Wednesday, January 9, 2013

सर्व स्वाभिमानी आणि देशभक्त भारतीय नागरिकांसाठी प्रतिज्ञा



मी भारताचा नागरिक आणि जगभरातील शांतताप्रिय जनतेचा एक भाग म्हणून अशी प्रतिज्ञा करतो की सरकारपातळीवर काहीही निर्णय झाला तरीही पाकिस्तान या देशाशी संबंधित असलेल्या कुठल्याही खेळाचे सामन्यांचे तिकीटे काढून प्रत्यक्ष दर्शन तर सोडाच, पण प्रक्षेपण आणि संबंधित कार्यक्रम—मग ते भारतीय संघाशी खेळत असले तरी—दूरदर्शन संचावर बघणार नाही, आकाशवाणीवर ऐकणार नाही आणि आंतरजालावर त्यासंबंधी कुठल्याही बातम्या वाचणार नाही किंवा धावसंख्या/गोलसंख्या वगैरे कुणालाही विचारणार नाही.

तसेच पाकिस्तान या देशाचे नागरिक सहभागी होत असलेला कुठलाही चित्रपट, मालिका, संगीताधारित कार्यक्रम बघणार नाही किंवा त्यासंबंधित कुठलीही बातमी वाचणार नाही.

पाकिस्तानी नागरिकांशी जगभरात कुठेही संबंध ठेवणार नाही. कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला—मग तो रुग्ण म्हणून समोर आला तरीही—कुठल्याही प्रकारची सेवा पुरवणार नाही.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानी शिक्षक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक, वैद्यक वगैरे—म्हणजेच पाकिस्तानचा कुठलाही नागरिक—सहभागी होत असलेल्या कुठल्याही समारंभात/कार्यक्रमात/सभेत सहभागी होणार नाही.

Sunday, October 28, 2012

पुणे बस डे ला पाठिंबा...नाही!



देव आनंदला एकदा एक जेष्ठ पत्रकार महाशयांनी विचारलं, "तू तुझे सिनेमे गोल्डीला दिग्दर्शित करायला का नाही सांगत. त्यावर देव म्हणाला होता "अगर गोल्डी डायरेक्ट करेगा तो मैं क्या करुंगा?" हे म्हणजे हरभजनसिंगने "अगर सचिन बॅटिंग करेगा तो मैं क्या करुंगा" अस म्हणण्यासारखं होतं. अगदी सकाळ वृत्तसमूहासारखं आहे नै का? मला वाटतं भल्या सकाळी सकाळपैकी कुणाच्या तरी डोक्यात अचानक कल्पनांची सकाळ होऊन "पी.एम.टी. बस चालवत असेल तर मग सकाळ काय करणार?" असा दिव्य विचार आला असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी अनेकांना वेठीला......सॉरी हां....तर त्यांनी व्यवसायिक, कारखानदार, राजकारणी अशा अनेकांना मदतीला घेऊन एक नोव्हेंबरला पुणे बस दिन साजरा करण्याचं ठरवलं. त्या  दिवशी नागरिकांनी फक्त बसनेच प्रवास करायचा असं ठरलं.

मला एकदम भडभडून आलं. पण म्हटलं त्या दिवशी बसने जाता आलं नाही तर? तर मग टिव्हीवर या दिवसाच्या यशाच्या बातम्या बघून भागवायचं? छे छे!! म्हणूनच आज कात्रज ते कोथरुड डेपो प्रवास करण्याची संधी आली तेव्हा अचानक मला बस प्रेमाचा उमाळा आला. कात्रज बस स्टँडवर उभी असलेली सुंदर खाशी नसली तरी सुबक लांबुडकी बस कपाळावर 'कोथरुड डेपो'चं कुंकू लाऊन उभी असलेली दिसली आणि विराट कोहलीला फुलटॉस दिसल्यावर होत नसेल इतका आनंद मला झाला आणि मी त्यात जाऊन बसलो. आता बस क्रमांक आठवत नाही. पण वांदो नथी. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात. तुम्हाला हवं तिथे नेऊन हापटलं की झालं बघा. चौदा रुपये सुट्टे नसल्याने पन्नास रुपये कंडक्टरला देऊन आणि तीस रुपये घेऊन बाकीचे सहा रुपये कधी येतात याकडे अर्ध लक्ष ठेऊन प्रवास सुरू केला. आणि लवकरच बस प्रवासाच्या आनंदावर विरजण पडायला सुरवात झाली. सुरवातीला दमदार स्टार्ट घेऊन रोरावत स्टँडबाहेर पडलेली बस मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच करत मार्गाक्रमण करु लागली. बस अचानक बंद पडत असे, ती चालक पुन्हा पुन्हा सुरू करत असे. खोक् खोक् खोकून आणि प्रेक्षकांच्या तोंडावर ड्वायलाग मारुन मारुन भरपूर पिडून मगच खपणार्‍या टीबीसम्राज्ञी लीला चिटणीस, सुलोचना, निरुपा रॉय, अचला सचदेव इत्यादी सिनेआयांप्रमाणे अ ते ज्ञ यांपैकी एकाही अक्षराने लिहून द दाखवता येणारे असंख्य आवाज करुन ही बस शेवटी सणस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या परिसरात कुठेतरी बंद पडली.

कंडक्टरने खाली उतरून प्रवाशांना हाकत हाकत दुसर्‍या बशीत भरण्यास सुरवात केली. "ओ, सहा रुपये" असं म्हटल्यावर त्याने दारावर पूरग्रस्तांसाठी वर्गणी मागितल्यावर अतिशय दयार्द्र नजरेने पण तितक्याच अलिप्तपणे डब्यात लोकं पैसे टाकतात तसे माझ्या खिशात सहा रुपये टाकले. आणि लगोलग मला एका बशीत भरला. ही बस ६८ क्रमांकाची बरं का. आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक MH12 AQ 3414. या बसचा भोंगा उर्फ हॉर्न सोडला तर सगळे भाग वाजत होते. काही वेळाने माझ्या शरीरातल्या २०६ हाडांपैकी सगळीच्या सगळी वाजायला लागून तो आवाज या आवाजात मिसळतोय की काय आसा भास होऊ लागला. शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटल्याने कुठे लागू नये ही कसरतही सुरू होतीच. दुसर्‍या दिवशी "बाबांना टुच केलं बाबा लल्ले नाई" हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून मनातल्या मनात रामरक्षा म्हणत शेवटी एकदाचा कोथरुड डेपोचा थांबा आला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो पुन्हा चुकून सुद्धा बस मधे न पाऊल ठेवण्याचा निश्चय करुनच.

बस डे. माफ करा. मी नाही प्रवास करणार त्या दिवशी. तुम्हाला रोज बस नीट चालवता येत नसतील तर वर्षातला एक दिवस बसने प्रवास करुन काय साध्य होणार. निव्वळ बस उत्तमरित्या चालवल्या तर अनेक मार्गांवर बस चालवून कोट्यावधीचा महसूल मिळण्याची शक्यता असताना अशी सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीला उपाशी ठवण्याचं पातक राजकारण्यांकडून घडतं. आणि मग उठल्याबसल्या टगेगिरी करणारे आणि कार्यकर्त्यांवर मायेचे सिंचन करणारे मंत्री असोत की 'पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुधारू' असं निवडणूक जाहीरनाम्यात लिहून नंतर राष्ट्रकुलाला लुटण्यात व्यग्र होऊन त्या आश्वासनाची सुरळी करणारे खेळप्रिय मंत्री असोत कुणालाच काहीच करावसं वाटत नाही. तासंतास बस येत नाही, आली तर लहान मुलांना खेळायलाही उपयोगी पडणार नाही अशा रितीने खुळखुळा झालेल्या अवस्थेतला बसवजा पत्र्याचा डबा येतो. चालकाने गिअर बदलला तर गिअरस्टिक सकट मागच्या सहा आसने खडखड्खड्खड करत हादरतात. थांब्यावर बस थांबत नाही. काय काय लिहू? मला नाही हो आवडत गाडी चालवत बाईक उडवत रोज जायला. पण काय काय सहन करायचं रोज?

म्हणून टीकेचा धनी व्हायचा धोका पत्करुन म्हणतो. पुणे बस डे ला माझा पाठिंबा नाही. कदापि नाही. पुणे बस डे गेला खड्ड्यात!!

--------------------------------------------------------------------------------------
हीच ती वाजणारी बस:



या चित्रफितीत येणारे गाड्यांच्या हॉर्नचे वगळता सगळे खड्खड्खड्खड् आवाज हे बसच्या भागांचे आहेत.

--------------------------------------------------------------------------------------

सिमेंटच्या जंगलातलं हिरवं बेट


पुण्यातल्या कोथरुडमधेच हे ठिकाण आहे असं मला कुणी आठवडाभरापूर्वी सांगितलं असतं तर मी त्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता. पण स्वतः बघितल्यावर विश्वास ठेवावाच लागला.  न्यु डी.पी.रस्यावरुन महेश विद्यालय ज्या सहजानंदकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे त्याच रस्त्यावर अगदी शेवटी ही दगडखाणीची टेकडी आहे. भरपूर वृक्षारोपण करुन खाणीमुळे निर्माण झालेल्या विवरातलं अनावश्यक गवत काढून टाकल्यास उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हे विकसित करता येईल. याबाबत स्थानिक नगरसेवकाला त्याने पुढाकार घ्यावा ही सूचना करण्याचा मानस आहे.



टेकडीवरुन दिसणारा सूर्योदय




















वारजेकडे जाणारा रस्ता




टेकडीवरुन दिसणारे वारजे उपनगर


टेकडीवरुन दिसणारा कुमार परिसर/सहजानंद हा कोथरुडचा भाग


पायवाट आणि डांबरवाट




Sunday, October 14, 2012

माझा आवाज: किशोर कुमार




महंमद रफी हा गानस्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्नर, इत्यादी. कदाचित हिमेश रेशमियाला असुरवंशातील उपमा शोभेल. पण किशोर कुमार हा माझा आवाज आहे. बस्स. बाकी काहीही वर्णन नाही. तो माझा आवाज आहे. कंपनीतल्या सी.ई.ओ. पासून चपराशापर्यंत आणि देशाच्या राष्ट्रपतींपासून महापालिकेच्या झाडूवाल्यापर्यंत कुणालाही येताजाता गुणगुणता येतील अशी गाणी गाणारा तो माझा किशोर आहे. सामान्य माणसाचा आवाज. ते उर्दूत दर्द वगैरे का काय म्हणतात ते त्याच्या गळ्यातून प्रत्येक शब्दानिशी टपकायचं. शास्त्रीय गाणं अजिबात शिकला नसूनही अनेक दशकं गात राहणं यातच किशोरचं मोठेपण आहे. "मी गायचो ते किशोर कुमार आरामात गाऊ शकायचा. पण तो गायचा ते मला जमायचं नाही." - हे साक्षात मन्ना डे यांचे शब्द आहेत.

त्याच्या व्यवहारीपणाला इंडस्ट्रीतल्या कोत्या मनाच्या लोकांनी कंजूषपणाचं लेबल लावलं. त्याच्या उत्स्फूर्तपणाला कायम आचरटपणाचं लेबल लावलं गेलं. प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल असतंच. त्याने ते लपवून ठेवलं नाही इतकंच. किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

इतर गायकांनी गायलेल्या दु:खी गाण्यांत आणि किशोरने गायलेल्या दर्दभर्‍या म्हणजेच सॅड साँग्स यांची तूलना केल्यास किशोरची गाणी आपल्याला सरस वाटतील ते किशोरच्या गाण्यांचं एक वैशिष्ठय आहे त्यामुळे. 'मेरा जीवन कोरा कागज' यासारख्या अगदी थोड्या गाण्यांचा अपवाद वगळला तर त्याच्या दु:खी गाण्यांतही हताश भाव कधीही दिसला नाही. नेहमी सकारात्मक वृत्ती आणि आशावाद दिसला. पुढे जाण्याचा मार्ग सुचवलेला असे. समस्येला काहीतरी समाधान सुचवलेले असे. 'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे. हाच आशावाद त्याला माझा आवाज बनवण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण आज माजलेल्या बजबजपुरीत माझा हरवलेला आवाज मला किशोरच्या आवाजात सापडतो.

म्हणूनच किशोर नामक सोबती हा आपल्यात नाही असं म्हणवत नाही. तो आहे. आणि माझा आवाज बनून राहिला आहे.














Tuesday, October 2, 2012

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥

सत्यासारखा दुसरा धर्म नव्हे. सत्यापलीकडे काहीच नाही. आणि असत्याहून अधिक तीव्र काहीच नाही.


एकदा अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातल्या एका नाट्यगृहात चार्ली चॅप्लीन नक्कल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुणालाही संशय न येऊ देता खुद्द चार्ली चॅप्लीन एक सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र या खोट्याच्या दुनियेची गंमत बघा. स्वतः चॅप्लीन या स्पर्धेत विजयी होऊ शकला नाही. निकालांचा उल्लेख मात्र संदिग्ध आहे. काही ठिकाणी तो तिसरा आल्याचा उल्लेख आहे तर काही ठिकणी असं म्हटलंय की तो अंतीम फेरीत देखील पोहोचू शकला नाही. मात्र स्वतः चॅप्लीन म्हणायचा की त्याला चॅप्लीनला परीक्षकांची आणि स्पर्धकांची इतकी दया आली की ती प्रसिद्ध चॅप्लीनची चाल नक्की कशी असावी याचे धडे द्यायची त्याला त्या क्षणी हुक्की आली. पण आयोजक आणि स्पर्धकांच्या उत्साहाला टाचणी लावण्याची त्याला इच्छा नसावी. म्हणून ती सुरसुरी त्याने महत्प्रयासाने आवरली. त्या स्पर्धेत चॅप्लीनच्या प्रवेशिकेचा नक्की निकाल काय लागला तो परमेश्वरालाच ठाऊक. मात्र चार्ली चॅप्लीन त्याचीच नक्कल करायच्या स्पर्धेत विजयी ठरू शकला नाही हे मात्र खरं. वरच्या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे असत्याहून तीव्र काहीच असू शकत नाही. अरे, ही तर खोट्याची दुनिया!

आता अमेरिकेतून जरा भारतात येऊया. मनोजकुमार उर्फ भारतकुमारचा भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या बलिदानावर आधारित चित्रपट शहीद हा १९६५ साली भारतातल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो पर्यंत आलेल्या सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांना मागे टाकत न भूतो न भविष्यति असं घवघवीत यश मिळवलं.



प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: Newspapers are unable, seemingly to discriminate between a bicycle accident and the collapse of अ civilization. वर्तमानपत्रांना एक सायकल अपघात आणि एखाद्या संस्कृतीचं लयाला जाणं, नष्ट होणं यात फरक करता येत नाही. शहीद या चित्रपटाबद्दल वाचलं तर वर्तमानपत्रांना निव्वळ हेच नव्हे तर खर्‍याखोट्यामधेही फरक करता येत नव्हता, अजूनही करता येत नाही हे स्पष्ट होतं. शहीद प्रदर्शित झाला आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून भरभरून लिहून येऊ लागलं. एका समि़क्षकाने चित्रपटाबद्दल बरंच काही स्तुतीपर लिहून थोडीशी टीका करताना पुढे लिहीलं होतं: चित्रपटातल्या तुरुंगाची दृश्य मात्र तितकीशी खरी वाटत नाहीत.

हे वाचून मनोजकुमारने कपाळाला हात लावला. त्याला यावर हसावं का रडावं ते कळेना. मनोज कुमारने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट उपसले होते. चित्रपटाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भगतसिंगच्या आईशी चर्चा करण्यापासून त्याला अगदी ओझरतं भेटलेल्या एखाद्या माणसाशीही बोलणं त्याने वर्ज्य केलं नव्हतं. चित्रपटातली दॄश्य परिणामकारक व्हावीत म्हणून चित्रिकरणाची ठिकाणं अत्यंत काळजीपूर्वक निवडली होती. तुरुंगातलं चित्रिकरण अधिकाधिक वास्तव वाटावं म्हणून मनोजकुमारने ते लुधियाना तुरुंगात केलं होतं. चित्रपटातले प्रमुख कलाकार वगळता तुरुंगातल्या इतर कैद्यांच्या भूमिकांमधे 'एक्स्ट्रा' कलाकार नव्हे तर त्या तुरुंगातले खरेखुरे कैदी वापरण्यात आले होते. तुरुंग खरं, कैदीही खरे. मात्र ह्या खर्‍या गोष्टी त्या समीक्षकाला 'तितक्याशा खर्‍या' वाटल्या नाहीत. कदाचित खरा तुरुंग आणि खरे कैदी त्याने कधी बघितलेच नसावेत. खरं काय ते आयुष्यभर कधीही न बघता, न तपासता जे खरं आहे हे तितकंसं खरं वाटत नाही असं त्याने ठोकून दिलं होतं. आहे की नाही गंमत?

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

Thursday, September 13, 2012

आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता जपण्याबाबतचे काही उपाय व माहिती

मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे.

(१) शक्य असल्यास घरामधे कुत्रा अवश्य पाळावा. खूप फायदा होतो. कुत्रा नुस्ता वासानी देखील भुंकायला लागतो.

(२) शक्यतोवर बाहेरील दरवाज्यांचे कुलुप digitized असावे. म्हणजे फक्त आपल्यालाच नंबर माहिती असतो. चोराला देखील अशी कुलुपे उघडण्यात लवकर यश येत नाही.
(२) 
(अ)  Digitized कुलपे परवडतातच असे नाही. त्यामुळे गोदरेजचे नवीन computerized पद्धतीने बनवलेले कुलूप आणि चावी (म्हणजे  दुसरी कुठलीही चावी लागत नाही त्याला) असे घ्यावे. (ब)  घराला/ फ्लॅटला ' युरोपा'ची कुलुपे व लॅच अत्यन्त सुरक्षित. या कुलपांचा जो स्टील बार आहे तो अलॉयचा असल्याने कापता येत नाही. (हा कापला गेल्यास युरोपा ५०००० रु. ची भरपाई देइल असा प्रवाद आहे शहानिशा नाही) पण कुलुप खुप मजबूत पण स्लीक आहे ४०० रु. पर्यन्त मिळते (मी युरोपाचा एजन्ट नाही. एक संतुष्ट ग्राहक आहे).

(३) शक्यतो एक जास्तीचे आणि लोखंडाचे दार (ग्रील) असावे घराला, म्हणजे नविन माणसाला दरवाजा उघडल्या उघडल्या घरात प्रवेश मिळणार नाही.

(४) दरवाज्यात येणार्‍यांना अवास्तव माहिती देऊ नये. गरजेपुरते बोलून कटवून टाकावे.

(५) घरी एकटे असताना शक्यतो शेजार्‍यांना मोठ्याने आपण एकटे असल्याचे सांगू नये. कोणजाणे कोणी नजर ठेवुन असेल तर?

(६) कामवाली, माळी, वाहनचालक यांना कामावर ठेवण्यापुर्वी त्यांची पुर्ण माहिती घेऊन त्याची नोंद आपल्याकडे करून ठेवावी, त्या माहितीची शहानिशा सुद्धा करून घ्यावी. वेळात वेळ काढुन एखाद्या दिवशी ती व्यक्ती नक्की तिथेच राहते ह्याची खात्री करून घ्यावी. शिवाय त्यांच्या योग्यतेची खात्री पटेपर्यंत त्यांच्यावर घराची जबाबदारी सोपवू नये.

(७) शक्यतो ओळखीतून आलेल्या बायकांनाच कामावर ठेवावे. अचानक काम द्या म्हणून समोर येणार्‍या व्यक्तीला काम देऊ नये.

(८) ड्रायव्हर, माळी, झाडुवाला अशा पुरूष कामगारांशी स्त्रियांनी कामापुरते बोलावे; जास्ती बोलणे आणि माहितीची देवाण-घेवाण हानिकारक ठरू शकेल.

(९) केबलवाला, पेपरवाला बिल मागायला आला की फक्त दरवाजा उघडून ग्रिलमधूनच पैसे आणि रिसिट घेणे.

(१०) कुरीयरवाले, पत्ता विचारायला येणारे, सेल्समन ई. पासुन पण सावध रहावे... शकयतो जाळीचा / लोखंडी दरवाजा उघडु नये.

(११) लहान मुलांना शिकवून ठेवावे: अनोळखी व्यक्तीनी फोन केला तर.. घरात कोणी नाही असं सांगु नये.

(१२) ४-५ दिवसांसाठी गावाला जात असल्यास फार गाजावाजा करु नये. अशा बातम्या लवकर पसरतात. अगदी जवळच्या शेजार्‍याला सांगून ठेवावे. शक्यतो पेपरवाल्याला सांगून ठेवावे. बाहेर पेपर पडलेले पाहून संशय येतो.

(१३) (खास करुन घरातील कर्ता पुरुष माणुस असाल तर) आपले बाहेर जायचे-यायचे वेळापत्रक अगदी दुसर्‍याने घड्याळ लावुन घ्यावे इतके अचूक ठेवू नये, अधे मधे दान्डी मारुन अचानक घरी परतणे, वा थोडे उशिराच जाणे हे केव्हाही चांगले!

(१४) दिवाळीत जास्तीचे अ‍ॅटमबॉम्ब्/बाण/भुईनळे आणून ठेवावेत, पुढील वर्षी ते वाजवुन पुन्हा नविन स्टॉक भरुन ठेवावा! काड्यापेटी/धूम्रकांडी प्रज्वलक (सिगारेट लायटर) इत्यादी सहज सापडेल असेच दोन चार ठिकाणी ठेवावे.

(१५) धुणी वाळत घालायची काठी, नारळ फोडायचा कोयता, भाजी चिरायची विळी/सुरी, मिसळणावळातील तिखटाची भुकटी ही नित्य कामाव्यतिरिक्त, केव्हाही गरज लागल्यास सहज सापडेल असे पण झाकुन ठेवावे, व मुले मोठी असल्यास त्यान्ना कार्यकारणभाव समजावुन सांगावा!

(१६) मी म्हणजे राजा, बायको म्हणजे राणी, पोरे म्हणजे राजकुमार/राजकन्या, अन माझे घर म्हणजे माझे राज्य, हे असे वागताना, तुमच्या राज्यात, तुमच्या माहितीच्या पाहुण्यांची वेळीअवेळीची वर्दळ जरुर असु द्यावी, टेहेळणी करणार्‍यांस याचा वचक बसु शकतो.

(१७) रात्री झोपताना, उशाखाली संरक्षणास आवश्यक असे वाटतील व सहज हाताळता येतील अशा सर्व वस्तू बाळगाव्यात.

(१८) जमल्यास, शेजारच्या दोनचार घरांचे मिळून एक असे "रॅकेट" करावे की एखाद्याच्या घरातील विशिष्ट बटण दाबताच शेजार्‍यांच्या घरात घंटा/धोक्याचा यांत्रिक आवाज (अलार्म) किंवा तत्सम आवाज ऐकू जाईल; याकरता हल्ली बहुतेक ठिकाणी इन्व्हर्टर असतातच, तेव्हा वीज खंडित होण्याचा प्रश्न पडू नये, तसे असल्यास चार्जेबल ब्याटर्‍यांवर ही योजना करावी.

(१९) ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत असे अनेक लोक टेडी बेअर व तत्सम सॉफ्ट टॉइज गाडीच्या मागे डिकीत काचेतून आरामात दिसू शकतील अशा प्रकारे ठेवलेले असतात. खेळण्यासाठी जरुर बरोबर बाळगावीत, पण सहज दिसू शकतील अशा प्रकारे अशी खेळणी ठेऊ नयेत. तसेच मुलांची नावे गाडीच्या काचेवर लिहू नये, कारण या दोन्हीमुळे घरात लहान मुले आहेत ह्या गोष्टीची व त्यांच्या नावांची रस्त्यावरून येता जाता व अनोळखी ठिकाणी आपसूक जाहिरात होते. शिवाय असे वाहन महागडे असेल तर "पार्टी मालदार आहे" असा (बरोबर अथवा गैर) समज करून गुन्हेगार अपहरणाची योजना बनवू शकतात.
ही गोष्ट अतीशयोक्तीपूर्ण खचितच नाही, कारण गुन्हेगार कसा विचार करू शकतात ह्याचा आपण विचार केला तर अशा अनेक गोष्टी सुचू शकतात.

(२०) सदनिकेत राहणार्‍या सर्वांनी... बाहेरून कुणालाही कडी लावता येणार नाही याची व्यवस्था करावी. काही इमारतींमधे घडलेल्या भीषण गुन्ह्यामधे आजूबाजूंच्या सर्व शेजारांच्या घरांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या होत्या. जेणेकरून मदतीला कुणी पटकन धाउन येउ शकणार नाही.

(२१) आपण कधी कधी डुप्लिकेट चाव्या शेजारी अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवतो. चावी हरवल्यास विसरल्यास कामी यावे म्हणून. दुर्दैवाने चोरी झालीच तर पोलीस हा प्रश्न विचारतात्. याच्या चाव्या कोणाकोणाकडे आहेत? पोलीसाना चुकूनही चाव्या कोणाकडे आहेत ते सांगू नये. त्या लोकाना पोलीसांचा खूप त्रास होतो. एक लक्षात घ्या अत्यन्त श्रीमन्त घरातल्या मुलानीही चोर्‍या केल्याची उदाहरणे पोलीसाना माहीत असतात त्यामुळे ते सगळ्या शक्यता लक्षात घेऊन तपास करतात . त्याना दोष देण्यात अर्थ नाही. त्यामुळे ' ती फार चांगली माणसे आहेत , ते कशी चोरी करतील' अशा आर्ग्युमेन्टला काही अर्थ नाही. पोलीस त्याना 'ग्रिल' करतात्च. चोरीच्या वेळी आपल्या कडे नेहमी येणार्‍या लोकांची नावे पोलीस विचारतात. कधी कधी त्यांच्याकडे देखील पोलीस तपासाला जातात....
शिवाय आपण ठेवायला दिलेल्या चाव्या त्यांच्या कडे येणार्या नोकरमाणसांच्या लक्षात आल्या तर ते ही काही 'उद्योग' करू शकतात. आपल्या स्नेह्यांच्या नकळत. कारण ह्या चाव्या रोजच्या रोज हाताळल्या जात नाहीत. शेजार्‍यांच्या ही पटकन लक्षात येत नाही चावी कुठे कशी आहे ते. आपल्याला कधी लागली तरच शोधून देतात ते....

(२२) ७० टक्के दुचाक्या सोसायटीच्या पार्किंगम्मधून रात्री जातात. बहुसंख्य दुचाक्याना फक्त हॅन्डल लॉक असते. व ते तोडणे म्हणजे केळे सोलण्याइतके सोपे. त्यामुळे साखळी व कुलूप पण लावावे. म्हणजे ते तोडायला आण्खी वेळ आणि आवाज लागू शकतो.
  
(२३) आमच्या आधीच्या कंपनीत फायर-ड्रिल झालं आणि नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी काही माहिती दिली त्यातली एक अत्यंत महत्वाची सूचना:
  
रात्री झोपण्याआधी जर आपण आधी गॅस शेगडीचा रेग्युलेटर बंद करत असू आणि मग सिलेंडरचा नॉब बंद करत असू तर असे करणे अत्यंत धोकादायक आहे. कारण सिलेंडर ते शेगडी या दरम्यान ट्युब मध्ये गॅस साठलेला असतो. त्यामुळे ट्युब तर हळू हळू खराब होतेच, पण झुरळं, उंदीर अशा अनेक कारणांनी ट्युब जर का कधी फाटली, तर त्या साठलेल्या गॅस मुळे आग लागण्याची शक्यता असते. रात्री शेवटचा वापर झाल्यावर सर्वप्रथम सिलेंडरचा नॉब बंद करावा आणि ज्योत विझली की मग शेगडीचा रेग्युलेटर.
  
(२४) मुंबईतल्या घरफोड्यांच्या बातम्या वाचल्या तर बहुतेक ठिकाणी रंगकाम, सुतारकाम, किंवा गवंडीकाम करून घेतले होते. असे काम करून घेताना विशेषतः आणि तसे नेहमीच घरातल्या किमती वस्तू जसे दागिने बँक लॉकर मधे ठेवावेत. कामगारांना आपली भाषा समजत नाही असे मानून त्यांच्यासमोर अशा गोष्टींची किंवा आपले घरे कसे केव्हा रिकामे (माणूस रहित) असेल याची चर्चा टाळावी.

(२५) आपल्या घराच्या सुरक्षेबरोबरच शेजारीही लक्ष ठेवावे. आजकाल बर्‍याच घरात दिवसा किंवा अगदी २४ तास वृद्ध जोडपी वा एकटी व्यक्ती घरात असतात, तर त्यांच्याकडे कोण येते जाते यावर ही लक्ष असू द्यावे. नेबरहूड वॉच सारखे.