Tuesday, July 28, 2015

डॅा ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे महान व्यक्तिमत्व काल कायमचे पंचत्वात विलीन झाले.

डॉ. कलाम यांनी कायम विज्ञानाचा प्रसार करण्यात आनंद मानला. समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजवताना नेहमी धर्माला बडवले पाहीजे असे नाही हे त्यांनी कुठलाही अभिनिवेश न ठेवता प्रत्यक्ष आचरणाने दाखवून दिले. या प्रवासात कुठेही त्यांना वादग्रस्त गोष्टी चिकटल्या नाहीत. ही कला फार कमी जणांना अवगत आहे.

ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात हे सगळ्यांनाच विदीत आहे. इथे कवी संदीप खरे यांच्या "व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची" या काव्यपंक्तींची आठवण आल्यावाचून राहत नाही. डॉ. कलाम म्हणायचे, "भारताला क्षेपणास्त्रांची गरज यासाठी आहे की ताकद ही नेहमी ताकदीचा आदर करते" (We need missiles as strength respects strength).

त्यांची ओळख वैज्ञानिक व मिसाईल मॅन इतकीच नव्हती, तर एक सहृदयी व संवेदनशील बॉस म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपला बॉस कधी जातो याची इतर लोक वाट बघतात, हे जाऊ लागले की त्यांच्या हाताखालचे लोक व्यथित होत असत. सरकारी बाबू असोत किंवा लष्करी अधिकारी, सगळ्यांशी वागताना कमालीचा संयम व शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी होती. लहान मुले व तरुणांना मार्गदर्शन करणे ह्या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी होत्या. ज्ञानदानाचा त्यांचा उत्साह आश्चर्यकारक होता. त्यामुळे वयाच्या ८४व्या वर्षी ते निवर्तले असले, तरी ते अकाली गेले असेच आपल्याला वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही. अक्षरशः स्वतःच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते देशहितार्थ विज्ञानाचा प्रसार व मार्गदर्शन करत राहीले.

लोकसत्तातल्या बातमीचे शीर्षक हे 'अग्निपंख विसावले' असे आहे. ते तितकेसे बरोबर नाही. डॉ कलाम यांचे नश्वर शरीर कार्य करेनासे झाले, पण त्यांची चेतवलेला विज्ञानाग्नि आपल्या सर्वामधे कायम तेवत राहून आपल्याला अग्निपंख बहाल करत राहील अशी मला खात्री आहे.

कायम देशहित हाच वैय्यक्तिक स्वार्थ मानणार्‍या अशा या सच्च्या भारतीयाला माझी साश्रू नयनांनी मन:पूर्वक श्रद्धांजली.

निआषाढ शु१२शके १९३७
© Mandar D. Josh
i

Friday, July 17, 2015

बाळाजी विश्वनाथ पेशवे - लेखक प्रमोद ओक

हे पुस्तक परिक्षण नाही. परिक्षण लिहीण्याइतका मी मोठा आहे असे मला अजिबात वाटत नाही. पुस्तकाच्या वाचनानंतर मला काय वाटले त्याबद्दल व्यक्त झालेले हे विचार आहेत.


हे पुस्तक नुकतेच वाचले. ही ऐतिहासिक कादंबरी नाही तर संशोधनपर पुस्तक आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना हे अनेक ठिकाणी कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे. पुस्तकासाठी संशोधन करताना लेखकाने घेतलेले कष्ट पानागणिक जाणवतात.

वास्तविक पेशवा हे पद छत्रपती शिवाजी महाराजांपासून अस्तित्वात असले तरी आपण ज्याला 'पेशवाई' म्हणतो ती बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांपासूनच सुरू झाली. थोरले बाजीराव पेशवे यांच्यापासून शेवटच्या बाजीरावांपर्यंत  सगळ्या पेशव्यांवर विपूल साहित्य उपलब्ध असले तरी या पहिल्या पेशव्याबाबत मी काहीही वाचलेले नव्हते. त्यामुळे हे पुस्तक नजरेस पडताच संग्रही ठेवण्याचा निश्चय केला, आणि हा विश्वास लेखकाने सार्थ ठरवला.

पुस्तकात सुरवातीला चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण हे महाराष्ट्रात  बाहेरून आले का, आले असल्यास देशाच्या किंवा परदेशाच्या कुठल्या भागातून आले इत्यादी बाबींचा उहापोह करण्यात आलेला आहे. तो कंटाळवाणा वाटला तरी तो पेशव्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे, कारण चित्पावण ब्राह्मणांविषयी इतिहासात मुख्यतः पेशव्यांपासूनच वाचायला मिळते.

शाहू महाराजांच्या सुटकेपासून ते बाळाजीपंत यांचा पेशवेपदावर नेमणूक इथपर्यंतचा इतिहास फारच रोचक आहे आणि तो लेखकाने विस्तृतपणे दिलेला आहे. सर्वसामान्य माणूस स्वाभाविकपणे प्रत्येक बदलाचा स्वीकार करण्याआधी "What's in it for me?" अर्थात "यात माझा काय फायदा?" असा विचार करतो. मग या मनुष्यस्वभावात असलेल्या वैशिष्ठ्यापासून त्याकाळचे सरदार, इतर मानकरी, वगैरे कसे लांब असतील? त्या धामधुमीच्या काळात याची व्यवस्थित जाणीव असलेल्या बाळाजीपंतांनी त्यांच्याकडे असलेल्या शक्यतो लढाई टाळून सामोपचाराने समोरच्याला त्याचा फायदा दाखवून देणे व माणसे जोडणे या दोन अंगभूत गुणांनी कसा उपयोग करुन शाहू महाराजांची सत्ता मजबूत करण्यास महत्वाची भूमिका बजावली हे या पुस्तकात व्यवस्थितपणे येते.

पुस्तक बाळाजीपंतांच्या मृत्यूवर संपत नाही. शेवटच्या प्रकरणात  त्यांची पत्नी राधाबाई व इतर पेशवे परिवाराबाबत बरीच माहिती मिळते. एक उत्तम पुस्तक संग्रही पडले याचे समाधान लेखक श्री प्रमोद ओक यांनी दिले त्याबद्दल त्यांचे आभार.

आता पुस्तकातून मला जाणवलेल्या माझ्यासाठी रोचक असलेल्या तीन बाबी. त्यातली इतिहासप्रेमींच्या दृष्टीने असलेली बाब प्रथम सांगतो.

(१)


(२) आमचे गाव केळशी. त्या अनुषंगाने:



याबाबत कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.

(३) आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला आपल्या मुळांविषयी (roots) प्रचंड उत्सुकता असते, त्या संदर्भातली ही बाब. आमचे पूर्वज मूळचे कोकणातल्याच वरवडे गावचे शाण्डिल्य गोत्री जोशी. आता "जोशी उदंड जाहले" हे जरी खरे असले, तरी आम्ही पेशव्यांशी संबंधित जोशांच्या शाखा/उपशाखांपैकी असू शकतो ही शक्यताच गुदगुदल्या करुन गेली. या बाबतही कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.