Tuesday, July 28, 2015

भेट




कॉफी पीत पीत
बटांशी हळुवार खेळत
विचार करत असताना तू आलास.....
...संथपणे
हळू हळू पावले टाकत
माझ्या दिशेने,
ठाम निश्चयी पावले तुझी.....
चपला मात्र जराशा लांबच काढून ठेवल्यास
संवेदनशील पर्यावरणवादी तू
किती सुंदर मनाचा आहेस रे.....
की
....गवतावर पादत्राणे घालून चालू नका अशी पाटी वाचली होतीस?

डॅा ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली

वैज्ञानिक व माजी राष्ट्रपती डॉ. कलाम हे महान व्यक्तिमत्व काल कायमचे पंचत्वात विलीन झाले.

डॉ. कलाम यांनी कायम विज्ञानाचा प्रसार करण्यात आनंद मानला. समाजात वैज्ञानिक दृष्टी रुजवताना नेहमी धर्माला बडवले पाहीजे असे नाही हे त्यांनी कुठलाही अभिनिवेश न ठेवता प्रत्यक्ष आचरणाने दाखवून दिले. या प्रवासात कुठेही त्यांना वादग्रस्त गोष्टी चिकटल्या नाहीत. ही कला फार कमी जणांना अवगत आहे.

ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जात हे सगळ्यांनाच विदीत आहे. इथे कवी संदीप खरे यांच्या "व्यर्थ हे सारेच टाहो, एक हे ध्यानात राहो, मूठ पोलादी जयांची, ही धरा दासी तयांची" या काव्यपंक्तींची आठवण आल्यावाचून राहत नाही. डॉ. कलाम म्हणायचे, "भारताला क्षेपणास्त्रांची गरज यासाठी आहे की ताकद ही नेहमी ताकदीचा आदर करते" (We need missiles as strength respects strength).

त्यांची ओळख वैज्ञानिक व मिसाईल मॅन इतकीच नव्हती, तर एक सहृदयी व संवेदनशील बॉस म्हणूनही ते प्रसिद्ध होते. आपला बॉस कधी जातो याची इतर लोक वाट बघतात, हे जाऊ लागले की त्यांच्या हाताखालचे लोक व्यथित होत असत. सरकारी बाबू असोत किंवा लष्करी अधिकारी, सगळ्यांशी वागताना कमालीचा संयम व शांतपणे समजावून सांगण्याची त्यांची हातोटी होती. लहान मुले व तरुणांना मार्गदर्शन करणे ह्या त्यांच्या विशेष आवडीच्या गोष्टी होत्या. ज्ञानदानाचा त्यांचा उत्साह आश्चर्यकारक होता. त्यामुळे वयाच्या ८४व्या वर्षी ते निवर्तले असले, तरी ते अकाली गेले असेच आपल्याला वाटले तर त्यात काही आश्चर्य नाही. अक्षरशः स्वतःच्या अखेरच्या क्षणापर्यंत ते देशहितार्थ विज्ञानाचा प्रसार व मार्गदर्शन करत राहीले.

लोकसत्तातल्या बातमीचे शीर्षक हे 'अग्निपंख विसावले' असे आहे. ते तितकेसे बरोबर नाही. डॉ कलाम यांचे नश्वर शरीर कार्य करेनासे झाले, पण त्यांची चेतवलेला विज्ञानाग्नि आपल्या सर्वामधे कायम तेवत राहून आपल्याला अग्निपंख बहाल करत राहील अशी मला खात्री आहे.

कायम देशहित हाच वैय्यक्तिक स्वार्थ मानणार्‍या अशा या सच्च्या भारतीयाला माझी साश्रू नयनांनी मन:पूर्वक श्रद्धांजली.

निआषाढ शु१२शके १९३७
© Mandar D. Josh
i

Friday, July 17, 2015

बाळाजी विश्वनाथ पेशवे - लेखक प्रमोद ओक

हे पुस्तक परिक्षण नाही. परिक्षण लिहीण्याइतका मी मोठा आहे असे मला अजिबात वाटत नाही. पुस्तकाच्या वाचनानंतर मला काय वाटले त्याबद्दल व्यक्त झालेले हे विचार आहेत.


हे पुस्तक नुकतेच वाचले. ही ऐतिहासिक कादंबरी नाही तर संशोधनपर पुस्तक आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाचकांना हे अनेक ठिकाणी कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे. पुस्तकासाठी संशोधन करताना लेखकाने घेतलेले कष्ट पानागणिक जाणवतात.

वास्तविक पेशवा हे पद छत्रपती शिवाजी महाराजांपासून अस्तित्वात असले तरी आपण ज्याला 'पेशवाई' म्हणतो ती बाळाजी विश्वनाथ भट या पेशव्यांपासूनच सुरू झाली. थोरले बाजीराव पेशवे यांच्यापासून शेवटच्या बाजीरावांपर्यंत  सगळ्या पेशव्यांवर विपूल साहित्य उपलब्ध असले तरी या पहिल्या पेशव्याबाबत मी काहीही वाचलेले नव्हते. त्यामुळे हे पुस्तक नजरेस पडताच संग्रही ठेवण्याचा निश्चय केला, आणि हा विश्वास लेखकाने सार्थ ठरवला.

पुस्तकात सुरवातीला चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण हे महाराष्ट्रात  बाहेरून आले का, आले असल्यास देशाच्या किंवा परदेशाच्या कुठल्या भागातून आले इत्यादी बाबींचा उहापोह करण्यात आलेला आहे. तो कंटाळवाणा वाटला तरी तो पेशव्यांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे, कारण चित्पावण ब्राह्मणांविषयी इतिहासात मुख्यतः पेशव्यांपासूनच वाचायला मिळते.

शाहू महाराजांच्या सुटकेपासून ते बाळाजीपंत यांचा पेशवेपदावर नेमणूक इथपर्यंतचा इतिहास फारच रोचक आहे आणि तो लेखकाने विस्तृतपणे दिलेला आहे. सर्वसामान्य माणूस स्वाभाविकपणे प्रत्येक बदलाचा स्वीकार करण्याआधी "What's in it for me?" अर्थात "यात माझा काय फायदा?" असा विचार करतो. मग या मनुष्यस्वभावात असलेल्या वैशिष्ठ्यापासून त्याकाळचे सरदार, इतर मानकरी, वगैरे कसे लांब असतील? त्या धामधुमीच्या काळात याची व्यवस्थित जाणीव असलेल्या बाळाजीपंतांनी त्यांच्याकडे असलेल्या शक्यतो लढाई टाळून सामोपचाराने समोरच्याला त्याचा फायदा दाखवून देणे व माणसे जोडणे या दोन अंगभूत गुणांनी कसा उपयोग करुन शाहू महाराजांची सत्ता मजबूत करण्यास महत्वाची भूमिका बजावली हे या पुस्तकात व्यवस्थितपणे येते.

पुस्तक बाळाजीपंतांच्या मृत्यूवर संपत नाही. शेवटच्या प्रकरणात  त्यांची पत्नी राधाबाई व इतर पेशवे परिवाराबाबत बरीच माहिती मिळते. एक उत्तम पुस्तक संग्रही पडले याचे समाधान लेखक श्री प्रमोद ओक यांनी दिले त्याबद्दल त्यांचे आभार.

आता पुस्तकातून मला जाणवलेल्या माझ्यासाठी रोचक असलेल्या तीन बाबी. त्यातली इतिहासप्रेमींच्या दृष्टीने असलेली बाब प्रथम सांगतो.

(१)


(२) आमचे गाव केळशी. त्या अनुषंगाने:



याबाबत कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.

(३) आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला आपल्या मुळांविषयी (roots) प्रचंड उत्सुकता असते, त्या संदर्भातली ही बाब. आमचे पूर्वज मूळचे कोकणातल्याच वरवडे गावचे शाण्डिल्य गोत्री जोशी. आता "जोशी उदंड जाहले" हे जरी खरे असले, तरी आम्ही पेशव्यांशी संबंधित जोशांच्या शाखा/उपशाखांपैकी असू शकतो ही शक्यताच गुदगुदल्या करुन गेली. या बाबतही कुणाला काही माहिती असल्यास कळवणे.



Wednesday, May 27, 2015

नावात काय आहे? सगळंच!

नावात काय आहे असं तुकाराम महाराज म्हणून गेलेच आहेत. काय म्हणता? शेक्स्पिअर म्हणाला असं? अहो शेक्स्पिअर काय तुकाराम काय शेवटी नावंच ना? तरी कोण म्हणालं ते महत्वाचं आहे म्हणता? तसं बरोबरच आहे तुमचं.

हे पाल्हाळ लावायचे कारण म्हणजे नुकतंच एका लग्नात एक नातेवाईक भेटले आणि कौतुकाने अरबस्थानातल्या इजिप्तमध्ये नोकरी निमित्त असलेल्या त्यांच्या मुलाने आपल्या दुसर्‍या मुलीचे नाव 'सायरा' असल्याचे सांगू लागले. मी मनात म्हटलं (आम्ही मनातच म्हणायचे) "सायरा? एका हिंदू कुटुंबातल्या मुलींच नाव सायरा? मोठी झाल्यावर काय म्हणायचं तिला? सायरा बानू? खिक्क्. अरबस्थानात असली मुसलमानी नावं ठेवायची सक्ती आहे का? की मुसलमानी नावं ठेवायचं कबूल कबूल कबूल केल्याशिवाय मुलं होऊ देत नाहीत तिथे? नशीब मुलगा नाही झाला नाहीतर त्याचं नाव महंमद ठेवलं असतं तुम्ही! नाहीतरी मागे एक नाटक येऊन गेलंच होतं बेगम बर्वे. म्हणजे आडनाव हिंदू आणि नाव किंवा संबोधनार्थी पदवी म्लेंच्छ. आनंद आहे."

हिंदू आई वडिलांना आपल्या मुलामुलींची नावं ठेवताना यवन किंवा म्लेंच्छ नावांना वाढत्या प्रमाणात शरण का जावं लागत आहे हे आकलनाच्या पलिकडचं आहे. एकीकडे वेगवेगळे सुंदर अर्थ असलेल्या संस्कृतप्रचूर नावांकडे अनेकांचा कल वाढत असल्याचे दिसत असताना आश्चर्यकारकरित्या बरेच आईवडील आपल्या मुलामुलींची नावे ख्रिस्चन आणि मुसलमान पद्धतीने ठेवत आहेत. हे अत्यंत क्लेषकारक आहे. आता हे मान्य आहे की आपल्या अपत्याची नाव काय ठेवावी हा ज्याचा त्याचा वैय्यक्तिक प्रश्न आहे, तरीही हिंदू म्हणून अशी नावे ठेवण्याकडे आज कमी प्रमाणात का होईना पण वाढता असलेला कल हे लक्षण आपला स्वाभिमान गुंडाळून ठेवल्याचे मानावे की अक्कल गहाण टाकून व्यक्तीस्वातंत्र्य या शब्दाचा भलताच अर्थ लावल्याचे?

एकदा एका कीर्तनकाराचे कीर्तन ऐकण्याचा योग आला असता त्याने हिंदूंबद्दल मांडलेली मते विचारप्रवृत्त करुन गेली.  एखाद्या हिंदूकडे बघितलं असता तो हिंदू आहे याचे कोणतेही लक्षण त्याच्या वेशभूषा किंवा दिसण्यावरुन जाणवत नाही. अर्थात इतर धर्मीयांकडे पाहून प्रत्येक बाबीचे तितकेच कट्टर अनुकरण आपल्याला शक्य आणि योग्य नसले, तरी प्रत्येक बाबीचं अंधानुकरण करणंही तितकंच धोकादायक आणि मूर्खपणाचे आहे.धर्मो रक्षति रक्षितः अशी एक म्हण आहे. अर्थ असा की जो धर्माचे रक्षण करतो त्याचं रक्षण धर्म करतो. तेव्हा आपण आपल्याच धर्माला, संस्कृतीला अशा प्रकारे हरताळ फासला, तर इतरांना आपला आदर करण्याची काहीच गरज भासणार नाही.

या संदर्भात एक बातमी आठवली. आयर्लंडनं समलिंगी जोडप्यांच्या लग्नांना परवानगी नुकतीच परवानगी दिल्याचे वाचनात आले. पाश्चात्य तसेच देशी वृत्तमाध्यमांनी याची तोंड फाटेस्तोवर स्तुती केली आणि जाता जाता भारतासारख्या धार्मिक बाबींत संकुचित दृष्टी बाळगणार्‍या देशाने यातून बोध घ्यावा, असा पांडित्यपूर्ण सल्लाही द्यायला ते विसरले नाहीत.

पण दोनेक वर्षांपूर्वी सविता हालाप्पनवार नावाची एक अडलेली गरोदर स्त्री याच कॅथलिक आयर्लंडमध्ये रुग्णालयात दाखल झाली होती. तिचं मूल गर्भातच गेलं होतं, आणि तिचा जीव वाचवण्यासाठी तिला मोकळी करणं आवश्यक होतं. पण गर्भपात करण्यास आमचा धर्म मान्यता देत नाही म्हणून ते डाॅक्टर्स नुसते तमाशा बघत बसले तीन चार दिवसांनी जंतुसंसर्ग होऊन तीळ तीळ झिजून ती मेली, पण या तथाकथित उदारमतवादी आयर्लंडच्या लोकांच्या दगडी मनांना पाझर फुटला नाही. बायबलमधे समलिंगी संबंधांच्या विरुद्ध स्पष्ट ताशेरे आणि खुद्द देवाने शिक्षा केल्याचे दाखले आहेत. अडलेल्या बाईची सुटका केल्याबद्दल देवानं रागावल्याचे वा त्यानं शिक्षा केल्याचे नाहीतच. पण लक्षात कोण घेतो? भारतात हे झालं असतं तर आधी नातेवाईकांनी, आणि तिथून वाचले तर वृत्तमाध्यमांनी या डाॅक्टर्सचा जीव घेतला असता. पण तसे होत नाही, भारतात अशा परिस्थितीत कोणताही डाॅक्टर धार्मिक तत्त्वांपायी अडलेल्या बाईचा जीव घेत नाही.

अधिक विषयांतर न करता या या मामल्याचे एक तात्पर्य लक्षात घेऊया ते असे की पाश्चात्य देशांत आणि एकंदरित फारिनमधे होणारी प्रत्येक गोष्ट चांगलीच असते, असे नाही. तेव्हा तिचा अंगीकार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. काही बाबतीत आपण त्यांच्यापेक्षा बरेच उजवे असू शकतो आणि आहोत. आज जगभरात भारतीयांना जो मान आहे तो बहुतांश प्रमाणात हिंदू आहोत म्हणूनच आहे. आपल्या अनेक पद्धतींना आणि प्रथांना आपणच जपायला हवे कारण ती आपली ओळख आहे, आणि आपली नावं हा आपल्या हिंदू असण्याच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा आईवडील आपल्या अपत्याचे नाव ठेवतात, तेव्हा त्या बाळाचे व्यक्तिमत्व घडायला सुरवात होण्याची आणि त्याची आपली अशी एक ओळख निर्माण होण्याची एक सूक्ष्मशी सुरवात असते. ती ओळख एक हिंदू म्हणून जपली जावी या करता आपण देशात असलो किंवा परदेशात असलो तरी नावं ठेवताना ती आपल्याच  संस्कृतीशी नातं सांगणारी असावीत याची काळजी घेणं आवश्यक आहे.

आपला बाह्यावतार आपल्याला बदलत्या काळानुसार आणि सोयीनुसार बदलावा लागला, तरी वर म्हटल्याप्रमाणे हिंदू असल्याच्या सगळ्याच चिन्हांना अशा प्रकारे तिलांजली देण्याची आवश्यकता नाही. "आमचं मूल आहे, आम्ही काहीही नाव ठेऊ" अशी स्वत्वहीन भूमिका घेणे हे हिंदूंसाठी अंतिमतः घातक ठरेल. व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क नाव निवडण्याच्या बाबतीत अवश्य गाजवावा, पण तो गाजवायला पर्याय म्हणून असंख्य हिंदू नावे उपलब्ध आहेत. तेव्हा हिंदू म्हणून आपला स्वाभिमान जपा.

हिंदू आईबाबांनो आपल्या मुलांची हिंदू पद्धतीने नावे ठेवा.

--------------------------------------------------------------------------------------------------
श्रेयनिर्देशनः या लेखनात उल्लेख केलेला आयर्लंडच्या सविता हालाप्पनवार या मृत्यू पावलेल्या महिलेचा किस्सा आमचे फेसबुकवरचे मित्रवर्य श्री कृष्णा धारासुरकर यांच्या एका टिप्पणीतून घेतला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------
जेष्ठ शुक्ल ९, शके १९३७
----------------------------------------------

Thursday, May 7, 2015

आता पुरे झाली एन्टरटेनमेन्ट

एन्टरटेनमेन्ट! एन्टरटेनमेन्ट!! एन्टरटेनमेन्ट!!!

आता पुरे झाली एन्टरटेनमेन्ट. आता तरी बाहेर पडा या मूर्खपणातून. दोन्ही हात चेहर्‍यावर ठेऊन "ऐयाआआआआआ आमीsssssर" किंवा "वॉऑऑऑऑऑव सलमान" किंवा अ ते ज्ञ यापैकी एकाही अक्षराने लिहून दाखवता न येणारे चित्कार काढून मोठ्या पडद्यावर अवतरलेल्या चिकन्या नटाकडे (किंवा नटवीकडे) पाहत जणू काही हाच आणि हाच आपला उद्धारकरता आहे असे भाव थोबाडावर लेवून असणार्‍या बावळटांनो, शुद्धीवर या. वय वर्ष पस्तीस असताना घरी "स्वसंरक्षणार्थ" मशीनगन आणि हातबॉम्ब ठेवणार्‍या आणि पकडलं गेल्यावर त्या मागचं गांभीर्य न समजण्याचं नाटक करणार्‍यांच्या पाठीशी उभं राहणं बंद करा. दारू पिऊन गाडी चालवणं हा गुन्हाच नव्हे तर प्रचंड धोकादायक आहे हे गावीच नसणार्‍या आणि असलं तरी पैशाच्या जोरावर आपण माणसं आणि न्याय दोन्ही विकत घेऊ शकतो असा माज बाळगणार्‍या या समाजकंटकांचं समर्थन करणं बंद करा. आपल्या दानधर्माचा डंका पिटणार्‍या आणि प्रत्यक्षात आपल्याच गाडीखाली आलेल्या लोकांना किरकोळ पैसे देऊन वाटेला लावणार्‍या कोत्या मनोवृत्तीच्या हलकटांविषयी कणव बाळगणं बंद करा. जंगल आणि पर्यावरण म्हणजे उघड्या जीपमधून प्राण्यांची हत्या करणं याचसाठी आहेत असं वाटणार्‍या माजोरड्यांना पाठिंबा देणं थांबवा. रस्त्यावर झोपावं लागणं या मागची अगतीकता आणि लाचारी समजून न घेता त्यांना कुत्र्याची उपमा देणार्‍या टोणग्यांना आणि गुन्हा केला असेल तरी शिक्षा झाल्यावर वाईट वाटतं असे तारे तोडणार्‍या या कचकड्याच्या बाहुल्यांचं कौतुक करणं आता बंद करा. दारूच्या नशेत गुन्हा करणारा माणूस वाईट नाही तर दारू पिणं आणि ती तयार करणारा वाईट याचा साक्षात्कार ऐन खटल्याच्या वेळी होणार्‍या येडपट चाहत्यांनो, तुमचा उथळपणा बंद करा.

लहानपणी कधी शेजारी राहणार्‍या तुमच्या सवंगड्याचं खेळणं त्याला न विचारता घरी आणलं म्हणून थोबडवून घेतलंय का कधी? तेच खेळणं उचलून तुमची आई तुम्हाला फरफटत घेऊन गेली असेल आणि ते खेळणं परत करायला लावलं असेल. आणि पुन्हा सगळ्यांसमोर बदडलं असेल आणि दोन दोन दिवस जीवघेणा अबोलाही धरला असेल. आज चाळीशीच्या घरात असलेले काही जण कदाचित हे वर्णन आठवून एव्हाना मनाने भूतकाळात पोचलेही असतील. त्यावेळची आई-वडिलांची प्रतिक्रिया आठवते? आपल्या मुलाने चोरी केली, तो वाया गेला, आता त्याचं कसं होणार आणि असे असंख्य भाव तुमच्या माऊलीच्या चेहर्‍यावर दिसले असतील तुम्हाला. हेच का आपण संस्कार केले असे हताश भाव तुमच्या वडिलांच्या चेहर्‍यावर दिसले असतील. आणि यामुळे तुम्हालाही तुम्ही केलेल्या गुन्ह्याची.....माफ करा....ते कायदेशीर झालं....तुम्ही केवढं मोठं पाप केलंय याची जाणीव होऊन तुमचं मन अपराधगंडाने ग्रस्त झालं असेल. यातूनच तुमच्या मनात पापभीरू वृत्तीही निर्माण झाली असेल. कायदा पाळणारे आणि त्याचा आदर करणारे नागरिक असेच तयार होतात.

पण बॉलिवुडमधले आईबाप तसे नसतात बरं का. चित्रपटात एका तरुणीला पळवून नेणार्‍या आपल्या मुलाला गोळी घालणारी आई दिसते तर प्रत्यक्षात आपल्या मुलाने घरात एके ५६ आणि हातबाँब ठेवले आणि बॉम्बस्फोट होणार आणि शेकडो लोक मारले जाणार ही माहिती पोलीसांना दिली नाही हे समजल्यावर मात्र जंगजंग पछाडून त्या देशद्रोही मुलाला उगवता सुर्य हे प्रमाणपत्र मिळवण्याची धडपड बाप करताना दिसतो. तो त्याला कायद्याने झालेली शिक्षा भोगावी आणि मग सुधारावे असा प्रयत्न काढताना मात्र दिसत नाही. अशा घटना घडल्या ही यांचा दांभिकपणा अधिकच ठळकपणे दिसतो.

चित्रपटातलं आदर्श वर्तन प्रत्यक्षात असावं अशी भाबडी आशा आज कुणालाही नाही आणि तशी अपेक्षा ठेवणं फार योग्य ठरणार नाही. चित्रपट आणि मालिकांतले प्रेमळ आणि वात्सल्यसिंधू बाबूजी पार्टीत झिंगलेले दिसतात आणि चित्रपटात कोट्यावर्धी कमावणारी नटी हॉटेलमधे उरलेलं अन्न पार्सल का नेऊ देत नाही म्हणून तिथल्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करताना दिसते. जोपर्यंत याचा समाजाला आणि देशाला अपाय होत नाही तो पर्यंत याकडे फारसं गांभीर्याने बघण्याची गरजही निर्माण होत नाही. मात्र चित्रपटातला प्रामाणिक, सालस, साधा, कायद्याचं पालनच नव्हे तर गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घेणारा/री ही प्रतिमा जेव्हा लोकं खरी मानून चालतात आणि त्याने केलेल्या कायदेभंगाकडे आणि देशद्रोहाकडे जेव्हा सहानुभूतीने पाहू लागतात, तेव्हा खरा धोका निर्माण होतो. अशा लोकांमुळे आपली मनं बोथट आणि रोगट करुन घेतलेल्या संपूर्ण समाजाला घाऊक  मानसोपचारांची गरज आहे असं वाटू लागतं.

माझ्याकडे पैसा आहे मला काहीही शक्य आहे असा माज करुन कुणी कायदा मोडून माणसं मारू लागत असेल आणि त्याला शिक्षाच होऊ नये म्हणून त्याच्या फक्त कुटुंबियांपैकीच नव्हे आपल्याहीपैकी कुणी त्याचं लंगडं समर्थन करत असेल तर आपल्या संस्कारातच काहीतरी गडबड आहे का हे तपासण्याची गरज निर्माण झालेली आहे. कायद्यापुढे कुणी मोठं नाही, देशापेक्षा काही महत्त्वाचं नाही हे संस्कार लहानपणापासून देणं ही आजची प्राथमिकता आहे. लहानपणी क्षुल्लक गोष्टींवरुन थोबडवून घेतलेल्या आजच्या चाळीशीत पोचलेला आजचा बाप जेव्हा स्वतःच्या मुलाला मात्र "जाऊ दे, लहान आहे मुलगा" या मानसिकतेतून शिक्षा करत नाही, तेव्हा त्याला त्या मानसिकतेतून बाहेर काढायलाच हवं आहे. आजच्या आई-वडीलांनी आपल्या मुलांना हे सांगायला हवं की दबंग हीरो हे आजचे खरे हीरो नव्हेत. त्यांचे अनुकरण करायची काहीही गरज नाही. अगदी खेळतानाही नाही. ते समाजाला आणि देशालाही धोकादायक आहे. आज संपूर्ण देशाला आदर्शवत वाटावेत असे लालबहादूर शास्त्रींसारखे नेते अस्तित्वात नाहीत. त्यांच्या एका शब्दाखातर दुष्काळात अनेकांनी स्वतः सुखवस्तू असतानाही एक वेळचे जेवण सोडलं होतं. मात्र ज्यांचा आदर्श ठेवावा असे अनेक जण आपल्या देशात आजही आहेत. आजचे खरे नायक हे हातात काठी वगळता काहीही शस्त्र नसताना आपल्यावर धडाधड मशीनगनमधून गोळ्या चालवणार्‍या कसाबवर झेप घेऊन त्याला पकडून देणारे निधड्या छातीचे हवालदार तुकाराम ओंबळे आहेत. कमांडो संदिप उन्निकृष्णन सारखे शूर तरूण आहेत. प्रचंड दबावाखाली असतानाही सलमान खान विरुद्ध पोलीसात स्टेटमेंट देऊन खटला उभा करायला लावणारे आणि त्यापायी हाल हाल होऊन स्वतःचा जीव गमवायला लागणारे रवींद्र पाटील यांच्यासारखे दृढनिश्चयी पोलीस आहेत. काहीही वैय्यक्तिक फायदा नसताना जगभर नैसर्गिक संकटात आणि युद्धजन्य परिस्थितीत मदतकार्य करणारे आपले असंख्य सैनिक आहेत. देशात कुठेही कुठलाही अपघात किंवा नैसर्गिक आपत्ती आली की सर्वप्रथम तिथे मदतकार्याला पोहोचणार्‍या नि:स्वार्थी संघ कार्यकते आहेत. स्टॉकहोम जल पुरस्कार ज्यांना मिळाला ते राजेंद्र सिंह आहेत. कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे आहेत. कायद्यापेक्षा मोठं आणि देशहितापेक्षा महत्वाचं कुणीही आणि काहीही नाही असे संस्कार मुलांवर करण्याची गरज आज कधी नव्हे ती निर्माण झालेली आहे. ही वेळ पुनश्च हरिॐ करण्याची आहे. बघू नका यांचे सिनेमे. गाणी ऐकू नका. बहिष्कार घाला. न्यायव्यवस्था जिथे न्याय द्यायला एका तपाहून अधिक लावते तिथे तुमचे हे प्रयत्न चोख काम करतील. ओस पडेलेली चित्रपटगृहच यांना धडा शिकवतील. तुम्हाला अदाचित संजय दत्तच्या वेळी हे करणं जमलं नसेल तर तुमची तेव्हाची पापं धुण्याची ही संधी आहे. कुटुंब घडवा, समाज आपोआप घडेल.

तेव्हा आता बास्स झाली एन्टरटेनमेन्ट.

---------------------------------------------------
संकष्ट चतुर्थी, वैशाख शु. ४, शके १९३७
अर्थात इसवीसन ७ मे २०१५
---------------------------------------------------

Saturday, March 21, 2015

पुतळ्यांचे 'पुतळे' होऊ नयेत म्हणून




स्थळः पुण्यातील कोथरुड येथील कर्वे पुतळ्याशेजारचा पेट्रोल पंप.

बहुधा पुण्यात नवीन असलेला एक माणूस त्याच्या नातेवाईकाशी फोनवर बोलत होता. तो नक्की कुठे उभा आहे हे सांगताना त्याचं लक्ष पुतळ्याकडे गेलं. तो पुतळा कुणाचा आहे हे त्याला माहित नव्हतं हे स्पष्ट होतं. तो जिथे उभा होता तिथून त्याला पुतळ्याखाली लिहीलेली अक्षरं अर्धवट दिसत होती. ती पाहून तो फोनवरच्या नातेवाईकाला म्हणाला, "मी भारतरत्न पुतळ्याशेजारी उभा आहे".

माझा मुद्दा थोडा वेगळा आहे, पण वरच्या घटनेने माझ्या मनात पुतळे आणि ते ज्यांचे आहेत त्यांच्याविषयी सर्वसामान्य लोकांना असणारी माहिती याविषयी मनात विचारचक्र सुरु झालं. आपल्या राज्यात आणि देशात अक्षरशः लाखोंच्या संख्येने पुतळे असतील. सर्वाधिक पुतळे बहुतेक गांधीजींचे असावेत. आता गाधीजींविषयी कुणाला माहिती नाही असा प्रश्न आपल्याला पडेल. पण आर.के.लक्ष्मण यांचे एक सुप्रसिद्ध व्यंग्यचित्र आहे. एक नेता गांधीजींच्या तसबीरीखालचे नाव वाचायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याचा खाजगी सचीव मागून त्याला, "It's Gandhiji sir", असं सांगतो आहे. यथा प्रजा तथा राजाच्या या काळात नेत्यांची ही स्थिती असेल तर सरवसामानय जणतेची काय असेल याची सहज कल्पना येऊ शकते.

यावर मला सुचलेले उपाय करता येऊ शकतो. जिथे असे पुतळे असतील तिथे पुतळ्याच्याच खाली एखाद्या छोट्या स्टॅन्डवर माहितीपत्रकांचा (फ्लायर्स) गठ्ठा ठेवता येईल. अशा माहिती पत्रकांच्या एका बाजूला त्या व्यक्तीची अगदी थोडक्यात माहिती आणि दुसर्‍या बाजूला त्या व्यक्तीवर असलेल्या पुस्तकांची शक्य तितकी समग्र यादी असावी. तसेच, अशीच माहिती पत्रके वरील ठिकाणाप्रमाणेच शेजारील पेट्रोल पंप वर इतर दुकाने यांमध्ये ठेवण्याची सक्ती करावी व ग्राहकांना दुकानातून बाहेर पडताना ती माहितीपत्रके देण्याची सक्ती करावी. ही माहितीपत्रके दुकानांना अर्थातच सरकारतर्फे विनामूल्य पुरवायची असल्याने ती ग्राहकांना देण्यात अशा दुकानदारांना कष्ट पडू नयेत. तसेच अशा पुतळ्यांशेजारी असलेली दुकाने पुरेशी मोठी असल्यास गल्ल्याशेजारी एखाद्या स्टॅन्डवर त्या व्यक्तींविषयी असलेली पुस्तके विक्रीस ठेवता येतील. मोठ्या दुकानांतून व मॉलधून असे करणे सोपे जावे. सर्वासामान्यपणे असे बघण्यात येते की एखाद्या मोठ्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या विचारसरणीबद्दल एखाद्या व्यवसायिकाला किंवा स्थानिक नेत्याला अंमळ अधिक ममत्व असते. अशा व्यक्तींच्या भावनांना आवाहन करुन अशी पुस्तके सवलतीच्या दरात किंवा मोफत देण्याची व्यवस्था करता येऊ शकते. अर्थात अशी पुस्तके ही सर्वप्रकारची असावीत. म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्य व चरित्राबरोबरच त्याच्या विचारांची समीक्षा असलेली पुस्तकेही असावीत जेणेकरुन वाचनेच्छुक लोकांना सर्वसमावेशक माहिती मिळवता येऊ शकेल.

कर्वे पुतळा ही खूण आणि बसस्टॉप म्हणून सांगताना किती जणांना पुतळा असल्यामुळे कुणीतरी मोठा माणूस असणार या पलिकडे त्यांच्या कार्याविषयी किती माहिती असेल? निदान त्या ठिकाणी तरी महर्षी कर्वे केवळ एक पुतळा म्हणूनच उभे आहेत. पण वर म्हटल्याप्रमाणे व्यवस्था केल्यास दोन फायदे होऊ शकतील. एक म्हणजे लोकांना अशा व्यक्तींविषयी पुरेशी माहिती होऊ शकेल, आणि दुसरा म्हणजे आपल्या देशाला मिळालेली आझादी ही फक्त बिना खडग बिना ढाल मिळालेली नसून हजारोंच्या संख्येने असलेल्या समाजसुधारक आणि क्रांतीकारकांचा देश घडवण्यात आणि स्वतंत्र करण्यात महत्त्वाचा सहभाग होता हे समजण्यात मोलाची मदत होईल.

जाता जाता एक प्रश्नः हा उपाय सरकारला कसा कळवता येईल?