Wednesday, October 20, 2010

मनोरंजनाचे घेतले व्रत: ऋषिकेश मुखर्जी

अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने पूर्वप्रकाशित हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

आपल्याला एखादा चित्रपट आवडण्याची कारणं अनेक असू शकतात. कुणाला एखाद्या चित्रपटातली हाणामारी आवडेल तर कुणाला भावनिक संवाद, कुणाला त्यातलं चित्रिकरण आवडेल, कुणाला अभिनय आवडेल, तर कुणाला आणखी काही. पण एक कारण सनातन आहे आणि ते म्हणजे चित्रपटात आपल्या दैनंदिन जीवनाचं प्रतिबिंब दिसणं. ज्या चित्रपटात ते दिसतं तो त्या प्रेक्षकाच्या भावविश्वाचा एक अविभाज्य अंग होऊन जातो.

पण मनुष्यस्वभावाची एक गंमत आहे. हे प्रतिबिंब चित्रपट बघताना आपल्याला उपदेशाच्या स्वरूपात नको असतं. दोषारोप करणारं बोट दाखवून आपल्या वागण्यातली विसंगती जाणवून दिलेली आपल्याला आवडत नाही. आपल्याला हवी असते ती करमणूक. इथे प्रवेश करतं ते हलक्याफुलक्या विनोदाच्या माध्यमातून सामाजिक विषय मांडण्याचं कसब. हे कसब चित्रपटसृष्टीत अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच चित्रकर्त्यांना साधलं. त्यांपैकी एक म्हणजे या लेखाचे उत्सवमूर्ती ऋषिकेश मुखर्जी. हिंदी चित्रपटसृष्टी मोठी करण्यात ज्या अनेक गुणी बंगाली कलावंतांचा सिंहाचा वाटा आहे त्यातले एक उत्तुंग व्यक्तिमत्वं म्हणजे ऋषिदा.
मूळचे कलकत्त्याचे असलेल्या मुखर्जी यांनी सुरवातीला पोटापाण्याच्या सोयीसाठी काही काळ प्राध्यापकी केली. पण चित्रपटक्षेत्रात नाव कमवायची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देईना. आजच्यासारखेच त्याकाळीही अनेक तरूण आवड आहे, गती आहे म्हणून या बेभरवशाच्या आणि तूलनेने स्थिरता नसलेल्या व्यवसायात आत्मविश्वासाने उडी मारत. असंच साहस करत ऋषिदांनीही या मायावी दुनियेत प्रवेश केला. बी. एन. सरकार यांच्या कलकत्ता मधल्याच न्यु थियेटर्स मध्ये त्यांनी कॅमेरामनची नोकरी पत्करली. मग काही काळाने कैंचीदा म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्या काळच्या प्रख्यात सिनेसंकलक सुबोध मित्तर यांच्याकडे त्याच संस्थेत संकलनकौशल्य आत्मसात केलं. अखेर ते ज्या संधीची वाट बघत होते ती संधी त्यांच्याकडे चालून आली. बिमल रॉय यांच्या सिद्धहस्त मार्गदर्शनाखाली दो बिघा जमीन या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक या नात्याने दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मुखर्जींचा प्रवेश झाला. या चित्रपटाचं संकलनही त्यांनीच केलं.


ऋषिदांना स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शन करण्याची पहिली संधी मिळाली ती १९५७ सालच्या मुसाफिर पासून. दिलीप कुमार, किशोर कुमार, केष्टो मुखर्जी, सुचित्रा सेन, उषा किरण, दुर्गा खोटे अशा अनेक कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट वास्तविक तीन कथांची गुंफण होती. आपल्या पहिल्याच चित्रपटात असा प्रयोग करणं हे अत्यंत धाडसाचं आणि म्हणूनच कौतुकास्पद होतं. मुसाफिर बॉक्स ऑफिसवर आपटला असला, तरी मुखर्जींच्या दिग्दर्शनकौशल्याने प्रभावित झालेल्या राज कपूरने त्यांच्याकडे आर.के स्टुडिओच्या अनाडीचं दिग्दर्शन सोपवलं.

साधंसोपं कथानक, सामाजिक संदेश, आणि मर्यादित पण रोचक व्यक्तिरेखा असलेला अनाडी प्रचंड लोकप्रिय झाला. दुग्धशर्करा योग असा की त्याने प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांचीही वाहवा मिळवली. त्या वर्षीचा उत्कृष्ठ दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार हुकला असला तरी अनाडीला आणि त्याच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या कलावंतांना मिळून तब्बल पाच फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. मुखर्जींच्या या दुसर्‍याच चित्रपटाने त्यांना दिग्दर्शक म्हणून लोकमान्यता मिळवून दिली. या धवल यशानंतर ऋषिकेश मुखर्जींनी मागे वळून पाहिलंच नाही.

 

सामाजिक आशय असलेला किंवा एखादा संदेश देणारा चित्रपट हा सुरवातीपासून शेवटापर्यंत गंभीरच असायला हवा असा एकेकाळी निर्माता-दिग्दर्शक आणि समीक्षकांचा समज होता. असे चित्रपट म्हणजे एक तर अडीच-तीन तास प्रेक्षकांना रडवायचं किंवा लांsssब चेहरा करून बसायला भाग पाडायचं या त्याकाळच्या (आणि कमी-अधिक प्रमाणात आजच्याही) चित्रपटीय प्रथेला  मुखर्जी यांचे चित्रपट म्हणजे सणसणीत अपवाद ठरले. 'प्रेक्षकांची करमणूक' या बाबतीत कुठेही कमी न पडता गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे ताकदीने सादरीकरण हे मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्ठ्य होतं.

सत्यकाम या चित्रपटात भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर उद्भवलेल्या एकंदर सामाजिक परिस्थितीने आपल्या आदर्शांच्या झालेल्या ठिकर्‍या आणि मूल्यांची पदोपदी चाललेली चेष्टा-अपमान पाहून व्यथित झालेल्या तरुणाची कथा, नमक हराम मधील कामगारवर्गाचा संघर्ष, अभिमान मधल्या पती-पत्नीं मध्ये पुरुषी अहंकारामुळे झालेला बेबनाव असे अत्यंत गंभीर प्रकृती असलेल्या विषयांचे प्रभावीपणे सादरीकरण करून मुखर्जी यांनी ते चित्रपट तितकेच मनोरंजकही होतील याची पुरेपूर काळजी घेतली. अशोक कुमार आणि संजीव कुमारच्या अभिनयानं नटलेला आशीर्वाद, धर्मेंद्रचा अनुपमा, बलराज सहानी अभिनीत अनुराधा यासारखे वेगळे चित्रपटही सरळ सरळ धंदेवाईक सिनेमांमध्ये मोडणारे नसले तरीही ते अजूनही तितक्याच आवडीने बघितले जातात ते याच कारणाने. या पैकी 'अनुराधा'ला  १९६१ साली उत्कृष्ठ चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि जर्मनीतल्या गोल्डन बेअर पुरस्कारासाठी नामांकितही झाला.

धर्मेन्द्रची पहिली ओळख आजच्या प्रेक्षकांना होते ती प्रामुख्याने त्याच्या जेम्स बाँड छाप मारधाडपटांतूनच. अशा चित्रपटांपासून धर्मेन्द्रप्रेमाची सुरवात होणारा त्याचा चाहतावर्ग सत्यकाम आणि अनुपमा या चित्रपटांमधला त्याचा नियंत्रित आणि संयत अभिनय पाहून आश्चर्यचकित होतो. या दोन्ही चित्रपटांतला धर्मेंद्रचा सशक्त अभिनय बघून इंग्रजीत ज्याला director's actor म्हणतात ते नक्की काय ते नेमकं समजतं आणि इथेच ऋषिदांच्या प्रतिभेसमोर आपण नतमस्तक होतो. गुड्डीतला सिनेनटाच्या रंग फासलेल्या चेहर्‍याआड दडलेल्या माणसाचं दर्शन घडवणारी धर्मेन्द्रची भूमिका आणि जया भादुरीच्या अभिनयाला असलेल्या 'द गर्ल नेक्स्ट डोअर' च्या प्रतिमेमुळे आलेल्या मर्यादा या चित्रपटात एक बलस्थान म्हणून समोर येतात तेव्हा उत्पल दत्त यांच्या प्रोफेसर गुप्तांच्या "जय धर्मेन्द्र" सारखं 'जय हृषिदा' म्हटल्यावाचून राहवत नाही. स्त्रीप्रधान चित्रपटात पूर्वी दिसायच्या त्या रडकथा. पण रेखाने ऋषिदांच्या मार्गदर्शनाखाली तिच्या जबरदस्त अभिनयाने गाजवलेले खूबसूरत आणि झूठी हे त्याला सणसणीत अपवाद आहेत.

त्यांच्या अत्युत्तम कलाकृतींमध्ये गणल्या गेलेल्या आनंद (१९७१) मधली कर्करोगग्रस्त आनंद या तरुणाची वेदना ही प्रेक्षकांना फक्त अश्रू ढाळायला लावत नाही. आपण आनंदने केलेल्या विनोदांवर चक्क हसतो देखील. कुठेही लांबलचक संवाद, अकारण लावलेलं पाल्हाळ, आणि सतत उपदेशांचा मारा यातलं काहीही आपल्याला या सिनेमात दिसत नाही. डॉ. भास्कर बॅनर्जीच्या डोळ्यांत आपलं मरण स्पष्ट पाहून आनंद त्यालाच धीर देतो आणि 'बाबूमोषाय, जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहीये!' या साध्यासोप्या शब्दात जगायचं कसं हे शिकवून जातो. या चित्रपटात आपल्याला राजेश खन्नातला सुपरस्टार दिसत नाही, आपल्याला दिसतो तो आतड्याच्या कर्करोगाने हळू हळू मरणाकडे खेचला जात असतानाही इतरांचेच अश्रू पुसणारा आनंद. आपला प्रेमभंग विसरून मित्राचं, डॉ. भास्करचं प्रेम जुळवायला झटणारा आनंद. आणि 'मौत तू एक कविता है...मुझसे एक कविता का वादा है मिलेगी मुझको' म्हणत मृत्यूशी काव्यमय मैत्री करणारा आनंद. यानंतर १९७२ साली आलेल्या बावर्ची मधल्या प्रमुख भूमिकेसाठी राजेश खन्नाची निवड निश्चित झाली तेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या यशोशिखरावर होता. अशा या सुपरस्टारला अर्ध्या बाहीच्या खाकी शर्ट आणि अर्ध्या विजारीत, डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर टॉवेल या अवतारात ऋषिदांनी दाखवण्याचं धाडस केलं. आनंद प्रमाणेच या चित्रपटातही राजेश खन्नाने साकारलेल्या नायकाला 'नायिका' नाही! देवळात प्रवेश करताना आपली पादत्राणं बाहेर काढून जावं तसं ऋषिदांच्या कॅमेर्‍यासमोर येण्याआधी 'स्टार'पदाच्या चपला आपोआप काढल्या जात त्या या अशा. सबकुछ राजेश खन्ना असलेल्या साध्यासुध्या आनंद इतकाच त्याचा बावर्चीही आपल्याला अंतर्मुख करतो आणि कुठेही प्रचारकी भाषा न वापरता एकत्र कुटुंबव्यवस्थेचे फायदेही दाखवून देतो.

व्यक्तिरेखांमधे रंग भरणे हा ऋषिदांच्या दिग्दर्शनकौशल्याचा एक महत्त्वाचा पैलू. त्यांच्या चित्रपटांत छोट्या भूमिका करणारे कलाकार आणि त्त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा ठळपणेही लक्षात राहतात. आनंद मधला जॉनी वॉकरचा इसाभाई सुरतवाला म्हणजेच 'मुरारीलाल' आणि आसित सेनचा औषधखाऊ सेठ चंद्रनाथ, काली बॅनर्जीने साकारलेली बावर्ची मधली आधी कृष्णावर जळणारी आणि मग तिची बाजू घेऊन आपल्याच आईशी भांडणारी मीता, बावर्चीमधलाच बायल्या नृत्यशिक्षक गूफी पेंटल, चित्रपटात काम मिळेल म्हणून गावाहून पळून आलेला आणि स्वप्नभंगाचं दु:ख आईपासून लपवणारा असरानीचा गुड्डीतला कुंदन, चुपके चुपके मधे धर्मेन्द्रने ".....जी ओ गू क्युं नहीं होता?" म्हणताच नाकाला पदर लाऊन उठणारी उषा किरण, अभिमान मधला डेव्हीडचा ब्रिजेश्वर राय, गोलमाल मधला युनुस परवेझचा नाकात बोटं घालणारा बडे बाबू, इन्स्पेक्टरच्या भूमिकेतला ओमप्रकाश....अशी उदाहरणं असंख्य आहेत. ही माणसं त्यांच्या लकबी, स्वभाववैशिष्ठ्यांसह आपल्याला आजही आठवतात ती त्यांच्या सुंदर व्यक्तिरेखाटनामुळे.

कितीही मोठा नट असो, फारशा चौकशा न करता जगन्मित्र असलेल्या ऋषिदांच्या चित्रपटात काम करायला नेहमीच उत्सुक असे. राज कपूर, देव आनंद, धर्मेंद्र, राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या त्याकाळच्या 'स्टार' अभिनेत्यांबरोबर त्यांनी एका पेक्षा एक सरस चित्रपट दिले. त्यापैकी अमिताभने त्यांच्याकडे सर्वाधिक चित्रपट केले. मुखर्जींची जादू अशी, की आपल्या सुपरस्टार पदाचा जराही अभिमान न बाळगता अमिताभने त्यांच्या अनेक चित्रपटात अगदी छोट्या म्हणजेच २-३ मिनिटांच्या पाहुण्या भूमिकाही केल्या. आठवा: गोलमाल चित्रपटातल्या 'सपने में देखा सपना' या गाण्यात अमोल पालेकर सुपरस्टार झाल्यावर भाव घसरलेला, फुटपाथवर बसलेला निराश अमिताभ. सुपरस्टार देव आनंद हा उत्कृष्ठ अभिनेता म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हता. मात्र जेव्हा जेव्हा त्याच्यातला अभिनय काढून घेणारा दिग्दर्शक मिळाला तेव्हा तेव्हा त्याचा अभिनय नावाजला गेला. ऋषिदांनी देवला दिग्दर्शित केलेल्या असली नकली मधे त्याने केलेला नैसर्गिक अभिनय हे त्याचंच एक उदाहरण आहे.

चित्रपटाची कथा आणि विषय कुठलाही असला तरी ऋषिकेश मुखर्जी यांचे बहुतेक सगळे चित्रपट निखळ कौटुंबिक करमणूक म्हणूनच ओळखले जातात याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या चित्रपटातील साधेपणा व त्यांनी माणसांचे आपापसातले नातेसंबंध यांचे अत्यंत तरलतेने पडद्यावर केलेले सादरीकरण. मुखर्जी यांना वरवर साध्या आणि सोप्या घटना प्रसंगांची पडद्यावर मांडणी करणं जास्त कठीण आहे हे ठाऊक असूनही ते अशाच आव्हानात्मक विषयांमध्ये अधिक रस घेत. त्यांच्या चित्रपटांमधून दिल्या जाणार्‍या संदेशांची कटूता आणि बटबटीतपणा संपूर्णपणे वर्ज्य करुन मनोरंजनरूपी साखरेच्या गोड वेष्टनात गुंडाळूनच दिली गेली पाहीजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. इंग्रजीत जे रचना तत्व (design principle) म्हणून वापरलं जातं ते K.I.S.S. म्हणजेच Keep it Simple, Stupid या तत्वाचा अनेक दिग्गज समीक्षकांच्या मते हिंदी चित्रपटांमध्ये मुखर्जी यांच्या इतका उपयोग कुणीच केला नसेल, अपवाद असलाच तर तो फक्त बासू चॅटर्जींचा. मुखर्जीं यांनी व्यावसायिक मसालापटांचा झगमगाट आणि कलात्मक चित्रपटांतलं अंगावर येणारं वास्तव या दोन्हीत सुवर्णमध्य साधला. आपल्या प्रत्येक निर्मितीत सर्वसामान्य माणसाची बदलती मानसिकता प्रतिबिंबित केल्याने त्यांचे बहुसंख्य चित्रपट प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत ठरले यात काही नवल नव्हे.
मुखर्जी यांचे सुरवातीचे चित्रपट हे विचारप्रवर्तक, सामाजिक किंवा गंभीर कथा असणारे असले, तरी त्यांच्या कारकीर्दीच्या दुसर्‍या टप्प्यात त्यांनी त्याबरोबरच अनेक विनोदी आणि करमणूकप्रधान चित्रपटांची मालिकाच सादर केली.

विनोदाच्या एका विशिष्ठ शैलीला मी वुडहाऊस शैली असं म्हणतो. पी. जी. वुडहाऊस यांच्या गोष्टी वाचताना हळू हळू वातावरणनिर्मिती होऊन एका क्षणी फिसकन् हसू येतं किंवा हास्यस्फोट होतो. या शैलीचं दुसरं वैशिष्ठ्य असं की विनोदनिर्मितीसाठी काही ओढून ताणून विशेष प्रयत्न केले गेले आहेत असं वाटत नाही. कथेतल्या पात्रांच्या संवादांमधून आणि कथा जशी उलगडते त्यातून जी स्वाभाविक आणि सहज वातावरणनिर्मिती होते त्याचा ह्या हास्यस्फोटात महत्त्वाचा वाटा असतो. या प्रकारच्या विनोदांनी जर सभ्यपणाबरोबरच सुसंस्कृतपणाही जपला तर त्यांचा सगळ्या कुटुंबाबरोबर आनंद घेता येतो. हीच शैली चित्रपटांसारख्या वेगळ्या माध्यमातही आपल्याला दिसते.
मुखर्जी यांच्या चित्रपटांत हीच शैली आपल्याला प्रकर्षाने जाणवते. काही सन्माननीय अपवाद वगळता आजचे तथाकथित विनोदी चित्रपट बघितले तर प्रेक्षकांकडून हशा वसूल करायला आचकट-विचकट हावभाव, विचित्र अंगविक्षेप, किंवा सरळ सरळ घाणेरडी भाषा यांचाच प्रामुख्याने आधार घेतलेला आढळतो. मध्यमवर्गाची नाडी अचूक ओळखलेल्या मुखर्जी यांनी चुपके-चुपके, गोलमाल, नरम-गरम, रंग बिरंगी या त्यांच्या विनोदी चित्रपटांमध्ये कुठेही असले प्रकार तर वापरले नाहीतच पण द्वैअर्थी किंवा अश्लील संवादांना जवळजवळ पूर्णपणे फाटा देऊन सकस व अभिरूचीपूर्ण विनोदनिर्मिती केली. शिवाय नायक हा एक तर 'बस्ती में रहने वाला' अत्यंत गरीब किंवा मग महाल सदृश्य बंगल्यात राहणारा गर्भश्रीमंत" अशा टोकाच्या प्रकारांच्या वाट्याला क्वचितच जाऊन, मध्यमवर्गाचे यथार्थ दर्शन घडवलं.

समाजाच्या एखाद्या वर्गाचं जगणं सिनेमात दाखवणं म्हणजे तो राहतो ते घर, तो वावरतो ती ठिकाणं आणि आजूबाजूची माणसं समानशीले व्यसनेषु सख्यम् आहेत की नाही एवढंच मर्यादित जग दाखवणं नव्हे. त्यांचं हात-पाय धुताना, पाणी पिताना, सिगारेट ओढताना, चालताना, कपडे घालताना या आणि अशा दैनंदिन गोष्टींच दर्शनही तितकंच प्रत्ययकारी व्हायला हवं. ऋषिदांनी या वातावरणनिर्मितीत किती प्राविण्य मिळवलं होतं ते सांगायला गोलमाल या चित्रपटातलं उदाहरण प्रातिनिधिक ठरावं. चित्रपटाच्या सुरवातीला अमोल पालेकर घरी येतो, एका तंद्रीत आणि उत्साहात धाकट्या बहिणीला मॅचबद्दल सांगत असतो. तिला जेवण वाढायला सांगून बाथरूममध्ये हात-पाय धुतो, आणि बाथरूमचं दार तसंच उघडं ठेऊन टेबलाशी येऊन बसतो. दोन सेकंदांनी गप्पा चालू ठेवत बहीण त्याला खायला देते आणि दार ओढून घेते. आपल्या सर्वांवरच लहानपणापासून घरातल्या आई-आजी आणि इतर मोठ्यांकडून तिन्हीसांजेला काय करावं काय करु किंवा बोलू नये याचे संस्कार झालेले आहेत. बावर्ची मधे 'ज्यांनी लहानाचं मोठं केलं त्यांचाच विश्वास आपल्यावर नाही...यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांबरोबर अपघातात मेलो असतो तर बरं झालं असतं' असं रडवेली झालेली कॄष्णा (जया भादुरी) सांगते. हे ऐकल्यावर दुर्गा खोटे सात्त्विक संतापाने त्यांच्या खास ठसक्यात "सुनोsss, शाम के वक्त लडकी की बातें सुनो" म्हणतात तेव्हा आपल्याला याच संस्कारांचं मायाळू रूप दिसतं.

नर्मविनोदी संवादांची पखरण असलेला गोलमाल इतका लोकप्रिय झाला, की सलग एका चित्रपटगृहात पाच वर्ष धो धो चालणारा सिनेमा अशी ज्याची ख्याती त्या शोले या अफाट लोकाश्रय लाभलेल्या सिनेमासमोरही त्याने तिकीटबारीवर दणक्यात धंदा केला. रूढ अर्थाने 'हीरो' या संकल्पनेत न बसणार्‍या अमोल पालेकर सारख्या अभिनेत्यालाही या चित्रपटाने हिंदीत चांगलीच लोकप्रियता मिळाली, तसंच उत्पल दत्त यांच्या सारख्या मातब्बर अभिनेत्याने चरित्र अभिनेताही कशाप्रकारे उत्कृष्ठ दर्जाचा विनोदी अभिनय करू शकतो हे दाखवून दिलं.

ह्याच दोन कलाकरांना घेऊन कुठेही तोचतोचपणा न जाणवू देता त्यांनी नरम गरम व रंगबिरंगी हे धमाल चित्रपट सादर केले. चुपके चुपके या चित्रपटात तर त्यांनी धमालच उडवून दिली. तो पर्यंत 'अँग्री यंग मॅन' आणि अ‍ॅक्शन हीरो म्हणून मान्यता पावलेल्या अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांनी या चित्रपटात असरानी, ओमप्रकाश व केष्टो मुखर्जी यांच्यासारख्या नावाजलेल्या विनोदी अभिनेत्यांच्या तोडीस तोड विनोदी अभिनय केला, याचं श्रेय अर्थातच मुखर्जी यांच्या दिग्दर्शनाला जातं. याच मालिकेतला १९९८ साली आलेला झूठ बोले कौवा काटे हा खास ऋषिदा पठडीतला नर्मविनोदी चित्रपट मात्र सपशेल आपटला. झूठ बोले कौवा काटे अयशस्वी होण्यामागे कदाचित सिनेरसिकांची बदलेली (की बिघडलेली?!) अभिरुची आणि पात्रनिवड (उत्पल दत्तला पर्याय म्हणून अमरीश पुरी आणि अमोल पालेकरला पर्याय म्हणून अनिल कपूर) ही कारणं असू शकतील. नर्मविनोदी चित्रपटांबाबत बोलताना दीप्ती नवल आणि फारुख शेख या त्याकाळच्या अनोख्या हिट जोडीने धमाल उडवून दिलेला किसीसे ना कहना हा चित्रपट आपण विसरूच शकत नाही. यातही उत्पल दत्त यांनी त्यांच्या उत्स्फूर्त अभिनयाने कहर केला होता.
दिग्दर्शनाबरोबरच गाण्यांच्या नितांतसुंदर चित्रिकरणामध्येही त्यांनी प्राविण्य मिळवलं होतं. गुड्डी चित्रपटातलं 'हम को मन की शक्ती देना' तसंच आनंद मधील 'कहीं दूर जब दिन ढल जाए' ही दोनच उदाहरणं आपल्याला याची ग्वाही देण्यास पुरेशी आहेत. त्यांच्या सिनेमात कुठेही गाणी 'घातली आहेत' असं वाटत नाही. ती कथानकाचा एक भाग होऊन किंवा कथा सांगण्याचं एक माध्यम बनून ती आपल्यापुढे सादर होतात. हे कौशल्य त्यांच्या व्यतिरिक्त फक्त विजय आनंद उर्फ गोल्डी ला साधलं होतं.

दूरदर्शनचा प्रभाव वाढू लागल्यावर मुखर्जी यांनी तलाश, हम हिंदुस्तानी (यात दादामुनी डॉक्टरच्या भूमिकेत आपल्याला दिसले), धूप छांव, रिश्ते आणि उजाले की ओर यासारख्या मालिकांद्वारे छोट्या पडद्यावरही आपला ठसा उमटवला. त्यांनी सेन्सॉर बोर्ड व एन.एफ.डी.सी या दोन संस्थांचे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. चित्रपटक्षेत्रातल्या भरीव कामगिरीसाठी असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने या प्रतिभावंत कलावंताला १९९९ साली गौरवण्यात आलं. २००१ साली चित्रपटक्षेत्रातल्या कामगिरी बद्दल ऋषिदांना 'पद्म विभूषण' हा देशाचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान देण्यात आला.



ऋषिकेश मुखर्जी हे फक्त उत्कृष्ठ दिग्दर्शकच नव्हे, तर एक सहृदय 'बॉस'ही होते याचं एक उदाहरण मंजू सिंग यांनी एका मुलाखतीत दिलं होतं. गोलमाल मधे अमोल पालेकर यांच्या धाकट्या अविवाहीत बहिणीची भूमिका साकारणार्‍या मंजू सिंग या प्रत्यक्षात दोन मुलींची आई होत्या. या गोष्टीची जाणीव असलेले मुखर्जी इतर जेष्ठ कलाकारांना सरळ सांगत, "मी हिचा सहभाग असलेली दृश्ये आधी चित्रीत करणार आहे म्हणजे तिला लवकर घरी जाता येईल."
रोमँटिक दृश्ये आणि पती-पत्नींमधले नाते यांचे सुंदररित्या चित्रिकरण करणार्‍या मुखर्जी यांची पत्नी मात्र त्यांच्या आधी ३० वर्ष हे जग सोडून त्यांना एकटं करून गेल्या. त्यांचा एक मुलगा नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दम्याचा तीव्र झटका येऊन मरण पावला. त्यांना तीन मुलीही आहेत. प्राणीप्रेमी असलेले मुखर्जी आपल्या बांद्र्याच्या सदनिकेत आपल्या काही पाळीव कुत्र्यांच्या आणि क्वचित भेट देणार्‍या एखाद्या मांजराच्या सहवासात राहत. मुले आणि नातेवाईक येऊन-जाऊन असले, तरी ते आपल्या आयुष्याची शेवटची काही वर्ष घरात एकटेच होते - सोबत असलीच तर हेच पाळीव प्राणी व काही नोकर यांची.

"ये दुनिया एक रंगमंच है और हम सब उसमे काम करनेवाली कठपुतलीयां है" असा काहीसा संवाद आनंद मधे आहे. योगायोग असा की ऋषिकेश मुखर्जींनी या जग नामक रंगमंचाचा निरोप घेतला तो याच चित्रपटातली अजरामर गाणी गाणार्‍या मुकेशच्याच स्मृतीदिनी. मूत्रपिंडाचा विकार बळावल्याने ऋषिदांचं २७ ऑगस्ट २००६ रोजी निधन झालं.

आजच्या चित्रपटांत सर्वसामान्य माणूस कुठेही दिसत नाही. दिसतो तो नुसता चकचकाट. गाण्यांत दिसतं तो आधुनिकतेच्या नावाखाली ठेक्याला आलेलं अवास्तव महत्त्व, वाद्यांचा गदारोळ, आणि आचकटविचकट नाच. नात्यांचं साधंसोपं भावस्पर्शी चित्रिकरण लोप पावलंय आणि त्याच्या जागी आलं आहे ते स्वार्थासाठी एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे संवाद. हळुवारपणे प्रेम व्यक्त होणं कधीच संपलं आहे. त्याजागी आलं आहे ते 'लोकांना हवं ते आम्ही दाखवतो' च्या नावाखाली हवं ते ओरबाडून घेण्याची चटक लावणारी वासनांधता. शिव्याशाप आणि अश्लीलतेने ओतप्रोत भरलेले संवाद आज विनोदाची झूल पांघरून आमच्यावर अधिराज्य करु पाहत आहेत. निखळ विनोद तर औषधालाही नाहीत. ही अशी अंगावर येणारी करमणूक पाहिली की जीव गुदमरतो आणि मग कळवळून म्हणावसं वाटतं, "ऋषिदा, तुम्ही परत या हो!"
 



- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

संदर्भः आंतरजालावरील अनेक संकेतस्थळं व माझे चित्रपटप्रेम.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

दुसरा लेख: मनोरंजनाचे घेतले व्रत | विजय आनंद उर्फ गोल्डी

Friday, October 15, 2010

ज्याची त्याची बांधीलकी

स्थळः एका मोठ्या कंपनीची मोठी कॉन्फरन्स रूम.

विषयः व्यक्तिमत्व विकास आणि मनःशांती (किंवा तत्सम काहीतरी).

वक्ता: एक नावाजलेला समुपदेशक. बाकी चर्चा झाल्यावर तो एक प्रश्न विचारतो, "काय केलं म्हणजे तुम्हाला आनंद होतो?"

आलेल्या उत्तरांपैकी बहुतेक उत्तरे मिस इंडिया, मिस युनिव्हर्स किंवा तत्सम स्पर्धांमध्ये त्या ललना देतात त्यासारखीच उत्तरे. काही खरी, काही खोटी. म्हणजे "मला गरीबांची सेवा केल्यावर आनंद मिळतो", "मला रुग्णसेवा करण्यात आनंद मिळतो", "मला कुठल्याही प्रकारची समाजसेवा केल्यावर आनंद होतो", वगैरे.
"मला दु:खी-पीडीतांची सेवा करण्यात आनंद मिळत नाही", एक कर्मचारी उत्तरतो.

झटक्यात सगळ्यांच्या नजरा 'हा आहे तरी कोण प्राणी' हे बघायला त्याच्याकडे वळतात.

"मला समाजसेवेत आनंद मिळत नाही", तो पुन्हा बोलतो.

"तुम्ही तुमचं म्हणणं अधिक स्पष्ट करून सांगाल का?" आता समुपदेशकाची उत्सुकताही चाळवली गेली असते.

"मला आनंद अनेक गोष्टीतून मिळतो. गाणी ऐकणे, वाचन करणे, वेगवेगळ्या प्रकारचे चांगले सिनेमे बघणे, विविध खेळ बघणे, माझ्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रपरिवाराबरोबर वेळ घालवणे, वगैरे.

मी समाजसेवा हे एक प्रकारची बांधीलकी किंवा कर्तव्य म्हणून करतो, कारण माझा आनंद हा 'इतरांना दु:ख असणे' यावर अवलंबून नसतो. My happiness does not depend on others being unhappy."

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

ही गोष्ट ऐकल्यावर मी विचारात पडलो. खरंच समाजकार्यात आनंद मिळतो असं सांगणारे फसवा आनंद तर मिळवत नाहीत?  हे नक्की कसलं लक्षण आहे? अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने आनंद शोधणे ही एक प्रकारची विकृती आहे का?  एकटेपणा घालवायला, काही कारणाने दु:खी झालेले मन रमवायला, वेळ आहे हाताशी म्हणून तो घालवायला (किंवा सत्कारणी लावायला) किंवा अशाच काही कारणांमुळे जेव्हा समाजसेवा केली जाते तेव्हा त्यात त्यात स्वार्थ गुंतल्याने हेतू शुद्ध राहत नाही, मग पुण्य मिळणं वगैरे तर दूरच. तुम्हाला काय वाटतं?

Tuesday, September 21, 2010

मी तुझा चंद्र झालो

टीपः ही कविता अक्षरशः अगदी 'ही' आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता
हळू हळू वर मागे सरकणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही
तेव्हाच....

Monday, September 20, 2010

सात्विक संतापाच्या चारोळ्या

गणपतीच्या मिरवणूकीला
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंता आहे

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....

आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...

Friday, September 3, 2010

किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू


मला आवडणार्‍या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं. तसंच त्यानं गायलेली इतर मराठी गाणी शोधायची होती. पण...आळस, आळस, आणि आळस!! या आळसाला लवकरच शॉक ट्रीटमेंट मिळाली....


* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

"अश्विनीssss येsss नाssss" आमच्या ऑफिसच्या बस मधला डेक दणाणला आणि माझे हातपाय बसल्याजागी थिरकू लागले. अनेक दिवस कॅबचालक आणि कंपनी व्यवस्थापनाच्या मागे लागल्यावर अखेर आमच्या बसमधे एकदाचं डेक विराजमान झालं आणि ऑफिस आणि घर यांमधला प्रवास काहीसा सुखकर वाटू लागला.


"अरे, हा किशोर कुमार गातोय की काय!?", मला जुनी हिंदी गाणी ह्या विषयातला जाणकार समजणार्‍या एका सहकर्मचार्‍याने हा प्रश्न विचारला. अशी वासरं असली की आपल्याला सहज लंगडी गाय होता येतं. फक्त खर्‍या जाणकारांसमोर तोंड बंद ठेवायचं म्हणजे आपण सुरक्षित राहतो हे मी अनुभवावरून शिकलोय. आजूबाजूला तसले कुणी घातकी मनुष्यप्राणी नसल्याची खात्री केली आणि एक प्रकारचा गूढ, ज्ञानी वगैरे छाप भाव चेहर्‍यावर आणत मी एका दमात उत्तरलो, "हं, बरोबर. ती गायिका आहे ना ती अनुराधा पौडवाल; संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल होते; १९८७ सालचा गंमत जंमत हा चित्रपट". अनेक वर्षांपूर्वी हा सिनेमा मी चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला असल्याने एवढं ज्ञान मी सहज फेकू शकत होतो.

"कित्ती मज्जा नै, किशोर कुमारने मराठीत पण गाणी म्हटली आहेत? हे एकच का रे?" गाडीच्या मागल्या शिटांच्या दिशेने एच.आर. मधली एका सुबकठेंगणी विचारती झाली. "बहुतेक" अस मोघम उत्तर देऊन गप गुमान बसावं की नाही! पण अप्रेझल जवळ येऊ घातलं होतं, आणि एरवी केलेल्या 'गुड मॉर्निंग'ला साधं उत्तर देण्याची तसदी न घेणारी ती ह्युमन रिसोर्स मधली वुमन मला एकाच वेळी किशोर कुमार आणि मराठी गाणी ह्या विषयातला महत्त्वाचा सोर्स समजू लागली होती. त्यामुळे अप्रेझल्स पर्यंत तरी त्या सुसरबाईची पाठ मऊच राहू द्यावी असा विचार करून अंगात पुरेसा उत्साह आणला आणि "म्हणजे काय, एकच नाही काही, चांगली तीन मराठी गाणी म्हटली आहेत" असं बोलून गेलो. "अय्या चक्क तीन? शप्पथ! कुठली रे?", ताडकन पुढचा प्रश्न आला. हे मात्र अनपेक्षित होतं. बोंबला! करायला गेलो गणपती आणि झाला मारुती!! कधी कधी आपण इंप्रेशन मारायला त्या भावनेच्या भरात बोलून जातो आणि मग ते निस्तरत बसावं लागतं. मस्तपैकी तोंडघशी पडण्याचा प्रसंग उदभवला आहे हे झटकन माझ्या लक्षात आलं. पण माझे ग्रह त्या दिवशी उच्चीचे असावेत. हा प्रश्न माझ्यावर आदळायला आणि महामार्गावर आमच्या गाडीसमोर एक दुचाकीस्वार तेलाच्या तवंगावरून घसरून अक्षरश: तोंडघशी पडायला एकच गाठ पडली आणि मला सगळ्यांच लक्ष तिकडे गेल्याचा फायदा मिळाला.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

पण अशी सुटका काही वारंवार होणार नव्हती. ती बया मला 'अ‍ॅट दी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी' गाठणार हे निश्चित होतं. तेव्हा तत्पूर्वी जरा आपल्या माहितीचं रूपांतर ज्ञानात केलेलं नक्कीच चांगलं असं वाटून जुन्या वर्तमानपत्रांची कात्रणं, पुस्तक वाचन, आणि अर्थातच माहितीसाठी आंतरजालावर फेरफटका अशा तर्‍हेने अस्मादिकांच संशोधन सुरु झालं. आंतरजालावर संगीताला वाहून घेतलेल्या अनेक फोरम्सना भेट देताना खूप मजा वाटली. त्यात एक अत्यंत आनंदाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कुमार सानू आणि हिमेशच्या अनुक्रमे सानूनासिक आणि भयाण स्वरांवर पोसलेल्या आजच्या तरुण पिढीलाही चांगलीच भुरळ घातली आहे. एवढंच नव्हे तर किशोर कुमारच्या एकट्याच्या नावाने निघालेल्या अनेक फोरम्सचे आणि कम्युनिटीजचे बहुतांश सदस्य तरुण तुर्क आहेत.

म्हणजेच किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

किशोर कुमारने हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण त्याची मराठी गाणी किती? हा प्रश्न विचारला तर अनेकांच उत्तर "एकच" असं येऊन "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याचा विषय निघेल. आता तुम्ही म्हणाल की किशोरचा विक्षिप्त स्वभाव आणि कंजूषपणाबद्दल बोलता बोलता गाडी त्याच्या मराठी गाण्यांवर कुठे बरं आली? ह्या दोन गोष्टींचा काय संबंध? थांबा. सांगतो.

किशोरने गायलेल्या एकूण तीन मराठी गाण्यांपैकी हे गाणं सर्वाधिक वेळा वाजवलं आणि दाखवलं गेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा ते टि.व्ही. वर दिसलं आहे तेव्हा तेव्हा पडद्यावरच्या अशोक सराफ आणि चारूशीला बरोबरच पडद्यामागे म्हणजेच रेकॉर्डिंग स्टुडीओमध्ये किशोरदा आणि अनुराधा पौडवाल हेही बागडताना दिसले आहेत. ह्यामुळे किशोरने मराठीत फक्त एकच गाणं गायलंय हे अज्ञान पसरायला फारसा वेळ लागला नाही. अर्थातच बाकीची गाणी आहेत तरी कोणती हे मात्र फारसं कुणी सांगू शकणार नाही हे ओघानं आलंच.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

"ए, शुक्रवारी त्या अ‍ॅक्सिडेंटच्या भानगडीत मी तुला परत विचारायचं विसरलेच", सोमवारी सकाळी कँटीनमध्ये चहा पीत असताना मला त्या बयेनं गाठलंच. "कोणती रे ती किशोरची बाकीची दोन गाणी?"

पण आता अस्मादिक पूर्ण तयारीत होते. पुन्हा त्याच दिवशीच्या उत्साहात मी जवाब देता झालो, "अगं सोप्पय, 'घोळात घोळ' ह्या सिनेमातलं 'हा गोरा गोरा मुखडा' आणि 'माझा पती करोडपती' मधलं 'तुझी माझी जोडी जमली गं' ही ती दोन गाणी". "अरे ही मी ऐकली आहेत, माझी आई लावते बर्‍याच वेळा घरी. पण ती किशोरकुमारनं म्हटली आहेत हे मला माहीतच नव्हतं. थँक्यू हं." असं म्हणून तरंगत निघून गेली.

"अरेच्या, गाणं मराठीत असलं तरी हिला किशोरचा आवाज कसा ओळखू आला नाही?" असा प्रश्न मला अजिबात पडला नाही. कारण मागे एकदा तिनं एक आंतरराष्ट्रीय कसोटी सामना चालू असताना "प्लीज वेलकम सुनील गावसकर इन्टू द कॉमेंट्री बॉक्स" हे वाक्य अर्धवट ऐकल्यावर "अय्या, गावसकर आला का बॅटींगला? अजून खेळतोय म्हणजे कम्मालच नै. काय स्टॅमिना असेल बै या वयात" अशी मुक्ताफळं भर कँटीनमध्ये उधळून अनेकांचा रक्तदाब एकदम लो केला होता. त्यामुळे हिला थोडं डोकं है थोडे की जरूरत है आणि ते परमेश्वराने लवकरात लवकर तिला द्यावं अशी मनोमन प्रार्थना करत मी सोमवारच्या कामाला भिडलो.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

किशोरने गायलेली तीन मराठी गाणी:
(१) अश्विनी ये ना | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट गंमत जंमत (1987) | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर





(२) हा गोरा गोरा मुखडा** | चित्रपट घोळात घोळ (1988) | संगीत दिग्दर्शक अनिल मोहिले | गीतकार सुधीर नांदोडे




(३) तुझी माझी जोडी जमली गं | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट माझा पती करोडपती (1988) | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर





**दुर्दैवाने हे गाणं युट्यूब वर उपलब्ध नाही.

Friday, August 27, 2010

माझी चिडचिड आणि यथा प्रजा तथा राजा

माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.

अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.

'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.

तर, ह्याच विषयाशी संबंधीत माझी ही अवांतर चिडचिड.....

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

चिडचिड क्रमांक एकः गुन्हेगार आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया

(१) संजय दत्त हा विविध आरोपांखाली मुंबई बाँबस्फोट खटल्यात अडकला आणि निकालात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वगैरे आरोपांखाली दोषी आढळला. त्यानंतर सामान्य जनतेने त्याच्यावर बहिष्कार घालायचं सोडून संजूबाबा संजुबाबा म्हणून डोक्यावर घेतलं, त्याचे अनेक चित्रपट लोकांनी उचलून धरले. सर्वसामांन्यांकडून देशद्रोह्याला हा असा पाठिंबा?

सायरा बानूला लगेच आपल्या धर्मभगिनीच्या मुलाचा पुळका आला आणि तिने "इस लडके को इतना पर्सिक्युट किया गया है...." असे एका वृत्तवाहिनीवर तारे तोडले. शिवाय तो सहा वर्षांसाठी तुरुंगात गेल्यास तो काम करत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच कसं कोट्यावधींच नुकसान होईल वगैरे बकवास हिंदी चित्रपट क्षेत्रातील तथाकथित विद्वानांनी सुरु केलीच. म्हणजे ह्यांनी गुन्हा केला त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल कायद्याप्रमाणे शिक्षा होणं महत्वाचं नाही, पण तुमच्या नसण्यानं किती आर्थिक नुकसान होईल आणि ते टाळता कसं येईल किंवा भरून कसं काढता येईल ते महत्वाचं! बाकी देश, कायदा, वगैरे सटरफटर गोष्टी नका हो सांगू यांना!!

(२) "हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्‍या महिलांच्या तोंडून हे असले उदगार? हरे राम!

(३) उपरोल्लेखित डॉन महाशयांची ठेवलेली बाई म्हणजेच रखेल म्हणजेच हिंदी चित्रपटातील दुय्यम नटी मोनिका बेदी हिचा एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये सहभाग आणि एका दिवंगत राजकीय नेत्याच्या मुलाने तिच्याबरोबर केलेली सलगी वजा लगट - अनेक लोकांनी हाही कार्यक्रम चवीने बघितला आणि ट्रेन आणि बस मध्ये, नाक्यावर वगैरे कोण कसं दिसलंय याच्या जोरदार चर्चा झडल्या. ह्या कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. मग मालिका निर्मात्यांनी जर "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद केल्यास त्यात चूक काय?

(४) पुढे ह्या आणि अशा अनेक प्रकारे शेण खाल्लेल्या तसंच मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे पहिल्या बायकोने घटस्फोट दिलेल्या या नेतापुत्राचं एका वाहिनीनं चक्क स्वयंवर मांडलं. त्याचा हा इतिहास ठाऊक असूनही देशभरातून मुलींची ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झुंबड उडाली. कार्यक्रम सुरु असतानाही ह्या दिवट्याचे वेडेचाळे सुरुच. कार्यक्रम त्या वाहिनीवर सुरु झाल्यावर चक्क गगनभेदी टी.आर.पी.

या स्वयंवरात 'निवडलेल्या' दुसर्‍या बायकोलाही मारहाण आणि शिवीगाळ झाल्यावर तर कहर झाला. खेळ, शेती, हवामान, भाववाढ, पाऊस, महागाई, जागतिक घडामोडी वगैरे सारख्या बातम्या तीन-चार दिवस चक्क दुय्यम ठरल्या. पुढे साहेबांनी बायकोबरोबर प्रभादेवीला सिद्धीविनायक दर्शन कसं घेतलं, आम्ही आता सुखाने संसार कसा करू वगैरे टँण टँण टँण पद्धतीने मुलाखती दिल्या. हेही सगळं लोकांनी उत्साहाने पाहिलं.

(५) हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानला एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याची शिकार केल्याबद्दल अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!!

काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं. नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शो यामधून झळकला आणि लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला.

या सगळ्यात मिडीया कसा पिसाटल्यासारखा करत होता त्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
तुरुंगात असताना सलमानने कुठली भाजी खाल्ली, त्याच्या नेहमीच्या आवडी-निवडी काय ह्याची चवीने अक्षरशः दिवसभर चर्चा सुरू होती. संजय दत्त तुरुंगात कसा सुतारकाम शिकला हेही समजलं. तो तुरुंगात किती शांत असतो वगैरे आवर्जून सांगितलं गेलं.

पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी ह्या घटिंगणांवर बहिष्कार घालायचं सोडून त्यांना एखाद्या महात्म्याप्रमाणे वागणूक द्यावी हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्‍यांना बहिष्काराच्या मार्गाने धडा शिकवायचा सोडून त्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची ह्याला काय म्हणावे?

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक दोनः लोका सांगे ब्रह्मज्ञान...

मला काही दिवसांपूर्वी आंतरजालावरून फिरत फिरत एक विपत्र आलं होतं, त्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या त्या गुन्ह्याप्रमाणे होणार्‍या दंडाची रक्कम किती याची यादी दिली होती. म्हणजे सिग्नल तोडल्यास किती दंड, नो एन्ट्री मध्ये शिरल्यास किती दंड, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास किती दंड, वगैरे. कारण अर्थाच की पोलीस वाट्टेल तो दंड आकारतात आणि पावती देत नाहीत. ते विपत्र कितीही उपयोगी असलं तरी मला अंमळ गंमतच वाटली. कारण तोपर्यंत आणि हा लेख लिहीपर्यंत वाहतूकीच्या नियमांचं पालन कसं करावं यासंदर्भात एकही विपत्र असं आंतरजालावर फिरताना आढळलं नाही किंवा मला कुणी पाठवलं नाही.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक तीनः स्वतःकडे तीन बोटं

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीमधला किस्सा ऐकण्याचा योग आला. कंपनी व्यवस्थापनाने 'ओपन फोरम' सभा आयोजित केली होती. त्यात काही कर्मचारी 'कँटीनमध्ये असणारा स्वच्छतेचा अभाव' या विषयी तावातावाने बोलत होते.

अ‍ॅडमिनच्या व्यवस्थापक साहेबांनी प्रश्न केला "नक्की कसली अस्वच्छता असते?"

जी उत्तरं आली त्यात प्रामुख्याने कँटीनमध्ये अर्धवट खाल्लेल्या बिस्किटांचे पुडे, शीतपेयांचे रिकामे कॅन, चॉकलेट वगैरेंचे इतस्ततः पडलेले कागद, सिगरेटची थोटके, इत्यादींचा समावेश होता. अर्थातच कँटीन प्रशासनाकडून हा कचरा कसा वेळेवर साफ केला जात नाही ही मु़ख्य तक्रार होतीच.

"ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो," व्यवस्थापक उत्तरले, "पण मला एक सांगा, हा कचरा कोण करतं?"

उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली. आता कुणीही उत्तर द्यायला पुढे येईना.

"मी सांगतो ना, तुम्हीच," व्यवस्थापकांनी बाँब टाकला.

"कॅंटीनमध्ये कोण खातं? तुम्ही." आता व्यवस्थापक साहेबांचा आवाज किंचित चढला होता.

"कॅंटीनमध्ये योग्य जागी कचर्‍याचे डबे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करण्याऐवजी टबलांवर, खुर्च्यांवर, आणि जमिनीवर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी कोण टाकतं किंवा तशाच ठेवतं? तुम्ही."

"सगळेच असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत ते इतरांना हे करण्यापासून परावृत्त का करत नाहीत? ऐकलं नाही तक्रार/सुचना करण्यासाठी पत्रपेटी ठेवलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष कोण करतं? तुम्ही."

पुढे काही सुधारणा झाली की नाही ते समजलं नाही, पण स्वच्छतेबद्दल कंपनी व्यवस्थापनाला जाहीर दोष देणार्‍यांची तोंड निदान तेव्हा तरी बंद झाली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

तर माझी चिडचिड होण्याची ही काही कारणं. समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणार्‍यांविषयी तुमचा काय अनुभव आहे?