Saturday, March 21, 2015

पुतळ्यांचे 'पुतळे' होऊ नयेत म्हणून




स्थळः पुण्यातील कोथरुड येथील कर्वे पुतळ्याशेजारचा पेट्रोल पंप.

बहुधा पुण्यात नवीन असलेला एक माणूस त्याच्या नातेवाईकाशी फोनवर बोलत होता. तो नक्की कुठे उभा आहे हे सांगताना त्याचं लक्ष पुतळ्याकडे गेलं. तो पुतळा कुणाचा आहे हे त्याला माहित नव्हतं हे स्पष्ट होतं. तो जिथे उभा होता तिथून त्याला पुतळ्याखाली लिहीलेली अक्षरं अर्धवट दिसत होती. ती पाहून तो फोनवरच्या नातेवाईकाला म्हणाला, "मी भारतरत्न पुतळ्याशेजारी उभा आहे".

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे, पण वरच्या घटनेने माझ्या मनात पुतळे आणि ते ज्यांचे आहेत त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांना असणारी माहिती याविषयी मनात विचारचक्र सुरु झालं. आपल्या राज्यात आणि देशात अक्षरशः लाखोंच्या संख्येने पुतळे असतील. सर्वाधिक पुतळे बहुतेक गांधीजींचे असावेत. आता गाधीजींविषयी कुणाला माहिती नाही असा प्रश्न आपल्याला पडेल. पण आर.के.लक्ष्मण यांचे एक सुप्रसिद्ध व्यंग्यचित्र आहे. एक नेता गांधीजींच्या तसबीरीखालचे नाव वाचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा खाजगी सचीव मागून त्याला, "It's Gandhiji sir", असं सांगतो आहे. यथा प्रजा तथा राजाच्या या काळात नेत्यांची ही स्थिती असेल तर सरवसामानय जणतेची काय असेल याची सहज कल्पना येऊ शकते.

यावर मला सुचलेले उपाय करता येऊ शकतो. जिथे असे पुतळे असतील तिथे पुतळ्याच्याच खाली एखाद्या छोट्या स्टॅन्डवर माहितीपत्रकांचा (फ्लायर्स) गठ्ठा ठेवता येईल. अशा माहिती पत्रकांच्या एका बाजूला त्या व्यक्तीची अगदी थोडक्यात माहिती आणि दुसर्‍या बाजूला त्या व्यक्तीवर असलेल्या पुस्तकांची शक्य तितकी समग्र यादी असावी. तसेच, अशीच माहिती पत्रके वरील ठिकाणाप्रमाणेच शेजारील पेट्रोल पंप वर इतर दुकाने यांमध्ये ठेवण्याची सक्ती करावी व ग्राहकांना दुकानातून बाहेर पडताना ती माहितीपत्रके देण्याची सक्ती करावी. ही माहितीपत्रके दुकानांना अर्थातच सरकारतर्फे विनामूल्य पुरवायची असल्याने ती ग्राहकांना देण्यात अशा दुकानदारांना कष्ट पडू नयेत. तसेच अशा पुतळ्यांशेजारी असलेली दुकाने पुरेशी मोठी असल्यास गल्ल्याशेजारी एखाद्या स्टॅन्डवर त्या व्यक्तींविषयी असलेली पुस्तके विक्रीस ठेवता येतील. मोठ्या दुकानांतून व मॉलधून असे करणे सोपे जावे. सर्वासामान्यपणे असे बघण्यात येते की एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या विचारसरणीबद्दल एखाद्या व्यवसायिकाला किंवा स्थानिक नेत्याला अंमळ अधिक ममत्व असते. अशा व्यक्तींच्या भावनांना आवाहन करुन अशी पुस्तके सवलतीच्या दरात किंवा मोफत देण्याची व्यवस्था करता येऊ शकते. अर्थात अशी पुस्तके ही सर्वप्रकारची असावीत. म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्य व चरित्राबरोबरच त्याच्या विचारांची समीक्षा असलेली पुस्तकेही असावीत जेणेकरुन वाचनेच्छुक लोकांना सर्वसमावेशक माहिती मिळवता येऊ शकेल.

कर्वे पुतळा ही खूण आणि बसस्टॉप म्हणून सांगताना किती जणांना पुतळा असल्यामुळे कुणीतरी मोठा माणूस असणार या पलिकडे त्यांच्या कार्याविषयी किती माहिती असेल? निदान त्या ठिकाणी तरी महर्षी कर्वे केवळ एक पुतळा म्हणूनच उभे आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे व्यवस्था केल्यास दोन फायदे होऊ शकतील. एक म्हणजे लोकांना अशा व्यक्तींविषयी पुरेशी माहिती होऊ शकेल, आणि दुसरा म्हणजे आपल्या देशाला मिळालेली आझादी ही फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली नसून हजारोंच्या संख्येने असलेल्या समाजसुधारक आणि क्रांतीकारकांचा देश घडवण्यात आणि स्वतंत्र करण्यात महत्त्वाचा सहभाग होता हे समजण्यात मोलाची मदत होईल.

जाता जाता एक प्रश्नः हा उपाय सरकारला कसा कळवता येईल?

Saturday, January 31, 2015

हा अधिक, तर तो उणा?

24वर्षे क्रिकेट खेळुन 200 कसोटी आणी शेकडो दिवसीय सामने खेळुन 100शतके अन 30हजार धाला केल्या म्हणुन सचिन तेँडुलकरला "देवत्व" बहाल करणारे आपल्या देशात करोडो लोक आहेत.पण 27वर्षात दहा बार लाख कँन्सरग्रस्त रुग्नांना अन त्यांच्या नातेवाईकांना दुपारचे भोजन मोफत देणाऱ्‍या मुंबईच्या हरखचंद सावला यांना मात्र कोणी ओळखतही नाहि..विषेश म्हणजे त्यांचा फोटो मिळवायला मला पुर्ण एक दिवस लागला..>>

फेसबुकवर बराच काळ फिरत असलेल्या पोष्टीचा हा एक भाग. गुगल गेल्यास सगळी पोस्ट वाचता येईल. मुद्दामून इथे देत नाही.


हरखचंद सावला यांची कामगिरी निश्चितपणे थोर आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे (आणि हे मी माझ्या मूळच्या चिकित्सक स्वभावला दूर ठेऊन, त्या माणसाबद्दल आलेल्या फेसबुकी फॉरवर्डवर बिंधास विश्वास ठेऊन म्हणतोय, तो माणूस खरंच अस्तित्वात आहे का याचीही खात्री केलेली नसताना.) पण याचा अर्थ प्रत्येक वेळी एखादं इतर क्षेत्रात थोर कर्तृत्व असलेलं व्यक्तीमत्व घ्यायचं आणि त्याच क्षेत्रातील कामगिरीबद्द्ल त्याला दिलेल्या एखाद्या पदवीवरुन टोमणे मारायचे आणि लोकांचा तेजोभंग करायचा हा करंटेपणा आता पुरे झाला. आहेच सचिन तेंडुलकर देव, पण त्याला देव म्हणतात ते फक्त क्रिकेटमधेच, त्याला कुणी थोर समाजसेवक म्हणत नाहीत - जरी तो दोनशे अनाथ मुलांच्या जेवणाखाण्याचा, कपड्यालत्त्याचा, व शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत असला तरी! सचिनने क्रिकेटमधून जो लोकांना आनंद दिलाय, त्याचं वर्णनही करता येणार नाही, मग त्याची तूलना इतरांशी कशाला? आणि हरखचंद महान माणूस असले तर सचिनमधे उणेपणा कसा काय येतो?

मुळात तूलनाच करु नये, पण तुम्हाला तूलनाच करायची हौस असेल, तर त्याच क्षेत्रातला चमकोगिरी करणारा माणूस घ्या आणि बडवा त्याला खुशाल. त्यासाठी apples and oranges यातला फरक समजण्याची कुवत असावी लागते.

दुसरी गोष्ट, जी मला तितकीच धोकादायक वाटते म्हणजे आंतरजालावर सगळीच माणसं एखादी गोष्ट वाचली की खोलात जाऊन विचार करत नाहीत. अशी चुकीची तूलना वाचून एखाद्या सचिनच्या चाहत्याने किंवा ज्याला कुणाला बडवायला घ्याल त्याच्या चाहत्याने समजा हरखचंद यांच्या सारख्या माणसा बद्दल मनात अढी ठेऊन त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं तर? हा त्यांना मिळू शकणार्‍या मदतीच्या दृष्टीने नुकसानकारक नव्हे का?

तेव्हा हरखचंद सावला यांच्याबद्दल भरपूर लिहा. आपल्या आजूबाजूला असेच प्रसिद्धीपराङ्मुख व्यक्तिमत्वे तुम्हाला दिसली तर त्यांच्याबद्दलही लिहा. आम्ही नक्की वाचू. पुढे ढकलू (फॉरवर्ड). शक्य झाल्यास मदतही करु. आपल्या पण अशा समाजसेवकांबद्दल लिहीताना सचिन तेंडुलकर किंवा इतर कुठल्या व्यक्तिविशेषाला कमी लेखणारे संदर्भ वापरून मनाचा कोतेपणा दाखवू नका, आणि इतर कुणी तसं करत असेल तर त्याला रोखा ही कळकळीची विनंती. अक्षरशः वात आलाय अशी आचरट तूलना बघून.

----------------------------------
माघ शु १२, शके १९३५
----------------------------------