Thursday, February 25, 2021

स्त्रीवाद अर्थात फेमिनिझम - महिला सशक्तीकरण नव्हे तर पुरुष अशक्तीकरण

हिंदू स्त्रिया आणि पुरुषांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तथाकथित स्त्रीवाद हा हिंदू महिलांच्या सबलीकरणासाठी किंवा सक्षमीकरणासाठी नसून हिंदू पुरुषांचे म्हणजेच त्यांच्या वडील, भाऊ, पती आणि पुत्र असलेल्या पुरुषांचे आणि त्या योगाने संपूर्ण हिंदू समाजाचे अशक्तीकरण करण्याचा डाव्यांचे षडयंत्र आहे.

आज एकच मूल असलेल्या कुटुंबांत (हिंदू हे वेगळं लिहायला नको) एक मुलगी ही वेळप्रसंगी आईचे रूप धारण करु शकणारी कुणाची बहीण उरलेली नाही. मुलांचीही हीच अवस्था आहे; बहिणींचे रक्षण करायला किंवा तिच्याकडे हट्ट करायला आज अनेक घरांत बहिणीच नाहीत. अशी नाती उरलेलीच नसल्यामुळे आजची तरुण पिढी ही या नात्यांसोबत येणारी मजा, अधिकार, आणि जबाबदार्‍यांच्या तसंच त्या नात्यांच्या असण्याने आपसूक मिळणार्‍या शिक्षणापासून आणि सकारात्मक परिणामांच्या कोणत्याही जाणीवांशिवाय मोठी होत आहे. आजच्या पत्नी आणि आई असलेल्या स्त्रियांचा विचार करायचा तर पुरुषांसाठी आज फक्त मातृत्व ही एकच भावना शुद्ध स्वरूपात उरलेली आहे, कारण हल्ली प्रेयसी आणि पत्नीच्या नात्यांबरोबरच प्रेमाचं स्वरूप आज भावनिकदृष्ट्या प्रचंड व्यवहारी आणि कोरडं झालेलं आहे, आणि म्हणूनच वडील नामक व्यक्ती मुलींच्या आयुष्यात त्या नावाच्या अर्थासह असेलच असं नाही. याचं कारण शोधायला गेलं तर आजच्या तरुणींना नवरा आणि वडील या नात्यांना त्यांच्या पूर्णार्थाने अनुभवणं आणि स्वीकारणं हे कमीपणाचं वाटू लागलेलं आहे हे निदर्शनास येतं. 

इंग्रजीत एक म्हण आहे, 'Power corrupts, and absolute power corrupts absolutely' अर्थात सत्तेमुळे भ्रष्ट आचार निर्माण होतो आणि अमर्याद सत्तेमुळे अमर्याद भ्रष्ट आचार निर्माण होतोच. त्याचप्रमाणे आजचा स्त्रीवाद हा स्त्री आणि पुरुषांना कुठल्याही नात्यात एकमेकांना पूरक असण्याऐवजी स्त्रीला कुटुंबात अमर्याद अधिकार दिले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून आजचे पुरुष स्त्रैण वाटावेत इतके बुळे बनलेले आहेत, किंबहुना बनवलेले गेले आहेत. त्यातही एकच मूल असल्याने त्याला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणं हे ओघाने आलंच. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर आजच्या तरुणांना नर्ड बनवण्याच्या नादात मर्द बनवायचं बाजूला पडलेलं आहे.

आजच्या स्त्रीला मिळालेल्या अमर्याद अधिकार आणि सत्तेमुळे तिला एक प्रकारची मानसिक नशा अनुभवायला मिळत असली, तरी असा कुठलाही अनुभव तिला जीवशास्त्राशी, जनुकीय प्रेरणांशी, आणि पर्यायाने निसर्गाशी उभा दावा मांडण्याची शक्ती देत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी स्त्रैण असलेला मुलगा जेव्हा पुढे जाऊन लग्नाच्या बाजारात उभा राहतो तेव्हा इतर बाबतीत अनुरूप असलेल्या मुलीला त्याला 'पसंत' करणं अवघड होऊन बसतं (लग्नाचा बाजार म्हणजे इथे जेव्हा प्रथम भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण वाटू लागतं तेव्हापासून प्रत्यक्ष विवाह होईपर्यंतचा काळ). कारण कुठल्याही स्त्रीला अशा प्रकारचा स्त्रैण (emasculated) पुरुषाबद्दल प्रेम किंवा आकर्षण वाटणं शक्यच नसतं असा पुरुष आसपास असताना तिला (शारीरिक) सुरक्षितेची भावनाच निर्माण होत नाही. एक स्त्री म्हणून तिची अंतःप्रेरणा तिला काया, वाचा, मने अशाच पुरुषाकडे खेचूण नेते, अशा पुरुषाला शोधते जो तिचं संरक्षण करु शकेल. असा पुरुष तिला हल्ली कुठे मिळतो हे वेगळं सांगायला नको. 

इथे एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे लक्षात घेतली पाहीजे की स्त्रीमुक्तीचा भारतातला अर्थ हा हिंदू पुरुषांपासून स्त्रियांना मुक्त करुन इतरांसाठी त्यांना उपलब्ध करण्याची संधी निर्माण करणे हा आहे. स्त्रीमुक्ती या गोंडस नावाखाली ही एक निव्वळ वामपंथी चळवळ आहे जिने आपल्या देशात फक्त आणि फक्त हिंदूंचेच नुकसान केले आहे, आणि ह्या नुकसानाचा फायदा कोणाला होतो आहे ते ही दिसतच आहे, त्यामुळे डावे हे कोणाची ढाल बनले आहेत हे समजणे सोपे आहे. हे एकदा लक्षात आलं की या मागचं षडयंत्र लक्षात यायला वेळ लागणार नाही. पर्यायाने भारतातली डावी चळवळ ही हिंदूंच्या दृष्टीने विकत घेतलेले गारदी आणि पाळलेले पेंढारी ठरली आहे. 

द फेमिनिस्ट लाय - इट वॉज नेव्हर अबाऊट इक्वॅलिटी (The Feminist Lie - It Was Never About Equality) या आपल्या पुस्तकात बॉब लुईस सप्रमाण सिद्ध करतो की स्त्रीवाद म्हणजेच फेमिनिझम चळवळ ही समानतेबद्दल कधीच नसून उलट स्त्रीयांचा श्रेष्ठतावाद निर्माण करण्याचा उद्देश त्यामागे होता. हा अमेरिकन संदर्भ झाला, पण एक भारतीय म्हणून आपल्याला समानता नवीन नाही. एक सनातन संस्कृती म्हणून आपण अनेक राण्या पाहिल्या आहेत आणि शक्तिरुपेण संस्थिता अशा देवींचा आपलं रक्षण करावं म्हणून नेहमीच धावा केलेला आहे. आपली समस्या समानतेच्या नावाखाली, महिला सशक्तीकरणाच्या नावाखाली होणारे पुरुषांचे अशक्तीकरण, हतवीर्य होणं ही आहे. दुर्दैवाने हे अगदी राजरोस सुरु आहे आणि यावर आपल्याला लवकरात लवकर उपाय शोधावाच लागेल.


बॉब लुईसचे हे पुस्तक अत्यंत वाचनीय असून नेटवर विनामूल्य उपलब्ध आहे. 

आपल्याला इतिहासात अनेक उदाहरणे आहेत ज्यात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी आलेली आहे तेव्हा अनेकदा आपण देवींचा धावा केलेला आहे. महिषासुरमर्दिनी, नरकासुरमर्दिनी या देवीच होत्या. बाईचा सत्तांध बुवा आणि बुवाची अधिकारहीन बाई करणार्‍या स्त्रीवादी असुराचा वध करायलाही स्त्रियांनीच पुढाकार घ्यावा लागेल आणि त्यांना जी शस्त्रे लागतील त्याला पुरुषांना धार काढून द्यावी लागेल. फेमिनिझम हा राक्षसांची ढाल आहे, आणि राक्षसांना संपवायचं असेल तर त्यांची स्त्रीवाद ही ढाल आधी नष्ट करावी लागेल. 

🖊 मंदार दिलीप जोशी
माघ शु. १३, शके १९४२

टीपः ही पोस्ट स्त्रीवाद या विषयाकडे फक्त स्त्री नव्हे तर सर्व बाजूंनी विचार करणार्‍या लोकांसाठी आहे. "म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की...." छाप वक्तव्य करायची असतील तर कृपया पोस्टकडे दुर्लक्ष करावे.

--------------------------------------------------------------------------
संदर्भः English Version
--------------------------------------------------------------------------



Thursday, February 18, 2021

पेट्रोल

पेट्रोल जरा जास्त आहे, दर वर्षी वाटतं
'भर टाकी' म्हणताना, आभाळ मनात दाटतं

तरी काउंटर चालत राहतो... डोकं चालत नाही...
इतका वेळ विचारांशिवाय कधीच थांबत नाही...

तितक्यात कुठून एक नग पंपावर येतो...
'कर टाकी फुल' म्हणत आपली राख करतो...

आपण मग गपगुमान वर्क फ्रॉम होम करत राहतो ...
पानांफुलाझाडांना खिडकीतूनच बघत राहतो...

जानेवारी सरून फेब्रुवारीचा सुरू होतो पुन्हा खेळ...
फेब्रुवारीमागून चालत येते मार्चची असह्य घामटवेळ...

चक्क लॅपटॉपसमोर डोकं ठेऊन आपण छोटीशी डुलकी घेतो...
मिटिंगआधी टीम्समध्ये... कुठून रिमाईंडर येतो...

🖋️ मंदार दिलीप जोशी

पहिल्या दोन ओळी: Saleel Sahasrabuddhe


Tuesday, February 16, 2021

प्रियांका गांधी वड्रा, दिशा रवी, आणि टूलकिट

१९९१ साली पेरारीवलन नावाचा एक तरुण फक्त १९ वर्षांचा होता. शिवरासन नामक एका मित्राने सांगितलं म्हणून त्याने एका दुकानातून सेल विकत घेऊन त्याला दिले. शिवरासन हा राजीव गांधी हत्या खटल्यातील मुख्य आरोपी होता, आणि तपासात निष्पन्न झाल्यानुसार त्याने त्या बॅटऱ्यांचा उपयोग बॉम्बमध्ये केला होता. 

पेरारीवलन गेली तीस वर्ष तुरुंगात आहे, फक्त आपल्या मित्राने मागितले म्हणून दुकानातून सेल आणून दिले या 'गुन्ह्यात'. त्या मित्राने त्या सेलचा उपयोग बॉम्ब बनवण्यात केला म्हणून. आता पेरारीवलनला त्या सेलचा उपयोग कशात होणार आहे हे खरंच माहीत नव्हतं का या मुद्द्यावर वाद होऊ शकतो, पण त्याला संशयाचा फायदा देता आला असता जो दिला गेला नाही हे ही खरंच आहे.

त्याच राजीव गांधींच्या मुलीने आज पर्यावरण कार्यकर्ती म्हणवून घेणाऱ्या दिशा रवीला अटक केली या घटनेचा निषेध केला आहे ― कारण ती 'फक्त' २१ वर्षांची आहे म्हणून. पेरारीवलनला माहीतही नव्हतं की तो दुकानात जाऊन जे सेल विकत घेतो आहे त्यांचा उपयोग बॉम्ब बनवण्यात होणार आहे ते. पण, पण, पण, दिशा रवीला हे पूर्णपणे ठाऊक होतं की ती जे #toolkit संपादित करत आहे, त्यातले दोष दूर करून पुढे पाठवत आहे, त्याचा उपयोग पुढे देशात शांतताभंग करून देश अस्थिर करायला होणार आहे. दिशा रवी आणि ग्रेटाच्या चॅटमध्ये दिशा सरळ म्हणते की त्यांच्यावर यूएपीए लागू शकतो, वकिलांशी बोलून घेते वगैरे! म्हणजे चुकीचं काम करते आहे हे तिला माहिती होतं. 

गांधी परिवाराचं हेच वैशिष्ट्य आहे. स्वतःच्या कुटुंबाबाबत काही दुर्घटना घडली तर त्यांच्याकडून वापरले जाणारे न्यायाचे मापदंड हे देशाच्या बाबतीत घडलेल्या दुःखद घटनेच्या बाबतीत त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या मापदंडांपेक्षा खूप वेगळे असतात.

आता गांधी परिवराच्या दुटप्पीपणाबाबत आणखी एक गोष्ट सांगतो. दिनांक १८ नोव्हेंबर २००८ रोजी राजीव गांधी हत्या केसमधील आणखी एक प्रमुख आरोपी नलिनीला भेटून वडिलांच्या हत्येच्या आरोपात नलिनीला वैयक्तिक पातळीवर 'माफ करत' प्रियांका गांधींनी त्या वेळी भरपूर फुटेज खाल्लं होतं. प्रियांका गांधी-वड्रांकडे फक्त शोबाजीसाठी का होईना पण नलिनीसारख्या प्रमुख आरोपीला माफ करण्यामागे काय अजेंडा होता तो त्या आणि त्यांची मम्मी जाणे, पण फक्त मित्राला बॅटऱ्या आणून दिल्या म्हणून गेली तीस वर्ष तुरुंगात खितपत पडलेला पेरारीवलन त्यांच्या खिजगणतीतही नव्हता ही बाबही गांधी कुटुंबाच्या स्वभावाच्या टूलकिटचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावे लागेल.

📖 मंदार दिलीप जोशी


Thursday, February 11, 2021

पालीचं शेपूट आणि साम्यवाद

जगाला सतत उदो उदो करायला नायक हवे असतात आणि सगळ्या नालायकपणाचं खापर फोडायला खलनायक. मनुष्यस्वभावातला हा दुर्गुण हेरून इतिहासात प्रत्येक वेळी डावे आपली कृष्णकृत्ये व्यक्तींच्या माथी मारून नव्या रुपात नवनव्या देशांत आपल्या कारवाया करायला मोकळे झाले. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. पाल आपलं शेपूट तोडून पळून जाते आणि तुम्ही ते वळवळणारं शेपूट बघत बसता, पण पाल केव्हाच निसटलेली असते.

रशिया, चीन आणि कंबोडियात कोट्यवधी लोकांच्या हत्या स्टॅलिन, माओ, आणि पॉल पॉट यांनी नाही केल्या, साम्यवादाने केल्या; वेनेज्युएलाला गरिबीत ह्युगो चॅवेजने नाही, साम्यवादाने ढकललं. 

स्टॅलिन, माओ, पॉल पॉट, आणि ह्युगो चॅवेज ही पालीची शेपटे आहेत. त्यांना टाकून साम्यवाद-समाजवाद नामक पाल कधीच पुढे निघाली आहे. त्यांची जीवनचरित्रे वाचायची ती त्यांनी काय धोरणे राबवली याचा अभ्यास करायला, त्यांनी किती बायका केल्या आणि ठेवल्या हे चवीने चघळायला नव्हे. 

वेनेज्युएला गरीब झाला त्याचं कारण समाजवाद असफल झाला म्हणून नव्हे, तर तो सफल झाला म्हणून. कारण समाजवादाचा परिणाम नेहमीच गरिबी हाच असतो, म्हणूनच वेनेज्युएलाला तो गरिबीत ढकलण्यात यशस्वी ठरला.

समाजवादाचा उद्देश लोकांना गरीब बनवून दास्यत्वात नेणे हा असतो. म्हणूनच आधी तुमचं आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं; बाकीची स्वातंत्र्ये त्यामागोमाग जातातच. आधी तुम्ही गरीब होता, मग गुलाम. 

म्हणून सरकारकडे नोकऱ्या मागू नका. सरकारने तुम्हाला नोकरी दिली की तुम्ही सरकारचे आश्रित होता. किंबहुना नोकऱ्या देणारं फक्त सरकारच उरलं, की तुम्ही सरकारचे गुलाम व्हाल. रशिया, चीन, इत्यादी देशांच्या साम्यवादी हुकूमशहांनी फक्त बंदूक आणि छळछावण्यांत धाडण्याची भीती यावर लोकांना दहशतीत ठेवलं नव्हतं, त्यांच्या धाकाचं माध्यम फक्त पोलीस आणि फौज नव्हते, तर जनतेच्या रोजगाराच्या सगळ्या नाड्या आपल्या हातात ठेऊन त्या त्या सरकारांनी लोकांना आपल्या टाचेखाली दाबून ठेवलं होतं. कारण पाठीवर बसणाऱ्या लाथेपेक्षा पोटावर बसणारी लाथ जास्त जोरात आणि निर्णायक ठरते हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. सरकार हवं तेव्हा लोकांना उपाशी मारू शकत होती.

आज अदानी-अंबानी शेतमाल खरेदी करून त्या व्यवसायात एकाधिकारशाही प्रस्थापित करतील आणि शेतकऱ्यांचं शोषण करतील या ज्या थापा मारल्या जात आहेत त्या या आधारावर की कुणी जाऊन त्याची सत्यता तपासणार नाही. मुक्त अर्थव्यवस्थेत अर्थात ओपन मार्केट इकॉनॉमी अंतर्गत एकाधिकारशाही (monopoly) निव्वळ अशक्य आहे. एखाद्या कंपनीने एखाद्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ एकाधिकारशाही गाजवल्याचं एक तरी उदाहरण दाखवा बरं! रिलायन्सने अगदी फुकट डेटा देऊनही लोकांच्या एकाच मोबाईलमधे एक जिओ तर दुसरं वोडाफोन-आयडिया किंवा एअरटेलचं कार्ड नांदत होतं आणि बाजारात या कंपन्या सुद्धा. याचाच अर्थ असा की ओपन मार्केट इकॉनॉमी अंतर्गत कुणी समजा मोनोपॉली स्थापित करण्याच्या जवळ पोहोचला तरी त्याला स्पर्धा निर्माण होते किंवा असलेली टिकून राहते.

याच्या तुलनेत सगळं काही सरकारचं किंवा सरकारी आशीर्वादाने सुरू असल्यावर एकाधिकारशाही निर्माण होण्याचा सर्वाधिक धोका असतो. तस्मात, सरकारकडून शोषण होण्याची शक्यता ही उद्योगपती-व्यापारी यांच्याकडून शोषण होण्याच्या शक्यतेहून कितीतरी पट जास्त असते.

म्हणूनच सरकारकडे कधी रोजगार मागायला जाऊ नका. तुम्ही ज्याला सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग अर्थात पब्लिक सेक्टर समजता ते वास्तविक सरकारी उद्योग अर्थात सरकारी सेक्टर आहे. आणि ज्याला तुम्ही लौकिकार्थाने खाजगी क्षेत्र समजता तेच वास्तविक सार्वजनिक अर्थात पब्लिक सेक्टर आहे. सरकारी क्षेत्रातले फक्त पगार ही एक गोष्ट बघितली तर तुम्हाला हे नक्की पटेल.

म्हणूनच आज खाजगी क्षेत्राला कमकुवत करण्याच्या दिशेने पडणाऱ्या प्रत्येक पावलाकडे आपलं बारीक लक्ष असलं पाहिजे आणि असं करू पाहणाऱ्या प्रत्येक धोरणाला कडाडून विरोध झाला पाहिजे.

समाजवाद गरीबी आणि गुलामीकडे जाणारा गुळगुळीत रस्ता आहे. म्हणून पालीच्या शेपटीकडे नव्हे, पालीकडे लक्ष द्या.

🖋️  मंदार दिलीप जोशी
पौष अमावस्या, शके १९४२

प्रेरणा: डॉ. राजीव मिश्रा

Tuesday, February 2, 2021

समानतेचं मिथक

एका स्वतंत्र समाजात आपण आपल्या क्षमतेच्या आणि योग्यतेच्या बळावर जे मिळवायचं ते मिळवू शकतो. आता हे मात्र खरं की सगळ्यांच्या क्षमता आणि योग्यता वेगवेगळ्या असल्याने सगळ्यांच्या कर्तृत्वाचा परीघही वेगवेगळा असू शकतो.

स्वातंत्र्य आणि असमानता हातात हात घालून येतात. मात्र प्रत्येक गुलाम हा समान असतो. समाजवाद हा तुम्हाला गुलाम बनवतो.

आपल्या पुलंचे अंतु बर्वा म्हणतात त्याप्रमाणे:

"अहो, कसला समाजवाद! समाजवादाच्या गफ्फा आहेत हो गफ्फा! अहो, एक आंब्याचं पानदेखील नसतं हो दुसऱ्यासारखं. ब्रह्नदेवाच्या दरबारी प्रत्येक भांडं निराळं. सगळ्या माणसांची नशिबं सारखी होतील कशी? घटकाभर धरा, तुमचा आला समाजवाद ! तो आमचा रत्नांग्रीचा गावगांधी शिट्ट्या फुंकून फुंकून सांगतो तशी आली कोकण रेल्वे नि गेली पांडू गुरवाच्या परसातून... म्हणून काय थोट्या पांडूच्या खांद्याला हाताचे खुंट फुटणारेत काय? आणि हात नाहीत म्हणजे मग कसेल त्याची जमीन नि दिसेल त्याची थैली ह्या तुमच्या राज्यात थोटा पांडू कसणार कसा आणि काय? तो तसाच राहायचा! स्वराज्य आलं म्हणून हरी साठ्याचा तिरळा डोळा सरळ झाला नाही नि महादेव गडबोल्याचं दोंद आत नाही गेलं! हे डावंउजवं राहायचंच समाजात! अहो, रामराज्यातदेखील मारूतीचं शेपूट उपटून रामानं आपल्या पाठीस नाही जोडलं, हा नरच राहिला नि तो वानरच राहिला."

आणि साम्यवाद हा गुलामी चांगली कशी हे मनावर बिंबवतो. आपण हलाखीच्या जगण्यातून वर आलं पाहिजे हा विचार तुमच्या मनात येऊच न देता आपण हलाखीत आहोत म्हणजे इतरांनाही त्याच पातळीवर आणण्याची वृत्ती तुमच्यात साम्यवाद बाणवतो. 

मग चित्रात दाखवल्याप्रमाणे काम करायची क्षमता नसेल तर कामच नको ही वृत्ती अखेर तुम्हाला भिकेला लावते.

प्रेरणा: डॉ राजीव मिश्रा

🖋️ मंदार दिलीप जोशी

Tuesday, January 19, 2021

साम्यवाद आणि भंपकपणा: मोदी, हिटलर, आणि फॅसिझम

आपण अनेकदा बघतो की डावे आणि इतर विरोधक मोदीजी त्यांच्या मनासारखे वागत नाहीत म्हणून त्यांना नावे ठेवताना हिटलर आणि फॅसिस्ट म्हणतात. असं म्हणताना हिटलरला सरकटपणे फॅसिस्ट (Fascist) ठरवलं जातं. हे कितपत सत्य आहे? मुळात हे बरोबर आहे की नाही? हिटलर खरंच फॅसिस्ट होता का? बहुतांश लोकांना या शब्दांचा अर्थ किंवा फरकच  मुळात कळत नसतो ही डाव्यांनी निर्माण केलेल्या इंग्रजीत ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो त्याची कमाल आहे.

चला, काही मूलभूत तथ्यांकडे आपण पाहू. 

(१) हिटलरच्या पक्षाचं नाव होतं National Socialist German Workers' Party (जर्मन नावः Nationalsozialistische Deutsche Arbeiterpartei किंवा NSDAP).
(२) मुसोलिनीच्या पक्षाचं नाव होतं National Fascist Party (इटालियन नाव: Partito Nazionale Fascista, PNF).

लोकांना आपल्याकडे फॅसिस्ट म्हटलं की हिटलर का आठवतो? हिटलर हा प्रत्यक्षात सोशलिस्ट अर्थात समाजवादी असताना फॅसिस्ट कसा? 

इथे जरा वेगळ्या पद्धतीने विचार करुन बघूया.

दुसरं विश्वयुद्ध जिंकणार्‍या दोस्त राष्ट्रांमधला एक देश होता USSR -यूनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक्स. इथे सोशलिस्ट अर्थात समाजवादी या शब्दाला महत्त्व आहे, कारण तो रशियन विस्तारवादाचं द्योतक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकायला काढलेला एक ब्रँड आहे. 

आता पुन्हा हिटलर सोशलिस्ट होता या मुद्द्याकडे येऊ. हिटलर सोशलिस्ट होता आणि रशियन सोशलिस्ट होते तर दोघं युद्धात विरुद्ध पक्षात कसे? हिटलर जरी सोशलिस्ट असला तरी त्यात त्याची स्वतःची अशी राजकीय आणि आर्थिक विचारसरणी होतीच की. Gottfried Feder नामक एक व्यक्ती त्याचा आर्थिक सल्लागार होता, आणि त्याचं Manifesto for abolition of interest slavery हे पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे. अर्थात, हिटलर हा पूर्णपणे फेडेरच्या सल्ल्याने चालत असे असं नाही, त्याचे इतर सल्लागार होतेच. एक गोष्ट आत्ताच स्पष्ट करु इच्छितो की इथे ना हिटलरचं समर्थन आहे ना फेडेरचे. इथे फक्त लक्षात आणून द्यायचा उद्देश आहे की ज्यू लोकांच्या खर्‍या खोट्या 'व्याजखोर सावकारी पाशा'विरोधात त्याने जर्मनीत रान उठवून जर्मन जनतेला त्यांच्याविरुद्ध भडकावण्यात तो यशस्वी ठरला होता. आता ज्यू लोक खरंच व्याजखोर होते का याचा आत्ता इथे पुरावा सादर करणं अवघड आहे, पण पूर्ण युरोपात ज्यू आपल्या व्याजखोर सावकारीसाठी बदनाम होते हे मात्र तत्कालीन संदर्भ आणि साहित्यातून आपल्याला दिसतं. याचं ठळक उदाहरण म्हणजे शेक्सपियरने देखील आपल्या 'मर्चंड ऑफ व्हेनिस' या नाटकातला शायलॉक हा खलनायक ज्यूच दाखवला होता.

आता सोशलिझमकडे परत येऊया. हिटलरच्या पक्षाच्या नावात समाजवादी हा शब्द होता आणि आपल्या घोषणापत्रात त्या पक्षाने समाजवादाच्याच मार्गाने जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हिटलर स्वतःला खराखुरा समाजवादी म्हणवून घ्यायचा आणि रशियाच्या समाजवादाला 'बोल्शेविक कम्युनिझम' असं म्हणून हिणवायचा. असं असलं तरी साम्यवाद्यांनी हिटलरच्या नाझी पक्षाशी शय्यासोबत करण्यात कुठलाच विधीनिषेध बाळगला नाही. 

इथे डावे/साम्यवादी यांचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्यावं लागेल आणि ते म्हणजे आपल्या विचारसरणीला पर्याय किंवा प्रतिस्पर्धी उभा राहू न देणं. हिटलरला सुद्धा सोशलिस्ट म्हणून म्हणून प्रसिद्धी मिळाली असती तर रशियन ब्रँडच्या सोशलिझमला अर्थात समाजवादाला एक पर्याय उपलब्ध झाला असता. रशियाने आपल्या ब्रँडच्या सोशलिझमचं मार्केटिंग केलं असतं आणि हिटलरने आपल्या ब्रँडच्या समाजवादाची टिमकी वाजवली असती. डाव्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजूही मंजूर नसतात (अगदी भारतात सुद्धा जे वेगवेगळे कम्युनिस्ट पक्ष आणि गट आहेत, त्यांच्यातही जी फूट पडलेली आहे, ती याच स्वरूपाची आहे). म्हणून मग त्यावेळच्या ताकदवान रशियाप्रणित समाजवाद्यांनी हिटलरला फॅसिस्ट लेबल लावून टाकलं. अर्थात हिटलर आणि मुसोलिनी यांची दुसर्‍या विश्वयुद्धात महाविनाशआघाडी झाल्यामुळे तसा प्रचार करणं हे रशियाप्रणित डाव्यांना सोपंही गेलं. त्यात भर म्हणजे साम्यवादी रशियाचं आणि हिटलरप्रणित समाजवादाशी असलेल्या वैराचं युद्धात रुपांतर झालं ते त्याने रशिया आणि जर्मनीमधे झालेला अनाक्रमणाचा करार मोडून थेट रशियावर हल्ला चढवल्यावर. पुढे विश्वयुद्धात दारूण पराभव झाल्याने जर्मन जिथे स्वतःला नाझी म्हणवून घ्यायला लाजत आणि मुख्य म्हणजे घाबरत होते तिथे साम्यवादी रशियाचा हा प्रचार रोखायची इच्छा होणे तर सोडाच आणि संधी सुद्धा कुणालाच मिळाली नसली तर आश्चर्य नव्हतं. 


इथे नाझी लोकांची भलामण करण्याचा हेतू नाही. फक्त डाव्यांच्या कंपूतील विसंवाद आणि शत्रुत्व दाखवायला वरील उदाहरण दिले. नाझी लोकांनी की पापं केली आहेत त्याबद्दल त्यांना मिळालेल्या शिक्षा सुद्धा सौम्यच म्हणायला हव्यात. 

Umberto Eco नामक एक प्रसिद्ध कम्युनिस्ट 'विचारवंत' होऊन गेले. त्यांनी फॅसिझमची १४ लक्षणे लिहीली आहेत. Ur-Fascism अशा नावाने शोध घेतल्यास सहज सापडतील. ती वाचली आणि एकंदर साम्यवादाचा इतिहास बघितला तर नाझी आणि साम्यवादी हे सरळसरळ एकाच माळेचे मणी असल्याचं लक्षात येईल. लालभाई असोत की हिरवे, तुम्हाला पर्याय मिळू देत नाहीत. तुमच्याकडे जी व्यवस्था आहे तिचे दोष सतत तुमच्या पुढ्यात उगाळत राहतील. तुम्हाला सतत उचकवत राहतील की तुमच्या समस्येचे कारण तुम्ही स्वीकारलेली व्यवस्था आहे आणि ती उलथवून लावणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांची व्यवस्था स्वीकार केलीत की तुमच्या सगळ्या समस्या सुटतील. त्यांची व्यवस्था आल्यावर तुमच्या समस्या जराही सुटल्या नाहीत आणि तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत केलीत तर चक्क तुम्हालाच एक समस्या ठरवून संपवलं जाईल. कारण आम्ही समस्या संपवतो हे ते नेहमी गर्वाने सांगत असतात (गंमतीची गोष्ट अशी की समाजवाद/साम्यवाद स्वीकारलेल्या एकाही देशाचं आजवर भलं झालेलं नाही उलट तो देश आर्थिक खड्ड्यातच गेलेला आहे ही गोष्ट वेगळी).  

रशियन डाव्यांचं पाप हे आहे की फॅसिझमला लक्ष्यस करण्याच्या नादात त्यांनी राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्तीला सुद्धा जवळजवळ एखाद्या गुन्ह्यासारखं बदनाम केलं. पण मग मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट का म्हणतात? सोपं आहे. हिटलरच्या जर्मनीचा नाझी पक्ष आणि इटलीच्या मुसोलिनीचा फॅसिस्ट पक्ष हे दोन्ही प्रखर राष्ट्रवादी आणि देशभक्त होते. यातूनच प्रेरणा घेऊन मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं जातं, कारण मोदी हे इतर पंतप्रधानांपेक्षा कडक शिस्तीचे आणि प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रभक्त आहेत, तसंच ते जनतेतही या ना त्या कारणाने राष्ट्रभावना जागृत करत असतात. आजही कुणाचा आवाज बंद करायचा असेल तर त्याला फॅसिस्ट म्हटलं की गप्प करता येतं. एखादा फारच चिवट निघाला तर तू राष्ट्रवादी आहेस म्हणजे तू फॅसिस्ट आहेस हे सिद्ध झालं असं होतं. थोडक्यात, राष्ट्रवाद हा फॅसिझ्मला जोडणे आणि त्या अनुषंगाने नॅरेटिव्हची मांडणी करण्यात डाव्यांनी इतरांवर घेतलेली आघाडी लक्षणीय आहे. कम्युनिस्ट किती नीच असतात हे या उदाहरणावरुन आपल्याला लक्षात येईल. या बाबतीत कम्युनिष्ठांची स्पर्धा फक्त कौमनिष्ठच करु शकतात.

तात्पर्यः आता कुणी मोदींना हिटलर आणि फॅसिस्ट म्हटलं की हिटलर आणि मुसोलिनीच्या पक्षांची पूर्ण नावे आणि सोवियत रशियाचे पूर्ण नाव तोंडावर फेकून मारा. 

पुढच्या लेखात फॅसिझमबद्दल विस्ताराने पाहूया.

© मंदार दिलीप जोशी

ता.क.: हिटलर आणि शिस्त आणि राष्ट्रवाद यांबद्दल उहापोह करणारा आणखी एक लेख इथे वाचता येईल.