Thursday, June 6, 2013

हे आणि ते - १: पाहुणचार

एकदा माझी एक आजी तिच्या भाचीच्या मुलाच्या लग्नानिमित्त तिच्याकडे उतरली होती. लग्नघर असल्याने आणि अर्थातच वार्धक्यामुळे आजीला माझ्या घरी येणं शक्य नसल्याने तिनेच सुचवल्याप्रमाणे तिला भेटायला मी तिथे गेलो. तिच्या माहेरच्या मंडळींशी ख्यालीखुशाली विचारणार्‍या गप्पा झाल्या. त्यांचा आधीपासून परिचय होताच, त्यामुळे गप्पांना वैयक्तिक संदर्भही लाभला. पण त्या बोलण्याला गप्पा असं म्हणणं म्हणजे विंदू दारा सिंगला अभिनेता म्हणण्यासारखं आहे.

मी बहुतेक अत्यंत चुकीच्या वेळेला तिथे पोहोचलो होतो. "ए श्रीsssssss ये ना रे" भयानक हेल काढत तीच ती जान्हवी तिटकारा यावा इतक्या लाडीकपणे एक एक शब्द उच्चारून श्रीला आधी वात आणि मग झोप दोन्ही आणत होती असा ज्वलंत विषय कम् दृष्य सुरू असताना मी तोंड उघडण्याचं धारिष्ट्य केलं आणि मी विचारलेला प्रत्येक प्रश्नावर आणि दिलेल्या प्रत्येक उत्तरावर "आँ?! क्कॉय? हां हां, हो का? क्कॉय? हां बोल आता" अशा प्रतिक्रिया उपस्थित काकु-आत्या इत्यादी मंडळींकडून मिळत गेल्या. आजीला कमी ऐकू येतं त्यामुळे मला तिच्याशी जोराने बोलावं लागत होतं आणि रोज अशा पद्धतीने बोलण्याची सवय नसल्याने तोच वरच्या पट्टीतला आवाज इतरांशी बोलताना लागत होता. मला इथे आमंत्रण नव्हतं मान्य, पण मी आल्यावर लक्ष देऊन चार शब्द नीट बोलले गेले असते तर मी काय त्या हेलकाढू जान्हवी आणि बावळट शिरोमणी श्रीच्या प्रेमालापात विघ्न आणून त्यांच्या सिरिअलचा बट्ट्याबोळ करणार होतो का? असो. तर, टीव्हीवर चाललेली बोंबाबोंब, लग्नघरातली गडबड, माझा मोठा आवाज या अभूतपूर्व गोंधळात आजीची सदिच्छा भेट मी कशीबशी उरकली आणि पुढ्यातला चिवडा लाडू पोटात ढकलून, तिथून अक्षरश: पळ काढला.

तिथून बाहेर पडलो आणि गेल्याच वर्षी आलेला एक अतिशय छान अनुभव आठवला. माझ्या एका कलीग-कम्-मैत्रिणीकडे सहकुटुंब जेवायला आमंत्रण होतं. शनिवारी संध्याकाळी साडेसातला जायचं असं ठरलं होतं पण मुलांना तयार करण्याच्या गडबडीत पोहोचायला आठ वाजलेच. आम्ही पोहोचलो तेव्हा ती आणि तिचा नवरा, दोघांनीही "या..." म्हणून सुहास्य वदनाने स्वागत केले. औपचारिक हसू लगेच ओळखू येतं मला, हे मात्र तसं नव्हतं हे स्पष्ट दिसत होतं. ते "या" बोलले नसते तरी निव्वळ ते स्मितहास्य पाहूनच ते अगदी मनापासून केलेलं स्वागत आहे हे मला जाणवलं असतंच. सुरवातीच्या गप्पा झाल्यावर पावभाजी हा मेनू असल्याचं समजलं. "अगदी last moment ठरलं पाव भाजीचं" मैत्रीण म्हणाली. आमच्या 'कुटुंबाला' पावभाजी अत्यंत प्रिय असल्याने तिच्या चेहर्‍यावर विशेष आनंद पसरला. मलाही उगाच भारंभार पदार्थ नसल्याने बरं वाटलं. बरेच पदार्थ असणं चुकीचं नाही, पण मग एकाचीही धड मजा घेता येत नाही. तेव्हा पावभाजी जिंदाबाद करत गप्पा मारत मारत सगळ्यांनी सही झालेल्या पावभाजीवर ताव मारला. मग दोघांनी आम्हाला सगळं घर दाखवलं. काही वेळाने पुलंच्या म्हैस कथेतल्या वर्णनाप्रमाणे दोन ट्रकवाले, दोन एसटीवाले, आणि दोन मुंग्या या समोरासमोर भेटल्या की काहीतरी टिकटिक टिकटिक टिकटिक टिकटिक झालंच पाहीजे या न्यायाने दोघा बायकांचं स्वयंपाकघरात काहीतरी गुफ्तगू झालं. मग पुन्हा गप्पा झाल्या आणि आल्यापासून साधारण दोनेक तासांनी आम्ही निघालो.

दुसर्‍या दिवशी मी दोघांनाही पावभाजी आणि पाहुणचार आवडल्याचा एसएमएस केला तेव्हा दोघांनीही उत्तर पाठवताना भेटीबद्दल आनंद व्यक्त केला.

त्या शनिवारी रात्री उशीरा झोप आणि रविवारी लवकर उठल्याने झोप अनावर होऊन मी रविवारी दुपारी बराच वेळ झोपलो. त्यामुळे रात्री जागरण झालं. मला सकाळी लवकर उठून चालायला जायचं असल्यामुळे ती झोप सोमवारी सकाळीही पूर्ण झाली नाही. मंगळवारच्या झोपेवरही याचा परिणाम झाला आणि माझं काम हळु हळु होऊ लागलं. लक्ष केंद्रित करण्यावर झालेल्या परिणामामुळे मी लक्षपूर्वक काम करण्याचा अधिकाधिक प्रयत्न करु लागलो आणि त्या भानगडीत इतरांशी बोलणं कमी झालं. या मौनामुळे त्या मैत्रिणीचा गैरसमज झाला आणि तिने मला विचारलं की "का रे बाबा शनिवारी तू आमच्याकडे येऊन गेल्यानंतर काही घडलं का? I am finding you a little aloof. आमच्याकडून काही चूक झाली आहे का?" खरं तर तसं काहीही नव्हतं. पण तिने हा विचार केला याचंच मला खूप कौतुक वाटलं. झोपेच्या खोबर्‍याची कथा सांगून तिचा गैरसमज मी लवकरच दूर केला, पण भेटीनंतर काहीही कारणाने का असेना 'काही चुकलं का' असं विचारणं हे संवेदनशील मन असल्याचा संदेश देऊन गेलं. या निमित्ताने आधी लक्षात न आलेली आणखी एक आणि महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे त्यांच्या पाहुणचाराची छान पद्धत. त्या दिवशी आम्हाला झालेल्या उशीरामुळे आमची वाट बघत असताना वेळ घालवायला त्यांनी कदाचित टीव्ही सुरू केलेला असावा. आम्ही घरात पाऊलही ठेवण्याच्या आत तो बंद झालेला होता. मला आत्ता आठवलं की यजमानांना रिमोट खाली ठेवताना मी बघितलं होतं बहुतेक. आम्ही घरात पाऊल ठेवण्यापासून तिथून निघून लिफ्टमधे शिरण्याच्या वेळेपर्यंत टीव्ही नाही, मधूनच पेपर किंवा मासिकं चाळणं नाही, मोबाईलशी चाळा नाही की मोबाईल वाजणं नाही, काही लहानसहान काम करणं नाही की आम्ही आल्यामुळे इतर कामं बाजूला राहिली आहेत असा साधा भास देखील आम्हाला झाला नाही - दोघांनीही संपूर्ण लक्ष आमच्यावरच केंद्रित केलेलं होतं आणि हे सगळं सहज होत होतं - दोघांच्याही वागण्यात कृत्रिमपणाचा लवलेश नव्हता. आम्ही काही सारखे कुणाकडे जातो असं नाही. पण बर्‍याच काळानंतर आम्हाला पाहुणे म्हणून गेल्यावर इतका छान अनुभव आला. शिवाय संपूर्ण वेळ आमच्याकडेच लक्ष दिल्याने अगदी राजेशाही पाहुणचार झाल्यासारखं वाटलं. समोरच्याच्या मनाचा आणि आनंदाचा इतका बारकाईने विचार करणार्‍या या साध्या स्वभावाच्या दांपत्याने केलेल्या आदरातिथ्य आणि त्याबद्दल केलेल्या पाठपुराव्याचं खूप कौतुक वाटलं.

'
अतिथी देवो भवया वचनाचा खरा अर्थ त्यांनी जाणला होता हे निश्चित. दुसर्‍या दिवशी पूजा करताना हात जोडल्यावर बाप्पाने त्यांना कायम सुखात ठेवावं अशी इच्छा आपोआप व्यक्त केली गेली, आणि तेव्हापासून त्या दोघांचा समावेश माझ्या रोजच्या प्रार्थनेत होतो आहे.




Friday, May 10, 2013

हिंदी चित्रपटांचा 'जॉय'



अथश्री प्रतिष्ठानतर्फे चालविल्या जाणार्‍या अथश्री त्रैमासिकाचे संपादक श्री आनंद आगाशे यांच्या परवानगीने एप्रिल-जून २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेला हा लेख इथे प्रकाशित करत आहे.
-----------------------------------------------------------------------------------

जुन्या हिंदी चित्रपटाच्या चाहत्यांसाठी २०११ हे साल दु:खद आठवणी ठेऊन गेलं. आधी शम्मी कपूर आणि मग देव आनंद यांना आपल्यातून हिरावून नेत त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का दिला. २०१२ तरी चांगलं जाईल असं वाटत असतानाच ९ मार्चला जॉय मुखर्जीवर काळाची झडप पडली आणि एका वेगळ्याच युगाचा अस्त जवळ येत चालल्याची जाणीव तीव्रतेनं झाली.

नाही, ते युग म्हणजे अभिनयाचं युग नव्हे. कारण जॉय त्याच्या अभिनयासाठी  कधीच नावाजला गेला नव्हता. किंबहुना आपली अभिनयाची मर्यादित कुवत त्याने सुरवातीलाच जोखली असावी. कारण गोरागोमटा पण भावशून्य चेहरा घेऊन अभिनय करण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्याच्या फंदात पडताना तो कधीही दिसला नाही. इंग्रजीत एक म्हण आहे If I cannot overwhelm with my quality, I will overwhelm with my quantity. मुद्राभिनय हा आपला प्रांत नव्हे, ही खूणगाठ मनाशी बांधलेल्या जॉयने मग त्याला जे जमत असे त्यावरच जास्तीत जास्त भर दिला. चित्रपटातल्या नायिकेच्या मागे गाणी गात फिरत असतानाच चेहर्‍यावर कमालीचा भोळेपणा व गोडवा लेऊन वावरणं हे जॉय मुखर्जी नामक उत्साहाच्या मूर्तीला जसं आणि जितकं जमलं तसं क्वचितच कुणाला जमलं असेल (प्रगतीपुस्तकात फारशी उठावदार कामगिरी कधीच करता न आल्याने त्यावर सही घेण्यासाठी तीर्थरूपांसमोर चेहर्‍यावर जबरदस्त भोळेपणा आणि बिच्चारा असण्याचे भाव घेऊन जायचो ते आठवलं. याला अभिनय म्हणतात महाराजा! पण जॉय मुखर्जी आणि माझ्या प्रगतीपुस्तकाचा काय संबंध? हो की नाही?).

त्याच्या वडीलांनी घरातच त्याला आखाडा तयार करुन एक मल्ल त्याच्या प्रशिक्षणासाठी नेमलेला आणि त्याला व्यायामाचा एक ठराविक आराखडा आखून त्यावर अंमल करायची जबाबदारी सोपवलेली. मग काय! मुळातच देखण्या असलेल्या जॉयचा बांधा नियमित व्यायामामुळे अतिशय रेखीव आणि सुद्धृढ व्हावा यात काही आश्चर्य नव्हतं. रोशोगुल्ला छाप अती गोड दिसणं हे व्यक्तिमत्वाचं एक व्यवच्छेदक लक्षण असलेल्या समस्त बंगाली नटांत धिप्पाड आणि पिळदार शरीरयष्टीच्या जॉयचं वेगळेपण साहजिकच उठून दिसायचं. मात्र इतकं कमावलेलं शरीर असूनही शर्ट काढून भिरकावण्याची गरज त्याला कधीही भासली नाही. त्याच दणकट शरिरयष्टीनिशी टी-शर्ट, शैलीदार टोप्या आणि तत्सम रंगेबिरंगी कपड्यात तो अतिशय देखणा दिसे.


विश्वजीत हा त्याच्याच पठडीतला, पण त्याच्या मागे कुणी गॉडफादर नव्हता. मात्र जॉयच्या मस्तकावर अनेकांचा वरदहस्त होता. आपले सख्खे कुटुंबीयच चित्रपटसृष्टीत आपले गॉडफादर असण्याचा फायदा जॉय इतका क्वचितच कुणाला मिळाला असेल. त्याचे वडील शशिधर मुखर्जी, काका सुबोध मुखर्जी, अशोक कुमार आणि किशोर कुमार हे सख्खे मामा असा जवळजवळ सगळाच कुटुंबकबिला चित्रपटसृष्टीत अगोदरच पाय रोवून उभा होता. जॉयचे वडील आणि निर्माते शशिधर मुखर्जी यांनी १९६० साली त्याच्यासाठी काढलेला 'लव्ह इन सिमला' हा तूफान यशस्वी ठरल्याने जॉय पदार्पणातच तरुण सिनेरसिकांच्या मनात आपले छोटेसे स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटातून त्याच्या बरोबरीने अझरा आणि साधना या नट्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यात अझरा ही पुढे फारशी चमक दाखवू शकली नाही तर साधनाने तिच्या वैशिष्ठ्यपूर्ण 'साधना कट' म्हणून ओळखल्या गेलेल्या केशरचनेसकट तूफान लोकप्रियता मिळवली.


सिमला सारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रिकरण झालेल्या या चित्रपटाच्या घवघवीत यशामुळे अशा प्रकारच्या संगीतप्रधान हलक्याफुलक्या प्रेमकथा घेऊन काढलेल्या चित्रपटांना नाव काय ठेवायचं असा अनेकांना पडलेला प्रश्न सुटला. देशातच नव्हे तर परदेशातही एखाद्या विशिष्ठ शहरात चित्रिकरण झाल्यास आणि काही समर्पक नाव न सुचल्यास चक्क 'लव्ह इन...' किंवा तत्सम शब्द जोडून त्या शहरांचंच नाव चित्रपटाला दिलं जाण्याचा गंमतीदार पायंडा पडला. खुद्द जॉयने १९६६ साली "जापाssssssन, लव्ह इन टोकियोsssss" असा आरोळीवजा चित्कार ठोकत बरंचसं चित्रिकरण टोकयोमधे झालेल्या अशाच एका चित्रपटात नायकाची भूमिका केली. त्या चित्रपटाचं नाव वाचक सूज्ञ असल्याने सांगण्याची गरज नाही! कथानक घडत असलेल्या आणि चित्रिकरण झालेल्या शहराचं आणि देशाचं नाव एका गाण्यात गुंफण्याचा हा बहुधा पहिलाच प्रसंग असावा.

                    

एकोणीसशे पन्नासचं दशक देव आनंद, राज कपूर, दिलीप कुमार या त्रयीने प्रेक्षकांना झुलवण्यात - आणि अर्थातच बलराज सहानी आणि अशोक कुमार यांच्यासारख्यांनी त्यांना जमिनीवर ठेवण्यात यश मिळवलेलं असताना पडद्यावर धम्माल करणार्‍या जॉय मुखर्जीच्या नर्मविनोदी सादरीकरण असलेल्या रहस्यप्रधान प्रेमकथा यांनी सिनेरसिकांच्या मनाचा एका वेगळ्या प्रकारे ठाव घेतला. मेंदू घरी ठेऊन चित्रपटगृहात मजा करायला जाणे ही प्रेक्षकांची मागणी त्यांनी नक्कीच पूर्ण केली. मग अशा प्रकारचे हलकेफुलके चित्रपट जॉयचा बालेकिल्लाच बनला.

स्वातंत्र्य मिळून एका तपाहून अधिक काळ लोटून गेला होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी किशोरावस्थेत असलेल्या अनेकांना आता चित्रपट बघताना तरी ते कष्टप्रद दिवस विसरून स्वप्नमय आणि आशावादी दुनियेत शिरण्याची गरज भासू लागली होती. अशा वेळी त्यांच्या समोर सादर झाला तो १९६० सालचाच 'हम हिंदूस्तान'. या चित्रपटात सुनील दत्त, आशा पारेख, हेलन, लीला चिटणीस, प्रेम चोपडा, गजानन जहागिरदार आणि संजीव कुमार अशी भरभक्कम मंडळी असून सुद्धा सुनिल दत्तच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत असलेला जॉय मुखर्जी निश्चितच लक्षात राहतो तो त्याच्या हेलनबरोबरच्या प्रणयदृश्यांमुळे. हा चित्रपटही प्रचंड यशस्वी झाल्याने जॉयलाही त्याचा फायदा झालाच.

 


त्याकाळी जॉय मुखर्जींचे अनेक चाहते असले तरी कालांतराने ते टिकले नसावेत हा माझा गैरसमज माझ्या एका आजीनेच दूर केला. एकदा आजी आणि आजोबा दूरदर्शनवर एक मुसाफिर एक हसीना बघत होते. आजोबांना चक्क घोरताना बघून "तेव्हा थियेटरात झोपले होते, आता काय घरातल्या घरात बघतोय....दिली ताणून! किती गोड दिसतो ना रे जॉय?" अर्थातच साधना असलेली दृश्य आली की आजोबांची झोप तात्पुरती उडत असे आणि "गाणं लागलंय ना, म्हणून जाग आली" अशी लंगडी सबब ते पुढे करत. आजोबा-आजींचा हा प्रेमळ संवाद ऐकल्यावर आजोबा साधनाचे उघड तर आजी जॉय मुखर्जीची छुपी फॅन असल्याचा शोध मला लागला. छुपी अशासाठी की जॉयबद्दल बोलताना बिचकत बिचकत ती "शम्मीएवढा नाही, पण तरी छान नाचतो....नाही?" असं शेपूट हळुच जोडत असे.


हिंदी चित्रपटांचा सुवर्णकाळ मानलेल्या गेलेल्या १९५० आणि १९६०च्या दशकात केवळ सुश्राव्य संगीतामुळे अनेक चित्रपटांनी सुमार कथा आणि त्याहून सुमार अभिनय असूनदेखील तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवलं. सुदैवाने तेव्हा पायरसी इतकी फोफावलेली नसल्याने आणि घरोघरी रेडिओ आणि दूरदर्शन संच नसल्याने फक्त गाण्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तरी सिनेरसिकांना चित्रपटगृहांचाच आश्रय घ्यावा लागे. अनावश्यकरित्या अचाट लांबी ठेवलेल्या या अत्यंत रटाळ चित्रपटाला यश मिळालं ते कर्णमधूर संगीतामुळेच. रफी आणि आशाच्या जादूई आवाजातल्या 'आप यूंही अगर हमसे मिलते रहे', 'बहोत शुकरिया, बडी मेहेरबानी', 'मुझे देखकर, आपका मुस्कुराना' अशा गाण्यांनी आणि साधना व जॉयच्या तितक्याच गोड चेहर्‍याने या चित्रपटाला लोकप्रिय केलं.

स्वर्गीय आवाजाची देणगी लाभलेल्या रफीला एका वेगळ्या अर्थाने परकायाप्रवेशाची कला अवगत होती. कसलेल्या नटांच्या बाबतीत तर तो स्वतःचा आवाज हा त्यांचाच आवाज असल्याचा भास तर सहज निर्माण करीच, पण बंगाली चित्रपटसृष्टीचा देव आनंद म्हणून ओळखला गेलेला विश्वजीत, फारसा देखणा नसला तरी चेहर्‍यावर एक प्रकारचा सोज्ज्वळपणा असलेला भारत भूषण, तलवारकट मिशा शोभून दिसणारा गोरागोमटा प्रदीप कुमार आणि अर्थातच रोशोगुल्ला जॉय मुखर्जी नामक ठोकळे पडद्यावर निदान गाण्यांपुरते तरी जिवंत वाटण्याचं श्रेय त्यालाच जातं. या निर्विकार चेहर्‍याच्या नटांनी कॅमेर्‍यासमोर न केलेला अभिनय रफी आपल्या आवाजातून करुन गाणी अजरामर करुन सोडायचा आणि पर्यायाने चित्रपट अक्षरशः चालवायचा असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जॉयच्या 'फिर वोही दिल लाया हूं' या चित्रपटातील गाणी. त्यातली इतर गाणी श्रवणीय आहेतच; पण या सगळ्यावर कळस चढवला तो 'आंचल में सजा लेना कलियाँ, जुल्फों मे सितारे भर लेना' या गाण्याने. चेहर्‍याच्या मूळच्या गोडव्याला प्रेमळ आर्जवाची जोड देऊन जॉयने हे गाणं थोडं तरी प्रेक्षणीय केलं. सोबत आशा पारेख असल्यावर प्रेक्षकांना आणखी काय हवं?  गिटार गदेसारखी खांद्यावर घेऊन 'लाखों है निगाह में, जिंदगी की राह में' गात फिरणारा जॉय ती गिटार वाजवू शकेल इतपत भास नक्की निर्माण करु शकायचा.


आपले वडील फिल्मिस्तान स्टुडीओचे संस्थापक जरी असले तरी सेटवर मात्र जॉय 'अमक्याचा मुलगा' किंवा 'मी म्हणजे कोण आहे माहीत आहे का' अशा आढ्यतेने कधीही वावरला नाही. उलट निर्माता आणि दिग्दर्शकाला जास्तीत जास्त सहकार्य करण्याचीच त्याची वृत्ती राहिली. या चित्रपटात त्याच्या बरोबर प्रथमच नायिकेची भूमिका करणारी आशा पारेख त्याची आठवण सांगताना म्हणते "जॉय बरोबर काम करणं म्हणजे काम वाटत नसे. शाळेची सहल निघाल्यासारखं खेळीमेळीचं वातावरण सेटवर असायचं. शिवाय जॉय खूप मनमेळावू आणि सगळ्यांना मदत करणारा होता. 'आँखों से जो उतरी है दिल में' हे गाणं माझ्यावर चित्रित होणार होतं. नेमकी फिल्म कमी पडणार अशी शक्यता निर्माण झाली, आणि गाण्याचं चित्रिकरण त्या दिवशी पूर्ण होणार नाही अशी आम्हा सगळ्यांनाच भीती वाटू लागली. पण जॉयने प्रचंड मदत केली आणि चित्रिकरण त्याच दिवशी पूर्ण झालं.

आशाने त्यानंतर जॉय बरोबर 'जिद्दी' आणि 'लव्ह इन टोकियो' हे तूफान लोकप्रिय चित्रपट केले; पण जॉयचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट म्हणता येईल तो 'शागीर्द' हा मात्र सायरा बानोच्या वाट्याला आला. यात आय. एस. जोहरने साकारलेला वृद्धत्वाकडे झुकत चाललेला, जगावर कावलेला, आणि 'कधीही प्रेमात पडू नकोस, कधीही लग्न करु नकोस' अशी शिकवण देणारा प्रोफेसर आणि मग तोच मदनबाणाचा शिकार झाल्यावर त्यालाच प्रेमाचे धडे देणारा जॉय मुखर्जीने साकारलेला शागीर्द या दोन व्यक्तीरेखांनी मिळून धम्माल उडवून दिली. यातलं "दुनियाsss पागल है, या फिर मैं दीवाना; मुझको चाहती है झुल्फों मे उलझाना..." या गाण्यात जॉय जे काही नाचलाय त्याला तोड नाही. आजही जी गाणी टि.व्ही.वर लागताच उठून नाचत सुटावसं वाटतं त्यात ह्या गाण्याचा नक्कीच समावेश आहे. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्तम विनोदपटांमधे गणला जातो.



तरुणांनी त्याच्या फॅशनचं अनुकरण करणं आणि तरुणींनी त्याच्यावर जीव ओवाळून टाकणं हे त्याचं नशीब मात्र फार काळ टिकलं नाही. १९६८ सालच्या हमसाया पासून त्याच्या कारकिर्दीला झपाट्याने उतरती कळा लागली. मुळातच नगण्य अभिनयक्षमता असणार्‍या जॉय मुखर्जीकडे दोन गोष्टी होत्या. त्यापैकी एक नैसर्गिक तर दुसरी मिळवलेली. ती नैसर्गिक गोष्ट म्हणजे अर्थातच त्याचा गोड चेहरा आणि ती मिळवलेली गोष्ट म्हणजे नियमित व्यायामानं कमावलेलं पिळदार शरीर. हळूहळू त्याने व्यायामाकडे दुर्लक्ष करायला सुरवात केली. पत्नीची- नीलमची नजर चुकवून तो हळूच सटके आणि बाहेर जाऊन अरबटचरबट खाऊन येई. त्याचं यश आणि त्याचं व्यायामाकडे होत चालेलेलं दुर्लक्ष आणि चुकीचा आहार यांचा काही जवळचा संबंध होता असं ठामपणे म्हणता येणार नाही, पण या वाईट सवयींनी आपला प्रताप दाखवायला सुरवात नक्कीच केली. हळूहळू 'वेळ घालवायला उत्तम' या हेतूने जॉयचे चित्रपट बघायला जाणार्‍या प्रेक्षकांना आणि अर्थातच निर्माता-दिग्दर्शकांना राजेश खन्ना, जीतेंद्र आणि मग अमिताभ बच्चन अशा नटांच्या रूपाने समर्थ आणि उत्तम पर्याय मिळाल्याने जॉयची गरज भासेनाशी झाली.

कारकिर्दीला उतरती कळा हे फारच सौम्य शब्द म्हणावे लागतील, कारण हमसाया आणि त्या नंतरचा जॉय मुखर्जीचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट आपटला. ही अपयशाची माळ त्याच्या हैवान (१९७७) या शेवटच्या चित्रपटापर्यंत कायम राहिली. सूज्ञपणा म्हणा किंवा हतबलता, जॉयने काळाची पावले ओळखून अभिनयातून आपलं अंग काढून घेतलं. त्याचं शेवटचं यश हे मात्र त्याने छलिया बाबू (पुन्हा १९७७) ह्या राजेश खन्ना आणि झीनत अमान अभिनित चित्रपटाचं दिग्दर्शन करुन मिळवलं. या चित्रपटाने बर्‍यापैकी यश मिळवलं असलं तरी त्याचा कोणताही फायदा जॉयला वैयत्तिक स्वरूपात झाला नाही. जॉय मुखर्जीने मग एकोणिसशे पंचाईंशी साली आलेल्या 'ब' दर्जाच्या फूलन देवी (१९८५) या चित्रपटात खलनायकाची भूमिकाही करुन पाहिली, मात्र त्याचाही त्याच्या चित्रपटसृष्टीतल्या गमावलेल्या स्टारपदाला परत आणण्याच्या दृष्टीने काहीही फायदा झाला नाही. इतरांसारख्या त्यानं चरित्र भूमिकाही न केल्यानं जॉय जो संन्यस्त झाला तो कायमचाच. शेवटी शेवटी त्याची ओळख काजोल आणि राणी मुखर्जीचा काका अशी करुन द्यावी लागत असे.


शम्मी कपूर आणि देव आनंदच्या मृत्यूने बसलेले धक्के पचायच्या आधीच ९ मार्चला वयाच्या अवघ्या त्र्याहत्तराव्या वर्षी जॉय मुखर्जीनेही इहलोकाला राम राम ठोकल्याची बातमी आली आणि त्याच्या जाण्याने जे जे चांगलं, जुनं आणि कदाचित म्हणूनच असलेलं सोनं यांचं युग संपत चालल्याची जाणीव अधिकच ठळक झाली. त्या काळच्या किंचित नटांची जितकी टिंगल-टवाळी प्रेक्षक करीत त्याच्या एक सहस्त्रांश टीका आजच्या सुनील शेट्टी, अक्षय कुमार, जॉन अब्राहम वगैरे प्रभूतींना सहन करावी लागली असेल असं वाटत नाही. अनेकांची तर "मला विश्वजीत, जॉय मुखर्जी आणि बबिता हे वेगवेगळे ओळखू यायचेच नाहीत" असं म्हणण्यापर्यंत मजल गेली होती. त्यावेळच्या अनेक उत्कृष्ठ नटांना प्रचंड प्रमाणावर असलेली मागणी पूर्ण करणं शक्य नव्हतं म्हणा किंवा प्रथितयश अभिनेत्यांना प्रत्येक चित्रपटात घेणं अनेक निर्मात्यांना परवडण्यासारखं नव्हतं म्हणा, ती पोकळी भरून काढली ती मात्र विश्वजीत, भारत भूषण, प्रदीपकुमार, जॉय मुखर्जी यांच्यासारख्या त्यावेळच्या माठ, ठोकळा आणि पुतळा अशा विशेषणांनी हिणवल्या गेलेल्या नटांनीच. या सगळ्यात जॉय मुखर्जी इतकी छाप कुणीच पाडली नसेल. जॉय इतका उत्साह, प्रचंड प्रमाणात असलेली आणि ओसंडून वाहणारी ऊर्जा त्याने अनेक गाण्यांत घातलेल्या धागडधिंग्याच्या रूपात अजरामर राहील. नायिकेसमोर आर्जवं करताना चेहर्‍यावर आणलेला भोळेपणाचा आव हा आव न वाटता खराच वाटावा इतपत अभिनय त्याला नक्की जमला. शम्मी कपूर खालोखाल जॉय मुखर्जीच्या कपड्यांचं, नाचण्याचं अनुकरण त्याकाळी केलं जाई एवढं सांगणं जे जॉयच्या त्याकाळी तरुणांच्या मनातलं स्थान काय होतं हे सांगण्यासाठी पुरेसं आहे.

आजोबा त्यांच्या पांढर्‍या विजारीवर पांढरे बूट आजीला आवडतं म्हणून घालायचे म्हणे. आणखी काय सांगू?


-----------------------------------------------------------------------------------

जॉय मुखर्जीचे चित्रपटः
  • लव्ह इन सिमला, हम हिंदूस्तानी  - १९६०
  • ऊम्मीद, एक मुसाफिर एक हसीना - १९६२
  • फिर वोही दिल लाया हूं  - १९६३
  • जिद्दी, जी चाहता है, इशारा, दूर की आवाज, आओ प्यार करें  - १९६४
  • बहू बेटी - १९६५
  • साज़ और आवाज, ये जिंदगी कितनी हसीन है, लव्ह इन टोकियो - १९६६
  • शागीर्द - १९६७
  • हमसाया, एक कली मुस्कायी, दिल और मुहब्बत - १९६८
  • दुपट्टा - १९६९
  • पुरस्कार, मुजरिम, इन्स्पेक्टर, एहसान, आग और दाग  - १९७०
  • कहीं आर कहीं पार - १९७१
  • एक बार मुस्कुरा दो - १९७२
  • हैवान - १९७७
-----------------------------------------------------------------------------------

Wednesday, May 1, 2013

दुधावरची साय


दुधावरची साय
जणू तुझं असणं
त्याचाच भाग असून
वेगळं उठून दिसणं

(फेसबुकवर चहावर केलेली एक छोटी कविता वाचून सुचलेलं काहीतरी)

Wednesday, January 9, 2013

सर्व स्वाभिमानी आणि देशभक्त भारतीय नागरिकांसाठी प्रतिज्ञा



मी भारताचा नागरिक आणि जगभरातील शांतताप्रिय जनतेचा एक भाग म्हणून अशी प्रतिज्ञा करतो की सरकारपातळीवर काहीही निर्णय झाला तरीही पाकिस्तान या देशाशी संबंधित असलेल्या कुठल्याही खेळाचे सामन्यांचे तिकीटे काढून प्रत्यक्ष दर्शन तर सोडाच, पण प्रक्षेपण आणि संबंधित कार्यक्रम—मग ते भारतीय संघाशी खेळत असले तरी—दूरदर्शन संचावर बघणार नाही, आकाशवाणीवर ऐकणार नाही आणि आंतरजालावर त्यासंबंधी कुठल्याही बातम्या वाचणार नाही किंवा धावसंख्या/गोलसंख्या वगैरे कुणालाही विचारणार नाही.

तसेच पाकिस्तान या देशाचे नागरिक सहभागी होत असलेला कुठलाही चित्रपट, मालिका, संगीताधारित कार्यक्रम बघणार नाही किंवा त्यासंबंधित कुठलीही बातमी वाचणार नाही.

पाकिस्तानी नागरिकांशी जगभरात कुठेही संबंध ठेवणार नाही. कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला—मग तो रुग्ण म्हणून समोर आला तरीही—कुठल्याही प्रकारची सेवा पुरवणार नाही.

इतकेच नव्हे तर पाकिस्तानी शिक्षक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, लेखक, वैद्यक वगैरे—म्हणजेच पाकिस्तानचा कुठलाही नागरिक—सहभागी होत असलेल्या कुठल्याही समारंभात/कार्यक्रमात/सभेत सहभागी होणार नाही.

Sunday, October 28, 2012

पुणे बस डे ला पाठिंबा...नाही!



देव आनंदला एकदा एक जेष्ठ पत्रकार महाशयांनी विचारलं, "तू तुझे सिनेमे गोल्डीला दिग्दर्शित करायला का नाही सांगत. त्यावर देव म्हणाला होता "अगर गोल्डी डायरेक्ट करेगा तो मैं क्या करुंगा?" हे म्हणजे हरभजनसिंगने "अगर सचिन बॅटिंग करेगा तो मैं क्या करुंगा" अस म्हणण्यासारखं होतं. अगदी सकाळ वृत्तसमूहासारखं आहे नै का? मला वाटतं भल्या सकाळी सकाळपैकी कुणाच्या तरी डोक्यात अचानक कल्पनांची सकाळ होऊन "पी.एम.टी. बस चालवत असेल तर मग सकाळ काय करणार?" असा दिव्य विचार आला असण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी अनेकांना वेठीला......सॉरी हां....तर त्यांनी व्यवसायिक, कारखानदार, राजकारणी अशा अनेकांना मदतीला घेऊन एक नोव्हेंबरला पुणे बस दिन साजरा करण्याचं ठरवलं. त्या  दिवशी नागरिकांनी फक्त बसनेच प्रवास करायचा असं ठरलं.

मला एकदम भडभडून आलं. पण म्हटलं त्या दिवशी बसने जाता आलं नाही तर? तर मग टिव्हीवर या दिवसाच्या यशाच्या बातम्या बघून भागवायचं? छे छे!! म्हणूनच आज कात्रज ते कोथरुड डेपो प्रवास करण्याची संधी आली तेव्हा अचानक मला बस प्रेमाचा उमाळा आला. कात्रज बस स्टँडवर उभी असलेली सुंदर खाशी नसली तरी सुबक लांबुडकी बस कपाळावर 'कोथरुड डेपो'चं कुंकू लाऊन उभी असलेली दिसली आणि विराट कोहलीला फुलटॉस दिसल्यावर होत नसेल इतका आनंद मला झाला आणि मी त्यात जाऊन बसलो. आता बस क्रमांक आठवत नाही. पण वांदो नथी. कारण वीरेंद्र सेहवागने वेडावाकडा फटका खेळून देखील चौकार गेला की टोनी ग्रेग वगैरे मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे जसं "दी बॉल हॅज नॉट क्वाईट गॉन व्हेअर ही इंटेंडेड टू, बट दोज आर फोर रन्स ऑल राईट. इट डज नॉट मॅटर हाऊ दि रन्स कम, इट ओन्ली मॅटर्स दॅट दे डू" असं असतं, अगदी तस्सच पुण्यात बसचे क्रमाक महत्वाचे नसतात. तुम्हाला हवं तिथे नेऊन हापटलं की झालं बघा. चौदा रुपये सुट्टे नसल्याने पन्नास रुपये कंडक्टरला देऊन आणि तीस रुपये घेऊन बाकीचे सहा रुपये कधी येतात याकडे अर्ध लक्ष ठेऊन प्रवास सुरू केला. आणि लवकरच बस प्रवासाच्या आनंदावर विरजण पडायला सुरवात झाली. सुरवातीला दमदार स्टार्ट घेऊन रोरावत स्टँडबाहेर पडलेली बस मेली ठेचेवर ठेच, ठेचेवर ठेच करत मार्गाक्रमण करु लागली. बस अचानक बंद पडत असे, ती चालक पुन्हा पुन्हा सुरू करत असे. खोक् खोक् खोकून आणि प्रेक्षकांच्या तोंडावर ड्वायलाग मारुन मारुन भरपूर पिडून मगच खपणार्‍या टीबीसम्राज्ञी लीला चिटणीस, सुलोचना, निरुपा रॉय, अचला सचदेव इत्यादी सिनेआयांप्रमाणे अ ते ज्ञ यांपैकी एकाही अक्षराने लिहून द दाखवता येणारे असंख्य आवाज करुन ही बस शेवटी सणस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या परिसरात कुठेतरी बंद पडली.

कंडक्टरने खाली उतरून प्रवाशांना हाकत हाकत दुसर्‍या बशीत भरण्यास सुरवात केली. "ओ, सहा रुपये" असं म्हटल्यावर त्याने दारावर पूरग्रस्तांसाठी वर्गणी मागितल्यावर अतिशय दयार्द्र नजरेने पण तितक्याच अलिप्तपणे डब्यात लोकं पैसे टाकतात तसे माझ्या खिशात सहा रुपये टाकले. आणि लगोलग मला एका बशीत भरला. ही बस ६८ क्रमांकाची बरं का. आर.टी.ओ. नोंदणी क्रमांक MH12 AQ 3414. या बसचा भोंगा उर्फ हॉर्न सोडला तर सगळे भाग वाजत होते. काही वेळाने माझ्या शरीरातल्या २०६ हाडांपैकी सगळीच्या सगळी वाजायला लागून तो आवाज या आवाजात मिसळतोय की काय आसा भास होऊ लागला. शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटल्याने कुठे लागू नये ही कसरतही सुरू होतीच. दुसर्‍या दिवशी "बाबांना टुच केलं बाबा लल्ले नाई" हे वाक्य ऐकायला लागू नये म्हणून मनातल्या मनात रामरक्षा म्हणत शेवटी एकदाचा कोथरुड डेपोचा थांबा आला आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला. तो पुन्हा चुकून सुद्धा बस मधे न पाऊल ठेवण्याचा निश्चय करुनच.

बस डे. माफ करा. मी नाही प्रवास करणार त्या दिवशी. तुम्हाला रोज बस नीट चालवता येत नसतील तर वर्षातला एक दिवस बसने प्रवास करुन काय साध्य होणार. निव्वळ बस उत्तमरित्या चालवल्या तर अनेक मार्गांवर बस चालवून कोट्यावधीचा महसूल मिळण्याची शक्यता असताना अशी सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीला उपाशी ठवण्याचं पातक राजकारण्यांकडून घडतं. आणि मग उठल्याबसल्या टगेगिरी करणारे आणि कार्यकर्त्यांवर मायेचे सिंचन करणारे मंत्री असोत की 'पुण्याची सार्वजनिक वाहतूक सुधारू' असं निवडणूक जाहीरनाम्यात लिहून नंतर राष्ट्रकुलाला लुटण्यात व्यग्र होऊन त्या आश्वासनाची सुरळी करणारे खेळप्रिय मंत्री असोत कुणालाच काहीच करावसं वाटत नाही. तासंतास बस येत नाही, आली तर लहान मुलांना खेळायलाही उपयोगी पडणार नाही अशा रितीने खुळखुळा झालेल्या अवस्थेतला बसवजा पत्र्याचा डबा येतो. चालकाने गिअर बदलला तर गिअरस्टिक सकट मागच्या सहा आसने खडखड्खड्खड करत हादरतात. थांब्यावर बस थांबत नाही. काय काय लिहू? मला नाही हो आवडत गाडी चालवत बाईक उडवत रोज जायला. पण काय काय सहन करायचं रोज?

म्हणून टीकेचा धनी व्हायचा धोका पत्करुन म्हणतो. पुणे बस डे ला माझा पाठिंबा नाही. कदापि नाही. पुणे बस डे गेला खड्ड्यात!!

--------------------------------------------------------------------------------------
हीच ती वाजणारी बस:



या चित्रफितीत येणारे गाड्यांच्या हॉर्नचे वगळता सगळे खड्खड्खड्खड् आवाज हे बसच्या भागांचे आहेत.

--------------------------------------------------------------------------------------

सिमेंटच्या जंगलातलं हिरवं बेट


पुण्यातल्या कोथरुडमधेच हे ठिकाण आहे असं मला कुणी आठवडाभरापूर्वी सांगितलं असतं तर मी त्यावर अजिबात विश्वास ठेवला नसता. पण स्वतः बघितल्यावर विश्वास ठेवावाच लागला.  न्यु डी.पी.रस्यावरुन महेश विद्यालय ज्या सहजानंदकडे जाणार्‍या रस्त्यावर आहे त्याच रस्त्यावर अगदी शेवटी ही दगडखाणीची टेकडी आहे. भरपूर वृक्षारोपण करुन खाणीमुळे निर्माण झालेल्या विवरातलं अनावश्यक गवत काढून टाकल्यास उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हे विकसित करता येईल. याबाबत स्थानिक नगरसेवकाला त्याने पुढाकार घ्यावा ही सूचना करण्याचा मानस आहे.



टेकडीवरुन दिसणारा सूर्योदय




















वारजेकडे जाणारा रस्ता




टेकडीवरुन दिसणारे वारजे उपनगर


टेकडीवरुन दिसणारा कुमार परिसर/सहजानंद हा कोथरुडचा भाग


पायवाट आणि डांबरवाट




Sunday, October 14, 2012

माझा आवाज: किशोर कुमार




महंमद रफी हा गानस्वर्गातील गंधर्व. हेमंत कुमार, मन्ना डे, तलत वगैरे यक्ष, किन्नर, इत्यादी. कदाचित हिमेश रेशमियाला असुरवंशातील उपमा शोभेल. पण किशोर कुमार हा माझा आवाज आहे. बस्स. बाकी काहीही वर्णन नाही. तो माझा आवाज आहे. कंपनीतल्या सी.ई.ओ. पासून चपराशापर्यंत आणि देशाच्या राष्ट्रपतींपासून महापालिकेच्या झाडूवाल्यापर्यंत कुणालाही येताजाता गुणगुणता येतील अशी गाणी गाणारा तो माझा किशोर आहे. सामान्य माणसाचा आवाज. ते उर्दूत दर्द वगैरे का काय म्हणतात ते त्याच्या गळ्यातून प्रत्येक शब्दानिशी टपकायचं. शास्त्रीय गाणं अजिबात शिकला नसूनही अनेक दशकं गात राहणं यातच किशोरचं मोठेपण आहे. "मी गायचो ते किशोर कुमार आरामात गाऊ शकायचा. पण तो गायचा ते मला जमायचं नाही." - हे साक्षात मन्ना डे यांचे शब्द आहेत.

त्याच्या व्यवहारीपणाला इंडस्ट्रीतल्या कोत्या मनाच्या लोकांनी कंजूषपणाचं लेबल लावलं. त्याच्या उत्स्फूर्तपणाला कायम आचरटपणाचं लेबल लावलं गेलं. प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल असतंच. त्याने ते लपवून ठेवलं नाही इतकंच. किशोर कुमार या वल्लीच्या विक्षिप्तपणाच्या अनेक जितक्या सुरस कथा आणि त्याहून अधिक दंतकथा प्रसिद्ध आहेत, तितक्याच त्याच्या कंजूषपणाच्या आख्यायिका सर्वश्रुत आहेत. त्याच्या गाण्याच्या बरोबरीने त्याचा चिकटपणाच्या कथा रंगवून सांगण्यात येतात. पण चित्रपटसृष्टीतलं ज्ञान ज्यांना आहे, आणि या माणसाच्या अंतरंगात डोकावण्याची संधी ज्यांना मिळाली आहे ते मात्र या सदगृहस्थाच्या स्वभावाचे काही वेगळेच पैलू आपल्याला सांगतात.

हिंदी चित्रपटसृष्टीसारख्या निष्ठूर आणि ठायी ठायी फसवाफसवी असणार्‍या क्षेत्रात कठोर व्यवहारवादी असणं किती आवश्यक आहे हे किशोरने फार लवकर जाणलं होतं. आपले जेष्ठ बंधू अशोक कुमार उर्फ दादामुनी यांना आलेले अनुभवही त्याने बघितले होते. त्यामुळे आपले कष्टाचे, हक्काचे पैसे वसूल करताना त्याने कसलीच भीडभाड न बाळगता अनेक विचित्र क्लुप्त्या वापरल्या. अर्थातच त्यामुळे आणि ह्या क्षेत्रातल्या क्रूर राजकारणामुळे तो कसा विक्षिप्त आणि तर्‍हेवाईक आहे, तो कसा सारखा पैसे पैसे करत असतो, त्याचं मानधन मिळेपर्यंत त्याला धीर कसा धरवत नाही वगैरे अनेक अफवा झपाट्याने पसरल्या. त्याकाळी आजच्या सारखा पिसाटलेला मिडीया नसला तरी असल्या दंतकथा भरपूर मसाला लावून सत्यकथा असल्याच्या थाटात छापणारी चित्रपटसृष्टीशी संबंधीत अनेक नियतकालिकं उर्फ गॉसिप मॅगझिन्स तर होतीच, शिवाय आज आहे तसा तेव्हाही लोकांचा छापील शब्दावर अंमळ जास्तच विश्वास होता. साहजिकच या गैरसमजांना बर्‍यापैकी खतपाणी मिळालं. म्हणूनच किशोर कुमारने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दिग्दर्शक सत्यजित रे यांना त्यांच्या 'पाथेर पांचाली' या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीच्या वेळी अर्थसहाय्य केलं ही माहिती असो किंवा मग सत्यजित रे यांच्याच 'चारुलता' या चित्रपटासाठी केलेल्या पार्श्वगायनासाठी किशोरने एक पैसाही घेतला नव्हता ही गोष्ट असो, फारशी कुणाला ठाऊक असण्याचा संभव नाही.

गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या "अश्विनीssss येsss नाssss" या गाण्याच्या आणि अर्थातच 'गंमत जंमत' या चित्रपटाच्या यशानंतर किशोरकडून आणखी मराठी गाणी गाऊन घ्यावीत असं अनेक संगीतकारांना वाटू लागलं. 'घोळात घोळ' या चित्रपटासाठी अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुधीर नांदोडे गीतकार असलेलं "हा गोरा गोरा मुखडा" ह्या गाण्याचं ध्वनीमुद्रण संपल्यावर संबंधितांना असं वाटलं की किशोर कुमारला त्याच्या लौकिकाला साजेसं भरभक्कम मानधन दिलं गेलं पाहीजे. त्यामुळे ध्वनीमुद्रण संपताच किशोरच्या हातात एक जाडजूड पाकीट ठेवलं गेलं. किशोरने पाकीट उघडलं आणि त्यातल्या काही नोटा काढून परत केल्या. आश्चर्यानं "किशोरदा ये क्या?" असं विचारल्यावर "अरे देखो, मैने कुछ दिनो पहले आपके दोस्त के यहां एक मराठी गाना गाया था, तो उनसे जितने पैसे लिये थे उतनेही आपसे लूंगा." अनेकदा रेकॉर्डिंगच्या आधीच मानधनाची मागणी करणार्‍या किशोरनं चक्क जास्त मानधन नको म्हणून काही पैसे परत केले हे बघून तिथे उपस्थित असणार्‍यांची बोटं तोंडात गेली.

इतर गायकांनी गायलेल्या दु:खी गाण्यांत आणि किशोरने गायलेल्या दर्दभर्‍या म्हणजेच सॅड साँग्स यांची तूलना केल्यास किशोरची गाणी आपल्याला सरस वाटतील ते किशोरच्या गाण्यांचं एक वैशिष्ठय आहे त्यामुळे. 'मेरा जीवन कोरा कागज' यासारख्या अगदी थोड्या गाण्यांचा अपवाद वगळला तर त्याच्या दु:खी गाण्यांतही हताश भाव कधीही दिसला नाही. नेहमी सकारात्मक वृत्ती आणि आशावाद दिसला. पुढे जाण्याचा मार्ग सुचवलेला असे. समस्येला काहीतरी समाधान सुचवलेले असे. 'दु:खी मन मेरे, सुन मेरा कहना' या नंतरची ओळ आहे 'जहां नहीं चैना, वहां नहीं रहना'. तसंच 'दिल आज शायर है, गम आज नगमा है' या गाण्याच्या शेवटी 'लेकिन लगाया है जो दांव हमने, वो जीत कर आयेंगेही' हा दुर्दम्य आशावाद आहे. हाच आशावाद त्याला माझा आवाज बनवण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण आज माजलेल्या बजबजपुरीत माझा हरवलेला आवाज मला किशोरच्या आवाजात सापडतो.

म्हणूनच किशोर नामक सोबती हा आपल्यात नाही असं म्हणवत नाही. तो आहे. आणि माझा आवाज बनून राहिला आहे.














Tuesday, October 2, 2012

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

नास्ति सत्यसमो धर्मो न सत्याद्विद्यते परम् ।
न हि तीव्रतरं किञ्चिदनृतादिह विद्यते ॥

सत्यासारखा दुसरा धर्म नव्हे. सत्यापलीकडे काहीच नाही. आणि असत्याहून अधिक तीव्र काहीच नाही.


एकदा अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को शहरातल्या एका नाट्यगृहात चार्ली चॅप्लीन नक्कल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुणालाही संशय न येऊ देता खुद्द चार्ली चॅप्लीन एक सर्वसामान्य स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. मात्र या खोट्याच्या दुनियेची गंमत बघा. स्वतः चॅप्लीन या स्पर्धेत विजयी होऊ शकला नाही. निकालांचा उल्लेख मात्र संदिग्ध आहे. काही ठिकाणी तो तिसरा आल्याचा उल्लेख आहे तर काही ठिकणी असं म्हटलंय की तो अंतीम फेरीत देखील पोहोचू शकला नाही. मात्र स्वतः चॅप्लीन म्हणायचा की त्याला चॅप्लीनला परीक्षकांची आणि स्पर्धकांची इतकी दया आली की ती प्रसिद्ध चॅप्लीनची चाल नक्की कशी असावी याचे धडे द्यायची त्याला त्या क्षणी हुक्की आली. पण आयोजक आणि स्पर्धकांच्या उत्साहाला टाचणी लावण्याची त्याला इच्छा नसावी. म्हणून ती सुरसुरी त्याने महत्प्रयासाने आवरली. त्या स्पर्धेत चॅप्लीनच्या प्रवेशिकेचा नक्की निकाल काय लागला तो परमेश्वरालाच ठाऊक. मात्र चार्ली चॅप्लीन त्याचीच नक्कल करायच्या स्पर्धेत विजयी ठरू शकला नाही हे मात्र खरं. वरच्या सुभाषितात म्हटल्याप्रमाणे असत्याहून तीव्र काहीच असू शकत नाही. अरे, ही तर खोट्याची दुनिया!

आता अमेरिकेतून जरा भारतात येऊया. मनोजकुमार उर्फ भारतकुमारचा भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांच्या बलिदानावर आधारित चित्रपट शहीद हा १९६५ साली भारतातल्या अनेक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तो पर्यंत आलेल्या सगळ्या ऐतिहासिक चित्रपटांना मागे टाकत न भूतो न भविष्यति असं घवघवीत यश मिळवलं.



प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे: Newspapers are unable, seemingly to discriminate between a bicycle accident and the collapse of अ civilization. वर्तमानपत्रांना एक सायकल अपघात आणि एखाद्या संस्कृतीचं लयाला जाणं, नष्ट होणं यात फरक करता येत नाही. शहीद या चित्रपटाबद्दल वाचलं तर वर्तमानपत्रांना निव्वळ हेच नव्हे तर खर्‍याखोट्यामधेही फरक करता येत नव्हता, अजूनही करता येत नाही हे स्पष्ट होतं. शहीद प्रदर्शित झाला आणि त्याच्याबद्दल वर्तमानपत्रातून भरभरून लिहून येऊ लागलं. एका समि़क्षकाने चित्रपटाबद्दल बरंच काही स्तुतीपर लिहून थोडीशी टीका करताना पुढे लिहीलं होतं: चित्रपटातल्या तुरुंगाची दृश्य मात्र तितकीशी खरी वाटत नाहीत.

हे वाचून मनोजकुमारने कपाळाला हात लावला. त्याला यावर हसावं का रडावं ते कळेना. मनोज कुमारने या चित्रपटासाठी प्रचंड कष्ट उपसले होते. चित्रपटाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून भगतसिंगच्या आईशी चर्चा करण्यापासून त्याला अगदी ओझरतं भेटलेल्या एखाद्या माणसाशीही बोलणं त्याने वर्ज्य केलं नव्हतं. चित्रपटातली दॄश्य परिणामकारक व्हावीत म्हणून चित्रिकरणाची ठिकाणं अत्यंत काळजीपूर्वक निवडली होती. तुरुंगातलं चित्रिकरण अधिकाधिक वास्तव वाटावं म्हणून मनोजकुमारने ते लुधियाना तुरुंगात केलं होतं. चित्रपटातले प्रमुख कलाकार वगळता तुरुंगातल्या इतर कैद्यांच्या भूमिकांमधे 'एक्स्ट्रा' कलाकार नव्हे तर त्या तुरुंगातले खरेखुरे कैदी वापरण्यात आले होते. तुरुंग खरं, कैदीही खरे. मात्र ह्या खर्‍या गोष्टी त्या समीक्षकाला 'तितक्याशा खर्‍या' वाटल्या नाहीत. कदाचित खरा तुरुंग आणि खरे कैदी त्याने कधी बघितलेच नसावेत. खरं काय ते आयुष्यभर कधीही न बघता, न तपासता जे खरं आहे हे तितकंसं खरं वाटत नाही असं त्याने ठोकून दिलं होतं. आहे की नाही गंमत?

अरे, ही तर खोट्याची दुनिया!!

Thursday, September 13, 2012

आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता जपण्याबाबतचे काही उपाय व माहिती

मित्रांनो, ह्या मध्ये आपण सेफ्टी डोअर, इतर घरगुती उपकरणे, घरच्या माहितीची गुप्तता, घरात कामाला येणारे व बिल घ्यायला येणारे यांच्याशी कसे वागावे, वाहन असेल तर त्याची सुरक्षितता इत्यादी बद्दल चर्चा करूया. सिक्युरिटी गार्ड किंवा एजन्सी वगैरे इथे अपेक्षित नाही. आणि घर म्हणजे अगदी सदनिकेपासून ते बंगल्यापर्यंत अभिप्रेत आहे.

(१) शक्य असल्यास घरामधे कुत्रा अवश्य पाळावा. खूप फायदा होतो. कुत्रा नुस्ता वासानी देखील भुंकायला लागतो.

(२) शक्यतोवर बाहेरील दरवाज्यांचे कुलुप digitized असावे. म्हणजे फक्त आपल्यालाच नंबर माहिती असतो. चोराला देखील अशी कुलुपे उघडण्यात लवकर यश येत नाही.
(२) 
(अ)  Digitized कुलपे परवडतातच असे नाही. त्यामुळे गोदरेजचे नवीन computerized पद्धतीने बनवलेले कुलूप आणि चावी (म्हणजे  दुसरी कुठलीही चावी लागत नाही त्याला) असे घ्यावे. (ब)  घराला/ फ्लॅटला ' युरोपा'ची कुलुपे व लॅच अत्यन्त सुरक्षित. या कुलपांचा जो स्टील बार आहे तो अलॉयचा असल्याने कापता येत नाही. (हा कापला गेल्यास युरोपा ५०००० रु. ची भरपाई देइल असा प्रवाद आहे शहानिशा नाही) पण कुलुप खुप मजबूत पण स्लीक आहे ४०० रु. पर्यन्त मिळते (मी युरोपाचा एजन्ट नाही. एक संतुष्ट ग्राहक आहे).

(३) शक्यतो एक जास्तीचे आणि लोखंडाचे दार (ग्रील) असावे घराला, म्हणजे नविन माणसाला दरवाजा उघडल्या उघडल्या घरात प्रवेश मिळणार नाही.

(४) दरवाज्यात येणार्‍यांना अवास्तव माहिती देऊ नये. गरजेपुरते बोलून कटवून टाकावे.

(५) घरी एकटे असताना शक्यतो शेजार्‍यांना मोठ्याने आपण एकटे असल्याचे सांगू नये. कोणजाणे कोणी नजर ठेवुन असेल तर?

(६) कामवाली, माळी, वाहनचालक यांना कामावर ठेवण्यापुर्वी त्यांची पुर्ण माहिती घेऊन त्याची नोंद आपल्याकडे करून ठेवावी, त्या माहितीची शहानिशा सुद्धा करून घ्यावी. वेळात वेळ काढुन एखाद्या दिवशी ती व्यक्ती नक्की तिथेच राहते ह्याची खात्री करून घ्यावी. शिवाय त्यांच्या योग्यतेची खात्री पटेपर्यंत त्यांच्यावर घराची जबाबदारी सोपवू नये.

(७) शक्यतो ओळखीतून आलेल्या बायकांनाच कामावर ठेवावे. अचानक काम द्या म्हणून समोर येणार्‍या व्यक्तीला काम देऊ नये.

(८) ड्रायव्हर, माळी, झाडुवाला अशा पुरूष कामगारांशी स्त्रियांनी कामापुरते बोलावे; जास्ती बोलणे आणि माहितीची देवाण-घेवाण हानिकारक ठरू शकेल.

(९) केबलवाला, पेपरवाला बिल मागायला आला की फक्त दरवाजा उघडून ग्रिलमधूनच पैसे आणि रिसिट घेणे.

(१०) कुरीयरवाले, पत्ता विचारायला येणारे, सेल्समन ई. पासुन पण सावध रहावे... शकयतो जाळीचा / लोखंडी दरवाजा उघडु नये.

(११) लहान मुलांना शिकवून ठेवावे: अनोळखी व्यक्तीनी फोन केला तर.. घरात कोणी नाही असं सांगु नये.

(१२) ४-५ दिवसांसाठी गावाला जात असल्यास फार गाजावाजा करु नये. अशा बातम्या लवकर पसरतात. अगदी जवळच्या शेजार्‍याला सांगून ठेवावे. शक्यतो पेपरवाल्याला सांगून ठेवावे. बाहेर पेपर पडलेले पाहून संशय येतो.

(१३) (खास करुन घरातील कर्ता पुरुष माणुस असाल तर) आपले बाहेर जायचे-यायचे वेळापत्रक अगदी दुसर्‍याने घड्याळ लावुन घ्यावे इतके अचूक ठेवू नये, अधे मधे दान्डी मारुन अचानक घरी परतणे, वा थोडे उशिराच जाणे हे केव्हाही चांगले!

(१४) दिवाळीत जास्तीचे अ‍ॅटमबॉम्ब्/बाण/भुईनळे आणून ठेवावेत, पुढील वर्षी ते वाजवुन पुन्हा नविन स्टॉक भरुन ठेवावा! काड्यापेटी/धूम्रकांडी प्रज्वलक (सिगारेट लायटर) इत्यादी सहज सापडेल असेच दोन चार ठिकाणी ठेवावे.

(१५) धुणी वाळत घालायची काठी, नारळ फोडायचा कोयता, भाजी चिरायची विळी/सुरी, मिसळणावळातील तिखटाची भुकटी ही नित्य कामाव्यतिरिक्त, केव्हाही गरज लागल्यास सहज सापडेल असे पण झाकुन ठेवावे, व मुले मोठी असल्यास त्यान्ना कार्यकारणभाव समजावुन सांगावा!

(१६) मी म्हणजे राजा, बायको म्हणजे राणी, पोरे म्हणजे राजकुमार/राजकन्या, अन माझे घर म्हणजे माझे राज्य, हे असे वागताना, तुमच्या राज्यात, तुमच्या माहितीच्या पाहुण्यांची वेळीअवेळीची वर्दळ जरुर असु द्यावी, टेहेळणी करणार्‍यांस याचा वचक बसु शकतो.

(१७) रात्री झोपताना, उशाखाली संरक्षणास आवश्यक असे वाटतील व सहज हाताळता येतील अशा सर्व वस्तू बाळगाव्यात.

(१८) जमल्यास, शेजारच्या दोनचार घरांचे मिळून एक असे "रॅकेट" करावे की एखाद्याच्या घरातील विशिष्ट बटण दाबताच शेजार्‍यांच्या घरात घंटा/धोक्याचा यांत्रिक आवाज (अलार्म) किंवा तत्सम आवाज ऐकू जाईल; याकरता हल्ली बहुतेक ठिकाणी इन्व्हर्टर असतातच, तेव्हा वीज खंडित होण्याचा प्रश्न पडू नये, तसे असल्यास चार्जेबल ब्याटर्‍यांवर ही योजना करावी.

(१९) ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे आणि ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत असे अनेक लोक टेडी बेअर व तत्सम सॉफ्ट टॉइज गाडीच्या मागे डिकीत काचेतून आरामात दिसू शकतील अशा प्रकारे ठेवलेले असतात. खेळण्यासाठी जरुर बरोबर बाळगावीत, पण सहज दिसू शकतील अशा प्रकारे अशी खेळणी ठेऊ नयेत. तसेच मुलांची नावे गाडीच्या काचेवर लिहू नये, कारण या दोन्हीमुळे घरात लहान मुले आहेत ह्या गोष्टीची व त्यांच्या नावांची रस्त्यावरून येता जाता व अनोळखी ठिकाणी आपसूक जाहिरात होते. शिवाय असे वाहन महागडे असेल तर "पार्टी मालदार आहे" असा (बरोबर अथवा गैर) समज करून गुन्हेगार अपहरणाची योजना बनवू शकतात.
ही गोष्ट अतीशयोक्तीपूर्ण खचितच नाही, कारण गुन्हेगार कसा विचार करू शकतात ह्याचा आपण विचार केला तर अशा अनेक गोष्टी सुचू शकतात.

(२०) सदनिकेत राहणार्‍या सर्वांनी... बाहेरून कुणालाही कडी लावता येणार नाही याची व्यवस्था करावी. काही इमारतींमधे घडलेल्या भीषण गुन्ह्यामधे आजूबाजूंच्या सर्व शेजारांच्या घरांना बाहेरून कड्या घालण्यात आल्या होत्या. जेणेकरून मदतीला कुणी पटकन धाउन येउ शकणार नाही.

(२१) आपण कधी कधी डुप्लिकेट चाव्या शेजारी अथवा जवळच्या ओळखीच्या व्यक्तींकडे ठेवतो. चावी हरवल्यास विसरल्यास कामी यावे म्हणून. दुर्दैवाने चोरी झालीच तर पोलीस हा प्रश्न विचारतात्. याच्या चाव्या कोणाकोणाकडे आहेत? पोलीसाना चुकूनही चाव्या कोणाकडे आहेत ते सांगू नये. त्या लोकाना पोलीसांचा खूप त्रास होतो. एक लक्षात घ्या अत्यन्त श्रीमन्त घरातल्या मुलानीही चोर्‍या केल्याची उदाहरणे पोलीसाना माहीत असतात त्यामुळे ते सगळ्या शक्यता लक्षात घेऊन तपास करतात . त्याना दोष देण्यात अर्थ नाही. त्यामुळे ' ती फार चांगली माणसे आहेत , ते कशी चोरी करतील' अशा आर्ग्युमेन्टला काही अर्थ नाही. पोलीस त्याना 'ग्रिल' करतात्च. चोरीच्या वेळी आपल्या कडे नेहमी येणार्‍या लोकांची नावे पोलीस विचारतात. कधी कधी त्यांच्याकडे देखील पोलीस तपासाला जातात....
शिवाय आपण ठेवायला दिलेल्या चाव्या त्यांच्या कडे येणार्या नोकरमाणसांच्या लक्षात आल्या तर ते ही काही 'उद्योग' करू शकतात. आपल्या स्नेह्यांच्या नकळत. कारण ह्या चाव्या रोजच्या रोज हाताळल्या जात नाहीत. शेजार्‍यांच्या ही पटकन लक्षात येत नाही चावी कुठे कशी आहे ते. आपल्याला कधी लागली तरच शोधून देतात ते....

(२२) ७० टक्के दुचाक्या सोसायटीच्या पार्किंगम्मधून रात्री जातात. बहुसंख्य दुचाक्याना फक्त हॅन्डल लॉक असते. व ते तोडणे म्हणजे केळे सोलण्याइतके सोपे. त्यामुळे साखळी व कुलूप पण लावावे. म्हणजे ते तोडायला आण्खी वेळ आणि आवाज लागू शकतो.
  
(२३) आमच्या आधीच्या कंपनीत फायर-ड्रिल झालं आणि नंतर अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी काही माहिती दिली त्यातली एक अत्यंत महत्वाची सूचना:
  
रात्री झोपण्याआधी जर आपण आधी गॅस शेगडीचा रेग्युलेटर बंद करत असू आणि मग सिलेंडरचा नॉब बंद करत असू तर असे करणे अत्यंत धोकादायक आहे. कारण सिलेंडर ते शेगडी या दरम्यान ट्युब मध्ये गॅस साठलेला असतो. त्यामुळे ट्युब तर हळू हळू खराब होतेच, पण झुरळं, उंदीर अशा अनेक कारणांनी ट्युब जर का कधी फाटली, तर त्या साठलेल्या गॅस मुळे आग लागण्याची शक्यता असते. रात्री शेवटचा वापर झाल्यावर सर्वप्रथम सिलेंडरचा नॉब बंद करावा आणि ज्योत विझली की मग शेगडीचा रेग्युलेटर.
  
(२४) मुंबईतल्या घरफोड्यांच्या बातम्या वाचल्या तर बहुतेक ठिकाणी रंगकाम, सुतारकाम, किंवा गवंडीकाम करून घेतले होते. असे काम करून घेताना विशेषतः आणि तसे नेहमीच घरातल्या किमती वस्तू जसे दागिने बँक लॉकर मधे ठेवावेत. कामगारांना आपली भाषा समजत नाही असे मानून त्यांच्यासमोर अशा गोष्टींची किंवा आपले घरे कसे केव्हा रिकामे (माणूस रहित) असेल याची चर्चा टाळावी.

(२५) आपल्या घराच्या सुरक्षेबरोबरच शेजारीही लक्ष ठेवावे. आजकाल बर्‍याच घरात दिवसा किंवा अगदी २४ तास वृद्ध जोडपी वा एकटी व्यक्ती घरात असतात, तर त्यांच्याकडे कोण येते जाते यावर ही लक्ष असू द्यावे. नेबरहूड वॉच सारखे.

Monday, June 25, 2012

प्रोजेक्ट

प्रोजेक्टचे काम
आनंद निधान
त्यावीण का दाम?
विचारो नये || २ ||

रोज येथे यावे
कष्ट ते करावे
सेकंदे का मरावे?
विचारो नये || ३ ||

पिता पिता चहा
मॉनिटरकडे पहा
होऊ का रिलॅक्स?
विचारो नये || ४ ||

परवाचे उद्या अन्
उद्याचे आजच करा
आजचे काल करू का?
(कर की मेल्या...)
विचारो नये || ५ ||

सरदार गोमटा
उगारी डेडलाईनचा सोटा
आव का तो मोठा?
विचारो नये || ६ ||

क्लायंट तो पेटे
व्हेंडर केकाटे
मरतो इथे कोण?
विचारो नये || ७ ||

साम दाम दंड
आली फीडबॅकची झुंड
कामात कधी खंड?
विचारो नये || ८ ||

आज यांचे काम
उद्या यांचे काम
पण आमुचे 'काम'?
विचारो नये || ९ ||

मोडली आमुची मान
उरले नाही त्राण
हरपले का भान?
विचारो नये || १० ||

आठवडा खपला
विकेंडही मेला
आराम कसला?
विचारो नये || ११ ||

असे आमुचे प्रोजेक्ट
सांगितले तुम्हांस फॅक्ट
काय करावे एग्झॅक्ट?
विचारो नये || समाप्त ||

Wednesday, May 2, 2012

पोलिटिकल करेक्टनेसच्या बैलाला @#($*&( #&

"वायझेड आहेत साले" ऑफिसच्या कॅब मधे माझा सात्त्विक संतापयुक्त आवाज घुमला आणि सगळे दचकले. निमित्त होतं एका एफ.एम. वाहिनीवरच्या कार्यक्रमाचं. "....पेश करते हैं मिस्टर घंटा." नेहमीच्या ऐकण्यातल्या घंटा सिंगचं मिस्टर घंटा हे रुपांतर ऐकलं आणि माझी सटकली. सटकली म्हणजे भयानक, मरणाची, प्रचंड, लय वगैरे सटकली. काही मित्रांच्या मते माझी सटकली ही द्विरुक्ती आहे म्हणून मग भयानक, मरणाची, प्रचंड, लय वगैरे शब्द जोडावे लागतात.

हे कृत्य पोलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली केलं गेल्याचं समजलं आणि त्या सटकण्यात आणखी भर पडली. डोंबलाचा पॉलिटिकल करेक्टनेस.

पोलिटिकल करेक्टनेस या शब्दप्रयोगाची तोंडओळख झाली ती मी मेडिकल ट्रान्स्क्रिप्शनचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना. कृष्णवर्णीय लोकांना निग्रो म्हणू नका हे मान्य, पण काळ्या लोकांना काळं (Black) नाही म्हणायचं हे समजल्यावर माझी पहिल्यांदा भ, म, प्र, ल वगैरे स. काळं (Black) या शब्दाला आलेला पर्यायी शब्दप्रयोग इतका हास्यास्पद आहे की त्यापेक्षा विनोदी दुसरा असूच शकत नाही. काळ्यांना काळं न म्हणता म्हणे आफ्रिकन-अमेरिकन (African-American) म्हणा. छान. आनंद आहे. म्हणजे काळी लोकं काय फक्त आफ्रिकेतूनच अमेरिकेत आली? बरं ठीक आहे. पण मग शेकडो वर्ष अमेरिकेत राहून अनेक पिढ्या तिथलं नागरिकत्व उपभोगून पूर्ण अमेरिकन झालेल्या, अमेरिकेशी अगदी रक्ताचं नातं निर्माण झालेल्या काळ्या लोकांचं काय? अरे बाबांनो, जे आहे ते आहे तेच म्हणा की. खरं बघायला गेलं तर 'आफ्रिकन-अमेरिकन' हा शब्दप्रयोग काळं या शब्दापेक्षा जास्त वंशद्वेष्टा आहे. काळे, गोरे म्हटलं की ते कोणत्याही देशाचे असू शकतात, त्यातून त्वचेचा रंग सोडला तर इतर कसलाही बोध होत नाही. पण जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी (वाचा: वर्तमानपत्रात, दूरदर्शनवर, रेडिओवर, आणि विपत्र, पत्रकं, जाहीराती, वगैरे औपचारिक संपर्कमाध्यमांतून) 'आफ्रिकन-अमेरिकन' असं संबोधून काळ्यांना "तुम्ही बाहेरचे आहात" असा संदेश सतत जात नाही का? याकडे कुणाचंच कसं लक्ष गेलेलं नाही? मी स्वतः काळा किंवा गव्हाळ आहे, ओबामा काळा आहे, आंद्रे आगासी गोरा आहे, जॅकी चॅन पिवळा (yellow) आहे - बोला काय म्हण्णॉय? अरे कुणाला शिव्या घालतोय का? मग जे आहे ते तसं म्हणा ना!! काय आफ्रिकन-अमेरिकन, ऑरियेंटल वगैरे भंकस लावली आहे!!

आणखी एक बकवासयुक्त शब्दप्रयोग नुकताच वाचनात आला. "...इस्लामधर्मियांचा हा महत्त्वाचा सण आहे". महान वैताग. अरे, अरे इस्लामधर्मीय काय? सरळ मुसलमान म्हणा ना! गंमत बघा, मुसलमान स्वतःला मुसलमान म्हणवतात. काळे स्वतःला काळे म्हणवतात. ज्यु स्वतःला अभिमानाने ज्यु म्हणवतात. मग काय फरक पडतो ज्याला जे आहे ते म्हणण्यात?

भाषा, जात, वगैरे तर विनोदनिर्मितीची राखीव कुरणे आहेत. द्वेषमूलक विनोद होऊ नयेत हे अगदी मान्य, पण पोलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली यांच्यावर आधारित विनोदांवर संपूर्ण बंदी घातली तर विनोदाचे एक मोठे दालन बंद होईल. लहानपणापासून सरदारजीचे विनोद ऐकलेले आहेत. आणि साधे विनोद सरदारजीच्या नावावर खपवलेलेही आहेत (आपल्याकडे कसं सर्वसाधारण विनोदावर फारशा हशा होत नाही पण तोच विनोद पु.लं.चा आहे हे जोडून सांगितला की ठो ठो ठॉ सगळे असतात तसं). दोन्ही बाबतीत अगदी सातमजली हसलो आहे, इतरांना हसवलं आहे. मग आत्ताच का या रिकाम्या न्हाव्यांना भींतीवर तुंबड्या लावण्याची बुद्धी झाली आणि बाकी सगळं सोडून सरदारजीचे विनोद खुपू लागले? अरे घंटा सिंग चा मिस्टर घंटा करणार्‍यांनो, ही कसली 'घंट्याची' विनोदबुद्धी?

अरे कोकणस्थ ब्राह्मणांवर विनोद हवेत? लेले, नेने, गोडबोले हे आपापल्या नावांचे रबरी शिक्के कसे बनवून घेतात ते विनोद तर चावून चावून चोथा झालेले आहेत. भटाला दिली ओसरी आणि भट हात पाय पसरी, बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी, रिकामा सुतार कुल्ले ताशी, चांभार चौकशा या म्हणींचं लहानपणी काही वाटत नसे आणि आजच्या पोलिटिकल करेक्टनेसच्या नामक भंपकपणाच्या मागे लागलेल्या जगात तर त्याहून काही वाटत नाही. पण मग अचानक सगळ्यांच्या भाषिक आणि प्रांतिक आणि जातीय अस्मिता अचानक का बरं जाग्या झाल्या? अरे जरा बुद्ध्यांक वाढवा स्वतःचा.

आजकाल तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या गोष्टीसुद्धा पोलिटिकल करेक्टनेसच्या भीतीपोटी "ढोबळमानाने असं म्हणता येईल की" किंवा "असं म्हणायला थोडाफार आधार आहे की..." अशा भंपक आवरणांखाली लपवल्या जातात तेव्हा भयानक चिडचिड येते. वंश (race) याची व्याख्या "मानवाचे जनुकीय आणि भौगोलिक वारशाने मिळालेल्या दिसण्यावर आधारित गटात वर्गीकरण" (Race is classification of humans into large and distinct populations or groups often based on factors such as appearance based on heritable phenotypical characteristics or geographic ancestry. म्हणजेच, काही रंग, उंची आणि इतर काही शारिरीक वैशिष्ठ्ये ही वंशाशी संबंधीत असतातच. मग त्याबद्दल शब्दांच्या उपयोगाला आक्षेप का?

पोलिटिकल करेक्टनेसचा उद्देश समाजाच्या सर्व स्थरावर समानता आणणे आहे असं म्हणतात. पण पोलिटिकल करेक्टनेसच्या नको तितकं मागे लागल्याने अनेक हास्यास्पद शब्दप्रयोग वापरात घुसले आहेत. वेडा म्हणू नये हो, मनोरुग्ण म्हणा (इंग्रजीतला शब्द अतीगोड आहे. वेड्याला तिकडे mentally challenged म्हणतात) —एका वर्तमानपत्राने कहर केला होता 'मानसिक अस्वास्थ्याने बराच काळ त्रस्त असलेल्या श्री. अमुकतमुक यांनी परवा आत्महत्या केली.....' मला आत्महत्या सोडून बाकीच्या वाक्याचा अर्थ लागायला मोजून एक मिनीट लागलं. अरे हे काsssय्ये? वेडा म्हणा ना वेडा. वेडाच होता ना तो? मग? मग काय, अर्थातच माझी भ, म, प्र, ल वगैरे स. वेडा! वेडा!! वेडा!!!

कालचक्र उलटं फिरवावं असं कुणाचचं म्हणणं असणार नाही. काळ्यांना पूर्वीसारखं 'नैसर्गिक गुन्हेगारी वृत्तीचे लोक' अशा दृष्टीने बघा असं कुणीच म्हणणार नाही. किंवा नाभिक जातीने इतर कुठला व्यवसाय करु नये असंही कुणाही सुसंस्कृत माणसाचं मत नसेल. पण मग काळ्यांना आफ्रिकन-अमेरिकन म्हटल्याने त्यांच्याकडे नैसर्गिक गुन्हेगार म्हणून बघण्याची वृत्ती नष्ट झाली आहे का? अजिबात नाही. उलट ती वृत्ती वाढीला लागली आहे हे कटू सत्य आहे. इंग्लंड मधे नुकत्याच गाजत असलेल्या वांशिक भेदाभेदाच्या आरोपांनी हे सत्य अधिकच उघडं नागडं करुन समोर आणलं आहे. अशुतोष गोवारीकरचा स्वदेस बघितला तर आपला विणकराचा पारंपारिक व्यवसाय सोडून शेती व्यवसायात पडू पाहणार्‍या हरिदासची कथा ही निव्वळ कथा नाही, तर आजही आपल्या ग्रामीण भारतातलं वास्तव आहे. मग, काय डोंबलाची क्रांती केली आहे तुमच्या पॉलिटिकल करेक्टनेसने? 'त्याने' असं लिहीण्याऐवजी आता 'त्याने/तिने' (he/she) असं लिहीण्याची पद्धत अनेक आस्थापनात रुढ झाली आहे. बिझनेसमनच्या ऐवजी बिझनेसपर्सन (businessperson) असा शब्दप्रयोग रुढ झाल्याला काही कमी काळ लोटलेला नाही. पण त्याने भेदभाव आपोआप थांबला आहे? स्त्रीमुक्ती संघटनांची आंदोलनं थांबली आहेत?

दुरावा हा अबोल्याने सुटत नाही. तसंच एखादं खदखदणारं शल्य किंवा अवघड प्रश्न, एखादा कठीण भासणारा मुद्दा हा त्याला बगल दिल्याने, त्याला गोड गोड भंपक शब्दांमागे आणि खोट्या कल्पनांमागे लपवल्याने सुटत नाही. त्याला सर्व शक्तीनिशी भिडलं तरच त्याचा निकाल लागतो. मला तरी म्हणूनच वाटतं की पोलिटिकल करेक्टनेस हा एक पलायनवादी दृष्टीकोन आहे, समस्या सोडवण्याचा मार्ग नव्हे. समानतेचा खरा अर्थ हा की आपण आपल्यातले मतभेद उघडपणे बोलून चर्चा करुन सोडवणे.

म्हणूनच म्हणतो, पोलिटिकल करेक्टनेसच्या बैलाला @#($*&( #&@)*#$(@#*$

अरे बाप रे! काय सांगताय? मी वर एके ठिकाणी "रिकामा न्हावी" म्हणालो? बरं म्हणालो, काय म्हण्णॉय?

--------------------------------------------------------------------------------------

थोडसं अवांतरः आपली मराठी लोकं जगभर पसरलेली आहेत. त्यामुळे नेहमीच्या वापरातले काही शब्द आता तिथली-तिथली लोकं ओळखू लागली आहेत म्हणे. "काळे" म्हटलं की म्हणे तिथल्या लोकांना हल्ली व्यवस्थित समजतं कुणाबद्दल बोलणं सुरू आहे ते. म्हणून आता आपली लोकं काळ्यांबद्दल बोलायचं झालं तर "व.पू." म्हणतात असं ऐकिवात आहे. आहे की नाही आपला मराठी माणूस डोकेबाज!

--------------------------------------------------------------------------------------