Showing posts with label विनोदी लेख. Show all posts
Showing posts with label विनोदी लेख. Show all posts

Sunday, August 28, 2016

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस खुले पत्र

माननीय सर्वोच्च न्यायालय व आदरणीय मुख्य न्यायाधीश सी जे ठाकूर यांस,

सप्रेम नमस्कार पी.आय.एल. विशेष

पत्र लिहिण्यास कारण की गणेशोत्सव जवळ आला आहे व हल्ली तुमच्या परवानगीशिवाय देशात काहीही होत नसल्याने हे काही प्रश्न:

१) घरी गणपती आणू की नको? आमच्याकडे सद्ध्या दीड दिवस गणपती असतो. दुसर्‍या दिवशी मधलाच वार असल्याने यंदा सुट्टी काढावी लागलेली आहे. राष्ट्रहिताविषयी तुमची तळमळ लक्षात घेता गणपती आणणे रद्द करावे व एक दिवस राष्ट्राच्या उभारणीसाठी फुकट घालवू नये की कसे या विषयी आपले यंदा काय निर्देश आहेत?

२) गणपती किती दिवस आणू? दीड/५/७/११/२१?

३) गणपती आणताना व विसर्जन करावयास नेताना आम्ही आमची खाजगी चारचाकी वापरतो. यंदाही तीच वापरली चालेल का? की गणेशोत्सवात चारचाकी मोठ्या प्रमाणात वापरल्याने प्रदूषण खूप होते असे आपले मत आहे? तसे असल्यास दुचाकी वापरली चालेल का?
३) अ) दुचाकी वापरल्यास त्यावर दुचाकी चालवणारा व मागे गणपती (आणि जीव मुठीत) धरुन बसणारा अशा दोन व्यक्ती चालतील का? की सोबत गणपती आहे म्हणून ते तीन धरले जाऊन दंड होईल? मग गाडी चालवणार्‍याने गणपतीला पाठुंगळीला बांधून बसावे असे आपले निर्देश आहेत काय?
३) ब) चारचाकी वापरणे चालणार असल्यास प्रश्न क्रमांक ३ उपप्रश्न अ प्रमाणे चालक धरुन पाच माणसे बसलेली चालतील की फक्त चार जणांनी बसून गणपतीला चालकाच्या बाजूला सीटबेल्ट लावून बसवावे? यासंदर्भात आपले निर्देश काय असणार आहेत?
३) क) गणपती आणण्यात व विसर्जन करायला जाताना दुचाकीवरुन जाणार्‍या मर्त्य मानवांबरोबरच गणपतीलाही हेल्मेट घालणे गरजेचे असेल का? कारण आम्हा मागासलेल्या हिंदूंमधे प्राणप्रतिष्ठापना होण्याअगोदर मूर्तीत प्राण नसतात व उत्तरपूजा झाल्यावर तो पार्थीव होतो त्यामुळे त्याला हेल्मेट घालणे गरजेचे नसावे. तरी पण आपण म्हणालात तर घालतो. काय करावे त्या सूचना आपण द्याव्यात ही विनंती.

४) गणपती किती उंच चालेल? आम्ही नेहमी १२ इंचाचा आणतो. कारण आमच्याकडे तेवढ्याच उंचीची मूर्ती मावेल एवढाच मीठा लाकडी देव्हारा आहे. यंदाही १२ इंचाचा चालेल की कमी करू?

५) नैवैद्य म्हणून केल्या जाणाऱ्या मोदकांचा परीघ व उंची किती असावी?
५) अ) प्रतिमोदक किती ग्रॅम साखर व नारळ वापरले जावेत?

६) गणेशोत्सवात प्रत्येक घराला किती किलो तुप वापरावयाची परवानगी आहे? त्यासंदर्भात आपण नि:संदिग्ध निर्देश देणार आहात काय?

७) प्रत्येक आरतीच्या वेळी किती आरत्या म्हटल्या जाव्यात? आमच्याकडे जुनाट, बुरसटलेल्या प्रथेनुसार अर्थातच गणपतीच्या आरती पासून सुरवात करुन मग देवीची, शंकराची, रामाची, मारुतीची, विठ्ठलाची, दत्ताची, आणि शेवटी घालीन लोटांगण अशा आरत्या म्हटल्या जातात. या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालतील का? की नेहमीच्या पूजेत आम्ही फक्त गणपती, देवी, असं म्हणून घालीन लोटांगण घालतो तसं घातलेलं चालेल? की गणेशोत्सव आहे म्हणून फक्त गणपतीचीच आरती म्हणावी?
७) अ) या सगळ्या आरत्या म्हटलेल्या चालणार असतील तर आरत्या म्हणण्याचा क्रम काय असावा? त्याच क्रमाने यंदाही म्हटल्या चालतील का? आपण क्रम ठरवून दिल्यास सोपे पडेल.
७) ब) यात देवीची म्हणजे महिषासुरमर्दीनीची आरती म्हणावी की वगळावी? की म्हटल्याने महिषासुरसमर्थकांच्या भावना दुखावतील का? या संदर्भात दिल्ली व जे.एन.यु परिसर व उर्वरित भारत यांच्या साठी आपण वेगवेगळे निर्देश देणार का?

८) आरत्या म्हणताना त्यात किती जण असावेत?

९) आरत्या म्हणताना आवाजाची पातळी किती असावी म्हणजे शेजार्‍यांना आवाजाचा त्रास होणार नाही?
९) अ) त्या संदर्भात आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असल्यास डेसिबल मापक यंत्र सरकारने जनतेला सवलतीत उपलब्ध करुन द्यावे असे निर्देश आपण द्यावेत अशी नम्र आणि लोटांगण घालून विनंती.

१०) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची संख्या किती असावी?
१०) अ) सहस्त्रावर्तने करताना जमलेल्या व्यक्तींची जातीनिहाय विभागणी काय असावी? उदाहरणतः समजा १० व्यक्ती जमल्यास त्यापैकी किती तथाकथित उच्चवर्णीय, अनुसूचीत जातीजमातीचे, आर्थिकदृष्ट्या मागास, दलित, महादलित, वगैरे असावेत? या संदर्भातल्या आपल्या निर्देशांची वाट बघत आहे.

११) दुसर्‍या दिवशी जेवायला आमच्याकडे ब्राह्मण बोलावण्याची पद्धत आहे. ते बोलवावेत काय? की आम आदमी पक्षाच्या तिहार मधल्या एखाद्या आमदार किंवा कार्यकर्त्याला बोलवावे?

१२) पूजेसाठी दुर्वा आणल्या चालतील की तो वृक्षतोडीच्या कसल्याशा कायद्याखाली गुन्हा ठरवण्याचा आपला मानस आहे?

भारतातल्या न्यायालयांसमोर साडेतीन कोटी खटले प्रलंबित असल्याचे मध्यंतरी वाचले. काय लोक असतात? आपल्याकडे न्यायाधीशांची संख्या लक्षात घेऊन कुणी खटले दाखल करतच नाही. लोकांना फार हौस कोर्टाची पायरी चढण्याची. आजोबांच्या वेळेपासून सुरू झालेले दिवाणी दावे नातू मरायला टेकला तरी निकाली लागत नाहीत हे माहित असताना न्यायव्यवस्थेवरचा ताण लक्षात न घेता वकील आणि न्यायप्रक्रियेवर खर्च करण्याची लोकांची हौस जिरत नाही हे खरंच. ती आपण जिरवाल ही खात्री आहे. पण अशा कोट्यावधी दिवाणी आणि फौजदारी खटल्यांसारख्या अनावश्यक आणि सटरफटर खटल्यांकडे लक्ष न देता आपण नालायक आणि रिकामटेकड्या हिंदूंचे सण व प्रथा यांच्याकडे लक्ष देत आहात हे नि:संशय प्रशंसनीय आहे. वर्षानुवर्ष चालणार्‍या व न्यायाधिशांच्या डोक्याची मंडई करणार्‍या या यडचाप खटल्यांपेक्षा पटकन निर्णय देऊन आटपता (आणि रिकामटेकड्या हिंदूंना आपटता) येतील अशा दिवाळीचे फटाके, जलीकट्टू, होळीचे पाणी, दहीहंडीची उंची, विविध जत्रांच्या वेळी दिले जाणारे कोंबड्यांचे बळी, तसेच आता गणेशोत्सव कसे साजरे करावेत याकडे आपण दिलेले लक्ष हे खरेच कौतुकास्पद आहे.

या संदर्भात मुख्य न्यायाधीश म्हणून आपण पुढाकार घेतच आहात तर मला व माझ्या काही समविचारी मित्रांना वरील प्रश्न पडले आहेत त्या संदर्भात आपण स्पष्ट निर्देश द्यावेत जेणेकरून आम्हाला खाजगी गणेशोत्सव नियमानुसार व सर्वोच्च न्यायालयसंमत अशा पद्धतीने साजरे करता येतील अशी आपल्याला नम्र व साष्टांग नमस्कार घालून विनंती.

आपला नम्र,
© मंदार दिलीप जोशी

ता. क. संघी पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी हे रीतसर निवडणूक लढवून लोकनियुक्त सरकार तुमच्या मर्जीशिवाय चालवतात म्हणजे काय? त्यांचे ऑडिट तातडीने होणे आवश्यकच आहे. त्यासाठी जनमताचा कौल घ्यायला २०१९ पर्यंत थांबण्याची काय गरज? ते लगेचच करायला पायजेल आहे. (सॉरी बारामतीशेजारच्या पुण्यात राहत असल्याने पटकन ती भाषा तोंडात आली.) शिवाय तुम्हाला फालतू प्रक्रीयेतून न जाता जाहीर कार्यक्रमांना हजेरी लावून न्यायालयासमोरच्या प्रश्नांना वाचा फोडायचे महत्त्वाचे काम आहेच, तिथे आपण कार्यक्रमांची शोभा (डे नव्हे) वाढवायला जालच. ते आटपले असल्यास आमच्या वरील प्रश्नांसंदर्भात आपण सहानुभूतीने विचार करुन निर्देश द्याल ही खात्री आहे.

Saturday, May 22, 2010

राँग नंबर

वेळः कै च्या कै. राँग नंबरला वेळ असते का? साधारण आपला आराम करायची वेळ असते तेव्हाच लोकांना हवे असलेले बरोबर नंबर राँग लागतात. उदा. रविवार पहाटे आठ. हो, बरोबर वाचलंत तुम्ही. पहाटे आठ. रविवारी ह्या वेळेला पहाटच असते की.

फोन: आमचा लँडलाईन


















राँग नंबर (१) - करंबेळकर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
एक स्त्री: "हॅलो, करंबेळकर का?"
मी: "नाही, राँग नंबर"
स्त्री: "ओह, सॉरी हां"

काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर आहेत का?"
मी: "नाही, राँग नंबर"
बुवा: "बर्र बर्र बर्र, सॉरी, मग कुणाचा आहे हा?"
मी: "तुम्हाला करंबेळकरांशी बोलायचंय?"
बुवा: "हो"
मी: "हे त्यांच घर नाही"
बुवा: "मग कुणाचं आहे"
मी: "माझं आहे"
बुवा: "तुम्ही त्यांचे शेजारी का?"
मी: "नाही, या नावाचं कुणीच ह्या इमारतीत राहत नाही"
बुवा: "अरे बापरे, सॉरी हां"

पुन्हा काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पुन्हा तीच स्त्री: "करंबेळकर आहेत का?"
मी: "नाहीत"
स्त्री: "कुठे गेलेत?"
मी: "माहीत नाही. आम्ही त्यांना ओळखत नाही. राँग नंबर"
स्त्री: "ओह हो! राँग नंबर लागला परत!! सॉरी अगेन हां"

मागल्या पानावरून पुढे.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर का हो?"
मी: "नाही हो"

अनेकदा असे फोन आल्यामुळे एव्हाना मी जवळ जवळ रडकुंडीला आलो होतो.
कारण पलीकडून...बुवा (बहुतेक बायकोला उद्देशून): "हें, हें, हें, अगं परत 'तिथेच' फोन लागला"

मी: "करंबेळकरांचा नंबर काय आहे?"
बुवा: "अमुक अमुक"
मी: "हा नंबर बरोबर आहे, पण इथे करंबेळकर नक्की राहत नाहीत"
बुवा (बायकोला उद्देशून): "अगं, एकदा मिसेस. करंबेळकर आहेत नं, त्यांना सरळ पत्रच पाठव"
(मला उद्देशून): "सॉरी हं"

पुढचे अनेक दिवस हे दोघं, जे नक्की नवरा-बायको असावेत, सारखे आळीपाळीने फोन करत होते. बरं ते प्रत्येक वेळी अत्यंत सौजन्याने बोलत आणि राँग नंबर आहे हे समजलं की तितक्याच नम्रतेने सॉरी म्हणत, त्यामुळे त्यांच्यावर मनसोक्त वैतागताही येत नव्हतं. त्यांनी माझं आणि मी त्यांचं नाव विचारण्याची तसदी घेतली नव्हती. आम्ही 'करंबेळकर' ह्या एकाच 'धाग्याने' बांधले गेलो होतो! मी तर त्यांना सरळ काका-काकू म्हणू लागलो होतो. एव्हाना त्या दोघांनाही माझा आवाज माहीत झाला होता बहुतेक, कारण पुढच्या वेळी:

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
काकू: "हॅलो, राँग नंबर बोलताय का?"



~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (२) - यासीन भाई

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो, बोला"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
मी: "काSSSSय?"

मी प्रचंड दचकलो, चुकून जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या यासीन मलिकचा फोन माझ्या घरी लागला की काय? किंवा एखाद्या भाईचा फोन असावा काय? पण मी व्यावसायिक नाही आणि चित्रपटश्रुष्टीत नाही आणि बिल्डर तर नाहीच नाही. तेव्हा मला फोन करून जो कोण भाई असली कामं करतो त्याचे फोनचे बिल वाढून त्याचेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचं लक्षात आलं आणि जीव भांड्यात पडला. तरी म्हटलं एकदा खात्री करुन घ्यावी.

पलीकडून: "हॅलो, हॅलो, यासीन भाई है क्या?"
मी: "यासीन कौन"
पलीकडून: "यासीन शेख तारवाला"
हे आडनावाच्या शेवटी "वाला" असलेल्यांची एक गडबड असते. त्यांचं ते आडनाव आहे की धंदा समजत नाही. असो. विषयांतर नको.

मी (मनातल्या मनात, "मग ठीके"): "राँग नंबर"
पलीकडून दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

साधारण आठवड्याभराने एके दिवशी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई को बुलाव"
च्यामारी, मी काय ह्याच्या तीर्थरूपांचा....नाही, त्याला काय म्हणतात उर्दूत? हां, आठवलं, वालीद साहेबांचा नोकर असल्यासारखा मला हुकुम देत होता.
मी (साहजिकच चिडून): "नहीं बुलाउंगा"
पलीकडून: "कायकू?"
मी: "राँग नंबर"
पलीकडून आधीपेक्षाही दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

आणखी काही दिवसांनी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई कैसे हो?"

अरेच्च्या! आता हा तर आपण यासीन भाईशीच बोलत असल्याचं गृहीत धरून हा सुरु झाला की.

मी: "हॅलो, मै यासीन भाई नहीं है"
पलीकडून: "तो वो किधर है?"
मी: "मालूम नै"
पलीकडून: "कायकू मालूम नै?"
मी: "ये राँग नंबर है"
तो माणूस पब्लिक फोनवरून बोलत असावा, कारण याखेपेला फोन ठेवल्याचा इतका मोठा आवाज झाला की त्या फोनची नक्की शकलं झाली असणार.

असेच काही दिवसांच्या अंतराने फोन येत गेले. आता मी पुरता वैतागलो होतो. त्यामुळे पुढच्या वेळी फोन आला की ह्या म्लेंछांच्या अवलादीची पुरती फुलटू करायची असं ठरवलं.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
ह्म्म्म, आत्ता कसा सरळ बोलतोय.
मी: "नहीं"
पलीकडून: "किधर गये है?"
मी: "उपर"
पलीकडून: "तो निचू बुलाएंगे क्या?"
मी (आवाजात पुरेसे कारुण्य आणून): "उपर मतलब उपर नै"
पलीकडून: "उपर मतलब उपर नै? मतलब?"
मी (आणखी कारुण्य): "आपको मालूम नै क्या? कमाल है!"
पलीकडून: "क्या हुवा?"
मी: "यासीन भाई तो चार दिन पहले ही अल्ला को प्यारे हो गये"
पलीकडून: "आँ"
ह्या वेळी मीच आधी फोन ठेवला.
या नंतर मात्र मला या माणसाचा पुन्हा फोन आला नाही.


<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

राँग नंबर (३) - फूड कॉर्नर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर?"
मी: "काय कोरणार?"
पलीकडून: "कोरणार नाही हो, फू-ड कॉ-र-न-र"
मी: "नाही, राँग नंबर"
पलीकडून: "अरे" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो ये कहांका नंबर है?"
मी: "घर का है"
पलीकडून: "किसके घर का?"
मी: "मेरे"
पलीकडून: "आप फूड कॉर्नर के मालिक है क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो कायको मेरा टाईम वेस्ट किया?"
मी: "आपने किया मेरा टाईम वेस्ट"
पलीकडून: "क्या आदमी है" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

असेच फोन नियमितपणे येत गेले. कधी कधी एकच ग्राहक परत परत फोन करायचा. एक्स्चेंज मध्ये तक्रार करा सांगून काही फायदा झाला नाही. शेवटी मी त्या यासीन शेख साठी वापरलेली कल्पना वेगळ्या तर्हेने वापरायची ठरवली. आणखी काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: ""हॅलो, छे अंडे और ब्रेड भेज दो"
च्यामारी, हे जास्त होतंय. असो. मी सरळ ऑर्डर घ्यायला सुरवात केली.
मी: "किधर"
पलीकडून: "D-8 में भेज दो, कितना टाईम लगेगा?"
मी: "आधा घंटा"
पलीकडून: "आSSSधा घंटाSSS, ज्यादा से ज्यादा दस मिनिट में चाहिये"
त्या बाईने इतका मोठा हेल काढला की मला वाटलं हिला दहा मिनिटात अंडी नाही मिळाली तर हृदयविकाराचा झटका वगैरे येतो की काय!
मी: "ठीक है, भेज देता हुं" (पाठवतोय मी, घंटा! बस बोंबलत)

अशा दहा पंधरा ऑर्डर घेतल्यावर एकदा फूड कॉर्नरच्या मालकाने फोन केला. त्याला आमचा नंबर कसा मिळाला आणि आम्ही कोण कसं समजलं देव जाणे. त्याला बहुदा वाटलं त्याच्या शेजारी एक दुसरं फास्टफूड दुकान उघडलं होतं त्याचे आम्ही मालक. शेवटी सगळं रामायण सांगितल्यावर त्याने सरळ चक्क फोन नंबर बदलला आणि आमचा त्रास संपला.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (४) - कोण बोलतंय?

हा एक अशक्य प्रकार आहे. अशा फोनना इलाज नसतो. ते एकाच माणसाकडून सारखे सारखे येत नाहीत. तेव्हा त्यातला एक गावरान छाप किस्सा सांगून लेखाचा समारोप करतो.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "कोन बोलतंय?"
मी: "तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "अवो पन तुमि कोन बोलतायसा?
मी: "अहो आधी तुम्ही सांगा तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "तुजा मुडदा बशिवला, हिरामनला बलिव आधी"
मी (घरचे आजूला बाजूला असल्याने संयम राखत): "अहो, तोंड सांभाळून बोला, हा हिरामणचा नंबर नाही"
पलीकडून: "य्ये, त्ये ठाव हाय आमास्नि, त्या मुडद्याकडं चड्डी नाय सवताची, फुन काय ठेवनार XXXXचा? बोलाव त्याला."
हा माणूस स्मशानात पावती फाडण्याच्या कामाला असावा नाहीतर प्रेतागारात, जिवंत माणसांना संबोधताना सुद्धा सारखा 'हा मुडदा' 'तो मुडदा' करत होता.

याही वेळी मीच फोन ठेऊन दिला.

इति राँग नंबर कहाणी सुफळ संपुर्ण

पी.एम.टी. उर्फ पुण्याची ऐश्वर्या राय

ह्या विनोदी लेखात उल्लेख केलेल्या घटना मी पुणेकर नव्हतो आणि अधून-मधूनच पुण्यात येणे व्हायचे तेव्हाच्या आहेत.




बर्‍याच वर्षांपूर्वी काही कामानिमित्त मला पुण्याला यावं लागलं. मंगेश तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं तर जिला 'पुण्याची ऐश्वर्या राय' म्हणतात ती पी.एम.टी. ची बस हिच्याबद्दल मी काही-बाही ऐकून असल्याने मामाकडे औंधला जाण्यासाठी कॉर्पोरेशन पर्यंत साधी रिक्षा करून मग शेअर रिक्षाने औंध गाठावे असा विचार करत होतो. पण स्वारगेटला उतरल्या उतरल्या समोरच औंधची बस दिसली आणि मोह आवरता आला नाही. "चला सुटलो, आता मेंढरासारखे कोंबून शेअर रिक्षात बसायला नको," मला पटकन वाटून गेलं. त्याच आनंदात मी झटकन बसमध्ये शिरलो आणि मला चालकाशेजारची जी सिंगल सीट असते ती मिळाली. एक तर पुण्यात लगेच बस मिळणे आणि चक्क बसायला जागा आणि तीही आवडती जागा मिळणे हा एक दुग्धशर्करा (च्यामारी दोन्ही महागलंय हल्ली. त्या शरद पवाराच्या फुल्या फुल्या फुल्या) योग का काय म्हणतात तोच होता की!

मला फक्त हर्षवायूच व्हायचा शिल्लक होता."याSSहु" असं जवळ जवळ ओरडतच मी बसलो. पण पुढे काय वाढून ठेवलंय ते मला तेव्हा कसे बरं कळणार? लवकरच हाय रे रामा, जळ्ळं मेलं नशीब ते, नशीब XX तर काय करील पांडू, अशा असंख्य म्हणी, वाकप्रचार आणि अनेक हताश विचार मनात येऊन गेले. कारण बस सुरु होताच मला लक्षात आलं की बस मध्ये ड्रायव्हरच्या शेजारी जे इंजिन असतं त्याचं झाकण गायब होतं आणि त्यातून एक गरम वाफेचा झोत थेट माझ्या चेहेर्‍यावर येत होता. माझा त्या बसमधला पुढचा अर्धा-पाउण तास कसा गेला असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. औंधला उतरेपर्यंत चेहेर्‍याची उजवी बाजू आकाराने एखाद्या भरल्या वांग्यासारखी (बी.टी. नै हो, साध्या) आणि रंगाने टोमॅटोसारखी लालेलाल अशी दिसत होती. मामा-मामी दोघेही माझ्या या अशा चमत्कारिक अवताराकडे पाहून हसत होते. मामीने तर विचारलंच, "काय रे, पुण्यात आल्या आल्या मारामारी वगैरे केलीस की काय?" तिचं बरोबरच होतं, कारण माझा उजवा गाल कुठल्यातरी कोल्हापुरी पैलवानाने थोबाडीत ठेऊन दिल्यावर सुजावा तसा दिसत होता. त्यानंतर मी "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर घोर प्रतिज्ञा केली.

......पण ती फारशी टिकली नाही. पैसे वाचवण्याच्या नादात मी काही महिन्यांनी मी पुन्हा तीच चूक केली. यावेळी मला धायरी परिसरात जायचं होतं. पुणे एस.टी. स्थानकावर उतरताच मित्राला फोन केला. "समोरच पी.एम.टी चा स्टँड आहे, तिथे अशा अशा नंबरच्या बस धायरीला जातात. आत्ता आठ वाजले आहेत. टाईमटेबलप्रमाणे आत्ता आठ वीसची एक बस आहे, ती तुला मिळेल," तो म्हणाला. त्याने नक्की कुठले नंबर सांगितले ते आत्ता आठवत नाहीत, तसे तेव्हाही आठवून उपयोग नव्हताच. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात, ती तुमच्या इच्छित स्थळी जाते आहे ना, मग झालं तर, असं असतं.

प्रचंड उत्साहात मी स्टँडच्या दिशेने मोर्चा वळवला. बाहेरून प्रथमदर्शनी तो स्टँड रामसे बंधूंच्या चित्रपटातल्या भूतबंगल्यासारखा दिसत होता. म्हणजे एकदम काळोखी वगैरे, आतून चित्रविचित्र आवाज येतायत पण आत जिवंत माणसांची वर्दळ आहे की नाही याची शंका यावी असे असा. अचानक एखादी हडळ यावी तशी एक बस रोरावत बाहेर पडली. तिला चुकवून मी आत शिरलो. आत समोर दोन व त्यामागे दोन अशा चार बस उभ्या असलेल्या दिसल्या. चारही बसचे क्रमांक नीट दिसत नव्हते.

"अहो, धायरी फाट्याला जाणारी बस कुठून सुटते हो?" फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा उभे होते त्यांना मी विचारलं. अशोक सराफचा फोटो आणि त्याखाली 'माझ्या यशाचे कडवट रहस्य: वैद्य-पाटणकर काढा' असं लिहिलेल्या बसकडे बोट दाखवून त्यांनी, "ती काय मागेच उभी आहे" अशी बहुमूल्य माहिती दिली. एखादा प्रश्न विचारल्यावर एखाद्या पुणेकराने मला दिलेले हे पहिले सरळ उत्तर! मामा बहुतेक मुंबईहून पेशल डेप्युटेशनवर आले असावेत.

असो. त्यांनी सांगितलेली बस नक्की धायरी फाट्याच्याच दिशेने जाईल ह्याची बसवरची अस्पष्ट पाटी वाचून खात्री करून घेतल्यावर मला पुन्हा एकदा ह.वा. झाला. पण ती सुद्धा रा.ब. च्या भू.बं. मधल्या अंधार्‍या खोली सारखी दिसत होती. सव्वा आठ वाजलेले असूनही आतले दिवे लागलेले दिसत नव्हते, पण इच्छुक प्रवासी मात्र होते.

"ती धायरीची बस कधी सुटेल हो?" बसमागे असलेल्या हापिसवजा खोपटासमोर खुर्ची टाकून आणखी एक मामा बसले होते त्यांना मी प्रश्न टाकला.

"कुण्या गावाच्च आलं पाखरू" अशा नजरेने माझ्याकडे पाहत त्यांनी उत्तर दिलं, "सुटेSSSल होS".

मी निमुटपणे बशीत जाऊन बसलो. आठ वीसचे साडेआठ केव्हाच होऊन गेले होते. तसं म्हणाल तर मुंबईतल्या सगळ्या बस अगदी वेळेवर सुटतात असा आपला दावा नाही बुवा. पण निदान बसमधले दिवे लागले आहेत, चालक बाहेरची पाटी फिरवतोय, कंडक्टर जवळच्याच पानपट्टीवर स्वतःच्या मुख-वंगणाची सोय करतोय, अशी सूचक दृश्य तरी दिसतात. इथे तर आत बसलेल्या इच्छुक प्रवाशांच्या चेहेर्‍यावर देखील तशी काही लक्षणे दिसेनात!

साडेआठ, आठ पस्तीस, आठ चाळीस, असं करता करता पावणेनऊला शेवटी ड्रायव्हरसाहेब येऊन स्थानापन्न झाले आणि त्यांनी बसमधले दिवे लावले. माझ्याइतक्याच कावलेल्या एका आजींनी शेवटी, "काय हो किती वाजले, किती हा उशीर?" असं विचारलं. मला वाटलं लोकलाजेस्तव किंवा स्त्रीदाक्षीण्यापोटी तरी काहीही न बोलता ते बस सुरु करतील. पण बोलण्यात हार जातील तर ते पुणेकर कसले! त्यांनी तोंडात नुकताच भरलेला मौल्यवान ऐवज तोंडातल्या एका सोयीस्कर कोपर्‍यात तात्पुरता ढकलून टाळूला लावायला जीभ मोकळी करून घेतली आणि "ए आज्जे, थोडी बी कळ सोसंना का तुला" अशी मुक्ताफळं उधळली. पु.लं.च्याच भाषेत सांगायचं तर असा 'एक अकारण हिणकस शेरा' मारला. त्यानंतर त्या आजींबरोबर आलेले आजोबा आणि चालक महाशय यांनी एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस केली, तेव्हा मला आपण आज काही धायरीला पोहोचत नाही असं वाटू लागलं. कंडक्टरसाहेब जास्त समजूतदार असावेत. त्यांच्या हस्तक्षेपाने आणि आमच्या सुदैवाने ही विचारपूस कुटुंबातील इतर सदस्यांवर घसरली नाही आणि ड्रायव्हरसाहेबांनी बस सुरु केली.

बस सुरु करेपर्यंत आळशीपणाचा महामेरू असलेल्या ड्रायव्हर साहेबांनी मग जेव्हा "च्यामारी, फॉर्म्युला वन मध्ये मायकल शुमाकरला टफ देणारी नोकरी सोडून पी.एम.टी. सारख्या तुच्छ ठिकाणी आपल्याला नाईलाजाने बस चालवावी लागत आहे" अशा आविर्भावात बस चालवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या छातीत परत धडधड सुरु झाली.

पण जिलब्या, खुन्या, वगैरे मारुतीच्या आणि गणपतीच्या कृपेने मी सुखरूप धायरीला उतरलो आणि पुन्हा एकदा "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी घोर वगैरे प्रतिज्ञा केली.

हल्ली पी.एम.टी. ला पी.एम.पी.एम.एल. असं कैतरी म्हणतात नै? द्याट रिमाईंड्स मी. आता तिला पुण्याची कतरिना म्हणावं काय?