रीवादी चळवळीचा भंपकपणा आणि धोका समजून घ्यायला अत्यंत उपयुक्त अशी बातमी आहे. 

(१) कला क्षेत्रातील कम्युनिस्ट प्रभावः या बाईंच्या बहिणीचे लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या.

आता "नाटककार" व "विचारवंत" हा एकच माणूस कसा असू शकतो? हा एक भयंकर मोठा विनोद आहे. कारण हे म्हणजे बद्धकोष्ठ आणि जुलाब यांच्यावर घेतली जाणारी औषधे एकदम घेतल्यासारखे आहे. तर ते असो. 

(२) या सगळ्या कम्युनिस्ट आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या सगळ्यात आधी अत्यंत सुस्थितीतील किंवा श्रीमंत पुरुषांशी स्वतःचं लग्न वगैरे उरकून मोकळ्या होतात, मुलं वगैरे होऊ देतात आणि मग इतर भोळ्याभाबड्या (की बावळट) तरुण पिढीला, प्रामुख्याने तरुणींनाच, पुरुषी वर्चस्ववाद (patriarchy) वर दुगाण्या झाडणारी प्रवचने देऊन त्यांची आयुष्य नासवायची कामे करायला सुरुवात करतात. त्याला फोडणी म्हणून #SmashBrahminicalPatriarchy असेल तर आणखी उत्तम. 

म्हणजे:

  • पुरुष कसे वाईट!
  • लग्न काय फक्त मुलं होण्यासाठी करायची का? 
  • मुलगा आणि मुलगी समान आहेत तर इतक्या मुली का होऊ द्यायच्या?
  • बायका म्हणजे काय मुलं होण्याचा कारखाना आहेत का?
  • मुळात लग्नच कशाला करायचं?
  • तुमचं शरीर ही तुमची मालमत्ता आहे तिचा उपभोग कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं (ma life ma body) - यात आयरनीच्या देवाला वाहिलेली ठिणगी म्हणजे म्हणजे पुरुषी वर्चस्ववादाला झुगारुन द्यायची भाषा करायची आणि स्वैराचाराला प्रोत्साहन देऊन स्वतःचं शरीर कुणालाही वापरू द्यायला प्रोत्साहन द्यायचं हे यांचं धोरण.

पार्श्वभूमी समजली असेल तर आता मूळ बातमीकडे वळूया. या बाईंच्या बहिणीचं लग्न "नाटककार" व "विचारवंत" इसमाशी झाल्यावर त्या डाव्या आणि महिला चळवळीत काम करु लागल्या. त्यांच्या प्रभावाने या दातार बाई सुद्धा "पुरोगामी" चळवळीत काम करु लागल्या. 

आता दैवदुर्विलास बघा. सर्वसाधारणपणे जुन्या काळी आपल्याला असं दिसतं की पहिली मुलगी झाली तर मुलगा होण्यासाठी आणखी दोन किंवा तीन 'चान्स' घेतले जायचे. त्यामुळे आपल्याकडे तीन बहिणीच असणे किंवा तीन किंवा चार बहिणींच्या पाठीवर एक भाऊ हे सर्रास होतं. जुन्या काळातली सामाजिक परिस्थिती वेगळी असल्याने मी यावर चांगलं किंवा वाईट अशी कोणतीच टिप्पणी करणार नाही. पण याला प्रतिगामी, बुरसटलेले विचार, पुरुषी वर्चस्ववादाचं प्रतीक वगैरे हिणवणार्‍या आणि मुख्य म्हणजे उठल्या बसल्या जेन्डर इक्वालिटीच्या (gender equality) गप्पा ठोकणार्‍या 'पुरोगामी' लोकांनीही त्याच वाटेवर जावं हे डाव्या/कम्युनिस्ट लोकांचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल. कारण त्या काळात दातार बाईंनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते, म्हणजेच  त्या काही अगदीच अडाणी अशिक्षित नव्हत्या. तरीही 'स्त्री मुक्ती' चळवळीत सक्रीय असलेल्या या पुरोगामी बाईंना तीन मुली असणे म्हणजे आपण 'हसे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला' या म्हणीचे ठळक उदाहरण आहे. 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण' ही म्हण वापरणार होतो पण कम्युनिस्ट लोकांचा ब्रह्म वगैरे गोष्टींवर विश्वास नसल्याने त्यांना हे कितपत झेपेल याची शंकाच आहे.

तर, पैसेवाले नवरे गटवायचे, व्यवस्थित मुलं वगैरे होऊ द्यायची - थोडक्यात स्वतःची आयुष्य व्यवस्थित स्थिरस्थावर वगैरे करुन घ्यायची आणि मग आपल्या सडलेल्या डाव्या, कम्युनिस्ट विचारांनी समाजाला नासवायला सुरवात करायची. लोकांना दाखवायला घरकामगार संघटना, बालहक्क हक्क लढा, दारुमुक्ती आंदोलन वगैरे जोडधंदे करायचे. 

आणि एके दिवशी मरायचं आणि "वैकुंठ" नामक स्मशानभूमीत "अंत्यसंस्कार" करुन घ्यायचे. 

अनेक बाबी वैय्यक्तिक म्हणून सोडून दिल्या तरी देहदान करायला हरकत नव्हती, जुन्या काळच्या ग्रॅज्युएट व्यक्तीला मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र या बाबतीत माहिती नसेलच असे नाही. म्हणजे हे लोक मरतानाही आपला भंपकपणा दाखवायला कमी करत नाहीत. शेवटी 'वैकुंठ' नामक ठिकाणी 'अंत्यसंस्कार' करुन घेतलेच ना?!

आहे की नाही गंमत?!

असो. good communist is a dead communist हे मात्र खरं.

© मंदार दिलीप जोशी
अधिक अश्विन कृ १२, शके १९४२