Thursday, November 14, 2013

स्मायली

चेहर्‍यावरचं सहज निर्व्याज हसू
कृत्रिम होऊन स्मायली झालं
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही

संभाषणात अट्टाहासाने पेरलेले स्मायली 
स्वल्पविरामांची जागा घेतल्यासारखे पसरले
तेव्हाच मी ओळखलं
आता काही खरं नाही

मग वास्तवातल्या मुखवट्यांवरही मात करण्यापर्यंत
याच स्मायलींची मजल गेली
तेव्हाच मी ओळखलं
आता खरंच काही खरं नाही


- मंदार
१४.११.२०१३
कार्तिक शु. १२, चातुर्मास समाप्ती, शके १९३५

Thursday, September 19, 2013

हे आणि ते - २: सुशिक्षित आणि सुसंस्कृत


 लहानपणी कधी एखाद्या खूप हुशार आणि उच्चशिक्षित माणसाने बेशिस्त व्यवहार केला की मी "इतका शिकलेला माणूस असे करुच कसे शकतो?!!" असे आश्चर्य व्यक्त करत असे. माझे ते आश्चर्य पाहून आमचे तीर्थरूप म्हणत, "सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं". हे नक्की काय असतं हे तेव्हा ठळकपणे दिसलं नव्हतं, पण अनुभव येत गेले आणि चित्र अधिकाधिक सुस्पष्ट होत गेलं.

पुस्तकं म्हणजे माझा जीव की प्राण. आपल्याला जसं पुस्तकांचं वेड आहे तसं इतरांनाही असावं असं मनापासून वाटणारा आणि आपली पुस्तकं एकेकाळी उत्साहाने इतरांना वाचायला देणारा असा मी. मात्र अनेक वर्षांपूर्वी आलेल्या एका अनुभवाने मला माझं हे धोरण बदलायला लावलं. एकदा एका अत्यंत हुशार नातेवाईक मुलाने एका महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान आलेला ताण घालवायला वाचनासाठी माझ्याकडे काही पुस्तकांची मागणी केली. त्यात शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह असलेलं एक पुस्तक होतं. मी ती पुस्तके आनंदाने दिली. त्याने ती पुस्तके वाचून झाल्यावर परतही केली. बर्‍याच दिवसांनी शेरेलॉक होम्सच्या लघुकथासंग्रह दिसल्याने मला त्यातल्या आवडत्या गोष्टी वाचण्याची इच्छा झाली आणि इच्छित पान उघडल्या उघडल्या कपाळावर आठ्या पसरल्या. पुस्तक जवळ जवळ शंभर वर्षाहून जास्त काळापूर्वी लिहीले गेल्याने त्यातले अनेक शब्द व्हिक्टोरियन काळातले आणि त्यामुळेच जरा अनोळखी आणि समजायला कठीण आहेत. म्हणूनच त्या मुलाला शब्दार्थांसाठी शब्दकोशात बघायला लागले असावे. कारण कठीण शब्दांचे अर्थ पानांच्या बाजूच्या मोकळ्या जागेत चक्क पेन्सिलीने लिहीलेले होते! अतिशय उच्चशिक्षित असलेल्या म्हणजे ग्राम्य भाषेत 'चार बुकं शिकलेल्या' त्या मुलाला पुस्तकं कशी हाताळावीत, त्त्यांची काळजी कशी घ्यावी हे कळत नसावं का? कळत असलं तरी वळत नसावं का? बरं ते काही अडाण्याचं पोर नव्हतं. वडील इंजिनियर आणि आई सुद्धा नोकरी करणारी. काहीही असो. तेव्हापासून मी कानाला खडा लावला आणि सरसकट सगळ्यांना पुस्तक वाचायला देण्याचं बंद करुन टाकलं.



त्यानंतर गेल्या आठवड्यातलीच गोष्ट. मी हल्ली पुस्तक प्रदर्शन व विक्री अशा गोष्टींपासून लांबच असतो. कारण एकदा आत गेलं की किती वेळ मोडेल आणि खिशाला नक्की किती मोठं भोक पडेल याची शाश्वती नसते. म्हणून मी आता बुकगंगा आणि फ्लिपकार्ट वरुन प्रामुख्याने पुस्तकं मागवतो. अशीच एकदा बुकगंगा वरुन ऑफिसच्या पत्त्यावर पुस्तकं मागवली. ती नेमकी शनिवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी आली. बुकगंगावर पैसे आधीच ऑनलाईन ट्रान्स्फरद्वारे भरून झालेले असल्याने पुस्तके कुरिअरवाल्याने कंपनीच्या सुरक्षारक्षकाजवळ ठेवली. मला सुरक्षारक्षकाचा फोन आला "साहेब, मी शिंदे** बोलतोय. तुमची पुस्तकं आली आहेत. मी ते पॅकेट फोडून त्यातलं सावरकरांचं 'माझी जन्मठेप' हे पुस्तक वाचू का? माझी रात्रपाळी असते. तेव्हढाच माझा टाईमपास होईल. तुम्ही ऑफिसला आलात की तुम्हाला परत देतो". आधी त्यांनी माझ्याकडून एक ऐतिहासिक कादंबरी वाचायला घेतल्याचा अनुभव असल्यानं ते निदान माझी निराशा करणार नाहीत याची खात्री होती, त्यात त्यांनी ही विनंती फारच अजीजीनं केल्यानं मी त्यांना तसं करायला परवानगी दिली. मी सोमवार-मंगळवार गणपतीसाठी सुट्टीवर असल्याने त्यांना पुस्तक वाचायला दोन रात्री आणखी मिळाल्या. तेवढ्या कालावधीत त्यांनी ते वाचून संपवलं आणि मला बुधवारी दिवसपाळीच्या सुरक्षारक्षकाद्वारे ते आणि बाकीची पुस्तकं एका प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून परत केली. पिशवीतून पुस्तकं काढल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. 'माझी जन्मठेप' आणि त्याबरोबर आलेल्या दोन अन्य पुस्तकांना वर्तमानपत्राच्या कागदाची अत्यंत व्यवस्थित कव्हरे घातलेली होती! वाचनाची हौस दांडगी असली तरी असं कितीसं शिक्षण झालं असेल त्या वॉचमन काकांचं? पण त्यांनी त्यांच्यातला सुसंस्कृतपणा निष्ठेने जपला होता हे मात्र खरं.

सुशिक्षित असणं वेगळं आणि सुसंस्कृत असणं वेगळं - याचा मात्र नव्याने प्रत्यय आला.

- मंदार
१९.०९.२०१३
भाद्रपद शु. १५. पौर्णिमा, शके १९३५

--------------------------------------------------------------------------------------
हे आणि ते - १: पाहुणचार
--------------------------------------------------------------------------------------

Saturday, September 7, 2013

काही मनातले


मी नुकतंच एका नास्तिक इसमास फेसबुकवर मित्रसूचीतून काढून टाकलं. नाही. मी त्याला तो नास्तिक आहे म्हणून काढलं नाही. प्रत्यक्ष आयुष्यात माझा मित्र तो कधीच नव्हता. पण त्याचं थोबाड रोज बघणं हा माझा नाइलाज आहे. तर कारण असं घडलं की गोकुळाष्टमीच्या काही दिवस आधी रस्त्यावरची पोस्टर बघून त्याच्या मुलाने म्हणे त्याला विचारलं राधा कृष्णाची कोण? तर त्याला म्हणे अवघडल्यासारखं झालं आणि म्हणे राधा कृष्णाची जवळची मैत्रिण. तो म्हणतो awkward mythology. त्यानंतर त्याच्या आणि त्याच्याचसारखी सडलेली विचारसरणी असलेल्या त्याच्या फेसबुकी मित्रांच्या घाणेरड्या पोस्टी वाचल्या. मी त्याला आणि त्या पोस्टवर आलेल्या काही खोडसाळ पोस्टींना प्रतिउत्तर दिल्यावर त्याला मी भगवी चड्डी घातली असल्याचा साक्षातकार झाला आणि त्याने आणखी काही तारे तोडले. त्याचं पर्यावसान मी त्याला माझ्या मित्रसूचीतून काढून टाकण्यात झालं.

माझं इतकंच म्हणणं आहे, की तुम्ही नास्तिक आहात, देव मानित नाही....त्या मताचा, त्या भावनेचा मी आदर करतो. मी तुम्हाला देव माना म्हणून समजवायला कधीच जाणार नाही, तसेच तुमच्या मताचा कधीही जाहीर कुचेष्टा किंवा अनादर करणार नाही. परंतु या नाण्याला अर्थातच दुसरी बाजू आहे अशी की तुम्ही माझा धर्म, देव, उत्सव, संस्कृती व तिचे अनेक पदर, त्या संदर्भातल्या असंख्य गोष्टी याबद्दलच्या माझ्या भावनांचाही आदर राखलाच पाहिजे. चिकित्सा म्हणून चर्चा करणे ठीक, पण वरील गोष्टींबद्दलची कुचेष्टा, अनादर, आणि त्या गोष्टींविषयीच्या कुचाळक्या मला चालणार नाहीत. तसे तुम्ही करणार असाल, तर फेसबुकावरुन तुम्ही स्वतःच मला तुमच्या मित्रसूचीतून काढून टाका. फेसबुकावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातूनही माझे मित्र राहू नका. न काढल्यास मला अशी फालतूगिरी केलेली दिसल्यास मीच काढून टाकेन. फेसबुकावरुन आणि प्रत्यक्ष आयुष्यातही. गणपतीबाप्पा तुम्हाला इतरांपेक्षा जास्तच सदबुद्धी देवो ही त्याच्या चरणी प्रार्थना. लवकर बरे व्हा. गेट वेल सून.

धन्यवाद.

- मंदार

ता.क. आणि हो, मी उद्या आणि परवा तुमच्यासारख्यांच्या नाकावर टिच्चून नारळही फोडणार आहे, बरं का!!

Sunday, August 4, 2013

मैत्री




वाटलं होतं खूप उशीर झालाय
नवे सवंगडी मिळवायला
उतू चाललेलं मनातलं
कुणालातरी सांगायला

बराच आनंद
बरंच दु:ख
आणि साचून राहीलेलं
बोचरं सुख
कधी वाटलेला मोकळेपणा
तर कधी लागलेली रुखरुख
वाटलं होतं खूप उशीर झालाय
हे सगळं बोलायला
उतू चाललेलं मनातलं
कुणालातरी सांगायला

काही अनुभव
काही भावना
काही अतीव सुखाचे क्षण
काही तीव्र वेदना
कधी जाणवलेला एकटेपणा
तर कधी हवासा वाटणारा एकांत
वाटलं होतं खूप उशीर झालाय
हे सगळं बोलायला
उतू चाललेलं मनातलं
कुणालातरी सांगायला

उत्तर शोधता शोधता
एकदा सहज उमगलं
मैत्रीच्या नात्याचं
गुपीत मग समजलं
उशीर कसला हो
आणि लवकर ते काय
आयुष्यरूपी दुधावरची
मैत्री म्हणजे साय

वेळ लागत नाही
ऋणानुबंध जुळायला
सभोवतालच्या गर्दीतून
'आपली' माणसं हुडकायला
योग मात्र यावा लागतो
त्यांना शोधू लागायला
आपल्याच नशीबाचं दान
नियतीकडून मागायला





Thursday, June 6, 2013

हे आणि ते - १: पाहुणचार

एकदा माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो. "ए श्रीsssssss ये ना रे" भयानक हेल काढत तीच ती जान्हवी तिटकारा यावा इतक्या लाडीकपणे एक एक शब्द उच्चारून श्रीला आधी वात आणि मग झोप दोन्ही आणत होती असा ज्वलंत विषय कम् दृष्य सुरू असताना मी तोंड उघडण्याचं धारिष्ट्य केलं आणि मी विचारलेला प्रत्येक प्रश्नावर आणि दिलेल्या प्रत्येक उत्तरावर "आँ?! क्कॉय? हां हां, हो का? क्कॉय? हां बोल आता" अशा प्रतिक्रिया उपस्थित काकु-आत्या इत्यादी मंडळींकडून मिळत गेल्या. आजीला कमी ऐकू येतं त्यामुळे मला तिच्याशी जोराने बोलावं लागत होतं आणि रोज अशा पद्धतीने बोलण्याची सवय नसल्याने तोच वरच्या पट्टीतला आवाज इतरांशी बोलताना लागत होता. मला इथे आमंत्रण नव्हतं मान्य, पण मी आल्यावर लक्ष देऊन चार शब्द नीट बोलले गेले असते तर मी काय त्या हेलकाढू जान्हवी आणि बावळट शिरोमणी श्रीच्या प्रेमालापात विघ्न आणून त्यांच्या सिरिअलचा बट्ट्याबोळ करणार होतो का? असो. तर, टीव्हीवर चाललेली बोंबाबोंब, लग्नघरातली गडबड, माझा मोठा आवाज या अभूतपूर्व गोंधळात आजीची सदिच्छा भेट मी कशीबशी उरकली आणि पुढ्यातला चिवडा लाडू पोटात ढकलून, तिथून अक्षरश: पळ काढला.

तिथून बाहेर पडलो आणि गेल्याच वर्षी आलेला एक अतिशय छान अनुभव आठवला. माझ्या एका कलीग-कम्-मैत्रिणीकडे सहकुटुंब जेवायला आमंत्रण होतं. शनिवारी संध्याकाळी साडेसातला जायचं असं ठरलं होतं पण मुलांना तयार करण्याच्या गडबडीत पोहोचायला आठ वाजलेच. आम्ही पोहोचलो तेव्हा ती आणि तिचा नवरा, दोघांनीही "या..." म्हणून सुहास्य वदनाने स्वागत केले. औपचारिक हसू लगेच ओळखू येतं मला, हे मात्र तसं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. ते "या" बोलले नसते तरी निव्वळ ते स्मितहास्य पाहूनच ते अगदी मनापासून केलेलं स्वागत आहे हे मला जाणवलं असतंच. सुरवातीच्या गप्पा झाल्यावर पावभाजी हा मेनू असल्याचं समजलं. "अगदी last moment ठरलं पाव भाजीचं" मैत्रीण म्हणाली. आमच्या 'कुटुंबाला' पावभाजी अत्यंत प्रिय असल्याने तिच्या चेहर्‍यावर विशेष आनंद पसरला. मलाही उगाच भारंभार पदार्थ नसल्याने बरं वाटलं. बरेच पदार्थ असणं चुकीचं नाही, पण मग एकाचीही धड मजा घेता येत नाही. तेव्हा पावभाजी जिंदाबाद करत गप्पा मारत मारत सगळ्यांनी सही झालेल्या पावभाजीवर ताव मारला. मग दोघांनी आम्हाला सगळं घर दाखवलं. काही वेळाने पुलंच्या म्हैस कथेतल्या वर्णनाप्रमाणे दोन ट्रकवाले, दोन एसटीवाले, आणि दोन मुंग्या या समोरासमोर भेटल्या की काहीतरी टिकटिक टिकटिक टिकटिक टिकटिक झालंच पाहीजे या न्यायाने दोघा बायकांचं स्वयंपाकघरात काहीतरी गुफ्तगू झालं. मग पुन्हा गप्पा झाल्या आणि आल्यापासून साधारण दोनेक तासांनी आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी मी दोघांनाही पावभाजी आणि पाहुणचार आवडल्याचा एसएमएस केला तेव्हा दोघांनीही उत्तर पाठवताना भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.

त्या शनिवारी रात्री उशीरा झोप आणि रविवारी लवकर उठल्याने झोप अनावर होऊन मी रविवारी दुपारी बराच वेळ झोपलो. त्यामुळे रात्री जागरण झालं. मला सकाळी लवकर उठून चालायला जायचं असल्यामुळे ती झोप सोमवारी सकाळीही पूर्ण झाली नाही. मंगळवारच्या झोपेवरही याचा परिणाम झाला आणि माझं काम हळु हळु होऊ लागलं. लक्ष केंद्रित करण्यावर झालेल्या परिणामामुळे मी लक्षपूर्वक काम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करु लागलो आणि त्या भानगडीत इतरांशी बोलणं कमी झालं. या मौनामुळे त्या मैत्रिणीचा गैरसमज झाला आणि तिने मला विचारलं की "का रे बाबा शनिवारी तू आमच्याकडे येऊन गेल्यानंतर काही घडलं का? I am finding you a little aloof. आमच्याकडून काही चूक झाली आहे का?" खरं तर तसं काहीही नव्हतं. पण तिने हा विचार केला याचंच मला खूप कौतुक वाटलं. झोपेच्या खोबर्‍याची कथा सांगून तिचा गैरसमज मी लवकरच दूर केला, पण भेटीनंतर काहीही कारणाने का असेना 'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. या निमित्ताने आधी लक्षात न आलेली आणखी एक आणि महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची छान पद्धत. त्या दिवशी आम्हाला झालेल्या उशीरामुळे आमची वाट बघत असताना वेळ घालवायला त्यांनी कदाचित टीव्ही सुरू केलेला असावा. आम्ही घरात पाऊलही ठेवण्याच्या आत तो बंद झालेला होता. मला आत्ता आठवलं की यजमानांना रिमोट खाली ठेवताना मी बघितलं होतं बहुतेक. आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, मोबाईलशी चाळा नाही की मोबाईल वाजणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही - दोघांनीही संपूर्ण लक्ष आमच्यावरच केंद्रित केलेलं होतं आणि हे सगळं सहज होत होतं - दोघांच्याही वागण्यात कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. आम्ही काही सारखे कुणाकडे जातो असं नाही. पण बर्‍याच काळानंतर आम्हाला पाहुणे म्हणून गेल्यावर इतका छान अनुभव आला. शिवाय संपूर्ण वेळ आमच्याकडेच लक्ष दिल्याने अगदी राजेशाही पाहुणचार झाल्यासारखं वाटलं. समोरच्याच्या मनाचा आणि आनंदाचा इतका बारकाईने विचार करणार्‍या या साध्या स्वभावाच्या दांपत्याने केलेल्या आदरातिथ्य आणि त्याबद्दल केलेल्या पाठपुराव्याचं खूप कौतुक वाटलं.

'
अतिथी देवो भवया वचनाचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता हे निश्चित. दुसर्‍या दिवशी पूजा करताना हात जोडल्यावर बाप्पाने त्यांना कायम सुखात ठेवावं अशी इच्छा आपोआप व्यक्त केली गेली, आणि तेव्हापासून त्या दोघांचा समावेश माझ्या रोजच्या प्रार्थनेत होतो आहे.