Tuesday, May 2, 2017

बाहुबली द कन्क्लुजन - एकदा तरी नक्की पहावी अशी भव्यकलाकृती

मी दक्षिणेतले डब केलेले चित्रपट फारसे बघायला जात नाही. फारसे कशाला, बघतच नाही. चित्रपटगृहातच नव्हे तर घरी सुद्धा नाही. रोजा हा शेवटचा डब केलेला सिनेमा चित्रपटगॄहात जाऊन बघितलेला आठवतो. याला मुरड घालून बघितलेले दोन चित्रपट म्हणजे अर्थातच बाहुबली द बिगिनिंग आणि गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला बाहुबली द कन्क्लुजन.

पहिला भाग बाहुबली द बिगिनिंग काही कारणांमुळे चित्रपटगृहात बघता आला नाही, पण मुलांच्या कृपेने अगणित वेळा टीव्हीवर पारायणे झालेली आहेत. पण टीव्हीवर पाहण्यात मजा नाही हे लक्षात आलेच होते.
चित्रपट निर्मात्यांनी रामायण, महाभारत आणि इतर इतिहासातल्या अनेक घटना आणि घटनाक्रम कथानकात वापरल्या आहेत. निवर्तलेल्या राजाच्या सद्वर्तनी आणि महपराक्रमी मुलाला सत्ता न मिळता अनीती आणि कुमार्गावर चालणार्‍या त्याच्या भावाला मिळणे, त्या सन्मार्गी मुलाने सत्तात्यागच नव्हे तर राजप्रासादाचा सुद्धा त्याग केल्यावरही त्याच्या जीवावर उठलेला अन्यायी भाऊ आणि त्याचे सल्लागार मंडळ, राजघराण्यातली कटकारस्थाने, ऐन वेळी चुकीच्या व्यक्तीचा आदेश ऐकून न्याय्य पक्षावर अन्याय करावा लागणं यात झालेला कटप्पाचा भीष्माचार्य, आणि बैलांच्या शिंगांना लावलेले पेटते पलीते अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी या चित्रपटात आहेत.

पहिल्या भागात जाणवलेली आणि दुसर्‍या भागात विशेषकरुन ठसठशीतपणे समोर आलेली उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपट हे संपुर्णपणे एका हिंदू साम्राज्यावर बेतलेला असून त्यात ठायी ठायी असलेल्या हिंदू देवतांच्या मूर्ती किंवा त्यांची आणि सणांची ठसठशीत प्रतीके व गाणी. या गोष्टी निश्चितपणे डोळे आणि जीवाला सुखावून जातात. याचं विशेष कारण म्हणजे आजवर हिंदीत बनलेले चित्रपट हे प्रामुख्याने धर्मांध आणि कत्तलखोर मुघल राज्यकर्त्यांची प्रतिमा व्हाईटवॉश करण्यासाठीच बनवले गेलेले होते. इतकंच नव्हे, तर नायक, नायिका आणि त्यांचं आख्खं खानदान हिंदू असले तरी चित्रपटात किमान एक कौवाली असणे किंवा प्रेमगीत असल्यास मौला, बुल्ला, खुदा किंवा तत्सम शब्दांची रेलचेल असणे, सिनेमात किमान एक सहृदय शांतीदूत वगैरे अशा गोष्टी पाहून वीट आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदू दैवते व प्रतीके यांची ठसठशीत उपस्थिती दाखवल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. नाही म्हणायला पहिल्या भागात असलम खान नामक शस्त्रविक्रेत्याची एक व्यक्तिरेखा होती पण त्यातही कटप्पा त्याच्या शस्त्रांचा पाणउतारा करताना दाखवला आहे.

आणखी एक सुखावणारी गोष्ट म्हणजे माहिष्मती साम्राज्याच्या 'राष्ट्रगीता' पासून ते सैन्याला दिल्या जाणार्‍या आदेशांपर्यंत अनेक ठिकाणी संस्कृत शब्दांचा केलेला वापर होय. सातत्याने उर्दू शब्द ऐकून किटलेल्या कानांनी आणि विटलेल्या मनांनी या बदलाचं निश्चितच जोरदार स्वागत केलं यात काही आश्चर्य नाही.
किती जणांच्या लक्षात आलं माहित नाही, पण बैलांच्या शिंगांना पेटते पलीते लावण्याची ही शिवाजी महाराजांची ही एकच कल्पना दिग्दर्शक राजामौलीने वापरलेली नाही. कुंतल देशाच्या राणीचा भाऊ कुमारवर्मामधे शौर्याची भावना उत्पन्न करुन त्याला पराक्रम गाजवायला भाग पाडणारा बाहुबली आणि मदत मागायला आलेल्या बुंदेल नरेश छत्रसालाला स्वतःचं स्थान निर्माण करायला प्रोत्साहन देणारे आपले महाराज यात मला विलक्षण साम्य आढळलं.

चित्रपटातील स्त्रियांचे केलेले चित्रण ही विशेष आवडलेली बाब. सम्राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकणारी शिवगामिनी तर आहेच, पण कधी संकटसमयी तलवार तर कधी प्रियकरासाठी मोकळा सोडलेला केशसंभार अशी चतुरस्र देवसेनाही आहे. देवसेना स्त्रियांशी वावगं वागणाऱ्या सेनापतीची स्वतः बोटं छाटते, त्यासाठी नवऱ्याची वाट बघत बसत नाही. पहिल्या भागातल्या हिरविणीला अवंतिकाला मात्र या भागात फारसं काम नाही.

दोषच सांगायचे तर दक्षिणेतल्या चित्रपटातील साहसदृश्यात अतिशयोक्ती या शब्दालाही लाजवेल अशी दृश्ये असतात तशी या चित्रपटातही आहेत. बैलांची काही दृश्ये ही VFXच्या दृष्टीने जरा गडबड वाटतात, पण तरीही अंगावर रोमांच यावेत अशी आहेत. बोट हवेतून जाते हे स्वप्नदृष्य (dream sequence) आहे हे नंतर जाणवतं, तिथे संपादन (एडीटींग) दोष असावा असं वाटतं. अगदी रजनीकांतला सात जन्मात जमणार नाहीत अशी अतिशयोक्तीपूर्ण साहसदृश्ये शेवटाकडे आहेत. पण याबाबत माझं जरा वेगळं मत आहे. एक तर हे कथानक काल्पनिक आहे, त्याला कुठल्याही ऐतिहासिक सत्य परिस्थितीचा काडीचाही आधार नाही. शिवाय इतक्या मोठ्या पटलावर या गोष्टी आरामात खपून जातात. आपल्याला चमत्कृतीपूर्ण हॅरी पॉटर चालतो, तर अतिशयोक्तीपूर्ण बाहुबली का चालू नये?

या चित्रपटाच्या निमित्ताने एतद्देशीय राजे व संस्कृती निर्भीडपणे दाखवणारे चित्रपट बनायला सुरवात झाली तर सोन्याहून पिवळं असं म्हणता येईल. खानावळ आणि हीन दर्जाच्या घराणेशाहीने ग्रासलेल्या हिंदीत बनतील अशी अजिबात आशा नाही. पण जे कुणी ते निर्माण करेल, ते करताना या चित्रपटातले दोष हेरून ते दूर करण्याची प्रक्रियाही सातत्याने झाली पाहीजे.

- (भयानक कम्युनल चित्रपट चाहता) © मंदार दिलीप जोशी

तळटीपः चित्रपटाशी करण जोहरचं असलेलं नातं, VFX स्टुडीओ आणि पैसे कुणाकुणाचे लागले आहेत या संबंधातले टोमणे आधीच गृहित धरुन सांगतो, की त्यांचे पैसे वापरुन हिंदू संस्कृती चित्रपटातून दिसत असेल तर मी म्हणतो वापरा बिंधास. काय?

No comments:

Post a Comment