Thursday, September 18, 2014

टाटा लोकसत्ता

आदरणीय(!) संपादक साहेब गिरीश कुबेर साहेबांस,

[लोकसत्तात मराठीची काय वाट लागलेली आहे याचा मी उल्लेखही करत नाही याची कृपया नोंद घ्या (किंवा घेऊ नका....आम्हाला काय त्याचे?)[]

मी मूळचा इंग्रजी माध्यमाचा विद्यार्थी. इयत्ता दुसरीत मराठी वाचायला शिकलो तेव्हापासून लोकसत्ता वाचतो आहे. माझ्या सुरवातीच्या मराठी वाचनात लोकसत्ताचा मोठा वाटा आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सातेक वर्षांपूर्वी पुण्यात स्थलांतरित झालो तेव्हा सुरवातीला पेपरच घेत नव्हतो. आम्ही उभयतां नोकरी करत असल्याने छापील अंक वाचायला दोघांनाही वेळ नव्हता. आता मुलं शाळेत जाऊ लागली म्हणून त्यांना चांगलं मराठी वाचायला मिळेल या आशेने पावरफुल आणि पवारफुल सकाळ न घेता लोकसत्ता घेणे पसंत केले कारण लोकसत्तावरचे प्रेम आणि श्रद्धा.....हो श्रद्धा. 

माधव गडकरी लोकसत्ताच्या संपादकपदावर होते तो पर्यंत लोकसत्ता हा वाचनीय होता. नंतर उतरती कळा लागली. अरुण टीकेकर, कुमार केतकर यांनी यथास्थित गरळ ओकून झाल्यावर आता तुम्ही लोकसत्ताला ढगात पाठवण्याच्या कामी कुठलीही कसर सोडलेली दिसत नाही. लोकसत्ताचे हल्लीचे लिखाण प्रचंड एकांगी होत चालले आहे. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍या त्यांचे प्रश्न मांडणार्‍या कुणीही काहीही बोलले, किंवा एखादा विषय मांडला, किंवा काही घटना घडली की लगेच त्यावर इयत्ता तिसरी ड च्या उत्साहात बातमी छापलीच पाहीजे असा पायंडा अलिकडे लोकसत्तात पडला होता. आता तर या गरळओकीत मोदी सरकार आल्याने नवा जोम आला आहे. एखाद्या घटनेशी, गोष्टीशी, किंवा केलेल्या विधानाशी संबंधित असलेल्या आणि असू शकणार्‍या असंख्य गोष्टींचा एकत्रितपणे विचार आणि अभ्यास करुन अन्वयार्थ काढायचा व मगच अग्रलेख लिहायचा असतो किंवा बातमी द्यायची असते हे लोकसत्ताच्या गावीही उरलेले नाही.

थोडासा ट्रॅक बदलतो. अनिसच्या भूमिकेनुसार "समाजामध्ये काम करताना थेट देवावर विश्वास/श्रद्धा ठेवू नका असे सांगत काम करता येत नाही, त्यामुळे बहुसंख्य समाज दूर जातो. त्यापेक्षा थेट अंधश्रद्धांवर (बुवाबाजी, ज्योतिष इत्यादी) हल्ला चढवत, त्यांचे दुष्परिणाम सांगत लोकांपर्यंत अधिक चांगले पोचता येते, प्रबोधन करता येते." याचाच अर्थ असा की आधी उघड दिसणार्‍या अंधश्रद्धांवर हल्ला चढवायचा. मग हळू हळू एक एक श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे हे पटवत पटवत लोकांना देव आणी श्रद्धा वगैर सब झूठ या पातळीवर यायला प्रवृत्त करायचं. उदाहरणतः नारळ फोडणे ही अंधश्रद्धा आहे, कोंबडी कापू नका, इत्यादी. मग हे भंपक आणि भेकड लोक बकरे कापणार्‍यांना जाऊन सांगणार नाहीत. कारण ते सेक्युलर आहेत. हा हलकटपणा लोक खपवून घेत नाहीत हे चांगलंच आहे. इथे कोणीही 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी'  हे पाळत नाही आणि स्वतः कष्ट करतोच. ते करत असताना आम्ही काही सण साजरे करत असलो आणि काही प्रथा पाळत असलो तर त्या आम्ही पाळणारच.

दाभोलकर हत्येनंतर ज्याप्रमाणे हिंदू संघटनांना लक्ष्य करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न झाला त्यामुळे तर आधीच हास्यास्पद असलेली अनिसची विश्वासार्हता खड्ड्यात जात चाललेलीच आहे. त्यांच्याबरोबर लोकसत्तानेही बहुतेक आपली निष्ठा विकून स्वतःच्या अब्रूला चितेवर चढवून अनिसबरोबर सती जायची तयारी केलेली दिसते.

तेव्हा हिरवी हवा डोक्यात गेलेले संपादक महाशय गिरीश कुबेर, पेपर चालवताय तर बातम्या देण्याचे काम करा. उगाच समाजाला मार्ग दाखवण्याच्या नावाखाली ऊठसूठ हिंदूना(च) अक्कल शिकवण्याचा आगाऊपणा करत जाऊ नका. वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजप्रबोधन करायला तुम्ही "लोकमान्य" नाही आणि या उचापत्यांनी हेही स्पष्ट आहे की तुमची नियतही साफ नाही. 

कुठलेही वर्तमानपत्र किंवा अंक हा एकांगी असेल आणि त्याचा गाभा हा द्वेषमूलक असेल तर तो फार काळ दर्जा आणि लोकप्रियता टिकवून ठेवू शकत नाही. माझ्यासारखे अनेक जण केवळ इतक्या वर्षांची सवय मोडता येत नाही म्हणून लोकसत्ता घेत होते. त्यातल्या मी फक्त माझ्यापुरता एक निर्णय घेतला आहे. तुमचा पेपर मी माझ्यापुरता या महिन्यापासून बंद करतो आहे. सकाळी सकाळी डोक्याला शॉट लाऊन घेण्याची माझी इच्छा नाही. आत्तापर्यंत चालू होता कारण काही लेख वाचायला आवडत असे. आता आवडणारे लेख ऑनलाईन वाचत जाईन आणि वाटलंच तर आवडणार्‍या लेखांचे प्रिन्टाआउट काढत जाईन.

आपला,
लोकसत्तावरची श्रद्धा उडालेला,

मंदार दि. जोशी




Saturday, August 23, 2014

पोच

माझ्या आजोबांचा लोकसंग्रह बर्‍यापैकी होता. ते गेले तेव्हा अनेक जण आजीला भेटायला येऊन गेले. काहींनी आजोबांच्या चांगल्या आठवणी सांगितल्या, काहींनी त्यांचे गुणवर्णन केले, तर काहींनी नुसत्या मौनानेच आम्ही तुमच्या दु:खात सामील आहोत हे सांगितले. जे प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत त्यांनी पत्र पाठवून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. आजोबा गेल्याचे दु:ख काही प्रमाणात का होईना अशा लोकांमुळे कमी व्हायला मदत झाली.
हे आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच आलेला एक अनुभव. नुकतेच माझे एक जवळचे नातेवाईक गेले. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजताच आई-बाबा गावी रवाना झाले. दुसर्‍या दिवशी मी निघणार होतो. ऑफिसला रजा टाकली. तिकडे त्या अत्यवस्थ माणसाच्या सख्ख्या साडूचा वेगळाच चॅनल लागलेला. त्याचा मुलगा आणि सून पुण्याला रहायला होते आणि त्यांच्या राहत्या जागेचा भाडेकरार संपत आलेला होता. आमची एक जागा भाड्याने देणे असल्याने त्यांना ती जागा हवी होती. त्याने बाबांकडे गळ घातली आणि प्रचंड घाई करत बाबांना मला सकाळीच फोन करायला लावला. माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. या माणसाला आपली जागा द्यायची नाही असं निक्षून बजावलं आणि तिरमिरीतच फोन कट केला. अरे एक माणूस आता जाईल की नंतर अशा परिस्थितीत मृत्यूशय्येवर पडलेलं आहे, आणि या माणसाला जागेची पडलेली आहे? जरा कळ काढता येत नाही? इतकी खाज की सगळे भयानक ताणाखाली असताना स्वतःचा स्वार्थ साधावासा वाटतो? लोकांना प्रसंगाचं गांभीर्य आणि पोच नामक गोष्ट का नसते? हा प्रसंग काही मित्रांना सांगितल्यावर आणखी भयानक किस्से ऐकायला मिळाले. घरोघरी मातीच्याच चुली असणार म्हणा. हे किस्से संबंधित मित्रांच्या नावाचा उल्लेख न करता पुढे देतोय.
आमच्याच इमारतीतील एका कुटुंबासंबंधित किस्सा:
आमच्या इमारतीतील एक आजी कर्करोगाने आजारी आहेत. घरात त्यांचे पती, मुलगा, सून आणि दीड वर्षाची नात आहे. त्या आजींना भेटायला म्हणून काही लोक बाहेरगावाहून आले आणि मुक्कामाला चक्क त्यांच्याच घरी राहिले. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा, आंघोळीला पाणी काढून द्या, वर त्यांना मधुमेह असल्याने त्याची पथ्य सांभाळा हे त्या कुटुंबाने करत बसायचं का? लोकांना इतकी साधी अक्कल नसते?
सौ. "अ" यांनी सांगितलेला किस्सा:
आमच्या घरी माझ्या सासर्‍यांच्या आजोळकडुन त्यांना मिळालेल्या श्री स्वामी समर्थांच्या खडावा आहेत. सासरे गेल्यावर एक बाई आम्हाला भेटायला आल्या आणि म्हणू लागल्या "काका जाताना पादुकांविषयी काही बोलले का?" त्यांनी असं विचारलं आणि त्याक्षणी त्या बाईबद्दलचा मनातला सगळा आदर नष्ट झाला.
श्री. "ब" यांचे एका व्यक्तीबद्दलचे दोन किस्से:
वडील गेल्यावर शेजारची एक गुजराथी शेजारीण आईला म्हणाली. "तुमाला आता नौ सबसिडाईझ्ड सिलेंडर लागणार नाहीत. त्यातले तुमाला न लागणारे सिलेंडर आम्हाला कमी किंमतीत द्याल का?" समोर आई होती म्हणून ती वाचली. माझा चेहरा आणि हावभाव पाहून ती जी सटकली ती पुन्हा मी भारतात तिथे घरी असेपर्यंत फिरकली नाही.
वडील गेल्यावर चार महिन्यातच आई गेली. त्यावेळी तीच गुजराथीण दुसर्‍याच दिवशी, "तुम्हाला फ्लॅट विकायचा आहे का? माझ्या ओळखीचे एक गुजराथी आहेत. त्यांना हवा आहे. मी तुम्हाला चांगलं डिल मिळवून देईन!" तिच्या सुदैवाने त्या दिवशी माझी बायको आणि मावशी समोर होत्या. मावशीने तिला अक्षरशः हात धरुन घराबाहेर काढायचं फक्तं बाकी ठेवलं होतं.
माझा आणखी एक किस्सा:
आमच्या नात्यातल्या एक आज्जी गेल्या. त्यांच्या बाराव्याला जेवणाची एक पंगत उठून दुसरी बसताना त्या आज्जींची सून बडबडली, "चला आता खर्‍या खवैय्यांची पंगत बसली." बसलेल्यांपैकी एक नातलग ताडकन् म्हणाला "आम्ही दिवसांचं जेवतोय, बारशाचं नाही."
"क" अणि "ड" या दोन बहिणींनी सांगितलेली हकिकतः
आम्ही आजोबा गेल्यावर त्यांना घेऊन सातारला निघालो होतो अंत्यसंस्कारांसाठी तेंव्हा एकाने फोन करुन सांगितलेलं "सांभाळून जा - अशा गाड्यांचे अपघात होऊन सगळेच्या सगळे मेल्याच्या अनेक घटना ऐकल्यात आपण". त्यानंतर बाबांचं आणि आईचं चित्त सातार्‍याला पोहोचेपर्यंत थार्‍यावर नाही. भयानक ताणाखाली काढलेले ते काही तास आजही आठवतात.
लोकहो पोच नसलेले काही महाभाग आपल्याही परिचयाचे असले तर असल्या नगांचे किस्से इथे सांगा.

Monday, August 18, 2014

दहीहंडीचा सण अशा प्रकारे साजरा करता येईल का?

दहीहंडीचा सण अशा प्रकारे साजरा करता येईल का?

मित्रहो, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मला हे देखील मान्य आहे की अक्कल शिकवण्याची वेळ येते तेव्हा पहिल्यांदा काही घटिंगणांना हिंदूंचेच सण सुचतात. पण मी या बाबतीत भाष्य करण्याचे कारण म्हणजे दहीहंडीचा सण ज्या प्रकारे साजरा केला जातो त्याला प्राप्त झालेले विकृत रूप. आपण आपल्याच बांधवांना मृत्यूच्या दाढेत आणखी किती काळ लोटत राहणार आहोत? पडल्यावर ब्रह्मांड कशा प्रकारे आठवतं हे जाणून घ्यायचे असेल तर घरातल्या घरात पार्श्वभागावर पडून पहावे. म्हणूनच मेले ते सुटले असं म्हणावं अशी अवस्था अपंगत्व आलेल्यांची होते हे वेगळं सांगायला नकोच.  तेव्हा अशा प्रकारे वर्षानुवर्ष आपण मानवी नुकसान सोसून आपल्याच धर्माची हानी करुन घेण्यापेक्षा निदान या सणाच्या विकृतीकरणाकडे तरी गंभीर लक्ष देण्याची वेळ आलेली आहे. यावरुन मला हा उत्सव साजरा करण्याची जी कल्पना सुचली आहे ती तुमच्या समोर मांडत आहे. तुम्हाला आवडली तर ती जरूर तुमच्या लाडक्या राजकीय नेत्यांपर्यंत किंवा पक्षापर्यंत पोहोचवा. एकाने जरी ही कल्पना उचलून धरली तरी मला भरून पावल्यासारखे होईल.

सद्ध्या दहीहंडी आणि त्यात लागणार्‍या मानवी थरांबद्दल बरंच काही वाचायला मिळत आहे. हंडी फोडत असताना झालेले अपघात हे अशा प्रत्येक चर्चेच्या आणि वादविवादाच्या केंद्रस्थानी दिसतात. यावर एक कल्पना सुचली आहे जेणेकरुन उत्सव उत्साहात साजराही करता येईल आणि होणारे मानवी नुकसान टाळताही येईल.

श्रीकृष्णाच्या काळात गृहिणी काही दह्याच्या हंड्या मोठमोठ्या इमारतींमधे बांधून ठेवत नसत. त्या घरातच छताला टांगून ठेवत होत्या. त्यामुळे हा उत्सव साजरा केला जाण्याची आताची पद्धत ही चर्चांमध्ये म्हटले जात असल्याप्रमाणे धोकादायकच नव्हे तर धार्मिकदृष्ट्या आणि तार्किकदृष्ट्याही चुकीची वाटते.

तेव्हा हा उत्सव साजरा करताना शाळांमधल्या वर्गात किंवा सभागृहात किंवा मग चक्क मंगल कार्यालय भाड्याने घ्यावा व तिथे हंडी बांधावी. जिथे हंडी बांधली जाईल तिथे हंडीची उंची साधारणपणे गावाकडच्या घरांच्या छताएवढीच असेल असे पहावे. गोविंदा म्हणून लहान मुलांना घ्यावे व जास्तीत जास्त तीन थर होतील अशा प्रकारे त्यांना हंडी फोडायला लावावी

हे करण्यासाठी जी जागा निश्चित केली जाईल तिथे गणपतीत जसे देखावे केले जातात तशा प्रकारे देखावा उभा करावा. म्हणजे जुन्याकाळचे वाटेल असे सामान, दह्याच्या हंड्या इकडेतिकडे ठेवलेल्या, एखादी जुनाट खाट, वगैरे. या देखाव्यांमुळे जास्त लोकांना काम मिळेल. अधिकाधिक सुंदर देखावा तयार करणार्‍या कलाकारांना किंवा असणार्‍या दहीहंडी मंडळांना रोख पुरस्कार द्यावेत. त्या देखाव्यात दहीहंडी फोडणार्‍या गोविंदांची त्या वर्षीची शाळेची फी परस्पर भरली जावी. आणखी अनेक गोष्टी राबवल्या जाऊ शकतात.

तर मित्रहो, कशी वाटली कल्पना. ही कल्पना आवडल्यास इथे सांगायला विसरू नका. तसेच वर आवाहन केल्याप्रमाणे तुमच्या आवडत्या राजकीय नेत्यापर्यंत आणि पक्षापर्यंत पोहोचवायला विसरू नका.



|| धर्मो रक्षति रक्षित: ||

Thursday, April 24, 2014

टग्यामहाराज बारामतीकर

धरणात पाण्याचे
अंमळ दुर्भिक्ष्य
अंत करु पाही
मुतोनिया ||

भगिनीस याच्या
मतदान करा
अन्यथा पाण्याला
बूच मारी ||

विरोध करती
नतद्रष्ट काही
टग्या महाराजां
दृष्ट लागे ||

पिऊन 'सोडला'
अवघा समुद्र
ठेविली का नावे
अगस्त्याला? ||

अगस्त्य अवतार
बारामतीचा टग्या
वंदावेच त्याला
पुन्हा पुन्हा ||

टग्यामागे उभा
तो जाणता राजा
आणि त्याची प्रजा
"शुभेच्छुक" ||

शाई पुसोनिया
मतदान करा
द्विगुणित करा
आनंदही ||

रामराया पुढे
हनुमान उभा
तैसेच ठाकले
हे ते दोघे ||

बोले तैसा चाले
जयांची ही कीर्ती
तयांना वंदावे
पुन्हा पुन्हा ||

Friday, January 24, 2014

मौत का सौदागर कुणाला म्हणावे मग?


गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदींना काही वर्षांपूर्वी मौत का सौदागर म्हटल्याने सोनिया गांधींवर चौफेर टीका झाली. मग रीतसर सारवासारव करण्यात आली. नुकतेच एका काँग्रेसी मंत्र्याने पंतप्रधान नरभक्षक नको असे खळबळजनक विधान केले.

तर गुजरातच्या दंगलींच्या वेळेला नरेन्द्र मोदी मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्यावर मौत का सौदागर असल्याचा आरोप केला जातो. पण जेव्हा ३०००+ शी़खांची हत्या झाली तेव्हा सरदहु दंगलींना प्रोत्साहन दिल्याचा आरोप हरकिशनलाल भगत, ललित माकन, जगदीश टायटलर व सज्जनकुमार यांच्यावर होता. यांच्याव्यतिरिक्त धरमदास शास्त्री (काँग्रेस), अर्जुनदास (काँग्रेस) व कमलनाथ (काँग्रेस) यांच्यावरही आरोप होते. १९९९ च्या निवडणुकीत वाचाळ मनमोहन सिंगांनी, 'या दंगलीत रा.स्व.संघाचा हात होता' असा धडधडीत खोटा आरोप केला होता. दंगलींनंतर पंतप्रधान राजीव गांधींनी "एक मोठे झाड पडते तेव्हा जमीन हादरतेच" असे बेजबाबदार विधान करुन शी़खांच्या जखमेवर मीठ चोळले होते. मग त्यांना हे मौ.का.सौ. हे विशेषण लावायला काँग्रेसवाले का विसरले?

आत्तापर्यंत झालेल्या सगळ्या दंगलींत बहुसंख्य वेळेला भाजपेतर सरकारे......आणि बहुतेक ठिकाणी काँग्रेसचीच सरकारे व मुख्यमंत्री होते हे या यादीवरुन स्पष्ट आहे. अशांना का नाही मौ.का.सौ. असे विशेषण लागले? की देशपातळीवरच्या राजकारणात नरेन्द्र मोदी आपल्याला भविष्यात भारी पडू शकतात हे आधीच ओळखल्याने काँग्रेसची तंतरली? आता या सगळ्या दंगलींच्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सगळ्यांना मौत का सौदागर म्हणायला काँग्रेस तयार आहे का?