Friday, July 31, 2015

लोकसत्ताचे डोके ठिकाणावर आहे काय?

आदरणीय वंदनीय माननीय विवेकवादी अंधश्रद्धानिर्मूलनपटू राजमान्य राजश्री श्री गिरीश कुबेर साहेब,

कोपरापासून नमस्कार.

लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल असे वाटले नव्हतेपण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतीम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत त्याबद्दल तुमचे अभिनंदन. तुमचा हा लेख फॉरवर्ड मधून आला तेव्हा आधी तुमच्याच वृत्तपत्रात विनोदी सदर लिहीणार्या तंबी दुराई सदृश्य कुणीतरी लिहीला आहे असा आधी समज झाला होतापण तो अखेर गैरसमज ठरला. या लेखाबद्दल तुमचा तीव्र निषेध.

फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गैर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धीभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरवातीला म्हणता, याकुब मेमन माफीचा साक्षीदार ठरला, आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहेतो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता, आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी भारतात परतण्याचा निर्णयही घेतला नाही. रॉ संस्थेच्या ज्या रामन साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता, त्याच रामन साहेबांनी एका लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की पाकिस्तानच्या आय.एस.आयया गुप्तहेर संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या मेमन कुटुंबियांनी याकूबला 'भारतात परतणे कितपत श्रेयस्करयाचा आढावा घ्यायला नेपाळमधे असलेल्या त्याच्या नातेवाईकाशी एका वकीलाशी सल्लामसलत करायला नेपाळला पाठवलं होतं. या दोघांनीही त्याला पुन्हा कराचीला परतण्याचा सल्ला दिला. तो कराचीला परस्पर पळून जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना नेपाळ पोलीसांनी त्याला ओळखला, आणि वेगाने त्याची रवानगी भारतात करण्यात आली. बरं आपण रामन यांचे सोडून देऊ. गेले बिचारे. त्यांची साक्ष काही काढता येत नाही आता. पण विमानतळावर त्याला पकडणार्या नेपाळी पोलीस अधिकार्याची मुलाखत आपण हे अचाट संपादकीय लिहीण्याच्या आधी बघितली का? माझ्या अंदाजाप्रमाणे नसेलच.

मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहीता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायात आणि दहशतवादी घटनात पाकिस्तानचा सहभाग आहे हे तो पर्यंत अनेको वेळा सिद्ध झालेले असताना आणि अगदी १९९३ बाँबस्फोटांचा तपास करतानाही अन्य मार्गाने निदर्शनास आलेले असताना आपण पाकिस्तानचे नक्की काय वाकडे केले जे याकुबच्या खुलाशाने करु शकणार होतो? मग ज्यातून पुढे काहीही कारवाई करता येणार नाही आणि मिळाली तरी जिची विश्वासार्हता संशयास्पदच आहे अशी माहिती 'उघड' करण्यास कारणीभूत ठरणारा असा वेडगळ आणि तद्दन निरुपयोगी करार भारत सरकारने कसा काय केला असेल असे मज पामराच्या बुद्धीलाही पडणारे प्रश्न तुम्हाला पडले नसतील असे आम्ही कसे मानावे?

वादासाठी आपण गृहित धरू की सरकारने त्याच्याशी काही गुप्त करार केला होता. तुम्हाला एक बाळबोध उदाहरण देतो. माझ्या घरात एक उंदीर धुमाकूळ घालतो आहे. मी त्याला पकडायला आत बुंदीचा लाडू ठेऊन एक पिंजरा लावतो. तो त्या पिंजर्यात फसतो. आता तुम्ही मला सांगा, निव्वळ विध्वंसक अशी ओळख असलेल्या उंदराला मी मारून टाकावे की त्याला प्रेमाने मांडीवर घेऊन प्रेमाने तो लाडू खायला द्यावा आणि मग सोडून द्यावे?

पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मेगासेसे किंवा गेला बाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. "मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी". मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणार्यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली दहाची नोट एखाद्या प्रवाशाने खिशात टाकावी इतकी क्षुल्लक बाब!

तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुसर्या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकुबने दाखल केलेले क्युरेटीव्ह पेटीशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज, आणि डेथ वॉरंटवर स्टे आणण्याचे प्रयत्न हे सगळे सगळे आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बचावाच्या पुरेपूर संधी दिल्या याची साक्ष नव्हे कायमग तुमच्याकडे तुमच्या "वस्तुस्थिती" "निर्विवाद सत्य" या शब्दांपलिकडे जाऊन तीन न्यायालयातज्यात अर्थात सर्वोच्च न्यायालय आहेच, जे पुरावे सादर होऊन गुन्हा सिद्ध झाला त्यांच्याहून वरचढ पुरावा आहे का? नसल्यास तुम्ही व्यवस्थेला अशक्त असे संबोधून खालच्या न्यायालयांचाच नव्हे तर फाशी जायच्या दिवशीही पहाटे साडेचार वाजता याकुबचे म्हणणे ऐकून घेणार्या सर्वोच्च न्यायालयाही अवमान करत आहात याची तुम्हांस जाणीव आहे काय?

हाच अशक्त याकुब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाउंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लेखपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षितअडाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतका हुशार असलेल्या हा अशक्त याकुबला आपण ज्याच्या "चोरट्या" धंद्यांचे पैसे फिरवतो आहोतलेखापरिक्षण करतो आहोत तो आपला सशक्त थोरला भाऊ टायगर काय धंदे करतो आहे याची कल्पना नव्हती असे "अधिकृत वस्तुस्थिती"च्या नावाखाली तुम्ही ठोकून देताना तुम्ही किती तर्कदुष्ट विधान करत आहात याची तुम्हालाच जाणीव नसावी. त्याच्याच पुढे तुम्ही म्हणता "त्याचे (म्हणजे टायगरचे) चोरटे व्यापार कुटुंबियांस ठाऊक होते" आणि मग लगेच "परंतू त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे हे कुटुंबास ज्ञात नव्हते". हे म्हणजे ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बोरीवली ते चर्चगेट रेल्वे प्रवास करणारा एक चाकरमानी साईड बिझनेस म्हणून प्रवासात पाकीटमारीचा धंदा करीत असे आणि ते त्याच्या कुटुंबीयांस ठावूक नसे अशी एखादी सुरस कथा कथा सांगावी अशा प्रकारे आपण सांगता. तसेच, एकीकडे याकुबला 'काही म्हणजे काही माहित नव्हतं हो' असा टाहो फोडतानाच "तो माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही." असेही म्हणून जाता. कुबेर साहेबएक पे रेहेना, एक तो काही माहित नै बोलना नैतो निरपराध बोलना. लेकीन प्लीजच कोलांट्याउड्या मत मारना.

पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबियांस माहित नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना ते आय.एस.आय ने त्यांना कचाट्यात पकडले? म्हणे, 'बाँबस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय.एस.आय.च्या कचाट्यात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुबाच्या देखत त्याला चोपले'. आईआईगंहे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच.

आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकुबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणूसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर "लटकावून टाका फासावर" इतकं सोपं आहे?

आपल्या या अचाट आणि अतर्क्य संपादकीयात आपण याकुबच्या धर्माचा उल्लेख करुन तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेचभारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करुन तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तूलनेत याकुबचा गुन्हा चक्क किरकोळ ठरवून काय सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे समजण्याइतके आता तुमचे वाचक दुधखुळे राहिलेले नाहीत. संजय दत्तला सवलती मिळतात, ते कायद्याने. दाऊद टायगरला परत आणण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत ते आपले सरकार अंतर्गत आंतरराष्ट्रीय कायदे पाळत असल्यानेच. आणि आता याकुब फासावर गेलाय तो ही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच. तेव्हा 'उचलला याकुब, लटकवला फासावर' हे वाक्य 'उचलली जीभ लावली टाळ्याला' शैलीत आपण बरळू नये, हेच उत्तम.

आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊद्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्याआणि ते कमी म्हणून की काय उजवा हातही निकामी झालेल्या माणसाबद्दल किंवा वयाच्या तेराव्या वर्षी आईचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह बघायला ज्याला लागला त्या व्यक्ती विषयी जरा उमाळा येऊ द्या.

गिरीश कुबेर साहेब, मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहेमला मराठी वाचनाची गोडी निर्माण होण्यामागे लोकसत्ताचे नियमित वाचन हे आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धाती एक मोठी अंधश्रद्धा होती हे आपण मागेच सिद्ध केले होतेत, आणि आज हे संपादकीय लिहून तेव्हाचा लोकसत्ता घेणे बंद करण्याचा माझा निर्णय किती योग्य होता हे तुम्ही मला दाखवूनच दिलेत.
माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हे एक वाचनीय वर्तमानपत्र होता. नंतर त्याला उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होतात्या बालीश गरळोओकीत नंतर मोदी सरकार आल्याने नवा जोम आला. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही. तोच वारसा आपण समर्थपणे पुढे चालवत आहात हे पाहून संतोष जाहला. कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता आणि पर्यायाने खपही टिकवून ठेवू शकत नाही.

तेव्हा संपादक गिरीश कुबेरमहाशय, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. देशाच्या न्यायव्यवस्थेचा आणि न्यायालयांचा आदर करायला शिका. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली  शाब्दिक कोलांट्याउड्या मारण्याच्या आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि तुमच्या या संपादकीयावरुन पुन्हा सिध्द झालेले आहे की तुमची नियतही साफ नाही. तेव्हा लवकर सुधारा. नाहीतर मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधे रस्त्यावरच्या मवाल्यागत वागून थोतरीत खाणारा राजदीप आणि अनेकांनी तोंडात शेण घातलं तरी रोज  चुकता बरळणारा निखिल वागळे यांच्या रांगेत लो तुम्हाला कधी नेऊन बसवतील तुम्हालाच पत्ता लागावयाचा 
नाही.  

पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता  तुमचा तीव्र निषेध.
आपला नम्र

मंदार दिलीप जोशी
जालनिशी | फेसबुक

ता.. मी लोकसत्ता का बंद केला ते सांगणारे जुने विपत्र इथे वाचावयास मिळेल.
http://mandarvichar.blogspot.in/2014/09/blog-post.html




Tuesday, July 28, 2015

भेट




कॉफी पीत पीत
बटांशी हळुवार खेळत
विचार करत असताना तू आलास.....
...संथपणे
हळू हळू पावले टाकत
माझ्या दिशेने,
ठाम निश्चयी पावले तुझी.....
चपला मात्र जराशा लांबच काढून ठेवल्यास
संवेदनशील पर्यावरणवादी तू
किती सुंदर मनाचा आहेस रे.....
की
....गवतावर पादत्राणे घालून चालू नका अशी पाटी वाचली होतीस?

डॅा ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे महान व्यक्तिमत्व काल कायमचे पंचत्वात विलीन झाले.

डॉ. कलाम यांनी कायम विज्ञानाचा प्रसार करण्यात आनंद मानला. समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजवताना नेहमी धर्माला बडवले पाहीजे असे नाही हे त्यांनी कुठलाही अभिनिवेश न ठेवता प्रत्यक्ष आचरणाने दाखवून दिले. या प्रवासात कुठेही त्यांना वादग्रस्त गोष्टी चिकटल्या नाहीत. ही कला फार कमी जणांना अवगत आहे.

ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात हे सगळ्यांनाच विदीत आहे. इथे कवी संदीप खरे यांच्या "व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची" या काव्यपंक्तींची आठवण आल्यावाचून राहत नाही. डॉ. कलाम म्हणायचे, "भारताला क्षेपणास्त्रांची गरज यासाठी आहे की ताकद ही नेहमी ताकदीचा आदर करते" (We need missiles as strength respects strength).

त्यांची ओळख वैज्ञानिक व मिसाईल मॅन इतकीच नव्हती, तर एक सहृदयी व संवेदनशील बॉस म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपला बॉस कधी जातो याची इतर लोक वाट बघतात, हे जाऊ लागले की त्यांच्या हाताखालचे लोक व्यथित होत असत. सरकारी बाबू असोत किंवा लष्करी अधिकारी, सगळ्यांशी वागताना कमालीचा संयम व शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी होती. लहान मुले व तरुणांना मार्गदर्शन करणे ह्या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी होत्या. ज्ञानदानाचा त्यांचा उत्साह आश्चर्यकारक होता. त्यामुळे वयाच्या ८४व्या वर्षी ते निवर्तले असले, तरी ते अकाली गेले असेच आपल्याला वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही. अक्षरशः स्वतःच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते देशहितार्थ विज्ञानाचा प्रसार व मार्गदर्शन करत राहीले.

लोकसत्तातल्या बातमीचे शीर्षक हे 'अग्निपंख विसावले' असे आहे. ते तितकेसे बरोबर नाही. डॉ कलाम यांचे नश्वर शरीर कार्य करेनासे झाले, पण त्यांची चेतवलेला विज्ञानाग्नि आपल्या सर्वामधे कायम तेवत राहून आपल्याला अग्निपंख बहाल करत राहील अशी मला खात्री आहे.

कायम देशहित हाच वैय्यक्तिक स्वार्थ मानणार्‍या अशा या सच्च्या भारतीयाला माझी साश्रू नयनांनी मन:पूर्वक श्रद्धांजली.

निआषाढ शु१२शके १९३७
© Mandar D. Josh
i

Friday, July 17, 2015

बाळाजी विश्वनाथ पेशवे - लेखक प्रमोद ओक

हे पुस्तक परिक्षण नाही. परिक्षण लिहीण्याइतका मी मोठा आहे असे मला अजिबात वाटत नाही. पुस्तकाच्या वाचनानंतर मला काय वाटले त्याबद्दल व्यक्त झालेले हे विचार आहेत.


हे पुस्तक नुकतेच वाचले. ही ऐतिहासिक कादंबरी नाही तर संशोधनपर पुस्तक आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना हे अनेक ठिकाणी कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे. पुस्तकासाठी संशोधन करताना लेखकाने घेतलेले कष्ट पानागणिक जाणवतात.

वास्तविक पेशवा हे पद छत्रपती शिवाजी महाराजांपासून अस्तित्वात असले तरी आपण ज्याला 'पेशवाई' म्हणतो ती बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांपासूनच सुरू झाली. थोरले बाजीराव पेशवे यांच्यापासून शेवटच्या बाजीरावांपर्यंत  सगळ्या पेशव्यांवर विपूल साहित्य उपलब्ध असले तरी या पहिल्या पेशव्याबाबत मी काहीही वाचलेले नव्हते. त्यामुळे हे पुस्तक नजरेस पडताच संग्रही ठेवण्याचा निश्चय केला, आणि हा विश्वास लेखकाने सार्थ ठरवला.

पुस्तकात सुरवातीला चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण हे महाराष्ट्रात  बाहेरून आले का, आले असल्यास देशाच्या किंवा परदेशाच्या कुठल्या भागातून आले इत्यादी बाबींचा उहापोह करण्यात आलेला आहे. तो कंटाळवाणा वाटला तरी तो पेशव्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे, कारण चित्पावण ब्राह्मणांविषयी इतिहासात मुख्यतः पेशव्यांपासूनच वाचायला मिळते.

शाहू महाराजांच्या सुटकेपासून ते बाळाजीपंत यांचा पेशवेपदावर नेमणूक इथपर्यंतचा इतिहास फारच रोचक आहे आणि तो लेखकाने विस्तृतपणे दिलेला आहे. सर्वसामान्य माणूस स्वाभाविकपणे प्रत्येक बदलाचा स्वीकार करण्याआधी "What's in it for me?" अर्थात "यात माझा काय फायदा?" असा विचार करतो. मग या मनुष्यस्वभावात असलेल्या वैशिष्ठ्यापासून त्याकाळचे सरदार, इतर मानकरी, वगैरे कसे लांब असतील? त्या धामधुमीच्या काळात याची व्यवस्थित जाणीव असलेल्या बाळाजीपंतांनी त्यांच्याकडे असलेल्या शक्यतो लढाई टाळून सामोपचाराने समोरच्याला त्याचा फायदा दाखवून देणे व माणसे जोडणे या दोन अंगभूत गुणांनी कसा उपयोग करुन शाहू महाराजांची सत्ता मजबूत करण्यास महत्वाची भूमिका बजावली हे या पुस्तकात व्यवस्थितपणे येते.

पुस्तक बाळाजीपंतांच्या मृत्यूवर संपत नाही. शेवटच्या प्रकरणात  त्यांची पत्नी राधाबाई व इतर पेशवे परिवाराबाबत बरीच माहिती मिळते. एक उत्तम पुस्तक संग्रही पडले याचे समाधान लेखक श्री प्रमोद ओक यांनी दिले त्याबद्दल त्यांचे आभार.

आता पुस्तकातून मला जाणवलेल्या माझ्यासाठी रोचक असलेल्या तीन बाबी. त्यातली इतिहासप्रेमींच्या दृष्टीने असलेली बाब प्रथम सांगतो.

(१)


(२) आमचे गाव केळशी. त्या अनुषंगाने:



याबाबत कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.

(३) आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला आपल्या मुळांविषयी (roots) प्रचंड उत्सुकता असते, त्या संदर्भातली ही बाब. आमचे पूर्वज मूळचे कोकणातल्याच वरवडे गावचे शाण्डिल्य गोत्री जोशी. आता "जोशी उदंड जाहले" हे जरी खरे असले, तरी आम्ही पेशव्यांशी संबंधित जोशांच्या शाखा/उपशाखांपैकी असू शकतो ही शक्यताच गुदगुदल्या करुन गेली. या बाबतही कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.



Wednesday, May 27, 2015

नावात काय आहे? सगळंच!

नावात काय आहे असं तुकाराम महाराज म्हणून गेलेच आहेत. काय म्हणता? शेक्स्पिअर म्हणाला असं? अहो शेक्स्पिअर काय तुकाराम काय शेवटी नावंच ना? तरी कोण म्हणालं ते महत्वाचं आहे म्हणता? तसं बरोबरच आहे तुमचं.

हे पाल्हाळ लावायचे कारण म्हणजे नुकतंच एका लग्नात एक नातेवाईक भेटले आणि कौतुकाने अरबस्थानातल्या इजिप्तमध्ये नोकरी निमित्त असलेल्या त्यांच्या मुलाने आपल्या दुसर्‍या मुलीचे नाव 'सायरा' असल्याचे सांगू लागले. मी मनात म्हटलं (आम्ही मनातच म्हणायचे) "सायरा? एका हिंदू कुटुंबातल्या मुलींच नाव सायरा? मोठी झाल्यावर काय म्हणायचं तिला? सायरा बानू? खिक्क्. अरबस्थानात असली मुसलमानी नावं ठेवायची सक्ती आहे का? की मुसलमानी नावं ठेवायचं कबूल कबूल कबूल केल्याशिवाय मुलं होऊ देत नाहीत तिथे? नशीब मुलगा नाही झाला नाहीतर त्याचं नाव महंमद ठेवलं असतं तुम्ही! नाहीतरी मागे एक नाटक येऊन गेलंच होतं बेगम बर्वे. म्हणजे आडनाव हिंदू आणि नाव किंवा संबोधनार्थी पदवी म्लेंच्छ. आनंद आहे."

हिंदू आई वडिलांना आपल्या मुलामुलींची नावं ठेवताना यवन किंवा म्लेंच्छ नावांना वाढत्या प्रमाणात शरण का जावं लागत आहे हे आकलनाच्या पलिकडचं आहे. एकीकडे वेगवेगळे सुंदर अर्थ असलेल्या संस्कृतप्रचूर नावांकडे अनेकांचा कल वाढत असल्याचे दिसत असताना आश्चर्यकारकरित्या बरेच आईवडील आपल्या मुलामुलींची नावे ख्रिस्चन आणि मुसलमान पद्धतीने ठेवत आहेत. हे अत्यंत क्लेषकारक आहे. आता हे मान्य आहे की आपल्या अपत्याची नाव काय ठेवावी हा ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे, तरीही हिंदू म्हणून अशी नावे ठेवण्याकडे आज कमी प्रमाणात का होईना पण वाढता असलेला कल हे लक्षण आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याचे मानावे की अक्कल गहाण टाकून व्यक्तीस्वातंत्र्य या शब्दाचा भलताच अर्थ लावल्याचे?

एकदा एका कीर्तनकाराचे कीर्तन ऐकण्याचा योग आला असता त्याने हिंदूंबद्दल मांडलेली मते विचारप्रवृत्त करुन गेली.  एखाद्या हिंदूकडे बघितलं असता तो हिंदू आहे याचे कोणतेही लक्षण त्याच्या वेशभूषा किंवा दिसण्यावरुन जाणवत नाही. अर्थात इतर धर्मीयांकडे पाहून प्रत्येक बाबीचे तितकेच कट्टर अनुकरण आपल्याला शक्य आणि योग्य नसले, तरी प्रत्येक बाबीचं अंधानुकरण करणंही तितकंच धोकादायक आणि मूर्खपणाचे आहे.धर्मो रक्षति रक्षितः अशी एक म्हण आहे. अर्थ असा की जो धर्माचे रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. तेव्हा आपण आपल्याच धर्माला, संस्कृतीला अशा प्रकारे हरताळ फासला, तर इतरांना आपला आदर करण्याची काहीच गरज भासणार नाही.

या संदर्भात एक बातमी आठवली. आयर्लंडनं समलिंगी जोडप्यांच्या लग्नांना परवानगी नुकतीच परवानगी दिल्याचे वाचनात आले. पाश्चात्य तसेच देशी वृत्तमाध्यमांनी याची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आणि जाता जाता भारतासारख्या धार्मिक बाबींत संकुचित दृष्टी बाळगणार्‍या देशाने यातून बोध घ्यावा, असा पांडित्यपूर्ण सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.

पण दोनेक वर्षांपूर्वी सविता हालाप्पनवार नावाची एक अडलेली गरोदर स्त्री याच कॅथलिक आयर्लंडमध्ये रुग्णालयात दाखल झाली होती. तिचं मूल गर्भातच गेलं होतं, आणि तिचा जीव वाचवण्यासाठी तिला मोकळी करणं आवश्यक होतं. पण गर्भपात करण्यास आमचा धर्म मान्यता देत नाही म्हणून ते डाॅक्टर्स नुसते तमाशा बघत बसले तीन चार दिवसांनी जंतुसंसर्ग होऊन तीळ तीळ झिजून ती मेली, पण या तथाकथित उदारमतवादी आयर्लंडच्या लोकांच्या दगडी मनांना पाझर फुटला नाही. बायबलमधे समलिंगी संबंधांच्या विरुद्ध स्पष्ट ताशेरे आणि खुद्द देवाने शिक्षा केल्याचे दाखले आहेत. अडलेल्या बाईची सुटका केल्याबद्दल देवानं रागावल्याचे वा त्यानं शिक्षा केल्याचे नाहीतच. पण लक्षात कोण घेतो? भारतात हे झालं असतं तर आधी नातेवाईकांनी, आणि तिथून वाचले तर वृत्तमाध्यमांनी या डाॅक्टर्सचा जीव घेतला असता. पण तसे होत नाही, भारतात अशा परिस्थितीत कोणताही डाॅक्टर धार्मिक तत्त्वांपायी अडलेल्या बाईचा जीव घेत नाही.

अधिक विषयांतर न करता या या मामल्याचे एक तात्पर्य लक्षात घेऊया ते असे की पाश्चात्य देशांत आणि एकंदरित फारिनमधे होणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असते, असे नाही. तेव्हा तिचा अंगीकार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. काही बाबतीत आपण त्यांच्यापेक्षा बरेच उजवे असू शकतो आणि आहोत. आज जगभरात भारतीयांना जो मान आहे तो बहुतांश प्रमाणात हिंदू आहोत म्हणूनच आहे. आपल्या अनेक पद्धतींना आणि प्रथांना आपणच जपायला हवे कारण ती आपली ओळख आहे, आणि आपली नावं हा आपल्या हिंदू असण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा आईवडील आपल्या अपत्याचे नाव ठेवतात, तेव्हा त्या बाळाचे व्यक्तिमत्व घडायला सुरवात होण्याची आणि त्याची आपली अशी एक ओळख निर्माण होण्याची एक सूक्ष्मशी सुरवात असते. ती ओळख एक हिंदू म्हणून जपली जावी या करता आपण देशात असलो किंवा परदेशात असलो तरी नावं ठेवताना ती आपल्याच  संस्कृतीशी नातं सांगणारी असावीत याची काळजी घेणं आवश्यक आहे.

आपला बाह्यावतार आपल्याला बदलत्या काळानुसार आणि सोयीनुसार बदलावा लागला, तरी वर म्हटल्याप्रमाणे हिंदू असल्याच्या सगळ्याच चिन्हांना अशा प्रकारे तिलांजली देण्याची आवश्यकता नाही. "आमचं मूल आहे, आम्ही काहीही नाव ठेऊ" अशी स्वत्वहीन भूमिका घेणे हे हिंदूंसाठी अंतिमतः घातक ठरेल. व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क नाव निवडण्याच्या बाबतीत अवश्य गाजवावा, पण तो गाजवायला पर्याय म्हणून असंख्य हिंदू नावे उपलब्ध आहेत. तेव्हा हिंदू म्हणून आपला स्वाभिमान जपा.

हिंदू आईबाबांनो आपल्या मुलांची हिंदू पद्धतीने नावे ठेवा.

--------------------------------------------------------------------------------------------------
श्रेयनिर्देशनः या लेखनात उल्लेख केलेला आयर्लंडच्या सविता हालाप्पनवार या मृत्यू पावलेल्या महिलेचा किस्सा आमचे फेसबुकवरचे मित्रवर्य श्री कृष्णा धारासुरकर यांच्या एका टिप्पणीतून घेतला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
जेष्ठ शुक्ल ९, शके १९३७
----------------------------------------------