Sunday, September 4, 2022

धर्मः लवचिकता आणि सोय

खूप पूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली होती. लिहायला कारण असं झालं की सणवार सुरु होण्याआधीच आणि सुरु असताना कर्मकांडांच्या अनुषंगाने अनेक नकारात्मक पोस्ट दृष्टोत्पत्तीस पडल्या. त्या लिखाणाचा साधारण सूर असा की 'मी अमुक व्रतवैकल्ये आणि/किंवा उपास करत नाही, त्यातलं अमुक करत नाही, तमुक करणार नाही, इत्यादी.  त्यावर मी काय लिहीलं होतं ते या लेखनाच्या शेवटी पाहूया.

या गणेशोत्सवाच्या दरम्यानही असं काही लिखाण दिसलं ते वाचून लिहिल्यावाचून राहावलं नाही. अर्थात कुणी काय केलं हा वैय्यक्तिक प्रश्न आहे पण सार्वजनिक पटलावर अशा गोष्टींचं समर्थन दिसलं तर त्यावर भाष्य करणे अपरिहार्य आहे. तसेच, या लेखनातून व्यक्तीवर नव्हे तर प्रवृत्तीवर टीका आहे, किंबहुना टीका करण्याचा नव्हे तर प्रबोधन हाच हेतू आहे. त्यामुळे राग मानू नये. समाजमाध्यमांवर लिहीणार्‍या सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तींनी, आपल्या लिखाणात व्यक्त केलेल्या विचारांना वाचक सकारात्मक प्रतिसाद देत असतील तर अशा लोकांना स्खलनशील वर्तनाला प्रवृत्त न करता धर्मपालनाकडे कसे नेता येईल हे बघितले पाहीजे. मार्ग कठीण आहे, पण दुर्दैवाने लोक वाचून लगेच मान हलवतील असं लिखाण करण्याकडे अनेकांचा कल होत चालला आहे असं दिसल्याने हे लिहीणे भाग आहे. 

K N Krishna Bhat

धर्माची अनेक अंगे असतात, त्यातच कर्मकांड हे एक अंग आहे. धर्माचा र्‍हास घडवून आणायचा झाला की त्यातली अशी अंगे निवडून स्खलनशील मनुष्यस्वभावाला भावेल अशा प्रकारे ती कशी गरजेची नाहीत हे दाखवायचं आणि त्या शब्दांना अपमानकारक पद्धतीने सातत्याने वापरून ते शब्द ऐकताच सामान्यजनांच्या मनात आपल्याच धार्मिक बाबींबाबत चीड उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण करायची ही डावे आणि हिंदूद्वेष्ट्यांची जुनी कार्यपद्धती आहे. असेच दोन शब्द म्हणजे सनातनी आणि कर्मकांडं हे होत. सनातनी म्हणजे धर्माचे काटेकोर पालन करणारा अथवा  करण्याकडे कल असलेला तसेच कर्मकांड म्हणजे आपल्या धार्मिकतेचे ऐहिक प्रकटीकरण किंवा परमेश्वराशी जोडले जाण्याचा एक मार्ग होय.   

आपला धर्म लवचिक आहे. कर्मकांडांच्या संदर्भात याचा अर्थ असा की एखादी प्रथा, परंपरा, नेम आपण पाळत असू आणि एखाद्या वेळी जर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ती प्रथा, परंपरा, नेम पाळणे अशक्य असेल तर त्याने आपल्याला दोष लागत नाही किंवा इतरही काही बिघडत नाही. तिथे ताठरपणा दाखवण्यात अर्थ नसतो कारण ती आपत्कालीन परिस्थिती असते. 

मात्र कर्मकांड ज्याला जमतं त्यानेच करावं, ज्याला जमत नाही त्याने करू नये. आपल्या सोयीने खंड पाडला तरी देव समजून घेईल, भाव हवा, या सगळ्या आपल्या मनाच्या धारणा आहेत, खेळ आहेत, बाकी काही नाही, कारण ते आपल्या सोयीचं आहे. प्रत्यक्षात मात्र नियम म्हणजे नियम असतो. सगुण उपासना आणि कर्मकांड हे हातात हात घालून जाणारे विषय आहेत. ज्यांना कर्मकांडातला कर्मठपणा झेपत नाही, त्यांनी तो करू नये, इतकी साधी गोष्ट आहे. पण आपल्याला झेपत नाहीत त्या गोष्टी अर्धवट करून, मध्येच खंडित करून, त्याचं लंगडं समर्थन करू नये, तेव्हा सामान्य विचारी व्यक्तीने इतका शहाणपणा तरी दाखवायला हरकत नसावी.

उदाहरणार्थ, गणपती बसवणे हे आजीवन करायचे व्रत आहे. मनात आलं तेव्हा फिरायला गेलो आणि मनात आलं तेव्हा बसवला, असं करायला तो काही करमणुकीचं साधन नाही. जेव्हा संस्कृती आणि ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, तेव्हा जे लोक ते आजीवन करतात, पाळतात, त्यांच्याकडून ते कार्य होतं. नाहीतर नाही केलं तरी चालतंय, असे म्हणणारे अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे काळाच्या ओघात अनेक गोष्टी हरवून गेल्या आहेत. धर्माच्या लवचिकतेचा अर्थ ज्याला जेवढे झेपेल तेवढेच करावे. गणपती अखंडित बसवता येणार नसेल तर त्या मार्गाला जाऊच नये, एवढी साधी गोष्ट आहे. मग नित्यपूजा तुम्हाला जशी आणि जेवढी आणि जेव्हा करायची आहे, त्यात तुम्हाला मुभा आहेच की. पण सगळ्याच गोष्टी फक्त आपल्या मनाप्रमाणे आणि सोईप्रमाणे करायला हे काही सहलीचे नियोजन नाही. काही लोक सुरवातीला उत्साहाने दहा दिवस बसवतात, मग झेपत नाहीसे झाल्यावर सात दिवस, पाच दिवस करता करता दीड दिवसावर येतात, मग न बसवण्यासाठी आज काय फिरायला गेलो, उद्या काय महत्त्वाची व्यावसायिक मिटींग होती, अशी काहीही हास्यास्पद कारणे चालतात. ज्यांच्याकडे ठराविक धार्मिक कार्ये ठराविक दिवशी होतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं की सणासुदीचे दिवस म्हणजे फिरायला जाण्याचे दिवस, पार्टी करण्याचे दिवस, सिनेमे बघण्याचे दिवस, खेळायला जाण्याचे दिवस ही अत्यंत घातक कल्पना आहे. आपल्याच पिढीने अशी गैरवर्तणूक केली तर पुढच्या पिढीला पूजा करणे, गणपती बसवणे किंवा इतरही काही नियम पाळणे, म्हणजे अनावश्यकच वाटणार यात शंकाच नाही. 

आपल्या योजनांत व्यत्यय यायला सणवार हे काही अचानक येत नाहीत, त्यांचे दिवस ठरलेले असतात. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे आता आपल्याला पुढील कित्येक वर्षांच्या सणावारांच्या तारखा कळू शकतात. अशा वेळी काही ठरवून करायची असलेली कामं तारखा पाहून करता येतात. नियम पाळणे, व्रतपालन करणे यांना दुराग्रह, ताठरपणा असली स्वतःच्या मनाला शांती देणारी नावं दिली म्हणून आपली चूक झाकली जात नाही. कुठल्याही परिस्थितीत नियम पाळणे याला दुराग्रह म्हणत नाहीत, निश्चय आणि व्रताचरण म्हणतात. व्रत ज्याला जमते त्यानेच करावे, बाकीच्यांनी या भानगडीत पडून परंपरा कमकुवत करण्याचे आणि बिघडवण्याचे काम करू नये. आणि केले तर हे काय चालतं, ते काय चालतं, अशा पद्धतीचे लंगडे स्पष्टीकरण तर मुळीच देऊ नये. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा अचानक आलेल्या अडचणीमुळे खंडित झाल्या तर इलाज नसतो. आजारपण, जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतात. घरी पण पूर्वनियोजन करतांना त्या अनुषंगाने करणं अपेक्षित असतं. देव रागवत नाही, शिक्षा करत नाही हे खरंच आहे. पण आपण केलेले, घालून घेतलेले नियम आपणच काटेकोर पाळणं हितकर. त्यामुळे आज काय फिरायला गेलो, उद्या काय ऑफिसची पार्टी होती, तेरवा आणखी काही, अशा सबबी लंगड्याच असतात.

धर्मात आध्यात्मिक प्रगती सर्वतोपरी आहे असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी हे समजून घ्यावं की 'आपण नेम/कर्मकांड भाव म्हणून पाळावीत सोय म्हणून नव्हे' ही गोष्ट लक्षात येणे हा आध्यात्मिक प्रगतीचाच अविभाज्य भाग असतो. आपल्या सोयीने धर्मकार्य करायची आणि सोयीने खंडित करायची यात आपण आपल्याच नैतिक अधःपतनाला हातभार लावत असतो. मग कसली आध्यात्मिक प्रगती घेऊन बसलात?

आपण अमुक अमुक करत नाही किंवा अमक्या कार्यात क्षुल्लक कारणाने खंड पडला याचं समर्थन करायला समाजमाध्यमांवर कुणाला मोठमोठे लेख लिहावे लागत असतील तर त्याचे दोनपैकी एक अर्थ होऊ शकतो. एक तर आपण जाज्ज्वल्य हिंदुत्ववादी असलो तरी त्याचवेळी किती लिबरल आहोत हे सांगायला सवंग लोकप्रियतेचा आधार घ्यायचा असतो..... किंवा जे असं करतात त्यांचं मन त्यांना खात असतं पण आपण केलं ते कसं बरोबर हे सांगून आणि लोकांची मान्यता मिळवून आपली अपराधीपणाची भावना शमवण्याचा तो प्रयत्न असतो. मन खात राहणं हे काही केवळ अपराध भावनेने होत नाही. आपल्या हातून राहिलं याची हूरहूर, रुखरुख असतेच आणि ते अतिशय साहजिक असतं. अपराधीपणा म्हणा किंवा रुखरुख म्हणा किंवा आणखी काही म्हणा, समाजमाध्यमांवर लोकांचं समर्थन मिळवण्याने जो बूंद से गयी वो लाईक और बदाम से परत नहीं आती.

मी व्रतवैकल्ये व उपास यांच्यासंदर्भात आधी लिहीलं होतं, तेच सर्व कर्मकांडांच्या बाबतीत लागू आहे की ज्यांना करायचे आहेत त्यांनी करावं, ज्यांना करायचं नाहीत त्यांनी ते करू नयेत. पण 'अमुक अमुक केलं नाही किंवा करत नाही' हे लोकांना दाखवायला लहान ते लघुनिबंधाइतकी लांबी असलेले लेख का लिहिता? आज आपण धर्मपालनाच्या बाबतीत तरुण पिढीला नावे ठेवतो, पण तरीही अनेक तरूण तरुणी प्रथा, परंपरा पाळायला उत्सुक आहेत; एखादा केलेला नेम पाळला की त्यांना आनंद देऊन जातो. त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक काही लिहीता येत नसेल तर नकारात्मक तरी लिहू नका. अशा नकारात्मक लेखबाजीने ज्यांना करायची इच्छा आहे त्यांची उत्सुकता व इच्छा तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मारत आहात.

सार हे की परंपरा पाळतांना 'आपल्या सोयीला' प्राधान्य नसावं. ती खंडित करण्यासाठी तसंच प्रबळ आणि अपरिहार्य असं कारण असलं पाहिजे, इतकंच. करायचं नसेल, करु नका. केलंत तर निष्ठेने करा. आणि खंडित केलंतच तर त्याचं केविलवाणे जाहीर समर्थन करू नका.

एक मित्र म्हणतो: With Hindus, it seems the pattern is always towards 'reforming' the religion to suit one's own cravings and convenience, rather than reforming oneself, by using the disciplines of the religion. And I suppose such lack of discipline and commitment, is presented as being "Spiritual but not religious" or "Progressive Scientific temper" etc. Well I can't say I am disciplined either. But I totally own up, I am just lazy, indolent etc., I will try to do better, but will never need the religion to be 'reformed', to fit my fecklessness.

हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे हे वाक्य अनेकदा पळवाटेसारखं वापरलं जातं, कारण धर्मपालन करायचं नसेल तिथे इतर मुद्द्यांच्या अभावी हे एक लक्षवेधक आणि दुर्दैवाने टाळ्या मिळवणारं वाक्य झालं आहे. जिथे धार्मिक बाबींच्या अनुषंगाने हिंदूंमधे नेहमी स्वतःच्या लालसापूर्ती आणि सोयिस्कर वर्तनाला पूरक असं समर्थन धर्मातून मिळवता आलं नाही की धर्मातच त्या अनुसार "सुधारणा घडवून आणणे" याकडे कल दिसतो. आणि मग याच बेशिस्त आणि लेच्यापेच्या वागण्याचे प्रकटीकरण्गं "आध्यात्मिक, पण धार्मिक नव्हे" आणि "प्रगतीशील वैज्ञानिक दृष्टिकोन" वगैरे शब्दांत केले जाते. गंमत म्हणजे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे असाल तर आत्मिक प्रगती घडवून आणाल, काहीतरी बिघडलेली वस्तू असल्यासारखं धर्माला सोयीस्करपणे वाकवून घेणार नाही. कर्मकांडांना कालसुसंगत करण्याच्या नादात आपण काळाबरोबर वाहवत जात नाही ना हे आपल्याच मनाला वारंवार विचारणे योग्य ठरेल.

मी ही माणूसच आहे, माझ्याकडून चुका होत असतील तर त्या सुधारण्याकडे माझा कल असला पाहीजे. प्रगती करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील, पण माझ्यातले दोष सुधारण्याऐवजी त्यांना पूरक असं धर्माला मी कधीही वाकवणार नाही.

तेव्हा जे करायचं ते निश्चयावर दृढ राहून करावं. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे 'उपासनेला दृढ चालवावे'. 

© मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ४, शके १९४४

आभार: परिज्ञा भीमाशंकर पुरी, सौ. राधा मराठे

तळटीपः माणसाने एकदा पायरी ओलांडली की पुढे अंत नाही. आपण घसरतो म्हणजे काय, आपली लिमिट काय यावर विवेचन करणारा एक जुना लेख आहे तो अवश्य वाचावा. 

Sunday, August 14, 2022

हे मातृभू

बरेच दिवस हे रूपांतर करायचं मनात होतं पण अनेकांच्या स्टोरीमध्ये राझी चित्रपटातील "ए वतन, मेरे वतन" हे गाणं ऐकून अचानक स्फुरलं आणि लिहून टाकलं. ते गाणं कितीही सुश्राव्य असलं तरी त्याचा चित्रपटातला संदर्भ आठवून आपल्या स्वातंत्र्यदिनी ते वाजावं हे कुठेतरी खटकत होतं. चित्रपटात पाकच्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने शाळेत बसवलेल्या मुलांच्या गाण्याचा उपयोग आपला स्वातंत्र्यदिन साजरा करताना होऊ नये असं वाटतं. असंही उर्दू हा प्रकार डोक्यात जातो माझ्या. तर, नमनाला घडाभर तेल झाल्यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त प्रस्तुत आहे या गाण्याचे संस्कृतप्रचुर मराठी रूपांतर. 

मूळ गाण्याच्या चालीवर मनातल्या मनात म्हणून पहा. आवाज चांगला असलेल्या कुणी हे गायचं मनावर घेतलं तरी त्यासाठी अनुमतीची आवश्यकता नाही, लेखनश्रेय दिले तरी पुरेसे आहे. 

हे मातृभू

हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू, मम मातृभू
हे मातृभू, मम मातृभू

तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला
तव पुत्र म्हणोनी ओळखती या जगी मला

विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
विहरलो जरी आकाशी मम अधिष्ठान रहा तू
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
जाईन जिथे तूच तिथे माझी प्रेरणा  
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू 

रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
रक्षु तुला सदैव परचक्र परतवू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
तुजसाठी त्यजू प्राण हे सुफलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जरी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू 

सुजलाम रहा तू, सुफलाम रहा तू
हे मातृभू 
मम मातृभू

हे मातृभू सुजलाम रहा तू
राहिलो जगी अन्यदेशी हृदयी तूच तू 
हे मातृभू 
मम मातृभू














© मंदार दिलीप जोशी
श्रावण कृ. ३, शके १९४४

Sunday, August 7, 2022

पुस्तक परिचय – स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी

एप्रिलमध्ये रामकथामाला, चित्र ज्ञानेश्वरी या पुस्तकांच्या लेखिका सौ Deepali Patwadkar यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी" हे पुस्तक भेट दिले.

साक्षात दीपालीताईंची भेट आणि वर पुस्तकांच्या खजिन्यात भर टाकायला मिळालेले हे रत्न याने तो दिवस सार्थक झाला!


टीप: मागे भिंतीवर दिसणारी चित्रे दीपालीताईंनीच काढलेली आहेत!

पुस्तक वाचून बरेच दिवस झाले असले तरी त्याबद्दल लिहायला ऑगस्ट अर्थात श्रावण उजाडला.  मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही पण मला काय वाटलं ते व्यक्त करतो. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर चर्च आणि मिशनरी यांच्या कारवायांवर अशा एखाद्या पुस्तकाची गरज होती आहे हे पुस्तक ती नक्कीच पूर्ण करते.

सेक्युलर व्यवस्था म्हणजे separation of Church and Government याचा अर्थ आपण असा घेत होतो की चर्चच्या कारवायांत तिथल्या राज्यकर्त्यांचा सहभाग नसावा. पण चर्च आणि मिशनरी आणि व्यापारी कंपन्या, ब्रिटिश आणि सरकार, हे सगळे वेगवेगळे नसून चर्च आणि मिशनरी यांना युरोपातील सरकारे, राजे महाराजे आणि व्यापारी कंपन्या यांचा पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य होते हे या पुस्तकातून स्पष्ट होते.

किंबहुना सुरवातीचा थोडाच काळ वगळला तर वसाहतवादाच्या हेतूंपैकी नेटिव्ह जनतेला धर्मांतर करून ख्रिश्चन करणे हा वसाहतवादाचा अविभाज्य भाग होता ही बाब हे पुस्तक सप्रमाण सिद्ध करते. इतकेच नव्हे तर एतद्देशीय जनता आणि संस्कृतींच्या बाबतीत ब्रिटिश राज्यकर्त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीचा होता की १७७० ते १९४४ पर्यंत साथीच्या रोगांनी आणि घडवून आणलेल्या दुष्काळांत अंदाजे १३ कोटी भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर सांपत्तिक, संस्कृतिक, आणि मानवी जीवनाची मिशनरी आणि ब्रिटीशांनी जितकी हानी केली आहे त्याची गणती होऊच शकत नाही.

हे पुस्तक लहान असले तरी एक लहानसा बॉम्ब आहे, कारण यात प्रत्येक मुद्दा हा संदर्भासकट येतो. तसेच, शेवटी असलेली परिशष्टे ही परिपूर्ण आणि माहितीचा खजिना आहेत.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना या पुस्तकाबद्दल जास्तीतजास्त जागृती होणे आवश्यक आहे.

हे पुस्तक भारतीय विचार साधनाच्या संकेतस्थळावर इथे उपलब्ध आहे.

🖊️ मंदार दिलीप जोशी
श्रावण शु दशमी, शके १९४४

Friday, August 5, 2022

साम्यवाद: तोंडओळख आणि उहापोह भाग १

The conflict between communism and freedom is the problem of our time. it overshadows all other problems. this conflict mirrors our age, its toils, its tensions, its troubles, and its tasks. on the outcome of this conflict depends the future of all mankind.

साम्यवाद आणि स्वातंत्र्य यातील संघर्ष हा आपल्या काळातली अशी समस्या आहे जी इतर सगळ्या समस्यांना झाकोळून टाकते. हा संघर्ष आपल्या कालखंडाचा आणि त्यातल्या आपल्या कष्टांचा आरसा आहे. या संघर्षाचा निकाल काय लागतो त्यावर समस्त मानवजातीचे भवितव्य अवलंबून आहे.  

George Meany
President, AFL-CIO

[अमेरिकेच्या कामगार नेत्यांत विसाव्या शतकातील एक प्रमुख नेते म्हणून ज्यांचे नाव आजही मानाने घेतले जाते ते हे जॉर्ज मीनी. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत जॉर्ज तरूण वयात प्लंबर झाले. सुमारे बारा वर्षांनंतर त्याचा कामगार संघटनेत प्रवेश झाला.  त्यांनी द्वितीय विश्वयुद्धात अमेरिकेच्या राष्ट्रीय युद्ध कामगार संघटनेत (National War Labor Board) अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे (American Federation of Labor) प्रतिनिधित्व केलं. १९५२ ते १९५५ या काळात त्यांनी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबरचे अध्यक्षपद भूषवले. या संघटनेचे अमेरिकेतल्याच काँग्रेस ऑफ इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशन्स Congress of Industrial Organizations (CIO) यात विलिनीकरण होणे ही त्यांचीच कल्पना. विलिनीकरण झालेल्या AFL–CIO या संघटनेचे अध्यक्षपद त्यांनी पुढील २४ वर्ष भूषवले. कामगार चळवळ ही सचोटीपूर्ण आणि भ्रष्टाचारमुक्त असावी यावर त्यांचा भर असे. अनेक वर्ष कामगार नेता असूनही जॉर्ज हे घोर साम्यवाद विरोधी होते.]

आपल्यापैकी अनेकांचा असा समज आहे की साम्यवादी पक्ष आज फक्त केरळात सत्तेत आहेत, म्हणजे साम्यवादाचा प्रभाव आकुंचन पावत आहे आणि साम्यवादाचा पराभव झालेला आहे किंवा होत आलेला आहे. पण परिस्थिती तशी नाही. एखादा विषाणू अर्थात व्हायरस ज्याप्रमाणे स्वतः स्वतंत्रपणाने काही करु शकत नाही आणि त्याला वाढायला आणि पसरायला मानवी शरीर लागते, त्याच प्रमाणे सम्यवाद हा स्वतःच्या पक्षाच्या सत्तेत असण्यावर अवलंबून नसून थेट सत्तेत नसतानाही विविध विचारधारांच्या पक्षांत शिरून ते पक्ष आणि विचारधारा आतून पोखरून टाकण्याचे काम करत असतो. अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात. ती ही माणसेच असल्याने कधीकधी आपल्या वागण्याबोलण्यातून काही गोष्टी वेळोवेळी उघड करत असतात, त्यामुळे अशी कामे करणारी माणसे ही ओळखण्यास वेळ लागत असला तरी डोळे आणि कान उघडे ठेवल्यास ओळखता येतात. 

अमेरिकेचा सांस्कृतिक आणि पर्यायाने सामाजिक र्‍हास हा अशाच आतून पोखरल्या गेलेल्या पक्षांच्या मार्फत घडवून आणला गेलेला आहे. भारतीय परिप्रेक्ष्यात बघायला गेलं तर दुर्दैवाने हा रोग आज आपल्या देवघर, कपड्यांचं कपाट, आणि शयनगृहातही पोहोचलेला आहे (कसा ते पुढे पाहूच). तो आणखी पसरायला नको असेल, आणि अमेरिकेचा झाला तसा र्‍हास भारताचा व्हायला नको असेल तर साम्यवाद आणि त्याचे ज्ञात आणि अज्ञात जन्मदाते आणि पुरस्कर्ते यांची तोंडओळख करुन घेणे गरजेचे आहे. हा भाग मुद्दाम लहान ठेवला असून पुढच्या भागात कार्ल मार्क्स कोण होता? साम्यवादाचा तो जन्मदाता होता की त्याच्या आधी अनेक वर्ष जी विध्वंसक प्रवृत्ती बोकाळलेली होती तिला त्याने तात्त्विक मुलामा दिला आणि भरपूर लेखन केलं जे साम्यवादाचा आधार बनलं? साम्यवाद म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाची उत्तरे पाहू. पुढच्या भागात आद्य साम्यवादी, साम्यवादाचा जन्मदाता ज्याला म्हटलं जातं तो कार्ल मार्क्स आणि ज्याच्या जीवावर तो जगत असे त्या फ्रेडरिक एन्गल्स यांची ओळख करुन घेऊ.

© मंदार दिलीप जोशी
श्रावण शु. ८, शके १९४४


Monday, August 1, 2022

खर्रा इतिहास: सिलसिला ए मुरब्बा

विकेंड हिस्टोरियन लोकांच्या नादाला लागू नका. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला याचा आमच्याकडे पुरावा आहे. एकदा काय झालं की साधूवृत्तीच्या जिल्लेइलाही औरंगजेब सरांच्या सैन्य अभ्यासात लाडके थोरले बंधू दारा शिकोह अपघाती मरण पावल्यापासून औरंगजेब सर फार म्हणजे फार दु:खात होते. त्यांचं चित्र काढायला छानसा चित्रकारही मिळेना. मग शहेनशहा औरंजेब सरांनी एक आयडीया केली. ती काय ते पुढे कळेलच.

असेच काही दिवस गेल्यावर, आणि दिवस गेल्यावर, बेगम साहेब गच्चीत फेरफटका मारत असताना त्यांना महालातल्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीच्या खिडकीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. नीट लक्ष देऊन ऐकले असता एक लहान मुलगा  "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे रडता रडता म्हणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. खरं म्हणजे बेगम पहिल्या मजल्यावर जायला घाबरायच्या. त्याचं काय झालं की एकदा जिल्लेइलाही औरंगजेब सरांचे मरहूम अब्बाहुजूर.... असो. तो विषय पुन्हा केव्हातरी. 

तर धीर एकटवून त्या पहिल्या मजल्यावरच्या चौथ्या खोलीत डोकावल्या. तिथे दारा शिकोहचा थोरला सुलेमान एका बरणीकडे पाहून मोठमोठ्याने "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे म्हणत रडत असल्याचे त्यांना दिसले. जवळ जाऊन बघतात तो काय, त्या बरणीत मरहूम भाऊजींचे शिरकमल...नको कमळ नको...आपण डोकं म्हणूया. तर मरहूम भाऊजींचं डोकं एका रसायनात घालून ठेवलेलं दिसलं. ते पाहताच बेगमना परवाच कोकण सुभ्यातून सरदार जोशुद्दीन आणि सहस्त्रबुद्दीन यांनी पाठवलेल्या कैर्‍यांचे गोड काय करायचे या प्रश्नावरचा उपाय सापडला.  

"कोण आहे रे तिकडे?" असा चारपाच वेळा आवाज देऊनही कुणी ओ देत नाही म्हणून भडकलेल्या बेगमसाहेबांना आपण अजून पहिल्या मजल्यावरच आहोत याचं भान आलं आणि त्यांनी सुलेमानलाच ती बरणी घेऊन बावर्ची खान्यात पाठवलं. तिथेही लोक "म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा, म्म्म्म्म्म्म अब्बा" असे किंचाळू लागले. बेगम मागोमाग तिथे पोहोचल्या आणि खानसाम्याला नेमकं काय करायचं आहे ते समजावून सांगितलं. 

आणि अशा रीतीने "म्म्म्म्म्म्म अब्बा" या उद्गारांचा मुरांबा असा मुघली अपभ्रंश होऊन तो शब्द मान्यता पावला. मुरांब्याचा शोध मुघलांनीच लावला असल्याचे या गोष्टीवरुन सिद्ध होते. हा खरा इतिहास तुम्हाला कुणीच सांगणार नाही. 

#म्हैत_नसलेला_औरंग्या #सिलसिला_ए_मुरब्बा #दर्द_ए_पितिहास #पीदरगीराचा_म्हैत_नसलेला_इतिहास

मूळ फारसी लेखक: आकथूकुद्दीन खान
अनुवाद मनोरंजन टकले व सिमसिम मरुदे
पान ८४०, ओळ ८

© मंदार दिलीप जोशी




Tuesday, June 21, 2022

मिथुनदांची हास्यजत्रा - जीने की आरझू

एक सपेरा असतो तो राकेश रोशनच्या एरियात ट्रेसपासिंग करत असतो. त्याला राकेश रोशन 'वा' करतो म्हणून तो बीन बजाके त्याच्या पाळीव नागाला राकेश रोशनवर सोडतो. 

मग राकेश रोशन ओरडून त्याच्या ओळखीच्या...दिल करकचून थाम के बैठीये...हत्तीला बोलावतो. इतके इच्छाधारी नाग आहेत म्हणून प्रेक्षकांना बोअर होऊ नये म्हणून एक इच्छाधारी हत्ती आणलाय.

तर तो इच्छाधारी हत्ती नागाला सोंडेने लांsssब फेकून देतो आणि सपेऱ्याला ढिशुम करतो. 

इतकंच नव्हे, मेहेरबान कदरदान, दिल करकचून थाम के बैठीये, तो हत्ती त्या सपेऱ्याच्यात हातातली 'बीन' घेऊन स्वतः वाजवतो आणि आपल्या दोस्तीतल्या नागाला सपेऱ्यावर सोडतो आणि तो नाग त्या सपेऱ्याला चावून खतम करतो. 

मात्र तो सपेरा मरण्याच्या आधी आपल्या मुलाला म्हणजे मिथुन चक्रवर्तीला लांबलचक भाषण देतो. त्यावेळी तिथे त्यांची फॅमिली फ्रेंड रती अग्निहोत्री असते. मिथुन पण नाग असतो म्हणे आणि त्याने कुणा बाईला "प्यार केला" तर त्याच्या विषाने ती मरेल त्यामुळे किसीसे प्यार मत करना असं सांगून तो सपेरा (एकदाचा) मरतो. 

मिथुनला अचानक आठवतं की आपण मघाशी रानात शेण खायला गेलो होतो तेव्हा बिंदीया गोस्वामीला 'प्यार करून' आलोय. तो धावत जातो तेव्हा बिंदीया गोस्वामी काळीनिळी होऊन मरून पडलेली असते.

पुढे ऐका. दिल करकचून थाम के बैठीये. बिंदीया गोस्वामी राकेश रोशनची बहीण असते. आणि रती अग्निहोत्री आणि राकेश रोशनचं लफडं असतं.

आहेकिनै मज्जा.

मग मिथुनने आणखी एकीला प्यार करून निळी केल्यावर राकेश रोशनला संशय येतो आणि दोघांची हाणामारी होते. मिथुन मनुष्यरूपातच राकेश रोशनला चावायला जातो (शी घाणेरडा) तर राकेश रोशन बाजूला झाल्यामुळे चुकून एका केळीच्या झाडाला चावतो आणि ते झाड निळं पडतं. हे पाहून मी उगाचच हातातलं केळं खाली ठेवलं.

नंतर हृतिकचे पप्पा आणि रती अग्निहोत्री यांचं एक द्वंद्वगीत असतं. त्यात हत्तीला कंपनी म्हणून एक साक्षर माकड पण असतं. राकेश रोशनच्या वतीने परस्पर, त्याने काहीही न सांगता ते माकड हत्तीच्या अंगावर "मुझे माफ करो" असं लिहून रतीला दाखवून येतं. मग रती पाघळते. नंतर मिथुनला रती अग्निहोत्रीवर प्यार आता हय तेव्हा रतीचे साक्षर माकड मिथुनवर मुंगूस सोडतं आणि रतीला वाचवतं. 

 इंग्रजीत Arjoo ऐवजी ArZOO का लिहिलंय ते तेव्हा मला कळलं. या स्टेजला मला वाटून गेलं की सिनेमा संपता संपता पेंग्विन पण येऊन जाईल. पण तसा काही चिमित्कार बघायला नाही मिळाला.

शेवटी एकदा शंकराच्या देवळातला नाग मिथुन चक्रवर्तीला चावतो आणि त्याला पूर्णपणे माणसात आणतो आणि सिनेमा संपतो. 

🖋️ मंदार दिलीप जोशी