Wednesday, February 12, 2020

बडे अच्छे लगते हैं

काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि खरी वाटू लागतात त्यातलं हे एक.

बड़े अच्छे लगते है...
क्या?
ये धरती, ये नदिया, ये रैना...
...और?
और तुम!


आपल्याला फक्त माणसांबद्दल जिव्हाळा नसतो, तर वस्तू, वास्तू, आणि जागांबद्दलही आत्मीयता असते.

तुम इन सबको छोड़के कैसे कल सुबह जाओगी
मेरे साथ इन्हें भी तो तुम याद बहुत आओगी


काही जुने इंग्रजी आणि त्यावरून ढापलेले हिंदी सिनेमे बघितले असतील, तर त्यात चारचाकी गाडीला जीव किंवा स्वतःचं मन आहे या मध्यवर्ती कल्पनेभोवती चित्रपटाची कथा फिरत असे हे नक्की आठवेल. अनेक कठीण प्रसंगांतून ती गाडी आपल्या मालकाला किंवा त्याच्या मुलाला बाहेर काढत असे. जगात सुष्ट शक्ती आहेत तशाच दुष्ट शक्ती सुद्धा म्हणून एका चित्रपटात एक दुष्ट खुनशी काळी गाडी  'मुख्य भूमिकेत' दाखवण्यात आली होती.

मगर सच्चे लगते हैं,
ये धरती, ये नदिया, ये रैना,
और?
और तुम!


आपली गाडी, शाईचे निबाचे पेन, म्युझिक सिस्टिम, अगदी वॉशिंग मशीन सारख्या घरगुती वस्तू या आपण एकहाती रहाव्या असं म्हणतो त्यामागे व्यक्तीपरत्वे वापरण्याची पद्धत बदलत असल्याने वस्तूंची झीज लवकर होऊ शकते, वस्तू लवकर बिघडू शकते हा साधा तर्कशुद्ध विचार आहे, पण त्यापलीकडे जाऊन माणसांना जशी माणसांबरोबरच निर्जीव वस्तूंबद्दलही जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा झाडं, नदी, आपल्या गावची माती अशा वस्तूंनाही माणसांबद्दल वाटू शकतो असं मला तरी वाटतं.

एखादी स्कुटर फक्त आपल्याच लाथेने सुरू होते, तर एखाद्या जुन्या टीव्हीला त्याच्याच मालकाने टपलीत मारल्यावर सुरू व्हायची खोड असते. एखाद्या सवयीच्या किंवा आवडीच्या झाडाखाली आपण बसलो तर एरवी माणसं पाहताच तिथे न फिरकणारे पक्षी आपल्या डोक्यावर घोंघावू लागतात आणि आपण त्या झाडाच्या आणि ते झाड आपल्या सानिध्यात शांतावल्यासारखं वाटतं, तर कधी नदीच्या किंवा स्वच्छ पाण्याच्या ओढ्याच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पाय सोडून बसल्यावर लहानगे मासे पायांभोवती निर्धास्त घोटाळू लागतात. कधी वाहतं पाणी पायाशी घुटमळून तळपायाला गुदगुल्या करुन पुढे गेल्याचा भास होतो. वर्षभर बंद असणारं आपलं गावाकडचं घर कुटुंबासहित कुलूप उघडून आत शिरल्यावर एकदम जिवंत होऊन उठतं तर कधी तेच घर आपण एकटे गेल्यावर 'बाकीचे कुठे आहेत, मुलं दिसत नाहीत ती..मग बरोबर मंडळी पण नाही आली ते', असं अपूर्णतेने व्याकूळ होऊन विचारतंय असा भास होतो.

ओ माझी रे, जइयो पिया के देस
ढोबळ विचार केला तर इथे पिया का देस म्हणून फक्त प्रिय व्यक्तीचा देस नव्हे तर आपलं शहरातलं किंवा गावाकडचं घर, अगदी बरीच वर्षे काम करत असलेलं ऑफिस, मित्रांबरोबर चकाट्या पिटायची जागा, देऊळ आणि त्यापुढंचं पटांगण, असं काहीही असू शकतं. जी जागा आपला भावनिक कम्फर्ट झोन असते, तोच पियाका देस.

फक्त ते आपलं असायला, वाटायला हवं. ते नातं सहजीवनाला पूरक अर्थात symbiotic असलं तरच हे शक्य होतं, परजीवी म्हणजे parasitic असलं तर नाही. आपण बहुतांशी symbiotic आहोत म्हणूनच आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलं:
अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम् |
उदारचरितानां तु वसुधैव कुटुम्बकम् ||
 
(महोपनिषद्, अध्याय ४, श्‍लोक ७१)
अर्थात: हा आपला बंधू, तर तो आपला बंधू नव्हे तर परका आहे, असा विचार कोत्या मनाची माणसे करतात. उदार अंत:करणाच्या लोकांकरता हे संपूर्ण जगच कुटुंबासमान आहे.

एका कुटुंबातली लोकं ज्याप्रमाणे वागतात तसं symbiotic वागलं तर माणसं, वस्तू, आणि वास्तूच काय पण संपूर्ण देश तुम्हाला सामावून घ्यायला सरसावतील. Parasitic माणसं मात्र स्वतःच्याही देशात तिरस्करणीय ठरतात. सुज्ञांंस अधिक सांगणे न लगे.

खरंच आहे, काही गाणी अचानक उमगतात, समजतात, आणि नुसतीच वाटू लागत नाहीत तर त्यांचे वेगळे अर्थही लागू लागतात.

🖋️ मंदार दिलीप जोशी
माघ शु, चतुर्थी, शके १९४१

Saturday, February 1, 2020

कोरोनास्य कथा: रम्या:

अमेरिकन फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात एफबीआयच्याएजंटस् नी नुकतंच बॉस्टनमधल्या विद्यापीठ व एका रुग्णालयाशी संलग्न असलेल्या तीन जणांवर हेरगिरीचे आरोप ठेवले. या तिघांपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या रसायनशास्त्र व रासायनिक जीवशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ चार्ल्स लिबर (Dr. Charles Lieber) यांनी त्यांना चीनकडून दरमहा मिळालेल्या ५०,००० डॉलर रकमेबाबत व एरवी मिळालेल्या कोट्यवधी डॉलर्सबद्दल संरक्षण खात्याला खोटी माहिती दिल्याच्या कारणावरून अटक करण्यात आली.

मॅसेच्युसेट्सचे अ‍ॅटर्नी जनरल अ‍ॅन्ड्र्यू लेलिंग (Andrew Lelling) यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ चार्ल्स लिबर यांना गेल्या अनेक वर्षात ही रक्कम चीनमधील संस्थांसाठी संशोधन करण्याच्या मोबदल्यात त्यांना देण्यात आली. डॉ लिबर यांना त्यांच्या हार्वर्ड विद्यापीठातील कार्यालयात अटक करुन सक्तीच्या प्रशासकीय सुट्टीवर पाठवण्यात आले. अटकेच्या काळात अर्थातच त्यांना विद्यापीठात अध्यापन आणि संशोधनात्मक कार्यात सहभागी होता येणार नाही. डॉ चार्ल्स लिबर हे चौकशीत पूर्ण सहकार्य करत असून या प्रकरणातील त्यांच्या सहभागाचे पुनरावलोकन करत आहेत असं हार्वर्ड विद्यापीठाकडून प्रसूत करण्यात आलेल्या माहितीत म्हटलं आहे.

आरोप ठेवण्यात आलेले इतर दोन जणं चीनी "विद्यार्थी" असून हे बॉस्टनमधील विद्यापीठात संशोधन सहाय्यक अर्थात रिसर्च असिस्टंट म्हणून काम करत होते.

यातली एक जण यँकिंग ये (Yanqing Ye) ही चक्क चीनच्या सैन्यात लेफ्टनंट म्हणून अजूनही कार्यरत आहे. अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करताना तिने ही माहिती लपवली होती. तिने एप्रिल २०१९ साली बॉस्टन विद्यापीठ सोडले असून ती सद्ध्या चीनमधे असल्याने अर्थातच तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, आणि सगळ्या आंतरराष्ट्रीय संकेतांना खुंटीवर टांगून ठेवण्याच्या चिनी दादागिरीच्या पद्धतीमुळे तशी शक्यताही नाही. Yeकडच्या उपकरणांत रोबोटीक्स आणि संगणक वैज्ञानिक असलेल्या दोन अमेरिकन नागरिकांची माहिती सापडली.

झाओसंग झेंग (Zaosong Zheng) या दुसर्‍या 'सहाय्यकाला' तो चीनला परतण्याच्या प्रयत्नात असताना लोगन विमानतळावर एफबीआयच्या मते "संवेदनशील जैविक नमूने" (Sensitive Biological Samples) असलेल्या तब्बल २१ कुप्यांसकट अटक करण्यात आली. तो हार्वर्ड विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीवर बेथ इस्रायल मेडिकल सेंटरमध्ये संशोधक म्हणून कार्यरत होता.

एक सांगायचंच राहीलं, हे पैसे डॉ चार्ल्स लिबर यांना चीनमध्ये रासायनिक-जैविक प्रयोगशाळा उभारण्याकरता देण्यात आले होते. त्यांनी जी रासयनिक-जैविक प्रयोगशाळा उभारायला चीनला मदत केली होती, ती प्रयोगशाळा मध्य चीनमधील वुहान तंत्रज्ञान विद्यापीठात आहे.

जगभरात झपाट्याने पसरत असलेल्या आणि हजारोंच्या संख्येने लोकांना बाधित करत असलेल्या कोरोना व्हायरसचा उगम हा याच वुहान मधल्या एका प्रयोगशाळेत झाला. आत्तापर्यंत जगभरात कोरोना व्हायरसच्या तब्बल दहा हजार रुग्ण सापडल्याच्या बातम्या आहेत. चीनमधे या व्हायरसने आजारी पडलेल्या आणि दगावलेल्यांच्या बातम्या भारतात येऊन धडकू लागताच आपल्याकडे टिपिकल "मेले साप-विंचू कुत्री-मांजरी काहीही खातात आणि मग आजारी पडतात" अशा स्वरूपाच्या टिपिकल प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या, आणि आपली जनता 'आपल्याला काय त्याचं' म्हणून आपापल्या कामाला लागली, आणि सद्ध्या बजेट-बजेट खेळायच्या मनस्थितीत आहे. तेव्हा या बातमीक्डे दुर्लक्ष झाल्यास नवल नाही.


© मंदार दिलीप जोशी
माघ शु. सप्तमी (रथसप्तमी), शके १९४१

(विस्तृत माहिती)

Monday, January 27, 2020

नक्षलवाद्यांवर पलटवार - गावकऱ्यांचा नक्षलवाद्यांवरच उलट हल्ला

मलकानगिरी (ओरिसा) - नक्षलवाद्यांच्या विकास विरोधी धोरणांनी चिडून ग्रामस्थांनी थेट नक्षलवाद्यांवरच हल्ला केल्याची घटना ओरिसा राज्यातील मलकानगरी जिल्ह्यातल्या जन्तराई नामक गावात घडली आहे.

या हल्ल्यात एक नक्षलवादी ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. मृत नक्षलवाद्याचे शव पोलीस निरीक्षक कार्यालयात तर जखमी माओवादी दहशतवाद्यावर जिल्ह्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जन्तराई गावात सुरू होणार असलेल्या नव्या रस्तेबांधणीला नक्षल दहशतवादी विरोध करत होते व रस्ता होऊ देऊ नये याकरिता गावकऱ्यांना धमक्या देत असत. हा रस्ता झाल्यावर गावकऱ्यांना फक्त सुखकर प्रवासच नव्हे तर आपल्या शेतमालाला वाजवी बाजारभाव व सरकारी योजनांचा लाभ मिळेल.

गावकऱ्यांना शुभेच्छा.

-----------------------------



मलकानगिरी (ओड़िसा) - नक्सलियों के विकास विरोधी होने पर ग्रामीणों का गुस्सा फूटा । ग्रामीणों ने माओवादियों पर किया हमला। हमले में एक केडर नक्सली की मौत , एक बुरी तरह घायल हो गया है मृत नक्सली का शव एसपी कार्यालय में और घायल का जिला अस्पताल में इलाज जारी ।मामला ओडिसा के मलकानगिरी जिले के जन्तराई गांव का । दरअसल यहां बन रही सड़क का नक्सली विरोध कर ग्रामीणों को चेतावनी दे रहे थे कि सड़क न बनाने दें । सड़क बनने से ग्रामीणों को न केवल यातायात की सुविधा मिलती बल्कि सरकारी योजनाओं का लाभ और अपनी फसल का सही दाम मंडी तक ले जाने से मिलता ।


#StopRedTerror #Naxalism #Maoism #Terrorism

Friday, January 10, 2020

अश्रू विकणे आहे


आपण भारतीय फारच संवेदनशील असतो आणि त्यामुळे आपल्याला भावुक करून टीआरपी वाढवणं हा सर्वभाषिक वाहिन्यांच्या हातचा मळ झालेला आहे.

सिनेमा नाटकात गरजच असते, पण हे लोण आता तथाकथित रिएलिटी शो पासून मुलाखतीपर्यंत सगळीकडे पसरलेलं आहे. पहावं तिथे रडारड. अगदी मास्टरशेफ सारख्या कार्यक्रमात सुदधा माझी आई/वडील, त्यांनी खाल्लेल्या खस्ता, आमची गरिबी, लोक मला कसे टोचून बोलत होते हो असं टँण टँण टँण ब्लाह ब्लाह ढसा ढसा अश्रूपात करत सुरू असतं.

मुलाखतीतल्या लोकांचं कार्यक्षेत्र आणि त्या मागचा प्रवास आणि त्यासंबंधीचे विचार या पुरता कार्यक्रम मर्यादित असेल तर यांना बहुतेक पैसे मिळत नसावेत, म्हणून ओढूनताणून अश्रू काढायचे प्रकार चालतात. त्यात मुलाखत देणारे लोक अभिनयक्षेत्राशी संबधित असतील तर आपल्याला त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाचं दर्शनही होतं. कहर म्हणजे मुलाखतीतल्या लोकांच्या भावनांच्या विहिरीला त्यांच्या दिवंगत आईवडीलांचे फोटो दाखवून किंवा तुम्ही त्यांना काय सांगाल अशा प्रश्नांचे रहाट लावून डोळ्यांतून अश्रूंचे पाट वहायला लावणे.

गंमत म्हणजे बऱ्याच लोकांना ते खरं वाटतं. रिएलिटी शो असो किंवा मुलाखत, अशा कार्यक्रमात जवळजवळ प्रत्येक वेळी सगळं सराव करून घेतलेलं अर्थात रिहर्स केलेलं असतं हो. प्रश्न सुद्धा आधी द्यावे लागतात, हे काही मोठं गुपित नव्हे.

सामान्य जनतेतील एखादा दमलेला बाबा आपली मुलं काय करत असतील या  वेळी शाळेत असा विचार करत असतो तर ऑफिसमधून येताना ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर एखाद्या आईचा अर्धा जीव पिल्लांपर्यंत पोहोचून तिचे डोळे पाणावलेले असतात. एखादी बहीण आपल्या भावाचा इंटरव्ह्यू आज नीट होऊदे अशी परमेश्वराकडे प्रार्थना करत असते तर एखादा भाऊ बहिणीच्या लग्नासाठी जुळवाजुळव करत असतो. एखादा मित्र आपल्या जायबंदी मित्राला ऑफिसात सोडायला वाट वाकडी करून आणि खिशाला खार लावून जातो तर कुणी आणखी काही करत असतं.

थोडक्यात, आम्हाला तुमची पाककला दाखवा, अभिनय दाखवा, खेळ दाखवा - हं त्या संदर्भातला संघर्षही दाखवा म्हणजे आम्ही काही शिकू त्यातून. बाकी रडारड आणि रोजच्या आयुष्यातला संघर्ष जनतेच्या पाचवीला पुजलेली आहे. त्याबाबतीत सामान्य लोकांकडून तुम्हीच शिकाल.

So please spare us the artificial sentimental overflow. तुमची रडारड तुमच्याकडे ठेवा.

🖋️ मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४१

Thursday, January 9, 2020

छपाकच्या निमित्ताने


तुमच्यापैकी अनेक जण जिहादींशी मैत्री ठेऊन आहेत. धक्का बसला? राग आला? पुन्हा सगळे तसे नसतात अशी टेप वाजवायची इच्छा होते आहे? आधी पुढचं वाचा.

लक्ष्मी अग्रवालवर ऍसिड फेकणारा नईम खान लक्ष्मीच्या भावाचा मित्र होता, लक्ष्मी नईमच्या बहिणीची मैत्रीण होती...आणि लक्ष्मीवर ऍसिड फेकण्यात मदत करणारी नईमच्या भावाची प्रेयसी होती.

लक्ष्मी १४ वर्षांची असल्यापासून ३१ वर्षांचा नईम तिने आपल्याशी शय्यासोबत करावी म्हणून तिच्या मागे लागला होता. एक वर्ष प्रयत्न करून थकल्यावर शेवटी नईम खानने त्याच्या मजहबी मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या मदतीने लक्ष्मीवर ऍसिड हल्ला केला. नईमच्या भावाच्या प्रेयसीने लक्ष्मीला बाजारात धरून खाली पाडलं आणि सोबतच्या तीन जिहादींनी मिळून तिच्यावर ऍसिड फेकलं.

आता दुसरा परिच्छेद पुन्हा वाचा.

काही शिकलात का यातून?

🖋️ मंदार दिलीप जोशी

Sunday, December 15, 2019

मोदीजी तुम्ही पडलात?

मोदीजी तुम्ही पडलात?

बरं, चालायचंच. शरीरच पडलं ना, वय होत चाललं आहे, शरीर कधी ना कधी दगा देणारच. ते पडलं तरी चालेल मोदीजी, विचारांत घसरण होता कामा नये. होय तर.

मोदीजी, ऐका. तुम्ही पडलात तर पडलात, पण ज्यांना तुम्ही अमुक करोड देशवासीयो म्हणून संबोधता ना, त्या असंख्य लोकांच्या आशाआकांक्षांना धक्का लागता कामा नये, ज्यांच्या लेखी मोदी हे नाव म्हणजे शेवटची आशा आहे.

१९४७ मधे धार्मिक आधारावर फाळणी झाल्यावर आपले अनेक लोक तेव्हापासून काही हलगर्जी राजकारण्यांमुळे शत्रूभूमीत अत्याचार सहन करत आहेत. सत्तर वर्षांनंतर तुमच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य दिसतंय. तुमच्या शरीराचा तोल गेला तर जाऊदे एक वेळ, पण या लोकांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य जाता कामा नये.

एक काळ असा होता की अनेकांनी नैराश्यापोटी काश्मीर आपल्या हातून गेलाय असा समज करून घेतला होता आणि तसं झालंही असतं. कारण तिथे न गवताचं पातं उगवत नाही म्हणून अक्साई चीनवर पाणी सोडायला हरकत नाही असे तारे संसदेत निर्लज्जपणे तोडल्याचे देशाने ऐकले आहेत. त्याच संसदेत तुम्ही ३७० ची तोडमोड करून देशाला विश्वास दिलात की आता खरोखरच देशाची एकही इंच भूमी शत्रूच्या ताब्यात जाणार नाही. मोदीजी, तुम्ही घसरून पडलात तर पडलात, तुमच्यावरचा भारताचा हा विश्वास डगमगता कामा नये.

मोदीजी, तुम्ही जेव्हा इंग्लंड, अमेरिका, इस्रायल, वगैरे देशांत फिरता ना, आणि जेव्हा तिथे लोक "मोदी, मोदी" म्हणून ओरडतात ना, तेव्हा आम्हाला "भारत, भारत" ऐकू येतं. आमच्यासारख्या कोट्यवधी लोकांना पूर्ण जगभर हाच "भारत, भारत" चा गजर ऐकायचा आहे. मोदीजी, तुम्ही पडलात तर पडलात, या गजराचा आवाज कमी होता कामा नये.

सभांच्या शेवटी तुम्ही लोकांना 'वंदे मातरम' आणि 'भारत माता की जय' म्हणायला लावता ना, शप्पथ सांगतो मनाला इतकं समाधान वाटतं की चला कुणीतरी आपल्या बापजाद्यांचा जयजयकार न करता देशाचा जयजयकार करतो आहे. कारण अमक्या तमक्याचा जय म्हटल्यावर काही लोकांच्या पूर्वजांचा जयजयकार डोळ्यांसमोर येतो,  पण भारत माता की जय म्हटल्यावर देशातल्या दरिद्रातल्या दरिद्री माणसापर्यंत सगळ्यांच्या पितरांचा जयजयकार होतो. हा जयजयकार थांबता कामा नये. मोदीजी, तुम्ही पडलात आणि क्षणभर थांबलात तरी चालेल, पण भारत मातेच्या सन्मानार्थ हात उंचावून जयजयकार करण्याची ही परंपरा थांबता कामा नये.
   
राजकारण, वैयक्तिक स्वार्थ, आणि पुचाट धोरणं यांच्यामुळे तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या हिंदूंना महत्प्रयासाने तुमच्या नावामुळे एकत्र येत आहेत मोदीजी.   तेव्हा तुम्ही पडलात तर पडलात, हिंदूंना जोडण्याच्या या प्रयत्नांत खंड पडता कामा नये.

काही लोकांना तुम्ही पडलेलं पाहून मजा येते आहे. भूतपूर्व राष्ट्रपती कैलासवासी श्री शंकर दयाळ शर्मा एकदा राजघाटावर एका कार्यक्रमाला गेले असताना चालता चालता पडले. मला स्पष्ट आठवतं आहे, टाइम्स ऑफ इंडियाने ते वृत्त छापताना कसे पडले याचे तीन टप्प्यातले तीन फोटो छापले होते. राष्ट्रपतींबद्दलचं हे वृत्त आणि तेही या पद्धतीने छापू नये याच तारतम्य इंग्रजांचे पिल्लू असलेल्या या वृत्तपत्राला नव्हते.

त्यावर एका वाचकाने टाईम्सला दिलेलं उत्तर सुद्धा, आमच्या तीर्थरूपांनी मोठ्याने वाचून दाखवल्याने, ठळकपणे लक्षात आहे. त्या वाचकाचे शब्द होते - It is not the President, but the Times of India which has fallen.

ही तीच लोकं आहेत ज्यांना तुमचं न थांबता धावणं आवडत नाही. पण आम्ही सांगतो मोदीजी, जोपर्यंत दुसरा मोदी निर्माण करायची धमक आमच्यात येत नाही तोवर तुम्ही धावत रहा, तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही.

मत दिलंय ना, मग तुम्हाला इतक्या सहजासहजी सोडणार नाही आम्ही. प्रत्येक मत वसूल करू.

पण एक सांगू का, काँग्रेसला शंभरदा हरवता येऊ शकतं पण वयाला, काळाला नाही ना हरवता येत. म्हणून जरा स्वतःची काळजी घेत चला.

अच्छा आजपुरतं पुरे.

©️ मंदार दिलीप जोशी, पुणे, महाराष्ट्र
©️ Sarvesh Kumar Tiwari, गोपालगंज, बिहार


आय बेग टू

खरं म्हणजे ज्यांना समजूनच घ्यायचं नाही, त्यांना काहीही आणि कितीही सांगितलं तरी उपयोग नाही. पण लाखातला एक जरी समजला, तरी पुरे म्हणून हे.

हे कव्हरिंग लेटर वाचा, विमा कंपनीच्या प्रतिनिधीने वीर सावरकरांना लिहिलेलं आहे. पॉलिसी पाठवत आहे, सोबतचा फॉर्म भरून पाठवा अशा आशयाचं हे पत्र. यातले "I beg to enclose" आणि "obliged" हे शब्द पहा. हे beg to याचा अर्थ भीक मागतो असा होत नसून, 'आपणांस विनंती करतो' या अर्थाचा इंग्रजीतून पत्र लिहिताना वापरायचा एक सामान्य शिष्टाचार आहे.

स्वातंत्रवीर सावरकर यांनी इंग्रज सरकारला लिहिलेल्या पत्रात माफीची भीक मागितल्याचा समज हा त्या काळात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी भाषेच्या अज्ञानामुळे, किंवा ज्ञान मिळवायची इच्छाच नसल्यामुळे करून दिला जातो.

संस्कृत येत नाही म्हणून एखाद्या पुस्तकाचा दु:स्वास करायचा आणि इंग्रजी पत्रलेखनाची शैली झेपत नाही म्हणून सावरकरांवर जळायचं आणि त्यांची बदनामी करू पहायची यात फार अंतर नाही. पण पिवळी पुस्तके वाचायची सवय असल्याने बुद्धीची झेप तेवढीच असणार.  किंबहुना, बुद्धीची झेप तेवढीच असल्याने फक्त पिवळी पुस्तकेच झेपत असणार.

आणि १९४८ पर्यंत सोशल मीडिया नव्हतं म्हणून चाळे खपून जायचे, आता लोक सोडणार नाहीत. तेव्हा पप्पूशेट, तुम्ही आपले थायलंडला जा सुट्टीवर आणि मस्त अंगप्रत्यंगास मसाज करून घ्या, कारण ताण आला की असं काहीतरी बरळत सुटता. हा मानसिक मसाज तुम्हाला झेपणार नाही.

#वीर_सावरकर

टीप: राऊत, ही माझी पोस्ट माझ्या नावासकट एकही शब्द न बदलता किंवा गाळता सामनात छापून दाखवा तर तुम्हाला मानलं.

©️ मंदार दिलीप जोशी

Monday, September 16, 2019

दिग्दर्शन म्हणजे काय

शिरीष कणेकर आपल्या फिल्लमबाजी या एकपात्री कार्यक्रमात म्हणतात, की कुठल्यातरी चित्रपटात माला सिन्हा पहिल्याच सीनमध्ये घागरच्या घागर भरून पाणी नेते, तर पुढे तिची आंघोळ का नाही दाखवली?" यातला विनोदाचा भाग सोडला तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. प्रसिद्ध रशियन लेखक अँटॉन चेकोव्ह याने आपल्या सहकाऱ्यांना लिहिलेल्या अनेक पत्रात एक उल्लेख आढळतो. तो म्हणतो की "नाटकाचा एक नियम असावा. पहिल्या अंकात जर तुम्ही भिंतीवर बंदूक दाखवलीत, तर तिसऱ्या अंकात तिचा बार उडालाच पाहिजे. नाहीतर बंदूक दाखवण्याचं प्रयोजन काय?"

लायसन्स टू किल या चित्रपटात जेम्स बॉण्डचा अमेरिकन सीआयएमधला मित्र फिलिक्स लाईटर आणि त्याची पत्नी डेला त्यांच्या लग्नात त्याला त्यांचं आणि त्याचं नाव कोरलेला एक सिगारेट लायटर भेट देतात. जेम्स बॉण्ड लगेच तो पेटवून बघतो तेव्हा त्यातून नेहमीच्या लायटरपेक्षा खूप मोठी आणि लांब ज्योत बाहेर फेकली जाते.

कुणाला अपाय होत नाही पण याचा संदर्भ पुढे सिनेमात कुठेही न आल्यामुळे आपण हे दृश्य जवळजवळ विसरलेलो असतो.

पुढे फिलिक्सने पकडलेला अंमली पदार्थांचा तस्कर अर्थात ड्रग स्मगलर सांचेझ हा डेलावर आपल्या माणसांकरवी बलात्कार करवतो आणि फिलिक्सला गंभीर जखमी करवतो.

याचा बदला म्हणून जेम्स बॉण्ड अर्थातच गुप्तरीतीने सांचेझच्या मागे लागून त्याचं साम्राज्य नष्ट करतो. शेवटच्या मारामारीत ड्रग्स मिसळलेल्या गॅसोलीनने म्हणजे रॉकेलने माखलेला सांचेझ जेम्सला मारायला कोयता सदृश्य शस्त्र उगारतो तेव्हा जेम्स त्याला विचारतो की मी हे सगळं का केलं हे तुला जाणून घ्यायची उत्सुकता नाही का? "Don't you want to know why?" हे ऐकून सांचेझ क्षणभर थांबतो. जेम्स खिशातून तोच सिगारेट लायटर काढून त्याला दाखवतो आणि त्यावरची नावं वाचून डोळे विस्फारलेल्या सांचेझला लायटर पेटवून त्यातून निघालेल्या मोठ्या ज्योतीचा वापर करून पेटवून देतो आणि तिथून निसटतो.

तर, लायटरमधली सर्वसाधारण लायटरपेक्षा कैक पटींनी मोठी असलेली ज्योत का दाखवली हे आपण केव्हाच विसरलेलो असतो, किंबहुना मठ्ठ सिनेमांवर पोसलेल्या आपल्या सिने-मनाला हा प्रश्नही पडत नाही. पण शेवटी याचं उत्तर मिळतं, नव्हे दिग्दर्शक आपल्याला देतो.

याला दिग्दर्शन म्हणतात.

©️ मंदार दिलीप जोशी

Sunday, June 2, 2019

जेम्स बॉन्ड - शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे काय रे भाऊ?

आपण जेम्स बॉन्डच्या प्रत्येक चित्रपटात पाहिलं असेल, की त्याचे आवडते पेय म्हणजे मार्टिनी. तो जिथे कुठे हे पेय घईल, ते देणार्‍याला म्हणजे सर्व करणार्‍याला तो फक्त एवढंच सांगून थांबत नाही. तो पुढे म्हणतो, "शेकन, नॉट स्टर्ड". याचं काहीही बोध न होणारं विनोदी मराठी भाषांतर म्हणजे "हलवून दे, ढवळून नको".

आता हे शेकन, नॉट स्टर्ड म्हणजे नेमकं काय? नक्की काय शेकवायचं...आपलं...हलवायचं असतं...आणि ते स्टर्ड म्हणजे ढवळायचं का नसतं? तर ते शेकन म्हणजे काय असतं ते आधी पाहू. मार्टिनी हा एक कॉकटेलचा प्रकार आहे. तर शेकन कॉकटेले एकात दुसरं मिसळून ढवळून चालत नाहीत. ती व्यवस्थित हलवून तयार करण्याकरता बाजारात पूर्णपणे स्टीलपासून बनवलेला एक खास 'शेकर' मिळतो. या शेकरचे एकूण तीन भाग असतात. तळाकडचा म्हणजे खालचा स्टीलचा मोठा कप असतो त्यात पेये घातली जातात. या भागाला दोन भागांचे असलेले एक स्टीलचेच झाकण असते. ते दोन भाग म्हणजे एक गाळणी आणि त्यावर असलेला एक स्टीलचा कप. आधी म्हटल्याप्रमाणे हा शेकर संपूर्ण स्टीलचा बनवलेला असल्याकारणाने ही चाळणी आणि कपही स्टीलचेच असतात.



जेम्स बॉन्डला जर त्याची लाडकी मार्टिनी शेकन करुन द्यायची असेल तर त्यात व्होडका आणि व्हर्मूथ (vermouth) अशी दोन पेये वापरावी लागतात. व्हर्मूथ म्हणजे ड्राय अर्थात चवीला कडूसर. व्हर्मूथ हा एक व्हाईट वाईनचा प्रकार असून त्यात साखर अगदी अत्यल्प असते. अशा या कडूसर व्हाईट वाईनमध्ये काही वनस्पतींचा अर्क उतरवला की व्हर्मूथ तयार होते. आपल्याकडे जसं एखादी रेसिपीत "मीठ चवीप्रमाणे" असं लिहीलेलं असतं तसं यातही चवीनुसार जास्तीची साखर घालतात. व्हर्मूथचे च्या अनेक ब्रॅण्डपैकी 'मार्टिनी' याच नावाचा व्हर्मूथचा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. तर त्याची कृती अशी, की एक 'मार्टिनी ग्लास' फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचा. मग एकास चार या प्रमाणात व्हर्मूथ व व्होडका घ्यायची...अंहं, एकत्र करायची नाही. पण यांचेही प्रमाण साधारण १४ मिली व्हर्मूथ आणि ५६ मिली व्होडका असे ठरलेले आहे. आता वर उल्लेख केलेल्या शेकरमधला कप भरून बर्फ घ्यायचा आणि त्यात व्हर्मूथ टाकायची. पण यात बर्फ आणि व्हर्मूथ एकत्र करणे हा उद्देश नसून त्या बर्फाला व्हर्मूथने 'ओले' करणे एवढाच आहे. त्यामुळे ताबडतोब कपावर गाळणी लावली जाते आणि ती व्हर्मूथ लगेच गाळली जाते. मग त्या शेकरमधल्या व्हर्मूथयुक्त बर्फात व्होडका टाकली जाते. आता गाळणीचे झाकण लाऊन मग शेकर पूर्ण बंद करून तो व्यवस्थित हलवायचा. म्हणजे उरलेले औषध संपवायला आपण त्यात पाणी घालून हलवतो तसे...ख्या ख्या. आता हे शेकलेले अर्थात शेकन अर्थात हलवलेले मिश्रण शेकरच्या गाळणीद्वारे त्या थंड केलेल्या ग्लासात गाळायचे. पुन्हा चवीकरता हवे असल्यास त्यात एक लिंबाचे साल टाकायचे.

झाली बॉन्ड साहेबांची 'व्होडका मार्टिनी, शेकन नॉट स्टर्ड' तयार!

'स्टर्ड' मार्टिनी तयार करताना फरक इतकाच की व्होडका शेकरमध्ये ओतली की हलवायच्या ऐवजी बारीकश्या चमच्याने थोडीशी ढवळली जाते. ती त्या थंड ग्लासात गाळली की झाली तयार 'मार्टिनी, स्टर्ड नॉट शेकन'!

पण जेम्स बॉन्डला शेकनच का लागते? स्टर्ड मार्टिनी तयार करण्याच्या कृतीचा आणि त्या पेयाची मजा घेण्याचा काय संंबंध? तर जेम्स बॉन्ड कोण आहे? तर गुप्तहेर. आता तो गावभर...आपलं....जगभर "बॉन्ड, जेम्स बॉन्ड" अशी ओळख देत बोंबलत फिरतो ते सोडा. तर, गुप्तहेराने नशा केली तर तो त्याचं काम कसं करणार? म्हणजे जिथे मार्टिनी मिळते अशा बारमधे किंवा हॉटेलात स्टाईलीत रुबाबात एन्ट्री तर मारायची असते, आणि तिथे आणखी शायनिंग मारत मद्यपान तर करायचं आहे, शिवाय नशाही हवी आहे, पण इतकीही नाही की झिंगून बेसावधपणा येईल - कारण त्याला त्याची कामगिरीही पार पाडायची आहे. पण मार्टिनी मूळ कशी तयार केली जाते, तर स्टर्ड अर्थात ढवळून. पण तसे केल्याने त्यातले अल्कोहॉलचे प्रमाण तसेच राहते. आता हे एका गुप्तहेराला कसे चालणार? म्हणून जेम्स बॉन्डला मार्टिनी शेकन हवी असते. वर दिलेल्या कृतीप्रमाणे हलवल्यामुळे कॉकटेलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते, कारण हलवल्याने बर्‍यापैकी अल्कोहोल उडून जाते. त्यामुळे जेम्स बॉन्डला अपेक्षित न झिंगता नशा येऊन ताजेतवानेपणा आणणारे पेय तयार होते.

शॉन कॉनरी, रॉजर मूर, जॉर्ज लेझनबी, टिमथी डाल्टन, पिअर्स ब्रोस्नन यांनी ही शेकन नॉट स्टर्डची परंपरा सुरु ठेवली होती. डॅनियल क्रेगचा बॉण्ड मात्र कॅसिनो रॉयॅल (२००६) मधे जुगाराच्या एका टप्प्यात कोट्यावधी डॉलर हरल्यावर जेव्हा वेटर त्याला "सर, शेकन ऑर स्टर्ड?" असं आदबीने विचारतो, तेव्हा सटकून म्हणतो "डू आय लुक लाईक आय गिव्ह अ डॅम?"

असं करु नकोस बाबा, आम्हाला आपलं तू विचारल्यावर "शेकन नॉट स्टर्ड" असंच म्हणत जा रे.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ १४, शके १९४१

Friday, May 31, 2019

मी आणि तो

मी गेलो उत्साहाने त्याच्या इफ्ताराला
तो मला संपवण्या ज़कात झोळीत घालत होता

पाहून त्याला क्रूसावरती डोळां आले पाणी
तोच क्रूस घालण्या गळ्यात संधी शोधत होता

मला वाटले इश्काला नसतो मजहब काही
तो शीर माझे धडावेगळे उंच उडवत होता

मी समजलो प्रेमात कसला रिलिजियन बंधू
बंबात घालुनी लव्ह माझे तो हासत होता

पोसले साप ते कसे निघावे शाकाहारी
तो अजगर निधर्मांध मजला गिळत होता

©️ मंदार दिलीप जोशी

Thursday, May 23, 2019

पुन्हा एक वार, आलं मोदी सरकार !

मी काही काळापूर्वी एक पोस्ट टाकली होती त्यात म्हटलं होतं की माझं प्राधान्य हिंदुत्व व हिंदुत्वाधारित विकास आहे. पुढे म्हटलं होतं त्याचा भावार्थ असा होता की जरी असं असलं तरी पूर्ण विचारांती मी याच मतावर पोहोचून ठाम आहे की पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्व व विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने निर्णयप्रक्रिया व वेग इत्यादी परिप्येक्ष्यांतून पूर्ण बहुमताने निवडून आलेले भाजप सरकार हाच २०१९ला योग्य आणि एकमेव पर्याय आहे.

या पाच वर्षात मला काय मिळालं, हा विचार माझ्या मनाला कधीच शिवला नाही. माझे जवळचे आणि कुटुंबियांना चांगलंच माहीत आहे की एखाद्या गोष्टीची सत्यता आणि देशासाठी असलेलं महत्त्व पटलं की खिशाला खार लाऊन आणि आपला वेळ खर्च करुनही मी अनेक गोष्टी करतो. त्यामुळे मोदींनी माझ्या खिशात किती पैसे टाकले हा विचार मी करत नाही, करणार नाही.

तरीही एक सांगू इच्छितो. प्रधानमंत्री आवास योजना, आयुषमान योजना यातून सहाय्यता मिळालेले माझ्या जवळच्या मित्रपरिवारात, सहकर्मचार्‍यांत, आणि वैय्यत्तिक ओळखीत आहेत. एक लक्षात घ्या, हा फक्त पैसा नाही. पैसा काय सगळ्यांनाच हवा असतो, मलाही तुम्हालाही. पण जेव्हा आत्यंतिक गरज असताना मदत मिळते तेव्हा त्याची किंमत ही आभाळाहून जास्त असते. एक रुपया मदत पाठवली तर त्यातले जेमतेम पंधरा पैसे लाभार्थींपर्यंत पोहोचतात हे दिवस आपण बघितलेले असताना आता तो आख्खा रुपया थेट लाभार्थींच्या खात्यात, मग ते शहरी असोत किंवा शेतकरी, पोहोचणारे दिवस आपण बघत आहोत याचं श्रेय निर्विवादपणे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनाच जातं.

या परिप्येक्षातून आयकर रिटर्न्स भरणार्‍यांच्या संख्येत या पाच वर्षात भरीव वाढ झालेली आहे या गोष्टीकडे बघणे गरजेचे आहे. सामान्यतः मेहनतीने पैसा कमावणार्‍या जनतेला कर द्यायला हरकत नसते, पण त्या पैशाचं पुढे काय होतं किंवा कररूपी पैसा योग्य ठिकाणी खर्च होतो की नाही याची चिंता त्याला अधिक असते. हां, सरकारचा दट्ट्या असतोच, पण जबरदस्तीपेक्षा सरकारप्रती असलेला विश्वास हा अधिक प्रभावी ठरतो. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी हा विश्वास देशाच्या जनतेत रुजवल्यामुळे लोकांची कर भरण्याकडे कल वाढत चालला होता, आणि त्याचीच परिणिती रिटर्न्स वाढण्यात झाली.

हिंदुत्वाचं म्हणाल तर मुळात तुमच्यातच एकी नसेल तर मोदी काय "गुंडाळून ठेवतो मी संविधान, लगेच हिंदूराष्ट्र घोषित करतो, आणि धरुन हाणतो म्लेंछांना आणि यवनांना" असं म्हणावं अशी अपेक्षा आहे का? त्यांच्यावर किती आणि कसा दबाव आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? एखादी योजनेसाठी चार कागद लागत असतील तर म्लेंच्छ आठ घेऊन पोहोचतो, प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जाऊन योजनेची सगळी माहिती घेतल्यावर. आणि हिंदू घरी बसून मला काहीच कसं माहीत नाही, मोदींनी पोहोचवली का नाही माहिती अशी किरकिर करतो. भांडण झालं की पाच मिनिटात शंभर लोक गोळा करण्याची क्षमता तुमच्यात आहे का? नसेल तर आधी निर्माण करा आणि मग मोदी अमुक का करत नाहीत आणि तमुक का करत नाहीत याच्या चर्चा करा.

दुसरी गोष्ट, आजवर ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं "Wearing your Dharma on your sleeve" असं  कुणी केल्याचं स्मरतं का? निवडणुका असो किंवा नसो, सातत्याने भगवी वस्त्रे आणि स्थानिक वेषभूषा करुन देवदर्शनाला जाणारा पंतप्रधान कुणी बघितला होता का? हिरव्यांची जाळीदार टोपी घालायला नकार देणारे मोदीजी आवर्जून कुठलीही निवडणूक नसताना स्वतः गंगा आरती साठी जाताच, पण सोबतच्या परदेशी पाहुण्यांनाही घेऊन जातात. उघडपणे हिंदू संस्कृती व धर्माबद्दल आदर व्यक्त करतात. हिंदू संस्कृतीचा अविभाज्य अंग असलेला योग आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिवस म्हणून साजरा केला जाण्याचं श्रेय कुणाला याचा विचार हिंदूंनी अवश्य करावा. निवडणुका आल्यावर राजकारणाचा भाग म्हणून आपले ख्रिस्ती आणि पारशी मूळ लपवून आपण जानवेधारी हिंदू असल्याचं सांगत देवळादेवळातून हिंडणार्‍या आणि नंतर ते सोंग साफ विसरणाऱ्या राहुल गांधीच्याच इटालियन मोतोश्रींनी हिंदूंच्या मुळावर येणार्‍या आणि हिंदूंच्या सत्यानाशाचे थेट कारण ठरणारा कायदा करण्याचं ठरवलं होतं, हे हिंदूंनी विसरू नये. हा विषय मोठा आहे, विस्तृतपणे पुन्हा केव्हातरी बोलू .

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन गळे काढणार्‍या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या बायकोची आणि आईची काहीही तक्रार नसताना आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या दोघीही राजकारणात नसताना अकारण प्रत्येक वादात त्या दोघींना ओढलं तेव्हा मोदींनी एक चकार शब्द काढला नाही. पण माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या भ्रष्टाचाराचा विषय काढल्यावर राहुल गांधी यांना ते आपले पिताजी असल्याची आठवण झाली आणि त्यांनी पुन्हा मोदींच्या कुटुंबियांबद्दल उद्गार काढले. बारा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री आणि पाच वर्ष देशाचे पंतप्रधान असताना इतर कुणाच्या घरच्यांनी महाल बांधले असते. पण नरेन्द्र दामोदरदास मोदी हा इसम खरंच वेडा म्हटला पाहीजे, कारण या सतरा वर्षात त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या पदाचा एक रुपयाही अनुचित फायदा झालेला नाही. या उलट उत्पनाचं काही साधन नसताना राहुलच्या इटालियन मम्मीची संपत्ती इंग्लंडच्या राणीशी स्पर्धा करतानाही दिसली. या पार्श्वभूमीवर स्वतःच्या बचतीतली मोठी रक्कम जो माणूस सरळ दान करुन टाकतो, अशा माणसाला वेडा नाही तर काय म्हणावं? आधी केले, मग सांगितले ही म्हण या बाबतीत स्वतः जगत आहेत हे सगळा देश उघड्या डोळ्यांनी बघत होताच.

संरक्षणाच्या बाबतीतही मोदींनी देशाला नाराज केलं नाही. आधी पाकिस्तानात शरीफ महाशयांची अचानक भेट घेऊन टीकेचे धनी झालेले मोदी हे टीकाकारांना कळलेच नाहीत असे म्हणावे लागेल. नंतर पाकिस्तानची कशी ठासली हे सगळ्यांना ठाऊकच आहे. राफेल खरेदीत विरोधकांनी अनेक अडथळे आणूनही मोदी डगमगले नाहीत. आता मात्र ते लवकर पार पडावं ही इच्छा.

या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रवाद हा होता. हा एक शब्द नव्हे, राष्ट्रवादात राष्ट्र सर्वप्रथम, विकास, प्रगती, संरक्षण या सगळ्या गोष्टी येतात. ज्या राष्ट्रवादाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, त्या वृत्तीच्या थोबाडीत मारणारा हा निकाल आहे. क्रिकेटचा सामना असूनही तो सोडून अनेक लोकं लोकसभा टीव्ही लोक बघत बसायचे हा आणखी एक मोठा बदल आपण बघितला.

मी काही राजकीय विश्लेषक नाही, तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे. त्यामुळे या लेखनात अनेक तृटी असू शकतात, त्याबद्दल आधीच क्षमस्व. आणखी बरंच आहे बोलण्यासारखं, लिहीताही येईल, पण सद्ध्या जरा भावुक झालोय. २०१४ पेक्षा आताच्या निवडणुकीत मोदी सरकार यावं याबद्दल भावना तीव्र होत्या, त्या अपेक्षा पूर्ण झाल्याने डोळ्यांत आनंदाश्रू आहेत. आतापर्यंत बरंच लिहिलं, बरंच वाचलं, बर्‍याच चर्चा केल्या. यापुढेही हे होईलच, पण तूर्तास सद्ध्या आपला निरोप घेतो. आता वाट पाहूया "मैं नरेन्द्र दामोदरदास मोदी, इश्वर को साक्षी रखके शपथ लेता हूं कि...." हे शब्द कानावर पडण्याची.

समारोप करतो या प्रार्थनेने:

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे, त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता, इमे सादरं त्वां नमामो वयम्।
त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम्, शुभामाशिषं देहि तत्पूर्तये॥

अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्, सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्।
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गम्, स्वयं स्वीकृतं नः सुगंकारयेत्॥

समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्, परं साधनं नाम वीरव्रतम्।
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा, हृदन्तः प्रजागर्तु तीव्राऽनिशम्॥

विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्, विधायास्य धर्मस्य संरक्षणम्।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रम्, समर्था भवत्वाशिषा ते भृशम्॥

भारत माता की जय ! जय श्रीराम !

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ. पंचमी शके १९४१

Friday, May 17, 2019