Tuesday, September 21, 2010

मी तुझा चंद्र झालो

टीपः ही कविता अक्षरशः अगदी 'ही' आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मी तुझा चंद्र झालो....
केव्हा काय विचारतेस?
तोंड धुता धुता
हळू हळू वर मागे सरकणार्‍या कपाळरूपी किनारपट्टीकडे पाहून
कुठपर्यंत पाणी मारावं समजलं नाही
तेव्हाच....

Monday, September 20, 2010

सात्विक संतापाच्या चारोळ्या

गणपतीच्या मिरवणूकीला
रात्री दहाचा चाप आहे
आयपीएलच्या तमाशाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

गवयांच्या सवाईला चावला
समानतेचा साप आहे
रस्त्यावरच्या नमाजाला मात्र
सर्व काही माफ आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

कसाबला बिर्याणी अन्
अफझलला शांत झोप आहे
काश्मिरी पंडितांना मात्र
ट्रांझिट कँपचा शाप आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

अमरनाथाच्या भक्तांना
उघड्यावरच आसरा आहे
आपलीच जमीन मागताना
आपलाच आवाज कापरा आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

दादोजीं, रामदास खलनायक अन्
अफझलखान मात्र 'हाजी' आहे
ब्रिगेडवाल्या राज्यकर्त्यांची मात्र
मॅडमपुढे हांजी हांजी आहे

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

त्यांनी लुटली अब्रू, अहो लुटू द्यावी!
सहिष्णूतेचा गुंता आहे
आपल्याच लोकांचा झालेला
वैचारिक सुंता आहे

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

जाता जाता एक खवचट (काहीच्या काही) चारोळी....

आज कुंकू मागासलेले अन्
टाईट जीन्सला 'पोच' आहे
आईचा सल्ला स्वेच्छा अन्
सासरची प्रथा 'जाच' आहे...

Friday, September 3, 2010

किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू


मला आवडणार्‍या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं. तसंच त्यानं गायलेली इतर मराठी गाणी शोधायची होती. पण...आळस, आळस, आणि आळस!! या आळसाला लवकरच शॉक ट्रीटमेंट मिळाली....


* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

"अश्विनीssss येsss नाssss" आमच्या ऑफिसच्या बस मधला डेक दणाणला आणि माझे हातपाय बसल्याजागी थिरकू लागले. अनेक दिवस कॅबचालक आणि कंपनी व्यवस्थापनाच्या मागे लागल्यावर अखेर आमच्या बसमधे एकदाचं डेक विराजमान झालं आणि ऑफिस आणि घर यांमधला प्रवास काहीसा सुखकर वाटू लागला.


"अरे, हा किशोर कुमार गातोय की काय!?", मला जुनी हिंदी गाणी ह्या विषयातला जाणकार समजणार्‍या एका सहकर्मचार्‍याने हा प्रश्न विचारला. अशी वासरं असली की आपल्याला सहज लंगडी गाय होता येतं. फक्त खर्‍या जाणकारांसमोर तोंड बंद ठेवायचं म्हणजे आपण सुरक्षित राहतो हे मी अनुभवावरून शिकलोय. आजूबाजूला तसले कुणी घातकी मनुष्यप्राणी नसल्याची खात्री केली आणि एक प्रकारचा गूढ, ज्ञानी वगैरे छाप भाव चेहर्‍यावर आणत मी एका दमात उत्तरलो, "हं, बरोबर. ती गायिका आहे ना ती अनुराधा पौडवाल; संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल होते; १९८७ सालचा गंमत जंमत हा चित्रपट". अनेक वर्षांपूर्वी हा सिनेमा मी चित्रपटगृहात जाऊन पाहिलेला असल्याने एवढं ज्ञान मी सहज फेकू शकत होतो.

"कित्ती मज्जा नै, किशोर कुमारने मराठीत पण गाणी म्हटली आहेत? हे एकच का रे?" गाडीच्या मागल्या शिटांच्या दिशेने एच.आर. मधली एका सुबकठेंगणी विचारती झाली. "बहुतेक" अस मोघम उत्तर देऊन गप गुमान बसावं की नाही! पण अप्रेझल जवळ येऊ घातलं होतं, आणि एरवी केलेल्या 'गुड मॉर्निंग'ला साधं उत्तर देण्याची तसदी न घेणारी ती ह्युमन रिसोर्स मधली वुमन मला एकाच वेळी किशोर कुमार आणि मराठी गाणी ह्या विषयातला महत्त्वाचा सोर्स समजू लागली होती. त्यामुळे अप्रेझल्स पर्यंत तरी त्या सुसरबाईची पाठ मऊच राहू द्यावी असा विचार करून अंगात पुरेसा उत्साह आणला आणि "म्हणजे काय, एकच नाही काही, चांगली तीन मराठी गाणी म्हटली आहेत" असं बोलून गेलो. "अय्या चक्क तीन? शप्पथ! कुठली रे?", ताडकन पुढचा प्रश्न आला. हे मात्र अनपेक्षित होतं. बोंबला! करायला गेलो गणपती आणि झाला मारुती!! कधी कधी आपण इंप्रेशन मारायला त्या भावनेच्या भरात बोलून जातो आणि मग ते निस्तरत बसावं लागतं. मस्तपैकी तोंडघशी पडण्याचा प्रसंग उदभवला आहे हे झटकन माझ्या लक्षात आलं. पण माझे ग्रह त्या दिवशी उच्चीचे असावेत. हा प्रश्न माझ्यावर आदळायला आणि महामार्गावर आमच्या गाडीसमोर एक दुचाकीस्वार तेलाच्या तवंगावरून घसरून अक्षरश: तोंडघशी पडायला एकच गाठ पडली आणि मला सगळ्यांच लक्ष तिकडे गेल्याचा फायदा मिळाला.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

पण अशी सुटका काही वारंवार होणार नव्हती. ती बया मला 'अ‍ॅट दी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी' गाठणार हे निश्चित होतं. तेव्हा तत्पूर्वी जरा आपल्या माहितीचं रूपांतर ज्ञानात केलेलं नक्कीच चांगलं असं वाटून जुन्या वर्तमानपत्रांची कात्रणं, पुस्तक वाचन, आणि अर्थातच माहितीसाठी आंतरजालावर फेरफटका अशा तर्‍हेने अस्मादिकांच संशोधन सुरु झालं. आंतरजालावर संगीताला वाहून घेतलेल्या अनेक फोरम्सना भेट देताना खूप मजा वाटली. त्यात एक अत्यंत आनंदाची गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कुमार सानू आणि हिमेशच्या अनुक्रमे सानूनासिक आणि भयाण स्वरांवर पोसलेल्या आजच्या तरुण पिढीलाही चांगलीच भुरळ घातली आहे. एवढंच नव्हे तर किशोर कुमारच्या एकट्याच्या नावाने निघालेल्या अनेक फोरम्सचे आणि कम्युनिटीजचे बहुतांश सदस्य तरुण तुर्क आहेत.

म्हणजेच किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

किशोर कुमारने हिंदीसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण त्याची मराठी गाणी किती? हा प्रश्न विचारला तर अनेकांच उत्तर "एकच" असं येऊन "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याचा विषय निघेल. आता तुम्ही म्हणाल की किशोरचा विक्षिप्त स्वभाव आणि कंजूषपणाबद्दल बोलता बोलता गाडी त्याच्या मराठी गाण्यांवर कुठे बरं आली? ह्या दोन गोष्टींचा काय संबंध? थांबा. सांगतो.

किशोरने गायलेल्या एकूण तीन मराठी गाण्यांपैकी हे गाणं सर्वाधिक वेळा वाजवलं आणि दाखवलं गेलं आहे, आणि जेव्हा जेव्हा ते टि.व्ही. वर दिसलं आहे तेव्हा तेव्हा पडद्यावरच्या अशोक सराफ आणि चारूशीला बरोबरच पडद्यामागे म्हणजेच रेकॉर्डिंग स्टुडीओमध्ये किशोरदा आणि अनुराधा पौडवाल हेही बागडताना दिसले आहेत. ह्यामुळे किशोरने मराठीत फक्त एकच गाणं गायलंय हे अज्ञान पसरायला फारसा वेळ लागला नाही. अर्थातच बाकीची गाणी आहेत तरी कोणती हे मात्र फारसं कुणी सांगू शकणार नाही हे ओघानं आलंच.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

"ए, शुक्रवारी त्या अ‍ॅक्सिडेंटच्या भानगडीत मी तुला परत विचारायचं विसरलेच", सोमवारी सकाळी कँटीनमध्ये चहा पीत असताना मला त्या बयेनं गाठलंच. "कोणती रे ती किशोरची बाकीची दोन गाणी?"

पण आता अस्मादिक पूर्ण तयारीत होते. पुन्हा त्याच दिवशीच्या उत्साहात मी जवाब देता झालो, "अगं सोप्पय, 'घोळात घोळ' ह्या सिनेमातलं 'हा गोरा गोरा मुखडा' आणि 'माझा पती करोडपती' मधलं 'तुझी माझी जोडी जमली गं' ही ती दोन गाणी". "अरे ही मी ऐकली आहेत, माझी आई लावते बर्‍याच वेळा घरी. पण ती किशोरकुमारनं म्हटली आहेत हे मला माहीतच नव्हतं. थँक्यू हं." असं म्हणून तरंगत निघून गेली.

"अरेच्या, गाणं मराठीत असलं तरी हिला किशोरचा आवाज कसा ओळखू आला नाही?" असा प्रश्न मला अजिबात पडला नाही. कारण मागे एकदा तिनं एक आंतरराष्ट्रीय कसोटी सामना चालू असताना "प्लीज वेलकम सुनील गावसकर इन्टू द कॉमेंट्री बॉक्स" हे वाक्य अर्धवट ऐकल्यावर "अय्या, गावसकर आला का बॅटींगला? अजून खेळतोय म्हणजे कम्मालच नै. काय स्टॅमिना असेल बै या वयात" अशी मुक्ताफळं भर कँटीनमध्ये उधळून अनेकांचा रक्तदाब एकदम लो केला होता. त्यामुळे हिला थोडं डोकं है थोडे की जरूरत है आणि ते परमेश्वराने लवकरात लवकर तिला द्यावं अशी मनोमन प्रार्थना करत मी सोमवारच्या कामाला भिडलो.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

किशोरने गायलेली तीन मराठी गाणी:
(१) अश्विनी ये ना | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट गंमत जंमत (1987) | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर





(२) हा गोरा गोरा मुखडा** | चित्रपट घोळात घोळ (1988) | संगीत दिग्दर्शक अनिल मोहिले | गीतकार सुधीर नांदोडे




(३) तुझी माझी जोडी जमली गं | सहगायिका अनुराधा पौडवाल | चित्रपट माझा पती करोडपती (1988) | संगीत दिग्दर्शक अरुण पौडवाल | गीतकार शांताराम नांदगावकर





**दुर्दैवाने हे गाणं युट्यूब वर उपलब्ध नाही.

Friday, August 27, 2010

माझी चिडचिड आणि यथा प्रजा तथा राजा

माझी अनेक गोष्टींमुळे चिडचिड होते. त्यातली एक मुख्य म्हणजे लोकं जेव्हा स्वतः मध्ये अगदी सहजसाध्य असलेली सुधारणा घडवून आणल्यास परिस्थिती सुधारण्याची शक्यता असताना अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी, सरकार, व्यवस्थापन, पोलीस – ही यादी न संपणारी आहे – यांना दोष देत बसतात.

अर्थात उपरोल्लेखित घटकांचा काहीच दोष नसतो असं नाही, पण एक बोट त्यांच्याकडे असताना स्वतःकडे असलेली तीन बोटं मात्र दुर्लक्षिली जातात.

'यथा राजा तथा प्रजा' अशी म्हण आहे. पण ती बदलून 'यथा प्रजा तथा राजा' अशी करायला हवी असं हल्ली प्रकर्षानं वाटू लागलंय. आपल्या समाजाचं नैतिक अध:पतन इतकं झालंय की आपल्याला हे असले राज्यकर्ते मिळाले कारण आपलंच नाणं खोटं होतं म्हणून हे पटू लागतं.

तर, ह्याच विषयाशी संबंधीत माझी ही अवांतर चिडचिड.....

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

चिडचिड क्रमांक एकः गुन्हेगार आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया

(१) संजय दत्त हा विविध आरोपांखाली मुंबई बाँबस्फोट खटल्यात अडकला आणि निकालात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे वगैरे आरोपांखाली दोषी आढळला. त्यानंतर सामान्य जनतेने त्याच्यावर बहिष्कार घालायचं सोडून संजूबाबा संजुबाबा म्हणून डोक्यावर घेतलं, त्याचे अनेक चित्रपट लोकांनी उचलून धरले. सर्वसामांन्यांकडून देशद्रोह्याला हा असा पाठिंबा?

सायरा बानूला लगेच आपल्या धर्मभगिनीच्या मुलाचा पुळका आला आणि तिने "इस लडके को इतना पर्सिक्युट किया गया है...." असे एका वृत्तवाहिनीवर तारे तोडले. शिवाय तो सहा वर्षांसाठी तुरुंगात गेल्यास तो काम करत असलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांच कसं कोट्यावधींच नुकसान होईल वगैरे बकवास हिंदी चित्रपट क्षेत्रातील तथाकथित विद्वानांनी सुरु केलीच. म्हणजे ह्यांनी गुन्हा केला त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही, तुम्हाला त्या गुन्ह्याबद्दल कायद्याप्रमाणे शिक्षा होणं महत्वाचं नाही, पण तुमच्या नसण्यानं किती आर्थिक नुकसान होईल आणि ते टाळता कसं येईल किंवा भरून कसं काढता येईल ते महत्वाचं! बाकी देश, कायदा, वगैरे सटरफटर गोष्टी नका हो सांगू यांना!!

(२) "हाऊ क्युट ना, ही ही ही ही": कु़ख्यात डॉन अबू सालेम ह्याला अटक केल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी इस्पितळात आणलं असता त्याला 'बघायला' जमलेल्या तिथल्या काही निवासी महिला डॉक्टरांचे हे उदगार. तो क्युट आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे, पण एका अंडरवर्ल्ड डॉनला – एका गुन्हेगाराला, खून्याला बघायला एवढी गर्दी? ते ही ठीक आहे, पण चांगल्या घरातल्या (हे गृहीत धरलं आहे) उच्चशिक्षित होऊ पाहणार्‍या महिलांच्या तोंडून हे असले उदगार? हरे राम!

(३) उपरोल्लेखित डॉन महाशयांची ठेवलेली बाई म्हणजेच रखेल म्हणजेच हिंदी चित्रपटातील दुय्यम नटी मोनिका बेदी हिचा एका रिअ‍ॅलिटी शो मध्ये सहभाग आणि एका दिवंगत राजकीय नेत्याच्या मुलाने तिच्याबरोबर केलेली सलगी वजा लगट - अनेक लोकांनी हाही कार्यक्रम चवीने बघितला आणि ट्रेन आणि बस मध्ये, नाक्यावर वगैरे कोण कसं दिसलंय याच्या जोरदार चर्चा झडल्या. ह्या कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाला. मग मालिका निर्मात्यांनी जर "लोकांना पाहिजे ते आम्ही देतो" असा युक्तीवाद केल्यास त्यात चूक काय?

(४) पुढे ह्या आणि अशा अनेक प्रकारे शेण खाल्लेल्या तसंच मारहाण आणि शिवीगाळ केल्यामुळे पहिल्या बायकोने घटस्फोट दिलेल्या या नेतापुत्राचं एका वाहिनीनं चक्क स्वयंवर मांडलं. त्याचा हा इतिहास ठाऊक असूनही देशभरातून मुलींची ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी झुंबड उडाली. कार्यक्रम सुरु असतानाही ह्या दिवट्याचे वेडेचाळे सुरुच. कार्यक्रम त्या वाहिनीवर सुरु झाल्यावर चक्क गगनभेदी टी.आर.पी.

या स्वयंवरात 'निवडलेल्या' दुसर्‍या बायकोलाही मारहाण आणि शिवीगाळ झाल्यावर तर कहर झाला. खेळ, शेती, हवामान, भाववाढ, पाऊस, महागाई, जागतिक घडामोडी वगैरे सारख्या बातम्या तीन-चार दिवस चक्क दुय्यम ठरल्या. पुढे साहेबांनी बायकोबरोबर प्रभादेवीला सिद्धीविनायक दर्शन कसं घेतलं, आम्ही आता सुखाने संसार कसा करू वगैरे टँण टँण टँण पद्धतीने मुलाखती दिल्या. हेही सगळं लोकांनी उत्साहाने पाहिलं.

(५) हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खानला एका दुर्मिळ जातीच्या प्राण्याची शिकार केल्याबद्दल अटक झाली. जामीनावर सुटका झाल्यावर त्याच्या बंगल्याच्या गच्चीत त्याने त्याच्या नेहमीच्या उघड्या अवतारात अत्यंत उर्मट भाषेत आपल्या 'चाहत्यां' समोर एक निर्ल्लज्ज भाषण ठोकलं. त्याचा प्रत्येक शब्द साधारण शंभराच्या आसपास जमलेले ते चाहते उचलून धरत होते. अक्षरशः जल्लोष सुरु होता. त्याने काही वावगं केलंय हेच उपस्थितांपैकी कुणाला वाटत नव्हतं!! मग त्याचा निषेध करणं, बहिष्कार टाकणं सोडाच!!!

काही काळाने त्यानं मद्यधुंद अवस्थेत रस्त्याच्याकडेला झोपलेल्या काही लोकांना चिरडलं. नंतर सलमान अनेक चित्रपट आणि रिअ‍ॅलिटी शो यामधून झळकला आणि लोकांनी त्याला प्रचंड पाठिंबा दिला.

या सगळ्यात मिडीया कसा पिसाटल्यासारखा करत होता त्याचा उल्लेख करायचा मोह आवरत नाही.
तुरुंगात असताना सलमानने कुठली भाजी खाल्ली, त्याच्या नेहमीच्या आवडी-निवडी काय ह्याची चवीने अक्षरशः दिवसभर चर्चा सुरू होती. संजय दत्त तुरुंगात कसा सुतारकाम शिकला हेही समजलं. तो तुरुंगात किती शांत असतो वगैरे आवर्जून सांगितलं गेलं.

पिसाटलेला मिडीया हा एक मोठा विषय आहे, पण सर्वसामान्य लोकांनी ह्या घटिंगणांवर बहिष्कार घालायचं सोडून त्यांना एखाद्या महात्म्याप्रमाणे वागणूक द्यावी हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल. एकीकडे सरकार कायदा आणि सुरक्षितता राखण्यात कसं अपयशी ठरतं आहे ह्याच्या चर्चा करायच्या आणि दुसरीकडे कायदा मोडणार्‍यांना बहिष्काराच्या मार्गाने धडा शिकवायचा सोडून त्यांना आपल्याच पैशाने अधिकाधिक लोकप्रिय आणि धनवान व्हायला मदत करायची ह्याला काय म्हणावे?

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक दोनः लोका सांगे ब्रह्मज्ञान...

मला काही दिवसांपूर्वी आंतरजालावरून फिरत फिरत एक विपत्र आलं होतं, त्यात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्या त्या गुन्ह्याप्रमाणे होणार्‍या दंडाची रक्कम किती याची यादी दिली होती. म्हणजे सिग्नल तोडल्यास किती दंड, नो एन्ट्री मध्ये शिरल्यास किती दंड, गाडी चालवताना भ्रमणध्वनीवर बोलताना आढळल्यास किती दंड, वगैरे. कारण अर्थाच की पोलीस वाट्टेल तो दंड आकारतात आणि पावती देत नाहीत. ते विपत्र कितीही उपयोगी असलं तरी मला अंमळ गंमतच वाटली. कारण तोपर्यंत आणि हा लेख लिहीपर्यंत वाहतूकीच्या नियमांचं पालन कसं करावं यासंदर्भात एकही विपत्र असं आंतरजालावर फिरताना आढळलं नाही किंवा मला कुणी पाठवलं नाही.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

चिडचिड क्रमांक तीनः स्वतःकडे तीन बोटं

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीमधला किस्सा ऐकण्याचा योग आला. कंपनी व्यवस्थापनाने 'ओपन फोरम' सभा आयोजित केली होती. त्यात काही कर्मचारी 'कँटीनमध्ये असणारा स्वच्छतेचा अभाव' या विषयी तावातावाने बोलत होते.

अ‍ॅडमिनच्या व्यवस्थापक साहेबांनी प्रश्न केला "नक्की कसली अस्वच्छता असते?"

जी उत्तरं आली त्यात प्रामुख्याने कँटीनमध्ये अर्धवट खाल्लेल्या बिस्किटांचे पुडे, शीतपेयांचे रिकामे कॅन, चॉकलेट वगैरेंचे इतस्ततः पडलेले कागद, सिगरेटची थोटके, इत्यादींचा समावेश होता. अर्थातच कँटीन प्रशासनाकडून हा कचरा कसा वेळेवर साफ केला जात नाही ही मु़ख्य तक्रार होतीच.

"ठीक आहे, मी संबंधितांना सूचना देतो," व्यवस्थापक उत्तरले, "पण मला एक सांगा, हा कचरा कोण करतं?"

उपस्थितांमध्ये कुजबूज सुरु झाली. आता कुणीही उत्तर द्यायला पुढे येईना.

"मी सांगतो ना, तुम्हीच," व्यवस्थापकांनी बाँब टाकला.

"कॅंटीनमध्ये कोण खातं? तुम्ही." आता व्यवस्थापक साहेबांचा आवाज किंचित चढला होता.

"कॅंटीनमध्ये योग्य जागी कचर्‍याचे डबे ठेवलेले आहेत. त्यांचा उपयोग करण्याऐवजी टबलांवर, खुर्च्यांवर, आणि जमिनीवर तुम्ही उल्लेख केलेल्या गोष्टी कोण टाकतं किंवा तशाच ठेवतं? तुम्ही."

"सगळेच असं करतात असं नाही, पण जे करत नाहीत ते इतरांना हे करण्यापासून परावृत्त का करत नाहीत? ऐकलं नाही तक्रार/सुचना करण्यासाठी पत्रपेटी ठेवलेली आहे. त्याकडे दुर्लक्ष कोण करतं? तुम्ही."

पुढे काही सुधारणा झाली की नाही ते समजलं नाही, पण स्वच्छतेबद्दल कंपनी व्यवस्थापनाला जाहीर दोष देणार्‍यांची तोंड निदान तेव्हा तरी बंद झाली.

* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

तर माझी चिडचिड होण्याची ही काही कारणं. समाजातील खलप्रवृत्ती व लोकांच्या विसंगत प्रतिक्रिया आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याऐवजी व्यवस्थेला कायम दोष देणार्‍यांविषयी तुमचा काय अनुभव आहे?

Monday, August 9, 2010

पापभीरू

एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर एका कोपर्‍यातल्या चौकटीत हीच मंडळी अत्यंत मख्ख चेहर्‍याने गोल गोल उत्तरे देऊन वेळ मारून नेत होती आणि देशातील कुठल्याही बाजारात जास्तीतजास्त तीनशे ते पाचशे रुपयांना उपलब्ध असणारी छत्री शंभरपट किंमतीला विकत घेऊनही आंतरराष्ट्रीय बाजारात तीच किंमत कशी वाजवी आहे असं केविलवाणं समर्थन देत चीड आणत होती. त्यात ते राजकारणी सदगृहस्थ "अहो तुम्ही आत्ता काही बोलू नका हो, माझ्यावर ह्या खेळांच्या आयोजनाची किती मोठी जबाबदारी आहे तुम्हाला कल्पना नाही, गेम्स होऊन जाउदेत मग चौकशी झाली आणि मी दोषी आढळलो तर राजीनामा देण्याचा विचार करू," असे तारे तोडत होते. हवापाणी आणि काही खेळांचे निकाल किंवा सामन्यांची स्थिती याव्यतिरिक्त मी बातम्यांच्या नादाला याच कारणाने लागत नाही, तेव्हा झक् मारली आणि बातम्या लावल्या असं मला झालं.

उद्विग्न होऊन आधी "काय हलकट लोक आहेत," आणि मग "सगळे राजकारणी असेच," आणि शेवटी "हे असंच चालायचं" असे हताश उद्गार काढून टि.व्ही. बंद केला. डोकं अक्षरशः सुन्न झालं होतं, तेवढ्यात आईची हाक ऐकू आली, "अरे मंदार, दादरला नऊ वाजता गाडी लागते, साडेआठ इथेच झालेत, हे खाली गाडीत जाऊन बसले सुद्धा, चल पळ लवकर." तंद्रीतून जागा होऊन मी लगबगीने खाली पळालो. माझा धाकटा भाऊ झारखंड मधल्या जमशेदपूर येथील त्याचं प्रशि़क्षण संपवून परतत होता त्याला, त्याच्याबरोबर भरपूर सामान असल्याने, आणायला जायचं होतं. दादरला पोहोचेपर्यंत जुजबी गप्पांमध्ये वेळ गेला. दादरला पोहोचलो तेव्हा सव्वानऊ झाले होते पण भावाने फोन करून गाडीने नुकतंच कल्याण सोडल्याचं सांगितलं. रेल्वे स्थानकाजवळच्या एका गल्लीत आम्ही गाडी लावली. "तू प्लॅट्फॉर्म तिकीट घेऊन तिथे जाऊन उभा रहा आणि गाडी आली की फोन कर मग मी गाडी घेऊन प्रवेशद्वारापाशी येतो," बाबा म्हणाले.

मी प्लॅट्फॉर्म तिकीट काढलं आणि माझा भाऊ ज्या डब्यात बसला होता तो डबा 'इंजिन पासून चौथा' असल्याने ती जागा शोधून तिथे जाऊन उभा राहिलो. मी अनेक महिन्यांनी मुंबईत येत होतो, तेव्हा गाडी येईपर्यंत बाकी काही करण्यासारखं नसल्याने रेल्वेगाड्यांचे बदललेले डबे आणि बरचसं न बदललेलं दादर स्थानक यांचं निरिक्षण करू लागलो. पण का कोण जाणे मनात पुन्हा ते भ्रष्टाचारी राजकारणी आणि त्यांची निलाजरी वृत्ती यांचे विचार येऊ लागले. एक लोकल गाडी त्याच फलाटाला लागली. शनिवार रात्र असल्याने फारशी गर्दी नव्हती त्यामुळे मी जिथे उभा होतो तिथे लोकल मधला महिलांसाठीचा डबा येत होता ही गोष्ट आत्तापर्यंत लक्षात आली नव्हती. ते समजल्यावर मी थोडा बाजूला होणार तेवढ्यात मागून एका मुलीची हाक आली "मंदारदादा, हाय." मी विद्यार्थीदशेत, नक्की सांगायचं तर शाळेत असताना माझ्याबरोबर सतीश आणि सुनेत्रा साठे हे भाऊ-बहीण बसने प्रवास करत त्यातली सुनेत्रा मला हाक मारत होती. मला तोंडातून एक चकार शब्द काढू न देता "मंदारदादा, तू मुंबईत कसा? तू पुण्यात असतोस ना? किती दिवस आहेस इथे? अरे थोडी घाईत आहे, तू असलास मुंबईत तर बोलू नंतर किंवा मग असं कर...ऑनलाईन शोध मला, फेसबूक आणि ऑर्कुट दोन्ही वर आहोत मी आणि सतीशदादा. मला शोध आणि माझ्या लिस्ट मधून शोधून सतीशदादाला पण अ‍ॅड कर." हे सगळं एका दमात बोलून पटकन त्या सुटणार्‍या गाडीत धावत धावत चढली आणि मला टाटा करत दिसेनाशी झाली.

कॉमन मॅनचे कोट्यावधीचे 'वेल्थ' लुटणार्‍यांच्या बातम्या बघून मनाला आलेल्या उदासीनतेमध्ये सुनेत्राच्या झालेल्या ओझरत्या भेटीने आणखी भर घातली. नाही, ही काही माझ्या एका – ज्याला इंग्रजीत 'ब्लास्ट फ्रॉम द पास्ट' का काय म्हणतात – त्याची गोष्ट नाही. माझ्या ह्या मनस्थितीचं कारण वेगळंच होतं. सुनेत्राला पाहून अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या आठवणी मनात पिंगा घालू लागल्या.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

एके दिवशी दुपारी फोन वाजला. आईच्या एका मैत्रीणीचा असल्याने मी आईला बोलावलं. मैत्रीणीने कदाचित दु:खद बातमी दिली असावी कारण "काSSSSय? कधी? कसं? हो मग...बाप रे," असं बोलून आईने फोन ठेवला.

"काय झालं आई?" मी अधीर होऊन विचारलं.

आईच्या तोंडातून शब्द फुटेना. शेवटी कसा बसा धीर एकटवून आई म्हणाली "साठे गेले".

"साठे म्हणजे..."

"हो, सतीश-सुनेत्राचे बाबा. सकाळीच हृदयविकाराचा झटका आला आणि गेले. त्यांना इस्पितळातून परस्पर स्मशानभूमीत नेणारेत, तेव्हा आपण आत्ता न जाणंच योग्य. आपण एक-दोन दिवसांनी जाऊ भेटायला साठे वहिनींना."

साठेकाका आणि काकू कधीतरी आमच्या बरोबर बस मध्ये असत, त्यामुळे त्यांचाही चांगलाच परिचय झाला होता. शाळेत जाणारी मुलं हा आमच्या आयांना जोडणारा दुवा असल्याने त्या दोघींचा परिचय विशेष वाढला होता.

पण माझं त्यांच्याकडे जाणं झालंच नाही. आई-बाबांनीही आग्रह केला नाही, पण ते दोघे एके दिवशी जाऊन साठे कुटुंबीयांची भेट घेऊन आले. ते आले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव काहीतरी वेगळंच घडल्याचे संकेत देत होते. आधी आई-बाबा दोघेही मला काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते, पण फारच खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं त्याने प्रचंड धक्का बसला. साठेकाकांना आलेला हृदयविकाराचा झटका हे लोकांना सांगायचं कारण होतं. त्यांनी आत्महत्या केली होती. माझा पुढचा "पण का" हा प्रश्न अपेक्षित असल्याने आईने पुढचं सांगायला सुरुवात केली.

साठेकाका एका विमान कंपनी मध्ये नोकरीला होते. जोडधंदा म्हणून पोस्टाची गुंतवणूक एजन्सी घेऊन कमीशन बेसिसवर व्यवसाय करीत. लोकांकडून पैसे घ्यायचे आणि पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवायचे आणि मॅचुअर झालेल्या योजनांमधले पैसे पुन्हा परत आणून द्यायचे वगैरे. एके दिवशी अशाच एका मॅचुअर झालेल्या योजनेचे दहा हजार त्यानी त्यांच्या कार्यालयातल्या एका बाईंना आणून दिले. इतकी मोठी रक्कम बाईंनी आपल्याबरोबर पर्समध्ये ठेवायच्या ऐवजी त्यांच्या मेजाचा एक भाग असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवली. संध्याकाळी घरी जाताना पैसे घ्यायला ड्रॉवर उघडल्यावर लक्षात आलं की पैसे त्यात नाहीत.

त्या बाईने आख्खं कार्यालय डोक्यावर घेतलं. जवळजवळ प्रत्येकावर संशय घेऊन झाला. "अहो असा त्रागा करण्यापेक्षा आपण सगळ्यांची झडती घेऊ," व्यवस्थापक साहेबांनी सुचवून पाहिलं. अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण बाई काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी सगळ्यांचे सल्ले धुडकावून लावत सरळ पोलीस चौकी गाठली. साडेपाच वाजले होते. प्रकरण पोलीसांपर्यंत पोहोचल्याने आता कार्यालयात मिटवता येणे शक्य नव्हते. सगळे थांबले तर उलट-सुलट चर्चा करून आपलं डोकं उठवतील आणि त्या बाईही तिथेच असल्या तर परिस्थिती स्फोटक होऊन अनवस्था प्रसंग ओढवेल म्हणून साहेबांनी सगळ्यांना घरी जायला सांगितलं आणि स्वत: एकटेच कार्यालयात थांबून राहिले. काही वेळाने पोलीस तिथे पोहोचले आणि सुमारे तासभर साहेबांचं डोकं खाल्लं. पोलीसांच्या वैतागाचं कारण साहेबांनी कुणालाही थांबवून ठेवलं नव्हतं हे होतं. त्यांचे 'कष्ट' वाढणार होते ना पुन्हा दुसर्‍या दिवशी येण्याचे! "उद्या सकाळी येतो, प्रत्येकाची चौकशी करू, कोणीही गैरहजर राहता कामा नये" असा दम देऊन ते निघून गेले.

आदल्या दिवशी निव्वळ त्रागा केल्याने बाईंच्या अंगात जबाब वगैरे देण्याची ताकद उरली नव्हती. त्यामुळे पोलीस सकाळी आले तेव्हा त्यांनी आधी बाईंचा जबाब घेतला. "तुमच्याकडे पैसे होते ही गोष्ट कुणाकुणाला माहित होती?" या प्रश्नावर त्यांनी काही सहकार्‍यांची नावे घेतली. अर्थातच साठ्यांनीच त्यांना पैसे आणून दिल्यामुळे त्यांचं नाव त्या जबाबात होतंच. त्यादिवशी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असणार्‍या साठ्यांना ही गोष्ट कुणीतरी दूरध्वनी करून सांगितली. साठे दुसर्‍या दिवशी कामावर आलेच नाहीत.

आली ती त्यांच्या 'हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेल्या आकस्मिक मृत्यू' ची बातमी. अर्थात हे कारण लोकांना सांगितलं गेलं. पण खरी गोष्ट अशी होती की "आपल्या घरी पोलीस येणार, आपली पोलीस चौकशी होणार, आणि त्यामुळे आपली नाचक्की होणार," या विचारांनी साठ्यांना इतकं अस्वस्थ केलं की पहाटे पाणी प्यायच्या निमित्ताने उठून त्यांनी एक सगळीच्या सगळी कीटकनाशकाची बाटली पिऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली. साठे काकूंच्या विनंती वरून डॉक्टरांनी मृत्यूचे कारण आत्महत्या असं न नोंदवता 'हृदयविकाराचा तीव्र झटका' असं नोंदवलं त्यामुळे साठे कुटुंबियांची पुढची परवड थांबली. केवळ दहा हजार रुपयांनी एका कुटुंबाचा कर्ता पुरुष हिरावून घेतला होता.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

"...एस-सी फोर इंजिनपासून चौथा, एस-सी फाईव्ह इंजिनपासून पाचवा..." माझ्या बरोब्बर डोक्यावर असलेल्या लाऊडस्पीकर मधून ही उद्घोषणा झाली आणि मी दचकून भानावर आलो. भाऊ डब्याच्या दारातच उभा होता. त्याचं सामान घेतलं आणि बाबांना फोन केला. गाडीत सामान ठेवलं आणि घरी आलो. रूमवर टि.व्ही. नसल्याने 'दूरदर्शना'साठी हपापलेल्या भावाने टि.व्ही. लावला. पुन्हा तेच पुराण सुरु झालं. एव्हाना प्रत्येक वृत्तवाहिनीचे स्वयंघोषित शोधपत्रकार बेंबीच्या देठापासून बोंबलत तीच बातमी आणि तेच निर्लज्ज चेहरे दाखवत होते.

"किती तो निलाजरेपणा!" मी बाबांना म्हणालो.

"यालाच कलीयुग म्हणतात रे" ते म्हणाले.

"तुम्हाला साठेकाका आठवतात का हो? कुठे नुसत्या पोलीस चौकशीने होणारी नामुष्की टाळायला आत्महत्येचा मार्ग पत्करणारे ते आणि कुठे कोट्यावधीचा गैरव्यवहार सिद्ध करणारे ढळढळीत पुरावे असतानाही काहीच घडलं नसल्याच्या थाटात मुलाखती देत सुटणारे हे घटिंगण" मी त्यांना म्हणालो.

माझ्याकडे एक खिन्न कटाक्ष टाकून ते म्हणाले "हे असंच चालायचं." त्यांनी वैतागून भावाकडून रिमोट हातात घेतला आणि चॅनल बदलून शेअर बाजाराच्या बातम्या बघू लागले, आणि मी संगणक चालू करून सतीश आणि सुनेत्राला फेसबूक आणि ऑर्कुटवर शोधू लागलो.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

यातली साठे यांची गोष्ट सत्यकथेवर आधारित असली तरी त्यातल्या व्यक्तींची नावे अर्थातच बदलण्यात आली आहेत.

अवांतर: सुदैवाने साठे काकूंना श्री. साठे यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली आणि आज सतीश आणि सुनेत्रा दोघेही आपआपल्या नोकरीत आणि संसारातही प्रगती करत स्थिरावले आहेत.

Wednesday, June 30, 2010

कोकण यात्रा - २: शांत, नयनरम्य कोळिसरे

लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे म्हणजे निसर्गाने आपले वैभव मुक्तहस्ताने जिथे उधळले आहे असे एक नयनरम्य गाव. रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर तर रत्नागिरी-जयगड रस्त्यापासून साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर असणार्‍या या गावाची लोकसंख्या आहे फक्त ८००. मुंबई किंवा पुणे मार्गे जायचे असल्यास पुणे-बंगळुरू हायवेवर उंब्रज फाट्याला उजवीकडे वळून चिपळूण मार्गे जावे लागते. रत्नागिरी-जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर कोळिसरे फाटा आहे. ह्या ठिकाणाहून कोळिसरे गाव २ किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी-रीळ ही एस. टी. सोयीची आहे. तथापि, आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वत:चे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल.

निसर्गसौंदर्य
हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा आणि उन्हाळ्यातही तूलनात्मक दृष्ट्या कमी तापमान यामुळे इथे पर्यटकांची एप्रिल-मे महिन्यातही ये-जा असते. अगदी जंगलासारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ठ्य. गावात इतकी मुबलक वृक्षराजी आहे की एखाद्या निबीड अरण्यात गाव वसले आहे की काय असा संभ्रम पडतो.

मुख्य रस्त्यापासून मंदिर परिसराकडे येण्याचा मार्ग







श्री तेरेदेसाई यांच्या घराबाहेरून दिसणारा मंदिर परिसर







ऐतिहासिक संदर्भ
कुठल्याही ठिकाणचे पर्यटन, विशेषकरून कोकणातील, हे त्या त्या ठिकाणची देवस्थाने पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे अनेक कुटुंबाचे कुलदैवत असलेले कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर हे ह्या ठिकाणचे आकर्षणस्थान. श्री लक्ष्मी-केशवाची मूर्ती असलेले हे देऊळ इथे कसे बांधले गेले याची एक मोठी रोचक कथा आहे.

सद्ध्या जो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मालखेडचे राष्ट्रकूट घराणे (इसवी सन ७५० ते ९७३) साधारण बाराशे वर्षांपूर्वी सगळ्या मराठी मुलुखाचे म्हणजेच महाराष्ट्राचे राजे बनले. हे राजे विष्णूचे परमभक्त होते. या घराण्यातील सदस्यांनी त्या भागात अनेक ठिकाणी श्रीविष्णूच्या मोहक मूर्तींची स्थापना करून सुंदर, सुबक मंदिरे बांधली. अनेक वर्षांनंतर यादव घराण्याच्या अंमलाखाली हा भाग आला. त्याच सुमारास परकीय मुसलमान आक्रमक असलेल्या जुलमी आणि मूर्तीभंजक मुघल राज्यकर्त्यांचा साम्राज्यविस्तार जोमाने सुरु झाला. त्या विस्ताराचा एक भाग म्हणून एतद्देशीय जनतेवर अत्याचार सुरू झाले आणि अर्थातच उत्साही 'बुत्शिकन' (मूर्तीभंजक) लोकांनी त्यांचे 'कार्य' जोमाने सुरु केले. या सुलतानी संकटापासून विविध देवदेवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी त्याकाळात ज्या अशा अनेक मूर्ती सुरक्षित/गुप्त ठिकाणी हलवल्या गेल्या, त्यातलीच ही श्री लक्ष्मीकेशवाची मूर्ती. ती कोल्हापूर येथे हलवण्यात येऊन तेथील रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. ही मूर्ती मूळ कुठल्या ठिकाणी होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारली. तेव्हा एके दिवशी वर्‍हवडे गावातील तीन पुरुष श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे यांना ही मूर्ती कुठे ठेवली आहे ह्याचा दृष्टांत झाला. त्यानुसार ही मंडळी कोल्हापुरास गेली व ही मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आली. ह्या मूर्तीची स्थापना कोकणातील रीळ गावी करावयाची असं त्यांनी ठरवलं. ही मूर्ती वर्‍हवडे खाडीतून व देवरूख-संगमेश्वर मार्गे एका लाकडी पेटीतून परत आणत असताना त्यांनी विश्रांतीसाठी कोळिसरे गावात रात्रीचा मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीतली मूर्ती इतकी जड झाली होती की त्यांच्या बरोबर असलेल्या मजूरांना ती उचलताही येईना. तेव्हा काय करावे असा प्रश्न या तिघांना पडला असता कोळिसरे येथीलच एक ग्रामस्थ श्री. भानूप्रसाद (की भानूप्रभू?) तेरेदेसाई यांना 'ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना याच गावात करावी' अशा अर्थाचा दृष्टांत झाल्याचे समजले व त्याप्रमाणे ही मूर्ती याच गावात राहिली.

डावीकडे: नूतनीकरणा आधीचे श्री लक्ष्मीकेशव मंदिर | उजवीकडे: नूतनीकरणा आधीचे रत्नेश्वर मंदिर








श्री लक्ष्मीकेशवाचे हे देऊळ सन् १५१० मध्ये तेरेदेसाई कुटुंबियांनी बांधले. ही तेरेदेसाई मंडळी म्हणजे दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजेच गोपाळगडाचे किल्लेदार. मंदिराच्या उभारणीसाठी खणायला सुरुवात केली असता एके ठिकाणी पाण्याची धार सुरु झाली.








हा झरा आजही सतत वाहता आहे. ह्या झर्‍यातील पाणी हे औषधी गुण असलेले आहे अशी वदंता आहे. असेही म्हटले जाते की पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्यासाठी हे पाणी येथून नेले जात असे.

नूतनीकरण केलेले श्री लक्ष्मीकेशव मंदिर





















मूर्तीचे वर्णन
श्री लक्ष्मीकेशवाची ही मूर्ती काळ्या संगमरवरातून घडवली गेली असून प्रत्यक्ष पाहणार्‍यांना अतिशय तेजस्वी भासते. पाच फूट उंचीच्या ही मूर्ती चार हाताची असून खालच्या उजव्या हातात कमळ, वरील उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र, तसेच खालील डाव्या हातात गदा अशी शस्त्रे आहेत. उजवीकडे गरूड आणि जय तर डावीकडे लक्ष्मी आणि विजय आहेत. मूर्तीच्या मागे डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी पाच अशा रितीने श्री. विष्णूचे दहा अवतार कोरले आहेत. महाराष्ट्रातील वैशिष्ठ्यपूर्ण मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना नक्कीच करायला हवी.








मंदिराच्या परिसरातच श्री रत्नेश्वराचे म्हणजेच शंकराचे देऊळ आहे.

नूतनीकरण केलेले श्री रत्नेश्वराचे मंदिर







श्री लक्ष्मीकेशव हे कुलदैवत असलेली आडनावे
श्री लक्ष्मीकेशव हे अडतीस घराण्यांचे (आडनावांचे) कुलदैवत आहे असे मानतात; शोध घेतल्यावर त्यापैकी छत्तीस आडनावे सापडली ती अशी:

उत्तुरकर, काणे, कानडे, काशीकर, कुंटे, केळकर, घनवटकर, घुले, घैसास, घोरपडे,
टिळक, ठोसर, ढब्बू, दांडेकर, नेने, पंडित, पुराणिक, पेंडसे, पोतनीस, फडणीस,
बोरगावकर, बेहेरे, बिवलकर, भट, भागवत, मेहेंदळे, राजवाडे, सुरनीस, सुभेदार, हुपरीकर,
लिमये, जोशी (शांडिल्यगोत्री ), विचारे, साळवे, सुगवेकर, बोंद्रे.

टीपः वरील आडनावांचे कुलदैवत हे श्री लक्ष्मीकेशव असले तरी ते कोळिसरे येथीलच असेल असे नाही.

उत्सव
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात होतो. या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. आणखी काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या देवस्थानचा सगळा कारभार पाहणार्‍या 'श्रीलक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट' यांच्या नावे देणगी देऊन आपल्याला मदत करता येऊ शकते.

जेवणाची व रहाण्याची सोय
श्री. तेरेदेसाई यांच्याकडे जेवणाची सोय होऊ शकते. देवदर्शनाला जाताना त्यांना जेवणाचे सांगून मग देवदर्शन घेऊन त्यांच्याकडे जेवायला यावे. निवासस्थानाच्या जवळच 'लकेर' नामक भक्तनिवास आहे तेथे राहण्याची तसेच चहा व फराळाची सोय होऊ शकते. लकेर म्हणजेच लक्ष्मी-केशव-रत्नेश्वर यांची अद्याक्षरे! पर्यटकांची फारशी गर्दी नसल्याने आठवड्याच्या एखाद्या मधल्याच वारी गेल्यास (शनिवार-रविवार सोडून कुठलाही वार) आगाऊ आरक्षण करण्याची तशी गरज नाही. तरीही गैरसोय टाळायची असल्यास आधी पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी करावी हे उत्तम. श्री. तेरेदेसाई यांचा फोन क्रमांक मिळू शकला नाही, पण पुजारी श्री. मराठे यांच्याशी
०२३५७-२४३८३५ या क्रमांकावर संपर्क साधून श्री तेरेदेसाई यांचा संपर्क होऊ शकतो.

या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. या देवळाच्या बदललेल्या आणि अधिकच चकाचक झालेल्या रूपाबाबत मात्र थोडीफार नाराजी असली, तरी आपले सौंदर्य राखण्यात ते बर्‍यापैकी यशस्वी झाले आहे.
































भरपूर निसर्गसौंदर्य, कोकणातल्या इतर ठिकाणांपेक्षा शांत, पाण्याचा बारा महिने वाहता झरा, रम्य तसेच सात्त्विक वातावरण पाहिलं की इथून जावेसेच वाटत नाही. राहण्याजेवणाचीही छान व्यवस्था असल्याने कौटुंबिक सहलीसाठी अगदी आदर्श वातावरण इथे आहे. गावच्या तळाशी शास्त्री नदी वाहते व पुढे जयगडच्या खाडीत समुद्रास मिळते.

असे हे निसर्गवैविध्य अनुभवल्याशिवाय कोकणची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही!

------------------------------------------------------------------
माहितीसाठी विशेष आभारः तेरेदेसाई व मराठे परिवार;
अंतर व सनावळीच्या अचूकतेसाठी: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.