Friday, May 17, 2019

Sunday, May 5, 2019

जागतिक हास्यदिनाच्या निमित्ताने - टवाळा आवडे विनोद अर्थात समर्थ रामदास स्वामी आणि विनोद

समर्थ रामदासस्वामी हे विनोद करण्याच्या विरोधात होते असा अपप्रचार जाणता अजाणता अनेक जण करताना दिसतात. त्याकरता त्यांच्याच "टवाळा आवडे विनोद" या शब्दांचा आधार घेतला जातो.

समर्थांनी समर्थ रामदासस्वामींनी इतकं काही लिहून ठेवलेलं आहे की घरात, समाजात वावरण्याकरता मार्गदर्शनात्मक असं इतर काही वाचलं नाही तरी चालेल असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते सगळंच्या सगळं फक्त वाचायचं म्हटलं तरी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अंमळ अवघडच आहे. कदाचित म्हणूनच इतक्या अभ्यासू, दिव्यत्वाची प्रचिती घेतलेला विद्वान संत विनोदासारख्या निर्मळ आणि आनंद देणार्‍या गोष्टीच्या विरोधात कसा असेल अशी शंका बर्‍याच लोकांच्या मनात डोकावलेली दिसत नाही.

समर्थांचे लिखाण पूर्ण न वाचताच दासबोधातील  दशक ७, समास ९ यातील "टवाळा आवडे विनोद" हे वाक्य बाजूला काढून जे टवाळ असतात त्यांनाच विनोद आवडतात किंवा विनोद आवडणारे सगळे टवाळ असतात असे अर्थ लावून ते प्रसारित केलं गेलं. अशा लोकांकरता इथे समर्थांनीच लिहून ठेवलेलं आहे शब्दात सांगायचं तर "पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।  तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ।।" अर्थात, अशा विपर्यास करणारे प्रत्येक वेळी मत्सरी दुरात्मे असतीलच असं नव्हे, अनेकदा ते निव्वळ अज्ञानापोटी केलेलं विधान आहे असंही आढळून येतं. इतकं आध्यात्मिक, गंभीर लिखाण करणार्‍या समर्थांना विनोद आवडत नसावा हे आणखी एक गृहतिक हे वाक्य वेगळं काढून प्रसारित करण्यामागे असावं. पण खरंच समर्थ रामदास स्वामींना विनोद आवडत नव्हता का? ते हास्यविनोदाच्या विरोधात होते का?

वास्तविक समर्थांच्या पूर्ण वाङ्मयात त्यांनी कुठेही विनोदाची किंवा विनोदनिर्मितीची किंवा तो करणार्‍याची निंदा केलेली नाही. दासबोधातील दशक सातवा समास नववा यात  कुणाकुणाला काय काय आवडते त्याचे विवेचन समर्थांनी केलेले आहे. समर्थांनी टवाळ नक्की कुणाला म्हटलं आहे आणि कोणत्या संदर्भात म्हटलं आहे ती आणि त्या नंतरची ओवी मुळातून वाचल्यास याचं उत्तर आपल्याला मिळतं. त्या दोन ओव्या :

टवाळां आवडे विनोद | उन्मत्तास नाना छंद | तामसास अप्रमाद | गोड वाटे ||५१||
मूर्ख होये नादलुब्धी | निंदक पाहे उणी संधी | पापी पाहे पापबुद्धि | लाऊन आंगीं ||५२||

५१ - उन्मत्त, माजोरड्या माणसांना नाना छंद असतात किंवा आवडतात. इथे छंद याचा अर्थ आजच्या भाषेत येडेचाळे किंवा लहरीमुळे केलेली विचित्र कृते असा घ्यावा. तामसी माणसाला शांत, संयमी राहणे जमत नाही. तो सतत दुष्टकर्माकडेच आकर्षिला जातो. समर्थांना इथे हे सांगायचं आहे की त्याचप्रमाणे टवाळ माणसाला येता जाता हलक्या दर्जाचा, विकृत अशा स्वरूपाचा विनोद करायला आणि इतरांना सांगायला आवडतं.

५२ - मूर्ख लोक नादलुब्धी असतात, निंदक नेहमीच दुसर्‍याच्या उणीवा शोधण्याच्या संधी शोधत असतो, त्याला त्यातच रस असतो. तर पापी माणूस दुसर्‍याचीही बुद्धी भ्रष्ट करुन तिचे रूपांतर पापबुद्धीत करण्यात दंग राहतो.

याचा अर्थ याचा अर्थ ज्याला विनोद आवडतो, तो टवाळच असतो असा त्याचा अर्थ खचितच होत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे समर्थ रामदासस्वामींचे साहित्य आणि त्यांचे आयुष्य पाहील्यास ते अगदी गंभीर प्रवृत्तीचे असतील असा निष्कर्ष काढणे उथळपणाचे ठरेल. समर्थ अशा प्रकारच्या विनोदाबद्दल काय विवेचन करतात ते मूर्खलक्षणांत अर्थात दुसर्‍या दशकात आपल्याला सापडतं. त्यातल्याही या दोन ओव्या प्रातिनिधिक म्हणाव्या लागतील:

विनोदार्थीं भरे मन | शृंघारिक करी गायेन | राग रंग तान मान | तो रजोगुण ||२४||
टवाळी ढवाळी निंदा | सांगणें घडे वेवादा | हास्य विनोद करी सर्वदा | तो रजोगुण ||२५||

सतत विनोदांत रमावेसे वाटते, विविध रंगाची व रागतालयुक्त श्रृंगारिक गायनाची गोडी वाटत राहते, तो रजोगुण होय (इथे सतत हा शब्द महत्त्वाचा). टिंगल, टवाळी, निंदा करण्यात, वादविवादात जिंकल्याचा किस्सा गर्वाने सांगण्याची आवड असते, हास्य विनोदात रमावेसे वाटते, तो रजोगुण होय.

रामदास स्वामी शिस्तप्रिय आणि बलोपासनेचे भोक्ते असले तरी ते तितकेच आयुष्याचा निर्मळ आनंद घेणारे होते. त्यांच्या या स्वभावाचे दर्शन घडविणाऱ्या अनेक घटना त्यांच्या चरित्रग्रंथांत नोंदवलेल्या आहेत. पण समर्थांनी विनोदाबद्दल काही लिहिलं आहे का हे पाहूया. पण त्या आधी एक गोष्ट पुन्हा लक्षात घेतली पाहीजे की समर्थांचा कटाक्ष येता जाता सतत टिंगल टवाळकीच्या स्वरुपात केल्या जाणार्‍या विकृत विनोदाकडे होता. निखळ विनोदाला समर्थांनी नेहमीच पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेले दिसेल.

मूर्खांची आणि पढतमूर्खांची लक्षणे सांगताना समर्थ एखाद्या गोष्टीच्या खोलात न जाता उथळपणा करणार्‍या मनुष्यांच्या विरोधाभासाने भरलेल्या वागण्याला सणसणीत टोमणे मारायला कमी करत नाहीत. हा ही विनोदाचाच एक प्रकार होय. जाता जाता त्या संदर्भातल्या दशक पाचवा समास तिसरा (६६) यात समर्थ काय म्हणतात ते पाहूया:

काखे घेऊनियां दारा | म्हणे मज संन्यासी करा | तैसा विषई सैरावैरा | ज्ञान बडबडी ||६६||
असो ऐसे पढतमूर्ख | ते काय जाणती अद्वैतसुख | नारकी प्राणी नर्क | भोगिती स्वइच्छा ||६७||

बायकोच्या कमरेला हाताने विळखा घालून मला संन्यासदीक्षा द्या असं एखादा म्हणतो, तसं विषयासक्त अज्ञानी माणूस आत्मज्ञानाची स्वैर बडबड करीत सुटतो. एकूण काय तर या पढतमूर्ख लोकांना अद्वैतानुभवाचं सुख कसं माहित असावे ? नरकातील प्राणी स्वतःच्या इच्छेने नरकाचे दुःख भोगत असतात.

शेवटी समर्थांनी विनोदाबद्दल काय लिहिले आहे, किंबहुना विनोदाचे समर्थन केले आहे का, त्याला स्पष्ट शब्दात प्रोत्साहन कसे दिले आहे ते पाहणे योग्य ठरेल. दासबोध दशक चौथा समास दुसरा (१४) यात समर्थ कीर्तन कसे करावे, कीर्तन नीरस होऊ नये म्हणून त्यात रंग कसे भरावे याचे जे विवेचन करतात ते संदर्भाकरता उपयुक्त असले तरी विस्तारभयास्तव संपूर्ण इथे देत नाही. पण त्यात ते विनोदाबद्दल म्हणतात तेवढं पाहूया:

पदें दोहडें श्लोक प्रबंद | धाटी मुद्रा अनेक छंद |
बीरभाटिव विनोद | प्रसंगें करावे ||१४||

भावभक्तियुक्त पदे, दोहे, श्लोक, धाटी, मुद्रा आणि छंद यांचा समावेश कथेत असावा. प्रसंगानुरुप चेहर्‍यावर वीर, हास्य इत्यादि रसाचा उपयोग करत कथेत विनोदाने रंग भरावा. यात समर्थांनी कीर्तन रंगवण्याकरता म्हणजे रंजक करण्याकरता इतर गोष्टींबरोबरच विनोदाचाही वापर करावा असं थेट आणि स्पष्टपणे म्हटलं आहे. असे समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात कसे असतील बरे? अशा अनेक ओव्यांची उदाहरणे दासबोधात आणि समर्थ साहित्यात अनेक ठिकाणी आढळतील.

प्रत्यक्ष समर्थ साहित्यातून घेतलेल्या वरील उदाहरणांवरुन हे स्पष्ट होईल की समर्थ रामदास स्वामी विनोदाच्या विरोधात तर नव्हतेच, उलट त्यांना विनोद आवडतच होता.

© मंदार दिलीप जोशी
वैशाख शु १, शके १९४१

संदर्भः श्रीमत् ग्रंथराज दासबोध - http://www.dasbodh.com/
विशेष आभारः कीर्तनकार श्री समीर लिमये.

Thursday, March 28, 2019

सबद सबद हर कोई कहे

अधूनमधून कधीतरी ऑनलाईन वैफल्याचा किंवा वैराग्याचा झटका येतो आणि असा विचार येतो की आपण जे फेसबुकवर राजकीय, धार्मिक, विनोदी पोस्ट करत असतो किंवा Meme टाकत असतो, किंवा क्वचित कौटुंबिकही पोस्ट करत असतो, ते टाकू नये, काय फायदा?

अशाच मनस्थितीत असताना एका व्यक्तीच्या वॉलवर काहीतरी विपरीत घडल्याचं वाचलं जातं. इनबॉक्समध्ये चौकशी केल्यावर कळतं त्या व्यक्तीच्या बाबांचं नुकतंच निधन झालेलं आहे. ती व्यक्ती म्हणते की माझे बाबा आजारी असताना मी काही वेळा तुझ्या राजकीय आणि विनोदी दोन्ही पोस्ट त्यांना मी वाचून दाखवत असे. तुझ्या विनोदी पोस्ट ऐकून आणि Meme त्यांना दाखवल्यावर ते माझ्याबरोबर खूप हसायचे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणायचं श्रेय तुला जातं. तुझ्याच एका पोस्टमुळे बाबा गेल्यावर आईच्या चेहर्‍यावरचं लोपलेलं हसू परत आलं आणि आई पुन्हा आनंदी दिसू लागली (तिचे शब्द - she became jovial). त्याबद्दल तुझे खरंच आभार आहेत.

गंमत म्हणजे या व्यक्तीला मी कधी भेटलोही नाहीये आणि ऑनलाईन वगळता ओळखही नाही. पण बोलून दाखवणारी ही पहिलीच व्यक्ती भेटली आहे. असा आनंद नकळत किती जणांना वाटला गेला असेल ते त्या गजाननालाच माहीत. तो सुखकर्ता तो दु:खहर्ता. तोच कर्ता तोच करविता.

संत कबीरांचे शब्द आहेत:
सबद हर कोई कहे
सबद के हाथ न पांव
एक सबद औषध करे
एक सबद करे घांव

किती खोल अर्थ भरलेला आहे या दोह्यात!  बाहेरून घरी आलेल्या नवरा, बायको, वडील, भाऊ, बहीण, वहिनी, दीर, सासू, सासरे, मित्र, मैत्रीण, किंवा अगदी शेजार्‍यालाही अशा कुणालाही तो एकदम ताजातवाना दिसत असला तरी "कसे आहात? दमलेले दिसता? आराम करा जरा." असं म्हणालात तर ती व्यक्ती आणखी प्रसन्न होईल आणि दमलेली असेल तर खरंच ताजेतवाने वाटू लागेल. अर्थात, "एक सबद औषधि करे". एक शब्द औषधासारखा काम करतो. मात्र हे औषध एकदाच लावून भागत नाही. ते वारंवार लावावं लागतं. हेच मनाचं औषध.

एक सबद करे घाव...पण घाव घालायला मात्र एखादाच शब्द पुरतो. गजाननाकडे प्रार्थना आहे की माझ्याकडून वापरले गेलेले सबद 'एक सबद औषध करे' असे आनंद देणारेच असूदेत.  आणि चुकूनही स्वतःहून 'एक सबद करे घांव' होऊ नये.

आणि अशा रीतीने ऑनलाईन वैफल्य, वैराग्य चुलीत घालून मी परत फेसबुकवर, सोशल मिडीयावर तुम्हाला 'पिडायला' हजर!




© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ ८, शके १९४०

Monday, February 11, 2019

का रे भुललासी वरलिया रंगा: अमोल पालेकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं प्रवचन

कालच प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते-दिग्दर्शक अमोल पालेकरांनी चित्रकार कै. प्रभाकर बर्वे यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात भलतीच टेप वाजवल्याने आयोजकांनी त्यांना विषयाला धरून बोलायचा आग्रह केला यावरून देशात गदारोळ उडाला (देशात म्हणजे ज्यांना याची काही पडली आहे अशा विश्वात, बाकी आमच्या कामवालीला अमोल पालेकर कोण हे ही माहीत नाही. तर ते असो). अमोल पालेकरांच्या कृत्याचं मुद्देसूद खंडन ते सात्विक संतापातून प्रच्छन्न शिवीगाळ अशा सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावर उमटल्या.
खूप पूर्वीपासून रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या चेहऱ्यांबद्दल आपल्याकडे प्रचंड गैरसमज दिसून येतात.



यातला प्रमुख गैरसमज असा की विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरातल्या, जातीधर्माच्या, आणि बुद्धीच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या व्यक्तींना आपण सर्वज्ञ समजण्याची चूक करत आलो आहोत. त्यातही तथाकथित कलात्मक चित्रपटांबाबत ते सत्य दाखवतात हा आणि त्यात 'अभिनय' करणारे लोक म्हणजे बुद्धिजीवी आहेत हा सगळ्यात मोठा गैरसमज. गरीब आणि मध्यमवर्गांचं प्रतिबिंब दिसेल असे सिनेमे असतील तर मग काही विचारायलाच नको, लोकांनी डोक्यावर घेतले होते असे सिनेमे. उगाच नाही विक्रमी 'शोले' समोर 'गोलमाल'ने टिच्चून धंदा केला.

याबाबत नसीम निकोलस तलेब या मूळच्या लेबनीज अमेरिकन असलेल्या लेखक, विद्वान, सांख्यिकी तज्ञ, अर्थतज्ज्ञ, शेअर बाजार व्यापारी, वगैरे बरंच काही असणाऱ्या या विचारवंताचे विचार वाचण्यासारखे आहेत. नट नट्यांच्या विषयीचे त्यांचे विचार हे प्रामुख्याने हॉलीवूड अर्थात अमेरिकन चित्रपट उद्योगाशी संबंधित असले तरी कलाकारांची मानसिकता आणि समज ही नेहमीच स्थलातीत असल्याने भारतवर्षातील कुठल्याही चित्रपट उद्योगाला लागू होतात.

तलेब म्हणतात की "चित्रपटसृष्टीत काय घडतं याचा आणि आपण सर्वसामान्य लोक यांचा काहीही संबंध नसतो. तलेब  आपल्याला दोन प्रश्न विचारतात: एक तुमच्या मित्रपरिवारात किती अभिनेते आहेत? किती अभिनेते तुमच्या मित्रांचे मित्र आहेत? यात अस्तित्व आणि प्रचलन (presence and prevalence) यात गल्लत करू नये. काही अपवाद वगळता नटनट्या सामान्य लोकांत मिसळत नाहीत."

"रोमन साम्राज्यात तर नटांना लग्न करायलाही बंदी होती, इतकंच नव्हे तर त्यांना सर्वसामान्य जनतेशी मिसळायलाही बंदी असे. तुम्हाला एखादा स्त्रीरोगतज्ञ आणि इंजिनियर, गवंडी आणि वाहनचालक एकमेकांत मिसळताना दिसतील, पण अभिनेते हे त्यांच्याच जगात मशगुल दिसतात. किती क्षेत्र अशी आहेत जिथे लोकांना त्यांच्या दिसण्यावर आणि आपण जे नाही त्याचा अभिनय करण्यावर काम दिलं जातं? किती क्षेत्रात शरीराचा 'वापर' हा वर चढण्याकरता केला जातो?"

"इतर क्षेत्रातले लोक, उदाहरणार्थ स्त्रीरोगतज्ञ किंवा रेल्वे अभियंते, आपल्याला नैतिकतेची प्रवचनं देताना दिसत नाहीत. खरं तर बाह्य दिसणे यावरच ज्यांचं सगळं जग अवलंबून आहे अशा या प्रत्यक्ष वर्तन आणि वैयक्तिक मते यांच्यात प्रचंड तफावत असलेल्या या लोकांना आपल्याला नैतिकतेचे धडे देण्याचा काहीही अधिकार नाही."
मात्र नटनट्या हीच गोष्ट प्रत्येक सार्वजनिक मंचावर वारंवार करताना दिसतात आणि भोळसट (की बावळट?) लोक त्याला तितक्याच सातत्याने भुलताना दिसतात. याचं कारण म्हणजे नटनट्यांना आपला मंदपणा बाहेर दिसू नये याचं प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यामुळे ते काहीही बडबडले तरी एखादा अत्यंत बुद्धिमान आणि विचारी माणूस आपल्याशी संवाद साधतो आहे असा भास निर्माण करण्यात ते यशस्वी ठरतात.

हा कार्यकारणभाव लक्षात घेतला की पैसे टाकून बनवलेला सिनेमा आणि विचारवंतांचा अभिनय करायला वर्षानुवर्ष पोसलेल्या नटनट्यांची अशी हंगामी वक्तव्य यात फारसा फरक उरत नाही हे आपल्याला समजतं.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे यातल्या बहुतेकांचा स्वभाव मुळातच विकृत आणि द्वेषाने भरलेला असतो आणि त्याला अनेक वर्ष पद्धतशीर खतपाणी मिळालेलं असतं.

म्हणूनच मग जाड काळ्या फ्रेमचा चष्मा लावलेला, पांढऱ्या केसांचा/ची, भलंमोठं कुंकू लावलेली, दाढीवाला, अशी कोणतीही आजी किंवा माजी नटमोगरी किंवा टोणगा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असहिष्णुता, वगैरे पढवलेली 'पेड' वाक्य बोलताना दिसले की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. कारण 'बनवलेला' सिनेमा कुणी बघायलाच गेलं नाही तर तो आपटतो, आणि यांच्या वक्तव्याला भाव दिला नाही की ते हवेत विरून जातं.

आपण फार मनावर न घेता एवढंच लक्षात घ्यायचं ―
तो धंदा असतो आणि हा सुद्धा, फक्त चेहऱ्याला रंग फासून ज्या बाजारात बसायचं त्याचं ठिकाण प्रत्येक पटकथेच्या मागणीनुसार वेगळं असतं इतकंच.



©️ मंदार दिलीप जोशी
माघ शु. पंचमी शके १९४०

तळटीप: अपवादांनी वरील विवेचन स्वतःवर ओढवून घेऊ नये.

Thursday, January 17, 2019

वामपंथी भारत विखंडन ४ - कम्युनिस्टांचं आणि पितृसत्ताक पद्धतीचं एवढं काय हो वाकडं?


राजीव मिश्रांची ही पोस्ट वाचल्यावर आधी फारशी पटली नाही, कारण अनुभव त्याच्या बरोबर उलट होते. मात्र ही पोस्ट पुन्हा पुन्हा वाचल्यावर आणि बराच विचार केल्यावर त्यातला मतितार्थ लक्षात आला. अर्थात पोस्टमधे काही मुद्द्यांचा राजीवजींनी उल्लेख केलेला नाही, पण एका जुन्या लेखाची आठवण झाल्यावर ट्युब पेटली.


साम्यवादी फ्रैंकफर्ट स्कूलचा विद्वान मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम्म याच्या म्हणण्यानुसार - "आईच्या प्रेमाच्या बरोब्बर विरुद्ध वडिलांचं प्रेम असतं. वडिलांचं प्रेम हे 'अटी आणि नियम लागू' यात मोडतं. यातला सगळ्यात त्रासदायक प्रमार हा की वडिलांचं प्रेम मिळायला मुलांना त्याच्या लायक बनावं लागतं. जर तुम्ही ऐदी आणि नालायक निपजलात तर तुम्हाला वडिलांचं प्रेम मिळत नाही....पण काही झालं तरी आईचं प्रेम मात्र मिळतंच.
हे एक अचानक केलेलं निरीक्षण नव्हे, तर साम्यवादाच्या संपूर्ण विचारसरणीच्या केंद्रस्थानी असलेला हा विचार आहे. फ्रैंकफर्ट स्कूलच्या विचारवंतांचं आयुष्य बघितलं तर एकाचंही आपल्या बापाशी पटलं नाही. जवळजवळ सगळी श्रीमंत बापाची बिघडलेली कार्टी होती. त्यांच्यापैकी एकालाही कामधंदा करायची कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती. सगळेच्या सगळे बापाच्या पैशावर ऐश करण्यात धन्यता मानत असत. या सगळ्यांच्या तीर्थरुपांना असं वाटत असे की आपल्या मुलाने काहीतरी कामधंदा करावा, पण हे मात्र आपल्या कष्टाने यशस्वी आणि श्रीमंत झालेल्या बापाचा दुस्वास करत.

यांच्या ऐश करण्याला काही मर्यादाच नव्हत्या. रंडीबाजी, दारूबाजी आणि सर्व प्रकारची व्यसने असलेले, आणि उपजिविकेसाठी काम करणं म्हणजे काहीतरी क्षुद्र प्रकार आहे असं समजणारे हे सम्यवादी विद्वान, आपल्या दैनंदिन खर्चाचे पैसे मात्र त्याच बापाकडून घ्यायचे. जर्मनीने युद्धात पडणे, लढणे, हरणे, आणि त्यानंतर कर्ज, गरीबी आणि मंदीत बुडणे या प्रकारांचा कुठलाही विपरीत परिणाम न झालेल्या गर्भश्रीमंत ज्यूंच्या या नतद्रष्ट अवलादी होत. यांचं आयुष्य म्हणजे ऐषआरामाच्या एका गटारगंगेतून न्हाऊन पुन्हा दुसर्या ऐषारामाच्या गटारगंगेत उडी हेच होतं. यातूनच साम्यवाद्यांच्या क्रिटिकल थिअरीचा जन्म झाला ज्यात pratyek समाजात मान्यता असलेल्या प्रत्येक संस्कार आणि मर्यादा यांना तिलांजली देण्याचा पुरस्कार केला गेलेला आहे.
अशा नालायकांना बापाचं प्रेम कसं मिळणार होतं? वेगळं सांगायला नको की आपापल्या बापांशी यांचे संबंध ताणलेलेच होते.

समाजात विकृत लोकांचं एक वैशिष्ट्य आसतं - जे मला मिळालं नाही ते इतरांनाही मिळू नये. साम्यवाद हा एक प्रकारची विकृती असल्यामुळे त्यांनी कुटुंबव्यवस्था आणि प्रामुख्याने पितृसत्ताक पद्धतीचा सर्वनाश हेच आपलं ध्येय मानलं.

अपवाद आहेत, शिस्त हा प्रकार आपल्याकडे प्रामुख्याने वडिलांकडूनच येतो. उदाहरणादाखल सातच्या आत घरात आलं नाही तर आई भुवया उंचावून तुमच्याकडे बघेल, दहाच्या आत आलं नाही तर जेवलात का विचारेल, आणि बारा वाजून गेले तर तुमच्या खोलीत येऊन येऊन तुमच्या डोक्यावरुन हात फिरवून झोपल्याची खात्री करेल. पण वडिलांना मात्र या उशिराचा हिशोब द्यावा लागतो. तुम्ही केलेल्या कृत्यांची कारणं ही वडिलांना पटावी लागतात, अर्थात वडील accountability मागतात. याचा अर्थ वडिलांचं हृदय तुमच्यासाठी तुटत नाही किंवा त्यांचं तुमच्यावर प्रेम नाही असं नाही, पण वडील त्याही आधी तुमच्या कृत्यांच्या परिणामांचा विचार करत असतात.
जिथे शिस्त असते तिथे अराजक निर्माण करणं अवघड होऊन बसतं. मग राष्ट्रवाद आणि शिस्तीच्या जोरावर हतवीर्य झालेल्या जर्मनीला अवघ्या सहा वर्षात पुन्हा गतवैभव प्राप्त करुन देणार्या हिटलर हा कम्युनिस्टांच्या, विशेषतः भारतीय कम्युनिस्टांच्या दृष्टीने, खर्या खोट्या अन्यायाचा पोस्टर बॉय झाला. लक्षात घ्या, कम्युनिस्टांच्या दृष्टीने खरी समस्या हिटलर नसून शिस्त म्हणजे डिसिप्लिन आहे. हिटलर हा जगन्मान्य क्रूरकर्मा होता, म्हणूनच कम्युनिस्टांच्या दृष्टीने हिटलरने जे काही केलं ते त्या सगळंच वाईट, मग तो शिस्तप्रिय असल्याने शिस्तही वाईटच. मग सुरू झाला एक सुनियोजित प्रचार. ज्या व्यक्तीला शिस्तप्रिय कारभार करण्यात रस आहे तो हिटलर. एखादी व्यक्ती कडक शिस्तीची असेल तर ती व्यक्ती हिटलर. एक हरलेला विनाशकारी हुकूमशहा. हा प्रचार इतका खोलवर रुजवला गेला की अत्याधिक शिस्तीचा भोक्ता असलेल्या कुठल्याही व्यक्तीला 'हिटलर' हे संबोधन वापरलं जाऊ लागलं, अगदी आपल्या वडिलांनाही. हीच कल्पना वडील आणि मुलांचे संबंध बिघडवायला उपयोग केली गेली.

म्हणूनच म्हणतो, ज्या मुलांना लहानपणी वडीलांचं प्रेम मिळत नाही, ते पुढे जाऊन साम्यवादी  होतात. शिस्त महत्त्वाचीच, पण आपल्या मुलांवर हातचं न राखता प्रेम करा, धपाटा घालणार्‍या हाताला गोंजारण्याचंही भान असू द्या. त्यांना योग्य मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर करु नका, नाहीतर पोरगं कधी टुकडे टुकडे गँगवाल्या कम्युनिस्ट गँगमधे जाईल सांगता येणार नाही.

© मंदार दिलीप जोशी
पौष शु. ११, शके १९४०

Sunday, December 23, 2018

रवांडातील वांशिक नरसंहारात चर्चचा सहभाग: भाग २ - विश्वासघात आणि उपसंहार



पहिला भाग इथे वाचता येईल 

चर्चने केलेला विश्वासघात
पहिल्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे रवांडातील राजकारणात आणि समाजकारणात चर्चची प्रत्यक्ष पण तरीही अनिर्बंध सत्ता होती. आधी जर्मनी आणि मग बेल्जियमला चर्चने त्यांच्या वसाहतवादी सत्तेची पकड मजबूत करायला भरपूर मदत केली. "रिलिजियन हा सामान्य जनतेसाठी अफूसारखा आहे (Religion is the opium of the masses)" या तत्त्वावर चालणार्‍या साम्यवादाचा वारा टुट्सींना लागण्यापूर्वी त्यांचेही चर्चशी उत्तम संबंध होते. टुट्सी अभिजनवर्गाबरोबर संगनमत  करुन रवांडातील सामान्य जनतेच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रावर चर्चने ताबा मिळवला होता. टुट्सींच्या साम्यवादावरच्या वाढत्या प्रेमामुळे हादरलेल्या चर्चने मग हुटूंशी संधान बांधलं आणि टुट्सी राज्यकर्त्यांना सत्तेतून खाली खेचलं.

आता रवांडातील राज्यकर्ते हुटू होते आणि अधिकाधिक सत्ता चर्चच्या ताब्यात जात  होती. आर्चबिशप आंद्रे पेरौदिन यांनी साम्यवादाच्या अनुयायांना सैतान आणि गॉडचे शत्रू घोषित करुन टाकलं. टुट्सींना राक्षस संबोधलं जाऊ लागलं. चर्चमधे पाद्री जी प्रवचनं देत त्यात टुट्सींद्वेष ठासून भरलेला असे. टुट्सी हे गॉडच्या पृथ्वीवरील राज्यस्थापनेच्या मार्गातील अडसर असल्याचे सांगून म्हणूनच त्यांचा नायनाट केला पाहिजे हा त्या प्रवचनांमधे सांगितलं जाऊ लागलं. चर्चच्याच मदतीने सत्तेत आलेल्या हुटूंनी चर्चला सरकारच्या प्रत्येक स्तरावर स्थान देत पाद्री मंडळींची महत्त्वाच्या पदांवर नेमणूक केली. आर्चबिशप महाशय तर चक्क केंद्रीय सरकारमध्ये विराजमान होते. चर्चमधे जे सांगितलं जाईल त्याला देवाचा आणि सरकारचा आदेश मानून तो पाळण्याची सक्ती केली गेली. चर्च हे रवांडाच्या सरकरचा एक अविभाज्य अंग बनलं, आणि चर्चच्या विरोधात बोलणं हे सरकारच्या विरोधात बोलण्याइतकाच मोठा गुन्हा मानला गेला. सरकार पातळीवरच हुटू आणि टुट्सी यांच्यात असलेल्या वांशिक फरकावर बोट ठेवत टुट्सींच्या विरोधात जोरदार प्रचार सुरु झाला आणि वर म्हटल्याप्रमाणे चर्चमधे तर टुट्सींना सैतानाची माणसं म्हणून रंगवलं जाऊ लागलं.

हे सगळंं सुरु असताना टुट्सी स्वस्थ बसणं शक्यच नव्हतं. काही स्थानिक आणि परागंदा टुट्सी तरूण मंडळींनी रवांडन पेट्रिओटिक फ्रन्ट अर्थात आरपीएफची स्थापना करुन रवांडावर आक्रमण करायची तयारी केली. यात आरपीएफला यशही मिळालं पण त्याची किंमत त्यांना त्यांच्या भाइबंदांच्या प्राणांनी चुकवावी लागली. इथे आपल्याला वर उल्लेख झालेल्या अरुशा शांतता कराराकडे पहावं लागेल. राष्ट्राध्यक्ष हबयारीमाना यांनी १९९३ साली आरपीएफचे नेते पॉल कगामे यांच्याशी केलेला हा करार चर्चच्या मर्जीविरुद्ध जाऊन केलेला असल्याने तो अर्थातच चर्चला मान्य नव्हता. साक्षात चर्च या करारावर नाराज असल्याने कधीच नीट पाळला गेला नाही. साम्यवादी  हुटूंना सैतानाची माणसं घोषित केल्यामुळे चर्चच्या मते गॉड आणि सैतान यांच्यात कसलाच करार होऊ शकत नव्हता.

त्यामुळे चर्चने या करारावर सह्या झाल्या झाल्या टूट्सींविरुद्ध विखारी प्रचाराला सुरवात केली. इतकंच नव्हे, तर चर्चमधून उघडपणे टुट्सींचा खातमा करायला लोकांना प्रोत्साहित केलं गेलं. पास्टर इग्नेस यिरिर्वाहन्दी याने तर या नरसंहारात सक्रीय सहभाग घेतला आणि लोकांना टुट्सींना नामशेष कसं केलं जावं याचं चक्क प्रशिक्षण दिलं. प्रचंड प्रमाणावर बुद्धीभेद सुरु होताच. टुट्सींना ठार मारणं न्याय्य ठरवण्याकरता बायबल मधले संदर्भ दिले गेले. लोकांच्या मनावर 'तुम्ही गॉडच्या शत्रूंविरुद्ध लढत असून गॉड तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही विजयी होणार आहात' हे सतत बिंबवलं गेलं. चर्चने रवांडाच्या सरकारला आणि नरसंहार करणार्या  सैन्याला पूर्ण पाठींबा जाहीर केला.

सिनेमातून आणि इतर प्रचारातून पाद्री आणि पास्टर दयाळू आणि नन अतीदयाळू ही प्रतिमा उभी करण्यात ख्रिश्चन जमात यशस्वी झाली आहे. एरवीही तसाच प्रचार सुरु असतो. पण हुटूंच्या तावडीतून जीव वाचवून कॅथलिक चर्चचा आश्रय घेणार्‍या टुट्सींना मात्र चर्च म्हणजे काय याचा अगदी प्रत्यक्ष आणि विपरीत अनुभव आला. हुटूंच्या तावडीतून कॅथलिक चर्चकडे पळणार्‍या टुट्सींची स्थिती एका कसायाच्या तावडीतून दुसर्याक कसायाकडे गेलेल्या थँक्सगिव्हिंगच्या टर्कीसारखी अवस्था झाली. प्रेमाचा धर्म म्हणून आपली जाहीरात करणार्या  आणि दयाळू म्हणवल्या जाणार्यास येशूच्या आश्रयाला गेलेल्या टुट्सींची निर्दयपणे हत्या करण्यात आली.

काही ठिकाणी विश्वासाने आश्रय मागायला गेलेल्या टुट्सींचं पाद्री आणि नन यांनी स्वागत केलं आणि मग विश्वासघात करत त्यांची हत्या केली,तर काही ठिकाणी हे काम चर्चशी संगनमत असलेल्या हुटू सैनिकांवर सोपवलं गेलं. चर्चचे पाद्री आणि नन आपल्या डोळ्यांसमोर होत असलेल्या हत्याकांडाचे मूक साक्षीदार बनून राहिले. त्यांच्या "गॉडचे शत्रू" मारले जात असताना त्यांना मधे पडायचं काहीच कारण दिसलं नाही. लोकांना चर्चमध्ये टुट्सींवर बलात्कार आणि खून करायला प्रोत्साहन देणारा फादर वेन्सेसलास मुनीश्यॅक हा दुर्दैवाने मोकळा फिरतो आहे.

एकट्या न्टारामा (Ntarama) कॅथलिक चर्चमध्ये ५००० टुट्सींचं हत्याकांड केलं गेलं. अशाच हत्या न्यामाटा (Nyamata), न्यारुबुये (Nyarubuye), स्याहिंडा (Cyahinda), न्यान्गे (Nyange)), आणि सेंट फॅमील (Saint Famille) इथे केल्या गेल्या.

यातल्या न्यान्गे पॅरीश (चर्च) येथील हत्याकांडाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. न्यान्गे पॅरीश मध्ये झालेल्या २,००० टुट्सींचे हत्याकांड तिथल्या चर्चमधले फादर अथानासे सिरोम्बा यांच्या मार्गदर्शनाखाली घडलं. फादर अथानासे याने प्रथम टुट्सींना तुतीस चर्चमध्ये आश्रय घेण्यास सांगितले आणि नंतर संपूर्ण इमारत बुलडोझरने जमीनदोस्त केली. हे पुरेसे वाटले नाही म्हणून की काय, फादर अथानासे याने हत्यारबंद हुटूंना बोलावून घेऊन इमारतीच्या ढिगार्याहतून बचावलेल्या टूट्सींना गोळ्या घालायला सांगितलं. आर्चबिशप पेरौदिनने हुटू बंडखोरांनी चालवलेल्या हत्याकांडाला चक्क बायबलमधले संदर्भांचे आधार दिले. इतकंच नव्हे पेरौदिनने स्वतः नरसंहारात उत्साहपूर्वक भाग घेतला. फादर वेंसेसलास मुन्येशयाका यांनी  तर लोकांना चक्क टुट्सी स्त्रियांवर बलात्कार आणि त्यांची हत्या करण्यास प्रोत्साहन दिले.

चर्चला संलग्न असलेल्या शाळांमध्येही विद्यार्थी आणि शिक्षकांची हत्याकांडं घडली. आपण ज्यांच्यावर विश्वास टाकला, अशा चर्चमधल्या फादर आणि नन यांनीच आपला विश्वासघात केला ही भावना जनतेसाठी सगळ्यात वेदनादायी होती.

उपसंहार
या हत्याकांडांच्या नंतर सुरवातीची काही वर्ष चर्चने त्यांच्याकडून काही अपराध घडले होते हेच नाकारलं. शेवटी तब्बल बावीस वर्षांनी चर्चने त्यांचे अपराध स्वीकारत एक माफीनामा प्रसिद्ध केला. या नरसंहारात कधी थेट तर कधी विश्वासघाताने मारल्या गेलेल्या लाखो निरपराध लोकांच्या पदरी चर्चकडून गुन्ह्याची स्वीकारोक्ती आणि एक माफीनामा या स्वरूपात क्रूर थट्टा वाट्याला आली. मालकांनी कोंबड्यांची झुंज लावावी, आणि त्यांनी काहीही विचार न करता कोणत्याही सबळ कारणाशिवाय रक्तबंबाळ होईपर्यंत किंवा अगदी जीव जाईपर्यंत एकमेकांशी झुंझत बसावं तसा हा प्रकार होता. जसं जगभर झालं, तसं इथेही मालकांच्या जागी चर्च होतं आणि झुंजणार्‍या दोन कोंबड्यांच्या जागी टुट्सी आणि हुटू.

चर्चचा हत्याकांडातील प्रत्यक्ष सहभाग रवांडातील शांतताप्रिय नागरिक आणि विशेषतः टुट्सी कधीच विसरले नाहीत. याच कारणास्तव राष्ट्राध्यक्ष पॉल कगामे यांनी अक्षरशः हजारो चर्च आणि मशीदी बंद केल्या. या नरसंहारातून धडा घेतलेल्या रवांडाच्या नागरिकांना फसवून केलेल्या धर्मांतरातून लादल्या गेलेल्या रिलिजियनसचा धोका ध्यानात आलेला आहे. त्यांच्या सुदैवाने त्यांना पॉल कगामे यांच्या रूपात अशा रक्तपिपासू वृत्तीच्या रिलिजियनस पासून आपल्या देशाला वाचवण्यासाठी सातत्याने कार्यशील असणार्‍या व्यक्तीच्या रुपात योग्य नेता मिळालेला आहे.


© मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ १, शके १९४०

टीपः आपल्याला परिचित असलेला याच विषयावरचा हॉटेल रवांडा हा सिनेमा आपण बघितला असेलच. नसेल तर आवर्जून बघा. याच बरोबर 'समटाईम्स इन एप्रिल' हा चित्रपटही बघण्यासारखा आहे.

संदर्भः
(१) विविध वर्तमानपत्रे व माहितीपट
(२) https://bit.ly/2EH9ixH