Wednesday, March 15, 2023

पोप आणि हिटलर

दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी व्हॅटिकनचे पोप पायस बारावे (XII) आणि हिटलरमधल्या संपर्कासंदर्भात एक लेख वाचनात आला. लेख खूप मोठा आहे आणि भविष्यात त्याचं भाषांतर करण्याचा प्रयत्न करेन पण त्याचा थोडक्यात गोषवारा असा: 


तत्कालीन पोप महाशय हे हिटलरशी सातत्याने संपर्कात होते. त्यांचा भर हा हिटलरने चर्चच्या हितसंबंधांना धक्का लावू नये यावरच होता. हिटलरचं म्हणणं असं होतं की चर्चच्या पादऱ्यांनी आणि इतर मंडळींनी राजकारणात ढवळाढवळ करू नये. या दोघांच्यात प्रत्यक्ष आणि मध्यस्थांमार्फत झालेल्या चर्चांत कोणता भाग राजकारण आणि कोणता रिलिजियस यावर खल होत असे. 

लक्षणीय बाब म्हणजे यात पोप महाशयांचे म्हणणे हिटलरने फक्त चर्च आणि चर्चच्या हितसंबंधांना इजा करू नये इतकंच होतं ― ज्यूंचे हिटलरने काहीही करावे त्याच्याशी चर्चला काहीही देणेघेणे नाही.

Pius XII had other priorities. As the head of a large international organization, his overriding aim in negotiations with Hitler’s emissary was protecting the institutional resources and prerogatives of the Roman Catholic Church in the Third Reich. If the only goal was to protect the welfare of the institutional Church, his efforts could well be judged a success. But for those who see the papacy as a position of great moral leadership, the revelations of Pius XII’s secret negotiations with Hitler must come as a sharp disappointment. 

युद्ध जसे जसे पुढे सरकू लागले तसा हिटलरच्या शासनाचा आणि त्याच्या ज्यूंचा निर्वंश करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा किमान तोंडदेखला निषेध करण्याचा दबाव पोप महाशयांवर वाढू लागला...

...पण शेवटपर्यंत दाखवायला सुद्धा हिटलरविरोधी एक शब्द त्यांच्या तोंडून बाहेर पडला नाही.


© मंदार दिलीप जोशी
चैत्र कृ ८, शके १९४४

Saturday, March 11, 2023

पाश्चात्यांचे हिंदुत्वः १

लंडनस्थित एक अमेरिकन पुरातत्वतज्ञ श्री जॉन मर्विन फ्रिट्झ निवर्तले. श्री फ्रिट्झ अनेकदा हम्पीला येत असत. त्यांची शेवटची इच्छा अशी होती की आपल्या अस्थी हम्पी येथील तुंग नदीत विसर्जित करण्यात याव्यात. त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी हम्पीला येऊन त्यांच्या अस्थींचे हिंदू परंपरेनुसार विधिवत विसर्जन केले. 

एकीकडे पाश्चात्य जगात हिंदू संस्कृती व परंपरांबद्दल आकर्षण वाढत आहे, तर दुसरीकडे आपल्यापैकी काही घटिंगण प्रथा, परंपरा कशा निरर्थक आहेत हे सांगण्याचा करंटेपणा करत आहेत. एका मित्राच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्माचे पुनरूज्जीवन कदाचित पाश्चात्य जगातून होईल किंवा त्याचा प्रणेते पाश्चात्य असतील ते अशा वेळी खरं वाटू लागतं.





Ashes of John Merwin Fritz, a London-based archaeologist, immersed in the Tungabhadra waters at Hampi

The ashes (asthi) of John Merwin Fritz, an 83-year-old London-based archaeologist and anthropologist, who died in London on January 23 this year, were, as per his wishes, immersed in the Tungabhadra waters at Hampi on Sunday.

Fritz was an internationally acclaimed archaeological researcher who made notable contribution to research on the great imperial city of Vijayanagara.

As per his wishes, his cremation was carried out according to Hindu rituals in London and the ashes were immersed in the Tungabhadra waters. His grandson Williams performed the ash-immersion rituals at Hampi.

Fritz’s daughter Alice Chandra Fritz and his friends John Gollings and George Michell were among those present at the Hampi ceremony.

“Fritz was very fond of India, especially Hampi. As per his wishes, his ashes were submerged in the Tungabhadra waters. His other wish was to complete the Vijayanagara Research Project which he started 30 years ago. I am also part of the project with a specific assignment of mapping surface archaeological features and I have finished it. We will try to complete the entire project,” Surendra Kumar, a Hampi-based researcher, told The Hindu.

Born on December 29, 1939 at Glendale of California in the United States, Fritz had settled down in London.

His work, Paleo-Psychology Today (1978), anticipated not only new directions in archaeology but also what would become the core of his research and publications regarding the symbolic features of past architectural monuments and structures, including aspects of both the Chaco site in New Mexico and, most substantively, the grand imperial city of Vijayanagara at Hampi in India.

In April 1981, Fritz joined George Michell, an architect from Australia, for archaeological research of Hampi. Over the next 20 years, he and George Michell ran an independent field camp in the middle of the ruins in Hampi. Together with the many scholars who became involved in what came to be known as the Vijayanagara Research Project, Fritz published extensively, editing the two-volume “Vijayanagara: Archaeological Exploration, 1990-2000”, and, together with George Michell, issued a popular guidebook on the site.

Their jointly authored “City of Victory” published in 1991 by Aperture in New York was the first of the several superbly illustrated volumes. They gifted much of the project’s maps and drawings to the British Library. Before his death, Fritz made a bequest to the American Trust for the British Library to fund a one-year cataloguing post for the collections.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ. चतुर्थी, शके १९४४ | गणेश चतुर्थी

Wednesday, February 15, 2023

शूरा मी वंदिले

जर एखादा पोलीस अधिकारी कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शूर असेल, आणि तो देशद्रोही आणि समाजकंटकांशी लढत आणि जिंकत असेल तर – त्याचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही - धक्का बसला? आणि शीर्षकाचा याच्याशी काय संबंध? थांबा थांबा, सांगतो. 

किमान हॉलिवूड आणि तिथून चोर्‍यामार्‍या करणारे बॉलिवूडचे आणि वेब सिरीजचे निर्माते हेच असत्य (नॅरेटिव्ह) प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. माझ्या आठवणीत नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला आलेल्या Bruce Willis नायक असलेल्या 'Diehard' या चित्रपट मालिकेनेपासून याची सुरवात झाली. नंतर २००८ च्या आसपास आलेल्या  Liam Neeson च्या 'Taken' या सिनेमा सिरीजने या छद्मसिद्धांताला पुढे रेटण्याचं काम केलं. आणखीही चित्रपट मालिका असतीलच, पण मला ठळकपणे या दोन आठवतात इतकंच. अरे हो, हे लिहीता लिहीताच बाटला हाऊस एनकाउंटरवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटातही नायकाचं वैवाहिक आयुष्य फारसं बरं चाललेलं नसतं असं दाखवलं आहे. [त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे डाय हार्ड मालिकेच्या चौथ्या भागात ऑफिसर मक्लेन (ब्रूस विलीस) ची मुलगी जी आधी स्वतःची ओळख ल्युसी जेनेरो (Gennero - तिच्या आईचं म्हणजे हॉली हिचं आडनाव) अशी करुन देत असते तीच वडिलांनी व्हिलन आणि मंडळींचे बारा वाजवल्यावर आपलं नाव ल्युसी मक्लेन अशी करुन देते. पण तरी नॅरेटिव्ह तोच राहतो.]


नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर आलेली वेब सिरीज 'फर्जी' याच विकृतीने ग्रासलेली दिसते. बुद्धीमत्ता आणि शौर्याच्या जोरावर अत्यंत ताकदवान असलेल्या माफियावर मात करणार्‍या पोलीसांचा एक गट अशी साधारण कथावस्तू आहे. यात नायक असलेल्या पोलीस अधिकार्‍याच्या र्‍हास होत चाललेल्या वैवाहिक आयुष्याबाबत एक संपूर्ण असंबद्ध अशी एक समांतर चालणारी गोष्ट आहे. या घटस्फोटाच्या प्रकरणाला मालिकेच्या कथेतून रजा दिली असती तरी तरी कथेवर काहीही परिणाम झाला नसता. 

हे सातत्याने का केलं जातं? कलात्मक स्वातंत्र्य अर्थात क्रिएटिव्ह लिबर्टी अंतर्गत कथेत मसाला घालणे हा एक तर्क होऊ शकतो, पण खरंच फक्त तेच कारण आहे का?

यावर चर्चा करत असताना दोन कारणे समोर आली. कुटूंबसंस्थेला विविध मार्गांनी नष्ट करायला डावे टपलेलेच आहेत. तसंच, डाव्यांनी व्यापलेल्या मनोरंजन क्षेत्रात त्यांचं लाडकं लक्ष्य अर्थात टार्गेट असलेली patriarchy अर्थात पितृसत्ताक पद्धती नेहमीच रडावर असते. समाजमाध्यमांत #SmashPatriarchy आणि थेट बोलता येत नाही म्हणून त्याला #SmashBrahminPatriarchy अशी दिलेली फोडणी आपण बघत असतो. आता #Patriarchyनष्ट करायची तर समाजातलं पौरुष नष्ट करणे भाग आहे. 

संगीत मानापमान नाटकातलं "शूरा मी वंदिले" या पदाकडे आपण येऊया. प्राचीन काळापासून स्त्री ही शूर पुरुषाकडे आकर्षित होते हा आपला पारंपारिक दृष्टीकोन (traditional view)आहे. काळानुसार समाजात अनेक बदल होत गेले असले तरी मूळ गाभा तोच राहिला आहे. आजही गणवेषातल्या अधिकारी व्यक्तीची पत्नी म्हणवून घेण्यात अनेकींना अभिमान वाटतो. माझ्या अनुभवांतही आपला नवरा पोलीसांत, सैन्यात, नौदलात किंवा तत्सम क्षेत्रात आहे हे सांगताना स्त्रियांच्या चेहर्‍यावर एक निराळीच चमक दिसते. 

चित्रपटांत आणि वेब सिरीजमधे अशा प्रकारची कथानके घालण्याचं हेच कारण दिसतं की प्रामाणिक, शूर, आणि यशस्वी पुरुष अधिकार्‍यांचं एक तर करियर उत्तम असू शकतं किंवा वैवाहिक आयुष्य तरी. पूर्वी चित्रपटांत प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांच्या कुटुंबावर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या दाखवल्या जायच्या. आता त्यांचा चांगला संसारच होऊ नये म्हणून हे कर्तृत्ववान शूर पुरुषांच्या अयशस्वी संसाराचा नॅरेटिव्ह रुजवण्याचे प्रयत्न होत आहेत. यात मेख अशी आहे की डाय हार्ड, टेकन, बाटला हाऊस इत्यादी सिनेमांत नायिकेला नवर्‍याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, प्रेमही आहे,  पण तरी तिला त्याबरोबर करावी लागणारी तडजोड आणि त्याग मात्र मान्य नाही. थोडक्यात ज्याप्रमाणे शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारी अशी समाजाची मानसिकता आहे तसंच "शूरा मी वंदिले" हा पारंपारिक दृष्टीकोन बदलून "शूरा मी लांबूनच वंदिले" असा दृष्टीकोन रुजवण्याचे जोरदार प्रयत्न गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून चित्रपट आणि मालिकांमार्फत सुरु आहेत. 

वाचकांनी सहमत व्हावंच असं अजिबात नाही, पण यावर विचार करावा अशी मात्र नक्कीच अपेक्षा आहे. 

मूळ हिंदी: © श्री जनार्दन पेंढारकर
मराठी भावानुवाद, संपादन, आणि वाढीव लेखनः © श्री मंदार दिलीप जोशी

Monday, January 16, 2023

खर्रा इतिहासः मुघल - अरबस्थ बामण

 मुघल हे खरे तर अरबस्थ बामण. भारतीय बामण मुंज झाल्यावर डोक्यावर शेंडी ठेवायचे. आबा भटाचे पणजोबा अण्णा भट यांनी शहेनशहा बाबराला आयडिया सांगितली की इकडच्या बामणांपेक्षा तुम्ही वरचढ दिसणे अपेक्षित आहे तेव्हा तुम्ही डोक्यावर शेंडी न ठेवता हनुवटीवर ठेवा आणि मिशी कापून टाका. तेव्हापासून मुघल बिनमिशीचे दाढी ठेऊ लागले. 


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान २७८६, ओळ ६
 #तुझ्यायची_अकबरी  #आबा_भट_भारीच_खट

🖋️ मंदार दिलीप जोशी

Saturday, January 7, 2023

धन्यवाद मिस्टर बुधकर

'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील सुधीर जोशी यांची विश्वास सरपोतदार ही भूमिका लांबी कमी असूनही त्यांच्या दमदार अभिनयाने गाजली, इतकी की आज बाकी कलाकारांच्या बरोबरीने त्या भूमिकेची आठवण काढली जाते. हल्लीच्या ट्रेंड अनुसार या भूमिकेचे stills वापरून केलेल्या Meme सुद्धा भरपूर आहेत.

त्यांची दुसरी एक भूमिका आहे पण ती तितकीशी गाजली नाही. कदाचित गंभीर आणि कटू सत्य मांडणारी होती म्हणून असं असू शकेल. ती भूमिका म्हणजे 'तू तिथे मी' या चित्रपटातली मिस्टर बुधकर ही अशीच लहान पण महत्वपूर्ण भूमिका. नुकतेच निवृत्त झालेले, एकुलता एक मुलगा कॅनडात अत्यंत सुस्थितीत, घरात म्हातारी आई त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाहीत, इथे रिकामा वेळ खायला उठतो म्हणून ऑफिसच्या वेळात घरून निघतात, बसने ऑफिसला जातात आणि गेट बाहेर सिक्युरिटीवाल्याशी गप्पा मारतात.

प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, त्यामुळे जनरलायझेशन करणे योग्य नाही. तरीही एक उदाहरण देतो. इथे म्हणजे फेसबुकवरच एका निवृत्त गृहस्थांची ओळख झाली. म्हणजे ही माहिती वैयक्तिक संपर्क झाल्यावरच कळली की ते निवृत्त आहेत. त्यांच्या हिंदुत्ववादी धोरणात्मक (strategic) आणि साम्यवादी, डावे यांच्याबद्दलच्या लिखाणाने प्रभावित होऊन त्यांना रिक्वेस्ट पाठवली होती. ते हिंदीत लिहितात. सगळीच मते पटतात असं नाही पण त्यांना गुरू केलेलं आहे. त्यांच्यापासून सगळ्यांनीच शिकण्यासारखं आहे. अक्षरशः २४ तास ते या विषयांत डोकं चालवत असतात. असो, त्यांची स्तुती खूप झाली.

प्रत्येकाने काही राजकीय लिखाण करून ज्ञानकण वाटावेत अशी अपेक्षा नाही, पण आज हिंदू समाजापुढे ज्या लग्नसंस्था, शिक्षण, धर्मशिक्षण, धर्माचरण, आपल्या गावाकडची माहिती, उत्सव, प्रथा, परंपरा इत्यादी अनेक समस्या आणि विषय आहेत. त्यावर उपाय म्हणून अनेक कार्ये हातात घेणे आवश्यक आहे आणि त्यातले महत्वाचे कार्य म्हणजे प्रबोधन आणि मार्गदर्शन.

काही गोष्टी फक्त हुशारी आणि तरुण रक्ताने जमत नसतात तर त्याला अनुभवातून आलेल्या विचारांची जोड लागतेच. त्यामुळे निवृत्त आयुष्य जगणाऱ्यांनी तरुण पिढीला नावे ठेवण्यात आणि मालिका बघून डोक्यात कचरा भरून घेण्यात अर्थ नाही, आणि व्हाट्सपवर निरर्थक फॉरवर्ड टाकून वेळ घालवण्यातही. यात पूर्णवेळ घर सांभाळणाऱ्या व्यक्तीही आल्याच. त्यामुळे उपरोल्लेखित म्हणजे या आधीच्या परिच्छेदातील विषयांवर चिंतन, मनन, आणि जमल्यास प्रबोधन आणि मार्गदर्शन अवश्य करावे.

टीप:
(१) हे कुणा एकाला/एकीला उद्देशून हे नाही. त्यामुळे स्वतःवर ओढवून घेऊ नका. घेतलंत तरी माय फादर्स व्हॉट गोज?
(२) फेसबुकवर एका पोस्टवर एक भंकस टीपी जोकवजा कमेंट केली आणि त्यावरून 'तू तिथे मी' सिनेमा त्यातले मिस्टर बुधकर आठवले. ओशोवाले संभोगातून समधीकडे म्हणतात तसं भंकसकडून चिंतनाकडे असं झालं.
(२) (अ) म्हातारपणी 'डेक्कन क्वीन' बघायची असेल तर तिला कसं धावायचं याचं मार्गदर्शन करण्याचीही धमक ठेवा.
(३) मी फक्त एक समाजोपयोगी उपाय सांगितला. बाकी ज्याला जे करायचं त्याने ते करावं.

🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष कृ १, शके १९४४

Saturday, December 31, 2022

खर्रा इतिहासः ख्रिसमस ट्री - एक मुघल शोध

 आपण हिंदूस्थानात मोठमोठ्या टूर्स काढत असूनही दीवान-ए-खास मधे आपल्या कामाची पुरेशी चिन्हे (souvenir) नाही अशी जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सरांना अलीकडे (म्हणजे हल्ली, कुणाकडे असं नव्हे. चावट कुठले) खंत लागून राहिली होती. बेगम शोधाबाईंच्या नादाने एक दोन मराठी मालिकांचे बघून त्यांना "प्रेझेंटेशन" द्यायची हुक्की आली होती पण त्यांच्या दिमाग-ए-मस्तिष्कचे जे विचार करण्याचे काम त्यांनी ज्या बिरबलाला औटसोर्स केले होते त्याने बादशहासरांना आवरलं म्हणून बरं झालं. 

पण अकबर सर सुद्धा कधीकधी विचार करत असत. जिल्लेइलाही शहेनशहा बादशहा ज.म.अकबर सर हिंदूस्थानात जिथे जिथे टूर घेऊन गेले होते तिथल्या स्थानिक झाडांची रोपे कुंडीत आणून दीवान-ए-खासमधे ठेवण्याची सूचना त्यांनी बिरबलाला केली. पण अकबर सरांना नुसतीच झाडं बघवेनात. त्यांनी बेगम शोधाबाईंना सांगून त्या झाडांवर चायनीज प्रवासी फुं-कून-पी आणि दी-वे-लाऊ यांनी बादशहा सरांना भेट दिलेले एक हजार दिवे त्या झाडांना लावून टाकले. पण ते दिवे चायनीज असल्याने त्यातले फक्त सातशेसहाईंशीच दिवे पेटले. शोधाबाईंना चिंता लागून राहिली पण बिरबलाने त्यांना "तसे बादशहा जिल्लेइलाही अकबर सरांचेही दिवे फारसे पेटत नसल्याने काही कळणार नाही" असा दिलासा दिला.

प्रचंड थंडीला कंटाळून युरोपियन प्रवासी रिका-म-टेकडोस्की एकदा डिसेंबरात दिल्लीत आला असताना त्याने दरबारात ही रोषणाई बघितली अ‍ॅंड रेस्ट इज हिस्टरी. अशा रीतीने ख्रिसमस ट्रीची परंपरा युरोपात प्रचलित झाली. 

पण हा खर्रा इतिहास युरेशियन विकेंड इतिहासकार तुम्हाला कधी सांगणार नाहीत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
पान ६६६, ओळ ८

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

🖋️ मंदार दिलीप जोशी






Sunday, December 18, 2022

प्रारब्ध

एक व्हिडिओ बघितला ज्यात एक ताई राजकीय बंदचा भाग म्हणून दुकान बंद करायला आलेल्या काही तरुणांना समजावत आहेत. त्याच ताईंच्या फेसबुक पोस्टवर जी मंडळी गरळ ओकत असतात, त्यांच्या पोस्टवर आलेल्या घाणेरड्या भाषेतल्या टिप्पण्या वाचून लहानपणी आजोबा सांगायचे ती गोष्ट आठवली.

खूप पूर्वी एका आटपाट गावात एक म्हातारा-म्हातारी आणि त्यांचा मुलगा रहायचे. बिचारे इतके गरीब होते की दिवस दिवस उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर येत असे. एकदा काय झालं की गरिबीमुळे त्रासून त्यांनी भगवान शकरांकडून वर प्राप्त करून घेण्यासाठी तप करायचं ठरवलं आणि तिघेही ध्यान लावून बसले.

कैलासावरून त्यांचं तप बघत असलेल्या पार्वतीमातेला त्यांच्यावर दया आली आणि त्या भगवान शंकरांना म्हणाल्या, "अहो, बघा ना, हे तिघे किती घोर तप ठरत आहेत. तुम्ही यांना वर का नाही देत?"

शिवशंकर हसून म्हणाले, "प्रिये, प्रारब्ध. मी वरदान दिल्याने काहीही होणार नाही. या जन्मात जे विधीलिखित आहे ते त्यांना भोगावंच लागेल."

पण पार्वतीमाता पडल्या आई. लगेच चिडून म्हणाल्या, "ते मला काही माहीत नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्यांना जाऊन एक एक वर देऊन या. माझ्याच्याने यांचे कष्ट बघवत नाहीत. जाताय ना?!"

अखंड सृष्टीच्या मातेचं म्हणणं ऐकून भगवान शंकर तिघांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी आपल्याकडे वर मागावा असं सांगितलं.

सर्वात आधी म्हातारीने वर मागितला. ती म्हणाली, "हे भोळ्या शंकरा, तुम्ही मला मी लग्न करून या घरात आले तेव्हा मी जशी होते तशी करा."

भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच म्हातारीचं रूपांतर एका सुंदर षोडशवर्षीय नवरीत झालं.

हे पाहून म्हातारा भडकला. रागाने लालबुंद होऊन शंकराला म्हणाला, "हे भगवान, या मूर्ख बाईला जराही अक्कल नाही. मी वर मागतो की हिला कुत्री करा."

म्हाताऱ्याचं ऐकून भगवान शंकरांनी "तथास्तु" म्हणताच त्या नवतरुणीचं रूपांतर एका कुत्रीत झालं.

मग भगवान शंकरांनी त्या मुलाला वर मागायला सांगितलं. मुलगा विचारात पडला. आपल्या आईला या अवस्थेत पाहून त्याला अपार दुःख होत होतं. त्याने पटकन हात जोडले आणि शंकरांना विनंती केली, "हे देवाधिदेव, माझ्या आईला पुन्हा पहिल्यासारखं करा."

भगवान शंकर "तथास्तु" म्हणाले आणि शांतपणे परत कैलासाकडे प्रस्थान करते झाले. परत आल्यावर भगवान शंकरांनी माता पार्वतीकडे पाहून एक मंद स्मित केलं आणि पुन्हा ध्यानात गेले.

तसं या गोष्टीकडून बरंच शिकण्यासारखं आहे पण हजारो वर्षांपासून परमेशवराच्या अवतारांपासून ते ऐतिहासिक काळातील थोर मंडळी आणि संत परंपरेतील महान लोक जे शिकवून गेलेत ते वाचून समजून वागण्याची अक्कल जर नसेल तर अशा बैलबुद्धीच्या लोकांना कितीही सांगितलं, तरी शेवटी प्रारब्धात असेल तसेच ते वागणार.

असे लोक कधीही बेकायदेशीरपणे रस्त्यावर चादरी अंथरून जागा बळकावलेल्या असतात त्यांना मुक्त करण्याचा उपक्रम राबवत नाहीत कारण अशा ठिकाणी काही सत्कार्य करण्याची हिंमत तर नसतेच, पण आदेशही नसतो. शिवाय नेहमी आपल्यापेक्षा कमी शक्ती असलेल्या घटकांवरच दमबाजी केली जाते (अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैव च नैव च अजपुत्रम बलिम दद्यात् देवो दुर्बलघातकः।) आणि त्याला आधार म्हणून काल्पनिक ऐतिहासिक अन्यायाची भावनिक फोडणी त्याला दिली जाते. अशी अरेरावी केल्यावर लोक आपल्याला घाबरतात हे एकदा कळलं की ती करणारे त्या राजकीय उतरंडीत जितक्या खालच्या पायरीवर असतील तितका त्यांचा इगो जास्त फुगतो आणि सुखावतो. मुख्य म्हणजे इतर काहीही रचनात्मक न करता उपद्रवमूल्य दाखवायला दिवसाचे काही ठराविक म्हणजे पाचशे ते दोन हजार रुपये मिळाले तर कोण थोर पुरुषांची शिकवण वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करेल? त्याला कुवत लागते आणि असल्यास बुद्धी वापरावी लागते, आणि तेवढे कष्ट घेण्याची यांची तयारी नसते. त्यापेक्षा वरून पैसे आणि आदेश आला की असली कामे ठरत फिरण्यात धन्यता वाटत असेल तर नवल काय?

तस्मात, व्हीडीओतल्या त्या ताईंनी ज्या आईच्या मायेने त्या मुलांना समजावलं ते त्यांचं कृत्य अत्यंत स्तुत्यच आहे. पण... असो. आपण आशा सोडू नये, एखादा तरी या घाणीतून बाहेर पडला तरी आपलं यश समजायचं. बाकी भगवान शकरांवर सोडून देऊया.

हर हर महादेव 🙏🏻

राजकीय बंद


🖋️ मंदारपंत जोशी

Friday, December 16, 2022

खाण तशी माती: देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम

खाण तशी माती अशी एक म्हण आहे मराठीत, त्याची आठवण झाली. 

देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया कंगूजम चा डँबिसपणा पहिल्या फोटोत दिसेलच. तिचे तीर्थरूपही काही कमी नाहीत. त्यांनी तर प्रचंड मोठा घोटाळा केलेला आहे. घोटाळे म्हणायला हवं.

या इसमाने खोट्या कागदपत्रांच्या आधारे व  आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांबरोबर काढलेले फोटो दाखवून आपण आंतरराष्ट्रीय दर्जाची मोठी व्यक्ती असल्याचे भासवून: 

(१) International Youth Committee (IYC) च्या नावे देशी आणि विदेशी विद्यार्थ्यांकडून कोट्यावधी रुपये उकळले आहेत.

(२) हे साहेब तीस्ता सेटलवाडचे पुर्वोत्तर भारतीय घोटाळाबंधू असून दंगलग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली बेकायदेशीर स्त्रोतांद्वारे आणि दानाद्वारे कोट्यावधी रुपये जमवले आहे.

(३) या साहेबांवर २०१६ची एक गुन्हेगारी केस प्रलंबित असून मुख्य न्याय दंडाधिकारी, इम्फाळ पूर्व यांनी त्याला फरार घोषित केलं होतं.

आणि देशी ग्रेटा थनबर्ग लायसिप्रिया म्हणते आम्ही गरीब. 

Licypriya Kangujam KKSingh


सोशल मिडियाने बातम्या समपातळीवर आणून ठेवल्या आहेत (created a level playing field). खाती ब्लॉक करणे वगैरे प्रकार असले तरी एखाद्या गोष्टीची सत्यासत्यता तपासणे अगदी सोपे झाले आहे. डाव्यांचा सोशल मिडियावर नियंत्रण आणण्याचा आग्रह असण्याचं कारण हेच आहे की "अरेच्या, तुम्हाला खरं कळतं, आणि तुम्ही ते जगाला सांगता पण?" थोडक्यात, सोशल मिडिया नसता, तर हे लोक आपल्याला वर्षानुवर्ष असंच येडे बनवत राहिले असते.


🖊 मंदार दिलीप जोशी

Wednesday, November 30, 2022

डोंबलाचे शेळीब्रिटी

शुक्रवारी २६ तारखेला सकाळी दापोलीला गाडीने चाललो होतो. मुर्डीचा चढ चढत असताना एके ठिकाणी गाडी डावीकडे घेऊन त्या निमुळत्या आणि खड्डेयुक्त रस्त्यावर एका गाडीला जायला जागा करून देताना अचानक त्या गाडीवाल्याने माझं लक्ष वेधून घ्यायला जोरात हॉर्न वाजवला. मी काच खाली केली तर त्याने विचारलं, "मंदार जोशी ना?"

मी दचकून म्हटलं हो.

"हांsssss मला वाटलंच, फेसबुक फोटो वरून ओळखलं मी!"

हे कमाल आहे, आता लोक चालत्या गाडीतून पण ओळखू लागले 😁

पण कसं आहे, की आपण ऑनलाइन किंवा ऑफलाईन सेलिब्रिटी आहोत, आपल्याला चार लोकं ओळखतात, अशा समजुतीत राहून डोक्यात कधी हवा जाऊ देऊ नये.

फार पूर्वी धर्मेंद्रची एक मुलाखत वाचली होती. त्यात त्याने एक किस्सा सांगितला होता तो जसा आठवेल तसा सांगतो. तो एकदा एकटाच गाडी चालवत आपल्या गावाकडे चालला होता. वाटेत त्याला एक खेडूत रस्त्याने चालत असलेला दिसला. आपण त्याला लिफ्ट देऊ, मग तो आपल्याला धर्मेंद्रने कशी लिफ्ट दिली हे सगळ्यांना सांगेल वगैरे मनात मांडे खाऊ लागला. धर्मेंद्रने गाडीत बसायला सांगितल्यावर तो बसला, पण गाडीत तो काहीच बोलेना. धर्मेंद्रने बळंच विचारलंन तेवढ्या प्रश्नांची त्याने थोडक्यात उत्तरे दिली इतकंच. त्याचं ठिकाण आल्यावर त्या खेडुताने मला इथे उतरवा असं सांगितलं.

धर्मेंद्रने गाडी थांबवल्यावर त्या खेडुताने खिशातून दोन रुपयाची नोट काढली आणि धर्मेंद्रच्या हातात ठेऊन शांतपणे आपल्या मार्गाने निघून गेला.

माझ्याही बाबतीत असंच एकदा झालं होतं. एकदा केळशीच्या उत्सवाला बाहेरगावाहून आलेल्या एक बाई मला शोधत असल्याचं समजलं, ब्लॉग लिहिणारे मंदार जोशी आलेत का असं विचारत होत्या. एका काकांनी आमची भेट घालून दिली. पुढचा काही वेळ मी हवेत होतो.

उत्सवात जो गोंधळ असतो त्यात एकाचा आवाज आणि उच्चार मला फार आवडतात म्हणून मी नेहमी पहिल्या रांगेत समोर बसत असे. त्यामुळे तो गाववाला मला ओळखतो असा माझा समज होता. एकदा प्रसादाचं जेवण आटपल्यावर तो जरा टेकला होता तिथे जाऊन मी ओळखीचं हास्य केल्यावर त्या व्यक्तीने मला विचारलं,

"कुणाकडे उतरलात?" 😁

तस्मात, फार हवेत उडू नये. ब्रह्मांडात जिथे आपली सूर्यमाला एवढूशी आहे, तिथे तुम्ही आम्ही कोण?

🖋️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, November 1, 2022

खर्रा इतिहास: फटाक्यांचा शोध

जिल्लेइलाही बादशहा जलालूद्दीन अकबर साहेब एकदा जश्न-ए-दिवटे निमित्त काय खास गोष्ट करावी असा आपल्या दिमाग-ए-मस्तिष्क मध्ये विचार करत बसले होते. ही गोष्ट त्यांना फार नवीन होती. पण वतीने विचार करणारा बिरबल काशीयात्रेला सुट्टीवर गेल्याने त्यांना हे काम करण्यास आत्मनिर्भर होणे जरुरीचे होते. या आधी मुल्क-ए-हिंदुस्थानात कुणीही केली नसेल अशी धमाल उडवून द्यावी आणि आवामचे दिल आपल्याबद्दलच्या मोहोब्बत ने भरून टाकावे असे त्यांना वाटत होते. 

काहीतरी कल्पना मिळेल म्हणून त्यांनी टीव्ही लावला. #झीट_मराठी नावाच्या वाहिनीवर कुठलीतरी आजी आपल्याच नातवाला विहिरीत ढकलून कसे ठार मारायचे असा विचार करत असलेली दिसली. बादशहा सलामतांना ती कल्पना फारशी पसंद आली नाही. मग त्यांनी चॅनल बदलला. #ठार_प्रवाह वर एक सासू आपल्या सुनेला शिऱ्यात विष घालून मारायची योजना आखत असल्याचे त्यांना दिसले. माणसं मारायचे हे असले अहिंसक प्रकार पाहून त्यांना बहुत गुस्सा आला. बादशहा सलामत जिल्लेइलाही जलालूद्दीन अकबर साहेबांच्या चौतीसाव्या बेगम साहिबांच्या वालीदा अर्थात बादशहांच्या सासूबाई #सोनी_मराठी बघत असलेल्या त्यांना दिसल्या. त्या वाहिनीवर एक इसम खोटं नाव सांगून लग्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना दिसलं. "सरळ उचलायचं ना" असं उद्गारल्यावर चौ.बे.वा. दचकल्या आणि त्यांनी चॅनल बदलला. #कलर्स_मराठी वर एक वस्ताद चाळे नामक नट "मला हे पसंत नाही" "मला ते पसंत नाही" असं ओरडत सगळीकडे आग लावत सुटलेला त्यांना दिसला. ही कल्पना मात्र त्यांना आवडली. त्यांनी लगेच चॅनलला फोन लावून वस्ताद चाळेला पाठवून द्या असा हुकूम सोडला.

"ए वस्ताद, बादशहांनी तुला लाल किल्ल्यावर बोलावले आहे" असं म्हटल्याबरोबर त्याने स्वतःची दाढी कुरवाळत खर्जातला आवाज लावून "पण माझी तर आधीच लाल आहे" अशी त्याच्या स्वभावाला अनुसरून आगाऊ टिप्पणी केली. मग बादशहांच्या सैनिकांनी त्याच्या तशरीफ वर काष्ठप्रहार करून ती आणखी लाल केली आणि वस्तादला बादशहा हुजुरांसमोर घेऊन गेले. 

बादशहा ज.म.अकबर सर त्यावेळी तुडुंब खाऊन झोपले होते. अलीकडे (म्हणजे कुणाकडे असे नव्हे, पलीकडच्या उलट) त्यांचे पोट जरा नासाज राहत असे. अशातच ते कुशीवर वळले आणि नेमकं त्याच वेळी त्यांच्या सतराव्या बेगम साहिबांच्या वालीद साहेबांनी दिलेल्या हवाबाण हरड्यांनी करामत दाखवली. ते पाहून वस्ताद चाळेच्या डोक्यात किडा वळवळला. "असं अनेकदा होतंय का?" नाक मुठीत धरलेल्या सैनिकांना त्याने लगेच सवाल पुसला. "हुजुरांना असा त्रास होतो कधी कधी, झोपेतच औषधांचा परिणाम होतो". काही नतद्रष्ट मित्रांच्या नादाने वस्ताद चाळेने एकदा नॅशनल जियोग्राफिकवर बघितलेला एक रिऍलिटी शो त्याला आठवला. सैनिकांकडून मशाल मागून घेत तो बादशहांच्या तशरीफमागे स्वस्थपणे उभा राहिला. त्याला फार वाट बघावी लागली नाही. हवाबाण हरड्यांनी लगेच पुन्हा आपला प्रभाव दाखवला, पण या वेळी जळती मशाल असल्याने ढुsssम्म असा स्फोटक आवाज होऊन मोठा जाळ झाला आणि बादशहा सलामत पटकन जागे होऊन पळत सुटले. 

आणि अशा प्रकारे कन्ट्री-ए-हिंद मध्ये फटाक्यांचा शोध लागला. पण हा इतिहास तुम्हाला विकेंड इतिहासकार सांगणार नाहीत.


अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ६७

#अकबर_शुंभमेळा #तुझ्यायची_अकबरी

© मंदार दिलीप जोशी

Thursday, October 27, 2022

परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे

प्रत्यक्ष आयुष्यात बहुसंख्य हिंदूंनी पुन्हा कुंकु/टिकली/गंध लावायला सुरवात करायला हवी असं नेहमी वाटत असे. मी स्वतः पाश्चात्य कपडे घालूनही मी रोज गंध लावून ऑफिसात जायचो, अजूनही जातो. खरं तर या कपड्यांना सोयीचे/नियमांअंतर्गत मोडणारे कपडे असं म्हणायला हवं. कारण कॉर्पोरेट ऑफिसात धोतर नेसून जाता येत नाही. पण अनेक ठिकाणी कुठल्याही कपड्यांसोबत कुंकू/टिकली-टिळा लावण्यावर बंधन नाही. इस्रोचे अवकाश शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन हे ही कामावर नियमित गंध लावून जात असत. जेव्हा ऑफिसात स्त्रिया टिकली लावून येतात तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व हे फक्त कॉर्पोरेट न राहता त्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते आणि एक प्रकारचं तेज चेहर्‍यावर असल्याचं भासतं. 

प्रत्यक्ष जगण्यात हिंदुत्वाची प्रतीके आणि चिह्ने आपण श्रद्धेने, अभिमानाने, आणि नियमितपणे अंगावर ल्याली पाहीजेत. या विषयावर मी माझ्या पद्धतीने काम करायला सुरवात केली होती आणि पुढेही करत राहीन. पण काल मला एका फेसबुक मैत्रिणीचे संदेश आले (चित्र १) आणि फेसबुकवर आपला वेळ अगदीच वाया जात नाही हे पटलं. कुंकू/टिळा/गंध हे कालबाह्य नाही तर अभिमानाने मिरवावे असे सांस्कृतिक, धार्मिक चिन्ह आहे हे विशेषतः तरुणांच्या मनावर ठसवले गेले पाहीजे. इथे मी कुंकू/टिकली लावण्यामागे विज्ञान, आज्ञाचक्र वगैरे बाबींबद्दल बोलत नाही कारण गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होतील. 
























एक आक्षेप समोर आला की पाश्चात्य कपड्यांवर कुंकू/टिकली लावण्याचा आग्रह बरोबर नाही. पण कुंकू-टिळा हे कपड्यांवर अवलंबून ठेवून आपण त्याचा परीघ मर्यादित करत आहोत. हे लिहीत असताना पाश्चात्य कपड्यांवर म्हणजे जीन्स-टीशर्टवर टिच्चून टिकली लावून फिरणारी एक फेसबुक अविवाहित भगिनी आठवली. तिची पोस्ट सोबत जोडली आहे, अर्थातच नाव झाकून. ती काही हिंदू धर्मातली पंडित नाही, पण तिच्या मनात जी विचारांची सुस्पष्टता आहे ती मला क्वचितच इतर लोकांच्यात दिसते (चित्र २ आणि ३). 





































पोस्टच्या सुरवातीला ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला ती विवाहित आहे आणि घरातली कर्ती स्त्री आहे. नवरा-बायको आणि एक मूल असं कुटुंब आहे. याचा अर्थ  किमान तीन जणं या विचारांनी प्रभावित झाले आहेत किंवा होतील. ते कदाचित इतरांना प्रभावित करतील. यालाच हिंदीत ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणत असावेत.

तुमच्यापैकी कुणी या बाबतीत समविचारी असेल तर मी एकटा काय करु शकतो किंवा शकते असा विचार करुन हताश होऊ नका. मात्र जे कराल त्याला भगवंताचे अधिष्ठान असावे.  

सामर्थ्य आहे चळवळीचे  जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (दा. २०.४.२६)

आपण सूज्ञ आहात, बहुत काय लिहीणे!

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. द्वितिया, शके १९४४


Thursday, October 6, 2022

बॉयकॉट बॉलीवूड आणि युद्धभूमीची निवड

#BoycottBollywood चळवळीला मूर्खात कसं काढायचं याचा आदिपुरुषचा ट्रेलर आणि त्यानंतर सुरु झालेलं प्रिमॅच्युअर रावणदहन हा एक वस्तुपाठ आहे. आत्तापर्यंत सैफचा रावण आणि त्याची मापं काढणार्‍या पोस्टी येऊन गेल्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी रावणाला ठेवण्यात चित्रपटामागच्या शक्ती यशस्वी झाल्या. एकूण पोस्ट्सपैकी ९५% पोस्ट या रावणावर होत्या.

आणि हिंदुत्ववादी / #BoycottBollywood वाले या गुगलीवर त्रिफळाचित झाले.

हा गुगली कसा?


पहिल्या फोटोकडे बघा. तुम्हाला तो आवडलेला नाही, कारण नेहमी, म्हणजे लागोपाठ सिनेमा मागून सिनेमात, नराधम, दुष्ट, अत्याचारी खलनायक मंडळींना नेहमी विभूती, गंध इत्यादी हिंदू प्रतीकं लावलेलं का दाखवायचं? आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.


आता दुसर्‍या फोटोकडे बघा. तुम्हाला तोही आवडलेला नाही, कारण तुमचा व्हिलन कितीही दुराचारी, अत्याचारी, बलात्कारी, थोडक्यात नीचपणाचा कळस असला तरी तो तुम्हाला म्लेंछवेषात वेड्याबिद्र्या पक्ष्यावर आरुढ होऊन आलेला चालणार नाही. आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.

अरे मग तुम्हाला हवंय तरी काय? फक्त बॉयकॉट बॉयकॉट करत आऊटरेज करायचंय? — हे मी नाही म्हणत, बॉलीवूडने तुमच्यावर फेकलेली Strawman Argument आहे. Strawman Argument म्हणजे तुमच्या मुद्द्याला खेचून दुसर्‍या टोकाला नेत "तुम्हाला असं म्हणायचंय का?" या पातळीवर चर्चा आणून ठेवणे. समजा तुम्ही म्हणालात की प्रदूषण कमी होणार्‍या गाड्यांची निर्मिती वाढली पाहीजे, तर समोरचा म्हणतो "म्हणजे काय आता बैलगाड्यांनी प्रवास करायचा का?" याला म्हणतात Strawman Argument. यात आता तुम्ही स्वतःचा मुद्दा बाजूला ठेवून त्याने मांडलेल्या दुसर्‍या टोकाच्या मतावर वाद घालू लागता. तर ते असो.

कथेचा नायक, श्रीराम कसे असले पाहीजेत, माता सीता कशी दाखवली पाहीजे, महाबली हनुमान कसे दिसले पाहीजेत यावर चर्चा फिरण्याऐवजी, चर्चा ही अधर्माचा पुतळा म्हणता येईल अशी व्यक्ती, ज्याच्या निर्दलनासाठी आणि धर्मसंस्थापनेकरता प्रत्यक्ष भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला तो राक्षसराज रावण कसा होता आणि कसा दाखवला पाहीजे यावर केंद्रित झाली. सर्वांनी रावणाच्या गुणांची यादी सादर करुन झाली. थोडक्यात, ही चर्चा "आमचा व्हिलन किनै..." याच भोवती फिरत राहिली.

Saif Ali Khan says Adipurush will ‘humanise’ Raavan, ‘justify his abduction of Sita’ - सैफ एका मुलाखतीत म्हणाला की आदिपुरुष सिनेमा रावणाचा 'मानवी चेहरा' समोर आणेल, सीताहरण योग्य कसं हे सिद्ध करेल.

पण अश्शी कश्शी हेअरस्टाईल रावणाची, अश्शी कश्शी मुघली दाढी रावणाची असं म्हणत, तुम्ही नाई म्हणजे नाही सहन करणार. तुम्ही म्हणणार की आमचा व्हिलन किनै विभूती लावायचा, आमचा व्हिलन किनै वेदविद्या पारंगत होता, आमचा व्हिलन किनै वीणा वाजवायचा, आमचा व्हिलन किनै शिवभक्त..... ब्लाह ब्लाह ब्लाह. मुघल असो वा राक्षस, दोघांचेही वर्तन तसेच होते आणि दोघेही संपवण्याच्याच लायकीचे हे आपण लक्षात घेतलंच नाही.

उद्या सैफने येऊन विचारलं की "तुमचा व्हिलन इतका यंव आणि त्यंव होता, मग तो वाईट कसा? उगाच आला सिनेमा झोडप, आला सिनेमा झोडप करताय!" असं म्हणत आपली, म्हणजे बॉयकॉट गँगची अक्कल काढली तर पुढच्या वेळी आपण गोंधळून नेमका कोणता मुद्दा उचलावा या गडबडीत पुढचा सिनेमा काही कोटी कमावून जाईल.

थोडक्यात, तुम्ही युद्धभूमी चुकीची निवडली या वेळी "खलनायक कसा असायला हवा" ही. हरकत नाही. 
युद्धभूमीची निवड करता यायला हवी. फार लांब नको जायला, पेशवे बाजीराव यांना पालखेडचा विजय कशामुळे मिळाला हे लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. दुर्दैवाने आपण पराभवातूनही शिकत नाही आणि शत्रू आपल्या विजयांचा अभ्यास करुन आपल्याला नंतर व्यवस्थित खिंडीत गाठतो.

पुढच्या वेळी लक्षात ठेवा.

प्रांजळ कबूली: सुदैवाने माझं अकाउंट रिस्ट्रिक्टेड होतं नाहीतर मलाही पोस्टी टाकायचा मोह आवरला नसता, तेव्हा मी जखमी होऊन संघाच्या बाहेर बसलेल्या, आणि त्यामुळे तटस्थ विचार करायची संधी मिळालेल्या खेळाडूसारखा आहे.

© मंदार दिलीप जोशी
विजयादशमी, शके १९४४