Monday, September 16, 2019

दिग्दर्शन म्हणजे काय

शिरीष कणेकर आपल्या फिल्लमबाजी या एकपात्री कार्यक्रमात म्हणतात, की कुठल्यातरी चित्रपटात माला सिन्हा पहिल्याच सीनमध्ये घागरच्या घागर भरून पाणी नेते, तर पुढे तिची आंघोळ का नाही दाखवली?" यातला विनोदाचा भाग सोडला तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रसिद्ध रशियन लेखक अँटॉन चेकोव्ह याने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या अनेक पत्रात एक उल्लेख आढळतो. तो म्हणतो की "नाटकाचा एक नियम असावा. पहिल्या अंकात जर तुम्ही भिंतीवर बंदूक दाखवलीत, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडालाच पाहिजे. नाहीतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय?"

लायसन्स टू किल या चित्रपटात जेम्स बॉण्डचा अमेरिकन सीआयएमधला मित्र फिलिक्स लाईटर आणि त्याची पत्नी डेला त्यांच्या लग्नात त्याला त्यांचं आणि त्याचं नाव कोरलेला एक सिगारेट लायटर भेट देतात. जेम्स बॉण्ड लगेच तो पेटवून बघतो तेव्हा त्यातून नेहमीच्या लायटरपेक्षा खूप मोठी आणि लांब ज्योत बाहेर फेकली जाते.

कुणाला अपाय होत नाही पण याचा संदर्भ पुढे सिनेमात कुठेही न आल्यामुळे आपण हे दृश्य जवळजवळ विसरलेलो असतो.

पुढे फिलिक्सने पकडलेला अंमली पदार्थांचा तस्कर अर्थात ड्रग स्मगलर सांचेझ हा डेलावर आपल्या माणसांकरवी बलात्कार करवतो आणि फिलिक्सला गंभीर जखमी करवतो.

याचा बदला म्हणून जेम्स बॉण्ड अर्थातच गुप्तरीतीने सांचेझच्या मागे लागून त्याचं साम्राज्य नष्ट करतो. शेवटच्या मारामारीत ड्रग्स मिसळलेल्या गॅसोलीनने म्हणजे रॉकेलने माखलेला सांचेझ जेम्सला मारायला कोयता सदृश्य शस्त्र उगारतो तेव्हा जेम्स त्याला विचारतो की मी हे सगळं का केलं हे तुला जाणून घ्यायची उत्सुकता नाही का? "Don't you want to know why?" हे ऐकून सांचेझ क्षणभर थांबतो. जेम्स खिशातून तोच सिगारेट लायटर काढून त्याला दाखवतो आणि त्यावरची नावं वाचून डोळे विस्फारलेल्या सांचेझला लायटर पेटवून त्यातून निघालेल्या मोठ्या ज्योतीचा वापर करून पेटवून देतो आणि तिथून निसटतो.

तर, लायटरमधली सर्वसाधारण लायटरपेक्षा कैक पटींनी मोठी असलेली ज्योत का दाखवली हे आपण केव्हाच विसरलेलो असतो, किंबहुना मठ्ठ सिनेमांवर पोसलेल्या आपल्या सिने-मनाला हा प्रश्नही पडत नाही. पण शेवटी याचं उत्तर मिळतं, नव्हे दिग्दर्शक आपल्याला देतो.

याला दिग्दर्शन म्हणतात.

©️ मंदार दिलीप जोशी

Sunday, June 2, 2019

जेम्स बॉन्ड - शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे काय रे भाऊ?

आपण जेम्स बॉन्डच्या प्रत्येक चित्रपटात पाहिलं असेल, की त्याचे आवडते पेय म्हणजे मार्टिनी. तो जिथे कुठे हे पेय घईल, ते देणार्‍याला म्हणजे सर्व करणार्‍याला तो फक्त एवढंच सांगून थांबत नाही. तो पुढे म्हणतो, "शेकन, नॉट स्टर्ड". याचं काहीही बोध न होणारं विनोदी मराठी भाषांतर म्हणजे "हलवून दे, ढवळून नको".

आता हे शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे नेमकं काय? नक्की काय शेकवायचं...आपलं...हलवायचं असतं...आणि ते स्टर्ड म्हणजे ढवळायचं का नसतं? तर ते शेकन म्हणजे काय असतं ते आधी पाहू. मार्टिनी हा एक कॉकटेलचा प्रकार आहे. तर शेकन कॉकटेले एकात दुसरं मिसळून ढवळून चालत नाहीत. ती व्यवस्थित हलवून तयार करण्याकरता बाजारात पूर्णपणे स्टीलपासून बनवलेला एक खास 'शेकर' मिळतो. या शेकरचे एकूण तीन भाग असतात. तळाकडचा म्हणजे खालचा स्टीलचा मोठा कप असतो त्यात पेये घातली जातात. या भागाला दोन भागांचे असलेले एक स्टीलचेच झाकण असते. ते दोन भाग म्हणजे एक गाळणी आणि त्यावर असलेला एक स्टीलचा कप. आधी म्हटल्याप्रमाणे हा शेकर संपूर्ण स्टीलचा बनवलेला असल्याकारणाने ही चाळणी आणि कपही स्टीलचेच असतात.



जेम्स बॉन्डला जर त्याची लाडकी मार्टिनी शेकन करुन द्यायची असेल तर त्यात व्होडका आणि व्हर्मूथ (vermouth) अशी दोन पेये वापरावी लागतात. व्हर्मूथ म्हणजे ड्राय अर्थात चवीला कडूसर. व्हर्मूथ हा एक व्हाईट वाईनचा प्रकार असून त्यात साखर अगदी अत्यल्प असते. अशा या कडूसर व्हाईट वाईनमध्ये काही वनस्पतींचा अर्क उतरवला की व्हर्मूथ तयार होते. आपल्याकडे जसं एखादी रेसिपीत "मीठ चवीप्रमाणे" असं लिहीलेलं असतं तसं यातही चवीनुसार जास्तीची साखर घालतात. व्हर्मूथचे च्या अनेक ब्रॅण्डपैकी 'मार्टिनी' याच नावाचा व्हर्मूथचा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. तर त्याची कृती अशी, की एक 'मार्टिनी ग्लास' फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा. मग एकास चार या प्रमाणात व्हर्मूथ व व्होडका घ्यायची...अंहं, एकत्र करायची नाही. पण यांचेही प्रमाण साधारण १४ मिली व्हर्मूथ आणि ५६ मिली व्होडका असे ठरलेले आहे. आता वर उल्लेख केलेल्या शेकरमधला कप भरून बर्फ घ्यायचा आणि त्यात व्हर्मूथ टाकायची. पण यात बर्फ आणि व्हर्मूथ एकत्र करणे हा उद्देश नसून त्या बर्फाला व्हर्मूथने 'ओले' करणे एवढाच आहे. त्यामुळे ताबडतोब कपावर गाळणी लावली जाते आणि ती व्हर्मूथ लगेच गाळली जाते. मग त्या शेकरमधल्या व्हर्मूथयुक्त बर्फात व्होडका टाकली जाते. आता गाळणीचे झाकण लाऊन मग शेकर पूर्ण बंद करून तो व्यवस्थित हलवायचा. म्हणजे उरलेले औषध संपवायला आपण त्यात पाणी घालून हलवतो तसे...ख्या ख्या. आता हे शेकलेले अर्थात शेकन अर्थात हलवलेले मिश्रण शेकरच्या गाळणीद्वारे त्या थंड केलेल्या ग्लासात गाळायचे. पुन्हा चवीकरता हवे असल्यास त्यात एक लिंबाचे साल टाकायचे.

झाली बॉन्ड साहेबांची 'व्होडका मार्टिनी, शेकन नॉट स्टर्ड' तयार!

'स्टर्ड' मार्टिनी तयार करताना फरक इतकाच की व्होडका शेकरमध्ये ओतली की हलवायच्या ऐवजी बारीकश्या चमच्याने थोडीशी ढवळली जाते. ती त्या थंड ग्लासात गाळली की झाली तयार 'मार्टिनी, स्टर्ड नॉट शेकन'!

पण जेम्स बॉन्डला शेकनच का लागते? स्टर्ड मार्टिनी तयार करण्याच्या कृतीचा आणि त्या पेयाची मजा घेण्याचा काय संंबंध? तर जेम्स बॉन्ड कोण आहे? तर गुप्तहेर. आता तो गावभर...आपलं....जगभर "बॉन्ड, जेम्स बॉन्ड" अशी ओळख देत बोंबलत फिरतो ते सोडा. तर, गुप्तहेराने नशा केली तर तो त्याचं काम कसं करणार? म्हणजे जिथे मार्टिनी मिळते अशा बारमधे किंवा हॉटेलात स्टाईलीत रुबाबात एन्ट्री तर मारायची असते, आणि तिथे आणखी शायनिंग मारत मद्यपान तर करायचं आहे, शिवाय नशाही हवी आहे, पण इतकीही नाही की झिंगून बेसावधपणा येईल - कारण त्याला त्याची कामगिरीही पार पाडायची आहे. पण मार्टिनी मूळ कशी तयार केली जाते, तर स्टर्ड अर्थात ढवळून. पण तसे केल्याने त्यातले अल्कोहॉलचे प्रमाण तसेच राहते. आता हे एका गुप्तहेराला कसे चालणार? म्हणून जेम्स बॉन्डला मार्टिनी शेकन हवी असते. वर दिलेल्या कृतीप्रमाणे हलवल्यामुळे कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, कारण हलवल्याने बर्‍यापैकी अल्कोहोल उडून जाते. त्यामुळे जेम्स बॉन्डला अपेक्षित न झिंगता नशा येऊन ताजेतवानेपणा आणणारे पेय तयार होते.

शॉन कॉनरी, रॉजर मूर, जॉर्ज लेझनबी, टिमथी डाल्टन, पिअर्स ब्रोस्नन यांनी ही शेकन नॉट स्टर्डची परंपरा सुरु ठेवली होती. डॅनियल क्रेगचा बॉण्ड मात्र कॅसिनो रॉयॅल (२००६) मधे जुगाराच्या एका टप्प्यात कोट्यावधी डॉलर हरल्यावर जेव्हा वेटर त्याला "सर, शेकन ऑर स्टर्ड?" असं आदबीने विचारतो, तेव्हा सटकून म्हणतो "डू आय लुक लाईक आय गिव्ह अ डॅम?"

असं करु नकोस बाबा, आम्हाला आपलं तू विचारल्यावर "शेकन नॉट स्टर्ड" असंच म्हणत जा रे.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ १४, शके १९४१

Friday, May 31, 2019

मी आणि तो

मी गेलो उत्साहाने त्याच्या इफ्ताराला
तो मला संपवण्या ज़कात झोळीत घालत होता

पाहून त्याला क्रूसावरती डोळां आले पाणी
तोच क्रूस घालण्या गळ्यात संधी शोधत होता

मला वाटले इश्काला नसतो मजहब काही
तो शीर माझे धडावेगळे उंच उडवत होता

मी समजलो प्रेमात कसला रिलिजियन बंधू
बंबात घालुनी लव्ह माझे तो हासत होता

पोसले साप ते कसे निघावे शाकाहारी
तो अजगर निधर्मांध मजला गिळत होता

©️ मंदार दिलीप जोशी

Thursday, May 23, 2019

पुन्हा एक वार, आलं मोदी सरकार !

मी काही काळापूर्वी एक पोस्ट टाकली होती त्यात म्हटलं होतं की माझं प्राधान्य हिंदुत्व व हिंदुत्वाधारित विकास आहे. पुढे म्हटलं होतं त्याचा भावार्थ असा होता की जरी असं असलं तरी पूर्ण विचारांती मी याच मतावर पोहोचून ठाम आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व व विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्णयप्रक्रिया व वेग इत्यादी परिप्येक्ष्यांतून पूर्ण बहुमताने निवडून आलेले भाजप सरकार हाच २०१९ला योग्य आणि एकमेव पर्याय आहे.

या पाच वर्षात मला काय मिळालं, हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. माझे जवळचे आणि कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे की एखाद्या गोष्टीची सत्यता आणि देशासाठी असलेलं महत्त्व पटलं की खिशाला खार लाऊन आणि आपला वेळ खर्च करुनही मी अनेक गोष्टी करतो. त्यामुळे मोदींनी माझ्या खिशात किती पैसे टाकले हा विचार मी करत नाही, करणार नाही.

तरीही एक सांगू इच्छितो. प्रधानमंत्री आवास योजना, आयुषमान योजना यातून सहाय्यता मिळालेले माझ्या जवळच्या मित्रपरिवारात, सहकर्मचार्‍यांत, आणि वैय्यत्तिक ओळखीत आहेत. एक लक्षात घ्या, हा फक्त पैसा नाही. पैसा काय सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तुम्हालाही. पण जेव्हा आत्यंतिक गरज असताना मदत मिळते तेव्हा त्याची किंमत ही आभाळाहून जास्त असते. एक रुपया मदत पाठवली तर त्यातले जेमतेम पंधरा पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात हे दिवस आपण बघितलेले असताना आता तो आख्खा रुपया थेट लाभार्थींच्या खात्यात, मग ते शहरी असोत किंवा शेतकरी, पोहोचणारे दिवस आपण बघत आहोत याचं श्रेय निर्विवादपणे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनाच जातं.

या परिप्येक्षातून आयकर रिटर्न्स भरणार्‍यांच्या संख्येत या पाच वर्षात भरीव वाढ झालेली आहे या गोष्टीकडे बघणे गरजेचे आहे. सामान्यतः मेहनतीने पैसा कमावणार्‍या जनतेला कर द्यायला हरकत नसते, पण त्या पैशाचं पुढे काय होतं किंवा कररूपी पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही याची चिंता त्याला अधिक असते. हां, सरकारचा दट्ट्या असतोच, पण जबरदस्तीपेक्षा सरकारप्रती असलेला विश्वास हा अधिक प्रभावी ठरतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हा विश्वास देशाच्या जनतेत रुजवल्यामुळे लोकांची कर भरण्याकडे कल वाढत चालला होता, आणि त्याचीच परिणिती रिटर्न्स वाढण्यात झाली.

हिंदुत्वाचं म्हणाल तर मुळात तुमच्यातच एकी नसेल तर मोदी काय "गुंडाळून ठेवतो मी संविधान, लगेच हिंदूराष्ट्र घोषित करतो, आणि धरुन हाणतो म्लेंछांना आणि यवनांना" असं म्हणावं अशी अपेक्षा आहे का? त्यांच्यावर किती आणि कसा दबाव आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? एखादी योजनेसाठी चार कागद लागत असतील तर म्लेंच्छ आठ घेऊन पोहोचतो, प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जाऊन योजनेची सगळी माहिती घेतल्यावर. आणि हिंदू घरी बसून मला काहीच कसं माहीत नाही, मोदींनी पोहोचवली का नाही माहिती अशी किरकिर करतो. भांडण झालं की पाच मिनिटात शंभर लोक गोळा करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? नसेल तर आधी निर्माण करा आणि मग मोदी अमुक का करत नाहीत आणि तमुक का करत नाहीत याच्या चर्चा करा.

दुसरी गोष्ट, आजवर ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं "Wearing your Dharma on your sleeve" असं  कुणी केल्याचं स्मरतं का? निवडणुका असो किंवा नसो, सातत्याने भगवी वस्त्रे आणि स्थानिक वेषभूषा करुन देवदर्शनाला जाणारा पंतप्रधान कुणी बघितला होता का? हिरव्यांची जाळीदार टोपी घालायला नकार देणारे मोदीजी आवर्जून कुठलीही निवडणूक नसताना स्वतः गंगा आरती साठी जाताच, पण सोबतच्या परदेशी पाहुण्यांनाही घेऊन जातात. उघडपणे हिंदू संस्कृती व धर्माबद्दल आदर व्यक्त करतात. हिंदू संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेला योग आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस म्हणून साजरा केला जाण्याचं श्रेय कुणाला याचा विचार हिंदूंनी अवश्य करावा. निवडणुका आल्यावर राजकारणाचा भाग म्हणून आपले ख्रिस्ती आणि पारशी मूळ लपवून आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत देवळादेवळातून हिंडणार्‍या आणि नंतर ते सोंग साफ विसरणाऱ्या राहुल गांधीच्याच इटालियन मोतोश्रींनी हिंदूंच्या मुळावर येणार्‍या आणि हिंदूंच्या सत्यानाशाचे थेट कारण ठरणारा कायदा करण्याचं ठरवलं होतं, हे हिंदूंनी विसरू नये. हा विषय मोठा आहे, विस्तृतपणे पुन्हा केव्हातरी बोलू .

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन गळे काढणार्‍या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या बायकोची आणि आईची काहीही तक्रार नसताना आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या दोघीही राजकारणात नसताना अकारण प्रत्येक वादात त्या दोघींना ओढलं तेव्हा मोदींनी एक चकार शब्द काढला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या भ्रष्टाचाराचा विषय काढल्यावर राहुल गांधी यांना ते आपले पिताजी असल्याची आठवण झाली आणि त्यांनी पुन्हा मोदींच्या कुटुंबियांबद्दल उद्गार काढले. बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पाच वर्ष देशाचे पंतप्रधान असताना इतर कुणाच्या घरच्यांनी महाल बांधले असते. पण नरेन्द्र दामोदरदास मोदी हा इसम खरंच वेडा म्हटला पाहीजे, कारण या सतरा वर्षात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदाचा एक रुपयाही अनुचित फायदा झालेला नाही. या उलट उत्पनाचं काही साधन नसताना राहुलच्या इटालियन मम्मीची संपत्ती इंग्लंडच्या राणीशी स्पर्धा करतानाही दिसली. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या बचतीतली मोठी रक्कम जो माणूस सरळ दान करुन टाकतो, अशा माणसाला वेडा नाही तर काय म्हणावं? आधी केले, मग सांगितले ही म्हण या बाबतीत स्वतः जगत आहेत हे सगळा देश उघड्या डोळ्यांनी बघत होताच.

संरक्षणाच्या बाबतीतही मोदींनी देशाला नाराज केलं नाही. आधी पाकिस्तानात शरीफ महाशयांची अचानक भेट घेऊन टीकेचे धनी झालेले मोदी हे टीकाकारांना कळलेच नाहीत असे म्हणावे लागेल. नंतर पाकिस्तानची कशी ठासली हे सगळ्यांना ठाऊकच आहे. राफेल खरेदीत विरोधकांनी अनेक अडथळे आणूनही मोदी डगमगले नाहीत. आता मात्र ते लवकर पार पडावं ही इच्छा.

या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवाद हा होता. हा एक शब्द नव्हे, राष्ट्रवादात राष्ट्र सर्वप्रथम, विकास, प्रगती, संरक्षण या सगळ्या गोष्टी येतात. ज्या राष्ट्रवादाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या वृत्तीच्या थोबाडीत मारणारा हा निकाल आहे. क्रिकेटचा सामना असूनही तो सोडून अनेक लोकं लोकसभा टीव्ही लोक बघत बसायचे हा आणखी एक मोठा बदल आपण बघितला.

मी काही राजकीय विश्लेषक नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. त्यामुळे या लेखनात अनेक तृटी असू शकतात, त्याबद्दल आधीच क्षमस्व. आणखी बरंच आहे बोलण्यासारखं, लिहीताही येईल, पण सद्ध्या जरा भावुक झालोय. २०१४ पेक्षा आताच्या निवडणुकीत मोदी सरकार यावं याबद्दल भावना तीव्र होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्याने डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. आतापर्यंत बरंच लिहिलं, बरंच वाचलं, बर्‍याच चर्चा केल्या. यापुढेही हे होईलच, पण तूर्तास सद्ध्या आपला निरोप घेतो. आता वाट पाहूया "मैं नरेन्द्र दामोदरदास मोदी, इश्वर को साक्षी रखके शपथ लेता हूं कि...." हे शब्द कानावर पडण्याची.

समारोप करतो या प्रार्थनेने:

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्।
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये॥

अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्, सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्।
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत्॥

समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्।
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्॥

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्, विधायास्य धर्मस्य संरक्षणम्।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥

भारत माता की जय ! जय श्रीराम !

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. पंचमी शके १९४१