Wednesday, January 31, 2018

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात - ऑक्सफॅमचा अहवाल आणि आपण

देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात अशा शीर्षकाचा एक अहवाल ऑक्सफॅम (Oxfam) नामक अनेक संस्थांचे कडबोळे असलेल्या संस्थेतर्फे प्रकाशित झाल्याचे वृत्त देशातील प्रमुख वृत्तपत्रांनी तसेच बातम्यांच्या वाहिन्यांनी प्रसारित केल्याचे सगळ्यांना आठवत असेलच.

बातमीचे शीर्षक आणि अहवालाचा निष्कर्ष पाहिल्यावरच काहीतरी काळबेरं असल्याचा संशय आला होता, पण वेळ मिळताच थोडं खोलात जाऊन बघू म्हणून तेव्हा काही प्रतिक्रिया दिली नव्हती. या संबंधात थोडं वाचन केल्यावर एक मात्र नक्की समजलं की कुठल्याही आंतरराष्ट्रीय संस्थेने फार भारताचं कौतुक केल्यावर हुरळून जाऊ नये, आणि टीका केल्यावर रागही मानू नये. कारण हे अहवाल ९९% वेळा वेगवेगळ्या हितसंबंधांवर आधारित असतात आणि भारताचं किंवा भारतातल्या गरीबांचं भलं वगैरे चिंतण्याचा अजिबात हेतू नसतो.

ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर लगेचच ज्या घराण्याला भारताच्या सम्राटपद वारसाहक्काने मिळायला हवं असं वाटतं त्या घराण्याच्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या युवराजांनी त्या बातमीवर झडप घालून ऑक्स्फॅमचा अहवाल डाव्होसला गेलेल्या पंतप्रधान मोदींना वाचायला सांगितला. त्यांनी अहवालातला निष्कर्ष खरा मानला असेल तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या ७१ वर्षांतली मधली साधारण १५ वर्ष वगळली तर भारतावर त्यांच्याच पक्षाचं राज्य होतं हे तथ्य ते सोयिस्कररित्या विसरले व नेहमीप्रमाणे स्वतःचं हसू करुन घेतलं.


अधिक विषयांतर न करता ऑक्सफॅमकडे वळूया. जागतिक राजकारणात पडद्यामागून सूत्र हलवणारे भलतेच असतात हे आता लपून राहिलेलं नाही. पडद्यामागे असणार्‍या व्यक्तींबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थाही (NGO) जागतिक राजकारणात आपापली प्यादी हलवत असतात. अशाच संस्थांपैकी ऑक्सफॅम आहे. ऑक्सफॅमचा संस्थापक कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड (Canon Richard Milford) हा एक भूतपूर्व ख्रिश्चन मिशनरी होता इतकं सांगितलं तरी संस्थेचा हेतू काय हे वेगळं सांगायला लागू नये. पण इतकी माहिती पुरेशी नसल्याने आणखी सांगणे आवश्यक आहे. या संस्थेचा जन्म दुसर्‍या महायुद्धानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या काही ख्रिस्ती धर्मप्रसारक कार्यकर्त्यांनी (Students' Christian Movement) एका संस्थेची स्थापना केली. हीच संस्था पुढे ऑक्सफॅम म्हणून प्रसिद्ध झाली.

सुरवातीच्या आक्रमक धर्मप्रसाराची जागा हळूहळू समाजसेवेच्या आणि रुग्णसेवेच्या वेष्टनात गुंडाळलेल्या धर्मपरिवर्तनाने घेतली. चर्चशी संबंधित संस्थांचे लक्ष तिसर्‍या जगातल्या भारतासारख्या भरपूर गरीबी आणि 'मागास' असलेल्या देशांकडे गेले नसते तरच नवल होते. पण या सगळ्यात मूळ हेतू हा आपण ज्यांची 'सेवा' करत आहोत अशांना स्थानिक संस्कृतीपासून वेगळं पाडणे आणि त्यांचे धर्मपरिवर्तन करुन ख्रिस्ती करणे हाच होता. मॅगडेलिन विद्यापीठात शिकत असताना ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीत सक्रीय असणारा कॅनन रिचर्ड मिलफॉर्ड याने त्यानंतर काही काळ भारतात त्रावणकोर आणि आग्रा येथे मिशनरी लोकांनी चालवलेल्या महाविद्यालयांत प्राध्यापकी केली. त्या नंतर तो इंग्लंडला परतला व लिवरपूल मधल्या ख्रिश्चन विद्यार्थी चळवळीचा अर्थात Students' Christian Movementचा सचिव झाला आणि मग काही काळ ऑक्स्फर्ड विद्यापीठातल्या चर्चचा म्हणजेच सेंट मेरीज ऑक्सफर्ड या चर्चचा धर्मगुरू म्हणजे व्हिकार म्हणून काम पाहिलं. १९४२ साली याच महशयांनी Oxford Committee for Famine Relief (ऑक्स्फर्ड दुष्काळ निवारण संस्था) अर्थात ऑक्सफॅमची स्थापना केली. १९८५ साली प्रकाशित एका मार्गदर्शक पुस्तिकेत ऑक्सफॅमने संस्थेने आपल्या कार्याची व्याप्ती थेट सेवेपुरती मर्यादित न ठेवता तिसर्‍या जगातील 'राहणीमानाचा दर्जा सुधारण्याच्या' दृष्टीने वाढवण्याची गरज व्यक्त केली. या कराता ऑक्सफॅमने आपल्या 'सेवा' आणि 'विकास' कार्यांना इतर संस्थांना सोपवण्यास सुरवात केली. रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी स्वतःच्या स्वयंसेवी  संस्था काढायला सुरवात केलीच होती. Evangelical Alliance Relief Fund (TEAR) व Catholic Agency for Overseas Development (CAFOD) या सारख्या संस्थांनी ऑक्सफॅमच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या 'सेवाकार्याचा' भर दुष्काळ निवारणावरुन हलवून 'राहणीमान विकासाकडे' वळवला. आता सेवाकार्यापेक्षा समग्र मानवतेच्या कल्याणाची काळजी त्यांना सतावू लागली होती.

हे सगळं करताना ऑक्सफॅमने स्वतःचा हेतू हा धर्मनिरपेक्ष सेवाकार्य असल्याचा आव व्यवस्थित आणला होता. उपरोक्त संस्था सुद्धा सेवाकार्य करताना आपला धर्मप्रसारणाचा हेतू आणि सेवाकार्याचा लाभ ख्रिश्चनांनाच मिळत असल्याची वस्तुस्थिती अगदी खर्‍याखुर्‍या धर्मनिरपेक्ष व शुद्ध हेतू असणार्‍या देणगीदारांपासूनही लपवण्यात यशस्वी झाल्या होत्या. ऐंशीच्या दशकात मात्र आपल्या 'सेवाकार्याचे' अवलंबत्व ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांकडून खूपच कमी करुन सरकारी आणि 'सेक्युलर' स्वयंसेवी संस्थांकडे सोपवलं. या संस्थांमधे अगदी प्राण्यांसाठी काम करणारी पेटा असो किंवा वरवर मानवी हक्कांची बाजू घेणारी अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थासुद्धा सामील आहेत असं त्यांच्या कारभाराकडे व कारवायांकडे पाहून म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. असं केल्याने त्यांच्या ख्रिश्चन अजेंड्याकडे जनतेचं आणि देणगीदारांचं  फारसं लक्ष जाणार नाही असा त्यांचा होरा होता आणि तो खराही ठरला. असं असलं तरी आपला मूळ हेतू साध्य करण्याच्या दृष्टीने ऑक्सफॅमने ख्रिश्चन संस्थांशी आपले संबंध घनिष्टच ठेवले होते.

अशा संस्थांचा गरीबांना मदत करता करता आणखी एक हेतू साध्य करायचा होता आणि तो म्हणजे समाजात प्रस्थापितांबद्दल आणि सरकारबद्दल असलेल्या असंतोषाला खतपाणी घालत त्याचे रूपांतर अंतर्गत कलहात करुन बंडापर्यंत गोष्टी पोहोचवणे. या कामी ख्रिश्चन एड (Christian Aid) ही संस्था पूर्वी आघाडीवर होती. वरवर सेक्युलर अशी छबी पण आतून हेतू वेगळाच हेतू अशा अनेक स्वयंसेवी संस्था आजही यात जाणता अजाणता सहभागी आहेत. भारतात अशा स्वयंसेवी संस्थांचं आदिवासी/वनवासी लोकांकडे विशेष लक्ष असतं. आदिवासी/वनवासींच्या भागात असणार्‍या खाणी आणि कारखाने व तत्सम गोष्टींत ढवळाढवळ करणे ही अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. भारतात अशा एन.जी.ओ. संस्थांमधे कार्यरत असणार्‍या नावांत हत्येचा आरोप असलेल्या नक्षलसमर्थक नलिनी सुंदर, बेला भाटीया अशांचा समावेश बघता या संस्थांचे कार्य काय असू शकतं या विचारानेच थरकाप होतो. नक्षलवादग्रस्त जिल्ह्यात हिंदू साधूसंतांची हत्या होते आणि मिशनर्‍यांचे कार्य मात्र निर्विघ्नपणे कसं सुरु असतं याची कारणमिमांसाही यातूनच स्पष्ट होते.

यात अंबानीने नवीन मोबाईल किंवा मोबाईलचा प्लान काढला की तो कसा कमावणार आहे आणि तुम्ही कसे गरीब अशा कंड्या पिकवण्यापासून ते नुकत्याच झालेल्या कोरेगाव-भीमा आणि वढू इथून जाणूनबुजून पसर(व)लेली दंगल समाविष्ट आहे. आर्थिक विषमतेचा बागुलबुवा दाखवून निर्माण झालेल्या असंतोषाला खतपाणी घालण्याबरोबरच जातीय भावना भडकावून बंडसदृश्य दंगल घडवून आणण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. कोपर्डी बलात्कार व हत्याकांडाच्या वेळी काय घोषणा व पोस्ट फिरत होत्या त्याची आठवण करुन देण्याची गरज नाही. त्यात पोलीस व सरकारी वकिलांनाही सोडलं गेलेलं नव्हतं. उज्ज्वल निकम यांनी विनामोबदला खटला लढवायची तयारी दाखवूनही सरकारी सोपस्कार म्हणून त्यांना दिलं गेलेलं मानधनाचं पत्र सोशल मिडीयावर फिरवून पोलीसांनी बघा किती कष्ट केले आणि हा माणूस बघा किती मलिदा खातो अशा प्रकारची पोस्ट फिरत असलेली आपल्याला आठवत असेलच. यात दुसरं तिसरं काही नसून कुठून तरी तुम्ही दबलेले/दाबलेले, पिचलेले, अत्याचारित आहात आणि तुमच्यापेक्षा श्रीमंत हे स्वत:च्या बुद्धीने व कष्टाने झालेले नसून तुमच्या जीवावर व तुम्हाला पिळूनच झालेले आहेत हेच ठसवणं आहे, आणि या कामी अशा स्वयंसेवी संस्था सक्रीय असतात. कोपर्डीच्या खटल्याला असलेली जातीय किनार अशा संस्थांना गिधाडाला मेलेला प्राणी दिसल्यावर होणार्‍या आनंदापेक्षा जास्त मोहात पाडतो. अशा संस्थांना परदेशातून आणि देशातून किती आणि कसा पैसा येतो हे एका वेगळ्या लेखाचा व संशोधनाचा विषय आहे, तेव्हा ती चर्चा इथे नको.

थोडंसं मागे जाऊन बघितलं तर मुंबईत लोकल गाड्यांवर दगड फेकण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. ही दंगलीत होणारी दगडफेक नव्हे तर रेल्वेरुळांनजिकच्या झोपडपट्टीतल्याच भरकटलेल्या तरुणांनी अधुनमधून भिरकावलेला दगड असं त्या गोष्टीचं स्वरूप होतं. रेल्वे डब्याच्या दारात उभं असणार्‍या आणि खिडकीजवळच्या जागेत म्हणजे विंडो सीटवर बसलेल्या लोकांना अर्थातच याचा सर्वाधिक त्रास झाला. प्रमाण खूप वाढलं आणि याची चर्चा टीव्ही व वर्तमानपत्रात होऊ लागली तेव्हा या जीवघेण्या प्रकाराचं चक्क समर्थन करत ही दगडफेक म्हणजे "आहे रे" आणि "नाही रे" वर्गांतल्या संघर्षाचं प्रतीक असल्याचा निर्लज्ज युक्तीवाद तेव्हा या एन.जी.ओं.नी केल्याचेही स्मरते.

तेव्हा ऑक्सफॅमच्या कार्याची मुळं किती खोलवर आणि दूरवर पसरलेली आहेत हे लक्षात घेतलं की 'देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात' अशा सनसनाटी मथळ्याची बातमी ही निव्वळ देशातली आर्थिक स्थितीवर भाष्य नसून असंतोष पेरण्याच्या अत्यंत मोठ्या आणि जटील कारस्थानाचा भाग आहे हे लक्षात घ्यायला हवं.

एखादी संस्था जेव्हा भारताच्या जी.डी.पी. किंवा एकूण आर्थिक परिस्थितीबद्दल व स्थिरतेबद्दल गौरवोद्गार काढते आणि ऑक्सफॅमसारखी संस्था देशाची ७३% संपत्ती १% जनतेच्या हातात असं सांगते तेव्हा त्याने अनुक्रमे हुरळून न जाता आणि दु:खी न होता त्या मागच्या हेतूकडे बघणे हे क्रमप्राप्त ठरते.

एका लोकप्रिय जाहिरातीचं वाक्य आठवतं. दिखावे पे न जाओ, अपनी अकल लगाओ. तेव्हा 'विद्येच्या' बाबतीत 'बाळ' न राहता इथे थोडीशी अक्कल वापरली, आणि ऑक्सफॅमची कुंडलीच हातात आली की राव!

संदर्भः
OXFORD HISTORY OF THE BRITISH EMPIRE Companion Series: Britain's Experience of Empire in the Twentieth Century, Edited by Andrew Thompson व इतर.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ८, शके १९३९








1 comment:

  1. अजून एक पर्दाफाश, भारीच .. keep it up

    ReplyDelete