Friday, November 12, 2010

शबरीधाम

रामायणातला एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे शबरी आणि तिची उष्टी बोरे खाणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांची गोष्ट. एका दंतकथेनुसार शबरीचा आश्रम जिथे होता त्या ठिकाणाला भेट देण्याचा नुकताच योग आला.

अप्रतिम निसर्गसौंदर्याने नटलेल्या दंडकारण्यात राहणारी धार्मिक वृत्तीची शबरी ही पूर्णा (पुष्करणी) नदीच्या तीरावर असलेल्या निबीड अरण्यात एकांत स्थळी तपस्येकरता राहत असे. जवळच असणार्‍या सरोवराच्या काठावर स्नान, पूजा, होम इत्यादी धर्मकार्यार्थ अनेक ऋषीगण नियमित येजा करत असत. शेवटी जंगलच ते, मार्ग असा कितीसा चांगला असणार? सरोवराकडे जाणार्‍या रस्त्यावरचे बारीक बारीक दगड, काटे, आणि पायांना इजा होऊ शकेल अशा इतर अनेक गोष्टींचे त्या रस्त्यावरून निर्मूलन करून ऋषींच्या मार्गातले अडथळे शबरी दूर करत असे. स्त्रीसुलभ लज्जा म्हणा किंवा इतर काही कारण, ही सगळी कामे ती लपूनछपून करत असे. शबरी याबाबतीत इतकी काळजी घेत असे की झाडू वापरला तर त्या आवाजाने आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल म्हणून ती हातानेच ही कामे करी. ही सगळी कामे कुणी केली हे उघड झालं तर आपल्यावर नसता प्रसंग ओढवेल अशी तिला भीती होती.

रोज आपला मार्ग साफ आणि निर्धोक बघून ही साफसफाई करतं तरी कोण असा प्रश्न समस्त ऋषी-मुनी आणि इतर साधक मंडळी एकमेकांना आश्चर्याने विचारत असत.

अखेर मातंग ऋषी यांना हे रहस्य उलगडलं. शबरीशी झालेल्या भेटीत त्यांनी तिच्यातले सुप्त गुण हेरले आणि तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. असे म्हणतात की देव दिवाळी (कार्तिक पौर्णिमा) ह्या दिवशी ही भेट झाली. शबरीने आश्रमाची व तिथल्या रहिवाशांची लहान-मोठी कामे करण्याबरोबरच ज्ञानार्जनही सुरु केलं. आपल्या मृदू आणि विनयशील स्वभावाने आश्रमातल्या सगळ्यांची मने तिने लवकरच जिंकून घेतली. दिवसभर विविध कामात व्यग्र असूनही चाललेले विद्यादान लक्ष देउन ग्रहण करणे आणि काही न समजल्यास नम्रतेने शंका विचारून लगेचच निरसन करुन घेणे ही शबरीची दिनचर्याच झाली. अशा प्रकारे विद्याग्रहण करून ती अनेक विषयांत पारंगत झाली.

मातंग ऋषींनी शबरीमधली ज्ञानपिपासा ओळखून आणि पारखून घेतल्यावर तिला आपली विद्यार्थिनी म्हणून स्वीकारले. ते इतकंच करुन थांबले नाहीत तर तिला आपल्या इतर शिष्यगणांच्या बरोबरीचे स्थान दिले.

अशा प्रकारे नित्यनेमाने गुरुसेवा करत असताना एके दिवशी मातंग ऋषींनी तिला आपल्या मनातला सल बोलून दाखवला, आणि त्याचबरोबर तिला आशीर्वादही दिला. ते म्हणाले, "पोरी, माझ्या हयातीत प्रभूंनी (श्रीराम) मला दर्शन दिले नाही, पण त्यांच्या चरणकमलांनी ते तुझी पर्णकुटी नक्की पवित्र करतील".

अशीच अनेक वर्ष लोटली. सीतेच्या शोधात दंडकारण्यातून जात असताना कबंध नावाचा अत्यंत कुरूप आणि महाभयानक राक्षस राम-लक्ष्मणांना सामोरा आला. लक्ष्मणाने त्या राक्षसाचे हात कापून त्याचा वध केला. त्याच्या कलेवरावर अंत्यसंस्कार केल्यावर चितेतून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. तो म्हणाला, मी दनुपुत्र असून ऋषीमुनींना त्रास देत असे, त्यामुळे स्थूलशिरा नामक ऋषींनी मला एक शाप दिला. त्या शापाच्याच प्रभावामुळे माझे मूळचे तेजस्वी रूप जाऊन हे असले विचित्र रूप प्राप्त झाले. तुम्ही माझा उद्धार केलात." असे सांगून त्याने राम-लक्ष्मणांना वंदन केले, आणि सीतेचा शोध घ्यायचा असेल तर आधी किष्किंधेच्या सुग्रीवाशी मैत्री कर असा सल्ला दिला. तसेच वाटेत शबरीमातेची भेट घ्या असंही सांगितलं.

मजल दरमजल करत वनातून मार्गक्रमण करत असताना श्रीरामांना शबरीचा आश्रम दिसला. अखेर भगवंताशी शबरीची भेट झाली. साक्षात प्रभूराम समोर दिसल्यावर शबरीच्या मुखातून बाहेर पडलेले पहिले शब्द गीत रामायणात म्हटल्याप्रमाणे "धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्रीचरणे आश्रमा" असेच असतील. शबरीने भक्तीभावाने दोघांना नमस्कार केला. तुलसीदासांच्या रामचरितमानस मध्ये या भेटीचं "स्याम गौर सुंदर दोऊ भाई, सबरी परी चरण लपटाई" असं सुंदर वर्णन केलं आहे.

पुढची गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे ते इथे लिहीत नाही. तर, शबरीचा आश्रम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाला भेट देण्याचं भाग्य मला नुकतंच प्राप्त झालं.

प्रभू रामाच्या चरणस्पर्शाने भारतवर्षातील अनेक ठिकाणे पवित्र झाली आहेत. गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यातील वनक्षेत्र हे त्यातीलच एक. पंचवटीच्या नैऋत्येला असणारे हे वनक्षेत्र प्राचीन दंडकारण्याचा एक भाग आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणार्‍या आहवा इथून ३४ किलोमीटर अंतरावर असणार्‍या सुबीर गावाजवळ एक 'चमक डोंगर' नामक पर्वत आहे. शबरीच्या अलौकिक आध्यात्मिक शक्तीमुळे हा डोंगर तसंच पूर्णा नदीचा परिसर प्रकाशमान झाला होता अशी कथा आहे. म्हणून त्याला तसे नाव पडले असावे. या परिसरात वास्तव्य करणारे हिंदू कोळी व अन्य आदीवासी समाजाच्या मनात रामायणकार वाल्मिकी ऋषी यांच्याबद्दल नितांत श्रद्धा आहे. मातंग ऋषी व शबरी माता यांच्याबद्दलही स्थानिक भिल्ल समाज आणि इतर वनवासी लोकांच्या मनात अनन्य श्रद्धाभाव आहे.

ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आणि शबरी यांची जिथे भेट झाली अशी श्रद्धा आहे, तोच हा पर्वत. याच पर्वतावर शबरीधाम नामक मंदिराची निर्मिती झाली आहे. हल्ली हे स्थान म्हणजे एक तीर्थक्षेत्रच झालं आहे. दरवर्षी माघ महिन्यातल्या पौर्णिमेला जवळच असणार्‍या सरोवरातील मातंग तीर्थात स्नान करण्यासाठी हजारो भाविक जमतात. यालाही आजकाल पम्पा सरोवर म्हणतात पण मूळ पम्पा हे कर्नाटकात आहे.

डांग जिल्ह्यात आणि आसपासच्या परिसरात समाजसेवा करणारे स्वामी असीमानंद हे हिंदूंच्या दृष्टीने एक थोर व्यक्तीमत्व. त्यांनी डांग जिल्ह्यात केलेल्या कामामुळे आज तिथल्या आदिवासी समाजात समृद्ध भारतीय संस्कृतीविषयी बर्‍यापैकी जागृती निर्माण झाली आहे. स्वामी असीमानंद हे मुळात अभियांत्रिकी चे पदवीधर. उच्चशिक्षित असूनही नोकरी-व्यवसाय करण्यात समाधान न मानता इथे येऊन त्यांनी हे अवघड कार्य हाती घेतले आणि तडीसही नेले..

रामायणावर प्रवचने करणारे मोरारिबापू यांनी २००२ साली स्वामी असीमानंद यांच्या विनंतीवरून शबरीधाम येथेच त्यांच्या प्रवचनांचा कार्यक्रम केला. तो करत असताना एकदा बोलता बोलता सहज त्यांच्या तोंडून "इथे आपण एक कुंभ मेळा आयोजित करुया" अशी इच्छा प्रदर्शित केली गेली. फेब्रुवारी २००६ साली सुरु झालेला हाच आगळावेगळा कुंभ मेळा आता शबरीकुंभ म्हणून ओळखला जातो. याच स्थानावर स्थानिय समितीने स्वामी असीमानंद यांच्या मार्गदर्शनाखाली एक नेटके देऊळ बांधले. करवीर पीठाच्या शंकराचार्‍यांच्या हस्ते इथे एक ध्वजारोहण कार्यक्रम आणि एक धर्म परिषदही पार पडली.

महाराष्ट्रातील नंदूरबार इथून मला या ठिकाणी पोहोचायला सुमारे दोन तास लागले.



महाराष्ट्रात सगळीकडे सूचनाफलक आणि स्थानदर्शक/दिशादर्शक फलक हे मराठी-हिंदी-इंग्रजी या तीन भाषांमध्ये लिहीण्याची पद्धत आहे. गुजरात राज्यात प्रवेश केल्यावर दिसलेले सगळे फलक फक्त गुजराती भाषेत आणि त्याच लिपीत दिसले. देवनागरी तर सोडाच, इंग्रजीतला एकही फलक दिसला नाही. अर्थात, त्यामुळे विदेशी पर्यटकांबरोबरच भारताच्या इतर भागातील पर्यटकांचीही गैरसोय होते.



रस्ता संपल्यावर दिसणारे शबरीधाम मंदिर


समोरील बाजूस असलेले एक कृत्रीम तळे


शबरीधाम मंदिराचा समोरचा भाग


मंदिराच्या भिंतीवर असलेले एक चित्र - बोरे चाखून बघताना शबरीमाता


चित्रात खालच्या बाजूला जे तीन दगड दिसत आहेत - ज्या दगडांवर बसून शबरीच्या हातची बोरे राम-लक्ष्मणांनी खाल्ली ते हेच अशी येथील स्थानिकांची श्रद्धा आहे.


जवळून काढलेले एक छायाचित्र


भ्राता लक्ष्मणासह बोरं खात असलेले श्रीराम


शबरीधाम मंदिराच्या गच्चीवरून दिसणारा परिसर


मंदिराची आणखी काही छायाचित्रे






शबरीधाम मंदिराचा मागचा भाग


शेजारील पंपेश्वर महादेवाचे देऊळ
+



शबरीधाम नंतर मी पम्पा सरोवराला भेट दिली. याच पम्पा सरोवरात रामाने लक्ष्मणासह स्नान केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात पुढील प्रकारे येतो:


क्रमेव गत्वा प्रविलोकयन्वनं ददर्श पम्पांशुभदर्शकाननाम् |
अनेक नानाविध पक्षीसंकुलां विवेश राम: सह लक्ष्मनेन ||

स्वैर भाषांतरः ज्या पम्पा सरोवराच्या काठावर (बसून) आसपासच्या मंगलमय वनश्रीचे दर्शन घेताना त्यांना आनंद झाला, त्या सरोवरात रामाने लक्ष्मणासह स्नान करण्याचे हेतूने प्रवेश केला.

वरून दिसणारा पम्पा सरोवराचा भाग


पम्पा सरोवराच्या परिसरात बागडणारे बगळे


स्नान केल्यावर राम लक्ष्मणाला म्हणाला....

सप्तानां च समुद्राणामेषु तीर्थेषु लक्ष्मण |
उपस्पृष्टं च विधिवत्पितरस्वापि तर्पिता: ||
प्रनष्टमशुभं तत्तत्कल्याणं समुपस्थितम् |
तेन तत्वेन हृष्टं मे मनो लक्ष्मण संप्रति ||

स्वैर भाषांतरः पुष्करणी (पूर्णा) नदीच्या या रम्य सरोवरात मातंग ऋषींनी स्थापन केलेल्या सप्तसमुद्रांच्या तसेच अनेक तीर्थांच्या पवित्र जलात स्नान करुन मी पापक्षालन केलं आहे तसेच पितरांचे ऋण फेडले आहेत. याच कारणाने आपल्या वाट्याला आलेले सगळे अशुभ नाहीसे होऊन आपले कल्याण होईल. म्हणूनच आता माझ्या मनाला अतीव आनंदाचा अनुभव येत आहे.

सरोवराची इतर काही छायाचित्रे - अगदी रम्य परिसर







शबरीधाम जवळील पम्पा सरोवराजवळील देवळात मातंग ऋषींची व शबरीची मूर्ती.


या देवळाबाहेर किंवा देवळातही या मूर्ती कोणाच्या आहेत हे सांगणारी एकही पाटी आढळली नाही.

शबरीधामकडून पम्पा सरोवराकडे जातानाही रस्त्यांची अवस्था अक्षरशः दिव्य आहे. आत्तापर्यंत मला कोकणातल्या काही ठिकाणी असणार्‍या खड्ड्यातल्या रस्त्यांचा(!) अनुभव असल्याने त्याहून वाईट काही पहायला मिळेल याची अपेक्षा नव्हती, पण अनुभव आला खरा. अत्यंत कार्यक्षम कारभार असणार्‍या गुजरात सरकारच्या कामाचा प्रभाव सगळ्या गुजरातेत पहायला मिळतो, असे असताना प्रशासनाने ह्या पावन जागेकडे जाणारे रस्ते (अरुंद असले तरी) निदान बर्‍या अवस्थेत ठेवले असतील, ही अपेक्षा फोल ठरली. अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते, "आमचा देश श्रीमंत आहे म्हणून आमचे रस्ते चांगले आहेत असं नव्हे, तर आमचे रस्ते चांगले आहेत म्हणून आमचा देश श्रीमंत आहे". हा धडा आपण कधी घेणार?



सरोवराच्या परिसरात फक्त नावाला "गुजरात टुरिझम" अशी पाटी आहे. एक उसाच्या रसाचे दुकान आणि आणखी एक सटरफटर छाप वस्तू विकणारे लहानसे दुकान वगळता सरकार पुरस्कृत 'टुरिझम'च्या नावाने सगळा आनंद आहे. मी मुद्दामून सरोवर वगळता बाकी परिसराची जास्त छायाचित्रे नाही काढली, कारण ह्या पवित्र परिसराचा पर्यटकांनी कचरा टाकून केलेला उकिरडा पाहून मनाला अतिशय यातना झाल्या, आणि त्या कटू आठवणी फोटोत तरी येऊ नयेत ही इच्छा होती. वरच्या छायाचित्रात खालचा भाग नीट बघितलात तर तुम्हाला पर्यटकांनी काय पराक्रम करुन ठेवलाय याचा थोडाफार अंदाज येऊ शकेल.

तसंच, पोहायला जाणार्‍यांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षक (लाईफगार्ड) तर फार लांबची गोष्ट आहे, एकही सुरक्षारक्षक किंवा एक साधा गाईडवजा पोर्‍याही दिसला नाही. गुजरात सरकार पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत शबरीधाम आणि पम्पा सरोवर परिसर या दोन ठिकाणांच्या बाबतीत तरी सपशेल अपयशी ठरलं असं खेदाने नमूद करावंसं वाटतं.

तरीही, ते इंग्रजीत 'इन अ लायटर व्हेन' का काय म्हणतात तसं बोलायचं झालं, तर परमेश्वर व त्याच्या लाडक्या भक्तांचं दर्शन इतक्या सहजा सहजी होत नाही, तेव्हा तेवढे कष्ट सोसायलाच हवेत आणि एकदा तरी शबरीधाम आणि पम्पा सरोवराला भेट द्यायलाच हवी.


~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ जय श्री राम ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~ ॐ ~

संदर्भ:
(१) शबरीधाम यात्रा महात्म्य - लेखक राजेश सुरेश दिक्षित (फक्त हिंदीत उपलब्ध).
(२) गीत रामायण.

आभारः
(१) नंदूरबार येथील राष्ट्रसेविका समिती सदस्या सौ. विद्युल्लता अभ्यंकर.
(२) मायबोलीवरील गप्पागोष्टी पानावरचे अनेक ज्यांनी मला शुद्धलेखनाविषयी मदत केली: सानी, भुंगा, स्मिता बिनिवाले, व अनेक इतर.

लेखातील सर्व छायाचित्रे: प्रत्यक्ष स्थळांवर जाउन काढली आहेत. प्रताधिकार सुरक्षित.





Wednesday, November 3, 2010

चित्रपट परिचय - २ | हॉर्टन हिअर्स अ हू (२००८): एक अनोखा अनुभव

सहावीत असताना माझी शाळा बदलली आणि त्याचबरोबर पंधरा मिनिटात नाचत, बागडत दंगा करत शाळेत जाण्याची सवय सुटली. अर्थात, चालत केलेल्या प्रवासात जरी घर ते विक्रोळी रेल्वे स्थानक आणि दादरला उतरल्यावर शाळेपर्यंत, आणि मग पुन्हा संध्याकाळी शाळा ते दादर स्थानक आणि विक्रोळी स्थानक ते घर अशी भरीव वाढ झाली असली, तरी त्यातली मजा निघून गेली होती. कारण मज्जा करण्याची जागा आता "कधी एकदा स्टेशन/शाळा/घर गाठतोय" या जगप्रसिद्ध मुंबईछाप घाईने घेतली होती. लवकरच नवखेपण जाऊन अस्मादिकांचे रूपांतर चतुर मुंबईकर रेल्वे प्रवासी (ही द्विरुक्ती आहे) असं झालं, आणि मी दादर लोकल मध्ये खिडकीतली जागा किंवा निदान बसायला जागा पटकावण्यासाठी माटुंगा स्टेशन गाठायला सुरवात केली.

आता तुम्ही विचाराल की मी हे सगळं का सांगतोय? याचा आणि चित्रपटांचा काय संबंध? पण आहे संबंध, ऐका तर खरं! एके दिवशी शाळा सुटल्यावर काही काम होतं म्हणून मित्राबरोबर सहज दादर स्टेशनपर्यंत गेलो आणि फलाट क्रमांक एक/दोन वर दादर लोकलची वाट पाहू लागलो. वेळ घालवायला वरती लावलेल्या टिव्ही संचावर लागलेल्या जाहीराती पाहू लागलो. जाहीराती संपल्यावर अचानक एक सुखद धक्का बसला. तिथे चक्क माझे आवडतं कार्टून टॉम अ‍ॅण्ड जेरी दाखवत होते!! मग काय, रोज धावत धावत दादर स्टेशन गाठणे आणि गाडीची वाट बघता बघता टॉम अ‍ॅण्ड जेरी बघणे हा रोजचा उद्योग झाला. आधीच वॉल्ट डिझ्नेच्या कार्टून्सनी वेड लावलंच होतं, त्यात आता ह्याची भर पडली. मग काही वर्षांनी उपग्रह वाहिन्यांचा जमाना आला आणि कार्टून नेटवर्कच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशनचा खजिनाच मिळाला आणि इतर काही अ‍ॅनिमेटेड मंडळींशी ओळख झाली.

मात्र त्याच बरोबर घरी आणि दारी ऐकाव्या लागणार्‍या टोमण्यांमुळे एक गैरसमज झाला तो म्हणजे कार्टून्स किंवा अ‍ॅनिमेशन हा फक्त लहान मुलांनी बघण्याचा चित्रप्रकार आहे. अर्थातच हे खोटं आहे ही गोष्ट लवकरच लक्षात आली, पण अजूनही भारतात सर्वत्र तोच समज आहे. जेव्हा जेव्हा आपल्याकडे एखादा धमाल अ‍ॅनिमेशनपट प्रदर्शित होतो, तेव्हा तेव्हा चित्रपटगृहात जे मोठे आपल्याला दिसतात त्यातले जवळ जवळ सगळे सिनेमा चांगला आहे म्हणून नव्हे तर फक्त लहान मुलांबरोबर कुणीतरी हवं म्हणून आलेले असतात. एकेकटे आले तरी कबूल करत नाहीत. असेच अनेक जण तर "अरे मुलीला आणणार होतो, पण तिचा एक्स्ट्रा क्लास होता, मग तिकीट वाया गेलं असतं म्हणून मित्राला घेऊन आलो," असं सांगून वेळ मारून नेतात. काही विशिष्ठ हाणामारी आणि विनोदपट वगळता आपल्या वेगळेपणामुळे जसे काही सिनेमे जसे आपल्याकडे लागत नाहीत, तसेच अनेक चांगले अ‍ॅनिमेशनपटही आपल्याकडे लागत नाहीत. असाच एक वेगळा असलेला, पण बहुतेक आपल्याकडे प्रदर्शित झालेला, अ‍ॅनिमेशनपट म्हणजे "हॉर्टन हिअर्स अ हू" हा नितांतसुंदर सिनेमा.


बघायला गेलं तर धमाल मनोरंजन, पण नीट पाहिला तर या चित्रपटातून आपल्याला चक्क अध्यात्मावर, सुजाण पालकत्वावर आणि काही सामाजिक वैगुण्यांवरही भाष्यही केल्याचं जाणवेल. आता कथेकडे वळू (हुश्श! असे काही आवाज ऐकू येताहेत मला ;) ).

नूल नावाच्या जंगलात काही नैसर्गिक घडामोडींमुळे धुळीचा एक कण एका फुलावरुन उडून हवेत तरंगत तरंगत जात असताना एका छोट्या तळ्यात आंघोळ करत असलेल्या हॉर्टन (Jim Carrey) या अत्यंत लाघवी आणि जंगलातील निसर्ग शिक्षक असलेल्या हत्तीची नजर वेधून घेतं, ते त्याला त्यातून एक अत्यंत छोटासा चित्कार ऐकू आल्यामुळे. हॉर्टन मग त्या धुळीच्या कणाची 'स्थापना' त्याच्या हातातल्या एका गुलाबी फुलावर करतो. कल्पनाशक्ती जोरात असलेल्या हॉर्टनला त्या धुळीच्या कणात अतीसूक्ष्म लोक राहत असलेलं 'हू-विल" (Who-ville) नामक एक अख्खंच्या अख्खं शहर असल्याचा साक्षात्कार होतो. या शहराचा महापौर असतो नेड मॅक्डॉड (Steve Carell). त्याच्या बरोबर राहत असतं त्याचं अवाढव्य कुटुंब - त्याची बायको सॅली (Amy Poehler) आणि "ह" (H) या अक्षराने नाव सुरू होणार्‍या शहाण्णव मुली - हो, ९६ मुली (Selena Gomez), आणि त्यांच्या पाठीवर झालेलं सत्याण्णवावं अपत्य आणि प्रथेनुसार वारसाहक्काने महापौरपदासाठीचा पुढचा दावेदार असलेला जोजो नामक मुलगा (Jesse McCartney). जोजोला मात्र पुढचा महापौर होण्यात काहीच रस नाहीये, त्याला व्हायचंय संशोधक, शास्त्रज्ञ.

ह्या महापौर साहेबांना डॉक्टर ला-रू Dr. LaRue (Isla Fisher) यांच्या सांगण्यानुसार असं लक्षात येतं की हॉर्टनने हू-विल् शहरासाठी जर लवकरच एक सुरक्षित स्थान शोधलं नाही तर हू-विल नष्ट होईल. मग ते तत्परतेने हॉर्टनला तसं सांगतात. मग सुरु होतो हॉर्टनचा माऊंट नूल या डोंगरावर तो धुळीचा कण पोहोचवण्याचा आटापिटा. अर्थातच इतर कुणाचाही एका धुळीच्या कणात एक शहर वसलंय यावर विश्वास बसत नाही, त्यामुळे हॉर्टनला जंगलातल्या जवळ जवळ सगळ्या प्राण्यांकडून कुचेष्टा आणि मानहानीला सामोरं जावं लागतं. यात आघाडीवर असते ती एक खडूस कांगारू (Carol Burnett), आणि उपद्व्यापी माकडांची जोडी असलेले विकरशॅम बंधू (Frank Welker and Dan Castellaneta).

हू-विल शहरात (हॉर्टनच्या धांदरटपणामुळे) अनेक गूढ घटना घडू लागल्याने शेवटी महापौर महाशयांना आपल्या नागरिकांना खरं खरं सांगावं लागतं. पण जसा जंगलवासी प्राण्यांचा जसा हॉर्टनवर विश्वास बसत नाही तसाच हू-विलकरांचा आपल्याच महापौरांवर विश्वास बसत नाही. दरम्यान, कांगारूबाई धुळीचा कण असलेलं ते गुलाबी फूल हॉर्टनकडून पळवण्यासाठी व्लाड व्लाडिकॉफ (Will Arnett) नामक एका खलप्रवृत्त गिधाडाला सुपारी देते. याचे उच्चार रशियन दाखवले आहेत हा उल्लेखनीय भाग. पण त्याबद्दल पुढे. व्लाडने हॉर्टनकडून ते पळवण्याच्या भानगडीत ते फूल तशाच दिसणार्‍या फुलांच्या ताटव्यात पडल्यामुळे हू-विल शहरात प्रचंड भूकंप होतो. हॉर्टनला ते फूल सापडते आणि सुदैवाने तो भूकंप आणि एका पाईपमधून येणारा हॉर्टनचा आवाज यामुळे निदान हू-विल करांना आपण एका धुळीच्या कणावर राहत असल्याची खात्री पटते. ते हॉर्टनवर त्यांचा विश्वास असल्याचे त्याला सांगतात.

शेवटी कांगारू इतर जंगलवासीयांना एकत्र करून हॉर्टनला पकडून पिंजर्‍यात टाकू पाहते आणि त्या फुलाला बिझलनटच्या उकळत्या तेलात टाकायचा आदेश देते. आता शेवटचा पर्याय म्हणून महापौर मॅक्डॉड सर्व हू-विलवासीयांना "आम्ही इथे आहोत" असं ओरडायला फर्मावतात. या प्रयत्नांत जोजो सामील होतो आणि आणि एका भोंग्यातून तोही आरोळी ठोकतो. अगदी शेवटच्या क्षणी कांगारूने तिच्या पिशवीतून अनेक वर्ष बाहेर पडू न दिलेला मुलगा रूडी (Josh Flitter) याला त्या धुळीच्या कणातून हू-विलकरांचा आवाज ऐकू येतो. आईच्या विरोधाला न जुमानता तो पिशवीच्या बाहेर झेप घेऊन ते फूल वरच्यावर उचलतो. जंगलातल्या प्राण्यांनाही आपण काय करायला जात होतो ह्याची जाणीव होते आणि ते हॉर्टनला शाबासकी देतात. हॉर्टन कांगारूकडे मैत्रीचा हात पुढे करतो आणि ती तो स्वीकारते. अशा रीतीने शेवट गोड होऊन सगळे जंगलवासी आणि हू-विल् वासी गाणं म्हणत म्हणत माऊंट नूल कडे जाऊ लागतात. याच वेळी कॅमेरा झूम-आऊट होतो आणि आपल्याला सांगतो की फक्त हू-विल् नव्हे, तर नूलचे जंगल आणि आपली पृथ्वी तसेच आपली सूर्यमालिका हे या विश्वात एका धुळीच्या कणाप्रमाणेच अतीसूक्ष्म आहे.



आता हा सिनेमा मला का आवडला ते सांगतो. वरच्या शेवटच्या दृश्याने आपणच नव्हे तर आपली पृथ्वी आणि आपली सूर्यमालिका या अफाट विश्वाच्या पसार्‍यात किती नगण्य आकाराची आहे याची जाणीव होते आणि "मी म्हणजे कोण" कसा गर्व करणे कसे फोल आहे हे समजतं. म्हणूनच मी सुरवातीला....खरं तर सुरवातीला म्हणजे मुद्द्याला हात घालण्याआधी बरंच पाल्हाळ लावल्यानंतर....जे म्हणालो होतो ना की यात थोडं अध्यात्म किंवा तत्त्वज्ञान दिसतं म्हणून, ते हेच.

हॉर्टन आकाराने मोठा असला तरी तो आपल्या आकाराचा उपयोग 'सद् रक्षणाय' यासाठीच करतो. तो एक खरा मित्र आहे आणि कल्पक शिक्षकही. आपण जर ताकदवान असलो तर आपल्या ताकदीचा उपयोग दुर्बळांचे रक्षण करण्यासाठी केला पाहीजे, आणि आपलं वय कितीही असलं तरी आपल्या आत दडलेलं लहान मूल, आपला आतला आवाज, कल्पनाशक्ती, नव्या कल्पना यांच्यासाठी आपल्या मनाची कवाडे सदैव उघडी ठेवली पाहीजेत हे ही यातून ध्वनित होतं.
वर उल्लेख न झालेलं एक पात्र आहे चित्रपटात आणि ते म्हणजे हॉर्टनचा खास मित्र असलेला मॉर्टन (Seth Rogen) हा उंदीर. याच्या बोलण्याकडे हॉर्टन नेहमीच लक्ष देऊन ऐकतो. मुख्य म्हणजे हॉर्टन जेव्हा जेव्हा चुकतो तेव्हा तेव्हा तो त्याला झापतो. सल्लागार कसा असावा याचं मॉर्टन हे उत्तम उदाहरण असल्याचं आपल्याला लक्षात येतं.

महापौर मॅक्डॉड यांचा मुलगा जोजो हा शहाण्णव मुलींच्या पाठीवर जन्माला आला आहे असं हू-विल् शहराच्या प्राथमिक ओळखीत आपल्याला समजतं. चित्रपट बघताना लहान मुलांना यातली मेख समजणार नाही, पण बहुतेक मोठ्यांना नक्की समजेल. सिनेमा ज्या देशात बनतो त्यातले संस्कृतिक-सामाजिक संदर्भ हे त्यात येतातच. त्यामुळे मॅक्डॉड यांच कुटुंब हे एका अ‍ॅनिमेशनपटातलं असलं तरी हे संदर्भ आपल्याला दुर्लक्षित करता येत नाहीत. आपल्या ओळखीत किंवा नात्यात एक-दोन तरी कुटुंब अशी असतात की ज्यात एकतरी मुलगा हवाच या अट्टाहासापायी दोन किंवा तीन मुलींच्या पाठीवर एक मुलगा असं बघायला मिळतं. आपल्याच देशात बुरसटलेले विचार असल्याचा आपला गैरसमज यातून दूर होतो. घरोघरी या ऐवजी देशोदेशी मातीच्याच चुली हेच खरं याची जाणीव हा भाग आपल्याला करुन देतो.

जोजोचं आपल्यावर लादण्यात आलेल्या 'भावी महापौर' या लेबलामुळे नाराज असणं आणि संशोधक व्हायची इच्छा बाळगणं हेही अत्यंत सूचक आहे. आपल्याकडे डॉक्टरांचा मुलगा डॉक्टर, आणि दुकानदाराचा मुलगा दुकानदार, तसंच सिनेनटाचा मुलगा अभिनेताच व्हावा, किंवा मग राजकारण्याचा मुलगा राजकारणातच पडावा, पुढारीच व्हावा अशी आई-बापाची इच्छा असते. अर्थात, कधी कधी त्यांना दुसरा पर्यायही नसतो म्हणा, पण आपल्या मुलावर आपल्या आवडी लादू नयेत, त्याला ज्यात गती आहे ते करु द्यावं हा फार महत्त्वाचा संदेश हा चित्रपट अत्यंत तरलतेने देतो. ही गोष्ट एकदा आपल्या लक्षात आली, की मग सिनेमाभर जोजोचं दु:खी चेहरा घेऊन घुम्यासारखं वावरणं आपल्या काळजाला भिडून जातं. मॅक्डॉड आणि जोजो या बाप-लेकाचं नातंही ताणावपूर्ण असलं तरी जोजोचं आपल्या बापावर प्रेमही आहे, कारण गुप्तपणे उभारलेली आपली प्रयोगशाळा तो बापाला वाईट वाटेल म्हणून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत बापापासून लपवूनच ठेवतो.

चित्रपटातील कांगारू ही सामान्यांना कस्पटासमान लेखणार्‍या राज्यकर्त्यांचे प्रतीकच म्हणायला हवी. जंगलातील जनता आपल्याऐवजी हॉर्टनचं ऐकू लागली तर तिच्या सत्तास्थानाला धोका पोहोचेल अशी तिला सतत भीती असते. याच भयापोटी ती विकरशॅम बंधू या माकडांच्या जोडीला आणि व्लाड व्लाडिकॉफ या गिधाडाला हॉर्टनवर सोडते. कांगारू आणखी काही गोष्टीचं प्रतीक आहे. ते म्हणजे अतीसंरक्षित आयुष्य देऊन आपल्या मुलांतील कल्पनाशक्ती मारणारे, आपल्या गृहतिकांना धक्का देणार्‍या बाहेरच्या गोष्टींची सतत भीती बाळगून असणारे पालक यांच. म्हणूनच ती रूडीला - आपल्या मुलाला - योग्य वेळ निघून गेल्यावरही आपल्या (पाऊच) पिशवीमध्येच ठेवते.

व्लाड व्लाडिकॉफ हे गिधाड चित्रपटातला एक खलप्रवृत्त पात्र आहे आणि त्याला रशियन उच्चारात बोलताना दाखवलं आहे. इथे थोडे राजकीय संदर्भ आहेत. अमेरिकेचं ज्या ज्या देशांशी प्रत्यक्ष युद्ध किंवा शीतयुद्ध झालं आहे त्या त्या देशांचे नागरिक दाखवलेले लोक अनेक वेळा अमेरिकन आणि ब्रिटिश सिनेमातून खलनायक म्हणून आपल्या समोर येतात. मग ते डाय हार्ड भाग २ आणि ३ मधले जर्मन अतिरेकी असोत किंवा इतर अनेक चित्रपटातले रशियन माथेफिरू.

विशेष गोष्ट अशी की हा चित्रपट हे सगळं सांगतो ते कसलाही आव न आणता, सहज कथेच्या ओघात.

तात्पर्य, कार्टूनपटांची संभावना 'मुलांचे मनोरंजन' म्हणून करणार्‍यांना हा आणि कदाचित असे अनेक चित्रपट हे झणझणीत अंजन ठरावेत. चला, मी आता थांबतोच. वाचून दमले असाल तर आणि हा चित्रपट बघणार असाल तर पुढच्या वेळेपर्यंत टाटा :)



*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

मोगरा फुलला दिवाळी अंक येथे पूर्वप्रकाशित.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

संदर्भ:

(१) स्टार मुव्हीज, एच.बी.ओ. वरील चित्रपट बघणे.
(२) कलाकारांच्या नावांसाठी: विकिपिडिया. (कंसातली नावे पात्रांना ज्यांचा आवाज वापरण्यात आला त्यांची आहेत.)

(३) सर्व छायाचित्रे: आंतरजालावरून साभार.

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*