Monday, August 9, 2010

पापभीरू

एका वृत्तवाहिनीवर अत्यंत गंभीर चेहरा करून तावातावाने एक वृत्तनिवेदक राष्ट्रकुल स्पर्धा म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात सुरु असलेल्या घोटाळ्याबद्दल बोलत होता आणि आयोजनासाठी जबाबदार असलेल्या एका राजकारणी व्यक्ती आणि त्याचे सहकारी-कम्-चमचे यांच्यावर, झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल पुराव्यांसकट आरोपांवर आरोप करत सुटला होता. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर एका कोपर्‍यातल्या चौकटीत हीच मंडळी अत्यंत मख्ख चेहर्‍याने गोल गोल उत्तरे देऊन वेळ मारून नेत होती आणि देशातील कुठल्याही बाजारात जास्तीतजास्त तीनशे ते पाचशे रुपयांना उपलब्ध असणारी छत्री शंभरपट किंमतीला विकत घेऊनही आंतरराष्ट्रीय बाजारात तीच किंमत कशी वाजवी आहे असं केविलवाणं समर्थन देत चीड आणत होती. त्यात ते राजकारणी सदगृहस्थ "अहो तुम्ही आत्ता काही बोलू नका हो, माझ्यावर ह्या खेळांच्या आयोजनाची किती मोठी जबाबदारी आहे तुम्हाला कल्पना नाही, गेम्स होऊन जाउदेत मग चौकशी झाली आणि मी दोषी आढळलो तर राजीनामा देण्याचा विचार करू," असे तारे तोडत होते. हवापाणी आणि काही खेळांचे निकाल किंवा सामन्यांची स्थिती याव्यतिरिक्त मी बातम्यांच्या नादाला याच कारणाने लागत नाही, तेव्हा झक् मारली आणि बातम्या लावल्या असं मला झालं.

उद्विग्न होऊन आधी "काय हलकट लोक आहेत," आणि मग "सगळे राजकारणी असेच," आणि शेवटी "हे असंच चालायचं" असे हताश उद्गार काढून टि.व्ही. बंद केला. डोकं अक्षरशः सुन्न झालं होतं, तेवढ्यात आईची हाक ऐकू आली, "अरे मंदार, दादरला नऊ वाजता गाडी लागते, साडेआठ इथेच झालेत, हे खाली गाडीत जाऊन बसले सुद्धा, चल पळ लवकर." तंद्रीतून जागा होऊन मी लगबगीने खाली पळालो. माझा धाकटा भाऊ झारखंड मधल्या जमशेदपूर येथील त्याचं प्रशि़क्षण संपवून परतत होता त्याला, त्याच्याबरोबर भरपूर सामान असल्याने, आणायला जायचं होतं. दादरला पोहोचेपर्यंत जुजबी गप्पांमध्ये वेळ गेला. दादरला पोहोचलो तेव्हा सव्वानऊ झाले होते पण भावाने फोन करून गाडीने नुकतंच कल्याण सोडल्याचं सांगितलं. रेल्वे स्थानकाजवळच्या एका गल्लीत आम्ही गाडी लावली. "तू प्लॅट्फॉर्म तिकीट घेऊन तिथे जाऊन उभा रहा आणि गाडी आली की फोन कर मग मी गाडी घेऊन प्रवेशद्वारापाशी येतो," बाबा म्हणाले.

मी प्लॅट्फॉर्म तिकीट काढलं आणि माझा भाऊ ज्या डब्यात बसला होता तो डबा 'इंजिन पासून चौथा' असल्याने ती जागा शोधून तिथे जाऊन उभा राहिलो. मी अनेक महिन्यांनी मुंबईत येत होतो, तेव्हा गाडी येईपर्यंत बाकी काही करण्यासारखं नसल्याने रेल्वेगाड्यांचे बदललेले डबे आणि बरचसं न बदललेलं दादर स्थानक यांचं निरिक्षण करू लागलो. पण का कोण जाणे मनात पुन्हा ते भ्रष्टाचारी राजकारणी आणि त्यांची निलाजरी वृत्ती यांचे विचार येऊ लागले. एक लोकल गाडी त्याच फलाटाला लागली. शनिवार रात्र असल्याने फारशी गर्दी नव्हती त्यामुळे मी जिथे उभा होतो तिथे लोकल मधला महिलांसाठीचा डबा येत होता ही गोष्ट आत्तापर्यंत लक्षात आली नव्हती. ते समजल्यावर मी थोडा बाजूला होणार तेवढ्यात मागून एका मुलीची हाक आली "मंदारदादा, हाय." मी विद्यार्थीदशेत, नक्की सांगायचं तर शाळेत असताना माझ्याबरोबर सतीश आणि सुनेत्रा साठे हे भाऊ-बहीण बसने प्रवास करत त्यातली सुनेत्रा मला हाक मारत होती. मला तोंडातून एक चकार शब्द काढू न देता "मंदारदादा, तू मुंबईत कसा? तू पुण्यात असतोस ना? किती दिवस आहेस इथे? अरे थोडी घाईत आहे, तू असलास मुंबईत तर बोलू नंतर किंवा मग असं कर...ऑनलाईन शोध मला, फेसबूक आणि ऑर्कुट दोन्ही वर आहोत मी आणि सतीशदादा. मला शोध आणि माझ्या लिस्ट मधून शोधून सतीशदादाला पण अ‍ॅड कर." हे सगळं एका दमात बोलून पटकन त्या सुटणार्‍या गाडीत धावत धावत चढली आणि मला टाटा करत दिसेनाशी झाली.

कॉमन मॅनचे कोट्यावधीचे 'वेल्थ' लुटणार्‍यांच्या बातम्या बघून मनाला आलेल्या उदासीनतेमध्ये सुनेत्राच्या झालेल्या ओझरत्या भेटीने आणखी भर घातली. नाही, ही काही माझ्या एका – ज्याला इंग्रजीत 'ब्लास्ट फ्रॉम द पास्ट' का काय म्हणतात – त्याची गोष्ट नाही. माझ्या ह्या मनस्थितीचं कारण वेगळंच होतं. सुनेत्राला पाहून अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेच्या आठवणी मनात पिंगा घालू लागल्या.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

एके दिवशी दुपारी फोन वाजला. आईच्या एका मैत्रीणीचा असल्याने मी आईला बोलावलं. मैत्रीणीने कदाचित दु:खद बातमी दिली असावी कारण "काSSSSय? कधी? कसं? हो मग...बाप रे," असं बोलून आईने फोन ठेवला.

"काय झालं आई?" मी अधीर होऊन विचारलं.

आईच्या तोंडातून शब्द फुटेना. शेवटी कसा बसा धीर एकटवून आई म्हणाली "साठे गेले".

"साठे म्हणजे..."

"हो, सतीश-सुनेत्राचे बाबा. सकाळीच हृदयविकाराचा झटका आला आणि गेले. त्यांना इस्पितळातून परस्पर स्मशानभूमीत नेणारेत, तेव्हा आपण आत्ता न जाणंच योग्य. आपण एक-दोन दिवसांनी जाऊ भेटायला साठे वहिनींना."

साठेकाका आणि काकू कधीतरी आमच्या बरोबर बस मध्ये असत, त्यामुळे त्यांचाही चांगलाच परिचय झाला होता. शाळेत जाणारी मुलं हा आमच्या आयांना जोडणारा दुवा असल्याने त्या दोघींचा परिचय विशेष वाढला होता.

पण माझं त्यांच्याकडे जाणं झालंच नाही. आई-बाबांनीही आग्रह केला नाही, पण ते दोघे एके दिवशी जाऊन साठे कुटुंबीयांची भेट घेऊन आले. ते आले तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव काहीतरी वेगळंच घडल्याचे संकेत देत होते. आधी आई-बाबा दोघेही मला काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हते, पण फारच खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं त्याने प्रचंड धक्का बसला. साठेकाकांना आलेला हृदयविकाराचा झटका हे लोकांना सांगायचं कारण होतं. त्यांनी आत्महत्या केली होती. माझा पुढचा "पण का" हा प्रश्न अपेक्षित असल्याने आईने पुढचं सांगायला सुरुवात केली.

साठेकाका एका विमान कंपनी मध्ये नोकरीला होते. जोडधंदा म्हणून पोस्टाची गुंतवणूक एजन्सी घेऊन कमीशन बेसिसवर व्यवसाय करीत. लोकांकडून पैसे घ्यायचे आणि पोस्टाच्या विविध योजनांमध्ये गुंतवायचे आणि मॅचुअर झालेल्या योजनांमधले पैसे पुन्हा परत आणून द्यायचे वगैरे. एके दिवशी अशाच एका मॅचुअर झालेल्या योजनेचे दहा हजार त्यानी त्यांच्या कार्यालयातल्या एका बाईंना आणून दिले. इतकी मोठी रक्कम बाईंनी आपल्याबरोबर पर्समध्ये ठेवायच्या ऐवजी त्यांच्या मेजाचा एक भाग असलेल्या ड्रॉवरमध्ये ठेवली. संध्याकाळी घरी जाताना पैसे घ्यायला ड्रॉवर उघडल्यावर लक्षात आलं की पैसे त्यात नाहीत.

त्या बाईने आख्खं कार्यालय डोक्यावर घेतलं. जवळजवळ प्रत्येकावर संशय घेऊन झाला. "अहो असा त्रागा करण्यापेक्षा आपण सगळ्यांची झडती घेऊ," व्यवस्थापक साहेबांनी सुचवून पाहिलं. अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण बाई काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी सगळ्यांचे सल्ले धुडकावून लावत सरळ पोलीस चौकी गाठली. साडेपाच वाजले होते. प्रकरण पोलीसांपर्यंत पोहोचल्याने आता कार्यालयात मिटवता येणे शक्य नव्हते. सगळे थांबले तर उलट-सुलट चर्चा करून आपलं डोकं उठवतील आणि त्या बाईही तिथेच असल्या तर परिस्थिती स्फोटक होऊन अनवस्था प्रसंग ओढवेल म्हणून साहेबांनी सगळ्यांना घरी जायला सांगितलं आणि स्वत: एकटेच कार्यालयात थांबून राहिले. काही वेळाने पोलीस तिथे पोहोचले आणि सुमारे तासभर साहेबांचं डोकं खाल्लं. पोलीसांच्या वैतागाचं कारण साहेबांनी कुणालाही थांबवून ठेवलं नव्हतं हे होतं. त्यांचे 'कष्ट' वाढणार होते ना पुन्हा दुसर्‍या दिवशी येण्याचे! "उद्या सकाळी येतो, प्रत्येकाची चौकशी करू, कोणीही गैरहजर राहता कामा नये" असा दम देऊन ते निघून गेले.

आदल्या दिवशी निव्वळ त्रागा केल्याने बाईंच्या अंगात जबाब वगैरे देण्याची ताकद उरली नव्हती. त्यामुळे पोलीस सकाळी आले तेव्हा त्यांनी आधी बाईंचा जबाब घेतला. "तुमच्याकडे पैसे होते ही गोष्ट कुणाकुणाला माहित होती?" या प्रश्नावर त्यांनी काही सहकार्‍यांची नावे घेतली. अर्थातच साठ्यांनीच त्यांना पैसे आणून दिल्यामुळे त्यांचं नाव त्या जबाबात होतंच. त्यादिवशी प्रकृती ठीक नसल्याने गैरहजर असणार्‍या साठ्यांना ही गोष्ट कुणीतरी दूरध्वनी करून सांगितली. साठे दुसर्‍या दिवशी कामावर आलेच नाहीत.

आली ती त्यांच्या 'हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झालेल्या आकस्मिक मृत्यू' ची बातमी. अर्थात हे कारण लोकांना सांगितलं गेलं. पण खरी गोष्ट अशी होती की "आपल्या घरी पोलीस येणार, आपली पोलीस चौकशी होणार, आणि त्यामुळे आपली नाचक्की होणार," या विचारांनी साठ्यांना इतकं अस्वस्थ केलं की पहाटे पाणी प्यायच्या निमित्ताने उठून त्यांनी एक सगळीच्या सगळी कीटकनाशकाची बाटली पिऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली. साठे काकूंच्या विनंती वरून डॉक्टरांनी मृत्यूचे कारण आत्महत्या असं न नोंदवता 'हृदयविकाराचा तीव्र झटका' असं नोंदवलं त्यामुळे साठे कुटुंबियांची पुढची परवड थांबली. केवळ दहा हजार रुपयांनी एका कुटुंबाचा कर्ता पुरुष हिरावून घेतला होता.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

"...एस-सी फोर इंजिनपासून चौथा, एस-सी फाईव्ह इंजिनपासून पाचवा..." माझ्या बरोब्बर डोक्यावर असलेल्या लाऊडस्पीकर मधून ही उद्घोषणा झाली आणि मी दचकून भानावर आलो. भाऊ डब्याच्या दारातच उभा होता. त्याचं सामान घेतलं आणि बाबांना फोन केला. गाडीत सामान ठेवलं आणि घरी आलो. रूमवर टि.व्ही. नसल्याने 'दूरदर्शना'साठी हपापलेल्या भावाने टि.व्ही. लावला. पुन्हा तेच पुराण सुरु झालं. एव्हाना प्रत्येक वृत्तवाहिनीचे स्वयंघोषित शोधपत्रकार बेंबीच्या देठापासून बोंबलत तीच बातमी आणि तेच निर्लज्ज चेहरे दाखवत होते.

"किती तो निलाजरेपणा!" मी बाबांना म्हणालो.

"यालाच कलीयुग म्हणतात रे" ते म्हणाले.

"तुम्हाला साठेकाका आठवतात का हो? कुठे नुसत्या पोलीस चौकशीने होणारी नामुष्की टाळायला आत्महत्येचा मार्ग पत्करणारे ते आणि कुठे कोट्यावधीचा गैरव्यवहार सिद्ध करणारे ढळढळीत पुरावे असतानाही काहीच घडलं नसल्याच्या थाटात मुलाखती देत सुटणारे हे घटिंगण" मी त्यांना म्हणालो.

माझ्याकडे एक खिन्न कटाक्ष टाकून ते म्हणाले "हे असंच चालायचं." त्यांनी वैतागून भावाकडून रिमोट हातात घेतला आणि चॅनल बदलून शेअर बाजाराच्या बातम्या बघू लागले, आणि मी संगणक चालू करून सतीश आणि सुनेत्राला फेसबूक आणि ऑर्कुटवर शोधू लागलो.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

यातली साठे यांची गोष्ट सत्यकथेवर आधारित असली तरी त्यातल्या व्यक्तींची नावे अर्थातच बदलण्यात आली आहेत.

अवांतर: सुदैवाने साठे काकूंना श्री. साठे यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली आणि आज सतीश आणि सुनेत्रा दोघेही आपआपल्या नोकरीत आणि संसारातही प्रगती करत स्थिरावले आहेत.

Wednesday, June 30, 2010

कोकण यात्रा - २: शांत, नयनरम्य कोळिसरे

लक्ष्मीकेशव आदिसनातन, कोळिसरे ग्रामी | शिळागंडकी मूर्ती शोभे, अतिसुंदर नामी ||

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील कोळिसरे म्हणजे निसर्गाने आपले वैभव मुक्तहस्ताने जिथे उधळले आहे असे एक नयनरम्य गाव. रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर तर रत्नागिरी-जयगड रस्त्यापासून साधारण ३.५ किलोमीटर अंतरावर असणार्‍या या गावाची लोकसंख्या आहे फक्त ८००. मुंबई किंवा पुणे मार्गे जायचे असल्यास पुणे-बंगळुरू हायवेवर उंब्रज फाट्याला उजवीकडे वळून चिपळूण मार्गे जावे लागते. रत्नागिरी-जयगड रस्त्यावर हातखंबा गावानंतर निवळी फाटा आहे. आधी जाकादेवी, मग चाफे, मग पुढे सुमारे ८ किलोमीटर अंतरावर कोळिसरे फाटा आहे. ह्या ठिकाणाहून कोळिसरे गाव २ किलोमीटर आत आहे. रत्नागिरीहून इथे यायचे असल्यास दुपारची रत्नागिरी-रीळ ही एस. टी. सोयीची आहे. तथापि, आपल्या सोयीने यायचे असल्यास स्वत:चे अथवा खाजगी वाहन अर्थातच अधिक उपयुक्त ठरेल.

निसर्गसौंदर्य
हिरवळीने वेढलेल्या पर्वतरांगा आणि उन्हाळ्यातही तूलनात्मक दृष्ट्या कमी तापमान यामुळे इथे पर्यटकांची एप्रिल-मे महिन्यातही ये-जा असते. अगदी जंगलासारखी घनदाट झाडी हे या गावचे वैशिष्ठ्य. गावात इतकी मुबलक वृक्षराजी आहे की एखाद्या निबीड अरण्यात गाव वसले आहे की काय असा संभ्रम पडतो.

मुख्य रस्त्यापासून मंदिर परिसराकडे येण्याचा मार्ग







श्री तेरेदेसाई यांच्या घराबाहेरून दिसणारा मंदिर परिसर







ऐतिहासिक संदर्भ
कुठल्याही ठिकाणचे पर्यटन, विशेषकरून कोकणातील, हे त्या त्या ठिकाणची देवस्थाने पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. त्याच प्रमाणे अनेक कुटुंबाचे कुलदैवत असलेले कोळिसरे येथील श्री लक्ष्मीकेशवाचे मंदिर हे ह्या ठिकाणचे आकर्षणस्थान. श्री लक्ष्मी-केशवाची मूर्ती असलेले हे देऊळ इथे कसे बांधले गेले याची एक मोठी रोचक कथा आहे.

सद्ध्या जो भाग मराठवाडा म्हणून ओळखला जातो तिथल्या मालखेडचे राष्ट्रकूट घराणे (इसवी सन ७५० ते ९७३) साधारण बाराशे वर्षांपूर्वी सगळ्या मराठी मुलुखाचे म्हणजेच महाराष्ट्राचे राजे बनले. हे राजे विष्णूचे परमभक्त होते. या घराण्यातील सदस्यांनी त्या भागात अनेक ठिकाणी श्रीविष्णूच्या मोहक मूर्तींची स्थापना करून सुंदर, सुबक मंदिरे बांधली. अनेक वर्षांनंतर यादव घराण्याच्या अंमलाखाली हा भाग आला. त्याच सुमारास परकीय मुसलमान आक्रमक असलेल्या जुलमी आणि मूर्तीभंजक मुघल राज्यकर्त्यांचा साम्राज्यविस्तार जोमाने सुरु झाला. त्या विस्ताराचा एक भाग म्हणून एतद्देशीय जनतेवर अत्याचार सुरू झाले आणि अर्थातच उत्साही 'बुत्शिकन' (मूर्तीभंजक) लोकांनी त्यांचे 'कार्य' जोमाने सुरु केले. या सुलतानी संकटापासून विविध देवदेवतांच्या मूर्ती वाचवण्यासाठी त्याकाळात ज्या अशा अनेक मूर्ती सुरक्षित/गुप्त ठिकाणी हलवल्या गेल्या, त्यातलीच ही श्री लक्ष्मीकेशवाची मूर्ती. ती कोल्हापूर येथे हलवण्यात येऊन तेथील रंकाळा तलावात दडवून ठेवण्यात आली. ही मूर्ती मूळ कुठल्या ठिकाणी होती याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

पुढे अनेक वर्षांनी परिस्थिती थोडी सुधारली. तेव्हा एके दिवशी वर्‍हवडे गावातील तीन पुरुष श्री. जोशी, श्री. विचारे आणि श्री. काणे यांना ही मूर्ती कुठे ठेवली आहे ह्याचा दृष्टांत झाला. त्यानुसार ही मंडळी कोल्हापुरास गेली व ही मूर्ती तलावाबाहेर काढण्यात आली. ह्या मूर्तीची स्थापना कोकणातील रीळ गावी करावयाची असं त्यांनी ठरवलं. ही मूर्ती वर्‍हवडे खाडीतून व देवरूख-संगमेश्वर मार्गे एका लाकडी पेटीतून परत आणत असताना त्यांनी विश्रांतीसाठी कोळिसरे गावात रात्रीचा मुक्काम केला. सकाळी पुन्हा प्रवासाला प्रारंभ करण्यासाठी पेटी उचलण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड जड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पेटीतली मूर्ती इतकी जड झाली होती की त्यांच्या बरोबर असलेल्या मजूरांना ती उचलताही येईना. तेव्हा काय करावे असा प्रश्न या तिघांना पडला असता कोळिसरे येथीलच एक ग्रामस्थ श्री. भानूप्रसाद (की भानूप्रभू?) तेरेदेसाई यांना 'ह्या मूर्तीची प्रतिष्ठापना याच गावात करावी' अशा अर्थाचा दृष्टांत झाल्याचे समजले व त्याप्रमाणे ही मूर्ती याच गावात राहिली.

डावीकडे: नूतनीकरणा आधीचे श्री लक्ष्मीकेशव मंदिर | उजवीकडे: नूतनीकरणा आधीचे रत्नेश्वर मंदिर








श्री लक्ष्मीकेशवाचे हे देऊळ सन् १५१० मध्ये तेरेदेसाई कुटुंबियांनी बांधले. ही तेरेदेसाई मंडळी म्हणजे दाभोळसमोरच्या अंजनवेल म्हणजेच गोपाळगडाचे किल्लेदार. मंदिराच्या उभारणीसाठी खणायला सुरुवात केली असता एके ठिकाणी पाण्याची धार सुरु झाली.








हा झरा आजही सतत वाहता आहे. ह्या झर्‍यातील पाणी हे औषधी गुण असलेले आहे अशी वदंता आहे. असेही म्हटले जाते की पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्यासाठी हे पाणी येथून नेले जात असे.

नूतनीकरण केलेले श्री लक्ष्मीकेशव मंदिर





















मूर्तीचे वर्णन
श्री लक्ष्मीकेशवाची ही मूर्ती काळ्या संगमरवरातून घडवली गेली असून प्रत्यक्ष पाहणार्‍यांना अतिशय तेजस्वी भासते. पाच फूट उंचीच्या ही मूर्ती चार हाताची असून खालच्या उजव्या हातात कमळ, वरील उजव्या हातात शंख, वरच्या डाव्या हातात चक्र, तसेच खालील डाव्या हातात गदा अशी शस्त्रे आहेत. उजवीकडे गरूड आणि जय तर डावीकडे लक्ष्मी आणि विजय आहेत. मूर्तीच्या मागे डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी पाच अशा रितीने श्री. विष्णूचे दहा अवतार कोरले आहेत. महाराष्ट्रातील वैशिष्ठ्यपूर्ण मूर्तींमध्ये या मूर्तीची गणना नक्कीच करायला हवी.








मंदिराच्या परिसरातच श्री रत्नेश्वराचे म्हणजेच शंकराचे देऊळ आहे.

नूतनीकरण केलेले श्री रत्नेश्वराचे मंदिर







श्री लक्ष्मीकेशव हे कुलदैवत असलेली आडनावे
श्री लक्ष्मीकेशव हे अडतीस घराण्यांचे (आडनावांचे) कुलदैवत आहे असे मानतात; शोध घेतल्यावर त्यापैकी छत्तीस आडनावे सापडली ती अशी:

उत्तुरकर, काणे, कानडे, काशीकर, कुंटे, केळकर, घनवटकर, घुले, घैसास, घोरपडे,
टिळक, ठोसर, ढब्बू, दांडेकर, नेने, पंडित, पुराणिक, पेंडसे, पोतनीस, फडणीस,
बोरगावकर, बेहेरे, बिवलकर, भट, भागवत, मेहेंदळे, राजवाडे, सुरनीस, सुभेदार, हुपरीकर,
लिमये, जोशी (शांडिल्यगोत्री ), विचारे, साळवे, सुगवेकर, बोंद्रे.

टीपः वरील आडनावांचे कुलदैवत हे श्री लक्ष्मीकेशव असले तरी ते कोळिसरे येथीलच असेल असे नाही.

उत्सव
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा उत्सव कार्तिक शुद्ध दशमी ते पौर्णिमा या काळात होतो. या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. आणखी काम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असून या देवस्थानचा सगळा कारभार पाहणार्‍या 'श्रीलक्ष्मीकेशव देवस्थान ट्रस्ट' यांच्या नावे देणगी देऊन आपल्याला मदत करता येऊ शकते.

जेवणाची व रहाण्याची सोय
श्री. तेरेदेसाई यांच्याकडे जेवणाची सोय होऊ शकते. देवदर्शनाला जाताना त्यांना जेवणाचे सांगून मग देवदर्शन घेऊन त्यांच्याकडे जेवायला यावे. निवासस्थानाच्या जवळच 'लकेर' नामक भक्तनिवास आहे तेथे राहण्याची तसेच चहा व फराळाची सोय होऊ शकते. लकेर म्हणजेच लक्ष्मी-केशव-रत्नेश्वर यांची अद्याक्षरे! पर्यटकांची फारशी गर्दी नसल्याने आठवड्याच्या एखाद्या मधल्याच वारी गेल्यास (शनिवार-रविवार सोडून कुठलाही वार) आगाऊ आरक्षण करण्याची तशी गरज नाही. तरीही गैरसोय टाळायची असल्यास आधी पत्रव्यवहार किंवा फोनाफोनी करावी हे उत्तम. श्री. तेरेदेसाई यांचा फोन क्रमांक मिळू शकला नाही, पण पुजारी श्री. मराठे यांच्याशी
०२३५७-२४३८३५ या क्रमांकावर संपर्क साधून श्री तेरेदेसाई यांचा संपर्क होऊ शकतो.

या देवळाचे नोव्हेंबर २००८ मध्ये नूतनीकरण करण्यात आले आहे. या देवळाच्या बदललेल्या आणि अधिकच चकाचक झालेल्या रूपाबाबत मात्र थोडीफार नाराजी असली, तरी आपले सौंदर्य राखण्यात ते बर्‍यापैकी यशस्वी झाले आहे.
































भरपूर निसर्गसौंदर्य, कोकणातल्या इतर ठिकाणांपेक्षा शांत, पाण्याचा बारा महिने वाहता झरा, रम्य तसेच सात्त्विक वातावरण पाहिलं की इथून जावेसेच वाटत नाही. राहण्याजेवणाचीही छान व्यवस्था असल्याने कौटुंबिक सहलीसाठी अगदी आदर्श वातावरण इथे आहे. गावच्या तळाशी शास्त्री नदी वाहते व पुढे जयगडच्या खाडीत समुद्रास मिळते.

असे हे निसर्गवैविध्य अनुभवल्याशिवाय कोकणची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही!

------------------------------------------------------------------
माहितीसाठी विशेष आभारः तेरेदेसाई व मराठे परिवार;
अंतर व सनावळीच्या अचूकतेसाठी: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.

Saturday, May 22, 2010

कोकण यात्रा - १: केळशी – दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी

कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता येणार्‍या या गावाला पर्याय नाही.

स्वतःचे वाहन घेऊन जायचे असल्यास छानच, पण घाटात वाहन चालवण्याचा अनुभव असणारा चालक बरोबर असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम. पु.लंच्या 'म्हैस' ह्या कथेत म्हटल्याप्रमाणे "गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं प्रवाशांना निराळ्या अर्थाने लागायला लागली" असा प्रकार ज्या लोकांच्या बाबतीत होतो त्यांनी आधीच औषधे घेतलेली बरी.



गावातल्या मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना आहे. रेल्वे फलाटासारख्या दिसणार्‍या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या भागाला बिदी असे म्हणतात. ह्या पाखाड्या जांभ्या दगडाचे चिरे वापरून केल्या आहेत. इथे पडणार्‍या धो धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून ह्या पाखाड्या तयार केल्या आहेत. पवसाळ्यात बिदीवर असणार्‍या घरातील अंगणापासून ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधले जातात.




वरच्या अंगणाच्या कडेपर्यंत पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे हा भाग पावसाळ्यातल्या व्हेनिस सारखा दिसू लागतो. असं असलं तरी बोटी वगैरे चालवण्याचा विचारही नको, कारण पाऊस एकदा बदा बदा कोसळू लागला की घराबाहेरचं काहीही दिसत नाही. त्यामुळे हे अतिरेकी हवामान सहन करण्याची ताकद आणि तयारी असेल तरच पावसाळ्यात येण्याचे धाडस करा. नाहीतर घरात पत्ते कुटत बसण्याची वेळ यायची!





केळशी 'पर्यावरण जपणारे गाव' अशी आपली प्रतिमा बनवू पाहत आहे. गावात काही घरात गावकर्‍यांनी गोबर गॅसची सोय करून घेतली आहे व इतरही अनेक घरात तशी सोय करायचं घाटत आहे.


कोकणातील इतर अनेक गावांसारखाच केळशीलाही रम्य, शांत, नयनमनोहर असा समुद्रकिनारा लाभला आहे, अगदी गोव्याच्या तोडीस तोड.






नियोजित मुंबई-गोवा सागरी महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे ह्या सौंदर्याला जरा डाग लागल्यासारखं झालं असलं, तरी अजूनही त्याने आपला देखणेपणा टिकवून ठेवला आहे.

रामाचे देऊळ उजवीकडे टाकून साठे आळीतून सरळ उत्तरेकडे पुढे गेलं की आपण एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो. एक नैसर्गिकरित्या तयार झालेली वाळूची टेकडी आपल्याला पहायला मिळते. शासन दरबारी असलेल्या पुरातत्व विभागाच्या दस्तैवजांनुसार ही वाळूची टेकडी साधारणपणे वास्को-दि-गामाच्या भारत भेटीच्या आसपास पंधराव्या शतकात एका सुनामीमुळे तयार झाली आहे.

या टेकडीवर सरसर चढून जाणं आणि वेगाने घसरत खाली येणं हा येथे येणार्‍या बाळगोपाळांचा आवडता उद्योग. या खेळात क्वचित मोठेही सहभागी होताना दिसतात. टेकडीवर बसून दिसणार्‍या सूर्यास्ताची शोभा काही औरच, असा या ठिकाणाला भेट
दिलेल्या पर्यटकांचा अनुभव.

सर्वप्रथम १९९० साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयातील अभ्यासक प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी ह्या टेकडीबद्दल काही शास्त्रीय निरिक्षणे नोंदवली होती. तसेच डॉ. अशोक मराठे या पुरातत्व शास्त्रज्ञाने डेक्कन महाविद्यालयतील काही सहकार्‍यांसह या वाळूच्या टेकडी संबंधात संशोधन केले. त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या:

किनार्‍यावरील इतर टेकड्यांपेक्षा ही टेकडी वेगळी आहे. केळशी परिसरात जास्तीत जास्त ८ मीटर हून अधिक उंचीची टेकडी आढळत नसताना ही टेकडी मात्र तब्बल २८ मीटर उंच आहे. इथे सापडलेली खापरे, माशांची हाडे यांचा काळ तेराव्या शतकाचा असल्याचे संशोधनाअंती समजले.

या टेकडीत काळे-पांढरे वाळूचे थर स्पष्टपणे आढळून येतात. काही ठिकाणी राखेचे थर, कोळसायुक्त वाळू, सागरी माशांची हाडे, खापरे व मडक्यांचे तुकडे, शंख-शिंपले आणि क्वचित नाणीही आढळतात. टेकडीच्या माथ्याकडील भागत गाडल्या गेलेल्या
दोन मानवी कवट्यांच्या जवळ चांगल्या अवस्थेत असलेली तांब्याची सहा नाणी आढळली होती. त्यांच्यावर "अल् सुलतान अहमदशहा बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी ८३७" असा मजकूर दिसतो. याचाच अर्थ ही नाणी बहामनी सुलतान अहमदशहा पहिला याने हिजरी सन ८३७ म्हणजे इ.स. १४३३ मध्ये वापरात आणली हे उघड होतं. टेकडीच्या पायथ्याशी सध्या ज्या भागापर्यंत भरतीचे पाणी येते, तेथे एक जांभ्या दगडाच्या चिर्‍यांनी बांधकाम केलेली शिलाहारकालीन जुनी पक्की विहीर आहे.

पुढे सागरी महामार्गाच्या निर्मितीसाठी आपल्या अचाट सार्वजनि़क बांधकाम विभागाने जे.सी.बी. यंत्राच्या सहाय्याने टेकडीच्या मध्यापासून काही भाग खणून काढला. परंतु पुरातत्वीय संशोधन पूर्ण झालेले नसल्याने आणि हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा कायमचा जतन व्हावा ह्यासाठी ह्या वाळूच्या टेकडीचा विनाश थांबावा हा अर्ज न्यायालयात ग्राह्य धरला जाऊन सागरी महामार्गाच्या कामावर न्यायालयाने बंदी आणली.

गावात अनेक देवळे आहेत, पण त्यातली प्रमुख दोन – एक रामाचे देऊळ आणि दुसरे महालक्ष्मीचे.



याच दोन देवळांशी गावातले दोन प्रमुख उत्सव निगडीत आहेत – रामनवमी आणि महालक्ष्मीची यात्रा. असे म्हणतात की लागू घराण्यातील एका गृहस्थांच्या  स्वप्नात देवी आली व तिने आपण नक्की कुठे आहोत ते सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी
खणले असता देवी सापडली व त्यावर देऊळ बांधण्यात आले. असेही म्हटले जाते की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला केलेला नवस इथे फेडता येतो. ह्या दोन देवळांची माहिती एकत्रित देण्यामागचा हेतू हा, की रामनवमीचा उत्सव आणि महालक्ष्मीचा उत्सव हे दोन जवळ जवळ जोडूनच येतात. कोकणच्या उत्सवांची खरी मजा लुटायची असेल तर मुक्काम ठोकून हे दोन्ही उत्सव पहावेत. महालक्ष्मीच्या उत्सवाचे वर्णन एका कवीने पुढीलप्रमाणे केले आहे, त्यातूनच आपल्याला कल्पना येईल.

देवीचे गाणे - श्री महालक्ष्मी केळशी
उत्सवाचा काल सत्वरी जवळी तो आला
प्रेमभराने ग्रामस्थांसी मोद बहु झाला || धृ ||
चैत्रमासी आनंद होतो मातेच्या सदनी
पाडव्याच्या दिनी जातसे ढोल गृहवरुनी
जमती सारे मानकरी नी ग्रामस्थ दोन्ही
श्रावण करिती वर्षफळाचे अनन्य चित्तानी
नूतन वर्षी समाराधना घालीतसे कोणी
वारी नेमुनी चूर्ण सेविती गंधाची वाटणी
ऐशी रिती उत्सावासी प्रारंभ केला || प्रेमभराने _ _ _ १ ||

दुसरे दिवशी जमती सारे वारी एकत्र
गृहागृहांतून पट्टी गोळा करण्याचे सत्र
तक्रारीला जागा नाही ऐसे ते तंत्र
नियमबद्ध तो केला ऐसा उत्सव सुयंत्र
साक्ष देतसे शिक्षा करुनी त्यासी अपवित्र
सरसावे जो फुट पाडण्या देऊनी कानमंत्र
ऐशा रीती सहा दिवस तो काळ त्वरे गेला || प्रेमभराने _ _ _ २ ||

अंगणात तयार केला मंडप भोजना
सप्तमीच्या दिवशी कामे असती ती नाना
आकडी घेउनी फिरती वारी केळीच्या पाना
दोन डांगा ओढा ऐशी आज्ञा हो त्यांना
हक्काचा तो फणस द्यावा त्वरित महाजना
सायंकाळी भाजी चिरण्या भगतांच्या ललना
पातवड्याचे खोरे झाले तयार सेवेला || प्रेमभराने _ _ _ ३ ||



अष्टमीच्या दिवशी चाले भोजन जोरात
प्रसाद भक्षण करा यथास्थित गोडी बहु त्यात
साठे-आखवे-परांजपे हे वाढती पंक्तीत
प्रसादाचे खोरे जाती इतर ज्ञातीत
फणस भाजी, वांगी हरभरे पातळ भाजीत
पुरण लोणचे यांची गोडी नाही वर्णवत
सारच तो दिमाख चाखुनी जीव बहु धाला || प्रेमभराने _ _ _ ४ ||



कलमदानी मंडपात सहा बैठका
हरिदासाची मध्ये आणि समोर बैदिका
उजवी बाजू असे राखिली ग्रामस्थ लोकां
डावे बाजूस मानकर्‍यांची बसते मालिका
लामणदीप आणि समया तेवती चंद्रिका
दोन बैठका वाढून दिधल्या इतर त्या लोकां
कीर्तनासी प्रारंभला रंग बहु आला || प्रेमभराने _ _ _ ५ ||

गोंधळाची वेळ जाहली ऐका वृतांत
मधे गोंधळी वामभागी पुजारी तिष्ठत
चांदीची ती दिवटी बुधली विलसे हस्तात
सभोवताली साथ चालते इतर चौघांत
गोंधळगीत चालले ते ऐसे रंगात
पूजा जाहली तेव्हा केले दीप प्रज्वलीत
गीत संपले दीप समूह तो पारावर गेला || प्रेमभराने _ _ _ ६ ||

एकदिशी उत्सवात दिवस भाग्याचा
कामे असती बहु त्या दिनी वेळ महत्वाचा
दागदागिने घातलेला नवीन झिलईचा
मुखवास तो नेऊन ठेविती पेटीत अंबेचा
अबदागीर वाजंत्री नी डंका बाराचा
वारा चवर्‍या उष्मा होतो प्रवास लांबीचा
वार्षिक राज्या पाहुनी भाविक मानस गहिवरला || प्रेमभराने _ _ _ ७ ||

हंड्या ग्लासे छते लावुनी करिती तो छान
कलमदानी मंडप होतो शोभायमान
मखरताटी रथपुतळीची मूर्ती ठेऊन
आत राणी राज्या करीतसे जणू संस्थान
श्री निसबत कारभारी सही संपूर्ण
रुप्या ताटी चांदीची ती समई ठेऊन
धामधुमीचा दिवस ऐसा वेगे तो गेला || प्रेमभराने _ _ _ ८ ||

द्वादशीला लिखिते जाती तेरा ग्रामात
अजरालय मुळवट वेळवट यांत
त्रयोदशीला अमुची यात्रा त्वरे पार पडत
भालदार विडेवाटणी सेवक लोकांत
प्रातःकाली बहिरी दर्शन जन संघ निघत
चांदीचा मुखवास लागला मूर्तींना आत
पावलीची ओढ लागली ढोल्या गुरवाला || प्रेमभराने _ _ _ ९ ||

चतुर्दशीला जेवणवाडी तयार ती केली
रथ स्थापना करुनी मंडळी सत्वर परतली
भोई जेवणकीस तयारी देवळात गेली
उभाघर, तिठ्ठे आळी वाढू लागली
त्रयोदशी नी चतुर्दशी या दोन्ही दिनकाळी
चीरकदान दिवल्याचे ते मंडप भवताली
चांदीचा मुखवास लागला मंडप स्वमिनीला || प्रेमभराने _ _ _ १० ||

आज बलुते जाति सर्वही सेवक लोकांत
जोशी, खरवळे, शिधये, गद्रे ब्राह्मण ते त्यांत
क्षेत्रपाल नी रथपुतळीला केळवण होत
वेळातटीचे लोक उतरती गद्रे गृहात
चतुर्दशीचे शुभ्र चांदणे पडले प्रशांत
आजारालययिचे लोक तळ्यावर बसुनी हवा खात
डोळांभरुनी पाहुनी घ्याहो सत्वर मूर्तीला || प्रेमभराने _ _ _ ११ ||

वेळ जाहली मंडपी आले परके ग्रामस्थ
आदर सत्कारांची त्यांच्या धावपळ ती होत
ठायी ठायी उभे राहुनी वृद्ध जाणिस्त
गुलाब अत्तर वार्‍यांकरवी त्यांस देववीत
हजार त्यांचे मानकरी जे विडा उचलीत
भालदार हो प्रवेश करिती वाजत गाजत
चकित व्हावे पाहुनी ऐशा कडक शिस्तीला || प्रेमभराने _ _ _ १२ ||

पहाटेची वेळ जाहली गोंधळ उतरला
सोनियाचा कळस, आरसा, रथ सज्ज झाला
चांदीचा तो दीप लागे आज आरतीला
मंडपात ताटामधुनी गुलाल उधळीला
"आई जगदंबे अंबाबाई" भजन घोष झाला
रथाभोवती चंद्रज्योती पुष्पनळा फुलला
रथयात्रेचा पौर्णिमेचा दिवस उजाडला || प्रेमभराने _ _ _ १३ ||



पौर्णिमेच्या मंगल आणि रम्य प्रातःकाळी
रथाभोवती जमते ब्राह्मण तरुणांची टोळी
"दुर्गे दुर्गट वारी" ऐशी आरती ती सगळी
घाईघाईने खांदी घेती तेव्हा रथपुतळी
रेटारेटी कौतुक पाहे जनता ती भोळी
"हर हर महादेव" ऐशी उठे आरोळी
हौस फिटली ह्या वर्षीची रथ पुढे गेला || प्रेमभराने _ _ _ १४ ||

पाखाडीशी भोई ज्यात तयार ते असती
ब्राह्मण जाऊनी डुंगवाले रथ पुढे नेती
मिरवत मिरवत आठ वाजता गद्र्यांच्या पुढती
डेल्यावरती घेत बसला तेव्हा विश्रांती
पीठाचे ते दिवे लाउनी स्त्रिया पूजा करिती
दही पोहे थंडगारसे भोई सेविती
प्रसाद खाता "भले ग भोई" शब्द तदा स्फुरला || प्रेमभराने _ _ _ १५ ||



महाजन सदनी प्रसाद आज पुरणपोळीचा
वारी त्यांना लाभ देती आपल्या पंक्तीचा
वेळ असतो तब्बल तेथे तीन तासांचा
उपाध्याय पूजा सांगण्या हक्क स्त्रियांचा
प्रवास संपे ऐशा रीती सर्व उभागराचा
साठे आळी फिरुनी आला उलटा रथ साचा
नवागरसि भोई आले आता सेवेला || प्रेमभराने _ _ _ १६ ||

नापित पूजा घेउनी फिरला परांजपे वाडी
हक्क पुजेचा जुना स्त्रियांच्या फडक्यांच्या फेडी
होळी बहिरी पेठ आणि पिंपळ पिछाडी
दोन भाया तेकुनी तेथे कुंभार वाडी
त्वरे घेउनी इतर स्थळे आला आघाडी
शेतामध्ये पुतळादेवी त्वरे रथ सोडी
इकडे म्हणती आता रथ जड आला || प्रेमभराने _ _ _ १७ ||

गावाच्या दक्षिणेस व देवीच्या देवळाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी
सोळाव्या शतकात बांधलेला याकुब बाबांचा दर्गा आहे. महाराजांनी यांना
गुरुस्थानी मानले होते व आपल्या कोकण दौर्‍या दरम्यान केळशीस येऊन
त्यांचे आशीर्वादही घेतले होते असे म्हटले जाते.

केळशीला कधी जावे: अक्षरशः वर्षातून कधीही जावे. तरीही सांगायचे झाल्यास महालक्ष्मीच्या यात्रेदरम्यान व डिसेंबर-जानेवारी ह्या थंडीच्या महिन्यांत जाणे सगळ्यात चांगले.

जवळची गावे: आंजर्ले - इथलीही यात्रा पाहण्यासारखी असते; आडे, उटंबर, दापोली, करडे, आसूद, हर्णै, मंडणगड, वेळास,
बाणकोट, श्रीवर्धन.

प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि केळशी:
  • कॅम्लिनचे संस्थापक श्री. नानासाहेब दांडेकर हे केळशीचे.
  • लोकमान्य टिळक यांचे आजोळ.
  • आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा-पणजोबा केळशीचे.
  • मध्यप्रदेशात मराठी झेंडा फडकत ठेवणार्‍या माजी मंत्री व खासदार
    सुमित्रा महाजन यांचं सासरघरचं गाव हे केळशी.
राहण्याची सोयः
केळशीमध्ये मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
पुढील सर्व ठिकाणी मद्यपान, धूम्रपान व मांसाहार निषिद्ध आहे.

१) श्री. गिरीश बिवलकर (विष्णू): ०२३५८-२८७३१२.
इथे मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
कुटुंब असल्यास प्राधान्य.
श्री. बिवलकर हे देवीचे पु़जारी .

२) त्यांचे शेजारी श्री. वसंत गोखले (फक्त राहणे): ०२३५८-२८७२६९; ९४२००४०९६९.

३) श्री. वर्तक संचालित 'पुण्याई' हॉटेल: संपर्क श्री. वर्तक ०२३५८-२८७२१७.
इथेही मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.

४) श्री. बगाराम महाजन, श्रीराम मंदिराजवळ यांचेकडे फक्त भोजनाची सोय
होऊ शकते.

५) कोकणातही आपल्या शहरातल्या चकाचक सदनिकेत राहण्याचा अनुभव हवा असल्यास श्री. यनगुल यांच्या मालकीचे व श्री. विजय जोशी यांचे व्यवस्थापन असलेले एन्-गुलमोहर. संपर्क ०२३५८-२८७३७१.

५) आनंदी निवास (प्रोप्रा. प्राची प्रसाद विद्वांस)
    भ्रमणध्वनी: ९९२१ ६७७ ०९०
    पुणे: ०२०-२४२५ ४४ ७५
   
६) सुरभी (प्रोप्रा. नरेश वर्तक)
    केळशी:०२३५८-२८७२४०
    भ्रमणध्वनी: ९६२३ ११३ १६२; ९८२० ४४१ ९८५



पुण्याई व एन्-गुलमोहर समोरासमोर आहेत.

तर मग, येताय नं आमच्या केळशीला ?

संपूर्ण पिकासा अल्बम पहायला पुढील चित्रावर टिचकी मारा:




आभार प्रदर्शनः माझी आजी श्रीमती कल्पना जोशी, जिच्या संग्रहात देवीच्या उत्सवाची ती कविता सापडली.

संदर्भः
टेकडीबद्दल: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.

अजि म्या पु.ल. पाहिले




महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार? त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की "कसं?"

वार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.

पुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्‍याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.

मग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्‍या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. "शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली". दार उघडलं गेलं आणि........

..........."अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.!

मी भीत भीत म्हणालो, "आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का?". मी मनात हुश्श केलं.

"आत या," पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.

थोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.

गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.

तद्वत "आम्हाला हाकलले, पण कुणी? प्रत्यक्ष पु.लं.नी" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता

आम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्‍याकडे बोट दाखवून त्यांना "आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का?" अशी विनंती केली. पण त्यांनी "नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्‍यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. "ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.

माझ्यासाठी "आता मी मरायला मोकळा" असं वाटण्याचा तो क्षण होता.

"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. "अरे सुजय", मी म्हणालो, "तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का? आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल?" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.

"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!"

"प्रसाद?" सुजय बुचकळ्यात पडला. "अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.

मी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, "हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.


मुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.

मी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.

झुरळ, गणित आणि तर्कशास्त्र

अ = ब,
ब = क,
म्हणून अ = क? नाही!!

कारण...
बायको झुरळाला घाबरते,
झुरळ आपल्याला घाबरते,
म्हणून बायको आपल्याला घाबरते का? नाही!!
ती घाबरते, झुरळालाच!

राँग नंबर

वेळः कै च्या कै. राँग नंबरला वेळ असते का? साधारण आपला आराम करायची वेळ असते तेव्हाच लोकांना हवे असलेले बरोबर नंबर राँग लागतात. उदा. रविवार पहाटे आठ. हो, बरोबर वाचलंत तुम्ही. पहाटे आठ. रविवारी ह्या वेळेला पहाटच असते की.

फोन: आमचा लँडलाईन


















राँग नंबर (१) - करंबेळकर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
एक स्त्री: "हॅलो, करंबेळकर का?"
मी: "नाही, राँग नंबर"
स्त्री: "ओह, सॉरी हां"

काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर आहेत का?"
मी: "नाही, राँग नंबर"
बुवा: "बर्र बर्र बर्र, सॉरी, मग कुणाचा आहे हा?"
मी: "तुम्हाला करंबेळकरांशी बोलायचंय?"
बुवा: "हो"
मी: "हे त्यांच घर नाही"
बुवा: "मग कुणाचं आहे"
मी: "माझं आहे"
बुवा: "तुम्ही त्यांचे शेजारी का?"
मी: "नाही, या नावाचं कुणीच ह्या इमारतीत राहत नाही"
बुवा: "अरे बापरे, सॉरी हां"

पुन्हा काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पुन्हा तीच स्त्री: "करंबेळकर आहेत का?"
मी: "नाहीत"
स्त्री: "कुठे गेलेत?"
मी: "माहीत नाही. आम्ही त्यांना ओळखत नाही. राँग नंबर"
स्त्री: "ओह हो! राँग नंबर लागला परत!! सॉरी अगेन हां"

मागल्या पानावरून पुढे.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर का हो?"
मी: "नाही हो"

अनेकदा असे फोन आल्यामुळे एव्हाना मी जवळ जवळ रडकुंडीला आलो होतो.
कारण पलीकडून...बुवा (बहुतेक बायकोला उद्देशून): "हें, हें, हें, अगं परत 'तिथेच' फोन लागला"

मी: "करंबेळकरांचा नंबर काय आहे?"
बुवा: "अमुक अमुक"
मी: "हा नंबर बरोबर आहे, पण इथे करंबेळकर नक्की राहत नाहीत"
बुवा (बायकोला उद्देशून): "अगं, एकदा मिसेस. करंबेळकर आहेत नं, त्यांना सरळ पत्रच पाठव"
(मला उद्देशून): "सॉरी हं"

पुढचे अनेक दिवस हे दोघं, जे नक्की नवरा-बायको असावेत, सारखे आळीपाळीने फोन करत होते. बरं ते प्रत्येक वेळी अत्यंत सौजन्याने बोलत आणि राँग नंबर आहे हे समजलं की तितक्याच नम्रतेने सॉरी म्हणत, त्यामुळे त्यांच्यावर मनसोक्त वैतागताही येत नव्हतं. त्यांनी माझं आणि मी त्यांचं नाव विचारण्याची तसदी घेतली नव्हती. आम्ही 'करंबेळकर' ह्या एकाच 'धाग्याने' बांधले गेलो होतो! मी तर त्यांना सरळ काका-काकू म्हणू लागलो होतो. एव्हाना त्या दोघांनाही माझा आवाज माहीत झाला होता बहुतेक, कारण पुढच्या वेळी:

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
काकू: "हॅलो, राँग नंबर बोलताय का?"



~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (२) - यासीन भाई

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो, बोला"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
मी: "काSSSSय?"

मी प्रचंड दचकलो, चुकून जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या यासीन मलिकचा फोन माझ्या घरी लागला की काय? किंवा एखाद्या भाईचा फोन असावा काय? पण मी व्यावसायिक नाही आणि चित्रपटश्रुष्टीत नाही आणि बिल्डर तर नाहीच नाही. तेव्हा मला फोन करून जो कोण भाई असली कामं करतो त्याचे फोनचे बिल वाढून त्याचेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचं लक्षात आलं आणि जीव भांड्यात पडला. तरी म्हटलं एकदा खात्री करुन घ्यावी.

पलीकडून: "हॅलो, हॅलो, यासीन भाई है क्या?"
मी: "यासीन कौन"
पलीकडून: "यासीन शेख तारवाला"
हे आडनावाच्या शेवटी "वाला" असलेल्यांची एक गडबड असते. त्यांचं ते आडनाव आहे की धंदा समजत नाही. असो. विषयांतर नको.

मी (मनातल्या मनात, "मग ठीके"): "राँग नंबर"
पलीकडून दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

साधारण आठवड्याभराने एके दिवशी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई को बुलाव"
च्यामारी, मी काय ह्याच्या तीर्थरूपांचा....नाही, त्याला काय म्हणतात उर्दूत? हां, आठवलं, वालीद साहेबांचा नोकर असल्यासारखा मला हुकुम देत होता.
मी (साहजिकच चिडून): "नहीं बुलाउंगा"
पलीकडून: "कायकू?"
मी: "राँग नंबर"
पलीकडून आधीपेक्षाही दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

आणखी काही दिवसांनी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई कैसे हो?"

अरेच्च्या! आता हा तर आपण यासीन भाईशीच बोलत असल्याचं गृहीत धरून हा सुरु झाला की.

मी: "हॅलो, मै यासीन भाई नहीं है"
पलीकडून: "तो वो किधर है?"
मी: "मालूम नै"
पलीकडून: "कायकू मालूम नै?"
मी: "ये राँग नंबर है"
तो माणूस पब्लिक फोनवरून बोलत असावा, कारण याखेपेला फोन ठेवल्याचा इतका मोठा आवाज झाला की त्या फोनची नक्की शकलं झाली असणार.

असेच काही दिवसांच्या अंतराने फोन येत गेले. आता मी पुरता वैतागलो होतो. त्यामुळे पुढच्या वेळी फोन आला की ह्या म्लेंछांच्या अवलादीची पुरती फुलटू करायची असं ठरवलं.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
ह्म्म्म, आत्ता कसा सरळ बोलतोय.
मी: "नहीं"
पलीकडून: "किधर गये है?"
मी: "उपर"
पलीकडून: "तो निचू बुलाएंगे क्या?"
मी (आवाजात पुरेसे कारुण्य आणून): "उपर मतलब उपर नै"
पलीकडून: "उपर मतलब उपर नै? मतलब?"
मी (आणखी कारुण्य): "आपको मालूम नै क्या? कमाल है!"
पलीकडून: "क्या हुवा?"
मी: "यासीन भाई तो चार दिन पहले ही अल्ला को प्यारे हो गये"
पलीकडून: "आँ"
ह्या वेळी मीच आधी फोन ठेवला.
या नंतर मात्र मला या माणसाचा पुन्हा फोन आला नाही.


<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

राँग नंबर (३) - फूड कॉर्नर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर?"
मी: "काय कोरणार?"
पलीकडून: "कोरणार नाही हो, फू-ड कॉ-र-न-र"
मी: "नाही, राँग नंबर"
पलीकडून: "अरे" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो ये कहांका नंबर है?"
मी: "घर का है"
पलीकडून: "किसके घर का?"
मी: "मेरे"
पलीकडून: "आप फूड कॉर्नर के मालिक है क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो कायको मेरा टाईम वेस्ट किया?"
मी: "आपने किया मेरा टाईम वेस्ट"
पलीकडून: "क्या आदमी है" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

असेच फोन नियमितपणे येत गेले. कधी कधी एकच ग्राहक परत परत फोन करायचा. एक्स्चेंज मध्ये तक्रार करा सांगून काही फायदा झाला नाही. शेवटी मी त्या यासीन शेख साठी वापरलेली कल्पना वेगळ्या तर्हेने वापरायची ठरवली. आणखी काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: ""हॅलो, छे अंडे और ब्रेड भेज दो"
च्यामारी, हे जास्त होतंय. असो. मी सरळ ऑर्डर घ्यायला सुरवात केली.
मी: "किधर"
पलीकडून: "D-8 में भेज दो, कितना टाईम लगेगा?"
मी: "आधा घंटा"
पलीकडून: "आSSSधा घंटाSSS, ज्यादा से ज्यादा दस मिनिट में चाहिये"
त्या बाईने इतका मोठा हेल काढला की मला वाटलं हिला दहा मिनिटात अंडी नाही मिळाली तर हृदयविकाराचा झटका वगैरे येतो की काय!
मी: "ठीक है, भेज देता हुं" (पाठवतोय मी, घंटा! बस बोंबलत)

अशा दहा पंधरा ऑर्डर घेतल्यावर एकदा फूड कॉर्नरच्या मालकाने फोन केला. त्याला आमचा नंबर कसा मिळाला आणि आम्ही कोण कसं समजलं देव जाणे. त्याला बहुदा वाटलं त्याच्या शेजारी एक दुसरं फास्टफूड दुकान उघडलं होतं त्याचे आम्ही मालक. शेवटी सगळं रामायण सांगितल्यावर त्याने सरळ चक्क फोन नंबर बदलला आणि आमचा त्रास संपला.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (४) - कोण बोलतंय?

हा एक अशक्य प्रकार आहे. अशा फोनना इलाज नसतो. ते एकाच माणसाकडून सारखे सारखे येत नाहीत. तेव्हा त्यातला एक गावरान छाप किस्सा सांगून लेखाचा समारोप करतो.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "कोन बोलतंय?"
मी: "तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "अवो पन तुमि कोन बोलतायसा?
मी: "अहो आधी तुम्ही सांगा तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "तुजा मुडदा बशिवला, हिरामनला बलिव आधी"
मी (घरचे आजूला बाजूला असल्याने संयम राखत): "अहो, तोंड सांभाळून बोला, हा हिरामणचा नंबर नाही"
पलीकडून: "य्ये, त्ये ठाव हाय आमास्नि, त्या मुडद्याकडं चड्डी नाय सवताची, फुन काय ठेवनार XXXXचा? बोलाव त्याला."
हा माणूस स्मशानात पावती फाडण्याच्या कामाला असावा नाहीतर प्रेतागारात, जिवंत माणसांना संबोधताना सुद्धा सारखा 'हा मुडदा' 'तो मुडदा' करत होता.

याही वेळी मीच फोन ठेऊन दिला.

इति राँग नंबर कहाणी सुफळ संपुर्ण