Friday, July 31, 2015

लोकसत्ताचे डोके ठिकाणावर आहे काय?

आदरणीय वंदनीय माननीय विवेकवादी अंधश्रद्धानिर्मूलनपटू राजमान्य राजश्री श्री गिरीश कुबेर साहेब,

कोपरापासून नमस्कार.

लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हतेपण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतीम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमचा हा लेख फॉरवर्ड मधून आला तेव्हा आधी तुमच्याच वृत्तपत्रात विनोदी सदर लिहीणार्या तंबी दुराई सदृश्य कुणीतरी लिहीला आहे असा आधी समज झाला होतापण तो अखेर गैरसमज ठरला. या लेखाबद्दल तुमचा तीव्र निषेध.

फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गैर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धीभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरवातीला म्हणता, याकुब मेमन माफीचा साक्षीदार ठरला, आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहेतो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता, आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी भारतात परतण्याचा निर्णयही घेतला नाही. रॉ संस्थेच्या ज्या रामन साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता, त्याच रामन साहेबांनी एका लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की पाकिस्तानच्या आय.एस.आयया गुप्तहेर संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या मेमन कुटुंबियांनी याकूबला 'भारतात परतणे कितपत श्रेयस्करयाचा आढावा घ्यायला नेपाळमधे असलेल्या त्याच्या नातेवाईकाशी एका वकीलाशी सल्लामसलत करायला नेपाळला पाठवलं होतं. या दोघांनीही त्याला पुन्हा कराचीला परतण्याचा सल्ला दिला. तो कराचीला परस्पर पळून जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना नेपाळ पोलीसांनी त्याला ओळखला, आणि वेगाने त्याची रवानगी भारतात करण्यात आली. बरं आपण रामन यांचे सोडून देऊ. गेले बिचारे. त्यांची साक्ष काही काढता येत नाही आता. पण विमानतळावर त्याला पकडणार्या नेपाळी पोलीस अधिकार्याची मुलाखत आपण हे अचाट संपादकीय लिहीण्याच्या आधी बघितली का? माझ्या अंदाजाप्रमाणे नसेलच.

मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहीता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायात आणि दहशतवादी घटनात पाकिस्तानचा सहभाग आहे हे तो पर्यंत अनेको वेळा सिद्ध झालेले असताना आणि अगदी १९९३ बाँबस्फोटांचा तपास करतानाही अन्य मार्गाने निदर्शनास आलेले असताना आपण पाकिस्तानचे नक्की काय वाकडे केले जे याकुबच्या खुलाशाने करु शकणार होतो? मग ज्यातून पुढे काहीही कारवाई करता येणार नाही आणि मिळाली तरी जिची विश्वासार्हता संशयास्पदच आहे अशी माहिती 'उघड' करण्यास कारणीभूत ठरणारा असा वेडगळ आणि तद्दन निरुपयोगी करार भारत सरकारने कसा काय केला असेल असे मज पामराच्या बुद्धीलाही पडणारे प्रश्न तुम्हाला पडले नसतील असे आम्ही कसे मानावे?

वादासाठी आपण गृहित धरू की सरकारने त्याच्याशी काही गुप्त करार केला होता. तुम्हाला एक बाळबोध उदाहरण देतो. माझ्या घरात एक उंदीर धुमाकूळ घालतो आहे. मी त्याला पकडायला आत बुंदीचा लाडू ठेऊन एक पिंजरा लावतो. तो त्या पिंजर्यात फसतो. आता तुम्ही मला सांगा, निव्वळ विध्वंसक अशी ओळख असलेल्या उंदराला मी मारून टाकावे की त्याला प्रेमाने मांडीवर घेऊन प्रेमाने तो लाडू खायला द्यावा आणि मग सोडून द्यावे?

पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मेगासेसे किंवा गेला बाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. "मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी". मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणार्यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली दहाची नोट एखाद्या प्रवाशाने खिशात टाकावी इतकी क्षुल्लक बाब!

तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुसर्या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकुबने दाखल केलेले क्युरेटीव्ह पेटीशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज, आणि डेथ वॉरंटवर स्टे आणण्याचे प्रयत्न हे सगळे सगळे आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बचावाच्या पुरेपूर संधी दिल्या याची साक्ष नव्हे कायमग तुमच्याकडे तुमच्या "वस्तुस्थिती" "निर्विवाद सत्य" या शब्दांपलिकडे जाऊन तीन न्यायालयातज्यात अर्थात सर्वोच्च न्यायालय आहेच, जे पुरावे सादर होऊन गुन्हा सिद्ध झाला त्यांच्याहून वरचढ पुरावा आहे का? नसल्यास तुम्ही व्यवस्थेला अशक्त असे संबोधून खालच्या न्यायालयांचाच नव्हे तर फाशी जायच्या दिवशीही पहाटे साडेचार वाजता याकुबचे म्हणणे ऐकून घेणार्या सर्वोच्च न्यायालयाही अवमान करत आहात याची तुम्हांस जाणीव आहे काय?

हाच अशक्त याकुब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाउंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लेखपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षितअडाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतका हुशार असलेल्या हा अशक्त याकुबला आपण ज्याच्या "चोरट्या" धंद्यांचे पैसे फिरवतो आहोतलेखापरिक्षण करतो आहोत तो आपला सशक्त थोरला भाऊ टायगर काय धंदे करतो आहे याची कल्पना नव्हती असे "अधिकृत वस्तुस्थिती"च्या नावाखाली तुम्ही ठोकून देताना तुम्ही किती तर्कदुष्ट विधान करत आहात याची तुम्हालाच जाणीव नसावी. त्याच्याच पुढे तुम्ही म्हणता "त्याचे (म्हणजे टायगरचे) चोरटे व्यापार कुटुंबियांस ठाऊक होते" आणि मग लगेच "परंतू त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे हे कुटुंबास ज्ञात नव्हते". हे म्हणजे ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बोरीवली ते चर्चगेट रेल्वे प्रवास करणारा एक चाकरमानी साईड बिझनेस म्हणून प्रवासात पाकीटमारीचा धंदा करीत असे आणि ते त्याच्या कुटुंबीयांस ठावूक नसे अशी एखादी सुरस कथा कथा सांगावी अशा प्रकारे आपण सांगता. तसेच, एकीकडे याकुबला 'काही म्हणजे काही माहित नव्हतं हो' असा टाहो फोडतानाच "तो माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही." असेही म्हणून जाता. कुबेर साहेबएक पे रेहेना, एक तो काही माहित नै बोलना नैतो निरपराध बोलना. लेकीन प्लीजच कोलांट्याउड्या मत मारना.

पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबियांस माहित नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना ते आय.एस.आय ने त्यांना कचाट्यात पकडले? म्हणे, 'बाँबस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुबाच्या देखत त्याला चोपले'. आईआईगंहे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच.

आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकुबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणूसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर "लटकावून टाका फासावर" इतकं सोपं आहे?

आपल्या या अचाट आणि अतर्क्य संपादकीयात आपण याकुबच्या धर्माचा उल्लेख करुन तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेचभारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करुन तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तूलनेत याकुबचा गुन्हा चक्क किरकोळ ठरवून काय सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे समजण्याइतके आता तुमचे वाचक दुधखुळे राहिलेले नाहीत. संजय दत्तला सवलती मिळतात, ते कायद्याने. दाऊद टायगरला परत आणण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत ते आपले सरकार अंतर्गत आंतरराष्ट्रीय कायदे पाळत असल्यानेच. आणि आता याकुब फासावर गेलाय तो ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच. तेव्हा 'उचलला याकुब, लटकवला फासावर' हे वाक्य 'उचलली जीभ लावली टाळ्याला' शैलीत आपण बरळू नये, हेच उत्तम.

आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊद्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्याआणि ते कमी म्हणून की काय उजवा हातही निकामी झालेल्या माणसाबद्दल किंवा वयाच्या तेराव्या वर्षी आईचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह बघायला ज्याला लागला त्या व्यक्ती विषयी जरा उमाळा येऊ द्या.

गिरीश कुबेर साहेब, मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहेमला मराठी वाचनाची गोडी निर्माण होण्यामागे लोकसत्ताचे नियमित वाचन हे आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धाती एक मोठी अंधश्रद्धा होती हे आपण मागेच सिद्ध केले होतेत, आणि आज हे संपादकीय लिहून तेव्हाचा लोकसत्ता घेणे बंद करण्याचा माझा निर्णय किती योग्य होता हे तुम्ही मला दाखवूनच दिलेत.
माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हे एक वाचनीय वर्तमानपत्र होता. नंतर त्याला उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होतात्या बालीश गरळोओकीत नंतर मोदी सरकार आल्याने नवा जोम आला. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही. तोच वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात हे पाहून संतोष जाहला. कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता आणि पर्यायाने खपही टिकवून ठेवू शकत नाही.

तेव्हा संपादक गिरीश कुबेरमहाशय, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि न्यायालयांचा आदर करायला शिका. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली  शाब्दिक कोलांट्याउड्या मारण्याच्या आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि तुमच्या या संपादकीयावरुन पुन्हा सिध्द झालेले आहे की तुमची नियतही साफ नाही. तेव्हा लवकर सुधारा. नाहीतर मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधे रस्त्यावरच्या मवाल्यागत वागून थोतरीत खाणारा राजदीप आणि अनेकांनी तोंडात शेण घातलं तरी रोज  चुकता बरळणारा निखिल वागळे यांच्या रांगेत लो तुम्हाला कधी नेऊन बसवतील तुम्हालाच पत्ता लागावयाचा 
नाही.  

पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता  तुमचा तीव्र निषेध.
आपला नम्र

मंदार दिलीप जोशी
जालनिशी | फेसबुक

ता.. मी लोकसत्ता का बंद केला ते सांगणारे जुने विपत्र इथे वाचावयास मिळेल.
http://mandarvichar.blogspot.in/2014/09/blog-post.html




Tuesday, July 28, 2015

भेट




कॉफी पीत पीत
बटांशी हळुवार खेळत
विचार करत असताना तू आलास.....
...संथपणे
हळू हळू पावले टाकत
माझ्या दिशेने,
ठाम निश्चयी पावले तुझी.....
चपला मात्र जराशा लांबच काढून ठेवल्यास
संवेदनशील पर्यावरणवादी तू
किती सुंदर मनाचा आहेस रे.....
की
....गवतावर पादत्राणे घालून चालू नका अशी पाटी वाचली होतीस?

डॅा ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे महान व्यक्तिमत्व काल कायमचे पंचत्वात विलीन झाले.

डॉ. कलाम यांनी कायम विज्ञानाचा प्रसार करण्यात आनंद मानला. समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजवताना नेहमी धर्माला बडवले पाहीजे असे नाही हे त्यांनी कुठलाही अभिनिवेश न ठेवता प्रत्यक्ष आचरणाने दाखवून दिले. या प्रवासात कुठेही त्यांना वादग्रस्त गोष्टी चिकटल्या नाहीत. ही कला फार कमी जणांना अवगत आहे.

ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात हे सगळ्यांनाच विदीत आहे. इथे कवी संदीप खरे यांच्या "व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची" या काव्यपंक्तींची आठवण आल्यावाचून राहत नाही. डॉ. कलाम म्हणायचे, "भारताला क्षेपणास्त्रांची गरज यासाठी आहे की ताकद ही नेहमी ताकदीचा आदर करते" (We need missiles as strength respects strength).

त्यांची ओळख वैज्ञानिक व मिसाईल मॅन इतकीच नव्हती, तर एक सहृदयी व संवेदनशील बॉस म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपला बॉस कधी जातो याची इतर लोक वाट बघतात, हे जाऊ लागले की त्यांच्या हाताखालचे लोक व्यथित होत असत. सरकारी बाबू असोत किंवा लष्करी अधिकारी, सगळ्यांशी वागताना कमालीचा संयम व शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी होती. लहान मुले व तरुणांना मार्गदर्शन करणे ह्या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी होत्या. ज्ञानदानाचा त्यांचा उत्साह आश्चर्यकारक होता. त्यामुळे वयाच्या ८४व्या वर्षी ते निवर्तले असले, तरी ते अकाली गेले असेच आपल्याला वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही. अक्षरशः स्वतःच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते देशहितार्थ विज्ञानाचा प्रसार व मार्गदर्शन करत राहीले.

लोकसत्तातल्या बातमीचे शीर्षक हे 'अग्निपंख विसावले' असे आहे. ते तितकेसे बरोबर नाही. डॉ कलाम यांचे नश्वर शरीर कार्य करेनासे झाले, पण त्यांची चेतवलेला विज्ञानाग्नि आपल्या सर्वामधे कायम तेवत राहून आपल्याला अग्निपंख बहाल करत राहील अशी मला खात्री आहे.

कायम देशहित हाच वैय्यक्तिक स्वार्थ मानणार्‍या अशा या सच्च्या भारतीयाला माझी साश्रू नयनांनी मन:पूर्वक श्रद्धांजली.

निआषाढ शु१२शके १९३७
© Mandar D. Josh
i

Friday, July 17, 2015

बाळाजी विश्वनाथ पेशवे - लेखक प्रमोद ओक

हे पुस्तक परिक्षण नाही. परिक्षण लिहीण्याइतका मी मोठा आहे असे मला अजिबात वाटत नाही. पुस्तकाच्या वाचनानंतर मला काय वाटले त्याबद्दल व्यक्त झालेले हे विचार आहेत.


हे पुस्तक नुकतेच वाचले. ही ऐतिहासिक कादंबरी नाही तर संशोधनपर पुस्तक आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना हे अनेक ठिकाणी कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे. पुस्तकासाठी संशोधन करताना लेखकाने घेतलेले कष्ट पानागणिक जाणवतात.

वास्तविक पेशवा हे पद छत्रपती शिवाजी महाराजांपासून अस्तित्वात असले तरी आपण ज्याला 'पेशवाई' म्हणतो ती बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांपासूनच सुरू झाली. थोरले बाजीराव पेशवे यांच्यापासून शेवटच्या बाजीरावांपर्यंत  सगळ्या पेशव्यांवर विपूल साहित्य उपलब्ध असले तरी या पहिल्या पेशव्याबाबत मी काहीही वाचलेले नव्हते. त्यामुळे हे पुस्तक नजरेस पडताच संग्रही ठेवण्याचा निश्चय केला, आणि हा विश्वास लेखकाने सार्थ ठरवला.

पुस्तकात सुरवातीला चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण हे महाराष्ट्रात  बाहेरून आले का, आले असल्यास देशाच्या किंवा परदेशाच्या कुठल्या भागातून आले इत्यादी बाबींचा उहापोह करण्यात आलेला आहे. तो कंटाळवाणा वाटला तरी तो पेशव्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे, कारण चित्पावण ब्राह्मणांविषयी इतिहासात मुख्यतः पेशव्यांपासूनच वाचायला मिळते.

शाहू महाराजांच्या सुटकेपासून ते बाळाजीपंत यांचा पेशवेपदावर नेमणूक इथपर्यंतचा इतिहास फारच रोचक आहे आणि तो लेखकाने विस्तृतपणे दिलेला आहे. सर्वसामान्य माणूस स्वाभाविकपणे प्रत्येक बदलाचा स्वीकार करण्याआधी "What's in it for me?" अर्थात "यात माझा काय फायदा?" असा विचार करतो. मग या मनुष्यस्वभावात असलेल्या वैशिष्ठ्यापासून त्याकाळचे सरदार, इतर मानकरी, वगैरे कसे लांब असतील? त्या धामधुमीच्या काळात याची व्यवस्थित जाणीव असलेल्या बाळाजीपंतांनी त्यांच्याकडे असलेल्या शक्यतो लढाई टाळून सामोपचाराने समोरच्याला त्याचा फायदा दाखवून देणे व माणसे जोडणे या दोन अंगभूत गुणांनी कसा उपयोग करुन शाहू महाराजांची सत्ता मजबूत करण्यास महत्वाची भूमिका बजावली हे या पुस्तकात व्यवस्थितपणे येते.

पुस्तक बाळाजीपंतांच्या मृत्यूवर संपत नाही. शेवटच्या प्रकरणात  त्यांची पत्नी राधाबाई व इतर पेशवे परिवाराबाबत बरीच माहिती मिळते. एक उत्तम पुस्तक संग्रही पडले याचे समाधान लेखक श्री प्रमोद ओक यांनी दिले त्याबद्दल त्यांचे आभार.

आता पुस्तकातून मला जाणवलेल्या माझ्यासाठी रोचक असलेल्या तीन बाबी. त्यातली इतिहासप्रेमींच्या दृष्टीने असलेली बाब प्रथम सांगतो.

(१)


(२) आमचे गाव केळशी. त्या अनुषंगाने:



याबाबत कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.

(३) आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला आपल्या मुळांविषयी (roots) प्रचंड उत्सुकता असते, त्या संदर्भातली ही बाब. आमचे पूर्वज मूळचे कोकणातल्याच वरवडे गावचे शाण्डिल्य गोत्री जोशी. आता "जोशी उदंड जाहले" हे जरी खरे असले, तरी आम्ही पेशव्यांशी संबंधित जोशांच्या शाखा/उपशाखांपैकी असू शकतो ही शक्यताच गुदगुदल्या करुन गेली. या बाबतही कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.



Wednesday, May 27, 2015

नावात काय आहे? सगळंच!

नावात काय आहे असं तुकाराम महाराज म्हणून गेलेच आहेत. काय म्हणता? शेक्स्पिअर म्हणाला असं? अहो शेक्स्पिअर काय तुकाराम काय शेवटी नावंच ना? तरी कोण म्हणालं ते महत्वाचं आहे म्हणता? तसं बरोबरच आहे तुमचं.

हे पाल्हाळ लावायचे कारण म्हणजे नुकतंच एका लग्नात एक नातेवाईक भेटले आणि कौतुकाने अरबस्थानातल्या इजिप्तमध्ये नोकरी निमित्त असलेल्या त्यांच्या मुलाने आपल्या दुसर्‍या मुलीचे नाव 'सायरा' असल्याचे सांगू लागले. मी मनात म्हटलं (आम्ही मनातच म्हणायचे) "सायरा? एका हिंदू कुटुंबातल्या मुलींच नाव सायरा? मोठी झाल्यावर काय म्हणायचं तिला? सायरा बानू? खिक्क्. अरबस्थानात असली मुसलमानी नावं ठेवायची सक्ती आहे का? की मुसलमानी नावं ठेवायचं कबूल कबूल कबूल केल्याशिवाय मुलं होऊ देत नाहीत तिथे? नशीब मुलगा नाही झाला नाहीतर त्याचं नाव महंमद ठेवलं असतं तुम्ही! नाहीतरी मागे एक नाटक येऊन गेलंच होतं बेगम बर्वे. म्हणजे आडनाव हिंदू आणि नाव किंवा संबोधनार्थी पदवी म्लेंच्छ. आनंद आहे."

हिंदू आई वडिलांना आपल्या मुलामुलींची नावं ठेवताना यवन किंवा म्लेंच्छ नावांना वाढत्या प्रमाणात शरण का जावं लागत आहे हे आकलनाच्या पलिकडचं आहे. एकीकडे वेगवेगळे सुंदर अर्थ असलेल्या संस्कृतप्रचूर नावांकडे अनेकांचा कल वाढत असल्याचे दिसत असताना आश्चर्यकारकरित्या बरेच आईवडील आपल्या मुलामुलींची नावे ख्रिस्चन आणि मुसलमान पद्धतीने ठेवत आहेत. हे अत्यंत क्लेषकारक आहे. आता हे मान्य आहे की आपल्या अपत्याची नाव काय ठेवावी हा ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे, तरीही हिंदू म्हणून अशी नावे ठेवण्याकडे आज कमी प्रमाणात का होईना पण वाढता असलेला कल हे लक्षण आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याचे मानावे की अक्कल गहाण टाकून व्यक्तीस्वातंत्र्य या शब्दाचा भलताच अर्थ लावल्याचे?

एकदा एका कीर्तनकाराचे कीर्तन ऐकण्याचा योग आला असता त्याने हिंदूंबद्दल मांडलेली मते विचारप्रवृत्त करुन गेली.  एखाद्या हिंदूकडे बघितलं असता तो हिंदू आहे याचे कोणतेही लक्षण त्याच्या वेशभूषा किंवा दिसण्यावरुन जाणवत नाही. अर्थात इतर धर्मीयांकडे पाहून प्रत्येक बाबीचे तितकेच कट्टर अनुकरण आपल्याला शक्य आणि योग्य नसले, तरी प्रत्येक बाबीचं अंधानुकरण करणंही तितकंच धोकादायक आणि मूर्खपणाचे आहे.धर्मो रक्षति रक्षितः अशी एक म्हण आहे. अर्थ असा की जो धर्माचे रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. तेव्हा आपण आपल्याच धर्माला, संस्कृतीला अशा प्रकारे हरताळ फासला, तर इतरांना आपला आदर करण्याची काहीच गरज भासणार नाही.

या संदर्भात एक बातमी आठवली. आयर्लंडनं समलिंगी जोडप्यांच्या लग्नांना परवानगी नुकतीच परवानगी दिल्याचे वाचनात आले. पाश्चात्य तसेच देशी वृत्तमाध्यमांनी याची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आणि जाता जाता भारतासारख्या धार्मिक बाबींत संकुचित दृष्टी बाळगणार्‍या देशाने यातून बोध घ्यावा, असा पांडित्यपूर्ण सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.

पण दोनेक वर्षांपूर्वी सविता हालाप्पनवार नावाची एक अडलेली गरोदर स्त्री याच कॅथलिक आयर्लंडमध्ये रुग्णालयात दाखल झाली होती. तिचं मूल गर्भातच गेलं होतं, आणि तिचा जीव वाचवण्यासाठी तिला मोकळी करणं आवश्यक होतं. पण गर्भपात करण्यास आमचा धर्म मान्यता देत नाही म्हणून ते डाॅक्टर्स नुसते तमाशा बघत बसले तीन चार दिवसांनी जंतुसंसर्ग होऊन तीळ तीळ झिजून ती मेली, पण या तथाकथित उदारमतवादी आयर्लंडच्या लोकांच्या दगडी मनांना पाझर फुटला नाही. बायबलमधे समलिंगी संबंधांच्या विरुद्ध स्पष्ट ताशेरे आणि खुद्द देवाने शिक्षा केल्याचे दाखले आहेत. अडलेल्या बाईची सुटका केल्याबद्दल देवानं रागावल्याचे वा त्यानं शिक्षा केल्याचे नाहीतच. पण लक्षात कोण घेतो? भारतात हे झालं असतं तर आधी नातेवाईकांनी, आणि तिथून वाचले तर वृत्तमाध्यमांनी या डाॅक्टर्सचा जीव घेतला असता. पण तसे होत नाही, भारतात अशा परिस्थितीत कोणताही डाॅक्टर धार्मिक तत्त्वांपायी अडलेल्या बाईचा जीव घेत नाही.

अधिक विषयांतर न करता या या मामल्याचे एक तात्पर्य लक्षात घेऊया ते असे की पाश्चात्य देशांत आणि एकंदरित फारिनमधे होणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असते, असे नाही. तेव्हा तिचा अंगीकार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. काही बाबतीत आपण त्यांच्यापेक्षा बरेच उजवे असू शकतो आणि आहोत. आज जगभरात भारतीयांना जो मान आहे तो बहुतांश प्रमाणात हिंदू आहोत म्हणूनच आहे. आपल्या अनेक पद्धतींना आणि प्रथांना आपणच जपायला हवे कारण ती आपली ओळख आहे, आणि आपली नावं हा आपल्या हिंदू असण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा आईवडील आपल्या अपत्याचे नाव ठेवतात, तेव्हा त्या बाळाचे व्यक्तिमत्व घडायला सुरवात होण्याची आणि त्याची आपली अशी एक ओळख निर्माण होण्याची एक सूक्ष्मशी सुरवात असते. ती ओळख एक हिंदू म्हणून जपली जावी या करता आपण देशात असलो किंवा परदेशात असलो तरी नावं ठेवताना ती आपल्याच  संस्कृतीशी नातं सांगणारी असावीत याची काळजी घेणं आवश्यक आहे.

आपला बाह्यावतार आपल्याला बदलत्या काळानुसार आणि सोयीनुसार बदलावा लागला, तरी वर म्हटल्याप्रमाणे हिंदू असल्याच्या सगळ्याच चिन्हांना अशा प्रकारे तिलांजली देण्याची आवश्यकता नाही. "आमचं मूल आहे, आम्ही काहीही नाव ठेऊ" अशी स्वत्वहीन भूमिका घेणे हे हिंदूंसाठी अंतिमतः घातक ठरेल. व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क नाव निवडण्याच्या बाबतीत अवश्य गाजवावा, पण तो गाजवायला पर्याय म्हणून असंख्य हिंदू नावे उपलब्ध आहेत. तेव्हा हिंदू म्हणून आपला स्वाभिमान जपा.

हिंदू आईबाबांनो आपल्या मुलांची हिंदू पद्धतीने नावे ठेवा.

--------------------------------------------------------------------------------------------------
श्रेयनिर्देशनः या लेखनात उल्लेख केलेला आयर्लंडच्या सविता हालाप्पनवार या मृत्यू पावलेल्या महिलेचा किस्सा आमचे फेसबुकवरचे मित्रवर्य श्री कृष्णा धारासुरकर यांच्या एका टिप्पणीतून घेतला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
जेष्ठ शुक्ल ९, शके १९३७
----------------------------------------------

Thursday, May 7, 2015

आता पुरे झाली एन्टरटेनमेन्ट

एन्टरटेनमेन्ट! एन्टरटेनमेन्ट!! एन्टरटेनमेन्ट!!!

आता पुरे झाली एन्टरटेनमेन्ट. आता तरी बाहेर पडा या मूर्खपणातून. दोन्ही हात चेहर्‍यावर ठेऊन "ऐयाआआआआआ आमीsssssर" किंवा "वॉऑऑऑऑऑव सलमान" किंवा अ ते ज्ञ यापैकी एकाही अक्षराने लिहून दाखवता न येणारे चित्कार काढून मोठ्या पडद्यावर अवतरलेल्या चिकन्या नटाकडे (किंवा नटवीकडे) पाहत जणू काही हाच आणि हाच आपला उद्धारकरता आहे असे भाव थोबाडावर लेवून असणार्‍या बावळटांनो, शुद्धीवर या. वय वर्ष पस्तीस असताना घरी "स्वसंरक्षणार्थ" मशीनगन आणि हातबॉम्ब ठेवणार्‍या आणि पकडलं गेल्यावर त्या मागचं गांभीर्य न समजण्याचं नाटक करणार्‍यांच्या पाठीशी उभं राहणं बंद करा. दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हाच नव्हे तर प्रचंड धोकादायक आहे हे गावीच नसणार्‍या आणि असलं तरी पैशाच्या जोरावर आपण माणसं आणि न्याय दोन्ही विकत घेऊ शकतो असा माज बाळगणार्‍या या समाजकंटकांचं समर्थन करणं बंद करा. आपल्या दानधर्माचा डंका पिटणार्‍या आणि प्रत्यक्षात आपल्याच गाडीखाली आलेल्या लोकांना किरकोळ पैसे देऊन वाटेला लावणार्‍या कोत्या मनोवृत्तीच्या हलकटांविषयी कणव बाळगणं बंद करा. जंगल आणि पर्यावरण म्हणजे उघड्या जीपमधून प्राण्यांची हत्या करणं याचसाठी आहेत असं वाटणार्‍या माजोरड्यांना पाठिंबा देणं थांबवा. रस्त्यावर झोपावं लागणं या मागची अगतीकता आणि लाचारी समजून न घेता त्यांना कुत्र्याची उपमा देणार्‍या टोणग्यांना आणि गुन्हा केला असेल तरी शिक्षा झाल्यावर वाईट वाटतं असे तारे तोडणार्‍या या कचकड्याच्या बाहुल्यांचं कौतुक करणं आता बंद करा. दारूच्या नशेत गुन्हा करणारा माणूस वाईट नाही तर दारू पिणं आणि ती तयार करणारा वाईट याचा साक्षात्कार ऐन खटल्याच्या वेळी होणार्‍या येडपट चाहत्यांनो, तुमचा उथळपणा बंद करा.

लहानपणी कधी शेजारी राहणार्‍या तुमच्या सवंगड्याचं खेळणं त्याला न विचारता घरी आणलं म्हणून थोबडवून घेतलंय का कधी? तेच खेळणं उचलून तुमची आई तुम्हाला फरफटत घेऊन गेली असेल आणि ते खेळणं परत करायला लावलं असेल. आणि पुन्हा सगळ्यांसमोर बदडलं असेल आणि दोन दोन दिवस जीवघेणा अबोलाही धरला असेल. आज चाळीशीच्या घरात असलेले काही जण कदाचित हे वर्णन आठवून एव्हाना मनाने भूतकाळात पोचलेही असतील. त्यावेळची आई-वडिलांची प्रतिक्रिया आठवते? आपल्या मुलाने चोरी केली, तो वाया गेला, आता त्याचं कसं होणार आणि असे असंख्य भाव तुमच्या माऊलीच्या चेहर्‍यावर दिसले असतील तुम्हाला. हेच का आपण संस्कार केले असे हताश भाव तुमच्या वडिलांच्या चेहर्‍यावर दिसले असतील. आणि यामुळे तुम्हालाही तुम्ही केलेल्या गुन्ह्याची.....माफ करा....ते कायदेशीर झालं....तुम्ही केवढं मोठं पाप केलंय याची जाणीव होऊन तुमचं मन अपराधगंडाने ग्रस्त झालं असेल. यातूनच तुमच्या मनात पापभीरू वृत्तीही निर्माण झाली असेल. कायदा पाळणारे आणि त्याचा आदर करणारे नागरिक असेच तयार होतात.

पण बॉलिवुडमधले आईबाप तसे नसतात बरं का. चित्रपटात एका तरुणीला पळवून नेणार्‍या आपल्या मुलाला गोळी घालणारी आई दिसते तर प्रत्यक्षात आपल्या मुलाने घरात एके ५६ आणि हातबाँब ठेवले आणि बॉम्बस्फोट होणार आणि शेकडो लोक मारले जाणार ही माहिती पोलीसांना दिली नाही हे समजल्यावर मात्र जंगजंग पछाडून त्या देशद्रोही मुलाला उगवता सुर्य हे प्रमाणपत्र मिळवण्याची धडपड बाप करताना दिसतो. तो त्याला कायद्याने झालेली शिक्षा भोगावी आणि मग सुधारावे असा प्रयत्न काढताना मात्र दिसत नाही. अशा घटना घडल्या ही यांचा दांभिकपणा अधिकच ठळकपणे दिसतो.

चित्रपटातलं आदर्श वर्तन प्रत्यक्षात असावं अशी भाबडी आशा आज कुणालाही नाही आणि तशी अपेक्षा ठेवणं फार योग्य ठरणार नाही. चित्रपट आणि मालिकांतले प्रेमळ आणि वात्सल्यसिंधू बाबूजी पार्टीत झिंगलेले दिसतात आणि चित्रपटात कोट्यावर्धी कमावणारी नटी हॉटेलमधे उरलेलं अन्न पार्सल का नेऊ देत नाही म्हणून तिथल्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करताना दिसते. जोपर्यंत याचा समाजाला आणि देशाला अपाय होत नाही तो पर्यंत याकडे फारसं गांभीर्याने बघण्याची गरजही निर्माण होत नाही. मात्र चित्रपटातला प्रामाणिक, सालस, साधा, कायद्याचं पालनच नव्हे तर गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेणारा/री ही प्रतिमा जेव्हा लोकं खरी मानून चालतात आणि त्याने केलेल्या कायदेभंगाकडे आणि देशद्रोहाकडे जेव्हा सहानुभूतीने पाहू लागतात, तेव्हा खरा धोका निर्माण होतो. अशा लोकांमुळे आपली मनं बोथट आणि रोगट करुन घेतलेल्या संपूर्ण समाजाला घाऊक  मानसोपचारांची गरज आहे असं वाटू लागतं.

माझ्याकडे पैसा आहे मला काहीही शक्य आहे असा माज करुन कुणी कायदा मोडून माणसं मारू लागत असेल आणि त्याला शिक्षाच होऊ नये म्हणून त्याच्या फक्त कुटुंबियांपैकीच नव्हे आपल्याहीपैकी कुणी त्याचं लंगडं समर्थन करत असेल तर आपल्या संस्कारातच काहीतरी गडबड आहे का हे तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. कायद्यापुढे कुणी मोठं नाही, देशापेक्षा काही महत्त्वाचं नाही हे संस्कार लहानपणापासून देणं ही आजची प्राथमिकता आहे. लहानपणी क्षुल्लक गोष्टींवरुन थोबडवून घेतलेल्या आजच्या चाळीशीत पोचलेला आजचा बाप जेव्हा स्वतःच्या मुलाला मात्र "जाऊ दे, लहान आहे मुलगा" या मानसिकतेतून शिक्षा करत नाही, तेव्हा त्याला त्या मानसिकतेतून बाहेर काढायलाच हवं आहे. आजच्या आई-वडीलांनी आपल्या मुलांना हे सांगायला हवं की दबंग हीरो हे आजचे खरे हीरो नव्हेत. त्यांचे अनुकरण करायची काहीही गरज नाही. अगदी खेळतानाही नाही. ते समाजाला आणि देशालाही धोकादायक आहे. आज संपूर्ण देशाला आदर्शवत वाटावेत असे लालबहादूर शास्त्रींसारखे नेते अस्तित्वात नाहीत. त्यांच्या एका शब्दाखातर दुष्काळात अनेकांनी स्वतः सुखवस्तू असतानाही एक वेळचे जेवण सोडलं होतं. मात्र ज्यांचा आदर्श ठेवावा असे अनेक जण आपल्या देशात आजही आहेत. आजचे खरे नायक हे हातात काठी वगळता काहीही शस्त्र नसताना आपल्यावर धडाधड मशीनगनमधून गोळ्या चालवणार्‍या कसाबवर झेप घेऊन त्याला पकडून देणारे निधड्या छातीचे हवालदार तुकाराम ओंबळे आहेत. कमांडो संदिप उन्निकृष्णन सारखे शूर तरूण आहेत. प्रचंड दबावाखाली असतानाही सलमान खान विरुद्ध पोलीसात स्टेटमेंट देऊन खटला उभा करायला लावणारे आणि त्यापायी हाल हाल होऊन स्वतःचा जीव गमवायला लागणारे रवींद्र पाटील यांच्यासारखे दृढनिश्चयी पोलीस आहेत. काहीही वैय्यक्तिक फायदा नसताना जगभर नैसर्गिक संकटात आणि युद्धजन्य परिस्थितीत मदतकार्य करणारे आपले असंख्य सैनिक आहेत. देशात कुठेही कुठलाही अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती आली की सर्वप्रथम तिथे मदतकार्याला पोहोचणार्‍या नि:स्वार्थी संघ कार्यकते आहेत. स्टॉकहोम जल पुरस्कार ज्यांना मिळाला ते राजेंद्र सिंह आहेत. कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे आहेत. कायद्यापेक्षा मोठं आणि देशहितापेक्षा महत्वाचं कुणीही आणि काहीही नाही असे संस्कार मुलांवर करण्याची गरज आज कधी नव्हे ती निर्माण झालेली आहे. ही वेळ पुनश्च हरिॐ करण्याची आहे. बघू नका यांचे सिनेमे. गाणी ऐकू नका. बहिष्कार घाला. न्यायव्यवस्था जिथे न्याय द्यायला एका तपाहून अधिक लावते तिथे तुमचे हे प्रयत्न चोख काम करतील. ओस पडेलेली चित्रपटगृहच यांना धडा शिकवतील. तुम्हाला अदाचित संजय दत्तच्या वेळी हे करणं जमलं नसेल तर तुमची तेव्हाची पापं धुण्याची ही संधी आहे. कुटुंब घडवा, समाज आपोआप घडेल.

तेव्हा आता बास्स झाली एन्टरटेनमेन्ट.

---------------------------------------------------
संकष्ट चतुर्थी, वैशाख शु. ४, शके १९३७
अर्थात इसवीसन ७ मे २०१५
---------------------------------------------------

Saturday, March 21, 2015

पुतळ्यांचे 'पुतळे' होऊ नयेत म्हणून




स्थळः पुण्यातील कोथरुड येथील कर्वे पुतळ्याशेजारचा पेट्रोल पंप.

बहुधा पुण्यात नवीन असलेला एक माणूस त्याच्या नातेवाईकाशी फोनवर बोलत होता. तो नक्की कुठे उभा आहे हे सांगताना त्याचं लक्ष पुतळ्याकडे गेलं. तो पुतळा कुणाचा आहे हे त्याला माहित नव्हतं हे स्पष्ट होतं. तो जिथे उभा होता तिथून त्याला पुतळ्याखाली लिहीलेली अक्षरं अर्धवट दिसत होती. ती पाहून तो फोनवरच्या नातेवाईकाला म्हणाला, "मी भारतरत्न पुतळ्याशेजारी उभा आहे".

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे, पण वरच्या घटनेने माझ्या मनात पुतळे आणि ते ज्यांचे आहेत त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांना असणारी माहिती याविषयी मनात विचारचक्र सुरु झालं. आपल्या राज्यात आणि देशात अक्षरशः लाखोंच्या संख्येने पुतळे असतील. सर्वाधिक पुतळे बहुतेक गांधीजींचे असावेत. आता गाधीजींविषयी कुणाला माहिती नाही असा प्रश्न आपल्याला पडेल. पण आर.के.लक्ष्मण यांचे एक सुप्रसिद्ध व्यंग्यचित्र आहे. एक नेता गांधीजींच्या तसबीरीखालचे नाव वाचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा खाजगी सचीव मागून त्याला, "It's Gandhiji sir", असं सांगतो आहे. यथा प्रजा तथा राजाच्या या काळात नेत्यांची ही स्थिती असेल तर सरवसामानय जणतेची काय असेल याची सहज कल्पना येऊ शकते.

यावर मला सुचलेले उपाय करता येऊ शकतो. जिथे असे पुतळे असतील तिथे पुतळ्याच्याच खाली एखाद्या छोट्या स्टॅन्डवर माहितीपत्रकांचा (फ्लायर्स) गठ्ठा ठेवता येईल. अशा माहिती पत्रकांच्या एका बाजूला त्या व्यक्तीची अगदी थोडक्यात माहिती आणि दुसर्‍या बाजूला त्या व्यक्तीवर असलेल्या पुस्तकांची शक्य तितकी समग्र यादी असावी. तसेच, अशीच माहिती पत्रके वरील ठिकाणाप्रमाणेच शेजारील पेट्रोल पंप वर इतर दुकाने यांमध्ये ठेवण्याची सक्ती करावी व ग्राहकांना दुकानातून बाहेर पडताना ती माहितीपत्रके देण्याची सक्ती करावी. ही माहितीपत्रके दुकानांना अर्थातच सरकारतर्फे विनामूल्य पुरवायची असल्याने ती ग्राहकांना देण्यात अशा दुकानदारांना कष्ट पडू नयेत. तसेच अशा पुतळ्यांशेजारी असलेली दुकाने पुरेशी मोठी असल्यास गल्ल्याशेजारी एखाद्या स्टॅन्डवर त्या व्यक्तींविषयी असलेली पुस्तके विक्रीस ठेवता येतील. मोठ्या दुकानांतून व मॉलधून असे करणे सोपे जावे. सर्वासामान्यपणे असे बघण्यात येते की एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या विचारसरणीबद्दल एखाद्या व्यवसायिकाला किंवा स्थानिक नेत्याला अंमळ अधिक ममत्व असते. अशा व्यक्तींच्या भावनांना आवाहन करुन अशी पुस्तके सवलतीच्या दरात किंवा मोफत देण्याची व्यवस्था करता येऊ शकते. अर्थात अशी पुस्तके ही सर्वप्रकारची असावीत. म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्य व चरित्राबरोबरच त्याच्या विचारांची समीक्षा असलेली पुस्तकेही असावीत जेणेकरुन वाचनेच्छुक लोकांना सर्वसमावेशक माहिती मिळवता येऊ शकेल.

कर्वे पुतळा ही खूण आणि बसस्टॉप म्हणून सांगताना किती जणांना पुतळा असल्यामुळे कुणीतरी मोठा माणूस असणार या पलिकडे त्यांच्या कार्याविषयी किती माहिती असेल? निदान त्या ठिकाणी तरी महर्षी कर्वे केवळ एक पुतळा म्हणूनच उभे आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे व्यवस्था केल्यास दोन फायदे होऊ शकतील. एक म्हणजे लोकांना अशा व्यक्तींविषयी पुरेशी माहिती होऊ शकेल, आणि दुसरा म्हणजे आपल्या देशाला मिळालेली आझादी ही फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली नसून हजारोंच्या संख्येने असलेल्या समाजसुधारक आणि क्रांतीकारकांचा देश घडवण्यात आणि स्वतंत्र करण्यात महत्त्वाचा सहभाग होता हे समजण्यात मोलाची मदत होईल.

जाता जाता एक प्रश्नः हा उपाय सरकारला कसा कळवता येईल?

Saturday, January 31, 2015

हा अधिक, तर तो उणा?

24वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धाला केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..>>

फेसबुकवर बराच काळ फिरत असलेल्या पोष्टीचा हा एक भाग. गुगल गेल्यास सगळी पोस्ट वाचता येईल. मुद्दामून इथे देत नाही.


हरखचंद सावला यांची कामगिरी निश्चितपणे थोर आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे (आणि हे मी माझ्या मूळच्या चिकित्सक स्वभावला दूर ठेऊन, त्या माणसाबद्दल आलेल्या फेसबुकी फॉरवर्डवर बिंधास विश्वास ठेऊन म्हणतोय, तो माणूस खरंच अस्तित्वात आहे का याचीही खात्री केलेली नसताना.) पण याचा अर्थ प्रत्येक वेळी एखादं इतर क्षेत्रात थोर कर्तृत्व असलेलं व्यक्तीमत्व घ्यायचं आणि त्याच क्षेत्रातील कामगिरीबद्द्ल त्याला दिलेल्या एखाद्या पदवीवरुन टोमणे मारायचे आणि लोकांचा तेजोभंग करायचा हा करंटेपणा आता पुरे झाला. आहेच सचिन तेंडुलकर देव, पण त्याला देव म्हणतात ते फक्त क्रिकेटमधेच, त्याला कुणी थोर समाजसेवक म्हणत नाहीत - जरी तो दोनशे अनाथ मुलांच्या जेवणाखाण्याचा, कपड्यालत्त्याचा, व शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत असला तरी! सचिनने क्रिकेटमधून जो लोकांना आनंद दिलाय, त्याचं वर्णनही करता येणार नाही, मग त्याची तूलना इतरांशी कशाला? आणि हरखचंद महान माणूस असले तर सचिनमधे उणेपणा कसा काय येतो?

मुळात तूलनाच करु नये, पण तुम्हाला तूलनाच करायची हौस असेल, तर त्याच क्षेत्रातला चमकोगिरी करणारा माणूस घ्या आणि बडवा त्याला खुशाल. त्यासाठी apples and oranges यातला फरक समजण्याची कुवत असावी लागते.

दुसरी गोष्ट, जी मला तितकीच धोकादायक वाटते म्हणजे आंतरजालावर सगळीच माणसं एखादी गोष्ट वाचली की खोलात जाऊन विचार करत नाहीत. अशी चुकीची तूलना वाचून एखाद्या सचिनच्या चाहत्याने किंवा ज्याला कुणाला बडवायला घ्याल त्याच्या चाहत्याने समजा हरखचंद यांच्या सारख्या माणसा बद्दल मनात अढी ठेऊन त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर? हा त्यांना मिळू शकणार्‍या मदतीच्या दृष्टीने नुकसानकारक नव्हे का?

तेव्हा हरखचंद सावला यांच्याबद्दल भरपूर लिहा. आपल्या आजूबाजूला असेच प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्वे तुम्हाला दिसली तर त्यांच्याबद्दलही लिहा. आम्ही नक्की वाचू. पुढे ढकलू (फॉरवर्ड). शक्य झाल्यास मदतही करु. आपल्या पण अशा समाजसेवकांबद्दल लिहीताना सचिन तेंडुलकर किंवा इतर कुठल्या व्यक्तिविशेषाला कमी लेखणारे संदर्भ वापरून मनाचा कोतेपणा दाखवू नका, आणि इतर कुणी तसं करत असेल तर त्याला रोखा ही कळकळीची विनंती. अक्षरशः वात आलाय अशी आचरट तूलना बघून.

----------------------------------
माघ शु १२, शके १९३५
----------------------------------

Thursday, January 29, 2015

देश कसा बुडवावा

देश कसा बुडवावा, तुला ऐकायचं होतं ना
ऐक, फार काही करावं लागत नाही मित्रा
देशनिंदा अतिशय सोपी गोष्ट आहे
देशभक्ती आचरटपणा
आ़णि द्रोह करणं फ्याशन आहे

तत्परतेने शत्रूची बोट उडवली रे उडवली
की सैन्यदलांना नावे ठेव
जाब विचार, साधे स्मगलर हो ते
दहशतवादी नाहीच्चेत मुळी, अशी कशी उडवली?
बघ, देश बुडतो की नाही

आपल्याच देशात आपल्याच घरातून हाकललेल्या
मारलेल्या, बलात्कारलेल्या, विस्थापित काश्मीरी पंडितांची व्यथा दाबून टाक,
दुर्लक्ष कर, मग जोरात कांगावा करुन विचार,
काय घंट्याचा त्रास होतो आहे त्यांना?
बघ, देश बुडतो की नाही

एकदा कुणीतरी सिनेमा काढेल
देवळात जाणार्‍यांना मूर्खात काढेल
पण तू मात्र त्याचा उदो उदो कर
त्याचंच कसं बरोबर म्हणत सिनेमा हिट कर
बघ, देश बुडतो की नाही

भगवदगीतेला राष्ट्रीय ग्रंथ करा म्हटल्यावर
तू लगेच माइकचं बोंडकं घेऊन जा
मिळतील तितक्या शिव्या गोळा कर
गीतेला त्वेषाने, उच्चारवाने त्या घाल
बघ, देश बुडतो की नाही

पण दुसरं एखादं पुस्तक राज्यघटनेपेक्षा उच्च आहे म्हटल्यावर
शांत बसून रहा, काहीही करु नको
बातमी बाहेर पडणार नाही असं बघ, मुस्कटदाबी कर
कारण कुणाच्या तरी भावना दुखावतील
बघ, देश बुडतो की नाही

देशाला जे जे भूषणावह, जो जो महान
त्याला त्याला पदोपदी हिणवायला विसरू नको
अपमानास्पद बोल, तेजोभंग कर
समाधान नाही झालं, तर शेलक्या विशेषणांनी विद्ध कर
बघ, देश बुडतो की नाही

भ्रष्टाचाराला पाठिंबा दे, पोलीसांना दोष दे
सगळे सगळे कसे हरामखोर
याची लांबलचक यादी दे
तू मात्र काहीही करु नकोस
स्वतःला काहीही तोशीस पडू देऊ नकोस
बघ, देश बुडतो की नाही

मग विरंगुळा म्हणून एक जोक मार
त्यात आठवणीने, खुबीने, शब्दांच्या कसरती करत
धार्मिक भावना दुखवायला विसरू नकोस
समोरचा रागावला तर तुम्हीच कसे हिंसक,
असा कांगावा करता येईलच
बघ, देश बुडतो की नाही

हे सगळं करताना, तुला विरोध करणार्‍याला जातीयवादी म्हण
त्याला धक्का बसेल, तो अवाक् होईल
मग नाईलाजाने, तोंड दाबून गप्प बसेल
मग तू विजयोन्मादात उत्सव साजरा कर
बघ, देश बुडतो की नाही

Sunday, January 4, 2015

लोकमान्य - एक युगपुरुष

लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.


सत्तावन्नचे स्वातंत्र्ययुद्ध इंग्रजांनी चिरडून फारा वर्षे लोटली नव्हती. या पराभवाने लोक मनाने इतके खचले होते की भारतीय जनता संपूर्णपणे हतवीर्य होऊन 'इंग्रज हेच आपले मायबाप, ते म्हणतील तेच आणि त्यांचेच सगळे बरोबर, आणि भारतीय जे जे ते ते टाकाऊ' अशा निष्कर्षाप्रत आली होती. अशा काळी थंड लोळागोळा होऊन पडलेल्या हिंदुस्थानला ऊब आणली ती न्यायमूर्ती रानडे यांनी. मात्र या उबेचे रूपांतर धगधगत्या वणव्यात केले ते लोकमान्य बाळगंगाधर टिळकांनी. "लोकमान्य टिळकांचा विजय असो" या मराठीभूमीतल्या घोषणे पासून उत्तरेतल्या "तिलक महाराज की जय" या जयजयकारात काय दडलेलं नाही? जनसामान्यांनी दिलेल्या या पदवीपासून ते थेट ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या तोंडून म्हणजेच 'फ्रॉम द हॉर्सेस माऊथ' आलेल्या "भारतीय असंतोषाचे जनक" (Father of Indian Unrest) या संबोधनाचे धनी असलेल्या लोकमान्य बाळगंगाधर टिळकांवर आजवर अनेक लेख व पुस्तके लिहिली गेली असतील. चरित्र लिहायचं म्हटलं की किती लिहावं याला बंधन  नसतं. मात्र एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं चित्रण चित्रपटाच्या माध्यमातून करायचं म्हटलं तर ते मात्र अतिशय आव्हानात्मक काम ठरतं. चित्रपटाला असलेलं वेळेचं बंधन आणि त्या माध्यमाला असलेल्या मर्यादा हे मोठे अडथळे ठरू शकतात. त्यात ती व्यक्ती राजकीय पुढारी किंवा स्वातंत्र्यसैनिक असली, तर बघायलाच नको. त्यातही लोकमान्यांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व असेल तर हे काम आणखी कठीण होऊन बसतं.

मग चित्रपट काढणार तरी कुठल्या पैलूवर? एका निष्णात गणितज्ञावर की पंचांगकर्त्यावर? गीतारहस्य ह्या ग्रंथाच्या रचनाकारावर की "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" ही सिंहगर्जना करणारर्‍या या नरसिंहावर? गोपाळराव आगरकरांसारख्या वैचारिक शत्रूची त्याच्या आजारपणात रात्र-रात्र बसून शुश्रुषा करणार्‍या हळव्या मित्रावर की 'शिक्षणमहर्षी' ही ज्या काळी शिवी झाली नव्हती त्या काळात सरकारी शाळांहून सरस आणि देशाभिमान जागृत होईल असे शिक्षण देणार्‍या शिक्षणसंस्था काढणार्‍या ध्येयवेड्यावर? भल्याभल्यांची भंबेरी उडवून देणार्‍या धडाडीच्या पत्रकार आणि संपादकावर की १९४७ नंतरही ज्याचा पुतळा कराचीत उभा होता अशा एकमेव भारतीय पुढार्‍यावर? दुष्काळ पडल्यावर ब्रिटीश सरकारने केलेल्या दुष्काळावरच्या कायद्यांचा उपयोग शेतकर्‍यांना व्हावा म्हणून त्यावर पुस्तिका लिहून वाटणार्‍या आणि शेतकर्‍यांच्या हितासाठी झटणार्‍या समाजसेवकावर की तुरुंगात असतानाही केवळ पुस्तकांच्या आधारावर नवी भाषा शिकणार्‍या तल्लख बुद्धीच्या या विद्यार्थ्यावर? वासुदेव बळवंत फडक्यांना सबूरीचा सल्ला देणार्‍या बळवंतरावांवर की चापेकरांसारख्या अनेक क्रांतीकारकांना प्रेरणास्थान ठरणार्‍या लोकमान्यांवर? व्यक्तिमत्वाला असंख्य कंगोरे असलेल्या या नरसिंहावर कुणाला चित्रपट काढता येईल? घटना नेमक्या कुठल्या निवडायच्या? एखाद्या डबक्यावर लघुपट काढता येतो. तलावावर मालिका लिहीता येते. आणि नदीवर नाटक-चित्रपट. पण ज्याच्या अमर्याद खोलीचा अंदाजच येत नाही अशा या अथांग रत्नाकरावर कुणाला चित्रपटासारखी कलाकृती निर्माण करणे झेपेल काय?

याचे उत्तर मात्र ओम राऊत यांच्या "लोकमान्यः एक युगपुरुष" या चित्रपटातून बर्‍याच अंशी होकारार्थी मिळते. मी बर्‍याच अंशी का म्हणालो याचा खुलासा पुढे करतो. बालगंधर्व चित्रपटापासूनच सुबोध भावे कुठल्याही भूमिकेचं सोनं करु शकतो याबद्दल शंका नव्हतीच. मात्र हा चित्रपट बघायला जाताना तो लोकमान्यांच्या  भूमिकेचं शिवधनुष्य कसे पेलतो याची उत्सुकताही होती. हा चित्रपट बघितल्यानंतर मात्र सुबोध भावे कुठलीही भूमिका अक्षरशः जगू शकतो याची ठामपणे खात्री पटली. लोकमान्यांची करारी भावमुद्रा, ताठ बाणा, प्रसंगी दिसणरा हळवेपणा आणि आग ओकणारे डोळे अंगार हे सुबोधने उत्तमरित्या स्वतःत उतरवले आहेत. इतके की आज टिळक हयात असते तर त्यांनीही सुबोधचं मनापासून कौतुक केलं असतं इतकी ही भूमिका तंतोतंत वठवण्यात सुबोध यशस्वी झाला आहे. गांधींची भूमिका म्हटलं की लगेच कृष्ण भानजी अर्थात बेन किंगस्ले आणि सरदार पटेल म्हटलं की परेश रावल हे ताकदीचे कलाकार जसे आठवतात, तसे आता यापुढे टिळक म्हटलं की सुबोध आणि सुबोध म्हटलं की टिळक हेच समीकरण आठवत राहणार नि:संशय.

"डॉग्स अ‍ॅन्ड इंडिअन्स आर नॉट अलाउड" हे ऐकण्याची सवय असलेल्या जनतेच्या समोरच त्या काळी एका इंग्रजाला "बाहेर पाटीच लाऊन घेणार आहे. डॉग्स अ‍ॅन्ड ब्रिटीश आर नॉट अलाउड" असं सुनावताना त्याचे डोळे अक्षरशः आग ओकतात. गोपाळराव आगरकरांशी वाद घालताना "हिंदू धर्मात काय सुधारणा करायची ते हिंदूच ठरवतील, (ब्रिटीश) कायद्याने लादलेली बळजबरीची सुधारणा चालणार नाही" असे जेव्हा लोकमान्य ठणकावतात, तेव्हा हे देशाभिमानी वाक्य ऐकताना आपल्याच हृदयाचे ठोके चुकतात. सुधारकांची सभा उधळल्यावर तिथून निघून जाताना त्याच्या चेहर्‍यावर उमटलेले ते छद्मी हास्य अजूनही डोळ्यांसमोरून जात नाही. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच !!" ही डरकाळी आणि "बहुजनांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत नाही आता सार्वजनिक गणेशोत्सवात घेता येईल" ही आणि अशी वाक्ये ऐकावी तर सुबोध भावेच्या तोंडूनच. केसरीत छापावयाच्या अग्रलेखाचा मजकूर लेखनिकाला सांगत असताना मधेच "विश्वनाथ गेला" हे ऐकल्यावर कापर्‍या आवाजात तो लेख सांगून पूर्ण करणार्‍या टिळकांना फक्त आणि फक्त सुबोधच साकारू जाणे.


हा चित्रपट जसा सुबोधचा आहे तसाच तो दिग्दर्शक ओम राऊत यांचाही आहे. ओम राऊत यांनी सुबोध भावे नामक हिर्‍याला पैलू पाडून चमकवलं आहे, त्याच्याकडून अगदी हवा तसा अभिनय करवून घेतला आहे. या बाबतीत दिग्दर्शक ओम राऊत यांचं कौतुक करायलाच हवं. वर म्हटल्याप्रमाणे घटना कोणत्या निवडायच्या या पेचातून त्यांनी इतक्या व्यवस्थितपणे मार्ग काढला आहे, की त्यातून हा चित्रपट टिळकांची कारकीर्द संपूर्णपणे दाखवत नसला तरी त्यांच्या कर्तृत्वाची पुरेशी झलक नक्की दाखवतो. चित्रपटात लोकमान्यांची हिंदुत्ववादी धर्माभिमानी बाजू त्यांनी कुठलाही प्रचारकी आव न आणता व्यवस्थित मांडली आहे. देशाच्या हिताचा असेल तर केलेला खूनही समर्थनीय ठरतो ही लोकमान्यांची भूमिका मांडताना चित्रपट कुठेही भीड ठेवत नाही. त्याचबरोबर "स्वराज्यासाठी रक्त वहायलाच हवं, नाहीतर मिळालेल्या स्वराज्याची किंमत राहणार नाही" असं सुनावून राजकारणात नाहक घुसू पाहणार्‍या अहिंसा नामक थोतांडाची संभावना करतानाही चित्रपट कमी पडत नाही. लोकमान्यांचा स्वदेशीचा पुरस्कार ही बाजूही चित्रपट यशस्वीपणे मांडतो. तसेच टिळक-आगरकर वाद आणि गांधी-टिळक भेट या प्रसंगांना प्रभावीपणे सादर करण्यात आलेले आहे. चित्रपटात टिळकांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना अशा प्रकारे दाखवण्यात आलेल्या आहेत की प्रेक्षकांना चित्रपटातून तर टिळकांविषयी माहिती मिळेलच पण चित्रपट संपवून घरी गेल्यावरही त्यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची प्रेरणा मिळेल. थोडक्यात, हा चित्रपट म्हणजे टिळक नामक महासागराची खोली दाखवण्याचा एक प्रयत्न आहे.



सुबोध म्हणजे टिळक आणि टिळक म्हणजे सुबोध असं वाटायला लावण्यात रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचाही मोठा वाटा आहे. आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले यांनी संपादनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली आहे. वेषभूषाकार महेश शेरला व कलादिग्दर्शक संतोष फुटाणे यांनी तो काळ हुबेहूब उभा करुन आपापल्या विभागात कमाल केली आहे. अजीत-समीर यांचे संगीत एरवी वेगळी गाणी म्हणून ऐकायला फार रोचक नसले तरी त्या त्या प्रसंगांत कुठेही उपरे भासत नाही, उलट चपखलच वाटते. चित्रपटाच्या सुरवातीला नाना पाटेकरांच्या आवाजातले निवेदन सुरू असताना निवेदनानुरूप ज्या बातम्या आणि छायाचित्रे दाखवली आहेत त्याबद्दल दिग्दर्शकाला वाकून कुनिर्सात.


लोकमान्यांना कारावासाची शिक्षा होऊन मंडालेला रवाना करण्याचे ठरते तो प्रसंग म्हणजे या चित्रपटाची सुरवात आहे. मग आजच्या काळातल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) आणि त्याची पत्नी समीरा (प्रिया बापट) याच्या माध्यमातून तो फुलत जातो. हा भाग मात्र जरा खटकला. एक कारण म्हणजे मुळात अशा व्यक्तिमत्वावर चित्रपट काढताना वेळेचं बंधन असताना हा भाग दाखवण्याऐवजी त्याला पूर्ण फाटा देऊन लोकमान्यांच्या कारकिर्दीतलेच अधिक प्रसंग दाखवले असते तर चित्रपट आणखी प्रभावशाली झाला असता. मकरंद आणि समीराच्या आयुष्यात लोकमान्यांच्या प्रभावाने जे बदल होतात ते सगळं फारच ओढून ताणून दाखवलं आहे, त्यामुळे चित्रपटातला हा भाग अधिकच अनावश्यक वाटतो. मात्र असं असलं तरी या दोन्ही भूमिकात्काम चिन्मय आणि प्रिया यांनी चांगलं काम केलं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या या वैगुण्याकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. म्हणूनच मी सुरवातीला 'बर्‍याच अंशी' हे शब्द वापरले होते.

दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपटात काही ठिकाणी घडणारे प्रसंग हे गोंधळात टाकतात. म्हणजे घटना किंवा दाखवलेले प्रसंग अमुक साली घडलेले असताना वेगळ्याच साली घडले आहेत असे दाखवले आहे. मात्र या गोष्टींकडे लक्षही जाणार नाही अशा प्रकारे ते प्रसंग रंगवण्यात चित्रपटकर्ते यशस्वी झाले आहेत.

चुकाच काढायच्या तर आणखीही काढता येतील. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे. कुठल्याही चरित्रपटाचं एक महत्त्वाचं साध्य (key takeaway) असावं ते म्हणजे एखादे जबरदस्त पुस्तक वाचल्यावर वाचकाची जशी भारावल्यासारखी अवस्था होते तशीच परिणामकारकता साधणं. निर्मिती, दिग्दर्शन, अभिनय, वेषभूषा आणि रंगभूषा, कलादिग्दर्शन इत्यादी प्रत्येक बाबीत घेतलेली प्रचंड मेहनत व अभ्यास आणि एकूणच चित्रपटाचे अप्रतीम सादरीकरण यांच्यामुळे तशी परिणामकारकता नक्कीच साधली जाते. चित्रपट आपल्याला एवढा गुंगवून ठेवतो की मध्यंतर नामक लहानशा व्यत्ययामुळेही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. चित्रपटाच्या सुरवातीला सुबोधने उभ्या केलेल्या लोकमान्यांच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत आपण एक वेगळेच भारावलेपण अनुभवतो.



भारतीय राजकारणावर ज्यांचा तीव्र प्रभाव पडतो आहे आणि आपल्याला प्रचंड अडचणीचे ठरू शकतात अशा नेत्यांना पाताळयंत्री ब्रिटीशांनी भारतीय जनतेपासून लांब ठेवण्याचं धोरण अवलंबलं. या रास्त भीतीतूनच लोकमान्यांना आयुष्याची तब्बल सहा वर्ष ब्रिटीशांनी भारताबाहेर मंडालेत, लोकांपासून लांब ठेवलं. लोकमान्यांना आणखी फक्त दहा वर्षांचे आयुष्य मिळते, तर भारतीय स्वातंत्र्यलढा आणि एकूण राजकारण यांचा चेहरामोहरा आज काही वेगळाच दिसला असता हे निश्चित.

असे जास्तीतजास्त चित्रपट बनायला हवेत. कारण आपल्याला आझादी ही फक्त आणि फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली आहे अशी खोडसाळ आणि तितकीच खुळचट समजूत करुन देणारी पाठ्यपुस्तके असल्यावर पुढच्या पिढीला सत्य समजणार तरी कसे? अशा कलाकृती बनल्याशिवाय स्वातंत्र्यलढ्यातल्या अशा हिर्‍यांचे प्रभावशाली दर्शन होणार तरी कसे?

चित्रपटाचा तिकीट काढलेला खेळ केव्हाच संपतो, पण त्यानंतर बराच काळ डोक्यात ठाण मांडून बसतात ते सुबोध भावेने सादर केलेले तुमचे, आमचे, सर्वांचेच - लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

अजून बघितला नसेल तर चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा. लोकमान्य - एक युगपुरुष.

------------------------------------------------------------------------------------


ट्रेलर
http://www.youtube.com/watch?v=aLvVD0lyOqw

http://www.youtube.com/watch?v=nu7_JEUm6mc

http://www.youtube.com/watch?v=BpS2bF3KwmU

पत्रकार परिषद १
 http://www.youtube.com/watch?v=S32mOWXJIi8

पत्रकार परिषद १
http://www.youtube.com/watch?v=VlU3RW_MTQc

गाणे: हे जीवन आपुले सार्थ करा
http://www.youtube.com/watch?v=0DeqgxST6Fg

गाणे: गजानना, गजानना
http://www.youtube.com/watch?annotation_id=annotation_3593398775&feature=iv&src_vid=0DeqgxST6Fg&v=UhlSmycJ4e8