Wednesday, May 1, 2013

दुधावरची साय


दुधावरची साय
जणू तुझं असणं
त्याचाच भाग असून
वेगळं उठून दिसणं

(फेसबुकवर चहावर केलेली एक छोटी कविता वाचून सुचलेलं काहीतरी)

Wednesday, January 9, 2013

सर्व स्वाभिमानी आणि देशभक्त भारतीय नागरिकांसाठी प्रतिज्ञा



मी भारताचा नागरिक आणि जगभरातील शांतताप्रिय जनतेचा एक भाग म्हणून अशी प्रतिज्ञा करतो की सरकारपातळीवर काहीही निर्णय झाला तरीही पाकिस्तान या देशाशी संबंधित असलेल्या कुठल्याही खेळाचे सामन्यांचे तिकीटे काढून प्रत्यक्ष दर्शन तर सोडाच, पण प्रक्षेपण आणि संबंधित कार्यक्रम—मग ते भारतीय संघाशी खेळत असले तरी—दूरदर्शन संचावर बघणार नाही, आकाशवाणीवर ऐकणार नाही आणि आंतरजालावर त्यासंबंधी कुठल्याही बातम्या वाचणार नाही किंवा धावसंख्या/गोलसंख्या वगैरे कुणालाही विचारणार नाही.

तसेच पाकिस्तान या देशाचे नागरिक सहभागी होत असलेला कुठलाही चित्रपट, मालिका, संगीताधारित कार्यक्रम बघणार नाही किंवा त्यासंबंधित कुठलीही बातमी वाचणार नाही.

पाकिस्तानी नागरिकांशी जगभरात कुठेही संबंध ठेवणार नाही. कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला—मग तो रुग्ण म्हणून समोर आला तरीही—कुठल्याही प्रकारची सेवा पुरवणार नाही.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानी शिक्षक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक, वैद्यक वगैरे—म्हणजेच पाकिस्तानचा कुठलाही नागरिक—सहभागी होत असलेल्या कुठल्याही समारंभात/कार्यक्रमात/सभेत सहभागी होणार नाही.

Sunday, October 28, 2012

पुणे बस डे ला पाठिंबा...नाही!



देव आनंदला एकदा एक जेष्ठ पत्रकार महाशयांनी विचारलं, "तू तुझे सिनेमे गोल्डीला दिग्दर्शित करायला का नाही सांगत. त्यावर देव म्हणाला होता "अगर गोल्डी डायरेक्ट करेगा तो मैं क्या करुंगा?" हे म्हणजे हरभजनसिंगने "अगर सचिन बॅटिंग करेगा तो मैं क्या करुंगा" अस म्हणण्यासारखं होतं. अगदी सकाळ वृत्तसमूहासारखं आहे नै का? मला वाटतं भल्या सकाळी सकाळपैकी कुणाच्या तरी डोक्यात अचानक कल्पनांची सकाळ होऊन "पी.एम.टी. बस चालवत असेल तर मग सकाळ काय करणार?" असा दिव्य विचार आला असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी अनेकांना वेठीला......सॉरी हां....तर त्यांनी व्यवसायिक, कारखानदार, राजकारणी अशा अनेकांना मदतीला घेऊन एक नोव्हेंबरला पुणे बस दिन साजरा करण्याचं ठरवलं. त्या  दिवशी नागरिकांनी फक्त बसनेच प्रवास करायचा असं ठरलं.

मला एकदम भडभडून आलं. पण म्हटलं त्या दिवशी बसने जाता आलं नाही तर? तर मग टिव्हीवर या दिवसाच्या यशाच्या बातम्या बघून भागवायचं? छे छे!! म्हणूनच आज कात्रज ते कोथरुड डेपो प्रवास करण्याची संधी आली तेव्हा अचानक मला बस प्रेमाचा उमाळा आला. कात्रज बस स्टँडवर उभी असलेली सुंदर खाशी नसली तरी सुबक लांबुडकी बस कपाळावर 'कोथरुड डेपो'चं कुंकू लाऊन उभी असलेली दिसली आणि विराट कोहलीला फुलटॉस दिसल्यावर होत नसेल इतका आनंद मला झाला आणि मी त्यात जाऊन बसलो. आता बस क्रमांक आठवत नाही. पण वांदो नथी. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात. तुम्हाला हवं तिथे नेऊन हापटलं की झालं बघा. चौदा रुपये सुट्टे नसल्याने पन्नास रुपये कंडक्टरला देऊन आणि तीस रुपये घेऊन बाकीचे सहा रुपये कधी येतात याकडे अर्ध लक्ष ठेऊन प्रवास सुरू केला. आणि लवकरच बस प्रवासाच्या आनंदावर विरजण पडायला सुरवात झाली. सुरवातीला दमदार स्टार्ट घेऊन रोरावत स्टँडबाहेर पडलेली बस मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच करत मार्गाक्रमण करु लागली. बस अचानक बंद पडत असे, ती चालक पुन्हा पुन्हा सुरू करत असे. खोक् खोक् खोकून आणि प्रेक्षकांच्या तोंडावर ड्वायलाग मारुन मारुन भरपूर पिडून मगच खपणार्‍या टीबीसम्राज्ञी लीला चिटणीस, सुलोचना, निरुपा रॉय, अचला सचदेव इत्यादी सिनेआयांप्रमाणे अ ते ज्ञ यांपैकी एकाही अक्षराने लिहून द दाखवता येणारे असंख्य आवाज करुन ही बस शेवटी सणस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या परिसरात कुठेतरी बंद पडली.

कंडक्टरने खाली उतरून प्रवाशांना हाकत हाकत दुसर्‍या बशीत भरण्यास सुरवात केली. "ओ, सहा रुपये" असं म्हटल्यावर त्याने दारावर पूरग्रस्तांसाठी वर्गणी मागितल्यावर अतिशय दयार्द्र नजरेने पण तितक्याच अलिप्तपणे डब्यात लोकं पैसे टाकतात तसे माझ्या खिशात सहा रुपये टाकले. आणि लगोलग मला एका बशीत भरला. ही बस ६८ क्रमांकाची बरं का. आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक MH12 AQ 3414. या बसचा भोंगा उर्फ हॉर्न सोडला तर सगळे भाग वाजत होते. काही वेळाने माझ्या शरीरातल्या २०६ हाडांपैकी सगळीच्या सगळी वाजायला लागून तो आवाज या आवाजात मिसळतोय की काय आसा भास होऊ लागला. शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटल्याने कुठे लागू नये ही कसरतही सुरू होतीच. दुसर्‍या दिवशी "बाबांना टुच केलं बाबा लल्ले नाई" हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून मनातल्या मनात रामरक्षा म्हणत शेवटी एकदाचा कोथरुड डेपोचा थांबा आला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो पुन्हा चुकून सुद्धा बस मधे न पाऊल ठेवण्याचा निश्चय करुनच.

बस डे. माफ करा. मी नाही प्रवास करणार त्या दिवशी. तुम्हाला रोज बस नीट चालवता येत नसतील तर वर्षातला एक दिवस बसने प्रवास करुन काय साध्य होणार. निव्वळ बस उत्तमरित्या चालवल्या तर अनेक मार्गांवर बस चालवून कोट्यावधीचा महसूल मिळण्याची शक्यता असताना अशी सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीला उपाशी ठवण्याचं पातक राजकारण्यांकडून घडतं. आणि मग उठल्याबसल्या टगेगिरी करणारे आणि कार्यकर्त्यांवर मायेचे सिंचन करणारे मंत्री असोत की 'पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुधारू' असं निवडणूक जाहीरनाम्यात लिहून नंतर राष्ट्रकुलाला लुटण्यात व्यग्र होऊन त्या आश्वासनाची सुरळी करणारे खेळप्रिय मंत्री असोत कुणालाच काहीच करावसं वाटत नाही. तासंतास बस येत नाही, आली तर लहान मुलांना खेळायलाही उपयोगी पडणार नाही अशा रितीने खुळखुळा झालेल्या अवस्थेतला बसवजा पत्र्याचा डबा येतो. चालकाने गिअर बदलला तर गिअरस्टिक सकट मागच्या सहा आसने खडखड्खड्खड करत हादरतात. थांब्यावर बस थांबत नाही. काय काय लिहू? मला नाही हो आवडत गाडी चालवत बाईक उडवत रोज जायला. पण काय काय सहन करायचं रोज?

म्हणून टीकेचा धनी व्हायचा धोका पत्करुन म्हणतो. पुणे बस डे ला माझा पाठिंबा नाही. कदापि नाही. पुणे बस डे गेला खड्ड्यात!!

--------------------------------------------------------------------------------------
हीच ती वाजणारी बस:



या चित्रफितीत येणारे गाड्यांच्या हॉर्नचे वगळता सगळे खड्खड्खड्खड् आवाज हे बसच्या भागांचे आहेत.

--------------------------------------------------------------------------------------

सिमेंटच्या जंगलातलं हिरवं बेट


पुण्यातल्या कोथरुडमधेच हे ठिकाण आहे असं मला कुणी आठवडाभरापूर्वी सांगितलं असतं तर मी त्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता. पण स्वतः बघितल्यावर विश्वास ठेवावाच लागला.  न्यु डी.पी.रस्यावरुन महेश विद्यालय ज्या सहजानंदकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे त्याच रस्त्यावर अगदी शेवटी ही दगडखाणीची टेकडी आहे. भरपूर वृक्षारोपण करुन खाणीमुळे निर्माण झालेल्या विवरातलं अनावश्यक गवत काढून टाकल्यास उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हे विकसित करता येईल. याबाबत स्थानिक नगरसेवकाला त्याने पुढाकार घ्यावा ही सूचना करण्याचा मानस आहे.



टेकडीवरुन दिसणारा सूर्योदय




















वारजेकडे जाणारा रस्ता




टेकडीवरुन दिसणारे वारजे उपनगर


टेकडीवरुन दिसणारा कुमार परिसर/सहजानंद हा कोथरुडचा भाग


पायवाट आणि डांबरवाट




Sunday, October 14, 2012

माझा आवाज: किशोर कुमार




महंमद रफी हा गानस्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्नर, इत्यादी. कदाचित हिमेश रेशमियाला असुरवंशातील उपमा शोभेल. पण किशोर कुमार हा माझा आवाज आहे. बस्स. बाकी काहीही वर्णन नाही. तो माझा आवाज आहे. कंपनीतल्या सी.ई.ओ. पासून चपराशापर्यंत आणि देशाच्या राष्ट्रपतींपासून महापालिकेच्या झाडूवाल्यापर्यंत कुणालाही येताजाता गुणगुणता येतील अशी गाणी गाणारा तो माझा किशोर आहे. सामान्य माणसाचा आवाज. ते उर्दूत दर्द वगैरे का काय म्हणतात ते त्याच्या गळ्यातून प्रत्येक शब्दानिशी टपकायचं. शास्त्रीय गाणं अजिबात शिकला नसूनही अनेक दशकं गात राहणं यातच किशोरचं मोठेपण आहे. "मी गायचो ते किशोर कुमार आरामात गाऊ शकायचा. पण तो गायचा ते मला जमायचं नाही." - हे साक्षात मन्ना डे यांचे शब्द आहेत.

त्याच्या व्यवहारीपणाला इंडस्ट्रीतल्या कोत्या मनाच्या लोकांनी कंजूषपणाचं लेबल लावलं. त्याच्या उत्स्फूर्तपणाला कायम आचरटपणाचं लेबल लावलं गेलं. प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल असतंच. त्याने ते लपवून ठेवलं नाही इतकंच. किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

इतर गायकांनी गायलेल्या दु:खी गाण्यांत आणि किशोरने गायलेल्या दर्दभर्‍या म्हणजेच सॅड साँग्स यांची तूलना केल्यास किशोरची गाणी आपल्याला सरस वाटतील ते किशोरच्या गाण्यांचं एक वैशिष्ठय आहे त्यामुळे. 'मेरा जीवन कोरा कागज' यासारख्या अगदी थोड्या गाण्यांचा अपवाद वगळला तर त्याच्या दु:खी गाण्यांतही हताश भाव कधीही दिसला नाही. नेहमी सकारात्मक वृत्ती आणि आशावाद दिसला. पुढे जाण्याचा मार्ग सुचवलेला असे. समस्येला काहीतरी समाधान सुचवलेले असे. 'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे. हाच आशावाद त्याला माझा आवाज बनवण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण आज माजलेल्या बजबजपुरीत माझा हरवलेला आवाज मला किशोरच्या आवाजात सापडतो.

म्हणूनच किशोर नामक सोबती हा आपल्यात नाही असं म्हणवत नाही. तो आहे. आणि माझा आवाज बनून राहिला आहे.