Friday, September 30, 2016

मी - एक हिंदुस्थान


मी सहावीत होतो तेव्हाची गोष्ट आहे. पाचवी झाल्यावर सहावीत माझी शाळा बदलली. मुंबईतल्या आम्ही राहत असलेल्या विक्रोळीतल्या विद्या मंदिर या शाळेतून नाव काढून दादरच्या हिंदू कॉलनी मधल्या तेव्हाच्या किंग जॉर्ज आणि नामांतर करुन राजा शिवाजी विद्यालय झालेल्या प्रतिष्ठित शाळेत मला घालण्यात आलं. नवी शाळा असल्याने आणि घरापासून चांगलीच लांब असल्याने बर्‍यापैकी बावरलेल्या अवस्थेत सुरवातीला मी वावरत असे. सुरवातीला ओळखी पाळखी झाल्या, पण त्याच बरोबर रॅगिंग हा प्रकारही सुरू झाला. मी अरे ला ल्गेच का रे करणारा असल्यामुळे तोंडी रॅगिंगला बरं तोंड देऊ शकत असे.

पण खरी गंमत सुरू झाली चित्रकलेच्या तासाला. पांढर्‍या शर्टावर मागे रंगांचे फटकारे दिसू लागले. रंग तसे निरुपद्रवी असल्याने लगेच धुतलेही जात, पण तरी दिवसभर रंगीत झालेला शर्ट घेऊन वावरणे ही अपमानास्पद बाब होती. पण हा प्रकार नेमकं कोण करतं याचा सुगावा लागलेला नव्हता, कारण मागच्याला विचारावं तर तो आपण या गावचेच नाही असा चेहरा करत असे. सगळे अनेकदा एकमेकांकडे बोट दाखवत असत. त्यामुळे शिक्षिकेला सांगितलं तर तिचा गोंधळ व्हायचा. हा प्रकार सहन केल्याने आधी नकळत तर मग मला जाणवेल अशा प्रकारे शर्ट रंगवला जाऊ लागला. मागच्याला आणि मागे बसणार्‍या इतरांना कडक इशारे वगैरे देऊन झाले. एक दोनदा हात उगारूनही झाला. पण जो पर्यंत मी प्रत्यक्ष बघत नाही तो पर्यंत कुणी दाद देईना. शाळा नवी असल्याने पटकन पंगा घेता येईना.

पण एकदा पाठीवर कुणीतरी ब्रश फिरवतंय अशी पुसटशी शंका आली आणि मी हळूच हातातल्या कंपासच्या आत दडवलेल्या आरशात बघितलं, तर मागचा मुलगा माझ्या शर्टावर चित्रकलेचे प्रयोग करण्यात गुंगून गेला होता.

मला नक्की काय झालं, कोण माझ्या अंगात संचारलं माहीत नाही.

पण अचानक माझा उजवा हात उचलला गेला, हाताची मूठ वळली गेली, मी गर्रकन् मागे वळलो आणि त्याच्या तोंडावर एक जबरदस्त ठोसा मारला.

तो मुलगा बेंचवरुन खाली कोपर्‍यात पडला. त्याचा एक दात तुटला होता, आणि तो भयंकर भेदरलेल्या चेहर्‍याने एकदा माझ्याकडे आणि एकदा आजूबाजूच्यांकडे बघत होता. माझा एकंदर अवतार बघता त्याला कुणाला सांगण्याची सोय नव्हती. ना शिक्षिकेला, ना वर्गातल्या इतरांना. कुठल्या तोंडाने आणि काय सांगणार? मी शेण खाल्लं म्हणून मला शिक्षा झाली हे? ते काही असो, त्या ठोशानंतर माझ्या शर्टावरची चित्रकला बंद झाली हे खरंच.

काल जेव्हा भारतीय सैन्याने 'इनफ इज इनफ' म्हणत अतिरेक्यांची ज्या प्रकारे ठासली, तो काल मारलेला पाकिस्तानला ठोसा मला भूतकाळात घेऊन गेला. मी मारलेल्या ठोशाने त्या मुलाचा एक दात पडला, काल भारतीय सैन्याने मारलेल्या ठोशाने पाकिस्तानचे अडीचशेच्या आसपास दात पाडले. अजून बरेच पाडायचेत, पण एक मारा, लेकिन क्या सॉलिड मारा ना?

 - इनफ इज इनफ जोशी

© मंदार दिलीप जोशी


Friday, September 16, 2016

एका पुरोगाम्याचा कात्रज केला त्याची गोष्ट

पुरोगामी: मी माझ्या मुलीचं लग्न अमावस्येला रात्री बारा वाजता करणार आहे.

मी: अच्छा म्हणजे हा मुहूर्त आहे तर. बरं आहे सगळ्या निमंत्रितांना येता येईल.

पुरोगामी (आता चिडचिड सुरू झालेली आहे): मुहूर्तावर करायचं नाही लग्न म्हणून रात्री बारा वाजता करतो आहे.

मी: अहो म्हणजे शेवटी तो मुहूर्तच ना.

पुरोगामी (आता कपाळावर आठ्या स्पष्ट दिसू लागलेल्या आहेत): काहीही बोलू नका, अमावस्येला लग्न करुन काहीही अशुभ होत नाही हे मला दाखवून द्यायचे आहे.

मी: पण अमावस्या रात्री आठ बत्तीसला संपते आहे.

पुरोगामी (आता हा भडकला) म्हणून काय झालं?

मी: अहो रात्री बारा वाजता खरंच चांगला मुहूर्त आहे. रात्री ९ ते दुसर्‍या दिवशी पहाटे ५ पर्यंत शुभ काल आहे. झकास संसार होणार बघा तुमच्या मुलीचा.

पुरोगामी (पत्रिका माझ्या हातातून खेचून घेत): तुम्ही नाही आलात तरी चालेल.

मी: ख्या ख्या ख्या.

Wednesday, September 14, 2016

पंडित नामा ११ (अंतिम भाग): नदीमार्ग हत्याकांड

हा पंडित नामा मालिकेतला शेवटचा भाग. यात आपण काश्मीरी पंडितांच्या वेचून केलेल्या खूनांच्या दहा वेगवेगळ्या घटना बघितल्या. या भागात एका सामूहिक हत्याकांडाबद्दल आपण वाचणार आहोत. इथे फक्त दहाच अशा घटना वर्णन केलेल्या असल्या तरी अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत. नोंदवल्या न गेलेल्याही अशा अनेक घटना आहेत पण मुळात हिंदूंच्या जीवाला किंमतच कमी असल्याने त्यांचा शोध घेण्याची तसदीही कुणी घेतलेली नाही.

काश्मीरी पंडित - त्यांना इथून जायचं नव्हतं. पाकिस्तान पुरस्कृत इस्लामी दशतवाद्यांनी त्यांना निर्वासित व्हायला भाग पाडलं. गोळीबार आणि बाँबफेकीने घडवलेल्या अत्याचार व हत्याकांडांच्या प्रभावातून राहती घरंच नव्हे तर सरकारी इमारती व शाळाही सुटल्या नाहीत. त्यांच्या घरातल्या स्त्रीयांवर त्यांच्या डोळ्यादेखत अमानुष बलात्कार झाले. त्यांना हाल हाल करुन ठार मारण्यात आलं. आमची मुंबई, आमचं पुणं, हमारा इंदोर, नम्म बँगळुरू, आमार बांगला, आपणो गुजरात अशा अस्मिता बाळगणार्‍या तुम्हा आम्हांसारखंच त्यांचंही त्यांच्या जन्मभूमीवर प्रेम होतं, काश्मीरवर प्रेम होतं. तिथल्या हिरव्यागार गवताच्या प्रत्येक पात्यावर, शीतल व स्वच्छ जलावर, जमीनीच्या प्रत्येक इंच मातीवर त्यांचं नितांत प्रेम होतं. काश्मीर खोरं सोडताना त्यांना किती मानसिक क्लेष झाले असतील याची कल्पना कदाचित आपण कधीच करु शकणार नाही. प्रेमाने बायकोच्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र असो वा घरात पिढ्यानपिढ्या चालत आलेले खानदानी दागिने असोत, कवडीमोल भावाने विकावे लागले...का?  फक्त जीव वाचवून पळून जाता यावं म्हणून. दिल में रखो अल्लाह का खौफ, हाथ में रखो कलाशनिकोव्ह यातल्या अल्लाहच्या खौफला दिलात ठेवायला काहीच आक्षेप नसणार्‍या पण दहशतवाद्यांच्या हातातल्या कलाशनिकोव्हच्या टप्प्यातून बाहेर पडता यावं म्हणून पळून जाताना काहींना बस, ट्रक, इत्यादी वाहने मिळाली तर इतर अनेकांना वेरीनागच्या बर्फाने आच्छादित धोकादायक पर्वतराजीला ओलांडून जवाहर बोगद्यापर्यंतचा प्रवास चक्क पायी करावा लागला.  

काश्मीरमधे या आधीही हिंदूंना इस्लामी आक्रमकांच्या अत्याचारांना सामोरं जावं लागलं होतं, या आधीही ते अनेकदा विस्थापित झाले होते. पण १९८९ च्या सुमारास सुरू झालेल्या या अत्याचारांच्या सत्राने मात्र काश्मीर खोर्‍याच्या लोकसंख्येची रचनाच संपूर्णपणे बदलून गेली. काश्मीर खोरं आता पूर्णपणे इस्लामबहुल झालं. 

काश्मीरात अतिरेक्यांनी घडवलेल्या सामूहिक हत्याकांडांपैकी तीन सगळ्यात भयानक समजली जातात. वंधामा इथे काश्मीरी पंडितांचे झालेले सामूहिक हत्याकांड, अनंतनाग जिल्ह्यातील छित्तिसिंगपुरा येथे २००० साली झालेल्या ३६ शीखांच्या हत्या, आणि २००३ साली नदीमार्ग येथे झालेले पंडित हत्याकांड ही ती तीन हत्याकांडे होत.

१९९० नंतर काश्मीर खोर्‍यात शिल्लक राहिलेल्या काश्मीरी पंडितांची संख्या नगण्य होती. पुलवामा जिल्ह्यातील शोपियान मधल्या नदीमार्ग येथे फक्त ५२ काश्मीरी पंडित राहत असत, ते ही चार कुटुंबांचा भाग होते. 

२३ मार्च २००३ च्या रात्री काही अतिरेकी नदीमार्ग गावात शिरले. अतिरेक्यांना गावात शिरताना पाहून'बंदोबस्तावरचे' पोलीस पार्श्वभागाला पाय लावून पळून गेले. ते तिथे थांबले असते तरी परिस्थितीत काहीही फरक पडणार नव्हताच.अतिरेक्यांनी मशीनगनच्या जोरावर त्यांनी घराघरात शिरून जितक्या हिंदूंनाबाहेर काढता येईल तितक्या हिंदूंना फरफटतघराबाहेर काढण्यात आलं. यात साठी ओलांडलेल्या वृद्धांपासून ते जमेतेम चालायला शिकलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्या वयोगटातल्या पंडितांचा समावेश होता. सगळ्यांना एका ओळीत उभं करुन धडाधड गोळ्या घालण्यात आल्या. यात अकरा पुरुष, अकरा महिला व दोन लहान मुलांचा समावेश होता. सर्वात वृद्ध एक ६५ वर्षांचे आजोबा तर सगळ्यात लहान एक २ वर्षांचं मूल होतं.

काही फोटो देतो आहे. त्रास होईल. नाईलाज आहे.




त्या दोन वर्षाच्या निरागस मुलाची काय चूक होती? काय चूक होती त्या उरलेल्या २२ जणांचीही? पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या शाळेतल्या मुलांना पाकिसाननेच पोसलेल्या अतिरेक्यांनी ठार केलं तेव्हा अचानक मानवतेचा पुळका आलेल्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. 

पण खरं उत्तर एकच. ते हिंदू होते. काश्मीरी पंडित होते. बाकीच्यांप्रमाणे १९९०च्या दशकात पळून न जाता अजूनही काश्मीर खोर्‍यात राहत होते. अतिरेक्यांच्या व त्यांना नियंत्रित करणार्‍या त्यांच्या पाकिस्तानी मालकांच्या मते त्यांनी मरायलाच हवं होतं. 


या हत्याकांडाला जबाबदार असलेल्यांपैकी तीन अतिरेक्यांना मात्र मुंबई पोलीसांनी एका आठवड्याच्या आत म्हणजे २९ मार्च रोजी कंठस्नान घातलं. हत्याकांडात सहभागी असलेल्या एका चौथा अतिरेक्याला एप्रिल मधे अटक झाली. हा हल्ला पाकिस्तानातल्या लष्कर-ए-तय्यबा या अतिरेकी संघटनेच्याच सदस्यांनी केल्याचं उघड झालं.

शासकीय पातळीवरुन पुढे काय झालं? केन्द्र सरकारने पाकिस्तानची 'कडी निंदा' केली. अमेरिकेने पाकिस्तानला नियंत्रण रेषेचा आदर करण्याची एक प्रेमळ टपलीत मारली. राज्य सरकारने 'आम्ही (उरल्यासुरल्या) पंडितांना संरक्षण देऊ त्यांनी काश्मीर खोरे सोडून जाऊ नये' असं पोकळ आणि तितकंच चीड आणणारं भंपक आश्वासन दिलं. 

आजही काश्मीरमधला हिंसाचार थांबलेला नाही. काफीर भारताला काश्मीरमधून पूर्णपणे हुसकावून लावणे हे पाकिस्तानचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ताजा उसळलेल्या हिंसाचारा मागे राज्य सरकारमधे काफीर देशाच्या काफीर पक्ष असलेल्या भाजपचा असलेला सहभागामुळे उठलेला पोटशूळ आहे. बुरहान वानीचं मारलं जाणं हे फक्त निमित्त. त्यांना दार-उल-हरब (इस्लामच्या नियंत्रणात नसलेला) असलेला काश्मीरच नव्हे तर संपूर्ण भारत देश हा दार-उल-इस्लाम मधे परीवर्तित करायचा आहे.

राज्यात ओतले जाणारे कोट्यावधी रुपये, पर्यटनामुळे मिळणारा महसूल, राज्य व केन्द्र सरकारी नोकर्‍यांत मिळणारे भरपूर आरक्षण आणि देशभरातकाश्मीरी विद्यार्थ्यांना मिळणार्‍या अमाप सवलती यांच्या बदल्यात जर सैन्यावर दगड आणि पेट्रोल बाँब फेकले जाणार असतील आणि रोज दंगली होणार असतील तर त्याला उत्तर हे गोळीनेच दिलं गेलं पाहीजे. भारत सरकारने आता काश्मीरी लोकांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे की भारतीय कायदे मानत नसाल आणि कायदा व सुव्यवस्था राखणार नसाल तर सरळ आपलं चंबुगबाळं उचला आणि तुमचे लाड होतील त्या देशात चालायला लागा, इथली एकही इंच जमीन आणखी मिळणार नाही. गंमत म्हणजे यांना हवी असलेली आझादी पाकिस्तानच्या ताब्यातल्या आझाद काश्मीरला पण हवी आहे. त्यांना पाकिस्तान पासून स्वातंत्र्य हवं आहे. गिलगीट-बाल्टीस्तानलाही स्वातंत्र्य हवं आहे. बलुचिस्तानही गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाच आहे. तेव्हा सरकारने लवकरात लवकर पाकिस्तान तेरे टुकडे होंगे हा प्रोजेक्ट तडीस न्यायला हवा. 

पण सरकारने यंव करावं आणि त्यंव करावं या पेक्षा आपण काय करु शकतो याकडे लक्ष देऊया. आपल्या शेजारीपाजारी लक्ष ठेवा. काश्मीरी विद्यार्थी भाडेकरू म्हणून ठेवताना काश्मीरी पंडित वगळून कुणालाही जागा देऊ नका किंवा विकू नका. काश्मीरी पंडितांच्या मालकीचे दुकान असेल तर तिथून आवर्जून खरेदी करा व इतर काश्मीरी लोकांकडे आपला पैसा जाऊ देऊ नका. इतकंच काय तर काश्मीर खोर्‍यात पर्यटनालाही जाऊ नका. आपला पैसा हा कुठल्याही प्रकारे आपल्याच हिंदू बांधवांच्या हत्येला कारणीभूत ठरलेल्यांच्या व देशाच्या मुळावर उठलेल्यांच्या खिशात जाऊ देऊ नका. 

कारण आता फक्त सरकारवर निष्ठा ठेऊन ठेविले अनंते तैसेचि रहावे या चालीवर चित्ती समाधान ठेवून जगण्याचे दिवस गेले!

----------------------------------

या मालिकेसाठी मी अनेक संदर्भ वापरले. त्यात प्रामुख्याने दोन पुस्तकांचा समावेश आहे:

१) My Frozen Turbulence in Kashmir - लेखक श्री जगमोहन (भूतपूर्व राज्यपाल, जम्मू आणि काश्मीर)
२) Our Moon Has Blood Clots - राहुल पंडिता

यातले पहिले पुस्तक My Frozen Turbulence in Kashmir काश्मीर समस्येवरच्या माहितीसाठी सगळ्यात अस्सल स्त्रोत मानला जातो. जम्मू आणि काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल श्री जगमोहन यांनी त्यांच्या कार्यकालात राज्यात इतकं भरीव काम केलं होतं, की त्यांचे शत्रू देखील त्यांचे नाव आजही आदराने घेतात. आज काश्मीर आपल्या हातातून गेलेलं नाही याचं श्रेय या माणसाला जातं. त्यामुळे कुणाला काश्मीर समस्येवर काही वाचन करायचं असल्यास सगळ्यात आधी हे पुस्तक वाचा इतकाच सल्ला देऊन मी थांबणार नाही, तर ते विकत घ्या व संग्रही ठेवा असा माझा आग्रह असेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद उपलब्ध आहे.

दुसरं पुस्तक Our Moon Has Blood Clots हेस्वतः एका काश्मीरी निर्वासिताने म्हणजे राहुल पंडिताने लिहीलेलं असल्याने ते सुद्धा वाचायला हवं. मात्र हे पुस्तक वाचून माझी निराशा झाली कारण लेखकाने त्यात बरंच पाणी घातलेलं आहे. इकडून तिकडून किस्से उचलून पुस्तकात टाकण्याचे चमत्कारही लेखकाने केलेले आहेत. कारण पुस्तकात असलेलेच किस्से इतर अनेक स्त्रोतात अधिक तपशीलातही सापडतात. राहुल पंडिताचा उल्लेख स्वतः अनेक काश्मीरी पंडितही आदराने करत नाहीत. राहुल पंडित यांची नक्षलवादाबद्दलची सहानूभूतीपर मते आणि आमीर खानची इंटॉलरन्सवरची इतरत्र केलेली भलामण विषयांतराच्या भीतीने इथे देत नाही. पण या उल्लेखावरुन वाचकवर्गाने काय ते समजून जावे. तरीही हे पुस्तक स्वतः एका काश्मिरी हिंदूने लिहीलेलं असल्याने किमान एकदा नजरेखालून घालायला हरकत नाही. 

३) आंतरजालावरील काश्मीरी पंडीतांना वाहिलेली पाने व इतर आंतरजालीय स्त्रोत. 

४) ट्विटरवरील काश्मीरी पंडितांची खाती - यांचाही मी ऋणी आहे. ट्विटर आजकाल अनेक चांगल्या वाईट कारणांसाठी चर्चेत आहे पण शोधल्यास त्यावर माहिती आणि ज्ञानाचा खजीना सापडू शकतो. काळाच्या उदरात गडप झालेल्या अनेक गोष्टी तिथे सापडतात आणि अनेकांचे बुरखे टराटरा फाटतात.

५) ही मालिका लिहीताना वेळोवेळी मला प्रोत्साहन देणारा एक अनामिक मित्र. त्याच्याच विनंतीवरुन नाव गुप्त ठेवत आहे.

--------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी 
भाद्रपद  शु.१२/१३ शके १९३८

--------------------------------------------------------