Saturday, May 22, 2010

कोकण यात्रा - १: केळशी – दापोली तालुक्याला पडलेली एक सुंदर खळी

कोकण म्हटलं की रम्य समुद्रकिनारा, हिरवीगार शेते, मन शांत करणारी देवस्थाने अशी दृश्ये डोळ्यासमोर येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं पाच ते सात हजार लोकवस्तीचं केळशी हे गाव अगदी असंच टुमदार आहे. आपली सुट्टी शांत वातावरणात घालवण्याची इच्छा असल्यास मुंबई व पुण्याहून सहज गाठता येणार्‍या या गावाला पर्याय नाही.

स्वतःचे वाहन घेऊन जायचे असल्यास छानच, पण घाटात वाहन चालवण्याचा अनुभव असणारा चालक बरोबर असल्यास सुरक्षेच्या दृष्टीने उत्तम. पु.लंच्या 'म्हैस' ह्या कथेत म्हटल्याप्रमाणे "गाडीला एका अर्थाने लागणारी वळणं प्रवाशांना निराळ्या अर्थाने लागायला लागली" असा प्रकार ज्या लोकांच्या बाबतीत होतो त्यांनी आधीच औषधे घेतलेली बरी.



गावातल्या मध्यवर्ती भागात रस्त्याची बिदी आणि पाखाडी अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना आहे. रेल्वे फलाटासारख्या दिसणार्‍या वरच्या भागाला पाखाडी आणि खालच्या भागाला बिदी असे म्हणतात. ह्या पाखाड्या जांभ्या दगडाचे चिरे वापरून केल्या आहेत. इथे पडणार्‍या धो धो पावसामुळे ये-जा करायला त्रास होऊ नये म्हणून ह्या पाखाड्या तयार केल्या आहेत. पवसाळ्यात बिदीवर असणार्‍या घरातील अंगणापासून ते समोरच्या पाखाडीपर्यंत छोटे पूल बांधले जातात.




वरच्या अंगणाच्या कडेपर्यंत पावसाळ्यात पाणी भरते. त्यामुळे हा भाग पावसाळ्यातल्या व्हेनिस सारखा दिसू लागतो. असं असलं तरी बोटी वगैरे चालवण्याचा विचारही नको, कारण पाऊस एकदा बदा बदा कोसळू लागला की घराबाहेरचं काहीही दिसत नाही. त्यामुळे हे अतिरेकी हवामान सहन करण्याची ताकद आणि तयारी असेल तरच पावसाळ्यात येण्याचे धाडस करा. नाहीतर घरात पत्ते कुटत बसण्याची वेळ यायची!





केळशी 'पर्यावरण जपणारे गाव' अशी आपली प्रतिमा बनवू पाहत आहे. गावात काही घरात गावकर्‍यांनी गोबर गॅसची सोय करून घेतली आहे व इतरही अनेक घरात तशी सोय करायचं घाटत आहे.


कोकणातील इतर अनेक गावांसारखाच केळशीलाही रम्य, शांत, नयनमनोहर असा समुद्रकिनारा लाभला आहे, अगदी गोव्याच्या तोडीस तोड.






नियोजित मुंबई-गोवा सागरी महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे ह्या सौंदर्याला जरा डाग लागल्यासारखं झालं असलं, तरी अजूनही त्याने आपला देखणेपणा टिकवून ठेवला आहे.

रामाचे देऊळ उजवीकडे टाकून साठे आळीतून सरळ उत्तरेकडे पुढे गेलं की आपण एका अत्यंत महत्वाच्या ठिकाणी येऊन पोहोचतो. एक नैसर्गिकरित्या तयार झालेली वाळूची टेकडी आपल्याला पहायला मिळते. शासन दरबारी असलेल्या पुरातत्व विभागाच्या दस्तैवजांनुसार ही वाळूची टेकडी साधारणपणे वास्को-दि-गामाच्या भारत भेटीच्या आसपास पंधराव्या शतकात एका सुनामीमुळे तयार झाली आहे.

या टेकडीवर सरसर चढून जाणं आणि वेगाने घसरत खाली येणं हा येथे येणार्‍या बाळगोपाळांचा आवडता उद्योग. या खेळात क्वचित मोठेही सहभागी होताना दिसतात. टेकडीवर बसून दिसणार्‍या सूर्यास्ताची शोभा काही औरच, असा या ठिकाणाला भेट
दिलेल्या पर्यटकांचा अनुभव.

सर्वप्रथम १९९० साली पुण्याच्या स.प. महाविद्यालयातील अभ्यासक प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांनी ह्या टेकडीबद्दल काही शास्त्रीय निरिक्षणे नोंदवली होती. तसेच डॉ. अशोक मराठे या पुरातत्व शास्त्रज्ञाने डेक्कन महाविद्यालयतील काही सहकार्‍यांसह या वाळूच्या टेकडी संबंधात संशोधन केले. त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या:

किनार्‍यावरील इतर टेकड्यांपेक्षा ही टेकडी वेगळी आहे. केळशी परिसरात जास्तीत जास्त ८ मीटर हून अधिक उंचीची टेकडी आढळत नसताना ही टेकडी मात्र तब्बल २८ मीटर उंच आहे. इथे सापडलेली खापरे, माशांची हाडे यांचा काळ तेराव्या शतकाचा असल्याचे संशोधनाअंती समजले.

या टेकडीत काळे-पांढरे वाळूचे थर स्पष्टपणे आढळून येतात. काही ठिकाणी राखेचे थर, कोळसायुक्त वाळू, सागरी माशांची हाडे, खापरे व मडक्यांचे तुकडे, शंख-शिंपले आणि क्वचित नाणीही आढळतात. टेकडीच्या माथ्याकडील भागत गाडल्या गेलेल्या
दोन मानवी कवट्यांच्या जवळ चांगल्या अवस्थेत असलेली तांब्याची सहा नाणी आढळली होती. त्यांच्यावर "अल् सुलतान अहमदशहा बिन अहमद बिन अल् हसन अल् बहामनी ८३७" असा मजकूर दिसतो. याचाच अर्थ ही नाणी बहामनी सुलतान अहमदशहा पहिला याने हिजरी सन ८३७ म्हणजे इ.स. १४३३ मध्ये वापरात आणली हे उघड होतं. टेकडीच्या पायथ्याशी सध्या ज्या भागापर्यंत भरतीचे पाणी येते, तेथे एक जांभ्या दगडाच्या चिर्‍यांनी बांधकाम केलेली शिलाहारकालीन जुनी पक्की विहीर आहे.

पुढे सागरी महामार्गाच्या निर्मितीसाठी आपल्या अचाट सार्वजनि़क बांधकाम विभागाने जे.सी.बी. यंत्राच्या सहाय्याने टेकडीच्या मध्यापासून काही भाग खणून काढला. परंतु पुरातत्वीय संशोधन पूर्ण झालेले नसल्याने आणि हा दुर्मिळ ऐतिहासिक ठेवा कायमचा जतन व्हावा ह्यासाठी ह्या वाळूच्या टेकडीचा विनाश थांबावा हा अर्ज न्यायालयात ग्राह्य धरला जाऊन सागरी महामार्गाच्या कामावर न्यायालयाने बंदी आणली.

गावात अनेक देवळे आहेत, पण त्यातली प्रमुख दोन – एक रामाचे देऊळ आणि दुसरे महालक्ष्मीचे.



याच दोन देवळांशी गावातले दोन प्रमुख उत्सव निगडीत आहेत – रामनवमी आणि महालक्ष्मीची यात्रा. असे म्हणतात की लागू घराण्यातील एका गृहस्थांच्या  स्वप्नात देवी आली व तिने आपण नक्की कुठे आहोत ते सांगितले. तेव्हा त्या ठिकाणी
खणले असता देवी सापडली व त्यावर देऊळ बांधण्यात आले. असेही म्हटले जाते की कोल्हापूरच्या महालक्ष्मीला केलेला नवस इथे फेडता येतो. ह्या दोन देवळांची माहिती एकत्रित देण्यामागचा हेतू हा, की रामनवमीचा उत्सव आणि महालक्ष्मीचा उत्सव हे दोन जवळ जवळ जोडूनच येतात. कोकणच्या उत्सवांची खरी मजा लुटायची असेल तर मुक्काम ठोकून हे दोन्ही उत्सव पहावेत. महालक्ष्मीच्या उत्सवाचे वर्णन एका कवीने पुढीलप्रमाणे केले आहे, त्यातूनच आपल्याला कल्पना येईल.

देवीचे गाणे - श्री महालक्ष्मी केळशी
उत्सवाचा काल सत्वरी जवळी तो आला
प्रेमभराने ग्रामस्थांसी मोद बहु झाला || धृ ||
चैत्रमासी आनंद होतो मातेच्या सदनी
पाडव्याच्या दिनी जातसे ढोल गृहवरुनी
जमती सारे मानकरी नी ग्रामस्थ दोन्ही
श्रावण करिती वर्षफळाचे अनन्य चित्तानी
नूतन वर्षी समाराधना घालीतसे कोणी
वारी नेमुनी चूर्ण सेविती गंधाची वाटणी
ऐशी रिती उत्सावासी प्रारंभ केला || प्रेमभराने _ _ _ १ ||

दुसरे दिवशी जमती सारे वारी एकत्र
गृहागृहांतून पट्टी गोळा करण्याचे सत्र
तक्रारीला जागा नाही ऐसे ते तंत्र
नियमबद्ध तो केला ऐसा उत्सव सुयंत्र
साक्ष देतसे शिक्षा करुनी त्यासी अपवित्र
सरसावे जो फुट पाडण्या देऊनी कानमंत्र
ऐशा रीती सहा दिवस तो काळ त्वरे गेला || प्रेमभराने _ _ _ २ ||

अंगणात तयार केला मंडप भोजना
सप्तमीच्या दिवशी कामे असती ती नाना
आकडी घेउनी फिरती वारी केळीच्या पाना
दोन डांगा ओढा ऐशी आज्ञा हो त्यांना
हक्काचा तो फणस द्यावा त्वरित महाजना
सायंकाळी भाजी चिरण्या भगतांच्या ललना
पातवड्याचे खोरे झाले तयार सेवेला || प्रेमभराने _ _ _ ३ ||



अष्टमीच्या दिवशी चाले भोजन जोरात
प्रसाद भक्षण करा यथास्थित गोडी बहु त्यात
साठे-आखवे-परांजपे हे वाढती पंक्तीत
प्रसादाचे खोरे जाती इतर ज्ञातीत
फणस भाजी, वांगी हरभरे पातळ भाजीत
पुरण लोणचे यांची गोडी नाही वर्णवत
सारच तो दिमाख चाखुनी जीव बहु धाला || प्रेमभराने _ _ _ ४ ||



कलमदानी मंडपात सहा बैठका
हरिदासाची मध्ये आणि समोर बैदिका
उजवी बाजू असे राखिली ग्रामस्थ लोकां
डावे बाजूस मानकर्‍यांची बसते मालिका
लामणदीप आणि समया तेवती चंद्रिका
दोन बैठका वाढून दिधल्या इतर त्या लोकां
कीर्तनासी प्रारंभला रंग बहु आला || प्रेमभराने _ _ _ ५ ||

गोंधळाची वेळ जाहली ऐका वृतांत
मधे गोंधळी वामभागी पुजारी तिष्ठत
चांदीची ती दिवटी बुधली विलसे हस्तात
सभोवताली साथ चालते इतर चौघांत
गोंधळगीत चालले ते ऐसे रंगात
पूजा जाहली तेव्हा केले दीप प्रज्वलीत
गीत संपले दीप समूह तो पारावर गेला || प्रेमभराने _ _ _ ६ ||

एकदिशी उत्सवात दिवस भाग्याचा
कामे असती बहु त्या दिनी वेळ महत्वाचा
दागदागिने घातलेला नवीन झिलईचा
मुखवास तो नेऊन ठेविती पेटीत अंबेचा
अबदागीर वाजंत्री नी डंका बाराचा
वारा चवर्‍या उष्मा होतो प्रवास लांबीचा
वार्षिक राज्या पाहुनी भाविक मानस गहिवरला || प्रेमभराने _ _ _ ७ ||

हंड्या ग्लासे छते लावुनी करिती तो छान
कलमदानी मंडप होतो शोभायमान
मखरताटी रथपुतळीची मूर्ती ठेऊन
आत राणी राज्या करीतसे जणू संस्थान
श्री निसबत कारभारी सही संपूर्ण
रुप्या ताटी चांदीची ती समई ठेऊन
धामधुमीचा दिवस ऐसा वेगे तो गेला || प्रेमभराने _ _ _ ८ ||

द्वादशीला लिखिते जाती तेरा ग्रामात
अजरालय मुळवट वेळवट यांत
त्रयोदशीला अमुची यात्रा त्वरे पार पडत
भालदार विडेवाटणी सेवक लोकांत
प्रातःकाली बहिरी दर्शन जन संघ निघत
चांदीचा मुखवास लागला मूर्तींना आत
पावलीची ओढ लागली ढोल्या गुरवाला || प्रेमभराने _ _ _ ९ ||

चतुर्दशीला जेवणवाडी तयार ती केली
रथ स्थापना करुनी मंडळी सत्वर परतली
भोई जेवणकीस तयारी देवळात गेली
उभाघर, तिठ्ठे आळी वाढू लागली
त्रयोदशी नी चतुर्दशी या दोन्ही दिनकाळी
चीरकदान दिवल्याचे ते मंडप भवताली
चांदीचा मुखवास लागला मंडप स्वमिनीला || प्रेमभराने _ _ _ १० ||

आज बलुते जाति सर्वही सेवक लोकांत
जोशी, खरवळे, शिधये, गद्रे ब्राह्मण ते त्यांत
क्षेत्रपाल नी रथपुतळीला केळवण होत
वेळातटीचे लोक उतरती गद्रे गृहात
चतुर्दशीचे शुभ्र चांदणे पडले प्रशांत
आजारालययिचे लोक तळ्यावर बसुनी हवा खात
डोळांभरुनी पाहुनी घ्याहो सत्वर मूर्तीला || प्रेमभराने _ _ _ ११ ||

वेळ जाहली मंडपी आले परके ग्रामस्थ
आदर सत्कारांची त्यांच्या धावपळ ती होत
ठायी ठायी उभे राहुनी वृद्ध जाणिस्त
गुलाब अत्तर वार्‍यांकरवी त्यांस देववीत
हजार त्यांचे मानकरी जे विडा उचलीत
भालदार हो प्रवेश करिती वाजत गाजत
चकित व्हावे पाहुनी ऐशा कडक शिस्तीला || प्रेमभराने _ _ _ १२ ||

पहाटेची वेळ जाहली गोंधळ उतरला
सोनियाचा कळस, आरसा, रथ सज्ज झाला
चांदीचा तो दीप लागे आज आरतीला
मंडपात ताटामधुनी गुलाल उधळीला
"आई जगदंबे अंबाबाई" भजन घोष झाला
रथाभोवती चंद्रज्योती पुष्पनळा फुलला
रथयात्रेचा पौर्णिमेचा दिवस उजाडला || प्रेमभराने _ _ _ १३ ||



पौर्णिमेच्या मंगल आणि रम्य प्रातःकाळी
रथाभोवती जमते ब्राह्मण तरुणांची टोळी
"दुर्गे दुर्गट वारी" ऐशी आरती ती सगळी
घाईघाईने खांदी घेती तेव्हा रथपुतळी
रेटारेटी कौतुक पाहे जनता ती भोळी
"हर हर महादेव" ऐशी उठे आरोळी
हौस फिटली ह्या वर्षीची रथ पुढे गेला || प्रेमभराने _ _ _ १४ ||

पाखाडीशी भोई ज्यात तयार ते असती
ब्राह्मण जाऊनी डुंगवाले रथ पुढे नेती
मिरवत मिरवत आठ वाजता गद्र्यांच्या पुढती
डेल्यावरती घेत बसला तेव्हा विश्रांती
पीठाचे ते दिवे लाउनी स्त्रिया पूजा करिती
दही पोहे थंडगारसे भोई सेविती
प्रसाद खाता "भले ग भोई" शब्द तदा स्फुरला || प्रेमभराने _ _ _ १५ ||



महाजन सदनी प्रसाद आज पुरणपोळीचा
वारी त्यांना लाभ देती आपल्या पंक्तीचा
वेळ असतो तब्बल तेथे तीन तासांचा
उपाध्याय पूजा सांगण्या हक्क स्त्रियांचा
प्रवास संपे ऐशा रीती सर्व उभागराचा
साठे आळी फिरुनी आला उलटा रथ साचा
नवागरसि भोई आले आता सेवेला || प्रेमभराने _ _ _ १६ ||

नापित पूजा घेउनी फिरला परांजपे वाडी
हक्क पुजेचा जुना स्त्रियांच्या फडक्यांच्या फेडी
होळी बहिरी पेठ आणि पिंपळ पिछाडी
दोन भाया तेकुनी तेथे कुंभार वाडी
त्वरे घेउनी इतर स्थळे आला आघाडी
शेतामध्ये पुतळादेवी त्वरे रथ सोडी
इकडे म्हणती आता रथ जड आला || प्रेमभराने _ _ _ १७ ||

गावाच्या दक्षिणेस व देवीच्या देवळाच्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी
सोळाव्या शतकात बांधलेला याकुब बाबांचा दर्गा आहे. महाराजांनी यांना
गुरुस्थानी मानले होते व आपल्या कोकण दौर्‍या दरम्यान केळशीस येऊन
त्यांचे आशीर्वादही घेतले होते असे म्हटले जाते.

केळशीला कधी जावे: अक्षरशः वर्षातून कधीही जावे. तरीही सांगायचे झाल्यास महालक्ष्मीच्या यात्रेदरम्यान व डिसेंबर-जानेवारी ह्या थंडीच्या महिन्यांत जाणे सगळ्यात चांगले.

जवळची गावे: आंजर्ले - इथलीही यात्रा पाहण्यासारखी असते; आडे, उटंबर, दापोली, करडे, आसूद, हर्णै, मंडणगड, वेळास,
बाणकोट, श्रीवर्धन.

प्रसिद्ध व्यक्तिमत्वे आणि केळशी:
  • कॅम्लिनचे संस्थापक श्री. नानासाहेब दांडेकर हे केळशीचे.
  • लोकमान्य टिळक यांचे आजोळ.
  • आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा-पणजोबा केळशीचे.
  • मध्यप्रदेशात मराठी झेंडा फडकत ठेवणार्‍या माजी मंत्री व खासदार
    सुमित्रा महाजन यांचं सासरघरचं गाव हे केळशी.
राहण्याची सोयः
केळशीमध्ये मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
पुढील सर्व ठिकाणी मद्यपान, धूम्रपान व मांसाहार निषिद्ध आहे.

१) श्री. गिरीश बिवलकर (विष्णू): ०२३५८-२८७३१२.
इथे मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.
कुटुंब असल्यास प्राधान्य.
श्री. बिवलकर हे देवीचे पु़जारी .

२) त्यांचे शेजारी श्री. वसंत गोखले (फक्त राहणे): ०२३५८-२८७२६९; ९४२००४०९६९.

३) श्री. वर्तक संचालित 'पुण्याई' हॉटेल: संपर्क श्री. वर्तक ०२३५८-२८७२१७.
इथेही मुक्काम, न्याहारी, चहा-पाणी, भोजन यांसह सर्व सोय होऊ शकते.

४) श्री. बगाराम महाजन, श्रीराम मंदिराजवळ यांचेकडे फक्त भोजनाची सोय
होऊ शकते.

५) कोकणातही आपल्या शहरातल्या चकाचक सदनिकेत राहण्याचा अनुभव हवा असल्यास श्री. यनगुल यांच्या मालकीचे व श्री. विजय जोशी यांचे व्यवस्थापन असलेले एन्-गुलमोहर. संपर्क ०२३५८-२८७३७१.

५) आनंदी निवास (प्रोप्रा. प्राची प्रसाद विद्वांस)
    भ्रमणध्वनी: ९९२१ ६७७ ०९०
    पुणे: ०२०-२४२५ ४४ ७५
   
६) सुरभी (प्रोप्रा. नरेश वर्तक)
    केळशी:०२३५८-२८७२४०
    भ्रमणध्वनी: ९६२३ ११३ १६२; ९८२० ४४१ ९८५



पुण्याई व एन्-गुलमोहर समोरासमोर आहेत.

तर मग, येताय नं आमच्या केळशीला ?

संपूर्ण पिकासा अल्बम पहायला पुढील चित्रावर टिचकी मारा:




आभार प्रदर्शनः माझी आजी श्रीमती कल्पना जोशी, जिच्या संग्रहात देवीच्या उत्सवाची ती कविता सापडली.

संदर्भः
टेकडीबद्दल: प्र. के. घाणेकर यांचे लेखन.

अजि म्या पु.ल. पाहिले




महाविद्यालयात असताना डोक्यात अनेक खुळं घुसतात, ठाण मांडून बसतात आणि मग जे काही ठरवलं असेल ते तडीस नेल्याखेरीज मन स्वस्थ बसू देत नाही. ते वयच तसं असतं, मग मी तरी त्याला अपवाद कसा असणार? त्यातलंच एक वेड म्हणजे माझे आवडते लेखक आणि अवघ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांना भेटायचं. पण माझ्यासमोर मूलभूत का काय म्हणतात तसा प्रश्न उभा होता की "कसं?"

वार्षिक परिक्षा संपल्यावर एकदा 'गणगोत' हे पुस्तक वाचत बसलो असता अचानक मनात विचार आला.....महाविद्यालयालयीन किंवा ग्राम्य भाषेत सांगायचं तर 'डोक्यात किडा वळवळला'...की आपण यांना भेटायला हवं, नव्हे भेटायचंच.

पुस्तक वाचून संपवलं आणि मेजावर ठेवणार तोच माझ्या हातातून सटकलं. खाली पडू नये म्हणुन पटकन दोन बोटात धरलं तेव्हा उचलताना पुस्तकाच्या सुरुवातीला पुस्तकाचे हक्क वगैरे लिहीलेल्या पानावर पु.लं.चा पुण्यातला पत्ता दिसला आणि माझी ट्युब पेटली. सुट्टीत पुण्याला मामाकडे जाणार होतोच. म्हटलं तेव्हा सरळ त्यांच्या घरी जावं. पण मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरात त्यांची घरं असल्याने ते नक्की कुठे असतील हे कसं समजणार ही सुद्धा समस्या होतीच. शिवाय फोन करून भेट ठरवायला मी काही पत्रकार नव्हतो किंवा कुठला कार्यक्रम ठरवायला जाणार नव्हतो. पण माझ्या नशीबात त्यांचं दर्शन घडणं लिहिलं होतं बहुतेक. कारण दुसर्‍याच दिवशी एका वर्तमानपत्रात ते कुठल्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात असल्याचं वाचनात आलं आणि ठरवलं की ह्या पुण्याला मामाकडे जाईन तेव्हा आगाऊपणा करून सरळ त्यांच्या घरीच जायचं.

मग ४ जून १९९६ च्या गुरुवारी दुपारी साधारण चार-साडेचारच्या सुमारास मी आणि माझा मामेभाऊ सुजय असे पु.ल. रहात असलेल्या रूपाली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या सदनिकेसमोर उभे राहिलो. आम्ही भलतं धाडस केलं होतं खरं, पण पु.लं.ना आमच्यासारख्या आगाऊमहर्षींकडून त्रास होऊ नये म्हणून सदैव सजग असणार्‍या सुनीताबाई आम्हाला आत तरी घेतील की नाही अशी भीती होती. "शेवटी आलोच आहोत तर बेल तर वाजवूया, फार फार तर काय होईल, आत घेणार नाहीत, भेटणार नाहीत, एवढंच ना" अशी स्वत:चीच समजूत काढून आम्ही धीर केला आणि बेल वाजवली". दार उघडलं गेलं आणि........

..........."अजि म्या ब्रह्म पाहिले " अशी अवस्था झाली. समोर साक्षात पु.ल.!

मी भीत भीत म्हणालो, "आम्ही मुंबईहून तुम्हाला भेटायला, तुमची स्वाक्षरी घेण्यासाठी आलो आहोत, आम्ही येऊ का?". मी मनात हुश्श केलं.

"आत या," पु.ल. म्हणाले. आम्हाला हायसं वाटलं. आम्ही दोघांनी त्यांचा प्रत्येक शब्द मनात साठवून ठेवायचा असं ठरवलं होतं. खरं सांगतो, त्यांनी त्याक्षणी "चालते व्हा" असं म्हणाले असते तरी आम्हाला तेवढाच आनंद झाला असता.

थोडं विषयांतर होतंय, पण एक उदाहरण देऊन कारण सांगतो. इथे मला लौकीकदृष्ट्या नुकसान झालं तरी त्याचा फायदा कसा करून घ्यावा ह्याच्याशी संबंधीत एक किस्सा आठवला.

गॅरी सोबर्स यांनी इंग्लंड मधल्या एका काऊंटी सामन्यात माल्कम नॅश नामक गोलंदाजाला एका षटकात, म्हणजेच सहा चेंडूंवर, सहा षटकार मारले. पु.लं.नीच एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे 'मुंबईत क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे' तसा तो राणीच्या देशातही असावा, कारण नॅशने आपली गोलंदाजी धुतली गेली म्हणून रडत न बसता त्याला ते सहा षटकार कसे मारले गेले ह्याचं रसभरीत वर्णन करणारे कार्यक्रम (टॉक शो) सादर करून त्याच्या आख्ख्या क्रिकेट कारकिर्दीत कमावले नसतील इतके पैसे कमावले.

तद्वत "आम्हाला हाकलले, पण कुणी? प्रत्यक्ष पु.लं.नी" असा मित्रमंडळींमध्ये, खाजगी का होईना, कार्यक्रम त्यांना 'वीट' येईल इतक्या वेळा सादर केला असता

आम्हाला आत यायला सांगून पु.ल. सोफ्यावर बसले. त्यांच घर अगदी त्यांच्यासारखंच साधं आणि नीटनेटकं. समोर भिंतीवर चार्ली चॅपलीनचं एक पोस्टर. आम्ही आपापल्या कागदावर त्यांची स्वाक्षरी घेतली. मी माझ्या हातातल्या कॅमेर्‍याकडे बोट दाखवून त्यांना "आमच्याबरोबर तुमचा एक फोटो काढू का?" अशी विनंती केली. पण त्यांनी "नका रे, आजारी माणसाचा कसला फोटो काढायचा" असं म्हणून नकार दिला. मी थोडा खजील झालो, कारण त्यांचे गुढगे दुखत होते हे त्यांच्या चालण्यातून दिसत होतं. त्यांनी असं म्हणताच सुजयच्या चेहर्‍यावर एक नाराजीची सुक्ष्म लकेर उमटलेली मला दिसली. "ठीक आहे, माफ करा. स्वाक्षरी बद्दल धन्यवाद" असं कॄतज्ञतेने म्हणून आम्ही त्यांच्या पाया पडलो. सुनीताबाईंकडे पाणी मागितलं व पिऊन लगेच निघालो.

माझ्यासाठी "आता मी मरायला मोकळा" असं वाटण्याचा तो क्षण होता.

"काय हे, फोटो का नाही काढून दिला, पु.ल. आहेत ना ते", आम्ही इमारती बाहेर आल्यावर सुजयची चिडचिड बाहेर पडली. लहान मूल रुसल्यावर कसं दिसेल तसे हुबेहुब भाव त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. "अरे सुजय", मी म्हणालो, "तू एक लक्षात घे, ते पु.ल. असले तरी भारतीय रेल्वे किंवा एस.टी. सारखी 'जनतेची संपत्ती' नाहीत. त्यांची प्रायव्हसी महत्त्वाची नाही का? आपण आगाऊपणा करून भर दुपारी गेलो खरं, नशीब सेलस्मन लोकांना हाकलतात तसं आपल्याला हाकलून नाही दिलं. उगीच कुणालाही फोटो कोण काढू देईल?" आता सुजयची नाराजी थोडी कमी झालेली दिसली.

"आणि असं बघ, काही देवळात फोटो काढायला बंदी असते की नाही, तसंच हे ही समज. ह्या साहित्यातल्या आपल्या दैवताचा फोटो आपल्याला काढता आला नाही असं समज. आणि त्यांनी आपल्याला प्रसाद दिलाय की!"

"प्रसाद?" सुजय बुचकळ्यात पडला. "अरे आपल्याकडे ह्या साहित्यातल्या देवाचा स्वाक्षरीच्या रूपाने प्रसाद आहेच की". असं म्हणताच सुजयची खळी खुलली.

मी पु.लं.ना प्रत्यक्ष भेटलो हे ऐकल्यावर द्राक्ष आंबट लागलेली एक कोल्हीण...आपलं...माझी एक मैत्रीण म्हणाली, "हँ, त्यात काय पु.ल. आपल्या पुस्तकातून सगळ्यांनाच भेटत असतात". खरय की - लेखक आणि कवी त्यांच्या पुस्तकातून, खेळाडू मैदानात किंवा टी.व्ही. वरील थेट प्रक्षेपणातून आणि कलाकार त्यांच्या कलेतून सगळ्यांनाच भेटत असतात. पण यांपैकी आपली आवडती व्यक्ती प्रत्यक्ष समोरासमोर भेटावी, त्या व्यक्तीशी थोडंसं का होईना बोलायला मिळावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. पण ते भाग्य फार थोड्यांच्या नशीबी येतं आणि अशा नशीबवान लोकांपैकी मी एक आहे ही एक खास गोष्ट खचितच आहे.


मुंबईला परतताच वर्तमानपत्रातला पु.लं.चा एक फोटो त्या कागदावर चिकटवून तो स्वाक्षरीचा कागद फ्रेम करून घेतला. वरच्या चित्रात दिसणारी ती फ्रेम पुण्यातील माझ्या घरात त्या जादूई क्षणांची आजही आठवण करून देते आहे.

मी ज्या दिवशी पु.लं.ना भेटलो तो दिवस ४ जून आणि त्यांची पुण्यतिथी १२ जून हे दोन्ही दिवस जवळ आले आहेत असं लक्षात आलं आणि ह्या आठवणी सहज शब्दबद्ध झाल्या. तुम्हाला कुणाला पु.ल. भेटले असल्यास तुम्हीही तुमच्या आठवणी सांगा.

झुरळ, गणित आणि तर्कशास्त्र

अ = ब,
ब = क,
म्हणून अ = क? नाही!!

कारण...
बायको झुरळाला घाबरते,
झुरळ आपल्याला घाबरते,
म्हणून बायको आपल्याला घाबरते का? नाही!!
ती घाबरते, झुरळालाच!

राँग नंबर

वेळः कै च्या कै. राँग नंबरला वेळ असते का? साधारण आपला आराम करायची वेळ असते तेव्हाच लोकांना हवे असलेले बरोबर नंबर राँग लागतात. उदा. रविवार पहाटे आठ. हो, बरोबर वाचलंत तुम्ही. पहाटे आठ. रविवारी ह्या वेळेला पहाटच असते की.

फोन: आमचा लँडलाईन


















राँग नंबर (१) - करंबेळकर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
एक स्त्री: "हॅलो, करंबेळकर का?"
मी: "नाही, राँग नंबर"
स्त्री: "ओह, सॉरी हां"

काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर आहेत का?"
मी: "नाही, राँग नंबर"
बुवा: "बर्र बर्र बर्र, सॉरी, मग कुणाचा आहे हा?"
मी: "तुम्हाला करंबेळकरांशी बोलायचंय?"
बुवा: "हो"
मी: "हे त्यांच घर नाही"
बुवा: "मग कुणाचं आहे"
मी: "माझं आहे"
बुवा: "तुम्ही त्यांचे शेजारी का?"
मी: "नाही, या नावाचं कुणीच ह्या इमारतीत राहत नाही"
बुवा: "अरे बापरे, सॉरी हां"

पुन्हा काही दिवसांनी.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पुन्हा तीच स्त्री: "करंबेळकर आहेत का?"
मी: "नाहीत"
स्त्री: "कुठे गेलेत?"
मी: "माहीत नाही. आम्ही त्यांना ओळखत नाही. राँग नंबर"
स्त्री: "ओह हो! राँग नंबर लागला परत!! सॉरी अगेन हां"

मागल्या पानावरून पुढे.....

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
एक बुवा: "हॅलो, करंबेळकर का हो?"
मी: "नाही हो"

अनेकदा असे फोन आल्यामुळे एव्हाना मी जवळ जवळ रडकुंडीला आलो होतो.
कारण पलीकडून...बुवा (बहुतेक बायकोला उद्देशून): "हें, हें, हें, अगं परत 'तिथेच' फोन लागला"

मी: "करंबेळकरांचा नंबर काय आहे?"
बुवा: "अमुक अमुक"
मी: "हा नंबर बरोबर आहे, पण इथे करंबेळकर नक्की राहत नाहीत"
बुवा (बायकोला उद्देशून): "अगं, एकदा मिसेस. करंबेळकर आहेत नं, त्यांना सरळ पत्रच पाठव"
(मला उद्देशून): "सॉरी हं"

पुढचे अनेक दिवस हे दोघं, जे नक्की नवरा-बायको असावेत, सारखे आळीपाळीने फोन करत होते. बरं ते प्रत्येक वेळी अत्यंत सौजन्याने बोलत आणि राँग नंबर आहे हे समजलं की तितक्याच नम्रतेने सॉरी म्हणत, त्यामुळे त्यांच्यावर मनसोक्त वैतागताही येत नव्हतं. त्यांनी माझं आणि मी त्यांचं नाव विचारण्याची तसदी घेतली नव्हती. आम्ही 'करंबेळकर' ह्या एकाच 'धाग्याने' बांधले गेलो होतो! मी तर त्यांना सरळ काका-काकू म्हणू लागलो होतो. एव्हाना त्या दोघांनाही माझा आवाज माहीत झाला होता बहुतेक, कारण पुढच्या वेळी:

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
काकू: "हॅलो, राँग नंबर बोलताय का?"



~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (२) - यासीन भाई

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो, बोला"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
मी: "काSSSSय?"

मी प्रचंड दचकलो, चुकून जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या यासीन मलिकचा फोन माझ्या घरी लागला की काय? किंवा एखाद्या भाईचा फोन असावा काय? पण मी व्यावसायिक नाही आणि चित्रपटश्रुष्टीत नाही आणि बिल्डर तर नाहीच नाही. तेव्हा मला फोन करून जो कोण भाई असली कामं करतो त्याचे फोनचे बिल वाढून त्याचेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचं लक्षात आलं आणि जीव भांड्यात पडला. तरी म्हटलं एकदा खात्री करुन घ्यावी.

पलीकडून: "हॅलो, हॅलो, यासीन भाई है क्या?"
मी: "यासीन कौन"
पलीकडून: "यासीन शेख तारवाला"
हे आडनावाच्या शेवटी "वाला" असलेल्यांची एक गडबड असते. त्यांचं ते आडनाव आहे की धंदा समजत नाही. असो. विषयांतर नको.

मी (मनातल्या मनात, "मग ठीके"): "राँग नंबर"
पलीकडून दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

साधारण आठवड्याभराने एके दिवशी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई को बुलाव"
च्यामारी, मी काय ह्याच्या तीर्थरूपांचा....नाही, त्याला काय म्हणतात उर्दूत? हां, आठवलं, वालीद साहेबांचा नोकर असल्यासारखा मला हुकुम देत होता.
मी (साहजिकच चिडून): "नहीं बुलाउंगा"
पलीकडून: "कायकू?"
मी: "राँग नंबर"
पलीकडून आधीपेक्षाही दाणकन फोन ठेवल्याचा आवाज.

आणखी काही दिवसांनी........

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई कैसे हो?"

अरेच्च्या! आता हा तर आपण यासीन भाईशीच बोलत असल्याचं गृहीत धरून हा सुरु झाला की.

मी: "हॅलो, मै यासीन भाई नहीं है"
पलीकडून: "तो वो किधर है?"
मी: "मालूम नै"
पलीकडून: "कायकू मालूम नै?"
मी: "ये राँग नंबर है"
तो माणूस पब्लिक फोनवरून बोलत असावा, कारण याखेपेला फोन ठेवल्याचा इतका मोठा आवाज झाला की त्या फोनची नक्की शकलं झाली असणार.

असेच काही दिवसांच्या अंतराने फोन येत गेले. आता मी पुरता वैतागलो होतो. त्यामुळे पुढच्या वेळी फोन आला की ह्या म्लेंछांच्या अवलादीची पुरती फुलटू करायची असं ठरवलं.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "सलामवालेकुम, यासीन भाई है क्या?"
ह्म्म्म, आत्ता कसा सरळ बोलतोय.
मी: "नहीं"
पलीकडून: "किधर गये है?"
मी: "उपर"
पलीकडून: "तो निचू बुलाएंगे क्या?"
मी (आवाजात पुरेसे कारुण्य आणून): "उपर मतलब उपर नै"
पलीकडून: "उपर मतलब उपर नै? मतलब?"
मी (आणखी कारुण्य): "आपको मालूम नै क्या? कमाल है!"
पलीकडून: "क्या हुवा?"
मी: "यासीन भाई तो चार दिन पहले ही अल्ला को प्यारे हो गये"
पलीकडून: "आँ"
ह्या वेळी मीच आधी फोन ठेवला.
या नंतर मात्र मला या माणसाचा पुन्हा फोन आला नाही.


<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>

राँग नंबर (३) - फूड कॉर्नर

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर?"
मी: "काय कोरणार?"
पलीकडून: "कोरणार नाही हो, फू-ड कॉ-र-न-र"
मी: "नाही, राँग नंबर"
पलीकडून: "अरे" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: "हॅलो, फूड कॉर्नर क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो ये कहांका नंबर है?"
मी: "घर का है"
पलीकडून: "किसके घर का?"
मी: "मेरे"
पलीकडून: "आप फूड कॉर्नर के मालिक है क्या?"
मी: "नहीं"
पलीकडून: "तो कायको मेरा टाईम वेस्ट किया?"
मी: "आपने किया मेरा टाईम वेस्ट"
पलीकडून: "क्या आदमी है" आणि फोन ठेवल्याचा आवाज.

असेच फोन नियमितपणे येत गेले. कधी कधी एकच ग्राहक परत परत फोन करायचा. एक्स्चेंज मध्ये तक्रार करा सांगून काही फायदा झाला नाही. शेवटी मी त्या यासीन शेख साठी वापरलेली कल्पना वेगळ्या तर्हेने वापरायची ठरवली. आणखी काही दिवसांनी..........

ट्रिंग ट्रिंग.
मी: "हॅलो"
पलीकडून: ""हॅलो, छे अंडे और ब्रेड भेज दो"
च्यामारी, हे जास्त होतंय. असो. मी सरळ ऑर्डर घ्यायला सुरवात केली.
मी: "किधर"
पलीकडून: "D-8 में भेज दो, कितना टाईम लगेगा?"
मी: "आधा घंटा"
पलीकडून: "आSSSधा घंटाSSS, ज्यादा से ज्यादा दस मिनिट में चाहिये"
त्या बाईने इतका मोठा हेल काढला की मला वाटलं हिला दहा मिनिटात अंडी नाही मिळाली तर हृदयविकाराचा झटका वगैरे येतो की काय!
मी: "ठीक है, भेज देता हुं" (पाठवतोय मी, घंटा! बस बोंबलत)

अशा दहा पंधरा ऑर्डर घेतल्यावर एकदा फूड कॉर्नरच्या मालकाने फोन केला. त्याला आमचा नंबर कसा मिळाला आणि आम्ही कोण कसं समजलं देव जाणे. त्याला बहुदा वाटलं त्याच्या शेजारी एक दुसरं फास्टफूड दुकान उघडलं होतं त्याचे आम्ही मालक. शेवटी सगळं रामायण सांगितल्यावर त्याने सरळ चक्क फोन नंबर बदलला आणि आमचा त्रास संपला.

~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~ ~

राँग नंबर (४) - कोण बोलतंय?

हा एक अशक्य प्रकार आहे. अशा फोनना इलाज नसतो. ते एकाच माणसाकडून सारखे सारखे येत नाहीत. तेव्हा त्यातला एक गावरान छाप किस्सा सांगून लेखाचा समारोप करतो.

ट्रिंग ट्रिंग
मी: "हॅलो"
पलीकडून: "कोन बोलतंय?"
मी: "तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "अवो पन तुमि कोन बोलतायसा?
मी: "अहो आधी तुम्ही सांगा तुम्हाला कोण हवंय?"
पलीकडून: "तुजा मुडदा बशिवला, हिरामनला बलिव आधी"
मी (घरचे आजूला बाजूला असल्याने संयम राखत): "अहो, तोंड सांभाळून बोला, हा हिरामणचा नंबर नाही"
पलीकडून: "य्ये, त्ये ठाव हाय आमास्नि, त्या मुडद्याकडं चड्डी नाय सवताची, फुन काय ठेवनार XXXXचा? बोलाव त्याला."
हा माणूस स्मशानात पावती फाडण्याच्या कामाला असावा नाहीतर प्रेतागारात, जिवंत माणसांना संबोधताना सुद्धा सारखा 'हा मुडदा' 'तो मुडदा' करत होता.

याही वेळी मीच फोन ठेऊन दिला.

इति राँग नंबर कहाणी सुफळ संपुर्ण

क्रिकेट: पळा पळा, कोण पुढे पळे तो... - एका धावचीतची कहाणी

क्रिकेटच्या इतिहासात फलंदाज आपल्या आचरटपणामुळे धावचीत झाल्याच्या अनेक मजेशीर घटना ठासून भरल्या आहेत, पण त्यातल्या एकालाही ओव्हल मैदानावर ८७ वर्षांपुर्वी घडलेल्या ह्या घटनेची सर नाही.

अनेक फलंदाजांनी अत्यंत वाईट 'धाव'पटू म्हणुन 'नाव कमावलं' असलं तरी डेनिस कॉम्पटन आणि इंझमाम-उल-हक यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. आणि हो, आपले गांगुली महाराज सुद्धा आहेत की. पण जून १९२२ मधे त्या दिवशी ओव्हल वर जे काही झालं ते पाहिलं असतं तर त्यांनाही 'आपण तितके काही वाईट नाही' असं वाटल्याशिवाय राहिलं नसतं!

वार्सिटी मॅचच्या साधारण एक पंधरवडा आधीची ही गोष्ट आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने कमकुवत सरे विरुद्ध ८ बाद २२१ अशी मजल मारली होती, त्यावेळी दुपारच्या सुमारास एकोणीस वर्षांचा टॉम राईक्स (Tom Raikes) हा नवीन फलंदाज आर.सी. रॉबर्टसन-ग्लास्गो (RC Robertson-Glasgow) याला साथ द्यायला खेळपट्टीवर आला. विन्चेस्टर सोडल्यानंतर राईक्स याचं हे पहिलंच वर्ष होतं तर त्याच्याहून एक वर्ष जेष्ठ असलेला रॉबर्टसन-ग्लास्गो हा ऑक्सफर्ड इलेव्हन मधील त्याच्या तिसर्‍या मोसमात खेळत होता. या जोडीने संघाच्या धावसंख्येत चार धावांची भर घातली असताना रॉबर्टसन-ग्लास्गोने चेंडू लाँग-ऑनकडे हलकेच तटवला आणि एक सोपी धाव घ्यायला सरसावला. पहिली धाव संथपणे घतल्यानंतरही दोघांनी दुसरी धाव घेण्याचा निर्णय घेतला. राईक्स आधी तयार नव्हता पण जरा का-कू केल्यावर दुसरी धाव घ्यायला तयार झाला. "तेव्हा", रॉबर्टसन-ग्लास्गोच्या शब्दात सांगायचे तर "आक्रीत घडलं".

ते दोघं खेळपट्टीच्या मध्यावर एकमेकांना सामोरे आले झाले असता (टाईम्स अनुसार) रॉबर्टसन-ग्लास्गोचा किंवा (रॉबर्टसन-ग्लास्गोच्या मते) राईक्सचा विचार बदलला, आणि ह्या दोघा सदगृहस्थांनी पेव्हिलियन एंडकडे एकत्र धाव घेतली.

असेच काही यार्ड धावल्यावर राईक्सला आपली घोडचूक लक्षात आली आणि त्याने वळून उलट दिशेला वॉक्सहॉल एंडकडे सुरक्षित पोहोचायच्या उद्देशाने धावायला सुरवात केली. त्याच वेळी रॉबर्टसन-ग्लास्गोने राईक्सचाच कित्ता गिरवला आणि अशा तर्‍हेने ऑक्सफर्डचे हे दोघे विद्वान पुन्हा म्हणजे दुसर्‍यांदा एकाच दिशेने धावू लागले!! यावर रॉबर्टसन-ग्लास्गोने आपल्या लेखात लिहिलंय की "मी त्याचं अनुकरण केलं, पण क्रीजवर अंमळ गर्दी आहे असं वाटल्याने मी उलट दिशेने धाव घेतली". यानंतर फारच धम्माल झाली. टाईम्स ने वर्णन केल्याप्रमाणे "उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या प्रेक्षकवर्गाला" आणखी एक धक्का बसायचा होता. रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोन दुर्दैवी(!) जीव जवळ जवळ एकाच वेळी पुन्हा वळले आणि "आपापल्या" क्रीज मध्ये "सुरक्षित" पोहोचण्यासाठी एकाच दिशेने तिसर्‍यांदा धावले.

या दोघांच्या चाळ्यांनी वेड लागायचे तेवढे शिल्लक राहिलेल्या सरे संघाच्या क्षेत्ररक्षकांनी या विनोदनिर्मिती मध्ये आपल्या भयानक क्षेत्ररक्षणाने हातभार लावला. लाँग-ऑन कडून येणारा थ्रो नीट नव्हता आणि चेंडू मिड-ऑनच्या हातात विसावला. मिड्-ऑन क्षेत्ररक्षकानेही चेंडू हाताळण्यात चूक केली. त्याच्या गोंधळात गोलंदाज आणि विकेटकीपर यांच्याकडून येणार्‍या "इकडे टाक" "इकडे फेक" च्या असंख्य हाकांनी भर घातली. यामुळे त्याच्या हातून चेंडू दुसर्‍यांदा पडला. एकदाचा त्याने गोलंदाजाकडे चेंडू फेकला आणि गोलंदाजाने बेल्स उडवल्या. पण हाय रे कर्मा! त्याला रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोघंही तिथेच क्रीजमध्ये धापा टाकत उभे असलेले दिसले! गोलंदाजाने तत्परतेने दुसर्‍या टोकाला चेंडू विकेटकीपर हर्बर्ट स्ट्रडविक (Herbert Strudwick) याच्याकडे फेकला आणि हर्बर्टने बेल्स उडवल्या.

अजूनही गोंधळ संपला नव्हता. कुणीतरी धावबाद झालंय हे नक्की होतं, पण नेमकं कोण याबद्दल कुणालाच खात्री नव्हती कारण रॉबर्टसन-ग्लास्गो आणि राईक्स हे दोघंही पॅव्हिलियन एंडला "सुरक्षित" उभे होते.

त्यात दोन्ही पंच इतरांसारखेच गोंधळलेले होते. दोघेही येडबंबू सारखे हसत चेहेर्‍यावर एक भले मोठे प्रश्नचिन्ह घेऊन उभे होते. एका (दंत)कथेनुसार तर फलंदाजांनी कोणाला बाद ठरवावे यासाठी चक्क नाणेफेक (टॉस) करण्याचा निर्णय घेतला होता, पण तेवढ्यात उलट दिशेने धावण्याचा पहिला निर्णय राईक्सचा असल्याचं रॉबर्टसन-ग्लास्गोच्या लक्षात आलं, आणि राईक्सने मैदान सोडलं.

बिली हिच हा सरे संघातील एक जेष्ठ खेळाडू नंतर रॉबर्टसन-ग्लास्गोच्या कानात हळुच कुजबुजला "तुला माहित्ये नं खरंच कोण बाद होतं ते?"

पण खरी गोष्ट अशी होती की खरंच कुणालाच माहीत नव्हतं हो!!!
-------------------------------------------------------------------------------------संदर्भ: 46 Not Out by RC Robertson-Glasgow (Sportsman's Book Club 1954) आणि क्रिकइन्फो डॉट कॉम.
प्रेरणस्थान: जेष्ठ पत्रकार श्री. द्वारकानाथ संझगिरी आणि माझं क्रिकेटवेड.

पी.एम.टी. उर्फ पुण्याची ऐश्वर्या राय

ह्या विनोदी लेखात उल्लेख केलेल्या घटना मी पुणेकर नव्हतो आणि अधून-मधूनच पुण्यात येणे व्हायचे तेव्हाच्या आहेत.




बर्‍याच वर्षांपूर्वी काही कामानिमित्त मला पुण्याला यावं लागलं. मंगेश तेंडुलकरांच्याच भाषेत सांगायचं तर जिला 'पुण्याची ऐश्वर्या राय' म्हणतात ती पी.एम.टी. ची बस हिच्याबद्दल मी काही-बाही ऐकून असल्याने मामाकडे औंधला जाण्यासाठी कॉर्पोरेशन पर्यंत साधी रिक्षा करून मग शेअर रिक्षाने औंध गाठावे असा विचार करत होतो. पण स्वारगेटला उतरल्या उतरल्या समोरच औंधची बस दिसली आणि मोह आवरता आला नाही. "चला सुटलो, आता मेंढरासारखे कोंबून शेअर रिक्षात बसायला नको," मला पटकन वाटून गेलं. त्याच आनंदात मी झटकन बसमध्ये शिरलो आणि मला चालकाशेजारची जी सिंगल सीट असते ती मिळाली. एक तर पुण्यात लगेच बस मिळणे आणि चक्क बसायला जागा आणि तीही आवडती जागा मिळणे हा एक दुग्धशर्करा (च्यामारी दोन्ही महागलंय हल्ली. त्या शरद पवाराच्या फुल्या फुल्या फुल्या) योग का काय म्हणतात तोच होता की!

मला फक्त हर्षवायूच व्हायचा शिल्लक होता."याSSहु" असं जवळ जवळ ओरडतच मी बसलो. पण पुढे काय वाढून ठेवलंय ते मला तेव्हा कसे बरं कळणार? लवकरच हाय रे रामा, जळ्ळं मेलं नशीब ते, नशीब XX तर काय करील पांडू, अशा असंख्य म्हणी, वाकप्रचार आणि अनेक हताश विचार मनात येऊन गेले. कारण बस सुरु होताच मला लक्षात आलं की बस मध्ये ड्रायव्हरच्या शेजारी जे इंजिन असतं त्याचं झाकण गायब होतं आणि त्यातून एक गरम वाफेचा झोत थेट माझ्या चेहेर्‍यावर येत होता. माझा त्या बसमधला पुढचा अर्धा-पाउण तास कसा गेला असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता. औंधला उतरेपर्यंत चेहेर्‍याची उजवी बाजू आकाराने एखाद्या भरल्या वांग्यासारखी (बी.टी. नै हो, साध्या) आणि रंगाने टोमॅटोसारखी लालेलाल अशी दिसत होती. मामा-मामी दोघेही माझ्या या अशा चमत्कारिक अवताराकडे पाहून हसत होते. मामीने तर विचारलंच, "काय रे, पुण्यात आल्या आल्या मारामारी वगैरे केलीस की काय?" तिचं बरोबरच होतं, कारण माझा उजवा गाल कुठल्यातरी कोल्हापुरी पैलवानाने थोबाडीत ठेऊन दिल्यावर सुजावा तसा दिसत होता. त्यानंतर मी "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी किर्लोस्करांच्या बंगल्यासमोर घोर प्रतिज्ञा केली.

......पण ती फारशी टिकली नाही. पैसे वाचवण्याच्या नादात मी काही महिन्यांनी मी पुन्हा तीच चूक केली. यावेळी मला धायरी परिसरात जायचं होतं. पुणे एस.टी. स्थानकावर उतरताच मित्राला फोन केला. "समोरच पी.एम.टी चा स्टँड आहे, तिथे अशा अशा नंबरच्या बस धायरीला जातात. आत्ता आठ वाजले आहेत. टाईमटेबलप्रमाणे आत्ता आठ वीसची एक बस आहे, ती तुला मिळेल," तो म्हणाला. त्याने नक्की कुठले नंबर सांगितले ते आत्ता आठवत नाहीत, तसे तेव्हाही आठवून उपयोग नव्हताच. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात, ती तुमच्या इच्छित स्थळी जाते आहे ना, मग झालं तर, असं असतं.

प्रचंड उत्साहात मी स्टँडच्या दिशेने मोर्चा वळवला. बाहेरून प्रथमदर्शनी तो स्टँड रामसे बंधूंच्या चित्रपटातल्या भूतबंगल्यासारखा दिसत होता. म्हणजे एकदम काळोखी वगैरे, आतून चित्रविचित्र आवाज येतायत पण आत जिवंत माणसांची वर्दळ आहे की नाही याची शंका यावी असे असा. अचानक एखादी हडळ यावी तशी एक बस रोरावत बाहेर पडली. तिला चुकवून मी आत शिरलो. आत समोर दोन व त्यामागे दोन अशा चार बस उभ्या असलेल्या दिसल्या. चारही बसचे क्रमांक नीट दिसत नव्हते.

"अहो, धायरी फाट्याला जाणारी बस कुठून सुटते हो?" फाटकाजवळ एक खाकी कपड्यातले मामा उभे होते त्यांना मी विचारलं. अशोक सराफचा फोटो आणि त्याखाली 'माझ्या यशाचे कडवट रहस्य: वैद्य-पाटणकर काढा' असं लिहिलेल्या बसकडे बोट दाखवून त्यांनी, "ती काय मागेच उभी आहे" अशी बहुमूल्य माहिती दिली. एखादा प्रश्न विचारल्यावर एखाद्या पुणेकराने मला दिलेले हे पहिले सरळ उत्तर! मामा बहुतेक मुंबईहून पेशल डेप्युटेशनवर आले असावेत.

असो. त्यांनी सांगितलेली बस नक्की धायरी फाट्याच्याच दिशेने जाईल ह्याची बसवरची अस्पष्ट पाटी वाचून खात्री करून घेतल्यावर मला पुन्हा एकदा ह.वा. झाला. पण ती सुद्धा रा.ब. च्या भू.बं. मधल्या अंधार्‍या खोली सारखी दिसत होती. सव्वा आठ वाजलेले असूनही आतले दिवे लागलेले दिसत नव्हते, पण इच्छुक प्रवासी मात्र होते.

"ती धायरीची बस कधी सुटेल हो?" बसमागे असलेल्या हापिसवजा खोपटासमोर खुर्ची टाकून आणखी एक मामा बसले होते त्यांना मी प्रश्न टाकला.

"कुण्या गावाच्च आलं पाखरू" अशा नजरेने माझ्याकडे पाहत त्यांनी उत्तर दिलं, "सुटेSSSल होS".

मी निमुटपणे बशीत जाऊन बसलो. आठ वीसचे साडेआठ केव्हाच होऊन गेले होते. तसं म्हणाल तर मुंबईतल्या सगळ्या बस अगदी वेळेवर सुटतात असा आपला दावा नाही बुवा. पण निदान बसमधले दिवे लागले आहेत, चालक बाहेरची पाटी फिरवतोय, कंडक्टर जवळच्याच पानपट्टीवर स्वतःच्या मुख-वंगणाची सोय करतोय, अशी सूचक दृश्य तरी दिसतात. इथे तर आत बसलेल्या इच्छुक प्रवाशांच्या चेहेर्‍यावर देखील तशी काही लक्षणे दिसेनात!

साडेआठ, आठ पस्तीस, आठ चाळीस, असं करता करता पावणेनऊला शेवटी ड्रायव्हरसाहेब येऊन स्थानापन्न झाले आणि त्यांनी बसमधले दिवे लावले. माझ्याइतक्याच कावलेल्या एका आजींनी शेवटी, "काय हो किती वाजले, किती हा उशीर?" असं विचारलं. मला वाटलं लोकलाजेस्तव किंवा स्त्रीदाक्षीण्यापोटी तरी काहीही न बोलता ते बस सुरु करतील. पण बोलण्यात हार जातील तर ते पुणेकर कसले! त्यांनी तोंडात नुकताच भरलेला मौल्यवान ऐवज तोंडातल्या एका सोयीस्कर कोपर्‍यात तात्पुरता ढकलून टाळूला लावायला जीभ मोकळी करून घेतली आणि "ए आज्जे, थोडी बी कळ सोसंना का तुला" अशी मुक्ताफळं उधळली. पु.लं.च्याच भाषेत सांगायचं तर असा 'एक अकारण हिणकस शेरा' मारला. त्यानंतर त्या आजींबरोबर आलेले आजोबा आणि चालक महाशय यांनी एकमेकांच्या मातोश्रींची काही मिनिटे जाहीर विचारपूस केली, तेव्हा मला आपण आज काही धायरीला पोहोचत नाही असं वाटू लागलं. कंडक्टरसाहेब जास्त समजूतदार असावेत. त्यांच्या हस्तक्षेपाने आणि आमच्या सुदैवाने ही विचारपूस कुटुंबातील इतर सदस्यांवर घसरली नाही आणि ड्रायव्हरसाहेबांनी बस सुरु केली.

बस सुरु करेपर्यंत आळशीपणाचा महामेरू असलेल्या ड्रायव्हर साहेबांनी मग जेव्हा "च्यामारी, फॉर्म्युला वन मध्ये मायकल शुमाकरला टफ देणारी नोकरी सोडून पी.एम.टी. सारख्या तुच्छ ठिकाणी आपल्याला नाईलाजाने बस चालवावी लागत आहे" अशा आविर्भावात बस चालवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या छातीत परत धडधड सुरु झाली.

पण जिलब्या, खुन्या, वगैरे मारुतीच्या आणि गणपतीच्या कृपेने मी सुखरूप धायरीला उतरलो आणि पुन्हा एकदा "पुण्यात ह्यापुढे कधीही बस मध्ये बसणार नाही" अशी घोर वगैरे प्रतिज्ञा केली.

हल्ली पी.एम.टी. ला पी.एम.पी.एम.एल. असं कैतरी म्हणतात नै? द्याट रिमाईंड्स मी. आता तिला पुण्याची कतरिना म्हणावं काय?