Saturday, April 21, 2018

कठुआ, सिरीया, आणि आपण

कठुआ येथे झालेल्या तथाकथित बलात्कार आणि खून प्रकरणानंतर तसेच अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटन यांनी सिरीयावर पुन्हा सुरु केलेल्या बॉम्बवषावाच्या निमिताने माध्यमांनी आणि इतर घटकांनी जी राळ उधळली आहे त्यातून तरुन जायचं असेल तर काही तथ्यांचा आणि तर्कांचा खोलवर जाऊन विचार करणे भाग आहे.

मनुष्याला मन आहे आणि मन म्हटलं की भावना आल्याच. वरवर उदात्त हेतू असल्याचं दाखवत मनुष्यस्वभावातील कमकुवत बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करुन त्यांचा उपयोग छुपे घाणेरडे हेतू साध्य करायला वापर केला जातो, जात आहे याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना होणारे त्रास हा विषय निघाला की साहजिकच आपण भावुक होतो. त्यातही मातृसुलभ भावनेमुळे सगळ्याच स्त्रीया लहान मुलांच्या बाबतीत खूप हळव्या असतात, मग अशा घटना घडल्यावर या हळव्या बाजूचा गैरफायदा घ्यायला काही भामटे सरसावले नाहीत तरच नवल आहे.  ही गोष्ट अधिक स्पष्ट करायला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला बातमी सांगितली गेली की 'सिरीयात एक ३० वर्षीय तरुण बॉम्बवर्षावात मेला" तर त्यावर तुमची प्रतिक्रिया ही फार फार तर "अरेरे वाईट झालं" या उद्गारांपलिकडे नसेल. पण वयाच्या याच आकड्यातून शून्य काढून तुम्हाला सांगितलं की 'सिरीयात बॉम्बवर्षावात ३ वर्षांचा मुलगा दगावला' तर त्यावर त्वेषाने व्यक्त होणं आणि ज्यानी कुणी हे घडवून आणलं त्याचा निषेध करणं हे तुम्हाला तुमचं नैतिक कर्तव्य वाटेल.

आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, तेव्हा आपल्या मेंदूतला मातृपितृसुलभ सहानुभूतीचा कोपरा जागृत होतो, पण त्यानंतर जो भावनांचा महापूर येतो त्याच्यात मात्र दुष्प्रचार करणार्‍यांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांखेरीज काहीही नसतं. कठुआत घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनाच्या याच कमकुवत बाजूचा फायदा घेत सहानुभूती आणि रोषाचा ओघ हा आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची बदनामी करण्याकडे वळवायचा. आणि दुसरीकडे मेलेल्या लहान मुलांचे खरेखोटे फोटो पसरवून युरोपात बहुसंस्कृतिवादाचा प्रसार करायचा आणि सिरीयातील असाद सरकारला अस्थिर करायची मोहीम चालवायची.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या नैसर्गिक सहानुभूतीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग भलत्याच गोष्टीसाठी करुन घेणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. जरा मागे गेलं तर युगोस्लाव्हिया आणि सर्बियाचे नेते स्लोबोदान मिलोसोविच यांना असाद यांच्या प्रमाणेच बदनाम करुन अमेरिका आणि नेटोच्या हवाईदलांनी कोसोवो आणि सर्बियावर इतका बॉम्बवर्षाव केला की मिलोसोविच यांच्यावर जितकी मुलंमाणसं मारण्याचा आरोप होता त्याच्या कित्येक पटींनी माणसं या बॉम्बवर्षावात मारण्यात आली. वर दिलेल्या उदाहरणाचा प्रयोग अमेरिकेत करुन बघितला तरी परिणाम तोच होईल. अमेरिकेत कुणालाही विचारा की सिरीयात अमेरिकेने हस्तक्षेप करावा का? तर उत्तर नाही असंच येईल. पण हा प्रश्न विचारताना "असाद सरकारमुळे आज २० मुलं मेली" हे शेपूट जोडून दिलंत, की तीच व्यक्ती फेफरे आल्यागत उच्चरवाने मुलांचा खुनी असादला खाली खेचायचा सल्ला देईल. मग त्याचे परिणाम अधिक मुलांच्या मृत्यूमध्ये होणार असल्याचं त्याच्या गावीही नसेल.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या सहानुभूतीची कारणं जैविक तर आहेतच पण इतिहासाला योग्य परिप्येक्षातून बघायला आपण अजूनही न शिकणं हे कारणही तितकंच महत्त्वाचे आहे. माध्यमं आणि इतर घटकांनी चालवलेल्या मोहिमांत लहान मुलांच्या डोक्यावर निरपराध असल्याचा शिका उमटतो आणि तशी ती खरोखरच निरपराध असतातही, पण हे जग इतकं साधं सोपं नाही. लहान मूल हे आकाशातून पडलेलं रत्न नसतं, तर ते फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक दुवा म्हणून काम करत असतं. ते कितीही निरपराध असलं तरी ते स्वतःला भूतकाळातून आलेल्या नाचणार्‍या भुतांपासून आणि क्रूर भविष्यकाळापासून वाचवू शकत नाही. आयुष्य जगताना, जगण्यासाठी त्याच्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्यांची, किंमत त्याला चुकवावीच लागते भले ते पर्याय निवडण्यात त्याचा काहीही हात नसला तरीही. उदाहरणतः आपल्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत; यात सद्गुण विकृतीने पछाडलेल्या हिंदू राजांचा आणि देश चालवायला काँग्रेसला उत्तम पर्याय समजणार्‍या आपल्या वाडवडिलांचाही समावेश करावा लागेल. माझ्या मुलांनाही मी निवडलेल्या पर्यायांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यात त्यांचा काहीही निर्णयाधिकार नसला तरी. इतिहास हा एक कालखंड नसून सतत घडणार्‍या घटनांची एक साखळी आहे, त्यामुळे कुठल्याही घटनेला भावनावेगात वेगळं कढून पुढचे, मागचे, आणि आजूबाजूचे संदर्भ वगळून तपासल्याने त्यातले प्रयोगसिद्ध वास्तविकता बदलत नाही.

याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला "पुढे काय?" याचा विचार न करता येणे किंवा पुढे काही घडले असल्यास त्याची नोंद न घेता येणे हा आहे. सिरीयाचे अध्यक्ष असलेले असाद हे लहान मुलांचे खूनी आहेत म्हणून यांना पदच्युत करा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण "असाद यांना पदच्युत करणे" या नंतरच्या परिणामांचा विचार करणे सोडून दिलेले असते. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्या क्षणी इराकचा विचार करणं आपण थांबवतो.

आणि आपण असिफाच्या तथाकथित बलात्कार्‍यांना/खुन्यांना फाशी द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ही घटना देशविघातक घटक सद्ध्या सत्तारूढ असलेलं सरकार खाली खेचायला किंवा त्या सरकारचं निव्वळ अस्तित्व हे हिंदूंच्या रानटी मनोवृत्तीचे प्रतीक असल्याचा तद्दन खोटा प्रचार करायला कसं वापरुन घेत आहेत याचा विचार करणं बंद केलेलं असतं.

काय आहे, भोळसट असायला हरकत नाही. पण देव, देश, आणि धर्म यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे आपल्याला वापरुन घेतील इतकं बावळट असणं कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.

© मंदार दिलीप जोशी व Satish Verma

No comments:

Post a Comment