Saturday, October 27, 2018

युपीएच्या गंमतीजमती भाग ३: भगवा दहशतवाद या लेबलाचा जन्म आणि त्याचे जन्मदाते

२९ ऑक्टोबर २००५ रोजी दिल्लीमधील गोविंदपुरी येथे एका बसमध्ये, कलकाजी जवळ, आणि सरोजिनी नगर मार्केट भागात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. यात ६७ जण ठार तर २०० हून अधिक लोक जखमी झाले.

२८ डिसेंबर २००५ रोजी बंगलुरू येतील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स Indian Institute of Science (IISc) येथे दहशतवादी हल्ला झाला. इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात गणिताचे प्रोफेसर मनीषचन्द्र पुरी यांचा मृत्यू झाला तर इतर चार जण जखमी झाले.

या नंतर ७ मार्च २००६ वाराणसी येथे कँटॉनमेन्ट रेल्वे स्टेशन आणि संकटमोचन मंदिर इथे बॉम्बस्फोट झाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर १ जून २००६ रोजी हल्ला झाला. याची पूर्वसूचना अगोदरच मिळाल्याने मोठी हानी टळली आनि तीन लष्कर-ए-तय्यबाच्या अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

या आणि या आधी व नंतर झालेल्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांत पकडले गेलेले, ठार झालेले, आणि संशय असलेले सगळे अतिरेकी हे म्लेंच्छ निघाले. इतकंच नव्हे, तर अतिरेक्यांना सहाय्य करणारे स्थानिकही म्लेंच्छ असल्याचे सगळ्या गुप्तचर संस्थांची माहिती होती.

या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यालयात अधिकारी असलेल्या श्री आर. व्ही. एस. मणी यांना गृहमंत्रालयात तातडीने पाचारण करण्यात आलं. गृहमंत्रालयात पोहोचल्या पोहोचल्या श्री मणी यांना गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या खोलीत जायला सांगण्यात आलं, त्यावेळी खोलीत आणखी दोन व्यक्ती हजर होत्या. त्यातली एक व्यक्ती म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि अतिरेकी संघटनांचा प्रचंड पुळका असलेले दिग्विजय सिंग.

...आणि दुसरी व्यक्ती म्हणजे महाराष्ट्रातले प्रसिद्ध पोलीस अधिकारी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे म्हणजेच एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे.

करकरेंनी मणी यांना नजिकच्या भूतकाळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची माहिती विचारली. यात त्यांनी किती लोक मेले, आता त्या प्रकरणांच्या चौकशीची काय स्थिती आहे, इत्यादी माहिती घेतली. यानंतर दिग्विजय सिंग यांनी मणी यांना आणखी काही माहिती विचारली. बोलण्याच्या ओघात इस्लामाबाद येथे काही कामानिमित्त गेलेले गृहमंत्रालयाचे काही वरिष्ठ अधिकारी काही तासांतच दिल्लीला पोहोचतील अशी माहिती श्री मणी यांनी दिली. पण त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आलं. इतकंच नव्हे तर केंद्रीय गृहसचिव केव्हा परतणार आहेत याबद्दलही उपस्थितांना फार काही फारसा रस दिसत नव्हता. श्री मणी यांच्याकडून दिग्विजय सिंग आणि हेमंत करकरे मिळेल ती माहिती मिळवत असताना गृहमंत्री शिवराज पाटील यांना त्या चर्चेत काडीचाही रस दाखवला नाही.

या प्रश्नोतरांच्या दरम्यान दोन गोष्टी श्री मणी यांच्या प्रकर्षाने लक्षात आल्या. दोन प्रश्नांच्या मध्ये दिग्विजय सिंग आणि करकरे यांच्यात आपापसात जी चर्चा झाली त्यावरुन श्री मणी यांच्या लक्षात आलं की सगळ्या अतिरेकी हल्ल्यात म्लेंच्छ जबाबदार असणं आणि त्यांना हल्ले करण्यात मदत करणारे स्थानिकही म्लेंछ असणे आणि याला गुप्तचर संस्थांनी दुजोरा देणे या वस्तुस्थितीवर ते दोघही नाखुष होते. दुसरी गोष्ट म्हणजे 'नांदेड', 'बजरंग दल', इत्यादी उल्लेख त्यांच्यातल्या संभाषणात वारंवार येत होता. आणखी एक महत्वाची गोष्ट श्री मणी यांच्या लक्षात आली ती म्हणजे दिग्विजय सिंग आणि हेमंत करकरे यांच्यात चांगलीच दोस्ती दिसत होती. जरी आयपीएस अधिकारी आणि राजकारणी लोकांनी एकमेकांशी वैय्यक्तिक संबंध वाढवू नयेत असे संकेत असले, तरी समज करकरे मध्य प्रदेशमध्ये पोलीस अधिकारी म्हणून काम करत असते तर त्यांच्यात आणि त्या राज्याचा एके काळी मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांच्यात चांगले संबंध असणं नवलाची गोष्ट असली नसती, पण एका राज्याचा माजी मुख्यमंत्री आणि दुसर्‍याच राज्याचा आयपीएस अधिकारी यांच्यात इतकी जवळीक ही आश्चर्याचीच गोष्ट होती. एका राज्याच्या पोलीस अधिकारी हा दुसर्‍याच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याबरोबर इतकी घसट का ठेऊन होता हे एक रहस्यच होते. पण शेवटी हिंदीतली एक म्हण आठवते, "चोर चोर मौसेरे भाई"

उपरोल्लेखित भेट झाल्यावर लगेच काही दिवसांनी "हिंदू दहशतवाद" हे शब्द रेकॉर्डवर आले. नांदेड इथल्या समीर कुलकर्णी नामक व्यावसायिकाच्या वर्कशॉपमध्ये २० एप्रिल २००६ रोजी स्फोट झाला. हे प्रकरण सीबीआयकडे गेलं, तेव्हा वस्तुस्थिती काही वेगळीच असल्याचं तपास अधिकार्‍यांच्या लक्षात आलं. अनेदा व्यावसायिक धंदा मंदा असल्यावर स्वतःच आपल्या गाळ्यांना आग लावतात आणि विमा कंपन्यांकडे खोटा दावा करुन विम्याचे पैसे लाटण्याचा प्रयत्न करतात. मात्र या अधिकार्‍यांवर त्यांचा हा असा अहवाल बदलण्यासाठी 'वरुन' दबाव आला. या घटनेला ताबडतोब हिंदू दहशतवादाचं लेबल लाऊन कुलकर्णी आपल्या वर्कशॉपमध्ये घातपात घडवून आणण्याकरता स्फोटक पदार्थ साठवून ठेवत असल्याचा आणि अशा प्रकारे साठवणूक करत असताना त्यांचा स्फोट झाल्याचा शोध लावण्यात आला. समीर कुलकर्णी बजरंग दलाच्या नांदेडमधल्या कार्यालयात जात असल्याची कंडीही यावेळी पिकवण्यात आली. मात्र या अधिकार्‍यांनी त्यांचा अहवाल बदलण्यास साफ नकार दिला. याचा परिणाम असा झाला की सीबीआयच्या प्रमुखपदी ज्या अधिकार्‍याची बढती होणार होती ती रोखण्यात आली, आणि भलत्याच व्यक्तीला सीबीआयचे प्रमुखपद देण्यात आले. चौकशी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी अहवाल बदलण्यास नकार दिल्याने या प्रकरणावर तिथेच पडदा पडला. पण काहीही करुन भगवा दहशतवाद खरंच अस्तित्वात आहे ही कपोलकल्पित बाब जनतेच्या मनावर बिंबवण्याची सुरवात याच प्रकरणापासून झाली होती, आणि त्याची भीषण फळे अनेकांना भोगायला लागणार होती.

अवांतरः
वर दिग्विजय सिंग यांचा उल्लेख मध्य प्रदेशचे (छत्तीसगढ वेगळे राज्य होण्याआधी) माजी मुख्यमंत्री म्हणून आलाच आहे तर त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दैदिप्यमान कारकिर्दीबद्दल थोडक्यात माहिती देणं आवश्यक आहे. आता छत्तीसगढचा भाग असलेल्या भागातून चाकिनी आणि डाकिनी नामक दोन नद्या वाहतात. अगस्त्य मुनींनी त्यांच्या ललितासहस्त्रनामम् या ग्रंथात या दोन नद्यांचा उल्लेख चाकिनीअंबा स्वरुपिणी आणि डाकिनेश्वरी असा केलेला आहे. स्थानिकांच्या दृष्टीने या दोन नद्यांचे पाणी पुरवठ्याइतकेच सांस्कृतिकही महत्त्व आहे.

नॅशनल मिनरल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनने या राष्ट्रीयीकृत संस्थेने या भागात खाणकामाला सुरवात केली. दुर्दैवाने नियोजनाच्या अभावामुळे या खाणींतून निघणारा विषारी कचरा याच दोन नद्यांत काही वर्ष टाकण्यात आला. याचा परिणाम अर्थातच या दोन्ही नद्यांचे पाणी धोकादायकरित्या अशुद्ध होण्यात झाला. ही गोष्ट मुख्यमंत्री असलेल्या दिग्विजय सिंग यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही त्यांनी स्थानिकांच्या तक्रारींवर कोणतीच कार्यवाही केली नाही. थोडक्यात, त्यांनी या नद्यांच्या शुद्धतेकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. शांततामय मार्गाने आपले प्रश्न सुटत नाहीत म्हटल्यावर त्याचे पर्यावसान हिंसेत झाले आणि त्याचे परिणाम झारखंडचा तो भाग आजही भोगतो आहे.

गंमतीची गोष्ट अशी, की जिथे आंदोलनकरुन मलई खायला मिळते अशा भागात तत्परतेने धाव घेणार्‍या मेधा पाटकर, अरुंधती रॉय, प्रिया पिल्लई, आणि बेला भाटीया इत्यादी प्रभूतीमात्र या भागाकडे कधीच फिरकल्या नाहीत. मानवाधिकार आणि आदिवासींचे प्रश्न हे त्यांच्यासाठी "जिथे मिळते मलई, तिथे वाजवा सनई" असे होते आणि आहेत. दुर्दैवाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष आणि आंदोलनाची गळचेपी यामुळे हा प्रश्न आणखी चिघळला आणि या भागातल्या नक्षलवादाला खतपाणी मिळालं. अरे हो, बेला भाटियावरुन आठवलं...याच बाईचा नवरा जॉन ड्रेझची नेमणूक सोनियामातेने संपूर्णपणे घटनाबाह्य अशा नॅशनल अ‍ॅडव्हायजरी काउन्सिलवर नेमणूक केली होती.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे
(२) Hindu Terror: Insider account of Ministry of Home Affairs - RVS Mani

क्रमशः

©️ मंदार दिलीप जोशी

2 comments:

  1. छान माहिती. काळजी करण्या सारखे वातावरण होते.

    ReplyDelete
  2. भयंकर आहे सगळं, साध्वी प्रज्ञांची "आप की अदालत" मधील मुलाखत पाहीली, कितीतरी गोष्टी तर त्या सांगूही शकल्या नसतील.

    ReplyDelete