Monday, April 30, 2018

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

मागे अमेरिकेतील सु/कु प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका आणि विचारवंत मॅलरी मिलेट यांच्या भगिनी केट मिलेट यांनी लिहीलेला एक लेख शेअर केला होता. आज इंग्लंडमधल्या एक प्रसिद्ध स्त्रीवादी कार्यकर्त्या जॉनेट कॉप्फरमॅन यांनी स्वतः व्यक्त केलेल्या भावना तुमच्यापुढे मांडतो आहे. (या लेखाचा स्वैर अनुवाद)

---------------------

माझ्या समानतेच्या लढ्याची किंमत माझ्या तान्हुल्या नातीला मोजावी लागेल का?

आजच्या महिलांना भेडसावणारी भावनिक पोकळी पाहून एकोणीसशे साठच्या दशकापासूनच्या प्रसिद्ध स्त्रीवादी (फेमिनिस्ट) जॉनेट कॉप्फरमॅन यांनी व्यक्त केलेल्या भावना.

माझ्या नातीचा अँबर अ‍ॅनचा जन्म झाल्यावर काही तासातच तिला मी माझ्या हातांत घेतलं आणि छातीशी कवटाळलं. त्याच वेळी मनात दाटलेल्या असंख्य गुंतागुंतीच्या भावनांनी काहूर माजवलं, मी पार गोंधळून गेले. मला तेव्हा नक्की काय वाटत होतं हे शब्दात वर्णन करणं कदाचित अवघड आहे, कदाचित नातीच्या जन्मामुळे झालेला उन्मुक्त आनंद आणि तिच्या भविष्याची धास्ती यांचं मिश्रण असं त्या भावनांचं वर्णन करता येऊ शकेल.

माझं पहिलं नातवंडं. अतिशय बांधेसूद शरीर, डोळ्यांत असलेली चमक, माझ्या बोटांत हळूच गुंतलेली तिची बोटं - आई कशाला, आजीलाही ओळखतात बरं का बाळं! अँबरचा जन्म हा एक चमत्कार मानावा लागेल. अर्थात, जन्माला आलेलं प्रत्येक सुदृढ बाळ हे एक चमत्कारच असतं, पण अ‍ॅम्बरच्या आईला, म्हणजे माझ्या सूनबाई ईव्हाला गर्भाशयाच्या अंतःस्तराचा क्षोभ (एन्डोमेट्रिओसिस) हा आजार असल्याने तिला आपण कधी आई होऊ शकू असं वाटतंच नव्हतं. शिवाय त्यांच्या लग्नाच्या वेळी दोघांची वयं पन्नाशीच्या पुढे होती - माझा मुलगा इलियास होता ५२ वर्षांचा आणि ईव्हा होती ५० वर्षांची. त्यामुळे मला नातवंडांची कितीही हौस असली तरी माझ्या वयाची सत्तरी ओलांडल्यावर मी ती आशा जवळजवळ सोडून दिली होती. आणि मग तो चमत्कार झाला. माझ्या पंचाहातराव्या वाढदिवसाला मला ईव्हाने मला गोड बातमी दिली आणि या संपूर्णपणे अनपेक्षित पण सुखद धक्क्याने मी खुर्चीवरुन जवळजवळ पडलेच. ईव्हाला दिवस गेले होते!

लहानगी अँबर हलकेच माझ्या कुशीत शिरत असताना मला तो दिवस आठवत होता, आणि मनात तो भावनांचा कोलाहल गोंधळ घालत होता. नातीच्या जन्माने मनात निर्मळ आनंद दाटण्याऐवजी भावनांचं जरासं कटूगोड असं मिश्रण भरून राहिलं होतं. आता आम्ही तिचा हात धरू, एखाद्या कुंभारासारखं तिच्या वकूबानुसार तिच्या आवडीनिवडींना आकार देऊ, पण पुढे काय? तिच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय? का असं वाटत होतं मला?

त्याचं कारण होतं त्याच दिवशी वर्तमानपत्रात मी वाचलेली एक बातमी. शाळेत जाणार्‍या मुलींना शारिरिकदृष्ट्या अक्षम असतानाच त्यांच्याच वयाच्या मुलामुलींकडून कौमार्य गमावण्याची जबरदस्ती कशी केली जाते याचा उल्लेख त्यात होता. कौमार्य गमावणं ही गोष्ट काहीतरी मोठी डिग्री मिळवावी अशा पद्धतीने इकडे मिरवतात. त्याच बातमीत पुढे अनेक अस्वस्थ करणार्‍या गोष्टींचं वर्णन होतं — किशोरवयीन मुलामुलींमध्ये झालेला नैराश्याचा (depression) प्रादुर्भाव, त्यातून स्वतःलाच इजा करुन घेणं, खाण्याच्या सवयी इतक्या बिघडलेल्या की जवळजवळ त्याला कुपोषण म्हणता येईल अशी परिस्थिती, शाळेत विद्यार्थ्यांचा त्यांच्याच शाळासोबत्यांकडून होणारा क्रूर मानसिक छळ (bullying), भ्रमणध्वनी (मोबाईल) वरुन होत असलेली लैंगिक स्वरूपाच्या संदेशांची देवाणघेवाण (sexting), आणि एकंदर लैंगिक बाबतीत निर्माण केला जाणारा गोंधळ. या गोष्टींना अधिकाधित किशोरावस्थेतली मुलं बळी पडत असल्याचं त्या बातमीत म्हटलं होतं.

हे फार भयंकर होतं. आम्ही स्त्रीमुक्ती चळवळीत सक्रीय असताना पुढच्या पिढीसाठी - विशेषतः पुढच्या पिढीतील आमच्या मुलींसाठी एका उज्ज्वल भविष्याची कल्पना केली होती. एक असं जग ज्यात स्वप्न बघायला आणि ती अंमलात आणायला आकाश कमी पडेल, आपले निर्णय आपण घेण्याचं स्वातंत्र्य आणि त्यातून प्रगती साधता येईल, आणि कुठल्याही क्षेत्रात कर्तृत्व गाजवण्यासाठी संधींची समान उपलब्धता असेल. बास, याच गोष्टींसाठी मी आणि अनेक स्त्रीयांनी साठच्या दशकात तीव्र लढा दिला होता. अशाच जगाची कल्पना आमच्या मुलींसाठी आम्ही केली होती.

जॉनेट कॉप्फरमॅन पुढे म्हणतात की आज याच स्त्रीवादाने आजच्या मुलींच्या आयुष्यात काय उलथापालथ माजवली आहे ते पाहून मी हादरून गेले. समानतेचा लढा आम्ही स्त्री"वादा" कडे घेऊन जाण्याने आजच्या मुलींना नक्की फायदा झालाय की नुकसान हे तपासणं मला गरजेचं वाटू. माझ्या मते दुर्दैवाने आजचा काळ हा महिलांसाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत उदास आणि रोगट असाच आहे.

लैंगिक सूख हे दैवी आनंद देणारं असायला हवं. शरीराला मिळणार्‍या सुखाचा मार्ग हा मनातून जायला हवा. पण आज सेक्सचा फक्त शारीरिक कंगोराच उरला आहे. दुर्दैवाने दैनंदिन आयुष्याच्या जवळजवळ प्रत्येक भागाला पॉर्न संस्कृतीने ग्रासलं आहे. याचं मूळ साठच्या दशकाती स्त्रीवादी आंदोलनांचा भाग असलेल्या लैंगिक स्वातंत्र्याच्या हाकांत आहे. हवं तितकं शारीरिक सूख मिळवा, तुम्हाला हव्या त्या व्यक्तीबरोबर ते मिळवा, एकाने समाधान झालं नाही तर अनेक व्यक्तींबरोबर झोपा, तडस लागे पर्यंत जेवता तसं एकमेकांची शरीरं भोगा, ओरबाडा.

प्रणयाराधन आणि शय्यासोबतीतल्या अत्यंत खाजगी असायला हव्यात अशा गोष्टी आज खुलेपणाने मोठ्या पडद्यावर दिसतात. छोट्या पडद्याने आपल्या मोठ्या भावाला या बाबतीत केव्हाच मागे टाकलं आहे. इकडे आयटीव्ही टू वाहिनीवर उघड उघड स्वैराचाराला प्रोत्साहन देणारा एक प्रेमाचं बेट (Love Island) नावाचा रिअ‍ॅलिटी शो होऊन गेला. शिसारी येणारी गोष्ट म्हणजे त्यात भाग घेणारे लोक माणसं आहेत की शरीरं भोगणारे यंत्रमानव असा प्रश्न पडावा. [आपल्याकडे बिग बॉस या कार्यक्रमाचं रूपांतर लवकरच अशाच हिडीस शो मध्ये येत्या काही वर्षातच होईल अशी मला खात्री आहे]

काळानुसार बदल हा अपरिहार्य आहे पण स्त्री आणि पुरुषांच्या सगळ्याच पारंपारिक भूमिका आज वैचारिक तिरस्काराचा विषय झाल्या आहेत — इतक्या की एक काळ असा होता की टीव्हीवर जाहीरातींतून गृहिणी आणि आई या दोन भूमिकांत स्त्री दिसूच नये असा अचाट अलिखित नियमच ठरून गेला होता. का? तर म्हणे स्त्री आणि पुरुष यांच्या "जुनाट" आणि "बुरसटलेल्या" पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (gender stereotyping) होऊ नये म्हणून.

स्त्रीमुक्तीवादाच्या चळवळींनी महिलांना प्रगतीच्या अनेक संधी नक्कीच मिळवून दिल्या, पण त्याच बरोबर आजचं जगणं स्त्रीमुक्तीवादाने अधिक संघर्षपूर्ण, वेदनादायी, किचकट आणि मनःशांती हिरावून घेणारं बनवल्याने त्या संधी या अशा गोष्टींमुळे केव्हाच खुज्या ठरल्या आहेत.

आज मला आम्ही त्या काळी दिलेल्या घोषणा आठवतात, "स्त्रीयांनो, आपले ब्रा जाळा, मिनीस्कर्ट घाला. मुक्त व्हा!" पण खरंच आजची स्त्री मुक्त आहे का? अशा घोषणांनी नक्की काय साध्य केलं? व्हिक्टोरियन काळातल्या कपड्यांच्या थरांनी गळ्यापासून पायापर्यंत गच्च आवळलेल्या गृहिणीचा प्रवास आपल्या शरीराचं प्रदर्शन मांडायला सोकावलेल्या मुलींपर्यंत झाला तो अशाच घोषणांच्या प्रभावाने. पन्नासच्या दशकात आपले पायही झाकलेले हवेत म्हणून स्त्रीया बॉबी सॉक्स या विशिष्ट प्रकारचे पायमोजे घालत असंत. त्या स्त्रीयांवर हे बंधन होतं, आजच्या मुलींवर अधुनमधून एखादा तरी कमी कपड्यांतला, तोंडाचा चंबू करुन काढलेला सेल्फी सोशल मिडीयावर टाकणं अनिवार्य वगैरे आहे की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे.

दैवदुर्विलास असा की एकीकडे स्त्रीस्वातंत्र्याचं कारण पुढे करुन इंग्लंडमधल्या बहुसंख्य समाजातल्या महिलांपैकी अनेक जणींचा कल हिणकस पद्धतीने शरीरप्रदर्शन करण्याकडे आहे, दुसरीकडे त्याच इंग्लंडमधल्या धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्य असलेल्या लोकसंख्येतील स्त्रीया मात्र आजही कपड्यांच्या बाबतीत व्यवस्थित मर्यादा पाळताना दिसतात. त्यांच्या म्हणण्यानुसार एक स्त्री म्हणून आमच्या शरीराचं पावित्र्य जपण्यासाठी, आमची स्पेस जपण्याकरता आम्ही असं करतो. आहे की नाही गंमत? यांच्या पैकी कोण बंधनात आहे आणि कोण मुक्त आहे?

खूप जास्त लांबीचा सुका बोंबिल वाटावा असं पोट खपाटीला गेलेलं, हाडं दिसू लागलेलं, गालफडं बसलेलं, आणि डोळे निस्तेज आणि खोल गेलेलं कुपोषित शरीर असणार्‍या सेलिब्रिटींचं अनुकरण करण्याचा रोग समाजात पसरेल अशा भविष्याची कल्पना आमच्यापैकी कुणीच करु शकलं नव्हतं.

शरीर आणि मन यांना एकत्र वाढू देण्याऐवजी वेळेआधीच दिलं जाणारं लैंगिक "शिक्षण" आज मुलांच्या मनातला गोंधळ वाढवण्याचं आणि त्यांना अकाली मोठं करण्याचं काम काम करत आहे. शरीराची पूर्ण वाढ होण्याअगोदरच आजच्या मुलींना लहान ब्रा/बिकीनी घालायला आज उद्युक्त केलं जातं. अर्वाच्य शब्द आणि लैंगिक व्यवहारांचं एक मोठं जग आज टीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून आज मुलांना नासवतंय.

आमच्या काळात एक आई म्हणून असलेल्या परीक्षेत नापास होणं, नको असलेलं गर्भारपण, अतिरिक्त मद्यपान या आणि तत्सम चिंता अगदीच मिळमिळित वाटाव्यात अशा भयानक चिंता संधी, पर्याय, आणि प्रगतीच्या अगणित संधी आणि स्वातंत्र्याची लयलूट असलेल्या आजच्या जगात मला माझ्या अँबर बद्दल आज भेडसावतात.

तरुणपणात सळसळत्या रक्ताच्या धगधगत्या आदर्शवादाची झिंग डोक्यात घेऊन त्याकाळी आम्ही दिलेल्या स्त्रीवादी लढ्यांनी मात्र आजच्या मुलींमध्ये "वाद" तेवढा शिल्ल्क ठेवला आणि त्यांच्यातल्या स्त्रीलाच मारुन टाकलं. एक स्त्री म्हणून आम्हाला परमेश्वराने दिलेलं अत्यंत अमूल्य, अद्वितीय, आणि अलौकिक असं काहीतरी आम्ही हरवून बसलो आहोत.

माझा जन्म दुसर्‍या महायुद्धाच्या काळात झाला. युद्ध संपल्यावर मला घेऊन आई आणि बाबा लंडनला परतले. त्याकाळी शालेय शिक्षण हे फक्त परीक्षेत चांगले गुण मिळवण्यापुरतं मर्यादित नव्हतं, तर तुम्ही पुढे कुठल्यही क्षेत्रात गेलात तरी न बिचकता आत्मविश्वासाने काम करत यावं या दृष्टीने व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास कसा करावा यावर भर असे. कालांतराने वयाच्या चौदाव्या वर्षाच्या आसपास बॉयफ्रेन्ड आयुष्यात आले, तरी तेव्हा त्या नव्या नात्यात सेक्स करायलाच हवं असा कोणताही वैय्यक्तिक किंवा सामाजिक दबाव आमच्यावर नव्हता.

बॉयफ्रेन्ड सिनेमाला घेउन गेल्यावर तिथल्या अंधारात घेतलेल्या चोरट्या चुंबनांपलीकडे कधी आमची मजल जात नसे. आणि पहिलं चुंबन मिळवण्यासाठी सुद्धा बॉयफ्रेन्ड मंडळींना भरपूर प्रणयाराधन करावं लागे. हां, आणि आम्ही गरमागरम प्रेमपत्र सुद्धा पाठवायचो बरं का! आपलं कौमार्य जपणं हे त्या काळी किमान साखरपुडा होईपर्यंत केलं जायचं किंवा किमान लग्नाचं विश्वासार्ह आणि ठाम आश्वासन मिळेपर्यंत तरी. आपल्या शरीर असं का, सेक्स म्हणजे काय वगैरे ज्ञान क्वचित आईकडून तर बरंचसं चोरून वाचलेल्या पुस्तकांतून आणि मित्रमैत्रिणींकडून मिळायचं. एक गोष्ट मात्र आमच्या पापभिरू मनावर कोरली गेली होती, ती म्हणजे कितीही इच्छा बळावली तरी ती पुर्णत्वाकडे कधीही न्यायची नाही. असं करणं म्हणजे फक्त नको असलेलं गर्भारपण ओढवून घेणं इतकंच नव्हे तर सगळ्यांसाठी ती गोष्ट एका भयंकर दुर्घटने सारखी होती.

आज एखाद्या किशोरवयीन मुलीला तिच्या बॉयफ्रेन्डने सेक्स्टिंग (sexting) केलं तर त्याच्या उत्तरादाखल आपला एक उत्तान कपडे घातलेला हॉट सेल्फी पाठवावा की आणखी काही करावं असा प्रश्न पडतो. त्यात तिला समवयस्कांकडून एकाहून एक भयानक असे सल्ले मिळत असतात. जणू काही त्या वयातल्या एखाद्या मुलीने करायच्या या अत्यंत सामान्य गोष्टी आहेत.

अँबरने या गोष्टी सहजपणे अंगिकाराव्यात असं मला वाटतं का? एका मुलीने करायच्या या अगदी सामान्य गोष्टी आहेत असं तिला वाटावं का? तिला कधी एखादं सुंदर प्रेमपत्र मिळेल की तिला फक्त शरीराची भूक असलेल्या भावनाशून्य नात्यांना तोंड द्यावं लागेल? ज्या मुलींच्या वाट्याला या गोष्टी येतील, त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. स्वतंत्र आयुष्य जगायच्या नादात स्वैराचाराची बंधनं लादून घेतली की काय होतं याची आजची पिढी हे उदाहरण आहे.

आमच्यात आणि आजच्या काळात एक मूलभूत फरक असा की आम्हाला मर्यादांची जाणीव होती. काही वेळा याच मर्यादा जाचक वाटल्या तरी आमच्याकडून काय अपेक्षित आहे हे ठावूक असल्याने आमचा पाय कधी घसरला नाही. आमच्या आईवडिलांशी आमचे कडाक्याचे वादही व्हायचे, पण तरीही आम्ही आज्ञाधारक होतो. आपण वेगळं वागलो, तर त्यांना आवडणार नाही हा प्रेमळ धाक होता. माझ्या बाबांना मी काजळ लावलेलं आवडायचं नाही, आणि मी ते मुद्दामून लावून त्यांना डिवचायचे. आमच्या मनासारखं झालं नाही तर आम्ही घर सोडून जाऊ अशी धमकीही आम्ही द्यायचो पण तसं करण्याची हिंमत कधीच झाली नाही. आपण कसे वागलो म्हणजे आईबाबांना आवडेल, हा विचार कायम मनात असायचा.

लोकांनी काय, किती (कमी), आणि कसं खावं हे सांगणारे धंदेवाईक तज्ञ आणि जाहीरातींचा मारा करणार्‍या कंपन्या तेव्हा नव्हत्या. आम्हाला एक वेळचा नाश्ता आणि दोन वेळचं भरपूर जेवायला मिळत असे. मधल्या वेळीतर भूक लागली तर सँडविच मिळत. तरीही आम्ही बारीक होतो, पण कुठल्याही व्यायामशाळा किंवा स्वतःची उपासमार करुन घेऊन नव्हे, तर या बारीकपणामागचं खरं कारण भरपूर चालणे आणि नाचकाम हे होतं. त्यामुळे आमच्या कंबरेचा "कमरा" कधी झालाच नाही. एखादं गुटगुटीत बाळ बघितलं की आपलंही असंच बाळ हवं असं लोकांना वाटायचं, आणि किशोरवयात जरासं जाडसर पोर बघितलं की कुणी हेटाळनी करायचं नाही. मुलींना त्यांच्या शरीरयष्टीवरुन हिणवलं जायचं नाही. आजचा काळ शस्त्रक्रीयेने चरबी काढण्याचा आहे. पण तरीही प्रचंड सुटलेली लठ्ठ शरीरं हा प्रकार त्या काळात सर्रास नव्हताच. दुर्दैवाने वेगवेगळ्या फळांचे रस, बारीक होण्याची घातक औषधं, आणि सूपरफूड यांची रेलचेल असलेल्या आजच्या काळात आजच्या मुली आपल्या शरीराबाबत समाधानी नाहीत.

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण पूर्ण केल्यावर मी काही काळ नृत्यांगना आणि मॉडेल म्हणून काम केलं. मग न्युयोर्कला गेले आणि संशोधक ग्रंथपाल (research librarian) म्हणून काम केलं. मग लग्न केलं आणि वयाच्या चोवीसाव्या वर्षी लंडनला परतले.

निसर्गाच्या विरोधात जाऊन घेतलेला समानतेच्या शोधाबद्दलची माझी अस्वस्थता साधारण १९७९ साली माझ्या The MsTaken Body या माझ्या पहिल्या पुस्तकातून. समानतेचा ढोल वाजवणर्‍या महिलांचा अतिरेक तेव्हाच मला दिसू लागला होता. आज प्रसूतीबद्दल कुठलीही गोष्ट नैसर्गिक पद्धतीने करण्यात बायकांना वाढत्या प्रमाणात वाटणारी भीती आणि "आणल्या जाणार्‍या" कळा या गोष्टी निश्चितच योगायोगाच्या नाहीत.

स्त्री असण्यामागचा आध्यात्मिक आणि शारिरिक आनंद आज यांत्रिकतेत जखडला गेला आहे. मूल जन्माला घालणं यातला आनंद "मा लाईफ मा चॉईस" मुळे केव्हाच हरवला. फार पुर्वी घरी सुईण येऊन मूल जन्माला येताना तुम्हाला मदत करायची. आता पुरुषी ढवळाढवळ वाढल्याने म्हणा किंवा प्रसूती आरामदायक व्हावी या करता औषधांचा मारा वाढल्याने म्हणा, स्त्रीयांना स्वतःबद्दल, स्वतंच्या शरीराबद्दल पुरेसा आत्मविश्वासच उरलेला नाही. समानतेमागे धावता धावता नवर्‍यांनी प्रसूतीदरम्यान हजर राहण्याचं फॅड निघालं आणि प्रसूतीसाठी तज्ञांचा ताफा हजर राहू लागला, आणि स्त्रीयांना आपण हे दिव्य एकटीने पार पाडू शकतो हा विश्वासच उरला नाही. आता मला सांगा, अशा समानतेचा काय उपयोग?

एक गोष्ट मात्र नक्की की पुरुषांची बरोबरी करण्याच्या मागे लागता लागता आज स्त्रियांची मक्तेदारी असलेली क्षेत्रे आज उरलेलीच नाहीत. मला असं वाटतं की स्त्रीच्या पारंपारिक भूमिकांचं सरसकटीकरण (stereotyping) हे खरं तर स्त्रीलाच एक वेगळी ओळख आणि सुरक्षितता प्रदान करतं. मुलं जन्माला घालणं आणि घराची काळजी घेणं याचा अर्थ तुम्ही जखडला गेला आहात असा नाही, तर तुम्हाला तुमच्या स्त्रीपणाचा सोहळा साजरा करण्याचं. स्वातंत्र्य मिळालं आहे असा होतो.

मला दोन मुलं पदरात असताना मी दोन डिग्र्या घेतल्या, काही काळ शिक्षिकेच्या भूमिकेत शिरले आणि मग लेखक आणि ब्रोडकास्टर म्हणून नाव कमावलं. हे करत असतानाच मी घरही सांभाळत होते. घरच्यांसाठी स्वयंपाक करत होते, मुलांशी खेळत होते, त्यांचा अभ्यास घेत होते आणि कधी कधी या सगळ्याचा ताण असह्य होऊन कोलमडतही होते. पण मी माझ्या मुलांमागे नेहमीच ठामपणे उभी होते. माझ्या आयुष्यातून काही शिकण्यासारखं असेल तर ते हे की आयुष्यात असलेले लोक महत्त्वाचे आहेत आणि एक बायको, आई, आणि बाई म्हणून ज्या ज्या म्हणून भूमिका त्यात अध्याहृत असतील त्या सगळ्या भूमिकांसकट माझं तिथे असणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि अनिवार्य आहे.

मी फक्त ४४ वर्षांची असताना माझा नवरा जॅक्स कर्करोगाने गेला. त्या वेळी तो ६१ वर्षांचा होता. एक आई म्हणून माझ्या मुलीवर मी कदाचित जास्तच भार टाकला असेल, पण त्या वेळी माझ्यात सुपरवुमन घुसली होती, आणि हा शब्द किती फसवा आहे हे आता लक्षात येतंय.

मी आजही "अग्गं बाई, बाईनेच का बरं ही कामं करायची" असा विचार न करता पदर खोचून स्वयंपाकघरात घुसू शकते, झाडलोट करु शकते, आणि घरातली कोणतीही कामं आनंदाने करते. मग ती करताना मी बाहेर कोण म्हणून वावरते त्याचा काहीही संबंध नसतो. रोजची घरातली कामं करणं ही देखील एक स्त्री म्हणून व्यक्त होण्याची एक पद्धत आहे आणि त्यातून चक्क आध्यात्मिक आनंद मिळवता येतो. जगण्याकरता भरपूर पर्याय समोर उपलब्ध असणं यात आयुष्याची परिपूर्णता नाही हे माझ्या केव्हाच लक्षात आलंय.

एक आजी म्हणून माझी अशी इच्छा आहे की माझ्या अँबरने असंच आयुष्य जगावं. तिने आयुष्यात काहीही करावं, पण तिला छान स्वयंपाक करता यावा, तिने घरासमोरच्या बागेत शांतपणे बसून पुस्तक वाचावं, उत्तम संगीताची तिला जाण असावी, आणि मुलांना घेऊन समुद्रावर फिरायला तिला जाता यावं— आणि मुख्य म्हणजे या सगळ्यासाठी तिला भरपूर वेळ मिळावा — जो आजच्या मुलींकडे उरलाच नाहीये. समानतेच्या मागे जाताना तिने दारूत स्वतःला बुडवून घेऊ नये आणि निरर्थक शारीरिक संबंधांनी स्वतःला नासवूनही घेऊ नये. तिने संवेदनक्षम, दयाळू, आणि सर्जनशील असावं पण त्याही पेक्षा एक बाई म्हणून आत्मविश्वासाने वावरावं. पुरुषांची बरोबरी करायला न जाता तिने आपलं स्त्रीत्व जपावं, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्याचा सोहळा साजरा करावा.

एक स्त्री म्हणून, आई म्हणून देवाकडे लई नाही मागणं !

© मंदार दिलीप जोशी (मराठी रूपांतर/भाषांतर)
फाल्गुन कृ. ७, शके १९३९ | ८ मार्च इसवी सन २०१८

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव

मार्क्सवादी स्त्रीमुक्ती चळवळीचे भयाण वास्तव: अमेरिकन स्त्रीवादी चळवळीची मुकुटमणी केट मिलेट यांची धाकटी बहीण मॅलरी मिलेट यांच्या शब्दातः

या लेखाच्या सुरवातीलाच मॅलरी त्यांच्या बालपणीची एक गोष्ट सांगतात. हायस्कूल नंतर मॅलरी मिलेटना त्यांच्या शाळेतल्या एका ननने विचारलं की पुढे काय करायचा विचार आहे. मॅलरीने उत्तर दिलं आता स्टेट युनिवर्सिटीत प्रवेश घेईन. यावर ननच्या चेहर्‍यावर पसरलेले उदास भाव पाहून मॅलरीने त्यांना कारण विचारलं. नन म्हणाली, मला वाईट वाटतं की चार वर्षांनंतर तू एक डाव्या विचारसरणीची नास्तिक बनूनच बाहेर पडशील. मॅलरी म्हणतात, "मला हसू आलं. किती भोळसट आणि बावळट विचार आहेत यांचे." मग मॅलरी विद्यापीठात गेल्या आणि चार वर्षांनी आपल्या सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या केट मिलेट या बहिणीसारख्याच डाव्या विचारसरणीच्या नास्तिक बनून बाहेर पडल्या. त्या ननने वर्तवलेलं भविष्य खरं ठरलं होतं.

हा प्रसंग पाहिला तर डाव्यांनी अमेरिकेत किती घट्ट पाय रोवले होते याचा अंदाज येइल. हिटलरने पार्श्वभागावर लाथ मारून हाकललेले फ्रँकफर्ट स्कूलवाले अमेरिकेत पोहोचले आणि तिथे अमेरिकेची संस्कृतिक वाट लावण्याचे काम जोमाने केलं. आज आपण जी अमेरिका पाहतो, जे त्यांचं संस्कृतिक व कौटुंबिक जीवन पाहतो तसं ते नेहमीच तसं नव्हतं. अमेरिकन असले तरी कुटुंबाचं महत्त्व त्यांच्या दृष्टीनेही होतंच. डाव्यांच्या क्रिटिकल थिअरीने अमेरिकन संस्कृतीची पूर्ण वाट लावली आणि भ्रष्ट केलं. आता अमेरिका करते म्हटल्यावर त्याचं अनुकरण जगाने करणं हे ओघाने आलंच. आपल्याकडे अशा विचारांचं आकर्षण हे अशा पद्धतीने आयात केलेल्या विचारांचं आहे.

या लेखात मॅलरी आपल्या बहिणीच्याच आग्रहावरुन न्यू यॉर्कला स्थलांतरित झाल्यावाच्या एका प्रसंगाचं वर्णन करतात. केटने त्यांना आपली मैत्रिण लिली कार्पच्या घरी एका कार्यक्रमाला बोलावलं. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्षस्थानी असणार्‍या केटने शाळेत घोकून घ्यावी तशी काही उत्तरं घोकून घेतली. ती अशी होती:

"आपण इथे का जमलो आहोत?" - केट
"क्रांती करायला" - सगळ्यांनी एका सुरात उत्तर दिलं.

"कुठल्या प्रकारची क्रांती?" - केट
"संस्कृतिक क्रांती" - सगळे

"आणि आपण ही संस्कृतिक क्रांती कशी करणार आहोत?" - केट
"अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश करुन" - सगळे

आणि अमेरिकन कुटुंबसंस्थेचा नाश कसा करणार?" - केट
"अमेरिकन बापाचा नाश करुन" - सगळे

"आणि अमेरिकन बापाचा नाश कसा करणार?" - केट
"त्याची शक्ती खलास करुन" - सगळे

"आणि ती कशी खलास करणार?" - केट
"लग्नसंस्थेवरची निष्ठा खतम करुन" - सगळे

"आणि ती कशी खतम होणार?"

मॅलरी लिहीतात, की यावर जे उत्तर आलं त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. त्या म्हणतात, माझा श्वासच अडकला, कानांवर विश्वास बसेना. कोण होते हे सगळे? मी नक्की पृथ्वीवर चाललेल्या कार्यक्रमातच बसले होते की भलत्याच ग्रहावर?

ते उत्तर होतं:
"स्वैराचार, कामुकता, वेश्यावृत्ती, आणि समलैंगिकतेला प्रोत्साहन देऊन (आम्ही लग्नसंस्था आणि कुटुंबव्यवस्थेला) खतम करणार."

--------------

केटने अनेक पुस्तकं लिहीली, त्यातली अनेक महाविद्यालयांत अभ्यासालाही लावली गेली. केट लवकरच अमेरिकन स्त्रीवादाची मुकुटमणी बनली. तिचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ मानला जाऊ लागला.

--------------

लेखात मॅलरी आणखी एक मुद्दा मांडतात. त्या म्हणतात की आज मी माझ्या बहिणीच्या नादाला लागून बरबाद झालेल्यांकडे पाहते तेव्हा हृदय विदीर्ण होतं. म्हातारं सगळ्यांनाच एक ना एक दिवस व्हायचं आहे, मात्र या सगळ्या जणी आज स्त्रीवादाची शिकार झाल्याने भीषण एकाकीपणाने ग्रस्त आहेत. त्यांनाही आजी होता आलं असतं, आणि ज्या कुटुंबसंस्थेचा स्वतःच्या हाताने नाश केला तेच नातेसंबंध आज त्यांना हवेहवेसे वाटत आहेत पण ते आता त्या कधीच अनुभवू शकणार नाहीत. मॅलरी या केटच्या बहीण असल्याचं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा "तुझ्या बहिणीच्या पुस्तकांमुळे माझ्या बहिणीचं (किंवा जी कोण असेल तिचं) आयुष्य बरबाद झालं असं अनेकदा ऐकवलं जातं.

आपल्याकडे हिंदूंच्या दुर्दैवाने या इंग्रजी डाव्यांच्या पुस्तकांचे पुरेसे अनुवाद झाले नाहीत (हे डावे उच्चविद्याविभूषित असूनही) पण त्यांच्या कल्पना मात्र इथे राबवल्या गेल्या. त्याने जे नुकसान झालं ते झालंच, आणि अजूनही चालू आहे. संस्कृतिक विध्वंस कसा करायचा या संबंधी फ्रॅकफर्ट स्कुलोत्पन्न घटिंगणांनी भरपूर लेखन केलेलं आहे आणि त्यांच्या कल्पना इकडे राबवून इथल्या डाव्यांनी आपलं भरपूर नुकसानही केलेलं आहे. लव्ह जिहादला याच कारणाने प्रोत्साहन मिळालेलं आहे, पण त्यासंबंधातला लेख पुन्हा केव्हा तरी. दुर्दैवाने आपल्याक्डे हिंदुत्ववादी संघटनांनी बौद्धिक योद्ध्यांना तयार करण्यात अक्षम्य चालढकल केली आणि या पुस्तकांचं भाषांतर केलंच नाही. त्या इंग्रजी पुस्तकांचं देशी भाषांत रूपांतर करायला अजूनही वेळ गेलेली नाही.

देशाला कळायला हवं, की हे विष आहे.

असो. मॅलरी मिलेट यांचा मूळ इंग्रजी लेख तुम्हाला इथे वाचता येईल.
https://www.frontpagemag.com/fpm/240037/marxist-feminisms-ruined-lives-mallory-millett

 https://photos.app.goo.gl/vNZueF3xipoDmOiv1


  © मंदार दिलीप जोशी
     शके १९३९

Friday, April 27, 2018

प्रथम तुज पाहता

प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. सीतामाईंना बघितल्यावर साक्षात प्रभू रामचंद्रांची अवस्था ही काहीशी अशीच झाली होती. त्या वेळी गौरीपूजनाला सीतामाई उद्यानात आल्या होत्या. अशा वेळी उद्यानात फिरणार्‍या प्रभू रामचंद्र व त्यांचे धाकटे भ्राता लक्ष्मण यांना सीतामाईंच्या एका सेविकेने बघितले आणि सीतामाईंकडे येऊन हर्षभरित भावाने दोन्ही बंधूंचे वर्णन केले. आपल्या त्या सेविकेकडून त्या अयोध्येच्या राजकुमारांचे वर्णन ऐकल्यावर सीतामाई आपल्या सख्यांसह प्रभू रामचंद्रांना बघण्यास आतुर झाल्या.

कंकन किंकिनि नूपुर धुनि सुनि। कहत लखन सन रामु हृदयँ गुनि॥
मानहुँ मदन दुंदुभी दीन्ही। मनसा बिस्व बिजय कहँ कीन्ही॥1॥

सीतामाई आणि त्यांच्या सेविकांच्या वावराने त्यांच्या बांगड्या, कंबरपट्टा, आणि पैंजणांचा आवाज ऐकून प्रभू रामचंद्रांचं लक्ष तिकडे गेलं. त्या वेळी झालेल्या प्रभू रामचंद्रांच्या अवस्थेचं वर्णन गोस्वामी तुलसीदास असं करतातः

अस कहि फिरि चितए तेहि ओरा। सिय मुख ससि भए नयन चकोरा॥
भए बिलोचन चारु अचंचल। मनहुँ सकुचि निमि तजे दिगंचल॥2॥

सीतामाईंच्या मुखचंद्राकडे बघण्याकरता प्रभूंच्या नेत्रांनी चकोर आकार धारण केला आणि ते सीतेकडे स्थिर दृष्टीने पाहू लागले, जणू निमी (राजा जनकाचे पुर्वज) (ज्यांचा निवास मानवाच्या पापण्यात आहे असे मानतात) यांनी मुलगी आणि जावई यांच्यात हा प्रसंग घडत असताना आपण तिथे उपस्थित राहू नये असे वाटून संकोचाने पापण्यांचा त्याग केला आणि त्यामुळे (हलक्या झाल्याने) प्रभू रामचंद्रांच्या पापण्या न मिटता त्या स्थिर राहून ते सीतामाईंकडे एकटक पाहू शकले.

देखि सीय शोभा सुखु पावा। हृदयँ सराहत बचनु न आवा॥
जनु बिरंचि सब निज निपुनाई। बिरचि बिस्व कहँ प्रगटि देखाई॥3॥
सुंदरता कहुँ सुंदर करई। छबिगृहँ दीपसिखा जनु बरई॥
सब उपमा कबि रहे जुठारी। केहिं पटतरौं बिदेहकुमारी॥4॥
सिय शोभा हियँ बरनि प्रभु आपनि दसा बिचारि॥
बोले सुचि मन अनुज सन बचन समय अनुहारि॥230॥
तात जनकतनया यह सोई। धनुषजग्य जेहि कारन होई॥
पूजन गौरि सखीं लै आईं। करत प्रकासु फिरइ फुलवाईं॥1॥
जासु बिलोकि अलौकिक सोभा। सहज पुनीत मोर मनु छोभा॥
सो सबु कारन जान बिधाता। फरकहिं सुभद अंग सुनु भ्राता॥2॥
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ। मनु कुपंथ पगु धरइ न काऊ॥
मोहि अतिसय प्रतीति मन केरी। जेहिं सपनेहुँ परनारि न हेरी॥3॥
जिन्ह कै लहहिं न रिपु रन पीठी। नहिं पावहिं परतिय मनु डीठी॥
मंगन लहहिं न जिन्ह कै नाहीं। ते नरबर थोरे जग माहीं॥4॥

सीतामातेच्या सौंदर्याचे वर्णन मात्र प्रभू रामचंद्र उघड बोलून दाखवत नाहीत. पण ते लक्ष्मणाला म्हणतात की हे लक्ष्मणा, हीच ती जनककन्या सीता जिच्या प्राप्तीसाठी शिवधनुष्य उचलण्याची कठीण अट आहे. या सीतेला पाहून माझ्या मनात जे चालले आहे त्याचे कारण त्या विधात्यालाच ठावूक, पण हे लक्ष्मणा, माझी ऊजवी पापणी मात्र फडफड करते आहे. पण रघुवंशात जन्म घेतलेल्यांचा हा स्वभावच आहे की ते स्वप्नातही परस्त्रीवर (जी विधिवत आपली झालेली नाही ती) लालसायुक्त दृष्टी ठेवत नाहीत. इथे गंमत पहा, आपल्याला विश्वामित्र ऋषींनी इथे का आणलं आहे याची या दोघांना कल्पना आहे. प्रभू रामचंद्रांना आपल्या पराक्रमाबद्दल खात्रीही आहे की आपण शिवधनुष्याला उचलून प्रत्यंचा नक्की चढवू आणि सीतेला पत्नी म्हणून प्राप्त करु. पण त्यांना आपण थोर अशा रघुकुलातले आहोत याची जाणीव आहे आणि त्या कुलाची मर्यादाशील परंपरा राखायची आहे म्हणून आपल्या भावना ते नियंत्रणात ठेऊ इच्छितात.

चितवति चकित चहूँ दिसि सीता। कहँ गए नृप किसोर मनु चिंता॥
जहँ बिलोक मृग सावक नैनी। जनु तहँ बरिस कमल सित श्रेनी॥1॥

आता सीतामाईंना त्यांच्या सखीने प्रभूंचे वर्णन करुन दोघांच्या दिशेने आणलं खरं पण सीतेला राम दिसेना. आपल्या लहानशा मृगनयनांनी सीतामाई प्रभूंना शोधू लागल्या.

लता ओट तब सखिन्ह लखाए। स्यामल गौर किसोर सुहाए॥
देखि रूप लोचन ललचाने। हरषे जनु निज निधि पहिचाने॥2॥

त्यांची ही अवस्था न बघवल्याने शेवटी सख्यांनी त्यांचे लक्ष प्रभू व भ्राता लक्ष्मण जिथे होत तिथे वेधून घेतलेच. वेलींच्या आडून प्रभूंचा चेहरा दिसताच सीतामाईंच्या डोळ्यांत अतीव समाधान दाटलं, की जणू त्यांना त्यांचा खजिनाच मिळाला असावा.

थके नयन रघुपति छबि देखें। पलकन्हिहूँ परिहरीं निमेषें॥
अधिक सनेहँ देह भै भोरी। सरद ससिहि जनु चितव चकोरी॥3॥
लोचन मग रामहि उर आनी। दीन्हे पलक कपाट सयानी॥
जब सिय सखिन्ह प्रेमबस जानी। कहि न सकहिं कछु मन सकुचानी॥4॥

सीतामाईंचे डोळे आता प्रभू रामचंद्रांकडे एकटक पाहू लागले. ते रूप डोळ्यांच्या मार्गे हृदयात साठवून घेत तो खजिना बाहेर पडू नये म्हणून की काय सीतामाईंनी डोळे मिटून घेतले.

लताभवन तें प्रगट भे तेहि अवसर दोउ भाइ।
तकिसे जनु जुग बिमल बिधु जलद पटल बिलगाई॥232॥

(इतक्यात एकमेकांशी बोलता बोलता) दोघे बंधू वेलींच्या आडून बाहेर आले. ढगांच्या आडून बाहेर आल्यावर ज्याप्रमाणे चंद्रदर्शन होते तसेच ते दृश्य होते. प्रभू रामचंद्रांचे सौंदर्य व पराक्रमी व्यक्तिमत्व सीतामाईंना मोहित करुन गेले.

सकुचि सीयँ तब नयन उघारे। सनमुख दोउ रघुसिंघ निहारे॥
नख सिख देखि राम कै सोभा। सुमिरि पिता पनु मनु अति छोभा॥2॥

पण त्याच वेळी आपल्या पित्याने आपल्याशी लग्न करायला ठेवलेली अट आठवून सीतामाई घाबरल्या. प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमावर कितीही विश्वास असला तरी मन चिंती ते वैरी न चिंती असे वाटणे साहजिकच होते.

परबस सखिन्ह लखी जब सीता। भयउ गहरु सब कहहिं सभीता॥
पुनि आउब एहि बेरिआँ काली। अस कहि मन बिहसी एक आली॥3॥

पण अशा प्रकारे बराच वेळ उद्यानात घालवल्याची जाणीव झाल्यावर सीतामाईंची अशी प्रभू रामचंद्रांच्या प्रेमात मुग्ध झालेली अवस्था पाहून सख्या घाबरून म्हणाल्या की आता फारच उशीर झाला बाई. सीतामाईंना पाहून एका सखीला मात्र चेष्टा करण्याची हुक्की आली. ती म्हणते कशी, आपण उद्या पुन्हा याच वेळी इथे येऊ.

गूढ़ गिरा सुनि सिय सकुचानी। भयउ बिलंबु मातु भय मानी॥
धरि बड़ि धीर रामु उर आने। फिरी अपनपउ पितुबस जाने॥4॥

आणि प्रभू रामचंद्रांना बघण्यात आपण खूपच वेळ घालवला हे लक्षात आल्याने आता आई काय म्हणेल या भीतीने सीतामाईंचा जीव कासावीस झाला आणि त्या प्रभू रामचंद्रांची छबी आपल्या हृदयात साठवून आपल्या राजवाड्यात परतल्या.

म्हटलं होतं ना, 
प्रथमदर्शी प्रेम अर्थात प्रथम तुज पाहता जीव वेडावला ही गोष्ट आधुनिक काळातली खचितच नाही. आणि त्याचं इतकं सुंदर वर्णन तुलसीदासच करू जाणोत.

बोला, जय श्री राम !

- मंदार दिलीप जोशी
वैशाख शु. नवमी, शके १९३९


Saturday, April 21, 2018

कठुआच्या निमित्ताने मतदानावर बहिष्कार घातक

सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही केलं नाही तर आम्ही मतदान करणार नाही - अशा अर्थाची पोस्ट ज्याने पहिल्यांदा लिहीली तो इसम चपलेने बडवून काढण्याच्या लायकीचा आहे.

ही पोस्ट ज्या भोळसटपणे** काही महिलावर्गाने पोस्ट केली त्यांना माझा कोपरापासून नमस्कार.

NOTA चा प्रचार कमी पडतो आहे असं वाटलं म्हणून आता कठूआ आणि उन्नाओ प्रकरणाचा फायदा घेऊन टाळूवरचं लोणी खाणारेच हा धंदा करत आहेत.

मतदान न केल्याने काय होणार आहे ते आपण आता पाहू.

आपण लोकशाहीत राहत असल्याने तुम्ही मतदान केलं नाहीत तरी निवडणुका व्हायच्या थांबणार नाहीत.

मतदान करणार नाही असं "माझी झांशी मी देणार नाही" या आवेशात ज्या म्हणत आहेत त्यातल्या बहुतेकांनी मोदी सरकारला मत दिलेलं आहे. मी हे ठामपणे म्हणू शकतो की हे सरकार त्याच्या सर्व गुणदोषांसकट काँग्रेस व त्याच्या भेळपुरी सरकारांच्या हजारो पटींनी चांगले आहे. असं असताना मतदान न केल्याने फक्त मोदी सरकारची अर्थात भाजपची मते कमी होतील आणि पुन्हा इटालियन मम्मी प्रणित काँग्रेस पुरस्कृत सरकार सत्तेवर येईल. मग कर्नल पुरोहित वगैरेंवर जे झालं ते सामान्य नागरिकांवर सुरु होईल. हिंदूंचं जगणं सद्ध्या मुश्कील असेल तर तेव्हा ते अशक्य होऊन बसेल. विचार करा, मतदान करु नका असं आवाहन करणार्‍या लोकांना कुणाच्याही अब्रूची पडलेली नाही. त्यांना फक्त या घटनांचा फायदा घेऊन मोदी सरकार खाली खेचायचे आहे आणि परत जनतेला आणि हिंदूंना छळायला सत्तेत यायचे आहे. आणि ते सत्तेत आल्यावर नक्की असं म्हणणार आहेत की "तुम्ही तर मतदान केलंच नाहीत, आम्ही कशाला तुमचे प्रश्न सोडवू".

खात असलेल्या अन्नाला चव नाही म्हणून ते टाकून तुम्ही शेण खाणार का? तसं असेल तर खरंच मतदान करु नका.

पण भावनेच्या भरात एका देशविघातक लांडग्याने केलेले घातक आव्हान भोळसटपणाने** आपल्या टाईमलाईनवर शेअर करु नका. हलकट लोकांनी टाकलेल्या वैचारिक शेणाचे पो आपल्या भिंतींवर थापू नका - दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ. परमेश्वराने डोक्यावर जो अवयव बसवला आहे त्याचा उपयोग करा आणि काहीही पोस्ट करण्याआधी सांगोपांग विचार करा.

माझं म्हणाल तर मी २०१९ मधे कमळावरच बटन दाबणार आहे. फिर एक बार, मोदी सरकार.

© मंदार दिलीप जोशी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155670347982326&id=652482325

**बावळटपणा म्हणणार होतो, पण जाऊदे म्हटलं आणि भोळसटपणे हा शब्द वापरला.

कठुआ, सिरीया, आणि आपण

कठुआ येथे झालेल्या तथाकथित बलात्कार आणि खून प्रकरणानंतर तसेच अमेरिका, फ्रान्स, आणि ब्रिटन यांनी सिरीयावर पुन्हा सुरु केलेल्या बॉम्बवषावाच्या निमिताने माध्यमांनी आणि इतर घटकांनी जी राळ उधळली आहे त्यातून तरुन जायचं असेल तर काही तथ्यांचा आणि तर्कांचा खोलवर जाऊन विचार करणे भाग आहे.

मनुष्याला मन आहे आणि मन म्हटलं की भावना आल्याच. वरवर उदात्त हेतू असल्याचं दाखवत मनुष्यस्वभावातील कमकुवत बाजूंचा व्यवस्थित अभ्यास करुन त्यांचा उपयोग छुपे घाणेरडे हेतू साध्य करायला वापर केला जातो, जात आहे याची नोंद आपण घेणं आवश्यक आहे. लहान मुलांना होणारे त्रास हा विषय निघाला की साहजिकच आपण भावुक होतो. त्यातही मातृसुलभ भावनेमुळे सगळ्याच स्त्रीया लहान मुलांच्या बाबतीत खूप हळव्या असतात, मग अशा घटना घडल्यावर या हळव्या बाजूचा गैरफायदा घ्यायला काही भामटे सरसावले नाहीत तरच नवल आहे.  ही गोष्ट अधिक स्पष्ट करायला एक उदाहरण पाहूया. समजा तुम्हाला बातमी सांगितली गेली की 'सिरीयात एक ३० वर्षीय तरुण बॉम्बवर्षावात मेला" तर त्यावर तुमची प्रतिक्रिया ही फार फार तर "अरेरे वाईट झालं" या उद्गारांपलिकडे नसेल. पण वयाच्या याच आकड्यातून शून्य काढून तुम्हाला सांगितलं की 'सिरीयात बॉम्बवर्षावात ३ वर्षांचा मुलगा दगावला' तर त्यावर त्वेषाने व्यक्त होणं आणि ज्यानी कुणी हे घडवून आणलं त्याचा निषेध करणं हे तुम्हाला तुमचं नैतिक कर्तव्य वाटेल.

आपल्याला जेव्हा हे सांगितलं जातं की एका ८ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला, तेव्हा आपल्या मेंदूतला मातृपितृसुलभ सहानुभूतीचा कोपरा जागृत होतो, पण त्यानंतर जो भावनांचा महापूर येतो त्याच्यात मात्र दुष्प्रचार करणार्‍यांनी पेरलेल्या खोट्या बातम्यांखेरीज काहीही नसतं. कठुआत घडलेल्या घटनेनंतर आपल्या मनाच्या याच कमकुवत बाजूचा फायदा घेत सहानुभूती आणि रोषाचा ओघ हा आपल्याच धर्माची आणि संस्कृतीची बदनामी करण्याकडे वळवायचा. आणि दुसरीकडे मेलेल्या लहान मुलांचे खरेखोटे फोटो पसरवून युरोपात बहुसंस्कृतिवादाचा प्रसार करायचा आणि सिरीयातील असाद सरकारला अस्थिर करायची मोहीम चालवायची.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या नैसर्गिक सहानुभूतीचा फायदा घेऊन त्याचा उपयोग भलत्याच गोष्टीसाठी करुन घेणे ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. जरा मागे गेलं तर युगोस्लाव्हिया आणि सर्बियाचे नेते स्लोबोदान मिलोसोविच यांना असाद यांच्या प्रमाणेच बदनाम करुन अमेरिका आणि नेटोच्या हवाईदलांनी कोसोवो आणि सर्बियावर इतका बॉम्बवर्षाव केला की मिलोसोविच यांच्यावर जितकी मुलंमाणसं मारण्याचा आरोप होता त्याच्या कित्येक पटींनी माणसं या बॉम्बवर्षावात मारण्यात आली. वर दिलेल्या उदाहरणाचा प्रयोग अमेरिकेत करुन बघितला तरी परिणाम तोच होईल. अमेरिकेत कुणालाही विचारा की सिरीयात अमेरिकेने हस्तक्षेप करावा का? तर उत्तर नाही असंच येईल. पण हा प्रश्न विचारताना "असाद सरकारमुळे आज २० मुलं मेली" हे शेपूट जोडून दिलंत, की तीच व्यक्ती फेफरे आल्यागत उच्चरवाने मुलांचा खुनी असादला खाली खेचायचा सल्ला देईल. मग त्याचे परिणाम अधिक मुलांच्या मृत्यूमध्ये होणार असल्याचं त्याच्या गावीही नसेल.

लहान मुलांबद्दल आपल्याला असलेल्या सहानुभूतीची कारणं जैविक तर आहेतच पण इतिहासाला योग्य परिप्येक्षातून बघायला आपण अजूनही न शिकणं हे कारणही तितकंच महत्त्वाचे आहे. माध्यमं आणि इतर घटकांनी चालवलेल्या मोहिमांत लहान मुलांच्या डोक्यावर निरपराध असल्याचा शिका उमटतो आणि तशी ती खरोखरच निरपराध असतातही, पण हे जग इतकं साधं सोपं नाही. लहान मूल हे आकाशातून पडलेलं रत्न नसतं, तर ते फक्त भूतकाळ आणि भविष्यकाळ यातील एक दुवा म्हणून काम करत असतं. ते कितीही निरपराध असलं तरी ते स्वतःला भूतकाळातून आलेल्या नाचणार्‍या भुतांपासून आणि क्रूर भविष्यकाळापासून वाचवू शकत नाही. आयुष्य जगताना, जगण्यासाठी त्याच्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्यांची, किंमत त्याला चुकवावीच लागते भले ते पर्याय निवडण्यात त्याचा काहीही हात नसला तरीही. उदाहरणतः आपल्या पूर्वजांनी ज्या पर्यायांची निवड केली त्याचे परिणाम आपण भोगतोच आहोत; यात सद्गुण विकृतीने पछाडलेल्या हिंदू राजांचा आणि देश चालवायला काँग्रेसला उत्तम पर्याय समजणार्‍या आपल्या वाडवडिलांचाही समावेश करावा लागेल. माझ्या मुलांनाही मी निवडलेल्या पर्यायांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यात त्यांचा काहीही निर्णयाधिकार नसला तरी. इतिहास हा एक कालखंड नसून सतत घडणार्‍या घटनांची एक साखळी आहे, त्यामुळे कुठल्याही घटनेला भावनावेगात वेगळं कढून पुढचे, मागचे, आणि आजूबाजूचे संदर्भ वगळून तपासल्याने त्यातले प्रयोगसिद्ध वास्तविकता बदलत नाही.

याचा विचार केला तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला "पुढे काय?" याचा विचार न करता येणे किंवा पुढे काही घडले असल्यास त्याची नोंद न घेता येणे हा आहे. सिरीयाचे अध्यक्ष असलेले असाद हे लहान मुलांचे खूनी आहेत म्हणून यांना पदच्युत करा असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण "असाद यांना पदच्युत करणे" या नंतरच्या परिणामांचा विचार करणे सोडून दिलेले असते. सद्दाम हुसेन यांना फाशी दिल्या क्षणी इराकचा विचार करणं आपण थांबवतो.

आणि आपण असिफाच्या तथाकथित बलात्कार्‍यांना/खुन्यांना फाशी द्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण ही घटना देशविघातक घटक सद्ध्या सत्तारूढ असलेलं सरकार खाली खेचायला किंवा त्या सरकारचं निव्वळ अस्तित्व हे हिंदूंच्या रानटी मनोवृत्तीचे प्रतीक असल्याचा तद्दन खोटा प्रचार करायला कसं वापरुन घेत आहेत याचा विचार करणं बंद केलेलं असतं.

काय आहे, भोळसट असायला हरकत नाही. पण देव, देश, आणि धर्म यांच्याबद्दल दुष्प्रचार करणारे आपल्याला वापरुन घेतील इतकं बावळट असणं कितपत योग्य हे ज्याचे त्याने ठरवावे.

© मंदार दिलीप जोशी व Satish Verma

त्याच्या आत्याबाईची शेजारीण

हे असलं शीर्षक? काय आहे अर्थ याचा? आणि कोण तो? कोण त्याची आत्याबाई? आणि कोण त्या आत्याबाईची शेजारीण? अहो ती शेजारीण म्हणजे आपण सगळे....हो तुम्ही आम्ही सगळे.

सांगतो. यातला तो म्हणजे लेओनिड निकोलाएव नावाचा रशियन. आता त्याच्या आत्याबाईबद्दल आणि तिच्या शेजारणीबद्दल जाणून घेण्याआधी आपण सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) याच्याबद्दल जाणून घेऊया. आता हा कोण आला मधेच? सांगतो.

सरगेई किरोव्ह (Sergei Kirov) हा रशियाचा क्रूरकर्मा हुकूमशहा स्टॅलिनचा उजवा हात समजला जायचा. १ डिसेंबर १९३४ साली लेनिनग्रॅड शहरात त्याची गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या करणारा होता लेओनिड निकोलाएव नावाचा ३० वर्षांचा रशियन तरुण. या हत्येमुळे संपूर्ण सोवियत रशियात प्रचंड खळबळ माजली. खुद्द स्टॅलिन मॉस्कॉतून रेल्वेगाडीतून लेनिनग्रॅडला रवाना झाला.

१ डिसेंबरला निकोलएवला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला गोळी घालून मारण्यात यावं असा आदेश बजावण्यात आला. यात कारण असं बाहेर आलं की निकोलाएवच्या पत्नीशी किरोव्हने अनैतिक संबंध ठेवले होते म्हणून चिडून निकोलाएवने त्याची हत्या केली. पण सोवियत रशियात अशी कारणं किती खरी असतील याची कल्पना केलेलीच बरी.

तर निकोलाएवने ही हत्या कुणाचीही मदत न घेता एकट्यानेच केल्याचं सांगितलं. पण स्टॅलिननं या घटनेचा पुरेपूर फायदा घेतला, निकोलाएवशी संबंध असलेल्या नसलेल्या अनेकांना सरळ उचलून देहदंडाची शिक्षा सुनावण्याचा त्याने सपाटा लावला. या शिक्षेविरुद्ध कुठलंही अपील करता येत नसे. निकोलाएवशी तुमचा संबंध असणं हे एकच कारण सांगितलं की अपील तर सोडाच खटलाही धड चालवला जाण्याची शक्यता शून्य होती. उचलल्या जाणार्‍यांच्यात निकोलाएवचे नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी-पाजारी कुणालाही सोडलं गेलं नाही. यात एलिझाबेथ लेरमोलो नामक एका महिलेला देहदंड मिळण्याचं कारण तुम्हाला सांगितलं तर तुम्ही चाट पडाल. ही महिला निकोलएवच्या आत्याची शेजारीण होती.

किरोव्हच्या हत्येचं निमित्त करुन स्टॅलोनने भीषण हत्याकांड आरंभलं. कम्युनिस्ट पार्टीचे हजारो कार्यकर्ता आणि सामान्य जनतेतले कोट्यावधी निरपराध नागरिकांची हत्या केली गेली. या प्रकाराची दहशत इतकी होती की सर्वसामान्य माणूस श्वास घेतानाही विचार करत असे.

किरोव्ह स्टॅलिनच उजवा हात समजला जात होता खरा, पण खरंच स्टॅलिनला त्याच्याबद्दल इतकी आत्मीयता होती?

नाही. त्यावेळच्या साहित्याचा कानोसा घेतला तर अनेकांचं असं म्हणणं होतं की किरोव्हची हत्या स्टॅलिननेच घडवून आणली होती. किरोव्ह स्टॅलिनचा उजवा हात समजला जात होता याचा अर्था त्याची लोकप्रियता सुद्धा रशियन जनतेत वाढत होती. स्टॅलिनला असा संशय होता की त्याने व कम्युनिस्ट पार्टीने ज्या सातत्याने विरोधकांच्याच नव्हे तर सामान्य नागरिकांच्या हत्या घडवून आणल्या होत्या त्याने रशियन जनता विटली होती आणि कदाचित स्टॅलिनला पदच्युत करुन किरोव्हला राष्ट्राध्यक्षपदी बसवेल.

कदाचित किरोव्हच्या हत्येत स्टॅलिनचा हात नसेलही, पण त्याच्या मृत्यूचा फायदा स्टॅलिनने पुरेपूर उचलला. क्रूरतेची परिसीमा गाठत सत्तेवरची आपली पकड त्याने घट्ट केली.

पण त्याने किरोव्हला खरंच न्याय मिळाला? 

--------------------------------------

असिफाला पण न्याय मिळायलाच हवा. कारण जानेवारीमध्ये झालेल्या हत्येची आत्ता अचानक वर येणं ही बाब संशयास्पद आहे. जवळजवळ तीन महीने हे षडयंत्र रचलं जात होतं का? कधी बोंब ठोकायला सुरवात करायची, कुणाकुणाला उचलायचं, कुठल्या समूदायाची बदनामी करायची, कुठल्या चॅनलनी कुठला मुद्दा उचलायचा याची पटकथा तर लिहीली जात नव्हती? असिफा बकरवाल समाजाची होती. बकरवाल समाजाने कधीही पाकिस्तानचे समर्थन केलेलं नाही आणि कधीही काश्मीरी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्‍यांच्या कच्छपी हा समाज लागलेला नाही. त्यातून वानी सारख्या बलत्काराचा आरोप असलेल्या आणि जिलानी या फुटीरतावादी नेत्याशी संबंध असलेल्या पोलीस अधिकार्‍याला बाहेरून तपासासाठी बोलवून घेणं ही बाब संशय वाढवणारी आहे. आणखी एक बाब म्हणजे सीबीआय चौकशीला दिलेला नकार आणि मुख्य्मंत्री मेहबूबा मुफ्ती यांची धक्कादायक विधाने.

असिफाला न्याय मिळायला हवा, तिच्यावर बलात्कार झालाच असेल तर बलात्कार्‍यांना शिक्षा व्हायलाच हवी. असं ऐकलं होतं की सैन्याला मोकळिक दिली गेली तेव्हा मेहबूबांनी त्याला विरोध केला होता, पण दिल्लीहून जवळजवळ रडतरडतच परत यावं लागलं होतं. And hell hath no fury greater than a woman scorned. मुलीच्या बदल्यात जहाल अतिरेक्यांना सोडणार्‍या बापाचं रक्त आहे ते, कधी ना कधी कुठे ना कुठे  आपला रंग दाखवणारच.

असिफाला न्याय मिळायला हवा. या घटनेची निःपक्षपाती चौकशी झालीच पाहीजे, आणि जे कुणी गुन्हेगार सापडतील त्यांची जात, धर्म, पद आणि समाजातील स्थान हे न बघता शिक्षा व्हायलाच हवी.

इथे एक गोष्ट आठवली ती जाता जाता सांगतो. सहसा हिंदू समाज एक धर्म म्हणून बलात्कार्‍यांचा साथ कधीच देत नाही. मुसलमानांची इतक्या वर्षांची सोबत असूनही हा दुर्गुण हिंदूंनी अजून अंगी बाणवलेला नाही. अलिगढमधे ख्वाजा चिश्तीच्या वंशजांनी घडवलेल्या मोठ्या यौन शोषण कांडात काही हिंदूनाही सामील करुन घेतलं होतं, पण जेव्हा ते पकडले गेले तेव्हा त्यांना हिंदू समाजाने साथ दिली नाही. त्यातल्या एकाने तर हा ताण सहन न होऊन आत्महत्या केली. निर्भया कांडातल्या आरोपीने देखील तुरुंगातच आत्महत्या केली होती हे तुम्हाला आठवत असेलच.  पण चिश्ती आरोपींना मुस्लीम समाजाने दूर लोटलं नाही. त्यांच्या मागे ते ठामपणे उभे राहिले. निर्भया कांडातला तथाकथित अज्ञान आरोपी मोहम्मद अफरोजच्या पाठीशी सुद्धा मुसलमान समाज उभा राहिला. एकाही मुसलमान नेत्याने त्याचा निषेध केला नाही. महालक्ष्मी येथील शक्ती मिल्स रेप प्रकरणात सापडलेल्या मुस्लीम आरोपीची आईच त्याच्या जन्माचा दाखला घेऊन कोर्टात आली होती. तो आता मोकळा झालं आहे आणि हप्ते वसुलीचा बिझनेस करतोय. त्याच्या समाजाने त्याला साथ दिल्यामुळे.

असिफाचं निमित्त करुन नाहक हिंदू समाजाला लक्ष्य केलं जातंय. आपली जम्मूतली जनता इतकी पोलीसविरोधी कशी झाली याचीही चौकशी व्हायला हवी. वानी नावाच्या त्या पोलीस अधिकार्‍याचे चरित्र जनतेसमोर यायला हवं, आणि त्याला बाहेरून या घटनेची चौकशी करायला का आणलं गेलं याचीही चौकशी केली जायला हवी.

आणि हो, असिफाला, आणि तिच्यासारख्या सर्वांनाच, न्याय मिळायलाच हवा.

आपली निकोलाएवच्या आत्याबाईची शेजारीण व्हायची नाहीतर!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10155668427647326&id=652482325

- © मंदार दिलीप जोशी