Friday, February 11, 2022

खर्रा इतिहासः जगन्नाथ यात्रा आणि अकबर

एकदा दक्षिण सफरीवर असताना बादशहा अकबराच्या बग्गीचा टायर पंक्चर झाला. नेहमीचा अब्दुल पंक्चरवाला हग यात्रेला गेल्याने अंमळ अडचणच झाली. मग अकबराने भगवान जगन्नाथाचा धावा सुरू केला. अचानक देवळातून एक शेंडीधारक इसम आला व त्याने बग्गीच्या चाकाचे पंक्चर काढून दिले. तुला पैसे देतो असं अकबर म्हणाला पण तो इसम पैसे न घेता परत गेला आणि पुन्हा सापडलाच नाही. आपल्या मदतीला भगवान जगन्नाथच धावून आले असं समजून बादशहा अकबराने जगन्नाथ यात्रा सुरू केली.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ६६६, ओळ ११

© मंदार दिलीप जोशी

Akbar praying






खर्रा इतिहासः मुमताज बेगम आणि ताज महाल

मुमताज बेगम निष्णात रांगोळी काढणारी होती. ती अस्थम्याची रुग्ण सुद्धा होती. तिला शाहजहान म्हणायचा सुद्धा की प्रिये, रांगोळी नाकातोंडात गेली तर तुला अस्थम्याचा ऍटॅक येईल. पण ती सोळाव्या वेळी गरोदर असताना आपल्या पहिल्या डिलिव्हरीच्या म्हणजे मुलाच्या लग्नात स्वतः जातीने रांगोळी काढायला बसली होती. दुर्दैवाने बादशहा शाहजहान सरांची भीती खरी ठरली आणि रांगोळी तिच्या नाकातोंडात जाऊन दम्याचा विकार बळावून त्यात ती गेली. तिचे अत्यसंस्कार यमुनेच्या काठी करण्यात येऊन तिच्या अस्थी ताज महालात ठेवण्यात आल्या आहेत.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ७८६, ओळ ८७

© मंदार दिलीप जोशी


Mumtaj Begum and Taj Mahal



खर्रा इतिहासः कोजागिरी पौर्णिमा आणि अकबर

आजच्याच रात्री बादशहा हुमायूंने बाळ अकबराला सोन्याच्या चषकातून दुध पाजले होते. त्यात हुमायूं जायफळ टाकायला विसरल्याने बाळ जलालुद्दीन जागाच राहिला. म्हणून हुमायुं अकबराला म्हणाला "कोजागरती" म्हणजे "का रे (दिवट्या) जागा आहेस?" (माझा पुढचा प्लॅन बोंबलला ना. बेगम, तुम्ही झोपा). अशा रीतीने हा उत्सव सुरु झाला.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ४८८, ओळ २४

© मंदार दिलीप जोशी





खर्रा इतिहासः छठ पूजेची सुरवात

 एकदा यमुनेच्या काठी सूर्याला अर्घ्य देत उभा असताना बादशहा जलालूद्दीन महंमद अकबराला "बचाओ बचाओ" अशी हाक ऐकू आली. लांब कुणीतरी नदीत बुडत असल्याचं अकबराला दिसलं. बादशहाने आजूबाजूला बघितलं आणि आपल्या अधिकाऱ्यांना विचारलं की किसीको तैरना आता हय क्या? पण तो समय त्यांचे घसे ओले करण्याचा असल्याने सगळ्यांनी आपापल्या आवडीच्या ठिकाणी पोहोचायला ओला बुक केल्यामुळे स्वतःला ओलं करून घ्यायला कुणी तयार होईना, त्यामुळे आम्हाला पोहोणे को नाही आता असं ठोकून ते मोकळे झाले. आता आलमपनाह स्वतः कसे उडी मारणार एवढ्यात त्यांना मागून कुणीतरी धक्का दिला आणि ते पाण्यात पडले, आणि पडल्यावर हातपाय मारू लागले. त्यांना काही कळण्याच्या आत ते बुडणाऱ्या माणसाजवळ पोहोचले सुद्धा होते. शेवटी त्या माणसास धरून त्यांनी किनाऱ्यावर आणले तेव्हा लक्षात आले की हा साला...अंहं...ही शिवी नव्हे बरं... हा इसम त्यांचा सालाच होता. म्हणजे धक्का देणाऱ्या बेगम शोधाबाईच होत्या!! 

बादशहांनी रागे भरू नये म्हणून बेगम साहिबांनी फुलांनी भरलेलं ताट त्यांच्यासमोर धरलं तर आलमपनाह चिडले आणि "हट" असं म्हणून ते ताट उडवलं, तेव्हा सगळी फुले यमुनेत जाऊन पडली. शोधाबाई साहिबांना हा कसलातरी संकेत वाटला आणि बादशहा सलामत "छठ" म्हणाले असं वाटून तेव्हापासून साला प्रकरण थंड झाल्यावर बादशहा अकबरांची परवानगी घेऊन सर्वप्रथम "छठ पूजेला" सुरवात केली.

अकबर-ए-सनातनी
मूळ फारसी लेखक: खोकखोक खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ६६६, ओळ ६

© मंदार दिलीप जोशी




खर्रा इतिहासः नेहरू आणि सावरकर भेट

ग्रामोफोनवर चोरून ऐकत असताना चाल आवडल्याने भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना एकदा 'जयोस्तुते' लाईव्ह ऐकायची लहर आली. लागलीच त्यांनी मुंबईला सावरकरांना फोन लावला, तो साधारण आठवडाभराने लागला. नेहरू म्हणाले, "स्वातंत्र्यवीर, अब हमारा कोई भरवसा नहीं. आज है उद्या नहीं. जाने से पहले एक बार जयोस्तुते गाना लाईव्ह सूनना है."

[म्हातारचळ लागलेलं दिसतंय, असं म्हणून] सावरकरांनी ताबडतोब शेजारची चार कार्टी गोळा केली आणि गाणं बसवून घेतले. अखेर तो दिवस उजाडला. पंडित नेहरू लहानग्या इंदिरेसह सावरकरांच्या घरी आले. कार्ट्यांनी जबरदस्त गाणे म्हटले. दोघांना गाणं इतकं आवडलं की 'सागरा प्राण तळमळला' आणि इतर अनेक गाण्यांची फर्माईश नेहरूंनी केली आणि पोरांनी ती म्हटली. 

पंडितजी साश्रूनयनांनी सावरकरांना म्हणाले देखील, "स्वातंत्र्यवीर, हमसे बडी गलती हो गयी, हमने तुमकू बहुत त्रास दिया. अब हम तुमकू भारतरत्न देना चाहते हैं." 

यावर सावरकरांनी [काय पण रत्न आहे असे उद्गार काढून] विनम्रपणे त्यास नकार दिला. म्हणून मग नाईलाजाने नेहरूंनी ते भारतरत्न स्वतःलाच ठेऊन घेतलं. 

हा इतिहास हे चड्डीवाले संघी तुम्हाला सांगणार नाहीत.

- सिमसिम मरुदे
जमात-ए-पुरोगामी टाईम्स कडून प्रमेय चिरडकरसह



Thursday, February 3, 2022

अजून जीव आहे!

इथे चूक की बरोबर यात मला पडायचं नाही. पण हल्ली नातेवाईकांमध्ये कुणी गेलं, तरी फोनवर निरोप आल्यावर जेमतेम त्या शहरात असलेलीच माणसं जमतात. अगदी पुणे, मुंबई, असं जवळपासच्या शहरात कुणी असेल तरी आपल्याला सांगितलं जातं की लगेच नेतोय, तुम्ही येण्याची घाई करु नका. मग आता नेलंच आहे तर कशाला नंतर तरी जा, असं म्हणत जसे संबंध असतील तसं एक फोन करुन काम भागवलं जातंं किंवा मग ते ही नाही. ज्याप्रमाणे महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून विभक्तपणाची जाणीव जास्त वाढायला लागली, तसं संपर्काची साधने वाढल्यापासूण नियमित संपर्क उरलेला नाही. थोडक्यात, नातेवाईक म्हणजे आकाशात लुकलुकणारे असंख्य तारे झाले आहेत. त्यातला एखादा निखळल्याची बातमी आपल्याला कळते, पण तो 'सोहळा' बघायला न मिळाल्याने क्लोजर मिळत नाही. आणि अनेकांना ते नाही मिळालं तरी काही फरक पडत नाही. 

कोविडकाळात आणि नंतरही लग्नेही पटापट उरकली गेली, जात आहेत. अर्थात तुम्ही त्या ५० निमंत्रितांच्या यादीत नसणे यावरुन असलेले फेसबुकीय विनोद सोडले तर किमान 'आमचे येथे आमचे चिरंजीव / कन्या यांचे लग्न अमुक अमुक यांच्याशी ठरले असून श्रींच्या कृपेने व अत्यंत मर्यादित निमंत्रितांसह हा सोहळा पार पडेल. तुम्हाला बोलावणे शक्य झाले नाही तरी तुमच्या शुभेच्छा व आशीर्वाद नवदांपत्याच्या पाठीशी असू देत." असं दोन ओळींचं पत्र पाठवायला काय होतं? 

Ships that pass in the night, and speak each other in passing,
Only a signal shown and a distant voice in the darkness;
So on the ocean of life we pass and speak one another,
Only a look and a voice, then darkness again and a silence
– Henry Wadsworth Longfellow

तुमच्यापैकी किंवा ओळखीपाळखीच्यांपैकी नौदलात (सशस्त्र किंवा मर्चंट) कुणी असेल, किंवा अगदी सामान्य ज्ञानाचा भाग म्हणूनही, तर तुम्हाला जवळपास असणार्‍या बोटी, मग त्या विरुद्ध दिशेला जात असोत किंवा एकत्र, एकमेकांशी संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी भोंगे आणि दिवे यांचा प्रयोग करतात हे माहित असेल (सिग्नल). हल्ली नातेवाईकांचं त्या बोटींपेक्षा बेक्कार झालंय. आयुष्याच्या प्रवासात इकडून तिक्डे जाताना सिग्नलही देण्याचेही कष्ट कुणी घेत नाही. आजवर लग्न झाल्याचं थेट न कळवायची पद्धत सुरु झालीच होती, इकडून तिकडून कळत असे. काही काळाने कुणी गेल्यावरही कळवण्याचे कष्ट कुणी घेणार नाही. ते ही असंच, इकडून तिकडून कळेल. 

 

पण हल्ली कशाचं काही न वाटण्याचा काळ आहे. त्याचंही काही वाटणार नाही. त्याचीही मनाची तयारी झालीच आहे. 

How still,
How strangely still
The water is today,
It is not good
For water
To be so still that way
–  Langston Hughes 

पण हे बरोबर आहे का? असं सारखं का वाटतं? कदाचित मनातलं पाणी तितकं स्तब्ध नसावं. आहे, थोडक्यात, 'माझ्या मना बन दगड' ही अवस्था प्राप्त व्हायला आणखी थोडा वेळ आहे... अजून जीव आहे!

© मंदार दिलीप जोशी
माघ शु. ३, शके १९४३