Sunday, June 19, 2016

वामपंथी भारत विखंडन १ - छडी लागे छम छम

काही दिवसांपूर्वी जे.एन.यु. मधलं फुटेज खरं असल्याची बातमी आपण वाचली असेलच. आज ट्विटरवर फिरता फिरता कन्हैया आणि त्याच्या लाल क्रांतीवाल्या कॉम्रेड लोकांचे छायाचित्र एके ठिकाणी पाहून त्यांची पुन्हा आठवण आली.

मानसशास्त्रात वेगवेगळ्या विकृतींचे वर्णन केलेले आपल्याला आढळते. पण या डाव्या विचाराच्या लालभाईंचं त्यात काहीच वर्णन दिसत नाही याचं मला नेहमी आश्चर्य वाटत असे. पण मग अधिक विचार करता असं लक्षात आलं की या क्षेत्रावर त्यांचंच वर्चस्व असण्याचा तर हा परिणाम तर नव्हे?

मला एक सांगा. आई, बाबा, आणि शाळेतले मास्तर किंवा बाई यांचा मार खात खात मोठ्या झालेल्या माझ्या आणि मागच्या इथल्या एक दोन पिढ्यांना एक प्रश्न आहे. उठता लाथ बसता बुक्की, धम्मक लाडू आणि चापट पोळी, आणि छडी लागे छम छम विद्या येई घम घम या गोष्टींची सढळ हस्ते उधळण जितकी आपल्या बाबतीत व्हायची त्या तूलनेत आपण आपल्या मुलांना नगण्य किंवा काहीच प्रसाद देत नसणार. बरोबर ना?

आधुनिक बालमानसशास्त्रानुसार चालणारे आपल्यापैकी अनेक जण मुलांना साधा धपाटाही घालत नसणार. मग आता आठवून पहा, आपण जितके आज्ञाधारक आणि सदाचरणी होतो, तितकी तुमची मुलं आहेत का? मग एक दोन पिढ्यातच मुलांचं संगोपन करण्याची पद्धत इतकी कशी बदलली? याचा विचार थोडा फ्लॅशबॅकमधे जाऊन केला तर आपल्यावरचा डाव्या विचारांचा प्रभाव पडल्याचा संशय नक्कीच निर्माण होतो.

हां, काळ बदललाय, झपाट्याने पुढे गेलाय हे खरं. अपवाद नक्की असतील, पण सर्वसाधारणपणे विचार केला तर मुलं म्हणून आपण आपल्या आई-बाबांच्या दृष्टीने हाताळायला अधिक सोपे होतो. अपवादाने नियम सिद्ध होत असला तरी अपवादाला आपण नियम म्हणू शकत नाही, बरोबर ना? डाव्या विचारांचे पाईक आणि साम्यवाद्यांची खासियत अशी असते की प्रचलित व्यवस्थेतले असेच अपवाद शोधायचे आणि तेच कसे नियम आहेत अशी हवा निर्माण करायची, जेणेकरुन लोकांना त्या संपूर्ण व्यवस्थेविषयीच घॄणा उत्पन्न व्हावी. आणि अर्थातच न्युनगंड. मग आधीच्या पिढीतल्या नारायणाला आजच्या सुनीलला आपण कसं बदडायचो ते आठवून डोळ्यांत पाणी येतं, आणि तो पुढच्या पिढीतल्या अदित्यला अंजारत गोंजारतच मोठं करायचं मनावर घेतो. आणि अशा रीतीने पुढची पिढी प्रथम क्रमांकाची सर्किट करून सोडण्याचा डाव्या विचारांचा मनसूबा तडीस जातो. हां, अपवाद हाच नियम आहे हा विचार आपल्या मनावर ठसवताना ते उपाय सुचवत जातात, मग त्याने काही 'सुधारणा' होवोत किंवा न होवोत. पण जे बदल होतील ते चांगल्यासाठीच आहेत आणि आपण कसे योग्य मार्गावर आहोत हे गाजर मात्र दर टप्प्यागणिक आपल्याला दाखवायला ते विसरत नाहीत.

हे फक्त एक उदाहरण आहे, आपल्या घरातलं. पण आज देशात जिथे जिथे फार काही बिघडल्याचं आपल्याला दिसतं तिथे तिथे तुम्हाला या साम्यवादी, डाव्या विचारांचा प्रभाव नक्कीच दिसून येईल. कारण आधुनिक मानसशास्त्र हे त्यांच्यासाठी शास्त्र कमी आणि शस्त्र अधिक आहे.

अहो, उगाच का कन्हैय्या आणि अनिर्बन जन्माला येतात?

ही पोस्ट एखाद्या कवटी सरकलेल्या कॉन्स्पिरसी थिअरीवाल्याची वाटली, तर बुवा सरकलेत म्हणून सोडून द्या. पण सोडून देण्याआधी ही पोस्ट पुन्हा एकदा वाचून त्यावर विचार करुन पहा.

जाता जाता एक सत्यघटना सांगतो:

पात्रयोजना: अतीद्वाड कार्टं आणि त्याचे बाबा.
स्थळः अमेरिका

बाबा: कार्ट्या..........
कार्ट: डॅड, हात खाली घ्या, पोलीसांना फोन करेन.
बाबांचाच चेहरा थोबाडीत खाल्ल्यासारखा.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पात्रयोजना: हेच दोघे
स्थळः भारत

बाबा: <फट्यॅक्> 
कार्ट पोलीसांना फोन करतं. अर्ध्या तासात हवालदार घरी.
कार्टः ओ, बाबांनी मला थोबाडीत मारलं.
पोलीसः मग? तुझा बा न्हाई मारणार तुला तर काय मी मारणार? मारू?
कार्ट्याचं थोबाड पुन्हा एकदा थोबाडीत मारल्यासारखं.

~ सत्यघटना ~

अवांतरः आपला साम्यवादी सोवियत रशियाशी असलेल्या मैत्रीचा काळ आठवून बघितला, तर साधारण हे असे विचार हळू हळू आपल्या देशात झिरपायची सुरवात कधी झाली असावी याचा अंदाज येतो आणि त्याचे हे असे परिणाम कधी दिसू लागले असावेत याचाही. सोवियत नेते निकिता ख्रुश्चेव म्हणे म्हणायचे, "We cannot expect the Americans to jump from Capitalism to Communism, but we can assist their elected leaders in giving Americans small doses of socialism until they suddenly awake to find they have Communism." येतंय का थोडं थोडं लक्षात?

टीपः लेखातील सर्व नावे काल्पनिक.

---------------------------------------------------------------------------------
© मंदार दिलीप जोशी - मराठी रूपांतर व संपादन
प्रेरणास्त्रोत / मूळ  हिंदी लेखन - आनंद राजाध्यक्ष

जेष्ठ शु. १४, शके १९३८, वटपौर्णिमा
---------------------------------------------------------------------------------

पुढचा भाग इथे

7 comments: