Showing posts with label संस्कृती आणि भाषा. Show all posts
Showing posts with label संस्कृती आणि भाषा. Show all posts

Saturday, January 27, 2024

जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्

मुंबईतील एक वृद्ध निवृत्त गृहस्थ. वय ७५च्या आसपास. अगदी सश्रद्ध, अतिशय साधे, सरळ आणि पापभिरू व्यक्ती. राम मंदिराचं उद्घाटन होणार ही बातमी कळल्यावर जबरदस्त आनंदी झाले होते. २२ जानेवारी कधी एकदा उजाडते याची डोळ्यांत प्राण आणून वाट बघत असत.

त्यांना साधारण गणपतीच्या थोडं आधीपासून तब्येतीच्या तक्रारी सुरु झाल्या. पण पावसाळ्यात अनेकांची पोटं बिघडतात, तसलं काही असेल म्हणून त्यावरचे उपचार घेत राहिले. त्या औषधांनी तेवढ्यापुरतं बरं वाटत असे. गणपतीत आठ दिवस कोकणात गावीही जाऊन आले. तेव्हाही त्यांना भूक जास्त लागत नव्हती. गणपती झाल्यावर परत मुंबईत आले तेव्हा एकदा छाती आणि पोटाच्या मधे बोट दाबल्यावर हाताला गोळ्यासारखं काहीतरी लागलं. तेव्हा मुलाने तपासणीसाठी ऑक्टोबर २०२३ च्या सुरवातीला मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यांना दुर्दैवाने कॅन्सरचं निदान झालं. मोठ्या आतड्याचा कर्करोग, तिसरी स्टेज. 

मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयात एका कर्करोगतज्ञांकडे त्यांच्यावर उपचार सुरु होते. ज्या वेळी कर्करोगाचं निदान झालं त्याच वेळी लक्षात आलं की तो पोटात सगळीकडे पसरलेला आहे. शस्त्रक्रिया करणंही शक्य नव्हतं. या डॉक्टरांनी कुटुंबियांना सुरवातीलाच सांगितलं होतं की रोग फार पुढे गेलेला आहे, वाचण्याची किंवा फार काळ जगण्याची काहीही आशा नाही. जेमतेम महिनाभर काढतील. 

त्यांच्यावर उपचार सुरु असताना तब्येतीत सुधारणा काहीही नव्हती, पण तब्येत बिघडतही नव्हती. पण श्रद्धेत ताकद बघा, जो मनुष्य जेमतेम महिना काढेल असं डॉक्टर म्हणालेले असताना फक्त श्रद्धेच्या जोरावर त्या व्यक्तीने २२ जानेवारीचा दिवस बघितला. २२ तारखेला दिवसभर राममंदिर सोहोळा टीव्हीवर लाईव्ह बघत होते. डोळे भरून तो अप्रतीम सोहळा बघितल्यावर रात्री घरात गव्हल्याची खीर करायला सांगितली, बाकी काहीही जेवले नाहीत. फक्त देवाला नैवेद्य दाखवला त्या पानातील खिरीची वाटी होती तेव्हढी खीर फक्त खाल्ली.

दुसऱ्या दिवशी २३ तारखेला सकाळी उठल्यावर मुलाला सांगितलं की पोटात थोडं दुखतंय. म्हणून मग त्याने डॉक्टरांना कॉल करून नऊच्या सुमारास त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी काही इंजेक्शन वगैरे दिली आणि थोड्या वेळाने त्यांचं दुखणं थांबलं. त्यानंतर ते झोपले. दुपारी बाराच्या सुमारास झोपेतच त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला आणि रामरायाच्या भेटीला निघून गेले.

कोहीनूर मिलमध्ये कामाला होते, आर्थिक स्थिती पूर्वी जेमतेम होती. पण मुलं कर्तबगार निघाली. त्यांना पेन्शन वगैरे काही नव्हतं, तरी पण दोन वर्षांपूर्वी जेव्हा मंदिरासाठी निधी गोळा करणे चालू होते तेव्हा स्वतःच्या सेव्हिंगमधून दहा का पंधरा हजार रुपये दिले होते. अर्थात त्यांच्या मुलाने पण दिलेच होते. पण ह्यांनी स्वतःकडून काहीतरी द्यावं म्हणून राम मंदिरासाठी दिले. फक्त राममंदिर सोहोळा बघायचा म्हणून जवळपास डॉक्टरांनी भाकीत केलेला १ महिना अधिक वरचे अडीच महिने स्वतःच्या इच्छाशक्तीवर त्यांनी तग धरला. राम मंदीर उदघाटन होणार ह्याच बळावर ते तगून राहिले. इतकी पराकोटीची श्रद्धा बाळगणे आपल्याला जमेल तो दिवस सोन्याचा. 

इच्छाशक्तीत खूप बळ असतं. किंबहुना श्रद्धेतून इच्छाशक्ती निर्माण होत असावी. जगण्याचं प्रयोजन आपल्याला श्रद्धा देते, आणि ते प्रयोजन साध्य करायला इच्छाशक्तीची मदत होते. म्हणूनच हे डावे आणि लिबरांडू जेव्हा लोकांच्या श्रद्धेची टिंगल करतात तेव्हा फार डोक्यात जातात.

मध्यंतरी एक लेख वाचला, त्यात (पाश्चात्य) सश्रद्ध लोक नास्तिकांंपेक्षा सरासरी ४ वर्ष अधिक जगतात असा निष्कर्ष काढलेला होता. भारतीय परिप्रेक्ष्यात असा काही सर्वे झाला असल्यास माहित नाही, पण अशी उदाहरणे बघितली, की आपल्याकडे ४ पेक्षा कितीतरी अधिक वर्ष आकडा निघेल यात शंका नाही. तसंही सद्ध्या सुरु असलेले एकेक प्रकार बघितले, तर हा देश फक्त सश्रद्ध लोकांच्या परमेश्वरावरच्या श्रद्धेमुळे चालला आहे याची खात्री पटते. पण ते असो. 

जय श्रीराम.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. २, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

टीपः एका मित्राने त्याच्या एका नातेवाईक व्यक्तीबद्दल सांगितलेली सत्यकथा. नामोल्लेख न करता सादर.

Thursday, January 25, 2024

रामाची नसलेली बहीण आणि खोडसाळ पढतमूर्ख

शीर्षटीपः हे खोटं आहे हे माहीत असूनही स्वतः वाल्मिकी रामायणातला संदर्भ तपासून + जाणकार व्यक्तीशी माझ्या आकलनाबाबत चर्चा करुन हे लिहीतो आहे. 

आज एका व्यक्तीने मला शंका विचारली की एक पोस्ट फिरते आहे. यात शांता नामक दशरथकन्या वाचकांशी संवाद साधते आहे या स्वरूपात ती फॉर्वर्डेड पोस्ट आहे. थोडक्यात पोस्टचा सारांश असा:

दशरथ राजाची एक कन्या होती शांता तिला त्यांनी अंगदेश नरेश रोमपाद राजाला दत्तक दिली. एक ब्राह्मण शेतीची समस्या घेऊन आला त्याच्याकडे राजाचं दुर्लक्ष झाल्याने तो देश सोडून  गेला म्हणून इंद्रदेवाचा कोप झाला आणि राज्यात दुष्काळ पडला. मग "ऋषी शृंग" यांनी यशस्वी उपाय सांगितला म्हणून शांताचा विवाह "ऋषी शृंग" यांच्याशी लावून दिला. 

पोस्टमधे अधुनमधून "मी मुलगी असल्याने मला दत्तक देताना दशरथाने विचारलं नाही",  "मुलगी असल्याने अंगदेशात मला राज्यकारभार करण्याचा अधिकार नव्हता" वगैरे स्त्रीमुक्तीवादी मळमळ आहेच. पण चतुराईने 'दुखावलेल्या ब्राह्मणामुळे' दुष्काळ पडल्याचं ठोकून दिलेलं आहे. म्हणजे patriarchy अर्थात पुरुषसत्ताक पद्धतीबद्दल  ओकलेली गरळ  स्त्रीमुक्तीवाद, आणि ब्राह्मणद्वेष सगळं एकदम पेरण्यात आलेलं आहे.

या पोस्टमधली शांता म्हणते की "वाल्मिकी रामायणातील बालकांड मधल्या या या नवव्या सर्गात मला शोधाल. माझा संदर्भ तिथे  नक्कीच सापडेल. एका श्रीरामभक्त राजपुत्रीचा इतका परिचय पुरे नव्हे का?"

यासाठी वाल्मिकी रामायणातल्या बालकांडातील नवव्या सर्गातल्या या श्लोकाचा संदर्भ देण्यात आलेला आहे:
"आनाय्य तु महीपाल ऋष्यशृङ्‍गं सुसत्कृतम् ।
विभाण्डकसुतं राजन् ब्राह्मणं वेदपारगम् ।
प्रयच्छ कन्यां शान्तां वै विधिना सुसमाहितः ॥" 

आता या खोडसाळ पोस्टचा समाचार घेऊया. एक तर संस्कृतचा गंध नाही, दुसरं म्हणजे श्लोकाचा संदर्भ देताना पूर्ण, म्हणजेच मागचापुढचा संदर्भ न देता, एकच श्लोक उचलून टाकणे हे नेहमीचे यशस्वी कलाकार आहेतच. या पोस्टमधे  "ऋषी शृंग" असा उल्लेख वाचल्याने हसून हसून पोट दुखलं. त्या ऋषींचे नाव "ऋष्यश्रुड्न्ग" असे आहे, शृंग नव्हे. हे ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे विभाण्डक ऋषींचे सुपुत्र होत.

तर, याचा पूर्ण संदर्भ असा आहे की पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करण्यासाठी कोणते ऋषी आमंत्रित करावेत या करता महाराज दशरथ चर्चा करत असताना सुमंत्राने महाराजांना एक कथा सांगितली. त्या कथे अनुसार महर्षि कश्यपांना 'विभाण्डक' नामक एक पुत्र आहेत. विभाण्डक यांना 'ऋष्यश्रुड्न्ग' नामक एक पुत्र आहेत. या नंतर ऋष्यश्रुड्न्ग हे कसे उत्तम आहेत याचं काही वर्णन आलेलं आहे. यांना समकालीन अंगदेशाचे प्रतापी नरेश रोमपाद होते. दुर्दैवाने महाराज रोमपाद यांच्याकडून धर्माचे उल्लंघन  (धर्माचे उल्लंघन म्हणजे कदाचित चुकीची धोरणे वगैरे असेल, त्याच्या खोलात जाण्यात अर्थ नाही) झाल्याने राज्यात अवर्षणाची परिस्थिती निर्माण झाली व भीषण दुष्काळ पडला. अशा वेळी त्या काळी राजे करत तेच रोमपाद महाराजांनी केलं. राज्यातील विद्वान ब्राह्मणांना बोलावून त्यांच्या हातून घडलेल्या या पापाचे प्रायश्चित्त काय असे विचारले. 

आता नीट वाचा. राजाने असे विचारल्यावर विद्वानांनी त्याला सल्ला दिला की विभाण्डक ऋषींचे सुपुत्र जे ऋष्यश्रुड्न्ग मुनी त्यांना आपण सन्मानपूर्वक बोलवावे आणि त्यांच्याशी आपली कन्या शान्ता हिचा विवाह लावून द्यावा. 



नवव्या सर्गात यानंतर इतक्या प्रभावी आणि विद्वान मुनींना आपल्याकडे कसं बोलवायचं या बद्दल खल केलेला दिसून येतो (आणि दहाव्या सर्गात ऋष्यश्रुड्न्ग मुनींना त्यांचे पिता विभाण्डक यांच्यासज रोमपाद राजाने त्याच्या राज्यात बोलावण्यासाठी जे उपाय केले त्याबद्दल माहिती आहे. त्याच्याही खोलात जाण्यात अर्थ नाही.) 

हे सांगताना सुमंत्र महाराज दशरथांना म्हणतो की या न्यायाने ऋष्यश्रुड्न्ग हे तुमचे जावईच झाले. याचा अर्थ ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे दशरथाचे जावई "आहेत" असा अर्थ नसून "तुम्ही पण राजा, रोमपाद पण राजा, म्हणून रोमपाद राजाची मुलगी की तुम्हालाही मुलीसारखी असल्याने ऋष्यश्रुड्न्ग मुनी हे तुमचे जावई असल्यासारखे आहेत" असा त्याचा अर्थ होतो. एकाच गावातले एकाच वयोगटातले लोक त्यांच्यापैकी कुणाच्याही मुलीच्या नवर्‍याला "ओ जावईबापू" असंच म्हणतात त्यातला हा प्रकार आहे. पुढे सुमंत्र हा महाराज दशरथांना ऋष्यश्रुड्न्ग मुनींना त्यांचे पिता विभाण्डक यांच्यासह रोमपाद राजाने त्याच्या राज्यात बोलावण्यासाठी जे उपाय केले त्याबद्दल माहिती देतो. 

या गोष्टीचा सारांश असा की मंत्री सुमंत्र हा राजा दशरथाला यज्ञाचे पौरोहित्य करायला सुयोग्य ऋषी कोण याबद्दल माहिती देतो आणि त्या ओघात रोमपाद राजा, त्याच्यावर आलेले संकट, त्यावर उपाय म्हणुन त्याला मुलगी शान्ता हिचा विवाह ऋष्यश्रुड्न्ग मुनींशी करण्याचा मिळालेला सल्ला, आणि त्या संकटाचे झालेले निवारण याचे वर्णन करतो. थोडक्यात, ऋष्यश्रुड्न्ग हे पौरोहित्य करायला सुयोग्य मुनी आहेत त्याची कारणे या सर्गात येतात.

तेव्हा यात कुठेही शान्ता ही दशरथाची मुलगी आहे असा उल्लेख येत नाही.  शान्ता ही अंगदेशचे महाराज रोमपाद यांचीच मुलगी आहे. 

यात एक मेख आहे. श्रावणबाळाच्या आईवडिलांचा शाप असा होता की "तू सुद्धा पुत्रवियोगाने मरशील". संस्कृतमधे "पुत्र" म्हणजे मराठीत "मुलगा" असं नाही. मुलगा किंवा मुलगी असं कुठलंही अपत्य असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे दशरथाने मुलगी दत्तक दिली असती तरी तिच्या वियोगाने तो मृत्यू पावलाच असता. बरं आधी मुलगी झाली... नंतर ती दत्तक दिली त्यानंतर शाप मिळाला म्हणून रामलक्ष्मण ऊशिरा झाले असं नाही होऊ शकत. मुलगी झाली असती, दत्तक दिल्यानंतरही जर ती मरण पावली असती तरीही तिच्या वियोगाने दशरथ राजा मेलाच असता.

दुसरं, त्या काळी ऋषीकन्यांचा विवाह राजाशी आणि राजकन्येचा विवाह ऋषींशी या गोष्टी घडत असत. यातलं काहीही लक्षात न घेता त्यामुळे त्याला स्त्रीवादाची शेपूट लावून आपल्या मनातली मळमळ रामायणाला चिकटवण्याचा हलकटपणा या पोस्टमधे केलेला आहे. 

अशा खोट्या किंवा अर्धखोट्या कथा आधीही होत्या, आता त्यात वाढ होणार हे नक्की. कारण हिंदूंच्या मनात आपल्याच श्रद्धास्थानांबद्दल न्यूनगंड निर्माण व्हावा याचसाठी द्वेष्ट्यांचा अट्टहास सुरू असतो. यात व्हॉट्सॅप विद्यापीठातून ढकललेले संदेश अर्थात 'फॉरवर्ड मेसेज' हे मोठं हत्यार आहे. अशा पोस्ट आल्या की कुठल्यातरी स्त्रीबद्दल पुळका पोस्ट आहे म्हणून भावुक मन असलेले बदामोत्सुक स्त्रीपुरुष त्यावर "छान माहिती" वगैरे कमेंट्स ठोकून देतात. तस्मात् एखादा श्लोक संदर्भ म्हणून टाकलेला आहे म्हणजे ते खरंच असणार असं न समजता त्याच्या आधी आणि नंतर काय उल्लेख आहेत हे समजून घेणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे गॅस सिम केला ही एक घटना किंवा कृत्य म्हणजे स्वयंपाक केला असे नसते त्याच प्रमाणे एकच श्लोक म्हणजे संपूर्ण सत्य नसते. त्यामुळे असे व्हॉट्सॅप विद्यापीठातले 'फॉरवर्ड मेसेज' पुढे ढकलण्याआधी कुठलाही ग्रंथ समूळ वाचणे आवश्यक ठरते. नाहीतर दासबोधाच्या दहाव्या समासात समर्थांनी केलेले पुढील वर्णन आपल्याला तंतोतंत लागू होईल.

दासबोध | समास दहावा: पढतमुर्ख लक्षण
समूळ ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
गुण सांगतां अवगुण- । पाहे तो येक पढतमूर्ख ॥ ८॥

जय श्रीराम.

© मंदार दिलीप जोशी
पौष पौर्णिमा, शके १९४५ | विक्रम संवत २०८० | युगाब्ध ५१२५

Saturday, December 30, 2023

राम मंदिर आणि डाव्यांचा थयथयाट

अनेक राजकारण्यांना चर्चेत राहण्यासाठी काही ना काही सनसनाटी, विचित्र वक्तव्य करावीच लागतात. त्याचप्रमाणे ते तोंडावाटे जी नकारात्मकता पसरवतात ती आत्यंतिक निष्ठेने घणाघात, टोला, चिमटा, इत्यादी लेबले बातम्या म्हणून पसरवण्याचं काम पत्रकार करत असतात. अशा राजकारण्यांना आपल्या तोंडावाटे काय बाहेर पडतं आहे याचा फारसा विचार करण्याची आवश्यकता नसते (आणि अनेकदा फारसा विचार करण्याची त्यांची तितकी कुवतही नसते) कारण ती वक्तव्ये मुळातच लोकांना वैताग आणायला आणि उचकवायला केली गेलेली असतात.

कलाकारांचं मात्र तसं नसतं; यात नटनट्या, दिग्दर्शक, लेखक, आणि कवी आणि सगळेच सादरकर्ते अर्थात 'परफॉर्मर' आले. त्यांना काहीही मांडायला सर्जनशीलता वापरावी लागते. त्यातच विशिष्ट राजकीय अजेंडा आणि आणि कला या गोष्टी एकत्र आल्या की एक आकर्षक आणि प्रभावी, पण तितकंच फसवं आणि घातक मिश्रण तयार होतं. ज्याप्रमाणे आयुर्वेदात दूध उत्तम, फळे उत्तम पण मिल्क शेकचे दूरगामी घातक परिणाम होतात त्याचप्रमाणे कलाकारांची सर्जनशीलता आणि धर्मद्वेषी राजकीय अजेंडा यांचं मिश्रण झाल्याने होतात.

एक कविता गेले अनेक दिवस समाजमाध्यमांवर फिरते आहे. विशेष म्हणजे ही कविता फिरवणाऱ्यांमध्ये काही हिंदुत्ववादी रामभक्त ही सामील आहेत. यात त्यांचा दोष नाही; डाव्यांना एका गोष्टीचं श्रेय दिलंच पाहिजे की त्यांनी अनेक हुशार कलावंत आपल्याकडे ओढून घेतलेले आहेत किंवा ते असेट्स व्यवस्थित पोसले आहेत. कविता वापरून दिशाभूल करणे यात डाव्यांचा हातखंडा आहे.

तर, या तथाकथित कवितेतली नकारात्मकता इतक्या खुबीने झाकली आहे की अनेकांना प्रथमदर्शनी "बरोबरच बोललाय की तो!" किंवा "त्यात काय वाईट आहे?" असं नक्कीच वाटू शकतं. आधी ही कविता दिसली तेव्हा की फारसं लक्ष दिलं नव्हतं, मात्र मला दोन जणांनी, म्हणजे दोन हिंदुत्ववादी मित्रपरिवारातल्या दोन जणांनी ही कविता आवडली म्हणून पाठवली तेव्हा माझे कान टवकारले गेले. कविता त्या व्हिडिओत ऐकता येईल किंवा गुगलून मिळवता येईल. आधी ऐकली नसेल तर ती आधी पूर्ण ऐका, आणि बघा सुद्धा.

पण कविता ऐकण्याच्या आधी संजय राऊत आणि अमोल कोल्हे यांची वक्तव्य वाचा आणि कविता आणि त्यांच्यातील साम्य पहा.

"...तर तो राम तुम्हाला पावणार नाही."
― संजय राऊत

"राम मंदिराचं उद्घाटन जितक्या थाटामाटात कराल तितकीच मोठी जबाबदारी रामराज्य आणण्याची देखील आहे..."
― अमोल कोल्हे


या दोघांची वक्तव्ये ही आपण नेहमीच पाल झटकल्याच्या घृणेने झटकून टाकत असतो, पण त्यांच्या बोलण्यातला जो आशय आहे तोच कवितेच्या वेष्टनात गुंडाळला की भल्याभल्यांना योग्य वाटू शकतं. तेच या कलाकाराने साध्य केलं आहे.

अर्थात, या व्यक्तीला कलावंत म्हणावं का हा वेगळाच विषय, पण साहेबांनी ऐतिहासिक विषयांवर पुस्तकं पण लिहिली आहेत हे एके ठिकाणी वाचून पोटात गोळा आला. असो, तर या कवितेच्या यशात, म्हणजे व्हायरल होण्यात, कवितेचं चित्रीकरण ज्या प्रकारे केलं गेलं आहे आणि जे नेपथ्य वापरलं गेलं आहे त्याचा मोठा सहभाग आहे. काळा पडदा, एक खुर्ची, उगाचच आपण प्रगल्भ आणि वैचारिक काहीतरी बोलतोय असं भासवण्यासाठी वाढलेली दाढी घेऊन आणि हातातला पांढरा रुमाल मध्येच समेवर येऊन उद्वेगाने फडकवणारा त्या खुर्चीभोवती वावरणारा पांढऱ्या कपड्यातला एक इसम ― असं नेपथ्य हे खरं तर हाऊ टिपिकल ऑफ लेफ्टिस्ट्स, अर्थात डाव्यांचं व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवं. पण ते अजूनही हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात येत नाही यात डाव्यांची हुशारी म्हणावी की आपला भोळसटपणा (naivety) याचा निर्णय मला करता येत नाही.

आता जरा इतर मुद्द्यांकडे वळूया. राम मंदिर खुलं होण्याच्या काहीच आठवडे आधी ही कविता यावी या 'टायमिंग'मध्ये काहीही आश्चर्य नाही, कारण या विषयावरून चित्त विचलित झालेले आणि पिसाळलेले अनेक राक्षस आपण बघत आहोत आणि मंदिर झाल्यावरही बघणार आहोत.

कवितेच्या सुरवातीलाच हा इसम वाल्मिकी ऋषींचा पट्टशिष्य असल्यागत आपण त्रेता युगातून आलेली व्यक्तिरेखा असल्यासारखं, "हाथ काट के रख दूंगा, ये नाम समझ आ जाये तो" अशी गर्जना करतो. कापाकापी हे सुद्धा डाव्यांचं महत्वाचं लक्षण आहेच, पण इथे जास्त लक्ष देण्यासारखं आहे ते म्हणजे कवितेतून केलं गेलेलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि जनमानस हतोत्साहित करण्याचा प्रयास. राम मंदिर खुलं होण्याची घटिका तोंडावर आलेली असताना हा कवितेच्या सुरवातीपासूनच हा रामभक्तांना अटी घालत सुटलाय की अमुक केलंत तरच तुम्हाला राम समजेल आणि तमुक केलंत तरच रामाचं नाव घेता येईल. तोंडी लावायला ढमूक त्रास आणि दुःख सहन केलंच पाहिजे तरच...अशी भावनिक धमकी आहेच. आत्ता या क्षणी, आणि तसं बघायला गेलं तर कधीही, तुम्ही राम नाही आहात किंवा होऊ शकणार नाही हे सांगायची गरजच काय? हे एक प्रकारे असं सांगणं आहे की तुम्ही राम होऊ शकत नाही आणि चालले राम मंदिर उभारायला.

राम नावाचं परफेक्शन कुणी कधीच साध्य करू शकलेलं नाही आणि शकणारही नाही. त्या अवस्थेकडे निरंतर होणारा प्रवास म्हणजे रामभक्ती, राम उपासना. मग ते करायला अटी आणि शर्ती लागू करणारे हे महाशय कोण?

दुसरं म्हणजे "इस जबरदस्ती के जय श्रीराम में सब कुछ है बस राम नहीं" असं म्हणताना तो हजारो कारसेवकांचा धडधडीत अपमान करतोय. मान्य, जबरदस्तीने जय श्रीराम म्हणायला लावलं की राम भेटणार नाही. पण संपूर्ण कवितेत स्वतःच विधाने करायची आणि स्वतःच ती खोडायची ही नाटकं आहेत. वर या काल्पनिक कृत्याचा दोष सगळ्यांना द्यायचा हा शुद्ध विकृतपणा आहे. शिवाय, स्वेच्छेने जय श्रीराम म्हणणाऱ्या सामान्य बंगालीजनांवर तिथल्या पोलिसांनी अमानुषपणे अत्याचार केले तेव्हा हीच काव्यप्रतिभा कुठे पेंड खायला गेली होती, किंवा तथाकथित प्रेम म्हणून लग्न केल्यावर बायकोला धर्म बदलण्यासाठी, हिंदू धर्म त्यागण्यासाठी जबरदस्ती केली जाते, प्रसंगी जीवही घेतला जातो तेव्हा त्याची निर्भत्सना करणारी कविता का 'होत' नाही असा जाब कविवर्यांना विचारायला हवा.

सुमारे पाचशे वर्षांनंतर अगणित जनांच्या हौतात्म्यानंतर आणि सातत्याने कायदेशीर पाठपुराव्यानंतर राम मंदिर होणार आणि तिथेच होणार आणि तारीखही ठरली हे जेव्हापासून नक्की झालं, तेव्हापासून हिंदुद्वेष्ट्यांच्या कळपांतले राक्षस भयंकर पिसाळले आहेत. मग काहींना राम सगळ्यांचा आहे असा साक्षात्कार झालेला आहे, तर काहींना आमचा राम वेगळा आहे असा वेडाचा झटका येतोय. हॉस्पिटल आणि शाळा बांधा अशी किरकिर आताशा ऐकू येत नाही पण आहे. २०१४ मध्ये डाव्यांचं लाडकं सरकार जाऊन नवीन आणि नावडता पक्ष पूर्ण बहुमताने आल्यापासून सुरू झालेला त्रास हा २०१९ नंतर आणखी वाढला आहे. अजून बरंच काम बाकी असलं तरी ठिकठिकाणी म्हणजे शिक्षणसंस्था, बँका इत्यादी ठिकाणांहून डाव्यांची पिल्ले जाऊन राष्ट्रीय  विचारांच्या व्यक्तींची नेमणूक व्हायला सुरुवात झालेली आहे. शिवाय, सरकारचे निर्णय घोषित होण्याआधीच समजून ते बदलण्यापर्यंत किंवा रद्द होण्यापर्यंत असलेला डाव्यांचा दबदबा आज तितकासा उरलेला नाही. आता पंतप्रधान त्यांच्या मनातली बात कुणाच्याही आधी स्वतःच येऊन जनतेला सांगतात. दौऱ्यावर जाताना फुकटचे पुख्खे झोडणारे दारुबाज पत्रकारांचा तांडा न नेता सरकारी खात्याचे संबंधित निवडक लोकच सोबत असतात. 'काश्मीर फाईल्स' चित्रपटात जो "सरकार उनकी है पर सिस्टम तो हमारा है" यातलं सरकार बदलून झालं, आता सिस्टमला बदलण्याचं काम हळूहळू सुरू आहे. राम मंदिराच्या उद्घाटनापाठोपाठ २०२४च्या निवडणुकाही तोंडावर आहेत. विरोधी पक्षांना अजूनही आपली एक घट्ट मूठ म्हणावी तशी वळता आलेली दिसत नाही, त्यांना पंतप्रधानपदासाठी एक चेहराही देता आलेला नाही. अशा निर्नायकी विरोधकांसमोर आव्हान गोळीबंद आहे, तेव्हा निकाल काय लागणार ते उघड आहेच!

जर आपल्याला अपेक्षित असाच २०२४चा निकाल आला तर सिस्टीम बदलण्यासाठी १५ वर्ष खूप होतात. अधिकाऱ्यांची जवळजवळ संपूर्ण नवी फळी भरती होऊन वरिष्ठ पदांवर पोहोचते. म्हणजे सिस्टीम अधिक वेगाने बदलली जाऊ शकते आणि ही भीती विरोधकांना नक्की आहे!

डावे असुर पिसाटण्याचं हे देखील महत्वाचं कारण आहे.

सातत्याने मुळातच शांतताप्रिय आणि सहिष्णू असलेल्या हिंदू समाजाला वर्षानुवर्षे तुम्ही शांतता पाळा, तुम्ही सहिष्णू व्हा असे डोस पाजले गेलेत त्याला आता हिंदू समाज कंटाळला आहे. आता दुय्यम नागरिक म्हणून न जगता आमचा देश म्हणून ताठ मानेने हिंदूंनी जगायला सुरवात केली आहे, हा डाव्यांच्या पार्श्वभागात घुसलेला मोठा काटा आहे. त्यांना आजही हिंदू समाजमन समजू शकलेलं नाही. मग राम मंदिरासमोर बाईट घेताना भावुक होणारे पत्रकार आणि विविध उपक्रम करणाऱ्या व्यक्ती, आणि कोट्यवधी भारतीय घरांतून ओसंडून वाहणारा उत्साह हे सगळं पाहून डाव्यांना असे काव्यमय वेडाचे झटके येणं साहजिकच आहे.

एकदा जमीन हिसकावून घेतल्यावर ती हिंदू परत घेतात आणि ती देखील हिंसा आणि अहिंसा अशा दोन्ही मार्गांनी, हा मानसिक धक्का आपल्या शत्रूंसाठी फार मोठा आहे. कारण 'झांकी' नंतर 'बाकी' गोष्टींकडे वळलेलं हिंदूंचं लक्ष हे डाव्यांना आणि एकंदर हिंदूंच्या शत्रूंना अत्यंत अस्वस्थ करणार हे उघडच आहे.

जाता जाता कवी महाशयांना माझं चार ओळीत उत्तर असं आहे की:
रामभक्त कैसे बनना है ये उनसे हम क्यूं सीखें
दुर्गा को जिन्होने वेश्या और रावण को महात्मा बताया है
तुम जैसों को अब हम रखते है जूते की नोंक पर
सैकडों वर्षों का वसूलना अब पुराना बकाया है

जय श्रीराम 🙏🏻

🖊️ मंदार दिलीप जोशी
मार्गशीर्ष कृ ३ संकष्ट चतुर्थी, शके १९४५
विक्रम संवत २०८०

Wednesday, November 29, 2023

हे ही आपलेच !

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बोगदातज्ञ श्री अर्नोल्ड डिक्स यांच्याबद्दल भारतीयांना नितांत प्रेम का आहे?

त्यांचे बोगद्या वाचवण्यात बाहेर देवाला नमस्कार करतानाचे फोटो प्रकाशित झाले होते. पण फक्त म्हणून? एक परदेशी गोरा ख्रिश्चन आपल्या धर्माच्या देवासमोर नतमस्तक झाला म्हणून? की अर्नोल्ड धर्मांतर करुन हिंदू झालेत अशी समजूत झाली आहे म्हणून? आणि त्यामुळे हिंदूंचा अहं सुखावला म्हणून?

अजिबात नाही.



फसलेल्या कामगारांना वाचवायला यश मिळावं म्हणून या बोगद्याजवळ काहीच दिवसांपूर्वी बाबा भौखनाग यांचे तात्पुरते मंदिर बांधण्यात आलेलं आपण अनेक छायाचित्रांतून बघितलं असेलच. त्या आधी त्याची पालखी काढून पूजा आणि आरती करण्यात आली. परमेश्वर कुपित झालेला आहे असं समजून देवाला साकडं घालण्यात आलं आणि हे छोटं मंदिर उभारण्यात आलं.

श्री अर्नोल्ड डिक्स यांच्याबद्दल भारतीयांना नितांत आदर आणि प्रेम याकरता आहे की ते मोकळ्या मनाने या देशाच्या, धर्माच्या अनुभूतींना सामोरे गेले म्हणून आणि स्थानिक संस्कृती आणि परंपरांबद्दलचा आदर जाहीर दाखवला म्हणून. आणि हो, त्यांच्यात स्वाभाविक काळजी, जिव्हाळा, आणि मानवता दिसली म्हणूनही.

हिंदुत्व म्हणजे दुसरं काय असतं? असलेल्या श्रद्धेचा त्याग करुन दुसरी स्वीकारणे इथवर हिंदुत्व मर्यादित नक्कीच नाही. हिंदुत्व म्हणजे स्वतःत डोकावून सत्यान्वेषण करणे आणि त्यातून जे निष्पन्न होईल त्याकडे डोळसपणे बघणे आणि उघडपणे स्वीकारणे. तेच अर्नोल्ड यांनी केल्याने आता भारतीय त्यांच्यावर प्रेम करु लागले आहेत.

यापैकी काहीही न करता फक्त कर्तव्य पार पाडून आपले पैसे घेऊन निघून गेले असते तरी भारतीयांना त्यांच्याबद्दल आदरच वाटला असता. जसा तो त्यांच्याबद्दल आणि त्यांच्यासारखे बाहेरुन आलेल्या आणि या मदतकार्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाबद्दल वाटतो आहे तसाच, मग त्यांनी यातलं काहीही केलेलं असो किंवा नसो. कारण कृतज्ञता ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

म्हणूनच श्री अर्नोल्ड डिक्स आणि या मदतकार्यात सहभागी झालेल्या सर्वांप्रती आपण कृतज्ञ आहोत.

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक कृ २, शके १९४५

Tuesday, October 31, 2023

मर्यादा पुरुषोत्तम

चित्रसेन स्वर्गात अर्जुनाला नृत्य आणि संगीताचं शिक्षण देत असताना ते बघत असलेली उर्वशी अर्जुनावर भाळली. अर्जुनावर अनुरक्त झालेल्या उर्वशीला अर्जुन म्हणाला की आमच्या एका पूर्वजाशी म्हणजेच महाराज पुरुरवा यांच्याशी विवाह करुन तुम्ही आमच्या वंशाचा जो सन्मान केलात, आमची वंशवृद्धी केलीत त्यामुळे तुम्ही मला मातेसमान आहात. त्यामुळे इतर कुठल्याही स्वरूपात मी तुम्हाला पाहू शकत नाही. 

इंग्रजीत एक म्हण आहे, "Hell hath no fury like a woman scorned." अर्जुनाच्या नकाराने क्षुब्ध झालेल्या उर्वशीने त्याला शाप दिला की तू कायम नपुंसक राहशील. यावर इंद्राने तिला शाप एक वर्षापर्यंत मर्यादित करण्याचा आणि ते एक वर्ष अर्जुनाला निवडण्याची मुभा देण्याचा सल्ला दिला. अर्जुनाने ते एक वर्ष म्हणून अज्ञातवासाचं एक वर्ष निवडलं. 


अज्ञातवासात अर्जुनाने बृहन्नडेचं रूप घेतलं आणि विराट राजाची कन्या उत्तरा तिला संगीत व नृत्याचं शिक्षण दिलं. अज्ञातवासाच्या शेवटी जेव्हा सर्व पांडव आपल्या मूळ रूपात प्रकट झाले तेव्हा विराट राजाने अर्जुनापुढे आपल्या कन्येच्या विवाहाचा प्रस्ताव मांडला. पण अर्जुनाने त्याला नकार दिला. 

आता अर्जुनाने नकार का दिला याकडे लक्ष द्या. अर्जुनाने उर्वशीच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिला त्याचं कारण आठवलं तर याचंही कारण आपल्या लक्षात येईल. 

अर्जुन विराट राजाला म्हणाला की त्याने उत्तराला संगीत व नृत्याचं शिक्षण दिलं, म्हणजे तो तिचा गुरु होता. आणि शिष्या ही मुलीसारखी असते. पण तुम्ही उत्तराचा विवाह माझा पुत्र अभिमन्यू याच्याशी करा. मग अभिमन्यू आणि उत्तरा यांचा विवाह संपन्न झाला.


विचार करा. आजच्या भाषेत ज्याला हॉट म्हणतात तशी अप्सरा तुमच्यावर अनुरक्त होते आणि तुम्ही तिला तिने तुमच्या एका पूर्वजाशी लग्न केलं म्हणून आईसमान म्हणता आणि नकार देता.

पुढे एक राजा आपल्या सुंदर मुलीचं स्थळ तुम्हाला सुचवतो आणि तुम्ही म्हणता तुम्ही तिचे गुरु असल्याने ती तुम्हाला मुलीसमान आहे म्हणून तुम्ही नकार देता, आणि तिचं लग्न आपल्या मुलाशी लावून देता.

आज शक्य आहे का ते? पण ‘चालतंय’ नावाखाली हवं ते करायचं. जाहिरात, मालिका, आणि सिनेमाच्या माध्यमातून आपल्यावर हे बिंबवण्याचा प्रयत्न सुरु आहे की कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी म्हणजे खूप लहान किंवा वयाने मोठी असली तरी हल्ली लग्न केलेलं/जमवलेलं चालतं आणि करावं(च). आठवा: अनिल कपूर आणि श्रीदेवीचा 'लम्हें' हा चित्रपट. अनिल कपूरचं श्रीदेवीवर प्रेम असतं पण तिचं दुसर्‍यावर. तिच्याशी लग्न होऊ शकत नाही म्हणून हा पुढे तिच्यासारख्याच दिसणर्‍या तिच्या मुलीशी लग्न करतो. मराठीत 'तुला पाहते रे' आणि हिंदीत 'दिल सम्हल जा जरा' आणि स्त्री व पुरुष यांच्या भुमिकांची अदलाबदल असलेला 'आप के आ जाने से' या मालिकांची उदाहरणे आहेत.

महाभारतातील किंवा कुठल्याही धर्मग्रंथातील व्यक्तींबाबत व्हॉट्सॅप फॉरवर्डेड विनोद ढकलणे आणि त्यावर हाहा करणे याला अजिबात अक्कल लागत नाही. पण मूळ संदर्भ तपासून त्या व्यक्ती किती धार्मिक होत्या आणि धर्मपालन करताना विशिष्ट परिस्थितीत स्त्रीकडे आई आणि मुलगी म्हणून बघायची दृष्टी त्यांना कशी होती यात त्यांचं मोठेपण सामावलेलं आहे हे आपल्या ध्यानात येतं. 

इथे अर्जुनाचं वय नेमकं किती ते सोडा. पण तुम्हाला तुमच्या वयाच्या ४०-४५ वर्षी, २५च्या आसपास वय असलेल्या मुलीमधे स्वतःची मुलगी किंवा बहीण दिसत नसेल आणि फक्त मादीच दिसत असेल तर तुमच्या मेंदूत काहीतरी फार मोठी गडबड आहे हे नक्की (मग दादा/ताई/काका/मामा करायची गरज आहेच असं नाही). ती गडबड एक तर जनुकीय किंवा संस्कारांशी संबंधित तरी आहे किंवा तुम्ही ज्या वातावरणात वाढलात त्याच्याशी तरी. 

तस्मात्, धर्ममार्गावर चाला.

बास, बाकी काही नाही.

🖊️ मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ३, शके १९४५

-----------------------------------------------------------------
टीपः
(१) वरील ४५-२५ ही वये ही प्रातिनिधिक म्हणून घेतली आहेत. अक्षरशः घेऊ नये.
(२) या लिखाणाचा कुठल्याही शहाण्या, अर्धवट, किंवा ठार वेड्या अशा मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींशी; जिवंत, अर्धमेल्या, किंवा मृत व्यक्तींशी; आणि त्यांच्या स्थान, भाषा, शिक्षण, आणि व्यवसाय वगैरेंशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
-----------------------------------------------------------------

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये

माझा एक लांबचा भाऊ आहे, जॉब प्रोफाइल आयटी सपोर्ट अशी आहे. 

मी त्याला कधी फोन केला की तो नेहमीच माझी जी काही शंका असेल तिचं निरसन करायचा, अगदी कितीही क्षुल्लक असेल तरी. मी एकदा त्याला सहज विचारलं की अरे बाबा तुला डिस्टर्ब होत नाही ना? तुला नक्की वेळ असतो ना?

मग एकदा त्याने त्याची प्रोफाइल मला समजावून सांगितली. मला वाटलं बऱ्यापैकी रिलॅक्स काम आहे. तो म्हणाला की अरे हे जे तुला रिलॅक्स वाटतं तेच मुळात प्रमुख काम आहे. एखादी घटना (incident) घडली की त्याला प्रतिसाद (response) देणं हे तुलनेने सोपं आणि तितकं स्ट्रेसवालं नाहीये. कारण काय करायचं हाच माझा विषय असल्यानं मला आधीपासूनच माहीत आहे किंवा नंतर मार्ग काढता येतो.  

पण आता काय घडेल, आता काही घडेल का, कधी घडेल, याची वाट बघत बसणं आणि त्या दडपणाखाली राहणं हेच सगळ्यात ताण देणारं असतं. 

नेहमीच्या आयुष्यात पण असंच असतं, वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध घडली की आपलं मन त्याला त्या त्या पध्दतीनं प्रतिसाद देतं. पण तीच गोष्ट गॅसवर असली म्हणजे अनिश्चित असली की तो कालावधी भयंकर कठीण असतो. 

अशा वेळी मला नेहमीच रामरक्षा फार मोठा आधार वाटत आलेली आहे. त्यामुळे काही घडत नाही तोवर...

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि। श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि। श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥

जय श्रीराम मित्रों 🙏🏻

🖊️ मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. २, शके १९४५

Saturday, March 11, 2023

पाश्चात्यांचे हिंदुत्वः १

लंडनस्थित एक अमेरिकन पुरातत्वतज्ञ श्री जॉन मर्विन फ्रिट्झ निवर्तले. श्री फ्रिट्झ अनेकदा हम्पीला येत असत. त्यांची शेवटची इच्छा अशी होती की आपल्या अस्थी हम्पी येथील तुंग नदीत विसर्जित करण्यात याव्यात. त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी हम्पीला येऊन त्यांच्या अस्थींचे हिंदू परंपरेनुसार विधिवत विसर्जन केले. 

एकीकडे पाश्चात्य जगात हिंदू संस्कृती व परंपरांबद्दल आकर्षण वाढत आहे, तर दुसरीकडे आपल्यापैकी काही घटिंगण प्रथा, परंपरा कशा निरर्थक आहेत हे सांगण्याचा करंटेपणा करत आहेत. एका मित्राच्या म्हणण्यानुसार हिंदू धर्माचे पुनरूज्जीवन कदाचित पाश्चात्य जगातून होईल किंवा त्याचा प्रणेते पाश्चात्य असतील ते अशा वेळी खरं वाटू लागतं.





Ashes of John Merwin Fritz, a London-based archaeologist, immersed in the Tungabhadra waters at Hampi

The ashes (asthi) of John Merwin Fritz, an 83-year-old London-based archaeologist and anthropologist, who died in London on January 23 this year, were, as per his wishes, immersed in the Tungabhadra waters at Hampi on Sunday.

Fritz was an internationally acclaimed archaeological researcher who made notable contribution to research on the great imperial city of Vijayanagara.

As per his wishes, his cremation was carried out according to Hindu rituals in London and the ashes were immersed in the Tungabhadra waters. His grandson Williams performed the ash-immersion rituals at Hampi.

Fritz’s daughter Alice Chandra Fritz and his friends John Gollings and George Michell were among those present at the Hampi ceremony.

“Fritz was very fond of India, especially Hampi. As per his wishes, his ashes were submerged in the Tungabhadra waters. His other wish was to complete the Vijayanagara Research Project which he started 30 years ago. I am also part of the project with a specific assignment of mapping surface archaeological features and I have finished it. We will try to complete the entire project,” Surendra Kumar, a Hampi-based researcher, told The Hindu.

Born on December 29, 1939 at Glendale of California in the United States, Fritz had settled down in London.

His work, Paleo-Psychology Today (1978), anticipated not only new directions in archaeology but also what would become the core of his research and publications regarding the symbolic features of past architectural monuments and structures, including aspects of both the Chaco site in New Mexico and, most substantively, the grand imperial city of Vijayanagara at Hampi in India.

In April 1981, Fritz joined George Michell, an architect from Australia, for archaeological research of Hampi. Over the next 20 years, he and George Michell ran an independent field camp in the middle of the ruins in Hampi. Together with the many scholars who became involved in what came to be known as the Vijayanagara Research Project, Fritz published extensively, editing the two-volume “Vijayanagara: Archaeological Exploration, 1990-2000”, and, together with George Michell, issued a popular guidebook on the site.

Their jointly authored “City of Victory” published in 1991 by Aperture in New York was the first of the several superbly illustrated volumes. They gifted much of the project’s maps and drawings to the British Library. Before his death, Fritz made a bequest to the American Trust for the British Library to fund a one-year cataloguing post for the collections.

© मंदार दिलीप जोशी
फाल्गुन कृ. चतुर्थी, शके १९४४ | गणेश चतुर्थी

Wednesday, February 15, 2023

शूरा मी वंदिले

जर एखादा पोलीस अधिकारी कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक आणि शूर असेल, आणि तो देशद्रोही आणि समाजकंटकांशी लढत आणि जिंकत असेल तर – त्याचं वैवाहिक जीवन सुखी असू शकत नाही - धक्का बसला? आणि शीर्षकाचा याच्याशी काय संबंध? थांबा थांबा, सांगतो. 

किमान हॉलिवूड आणि तिथून चोर्‍यामार्‍या करणारे बॉलिवूडचे आणि वेब सिरीजचे निर्माते हेच असत्य (नॅरेटिव्ह) प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. माझ्या आठवणीत नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला आलेल्या Bruce Willis नायक असलेल्या 'Diehard' या चित्रपट मालिकेनेपासून याची सुरवात झाली. नंतर २००८ च्या आसपास आलेल्या  Liam Neeson च्या 'Taken' या सिनेमा सिरीजने या छद्मसिद्धांताला पुढे रेटण्याचं काम केलं. आणखीही चित्रपट मालिका असतीलच, पण मला ठळकपणे या दोन आठवतात इतकंच. अरे हो, हे लिहीता लिहीताच बाटला हाऊस एनकाउंटरवर आधारित त्याच नावाच्या चित्रपटातही नायकाचं वैवाहिक आयुष्य फारसं बरं चाललेलं नसतं असं दाखवलं आहे. [त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणजे डाय हार्ड मालिकेच्या चौथ्या भागात ऑफिसर मक्लेन (ब्रूस विलीस) ची मुलगी जी आधी स्वतःची ओळख ल्युसी जेनेरो (Gennero - तिच्या आईचं म्हणजे हॉली हिचं आडनाव) अशी करुन देत असते तीच वडिलांनी व्हिलन आणि मंडळींचे बारा वाजवल्यावर आपलं नाव ल्युसी मक्लेन अशी करुन देते. पण तरी नॅरेटिव्ह तोच राहतो.]


नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राईमवर आलेली वेब सिरीज 'फर्जी' याच विकृतीने ग्रासलेली दिसते. बुद्धीमत्ता आणि शौर्याच्या जोरावर अत्यंत ताकदवान असलेल्या माफियावर मात करणार्‍या पोलीसांचा एक गट अशी साधारण कथावस्तू आहे. यात नायक असलेल्या पोलीस अधिकार्‍याच्या र्‍हास होत चाललेल्या वैवाहिक आयुष्याबाबत एक संपूर्ण असंबद्ध अशी एक समांतर चालणारी गोष्ट आहे. या घटस्फोटाच्या प्रकरणाला मालिकेच्या कथेतून रजा दिली असती तरी तरी कथेवर काहीही परिणाम झाला नसता. 

हे सातत्याने का केलं जातं? कलात्मक स्वातंत्र्य अर्थात क्रिएटिव्ह लिबर्टी अंतर्गत कथेत मसाला घालणे हा एक तर्क होऊ शकतो, पण खरंच फक्त तेच कारण आहे का?

यावर चर्चा करत असताना दोन कारणे समोर आली. कुटूंबसंस्थेला विविध मार्गांनी नष्ट करायला डावे टपलेलेच आहेत. तसंच, डाव्यांनी व्यापलेल्या मनोरंजन क्षेत्रात त्यांचं लाडकं लक्ष्य अर्थात टार्गेट असलेली patriarchy अर्थात पितृसत्ताक पद्धती नेहमीच रडावर असते. समाजमाध्यमांत #SmashPatriarchy आणि थेट बोलता येत नाही म्हणून त्याला #SmashBrahminPatriarchy अशी दिलेली फोडणी आपण बघत असतो. आता #Patriarchyनष्ट करायची तर समाजातलं पौरुष नष्ट करणे भाग आहे. 

संगीत मानापमान नाटकातलं "शूरा मी वंदिले" या पदाकडे आपण येऊया. प्राचीन काळापासून स्त्री ही शूर पुरुषाकडे आकर्षित होते हा आपला पारंपारिक दृष्टीकोन (traditional view)आहे. काळानुसार समाजात अनेक बदल होत गेले असले तरी मूळ गाभा तोच राहिला आहे. आजही गणवेषातल्या अधिकारी व्यक्तीची पत्नी म्हणवून घेण्यात अनेकींना अभिमान वाटतो. माझ्या अनुभवांतही आपला नवरा पोलीसांत, सैन्यात, नौदलात किंवा तत्सम क्षेत्रात आहे हे सांगताना स्त्रियांच्या चेहर्‍यावर एक निराळीच चमक दिसते. 

चित्रपटांत आणि वेब सिरीजमधे अशा प्रकारची कथानके घालण्याचं हेच कारण दिसतं की प्रामाणिक, शूर, आणि यशस्वी पुरुष अधिकार्‍यांचं एक तर करियर उत्तम असू शकतं किंवा वैवाहिक आयुष्य तरी. पूर्वी चित्रपटांत प्रामाणिक पोलीस अधिकार्‍यांच्या कुटुंबावर होणारे अत्याचार आणि त्यांच्या हत्या दाखवल्या जायच्या. आता त्यांचा चांगला संसारच होऊ नये म्हणून हे कर्तृत्ववान शूर पुरुषांच्या अयशस्वी संसाराचा नॅरेटिव्ह रुजवण्याचे प्रयत्न होत आहेत. यात मेख अशी आहे की डाय हार्ड, टेकन, बाटला हाऊस इत्यादी सिनेमांत नायिकेला नवर्‍याच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, प्रेमही आहे,  पण तरी तिला त्याबरोबर करावी लागणारी तडजोड आणि त्याग मात्र मान्य नाही. थोडक्यात ज्याप्रमाणे शिवाजी महाराज जन्माला यावेत पण शेजारी अशी समाजाची मानसिकता आहे तसंच "शूरा मी वंदिले" हा पारंपारिक दृष्टीकोन बदलून "शूरा मी लांबूनच वंदिले" असा दृष्टीकोन रुजवण्याचे जोरदार प्रयत्न गेल्या तीसहून अधिक वर्षांपासून चित्रपट आणि मालिकांमार्फत सुरु आहेत. 

वाचकांनी सहमत व्हावंच असं अजिबात नाही, पण यावर विचार करावा अशी मात्र नक्कीच अपेक्षा आहे. 

मूळ हिंदी: © श्री जनार्दन पेंढारकर
मराठी भावानुवाद, संपादन, आणि वाढीव लेखनः © श्री मंदार दिलीप जोशी

Thursday, October 27, 2022

परंतु तेथे भगवंताचे, अधिष्ठान पाहिजे

प्रत्यक्ष आयुष्यात बहुसंख्य हिंदूंनी पुन्हा कुंकु/टिकली/गंध लावायला सुरवात करायला हवी असं नेहमी वाटत असे. मी स्वतः पाश्चात्य कपडे घालूनही मी रोज गंध लावून ऑफिसात जायचो, अजूनही जातो. खरं तर या कपड्यांना सोयीचे/नियमांअंतर्गत मोडणारे कपडे असं म्हणायला हवं. कारण कॉर्पोरेट ऑफिसात धोतर नेसून जाता येत नाही. पण अनेक ठिकाणी कुठल्याही कपड्यांसोबत कुंकू/टिकली-टिळा लावण्यावर बंधन नाही. इस्रोचे अवकाश शास्त्रज्ञ के कस्तुरीरंगन हे ही कामावर नियमित गंध लावून जात असत. जेव्हा ऑफिसात स्त्रिया टिकली लावून येतात तेव्हा त्यांचं व्यक्तिमत्व हे फक्त कॉर्पोरेट न राहता त्याला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते आणि एक प्रकारचं तेज चेहर्‍यावर असल्याचं भासतं. 

प्रत्यक्ष जगण्यात हिंदुत्वाची प्रतीके आणि चिह्ने आपण श्रद्धेने, अभिमानाने, आणि नियमितपणे अंगावर ल्याली पाहीजेत. या विषयावर मी माझ्या पद्धतीने काम करायला सुरवात केली होती आणि पुढेही करत राहीन. पण काल मला एका फेसबुक मैत्रिणीचे संदेश आले (चित्र १) आणि फेसबुकवर आपला वेळ अगदीच वाया जात नाही हे पटलं. कुंकू/टिळा/गंध हे कालबाह्य नाही तर अभिमानाने मिरवावे असे सांस्कृतिक, धार्मिक चिन्ह आहे हे विशेषतः तरुणांच्या मनावर ठसवले गेले पाहीजे. इथे मी कुंकू/टिकली लावण्यामागे विज्ञान, आज्ञाचक्र वगैरे बाबींबद्दल बोलत नाही कारण गोष्टी विनाकारण गुंतागुंतीच्या होतील. 
























एक आक्षेप समोर आला की पाश्चात्य कपड्यांवर कुंकू/टिकली लावण्याचा आग्रह बरोबर नाही. पण कुंकू-टिळा हे कपड्यांवर अवलंबून ठेवून आपण त्याचा परीघ मर्यादित करत आहोत. हे लिहीत असताना पाश्चात्य कपड्यांवर म्हणजे जीन्स-टीशर्टवर टिच्चून टिकली लावून फिरणारी एक फेसबुक अविवाहित भगिनी आठवली. तिची पोस्ट सोबत जोडली आहे, अर्थातच नाव झाकून. ती काही हिंदू धर्मातली पंडित नाही, पण तिच्या मनात जी विचारांची सुस्पष्टता आहे ती मला क्वचितच इतर लोकांच्यात दिसते (चित्र २ आणि ३). 





































पोस्टच्या सुरवातीला ज्या मैत्रिणीचा उल्लेख केला ती विवाहित आहे आणि घरातली कर्ती स्त्री आहे. नवरा-बायको आणि एक मूल असं कुटुंब आहे. याचा अर्थ  किमान तीन जणं या विचारांनी प्रभावित झाले आहेत किंवा होतील. ते कदाचित इतरांना प्रभावित करतील. यालाच हिंदीत ज्योत से ज्योत जलाते चलो म्हणत असावेत.

तुमच्यापैकी कुणी या बाबतीत समविचारी असेल तर मी एकटा काय करु शकतो किंवा शकते असा विचार करुन हताश होऊ नका. मात्र जे कराल त्याला भगवंताचे अधिष्ठान असावे.  

सामर्थ्य आहे चळवळीचे  जो जो करील तयाचे॥ परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ (दा. २०.४.२६)

आपण सूज्ञ आहात, बहुत काय लिहीणे!

© मंदार दिलीप जोशी
कार्तिक शु. द्वितिया, शके १९४४


Thursday, October 6, 2022

बॉयकॉट बॉलीवूड आणि युद्धभूमीची निवड

#BoycottBollywood चळवळीला मूर्खात कसं काढायचं याचा आदिपुरुषचा ट्रेलर आणि त्यानंतर सुरु झालेलं प्रिमॅच्युअर रावणदहन हा एक वस्तुपाठ आहे. आत्तापर्यंत सैफचा रावण आणि त्याची मापं काढणार्‍या पोस्टी येऊन गेल्या आणि चर्चेच्या केंद्रस्थानी रावणाला ठेवण्यात चित्रपटामागच्या शक्ती यशस्वी झाल्या. एकूण पोस्ट्सपैकी ९५% पोस्ट या रावणावर होत्या.

आणि हिंदुत्ववादी / #BoycottBollywood वाले या गुगलीवर त्रिफळाचित झाले.

हा गुगली कसा?


पहिल्या फोटोकडे बघा. तुम्हाला तो आवडलेला नाही, कारण नेहमी, म्हणजे लागोपाठ सिनेमा मागून सिनेमात, नराधम, दुष्ट, अत्याचारी खलनायक मंडळींना नेहमी विभूती, गंध इत्यादी हिंदू प्रतीकं लावलेलं का दाखवायचं? आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.


आता दुसर्‍या फोटोकडे बघा. तुम्हाला तोही आवडलेला नाही, कारण तुमचा व्हिलन कितीही दुराचारी, अत्याचारी, बलात्कारी, थोडक्यात नीचपणाचा कळस असला तरी तो तुम्हाला म्लेंछवेषात वेड्याबिद्र्या पक्ष्यावर आरुढ होऊन आलेला चालणार नाही. आमी नाई म्हणजे नाही सहन करणार.

अरे मग तुम्हाला हवंय तरी काय? फक्त बॉयकॉट बॉयकॉट करत आऊटरेज करायचंय? — हे मी नाही म्हणत, बॉलीवूडने तुमच्यावर फेकलेली Strawman Argument आहे. Strawman Argument म्हणजे तुमच्या मुद्द्याला खेचून दुसर्‍या टोकाला नेत "तुम्हाला असं म्हणायचंय का?" या पातळीवर चर्चा आणून ठेवणे. समजा तुम्ही म्हणालात की प्रदूषण कमी होणार्‍या गाड्यांची निर्मिती वाढली पाहीजे, तर समोरचा म्हणतो "म्हणजे काय आता बैलगाड्यांनी प्रवास करायचा का?" याला म्हणतात Strawman Argument. यात आता तुम्ही स्वतःचा मुद्दा बाजूला ठेवून त्याने मांडलेल्या दुसर्‍या टोकाच्या मतावर वाद घालू लागता. तर ते असो.

कथेचा नायक, श्रीराम कसे असले पाहीजेत, माता सीता कशी दाखवली पाहीजे, महाबली हनुमान कसे दिसले पाहीजेत यावर चर्चा फिरण्याऐवजी, चर्चा ही अधर्माचा पुतळा म्हणता येईल अशी व्यक्ती, ज्याच्या निर्दलनासाठी आणि धर्मसंस्थापनेकरता प्रत्यक्ष भगवान विष्णूंना अवतार घ्यावा लागला तो राक्षसराज रावण कसा होता आणि कसा दाखवला पाहीजे यावर केंद्रित झाली. सर्वांनी रावणाच्या गुणांची यादी सादर करुन झाली. थोडक्यात, ही चर्चा "आमचा व्हिलन किनै..." याच भोवती फिरत राहिली.

Saif Ali Khan says Adipurush will ‘humanise’ Raavan, ‘justify his abduction of Sita’ - सैफ एका मुलाखतीत म्हणाला की आदिपुरुष सिनेमा रावणाचा 'मानवी चेहरा' समोर आणेल, सीताहरण योग्य कसं हे सिद्ध करेल.

पण अश्शी कश्शी हेअरस्टाईल रावणाची, अश्शी कश्शी मुघली दाढी रावणाची असं म्हणत, तुम्ही नाई म्हणजे नाही सहन करणार. तुम्ही म्हणणार की आमचा व्हिलन किनै विभूती लावायचा, आमचा व्हिलन किनै वेदविद्या पारंगत होता, आमचा व्हिलन किनै वीणा वाजवायचा, आमचा व्हिलन किनै शिवभक्त..... ब्लाह ब्लाह ब्लाह. मुघल असो वा राक्षस, दोघांचेही वर्तन तसेच होते आणि दोघेही संपवण्याच्याच लायकीचे हे आपण लक्षात घेतलंच नाही.

उद्या सैफने येऊन विचारलं की "तुमचा व्हिलन इतका यंव आणि त्यंव होता, मग तो वाईट कसा? उगाच आला सिनेमा झोडप, आला सिनेमा झोडप करताय!" असं म्हणत आपली, म्हणजे बॉयकॉट गँगची अक्कल काढली तर पुढच्या वेळी आपण गोंधळून नेमका कोणता मुद्दा उचलावा या गडबडीत पुढचा सिनेमा काही कोटी कमावून जाईल.

थोडक्यात, तुम्ही युद्धभूमी चुकीची निवडली या वेळी "खलनायक कसा असायला हवा" ही. हरकत नाही. 
युद्धभूमीची निवड करता यायला हवी. फार लांब नको जायला, पेशवे बाजीराव यांना पालखेडचा विजय कशामुळे मिळाला हे लक्षात घेतलं तरी पुरेसं आहे. दुर्दैवाने आपण पराभवातूनही शिकत नाही आणि शत्रू आपल्या विजयांचा अभ्यास करुन आपल्याला नंतर व्यवस्थित खिंडीत गाठतो.

पुढच्या वेळी लक्षात ठेवा.

प्रांजळ कबूली: सुदैवाने माझं अकाउंट रिस्ट्रिक्टेड होतं नाहीतर मलाही पोस्टी टाकायचा मोह आवरला नसता, तेव्हा मी जखमी होऊन संघाच्या बाहेर बसलेल्या, आणि त्यामुळे तटस्थ विचार करायची संधी मिळालेल्या खेळाडूसारखा आहे.

© मंदार दिलीप जोशी
विजयादशमी, शके १९४४

Sunday, September 4, 2022

धर्मः लवचिकता आणि सोय

खूप पूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहीली होती. लिहायला कारण असं झालं की सणवार सुरु होण्याआधीच आणि सुरु असताना कर्मकांडांच्या अनुषंगाने अनेक नकारात्मक पोस्ट दृष्टोत्पत्तीस पडल्या. त्या लिखाणाचा साधारण सूर असा की 'मी अमुक व्रतवैकल्ये आणि/किंवा उपास करत नाही, त्यातलं अमुक करत नाही, तमुक करणार नाही, इत्यादी.  त्यावर मी काय लिहीलं होतं ते या लेखनाच्या शेवटी पाहूया.

या गणेशोत्सवाच्या दरम्यानही असं काही लिखाण दिसलं ते वाचून लिहिल्यावाचून राहावलं नाही. अर्थात कुणी काय केलं हा वैय्यक्तिक प्रश्न आहे पण सार्वजनिक पटलावर अशा गोष्टींचं समर्थन दिसलं तर त्यावर भाष्य करणे अपरिहार्य आहे. तसेच, या लेखनातून व्यक्तीवर नव्हे तर प्रवृत्तीवर टीका आहे, किंबहुना टीका करण्याचा नव्हे तर प्रबोधन हाच हेतू आहे. त्यामुळे राग मानू नये. समाजमाध्यमांवर लिहीणार्‍या सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तींनी, आपल्या लिखाणात व्यक्त केलेल्या विचारांना वाचक सकारात्मक प्रतिसाद देत असतील तर अशा लोकांना स्खलनशील वर्तनाला प्रवृत्त न करता धर्मपालनाकडे कसे नेता येईल हे बघितले पाहीजे. मार्ग कठीण आहे, पण दुर्दैवाने लोक वाचून लगेच मान हलवतील असं लिखाण करण्याकडे अनेकांचा कल होत चालला आहे असं दिसल्याने हे लिहीणे भाग आहे. 

K N Krishna Bhat

धर्माची अनेक अंगे असतात, त्यातच कर्मकांड हे एक अंग आहे. धर्माचा र्‍हास घडवून आणायचा झाला की त्यातली अशी अंगे निवडून स्खलनशील मनुष्यस्वभावाला भावेल अशा प्रकारे ती कशी गरजेची नाहीत हे दाखवायचं आणि त्या शब्दांना अपमानकारक पद्धतीने सातत्याने वापरून ते शब्द ऐकताच सामान्यजनांच्या मनात आपल्याच धार्मिक बाबींबाबत चीड उत्पन्न होईल अशी परिस्थिती निर्माण करायची ही डावे आणि हिंदूद्वेष्ट्यांची जुनी कार्यपद्धती आहे. असेच दोन शब्द म्हणजे सनातनी आणि कर्मकांडं हे होत. सनातनी म्हणजे धर्माचे काटेकोर पालन करणारा अथवा  करण्याकडे कल असलेला तसेच कर्मकांड म्हणजे आपल्या धार्मिकतेचे ऐहिक प्रकटीकरण किंवा परमेश्वराशी जोडले जाण्याचा एक मार्ग होय.   

आपला धर्म लवचिक आहे. कर्मकांडांच्या संदर्भात याचा अर्थ असा की एखादी प्रथा, परंपरा, नेम आपण पाळत असू आणि एखाद्या वेळी जर एखाद्या आपत्कालीन परिस्थितीमुळे ती प्रथा, परंपरा, नेम पाळणे अशक्य असेल तर त्याने आपल्याला दोष लागत नाही किंवा इतरही काही बिघडत नाही. तिथे ताठरपणा दाखवण्यात अर्थ नसतो कारण ती आपत्कालीन परिस्थिती असते. 

मात्र कर्मकांड ज्याला जमतं त्यानेच करावं, ज्याला जमत नाही त्याने करू नये. आपल्या सोयीने खंड पाडला तरी देव समजून घेईल, भाव हवा, या सगळ्या आपल्या मनाच्या धारणा आहेत, खेळ आहेत, बाकी काही नाही, कारण ते आपल्या सोयीचं आहे. प्रत्यक्षात मात्र नियम म्हणजे नियम असतो. सगुण उपासना आणि कर्मकांड हे हातात हात घालून जाणारे विषय आहेत. ज्यांना कर्मकांडातला कर्मठपणा झेपत नाही, त्यांनी तो करू नये, इतकी साधी गोष्ट आहे. पण आपल्याला झेपत नाहीत त्या गोष्टी अर्धवट करून, मध्येच खंडित करून, त्याचं लंगडं समर्थन करू नये, तेव्हा सामान्य विचारी व्यक्तीने इतका शहाणपणा तरी दाखवायला हरकत नसावी.

उदाहरणार्थ, गणपती बसवणे हे आजीवन करायचे व्रत आहे. मनात आलं तेव्हा फिरायला गेलो आणि मनात आलं तेव्हा बसवला, असं करायला तो काही करमणुकीचं साधन नाही. जेव्हा संस्कृती आणि ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते, तेव्हा जे लोक ते आजीवन करतात, पाळतात, त्यांच्याकडून ते कार्य होतं. नाहीतर नाही केलं तरी चालतंय, असे म्हणणारे अनेक लोक असतात ज्यांच्यामुळे काळाच्या ओघात अनेक गोष्टी हरवून गेल्या आहेत. धर्माच्या लवचिकतेचा अर्थ ज्याला जेवढे झेपेल तेवढेच करावे. गणपती अखंडित बसवता येणार नसेल तर त्या मार्गाला जाऊच नये, एवढी साधी गोष्ट आहे. मग नित्यपूजा तुम्हाला जशी आणि जेवढी आणि जेव्हा करायची आहे, त्यात तुम्हाला मुभा आहेच की. पण सगळ्याच गोष्टी फक्त आपल्या मनाप्रमाणे आणि सोईप्रमाणे करायला हे काही सहलीचे नियोजन नाही. काही लोक सुरवातीला उत्साहाने दहा दिवस बसवतात, मग झेपत नाहीसे झाल्यावर सात दिवस, पाच दिवस करता करता दीड दिवसावर येतात, मग न बसवण्यासाठी आज काय फिरायला गेलो, उद्या काय महत्त्वाची व्यावसायिक मिटींग होती, अशी काहीही हास्यास्पद कारणे चालतात. ज्यांच्याकडे ठराविक धार्मिक कार्ये ठराविक दिवशी होतात, त्यांनी हे लक्षात घ्यावं की सणासुदीचे दिवस म्हणजे फिरायला जाण्याचे दिवस, पार्टी करण्याचे दिवस, सिनेमे बघण्याचे दिवस, खेळायला जाण्याचे दिवस ही अत्यंत घातक कल्पना आहे. आपल्याच पिढीने अशी गैरवर्तणूक केली तर पुढच्या पिढीला पूजा करणे, गणपती बसवणे किंवा इतरही काही नियम पाळणे, म्हणजे अनावश्यकच वाटणार यात शंकाच नाही. 

आपल्या योजनांत व्यत्यय यायला सणवार हे काही अचानक येत नाहीत, त्यांचे दिवस ठरलेले असतात. आधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे आता आपल्याला पुढील कित्येक वर्षांच्या सणावारांच्या तारखा कळू शकतात. अशा वेळी काही ठरवून करायची असलेली कामं तारखा पाहून करता येतात. नियम पाळणे, व्रतपालन करणे यांना दुराग्रह, ताठरपणा असली स्वतःच्या मनाला शांती देणारी नावं दिली म्हणून आपली चूक झाकली जात नाही. कुठल्याही परिस्थितीत नियम पाळणे याला दुराग्रह म्हणत नाहीत, निश्चय आणि व्रताचरण म्हणतात. व्रत ज्याला जमते त्यानेच करावे, बाकीच्यांनी या भानगडीत पडून परंपरा कमकुवत करण्याचे आणि बिघडवण्याचे काम करू नये. आणि केले तर हे काय चालतं, ते काय चालतं, अशा पद्धतीचे लंगडे स्पष्टीकरण तर मुळीच देऊ नये. पूर्वापार चालत आलेल्या परंपरा अचानक आलेल्या अडचणीमुळे खंडित झाल्या तर इलाज नसतो. आजारपण, जन्म-मृत्यू आपल्या हातात नसतात. घरी पण पूर्वनियोजन करतांना त्या अनुषंगाने करणं अपेक्षित असतं. देव रागवत नाही, शिक्षा करत नाही हे खरंच आहे. पण आपण केलेले, घालून घेतलेले नियम आपणच काटेकोर पाळणं हितकर. त्यामुळे आज काय फिरायला गेलो, उद्या काय ऑफिसची पार्टी होती, तेरवा आणखी काही, अशा सबबी लंगड्याच असतात.

धर्मात आध्यात्मिक प्रगती सर्वतोपरी आहे असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांनी हे समजून घ्यावं की 'आपण नेम/कर्मकांड भाव म्हणून पाळावीत सोय म्हणून नव्हे' ही गोष्ट लक्षात येणे हा आध्यात्मिक प्रगतीचाच अविभाज्य भाग असतो. आपल्या सोयीने धर्मकार्य करायची आणि सोयीने खंडित करायची यात आपण आपल्याच नैतिक अधःपतनाला हातभार लावत असतो. मग कसली आध्यात्मिक प्रगती घेऊन बसलात?

आपण अमुक अमुक करत नाही किंवा अमक्या कार्यात क्षुल्लक कारणाने खंड पडला याचं समर्थन करायला समाजमाध्यमांवर कुणाला मोठमोठे लेख लिहावे लागत असतील तर त्याचे दोनपैकी एक अर्थ होऊ शकतो. एक तर आपण जाज्ज्वल्य हिंदुत्ववादी असलो तरी त्याचवेळी किती लिबरल आहोत हे सांगायला सवंग लोकप्रियतेचा आधार घ्यायचा असतो..... किंवा जे असं करतात त्यांचं मन त्यांना खात असतं पण आपण केलं ते कसं बरोबर हे सांगून आणि लोकांची मान्यता मिळवून आपली अपराधीपणाची भावना शमवण्याचा तो प्रयत्न असतो. मन खात राहणं हे काही केवळ अपराध भावनेने होत नाही. आपल्या हातून राहिलं याची हूरहूर, रुखरुख असतेच आणि ते अतिशय साहजिक असतं. अपराधीपणा म्हणा किंवा रुखरुख म्हणा किंवा आणखी काही म्हणा, समाजमाध्यमांवर लोकांचं समर्थन मिळवण्याने जो बूंद से गयी वो लाईक और बदाम से परत नहीं आती.

मी व्रतवैकल्ये व उपास यांच्यासंदर्भात आधी लिहीलं होतं, तेच सर्व कर्मकांडांच्या बाबतीत लागू आहे की ज्यांना करायचे आहेत त्यांनी करावं, ज्यांना करायचं नाहीत त्यांनी ते करू नयेत. पण 'अमुक अमुक केलं नाही किंवा करत नाही' हे लोकांना दाखवायला लहान ते लघुनिबंधाइतकी लांबी असलेले लेख का लिहिता? आज आपण धर्मपालनाच्या बाबतीत तरुण पिढीला नावे ठेवतो, पण तरीही अनेक तरूण तरुणी प्रथा, परंपरा पाळायला उत्सुक आहेत; एखादा केलेला नेम पाळला की त्यांना आनंद देऊन जातो. त्यांच्यासाठी प्रोत्साहनात्मक काही लिहीता येत नसेल तर नकारात्मक तरी लिहू नका. अशा नकारात्मक लेखबाजीने ज्यांना करायची इच्छा आहे त्यांची उत्सुकता व इच्छा तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मारत आहात.

सार हे की परंपरा पाळतांना 'आपल्या सोयीला' प्राधान्य नसावं. ती खंडित करण्यासाठी तसंच प्रबळ आणि अपरिहार्य असं कारण असलं पाहिजे, इतकंच. करायचं नसेल, करु नका. केलंत तर निष्ठेने करा. आणि खंडित केलंतच तर त्याचं केविलवाणे जाहीर समर्थन करू नका.

एक मित्र म्हणतो: With Hindus, it seems the pattern is always towards 'reforming' the religion to suit one's own cravings and convenience, rather than reforming oneself, by using the disciplines of the religion. And I suppose such lack of discipline and commitment, is presented as being "Spiritual but not religious" or "Progressive Scientific temper" etc. Well I can't say I am disciplined either. But I totally own up, I am just lazy, indolent etc., I will try to do better, but will never need the religion to be 'reformed', to fit my fecklessness.

हिंदुत्व ही जीवनपद्धती आहे हे वाक्य अनेकदा पळवाटेसारखं वापरलं जातं, कारण धर्मपालन करायचं नसेल तिथे इतर मुद्द्यांच्या अभावी हे एक लक्षवेधक आणि दुर्दैवाने टाळ्या मिळवणारं वाक्य झालं आहे. जिथे धार्मिक बाबींच्या अनुषंगाने हिंदूंमधे नेहमी स्वतःच्या लालसापूर्ती आणि सोयिस्कर वर्तनाला पूरक असं समर्थन धर्मातून मिळवता आलं नाही की धर्मातच त्या अनुसार "सुधारणा घडवून आणणे" याकडे कल दिसतो. आणि मग याच बेशिस्त आणि लेच्यापेच्या वागण्याचे प्रकटीकरण्गं "आध्यात्मिक, पण धार्मिक नव्हे" आणि "प्रगतीशील वैज्ञानिक दृष्टिकोन" वगैरे शब्दांत केले जाते. गंमत म्हणजे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे असाल तर आत्मिक प्रगती घडवून आणाल, काहीतरी बिघडलेली वस्तू असल्यासारखं धर्माला सोयीस्करपणे वाकवून घेणार नाही. कर्मकांडांना कालसुसंगत करण्याच्या नादात आपण काळाबरोबर वाहवत जात नाही ना हे आपल्याच मनाला वारंवार विचारणे योग्य ठरेल.

मी ही माणूसच आहे, माझ्याकडून चुका होत असतील तर त्या सुधारण्याकडे माझा कल असला पाहीजे. प्रगती करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील, पण माझ्यातले दोष सुधारण्याऐवजी त्यांना पूरक असं धर्माला मी कधीही वाकवणार नाही.

तेव्हा जे करायचं ते निश्चयावर दृढ राहून करावं. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलंच आहे 'उपासनेला दृढ चालवावे'. 

© मंदार दिलीप जोशी
अश्विन कृ. ४, शके १९४४

आभार: परिज्ञा भीमाशंकर पुरी, सौ. राधा मराठे

तळटीपः माणसाने एकदा पायरी ओलांडली की पुढे अंत नाही. आपण घसरतो म्हणजे काय, आपली लिमिट काय यावर विवेचन करणारा एक जुना लेख आहे तो अवश्य वाचावा. 

Sunday, August 7, 2022

पुस्तक परिचय – स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी

एप्रिलमध्ये रामकथामाला, चित्र ज्ञानेश्वरी या पुस्तकांच्या लेखिका सौ Deepali Patwadkar यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक "स्वातंत्र्यलढा: चर्च आणि मिशनरी" हे पुस्तक भेट दिले.

साक्षात दीपालीताईंची भेट आणि वर पुस्तकांच्या खजिन्यात भर टाकायला मिळालेले हे रत्न याने तो दिवस सार्थक झाला!


टीप: मागे भिंतीवर दिसणारी चित्रे दीपालीताईंनीच काढलेली आहेत!

पुस्तक वाचून बरेच दिवस झाले असले तरी त्याबद्दल लिहायला ऑगस्ट अर्थात श्रावण उजाडला.  मला परीक्षण वगैरे लिहिता येत नाही पण मला काय वाटलं ते व्यक्त करतो. स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर चर्च आणि मिशनरी यांच्या कारवायांवर अशा एखाद्या पुस्तकाची गरज होती आहे हे पुस्तक ती नक्कीच पूर्ण करते.

सेक्युलर व्यवस्था म्हणजे separation of Church and Government याचा अर्थ आपण असा घेत होतो की चर्चच्या कारवायांत तिथल्या राज्यकर्त्यांचा सहभाग नसावा. पण चर्च आणि मिशनरी आणि व्यापारी कंपन्या, ब्रिटिश आणि सरकार, हे सगळे वेगवेगळे नसून चर्च आणि मिशनरी यांना युरोपातील सरकारे, राजे महाराजे आणि व्यापारी कंपन्या यांचा पूर्ण पाठिंबा आणि सक्रिय सहकार्य होते हे या पुस्तकातून स्पष्ट होते.

किंबहुना सुरवातीचा थोडाच काळ वगळला तर वसाहतवादाच्या हेतूंपैकी नेटिव्ह जनतेला धर्मांतर करून ख्रिश्चन करणे हा वसाहतवादाचा अविभाज्य भाग होता ही बाब हे पुस्तक सप्रमाण सिद्ध करते. इतकेच नव्हे तर एतद्देशीय जनता आणि संस्कृतींच्या बाबतीत ब्रिटिश राज्यकर्त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीचा होता की १७७० ते १९४४ पर्यंत साथीच्या रोगांनी आणि घडवून आणलेल्या दुष्काळांत अंदाजे १३ कोटी भारतीयांचा मृत्यू झालेला आहे. थोडक्यात सांगायचं तर सांपत्तिक, संस्कृतिक, आणि मानवी जीवनाची मिशनरी आणि ब्रिटीशांनी जितकी हानी केली आहे त्याची गणती होऊच शकत नाही.

हे पुस्तक लहान असले तरी एक लहानसा बॉम्ब आहे, कारण यात प्रत्येक मुद्दा हा संदर्भासकट येतो. तसेच, शेवटी असलेली परिशष्टे ही परिपूर्ण आणि माहितीचा खजिना आहेत.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत असताना या पुस्तकाबद्दल जास्तीतजास्त जागृती होणे आवश्यक आहे.

हे पुस्तक भारतीय विचार साधनाच्या संकेतस्थळावर इथे उपलब्ध आहे.

🖊️ मंदार दिलीप जोशी
श्रावण शु दशमी, शके १९४४

Saturday, May 28, 2022

पॉर्नः समाजस्वास्थ्य पोखरणारी कीड

सेक्स, मैथून, कामप्रेरणा, अशी विविध नावे आणि विशेषणे असणारी ही भावना पोटाच्या भुकेइतकीच आदिम आणि नैसर्गिक आहे. पण इतर कुठल्याही भुकेसारखी किंवा भावनेसारखीच ही भावना अनिर्बंध होऊन चालत नाही. आयुष्याच्या व्यवस्थापनात कामेच्छेचेही नियमन एक अविभाज्य अंग आहे. कामभावनेची कमतरता किंवा अभाव आयुष्याचे, शुष्क वाळवंट करते तर कामेच्छेचा अतिरेक ही व्यक्तीच्या आयुष्यात भयंकर वादळे घेऊ येतो, तसेच त्याची न झालेली पूर्तता फक्त त्या व्यक्तीलाच नव्हे तर इतरांनाही त्रासदायक ठरते. 'अती तिथे माती' ही म्हण इथे चपखल लागू होते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक अर्थातच वाईट, म्हणूनच टोकाची आसक्ती आणि टोकाची विरक्ती होणे यापेक्षा मध्यममार्ग साधणे हे अर्थातच आवश्यक आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक संस्कृतीने मनुष्याच्या कामवर्तन नियंत्रित करायचा सल्ला दिला आहे. विशेषतः भारतीय संस्कृती कामभावनेचे अनैसर्गिक दमन किंवा स्वैराचार ही दोन्ही टोके टाळून नियमन करण्यावर भर देते. वात्स्यायनापासून ते डॉ सिगमंड फ्रॉइडपर्यंत अनेकांनी या विषयावर संशोधन, लेखन केलेलं आहे. मानवाला पुढे घेऊन जाणारी ही भावना आहे. तथापि, लैंगिक जीवनाचा उहापोह इतका व्यापक विषय या लेखाचा नाही.   

आपण या लेखात वाचणार आहोत ते जगात सर्वाधिक उलाढाल असलेल्या आणि सामाजिक आरोग्याला पोखरून टाकत असलेल्या एका 'इंडस्ट्री' बाबत. ती इंडस्ट्री आहे पॉर्नोग्राफी अर्थात पॉर्न म्हणून ओळखले जाणारे मनोरंजनाच्या क्षेत्रातले आघाडीचे क्षेत्र. रेल्वे/बस स्थानकांवर मिळणारी बारीकशी पिवळी पुस्तके असोत वा मोबाईलच्या एखाद्या 'लपलेल्या कप्प्यात' ठेवलेल्या क्लिप्स. आज पॉर्न व्यवसाय जगात जवळपास सर्वदूर पसरला आहे. इंटरनेटवरील वरील विविध संकेतस्थळे याबाबत आघाडीवर आहेत. फार कशाला? 'सनी लिओनी' या नावाचा गुगलवर सगळ्यात जास्त धांडोळा घेतला जातो ही सत्यपरिस्थिती आहे. बहुतांशी या संकेतस्थळांचा उपयोग स्व-समाधानासाठी केला जातो. 

Pornhub

अमेरिकन फिल्म इंडस्ट्री अर्थात हॉलीवूडपेक्षाही तिथल्या पॉर्न क्षेत्राची कमाई जास्त आहे. इतकंच नव्हे, तर गुगलची 'सेवा' घेणार्‍या लोकांपेक्षा पॉर्नहब (Pornhub) आणि xvideos या आघाडीच्या दोन पॉर्न संकेतस्थळांना भेट देणारे लोक संख्येने जास्त आहेत. या संकेतस्थळांच्या दर्शकांची संख्या नेटफ्लिक्स वा अन्य तत्सम ओटीटी प्लॅटफॉर्महुन अधिक आहे यावरुन याची व्याप्ती लक्षात यावी. आपल्याकडे अनेक गोष्टींची सुरवात ही युरोप आणि अमेरिकेतून आलेल्या अनेक गोष्टींच्या अंधानुकरणाने होते. मनुष्यस्वभाव हा स्खलनशील असल्याने प्रामुख्याने सामाजिक व नैतिक अधःपतन घडवून आणणार्‍या गोष्टींचे इथे झटपट अनुकरण होत असल्यास नवल नाही. जगभरात लोकप्रिय (?) होत असलेल्या या क्षेत्राचे चाहते भारतातही मुळीच कमी नाहीत. गुगल ट्रेन्ड्सचा मागोवा घेतला, तर जागतिक स्तरावर पॉर्न साईट्स बघण्यात भारताचा तिसरा क्रमांक असून शहरांचा विचार केला तर संपूर्ण जगात नवी दिल्ली, मुंबई, आणि पुणे ही शहरे पॉर्न कंटेंट आणि साईट्स शोधण्यात (highest search volume) शिखरावर आहेत. पॉर्नहब या पॉर्न संकेतस्थळाच्या एका अहवालानुसार या साईटचे भारतातले अर्धे वापरकर्ते ही साईट प्रामुख्याने आपल्या मोबाईलवर बघतात, आणि या संकेतस्थळाचा वापर करणार्‍या भारतीयांपैकी महिलांची संख्या लक्षणीय, नेमकं सांगायचं तर ३०% आहे. मात्र केवळ नेटवर पॉर्न पाहण्यापर्यंतच आता भारतीय मर्यादित राहिलेले नसून तसा कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा आपल्या देशात एक मोठा व्यवसाय बनला आहे. 

याच संदर्भात शोध घेत असता People vs Larry Flynt हा एक अप्रतीम इंग्रजी चित्रपट बघायला मिळाला. याच चित्रपटामुळे माझा हा लेख लिहीण्याआधी प्रचंड गोंधळ झाला होता. आधीच वूडी हॅरलसनच्या अभिनयाच्या प्रेमात असल्याने आणि त्याचं यातलं मधलं जबरदस्त काम मनात कोरलं गेल्याने या चित्रपटाचा बर्‍यापैकी प्रभाव मनावर होता. त्याच बरोबर मूळ विषय खूप गंभीर असल्याने लेख हा चित्रपटाचं समीक्षण वाटू नये याची काळजी घ्यायला लागणार होती. लिहीत गेलं की गोंधळ दूर होईल असे वाटले आणि झाले देखील तसेच. असो, पुन्हा विषयाकडे वळूया. 

Playboy Penthouse Hustler

या चित्रपटाचा 'नायक' लॅरी फ्लिन्ट हा अमेरिकन पॉर्न क्षेत्रातील एक आघाडीची असामी होती. नेमकं सांगायचं तर लॅरी फ्लिन्ट हा पॉर्नच्या दुनियेत नेहमीच पहिल्या ५० च्या यादीत असायचा. आपण पॉर्न क्षेत्रातल्या पैशाबाबत बोलत आहोत तर याच्या कमाईकडे पाहूया. एकट्या १९९८ या वर्षी फ्लिन्टनं ५१,११२ मासिकं आणि ७,८१२ पॉर्न चित्रपट यातून एका वर्षात १३ कोटी डॉलर्स कमावले होते. "प्लेबॉय" आणि "पेंटहाऊस" या मासिकांशी स्पर्धा करण्यासाठी "हसलर" (Hustler) मासिक काढणारा, “हस्टलर एंपायर”चा सर्वसर्वा फ्लिंट प्रौढांसाठी असलेल्या अनेक वेबसाईटसचा गर्भश्रीमंत मालक होता. या मागचा इतिहास मोठा रंजक आहे. १० फेब्रूवारी २०२१ रोजी तो मरण पावला तेव्हा तो सुमारे ४० ते ५० कोटी डॉलर्सची संपत्ती मागे सोडून गेला. कहर म्हणजे या माणसाची व्हीलचेअर सोन्यानं मढवलेली होती [मार्च १९७८ मधे ग्विनीट काऊंटी न्यायालयाबाहेरच (Gwinnett County Courthouse) एकानं त्याला गोळी घातल्यावर त्याचं कमेरपासून खालचं शरीर लुळं पडलं आणि लॅरीला कायमचं अपंगत्व आलं).

पुढे वाचण्याआधी आपल्याकडे काही वर्षांपुर्वी पेप्सी आणि कोकाकोला या शीतपेयंच्या कंपन्यांत रंगलेलं जाहीरात युद्ध आठवा. तर, खास अमेरिकन शौकीन पण उच्चभ्रू वर्ग डोळ्यांसमोर ठेऊन ह्यू हेफनर (Hugh Hefner) या प्रकाशकाने १९५३ साली प्लेबॉय मासिक सुरु केलं. बॉब गुचिओनी (Bob Guccione) याने 'प्लेबॉय' ला स्पर्धा म्हणून १९६९ साली 'पेंटहाऊस' हे मासिक काढलं. 'प्लेबॉय' चा लोगो होता 'बनी'. पेंटहाऊसची जाहीरात अशी होती की एका रायफलच्या निशाण्यावर असलेलं एक 'बनी' आणि “आम्ही सशाच्या शिकारीला निघालो आहोत” हे घोषवाक्य. ही जाहीरात खूप गाजली. या दोन्ही मासिकांची लोकप्रियता शिखरावर असताना लॅरी फ्लिन्ट या धन्य पुरुषाने १९७४ साली “हस्टलर” हे मासिक सुरु केलं तेव्हा त्याने घोषवाक्य वापरलं - “एनीवन कॅन बी अ प्लेबॉय अ‍ॅन्ड हॅव अ पेंटहाऊस बट इट टेकस अ मॅन टू बी अ हस्टलर” (Anyone can be a playboy and have a penthouse but it takes a man to be a hustler!). प्लेबॉयचा बनी, आणि बनीची शिकार करु बघणारं पेंटहाऊस या दोन्हींची एकाच वाक्यात शिकार करणारं हे घोषवाक्य शौकिनांनी डोक्यावर घेतलं यात नवल नाही. इथेही लॅरीचा मनुष्यस्वभावाचा दांडगा अभ्यास म्हणा किंवा पैसा कुठून ओढता येईल याबाबतची हुशारी म्हणा, हे नक्कीच दिसून येतं. एक जण घसरला तर मी त्याही पेक्षा जास्त कसा घसरू शकतो हे दाखवण्यातही आजही अहमहमिका लागलेली दिसते त्याचा मुकुटमणी हा लॅरी होता असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. अश्लीलतेच्या उंबरठ्यावर रेंगाळणारी अनेक इन्स्टा रील्स आठवून बघा. हा सगळा इतिहास संक्षिप्त स्वरूपात बघायचा असेल तर “पीपल व्हर्सेस लॅरी फ्लिंट” हा चित्रपट अवश्य पहावा. 

सुरवातीला म्हटल्याप्रमाणे पॉर्न कंटेंट मोठ्याप्रमाणात तयार करणे हा भारतात आता एक मोठा व्यवसाय बनला आहे. नजिकच्या भूतकाळात डोकावलं तर या क्षेत्राकडे लोकांचं लक्ष जाण्याचं कारण राज कुंद्राला अटक झाली ही घटना होय,. आर्थिक गुन्हेगारीत प्रतिष्ठित असामी गुंतल्या असण्याचे आता लोकांना नवीन नाही पण या क्षेत्रात असं काही घडलं की देशातल्या भोळ्या(!) जनतेला आजही आश्चर्य वाटतं, आणि यावर जनसामान्यांत होणार चर्चा विनोद आणि मीम आणि अर्थातच ट्रोलिंग इथवर मर्यादित राहते. प्रत्यक्षात ही पाळेमुळे किती खोल गेली आहेत आणि कोण कोण लोक यात सहभागी आहेत याचा अंदाजही लावणे अवघड आहे. तुम्हाला आठवत असेल तर सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर उठलेल्या धुरळ्यात या क्षेत्राकडे आणि सहभागी व्यक्तींकडे अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे निर्देश केला होता. चित्रपट क्षेत्रातील पैसा मोठ्या प्रमाणात पॉर्न आणि त्यानंतर देहविक्रयाच्या क्षेत्रातून येत असल्याचे संबंधित व्यक्तींकडून खाजगी चर्चेत आणि युट्यूबवर असलेल्या मुलाखतींतून अनेकदा कळतं. चित्रपट क्षेत्रात असलेल्या लोकांच्या दृष्टीने मात्र हे सारे नित्यनेमाचं असतं. अचानक राज कुंद्रासारखी मोठी नावे समोर आल्यावर सामान्य वाचक/नागरिकाला धक्का बसतो इतकेच काय ते अप्रूप! आधीपासूनच पॉर्न क्षेत्रात कार्यरत असूनही कुंद्रा प्रकरणात आपल्याला गोवले गेल्याचा आरोप झोया राठोड आणि शर्लिन चोप्रा नामक दोन नट्यानी केला होता ही मोठी गंमतच आहे. कहर म्हणजे गहना वसिष्ठ नामक नटीने तर यात काहीच गैर होत नसल्याची बतावणी केली होती! पॉर्न क्षेत्र हे इंटरनेटच्या आणि कॅमेरा असलेल्या मोबाईलच्या महापुरामुळे आता फार वेगळ्या पातळीवर आणि घराघरांत पोहचलं आहे.

टिकटॉकसारख्या एपवरून जे काही दाखवलं जाऊ लागलं ते अती होऊन पाणी डोक्यावरुन चालल्यामुळेच त्यावर शासनाकडून बंदी आणली गेली, आणि एका जनहित याचिकेचा परिणाम म्हणून २०१५ साली ८५७ पॉर्न वेबसाईट्सवरदेखील बंदी आणायचा निर्णय झाला. आता मोदी सरकारने बंदी घातल्यावर त्याला विरोध हा झालाच पाहीजे हा अलिखित नियम असल्याने त्याला सर्वोच्च न्यायालयात कडाडून विरोध झाला. अनेक 'वापरकर्ते' तर पूर्वसूचना न देता अशी बंदी घातलीच कशी म्हणून बाह्या सरसावून सरकारला जाब विचारू लागले. एकीकडे चाइल्ड पॉर्नोग्राफीवर सरकार पुरेशी कारवाई करत नसल्याचं सांगत सरकारला झापणार्‍या सर्वोच्च न्यायालयाने संविधनाच्या २१व्या अनुच्छेदाकडे (वैय्य्क्तिक स्वातंत्र्याचा हक्क - right to personal liberty) बोट दाखवत बंदी कायम ठेवण्याबाबत अंतरिम आदेश द्यायलाही नकार दिला. पॉर्न साईट्स बघता येणे हा आपला हक्क आहे हे सांगत एका इसमाने या बंदीच्या निर्णयाला चक्क हिटलरशाही, एड्स किंवा कॅन्सर किंवा एखाद्या साथीच्या रोगहून वाईट अशा विशेषणांनी संबोधलं. 

अशी बंदी अस्तित्वात जरी आली तरी प्रत्यक्षात मात्र अशी बंदी केवळ कागदोपत्री राहते आणि हे गैरप्रकार सुरूच असतात. पूनम पांडे वा गुंजन अर्स यांसारख्या नट्या त्यांच्या वैयक्तिक एपवरून या प्रकारचे व्हिडीओ शेयर करत असतात. यात कित्येकदा अधिकचे पैसे मोजून 'प्रायव्हेट कॉल'चा पर्याय दिला जातो. आपल्या मेहनतीचे पैसे अशा गोष्टींवर उडवणाऱ्यांची संख्या पाहता पॉर्न हे मोठे व्यसन झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.

वैद्य परीक्षित शेवडे म्हणतात, की "अगदी रोजच्या रुग्णांतही या व्यसनाची चटक लागलेले आणि त्यामुळे एकीकडे मानसिक-शारीरिक आरोग्य हरवत असलेले तरुण हे आमच्यासाठी नित्यअनुभव होऊ लागले आहेत." त्यातच लॉकडाऊनकाळात या क्षेत्राला भरपूर झळाळी आल्याचे चित्र आहे. विशेषतः उत्तर भारतातील गावांतील जोडपी विविध मंचावरून 'Pay per view' तत्वाने आपल्या प्रणयक्रीडेचा बाजार मांडण्याची संख्या या काळात लक्षणीयरीत्या वाढल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर येत आहे. कॅमेरा असलेला मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन या मूलभूत सुविधा असल्या की घराघरांतून असे कंटेंट तयार होऊ लागले आहेत. यात थेट पॉर्न यात मोडणारं कंटेन्ट जसं आहे तसंच सॉफ्ट पॉर्न आणि नैतिकतेची ऐशीतैशी करणारे व्हिडिओ देखील आहेत. कित्येकदा पौगंडावस्थेतील किशोर-किशोरीदेखील यात आपला सहभाग नोंदवत असल्याचे चित्र आहे. कंटेन्ट बनवणार्‍यांना पैसे कमावण्याचे तर बघणार्‍यांना स्वस्तात 'देशी पॉर्न' बघण्याचे अगदी सहजसोपे साधन सापडल्याची भावना आहे! 

कोणत्याही सूज्ञ समाजासाठी हे हितकारक लक्षण नव्हे. या क्षेत्रात बराच काळ काम करून त्यातून बाहेर पडलेल्या जगभरातील कित्येक कलाकारांनी यामागचे भयाण अनुभव कथन केले आहेत. वर्षाला ९७०० कोटी डॉलर्सची उलाढाल असलेल्या पॉर्न इंडस्ट्रीमागचं वास्तव किती भीषण आहे याची आपण कल्पनाही करु शकत नाही. या कलाकारांच्या पॉर्न कारकीर्दीचा कालखंड फक्त सुमारे ३ महिने ते १ वर्ष इतकाच असतो. पौगंडावस्थेतल्या एका वर्षात त्या मुलीचं आयुष्य भकास झालेलं असतं. तिला व्यसनाधीनतेपासून नैराश्यापर्यंत अनेक त्रास सतावत असतात. थोडक्यात, अशा मुली (आणि मुलंही) शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उध्वस्त झालेली असतात. औषधे, शस्त्रक्रिया यांचा वारेमाप आणि घातक वापर या क्षेत्रात सर्रास होतो. पडद्यावर पाहत असलेली चित्रे ही सर्वसामान्य असल्याचा गैरसमज डोक्यात भिनल्याने सामान्य तरुण तरुणीदेखील त्याच संकल्पनांना बळी पडून आपल्या आरोग्याचे नुकसान करतात ही वस्तुस्थिती आहे. प्रजननसंस्था वा संबंधित अवयवांबाबतचे गैरसमज, त्यांचा आकार वाढवण्यासाठीची व्यर्थ धडपड इथपासून ते आत्मघातकी व्यसनाधीनता; इतकी की त्याव्यतिरिक्त अन्य कोणताही विचार डोक्यात नाही, स्त्रीदेहाला केवळ एक उपभोग्य वस्तू म्हणून पाहणे हे प्रकार तरुणांत लक्षणीयरीत्या वाढत आहेत. या विकृतीला वाट मिळवून देण्यासाठी कोणता थर गाठला जाऊ शकतो/जातो याची कल्पनाही न केलेली बरी. केवळ तरुणच नव्हे तर वयस्क व्यक्तींतही हे वेड जोर पकडू लागले आहे. एका डीसीपीने महिला अधिकाऱ्यासोबत तिचा सहा वर्षांचा मुलगाही सोबत असताना केलेले चाळे पुष्कळ गाजले होते. विवाहबाह्य संबंध हाही याच प्रश्नाचा उपप्रश्न झाला आहे. आपल्या पैशांच्या जोरावर वयाने आपल्या स्वतःच्या मुलीएवढ्या असणाऱ्या मुलींना नादी लावून त्यांच्या आयुष्याचा सत्यानाश करण्याचे प्रकारही समाजात वाढलेले दिसतील. विशेष म्हणजे या प्रकारांत नेहमी मुली अगदी निष्पापच असतील असेही नाही! घडत असलेल्या प्रकाराची पूर्ण जाणीव असूनही काहीतरी खूळ डोक्यात भरवून घेऊन त्यादेखील आपले नुकसान आपल्या हातांनी करून घेत असतात. यातील कित्येकजणी अगदी कळत नकळत ड्रग्स आणि वेश्याव्यवसायात खेचल्या जातात. पर्यटन अधिक असलेल्या भारतातील राज्य/ठिकाणांमध्ये अशा बाबी अगदी मध्यमवर्गीयांच्या घरातून घडत असल्याचे चित्र आहे.

Billie Eilish

जेम्स बाँड चित्रपट मालिकेतल्या ताज्या 'नो टाईम टू डाय' या चित्रपटाचं शीर्षक गीत गाणारी बिली एलिश (Billie Eilish) हिने गेल्याच वर्षी म्हणजे ती फक्त एकोणीस वर्षांची असताना दिलेल्या  एका मुलाखतीत वयाच्या अकराव्या वर्षी पॉर्न चित्रफिती बघायची सवय लागल्याने तिच्या मनावर काय परिणाम झाला हे सांगितलं होतं. आपल्या आयुष्यातील त्या कालखंडाकडे वळून बघताना बिली म्हणते, "पॉर्न हे स्त्रियांसाठी अत्यंत अपमानास्पद प्रकार आहे. मी तेव्हा खूप पॉर्न बघत असे आणि त्या प्रकाराने माझ्या डोक्यावर बर्‍यापैकी परिणाम झाला. पॉर्न बघितल्याची आणि त्यात गुंतल्याची मला लाज वाटते." स्त्रियांच्या शरीराचं अवास्तव चित्र उभं करणार्‍या पॉर्न चित्रपटांवर टीका करताना बिली पुढे म्हणते की "पॉर्नची लोकप्रियता पाहून मला अनेकदा माझा राग आवरणं अवघड होऊन बसतं. पॉर्न बघणं हे ठीक आहे असं मला एकेकाळी वाटायचं हे आठवलं की अनेकदा स्वतःचाच राग येतो. स्त्रीची योनी ज्या प्रकारे या चित्रपटांत दाखवली जाते ते साफ खोटं आहे. कुठल्याही स्त्रीची योनी अशी दिसत नाही. स्त्रीचे शरीर असं दिसत नाही." 

आपले अनुभव सांगताना बिली म्हणाली की पॉर्न बघण्याच्या सवयीमुळे तिचं भावविश्व उध्वस्त झालं आणि याचा तिच्या खाजगी संबंधांवरही परिणाम झाला. "संभोग करण्याच्या सुरवातीच्या काही वेळा मी अशा गोष्टींना नाही म्हणू शकले नाही की ज्या मला आतून कळत होतं की अनैसर्गिक आहेत, चूक आहेत, पण पॉर्न बघण्याचा परिणाम म्हणून मला असं वाटत असे की या गोष्टींचं मला खरं तर आकर्षण वाटलं पाहीजे. बराच काळ कुणी आवडणं आणि त्याच्याशी प्रेमाचं नातं जोपासणं हे माझ्यासाठी अवघड होऊन बसलं होतं. यामुळे एकटीनेच आयुष्य काढावं लागतं की काय असंही अनेकदा वाटत असे. पण मी महत्प्रयासाने स्वतःला सावरलं आहे." 

घराघरांत अगदी लहान वयापासूनच हातात मोबाईल देण्याची सवय असल्याने नेमके कोणत्या वयात काय पाहिले जात आहे यावर कोणाचेही नियंत्रण नसते. पर्यायस्वरूप हे प्रकार आणखीच खोलवर पसरत राहतात. शृंगाराचे भारतीय संस्कृतीला कधीही वावडे नव्हते. याच देशात कामशास्त्राचा पुरातन इतिहास आहे, हलेबीड-खजुराहो आहे, शृंगार रस हा साहित्यातील नवरसांतील एक असून महाकवी कालिदासाच्या लिखाणात त्याची पुरेपूर पखरण आहे. मात्र हा शृंगार उत्कट आहे; उत्तान नव्हे! त्यालाही स्थल-काळाची बंधने आहेत. विवाहयोग्य झालेल्या स्त्री-पुरुषांनी कामशास्त्र अभ्यासावे असे स्वतः वात्स्यायनांनी लिहून ठेवले आहे. थोडक्यात वयाचा विचारही तेथे आहे. शृंगार आणि बीभत्सपणा यांतील सीमारेषाच पुसून टाकणारे क्षेत्र म्हणजे पॉर्न असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच हा विषय चर्चेला घेण्यापासून टाळण्याची आपली प्रवृत्ती असते. मात्र सुरुवातीलाच योग्य लक्ष दिल्यास पिटीकेचा भगंदर होणे टळू शकते. समस्या आणि तिचा विस्तार लक्षात घेतला तरच त्याचे उपचार सापडू शकतात. 

ही समस्या मुळात सुरू कुठून होते माहित आहे? उत्तर तुमच्यापैकी अनेकांना आवडणार नाही. आज उद्भवणार्‍या अनेक लैंगिक समस्यांचे आणि पसरलेल्या विकृतींचे मूळ हे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे हे आहे. आज फेसबुक आणि व्हॉट्सपवर अनेक जणी आपले फोटो टाकत असतात. अनेक वेळा फिल्टर वापरून मूळ सौंदर्यात भरच पडत असते. नित्यनूतन प्रोफाईल फोटो टाकण्या पुरुषही मागे नाहीत. व्यायामशाळेत जाणारे काही शरीरसौष्ठवपटू आपले सिक्स पॅक्स दाखवत बनियनमधले फोटो टाकत असतातच. याचा पॉर्नशी काय संबंध असं संतापून विचारण्याआधी लक्षात घ्या, की सुरवात वरवर निरुपद्रवी वाटणार्‍या गोष्टीतून आणि कृतीतूनच होत असते. हे उदाहरण देण्यामागचं कारण पुढच्या काही परिच्छेदात सांगतोच. आज या गोष्टी व्यक्तीस्वातंत्र्यात मोडत असल्या तरी याचे परिणाम अतिशय हळू होत जात पुढे अनेक लहानमोठ्या शारीरिक आणि मानसिक व्याधी होण्यापर्यंत जाऊ शकतात. 'अति तिथे माती' ही म्हण आपल्याला काही नवीन नाही. सोशल मिडियाचा अतिरेकी वापर टाळा. बदाम खाऊन फायदा आहे, चांगल्या फोटोंवर रेंगाळून ते वाटण्यात नव्हे.

तर, स्त्रीपुरुषांमधला मानसिक व शारीरिक भेद लक्षात घेता आज वैवाहिक जीवनात भेडसावणार्‍या दोन प्रमुख लैंगिक समस्यांचा विचार करताना इथे फक्त 'स्त्रीदर्शन' याबाबतीत इथे विचार करणार आहोत. आजच्या घडीला वैवाहिक आयुष्यात आढळणार्‍या दोन प्रमुख लैंगिक समस्या पुढीलप्रमाणे आहेत. एक म्हणजे वैवाहिक आयुष्यात 'शरीरसंबंध ठेवताना प्रत्यक्ष मीलन होण्यापूर्वीच वीर्यस्राव होणे (premature ejaculation)'. आणि दुसरी म्हणजे सतत पॉर्नचा वापर केल्याने उदभवणारी पुरुष नपुंसकता!! दोन्ही समस्यांचा एकत्रित विचार करुया.

कारणे अनेक असली तरी विस्तारभयास्तव आज आपण यातील केवळ एका अतिशय महत्त्वाच्या कारणाकडे पाहूया. ते कारण म्हणजे सतत 'त्याच' गोष्टीचा विचार करत राहणे. आयुर्वेद वा योगशास्त्रासह कित्येक भारतीय शास्त्रांनी निव्वळ दर्शनच नव्हे तर 'स्त्रीस्मरण' हे देखील शुक्रस्खलन होण्याचे कारण सांगितले आहे. 'शरीराबाहेर पडणे' ही शुक्राची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, मात्र शरीरातील अखेरचा आणि सर्वोत्तम धातू असल्याने असे सतत होत राहणे आरोग्यास हितकर नसल्याचे आयुर्वेदाचे मत आहे. सध्याच्या काळात समयपूर्व वीर्यस्राव ही समस्या वेगाने वाढत असल्याचा वैद्यांचा प्रत्यक्ष उपचार करत असतानाचा अनुभव आहे. सतत शरीरसंबंधांचा विचार करत राहणे या गोष्टीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. कामेच्छा चाळवणाऱ्या गोष्टींचे वाढते प्रमाण हे यामागील महत्वाचे कारण. पॉर्न फिल्म्सपासून ते आजकाल साबण वा अगदी चहाच्या जाहिरातींपर्यंत सर्वत्र स्त्रियांचे उपभोग्य वस्तू म्हणून अतिशय आक्षेपार्ह पद्धतीने केले जाणारे प्रदर्शन हेदेखील यास कारणीभूत आहे. वैद्यपंचानन गंगाधरशास्त्री गुणे यांसारखे ज्येष्ठ वैद्य आपल्या ग्रंथात म्हणतात की "ही परिस्थिती पुढे इतके गंभीर स्वरूप प्राप्त करते की काही रुग्णांत केवळ स्त्रीचा आवाज ऐकून वा अगदी पैंजणांचा आवाज ऐकूनही वीर्यस्राव होऊ लागतो." वैद्यांनी अशा प्रकारच्या कित्येक केसेस हाताळल्यावर लक्षात आलेली गोष्ट म्हणजे लहानपणापासून कळत नकळत झालेला चुकीच्या जाहिरातींचा मारा आणि ही अडचण सांगण्यासाठी योग्य वेळी कोणीही योग्य व्यक्ती उपलब्ध नसणे. प्रसारमाध्यमांतील आक्रमक जाहिरातींबाबत इथे मांडलेले मत ज्यांना मान्य होणार नाही त्यांनी याबाबत मानसशास्त्र या विषयातील नामवंत वैज्ञानिक नियतकालिकांतील संशोधने जरूर अभ्यासावी. 'परदेशात असं काही का होत नाही?' असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. त्यांना बापड्यांना कदाचित परदेशातील एकंदरीत सांस्कृतिक रचना आणि त्यांच्या समस्या यांबद्दल माहितीच नसावी. अर्थात या समस्येकरता केवळ प्रसारमाध्यमे दोषी आहेत असे माझे मत नसून आपले हरवत चाललेले नियंत्रण हे सर्वाधिक कारणीभूत आहे. वैवाहिक जीवन सुखी ठेवायचे असल्यास, आणि एकंदरच शरीर व मनाचा विचार करताना वैय्यक्तिक आयुष्य आरोग्यपूर्ण ठेवायचं असल्यास आपला सोशल मिडियात असणारा अतिरेकी वावर (आणि वापर), भडक जाहिराती, आणि साहित्य यांपासून दूर राहणे तसेच आवश्यकता भासल्यास वंध्यत्व विषयातील तज्ज्ञांच्या मदतीने तातडीने आयुर्वेदीय उपचार व ध्यान इत्यादींची मदत घेणे हे लाभदायक उपाय आहेत हे कायम लक्षात ठेवावे.

पुरुष नपुंसकतेचा विचार करताना आयुर्वेद काय म्हणतो ते पाहूया. आयुर्वेदानुसार तेरा शारीरिक प्रक्रियांचा उल्लेख 'अधारणीय वेग' यांमध्ये केलेला आहे. अधारणीय वेग म्हणजे अडवू नयेत अशा शारीरिक क्रिया. उदा. लघवी वा शौचाची भावना. शुक्राचा समावेशदेखील या तेरा वेगांत केलेला आहे. थोड्क्यात; शुक्रवेगाची इच्छा झाल्यास ती टाळू नये. मात्र असे सांगतानाच 'वेगान् न उदीरयेत।' म्हणजेच या क्रिया बळजबरीनेदेखील करू नयेत असेही आयुर्वेद बजावतो. खरी गोम इथेच आहे!

बहुतांशी वेळेस उत्तेजना मिळवण्यासाठीच पॉर्नचा वापर होतो. थोडक्यात; इथे शुक्रवेग 'उत्पन्न केला जातो'. स्वाभाविकपणे या क्रियेचे दूरगामी दुष्परिणाम होत असतात. यातील सगळ्यात प्रमुख दुष्परिणाम म्हणजे पुरुषांच्या जननेंद्रियाचे कार्य योग्य पद्धतीने न झाल्याने उद्भवणारे नपुंसकत्व. स्त्रियांमध्येही कामेच्छा कमी होण्यासारखे दुष्परिणाम या सवयीमुळे होऊ शकतात. आयुर्वेदाचे मत पटत नसेल तर 'सायकॉलॉजी टुडे' हे नामांकित मनोवैज्ञानिक नियतकालिक काय सांगते पहा. [Robinson, Marnia, and G. Wilson. "Porn induced sexual dysfunction: A growing problem “, í." Psychology Today, July 11 (2011).]. बिनवैद्यकीय संदर्भ म्हणून पॉर्नलँड हे गेल डाईन्स लिखित पुस्तक वाचण्यासरखे आहे. 

या संशोधनानुसार आज जगभर या समस्येने गंभीर रुप धारण केलेले असून; वयाच्या २० व्या वर्षांपासूनच पुरुष जननेंद्रियाच्या कार्यक्षमतेत बिघाड झाल्याने नैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यास अशा व्यक्तींमध्ये असमर्थता दिसून येते. आयुर्वेदीय सिद्धान्त आज जगभरात आपले महत्व दाखवत आहेत त्याचा आणखी एक पुरावा. याशिवाय आजकाल 'एव्हिडन्स बेस्ड रिसर्च' आहे का? असं विचारण्याचं फॅड असल्याने हे उदाहरण सहज नमूद करत आहे.

यावर उपाय काय? पॉर्न बघणे या व्यसनापासून दूर जाण्यासाठी पुन्हा आयुर्वेदही फायदेशीर आहे. आयुर्वेद व्यसन सोडवण्याची जी प्रक्रिया सांगतो तीच यासाठी उपयुक्त आहे. ती म्हणजे अपथ्याचा क्रमाक्रमाने त्याग करणे. हा क्रम पादांश अर्थात एक चतुर्थांश असा असतो. १/४ - १/४ या क्रमाने हे व्यसन सोडवावे लागते. (ही संकल्पना शुद्ध आयुर्वेदीय उपचार देणाऱ्या वैद्यांकडून नीट समजावून घ्यावी.) सोबत ध्यानधारणा, योग आणि व्यायाम यांचा आधार घ्यावा. एकदम सोडायला गेल्यास चिडचिड, अन्य व्यसनांकडे ओढ अशा प्रकारची लक्षणे दिसू शकतात.

आपल्या आंबटचवीच्या शौकाचा अतिरेक करून आयुष्याची माती करून घेऊ नका इतकीच प्रामाणिक इच्छा.

----------------------------------------------------------------

संदर्भ श्रेयः'या लेखातील वैद्यकीय संदर्भ वैद्य परीक्षित शेवडे यांच्या सौजन्याने' इतकंच श्रेय मर्यादित ठेवू इच्छित नाही. कारण इतक्या संवेदनशील विषयावरचे वैद्यकीय आणि तत्सम संदर्भ गोळा करा, मग ते तपासून घ्या, आणि तदतर ते टंकलिखित करा हे आणि इतके माझे कष्ट वाचवण्याचं मोठं काम डॉ शेवडेंच्या लेखनाने करुन ठेवलंच होतं. मी फक्त ते वेळोवेळी जमवत गेलो आणि ते संदर्भ लेखाच्या प्रवाहीपणाला धक्का लागू न देता योग्य ठिकाणी बसवले इतकंच. 

----------------------------------------------------------------

© मंदार दिलीप जोशी
वैशाख कृ, १३, शके १९४४

Monday, April 11, 2022

मखत्राता श्रीराम

काल रामनवमी होती. रामरक्षा स्तोत्रात श्रीरामांना मखत्राता म्हटलं गेलंय. मखत्राता या शब्दाचा अर्थ यज्ञाचा त्राता असा आहे. 


आता हा शब्द आजच्या परिप्रेक्ष्यात समजून घेऊया.

यज्ञाला त्राता म्हणजे रक्षणकर्ता असण्याची आवश्यकता का भासावी? कारण काही लोकांना त्याचा ध्वंस करण्यात खूप रस होता. यज्ञात असं काय बरं होतं की ज्या कारणे त्यांचा ध्वंस करायला संख्याबळ आणि शस्त्रदल घेऊन यावं लागत होतं?

कारण यज्ञ म्हणजे फक्त त्यात वस्तू टाकून जाळणे इतकंच नव्हतं तर यज्ञातून काही फळे मिळत असत ज्यायोगे यज्ञ करणाऱ्यांचे सामर्थ्य वाढत असे. आता मानवांनी यज्ञ करून सामर्थ्य प्राप्त केलं तर ते दानवांना कसं मानवावं बरं? माणसे लढाऊ वृत्तीची होणे हे दानवांना झेपण्यासारखे नव्हतेच. म्हणूनच यज्ञांचा विध्वंस करायला यायचे. आणि म्हणूनच मखत्राता असण्याची आवश्यकता असायची.

याला मानवी स्वभावाच्या सार्वत्रिक आणि सर्वकालिक परिप्रेक्ष्यात बघा. हे तत्व पुराणकथेपुरते मर्यादित नाहीये, आजही तितकंच महत्वाचं आहे. अशांतीदूत हे तेच मखध्वंसी दानव आणि डावे त्यांचे शुक्राचार्य आहेत.

मखत्राता असण्याची गरज तेव्हा होती, आज आहे, आणि उद्याही असणार आहे... आणि आता कुणीही अवतार घेऊन येणार नाहीये.

तुझमें राम, मुझमें राम, सबमें राम समाया
फिर क्या हिंमत किसीकी जो हमें मारने हात उठाया?

पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

Tuesday, March 15, 2022

हम देखेंगे

अनिवार्य है की हम भी देखेंगे

जो ईश्वर वचन देता है
जो वेद पुराणो का रचयिता है

जब अत्याचारों के मेघ
रूई की भांति उड़ जाएँगे
हम भक्तो के पाँव-तले
जब धरती धड़-धड़ धड़केगी
तथा आतंकीयों के शीर्षपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी

जब पापीयों के ताबे से
सब मंदिर छुडवाये जाएँगे
सब पवित्रता के शिष्यगण
सिंहासन पे बिठाए जाएँगे 

सब 'ताज' खोले जाएँगे
सब मदमत्त गिराए जाएँगे
बस नाम रहेगा रामलल्ला का
उपस्थित है जो अयोध्या में
जो न्यायी भी है द्रष्टा भी

उठ्ठेगा तत्वमसि का उद्घोष
जो मैं भी हूँ और तुम भी हो
और राज़ करेंगे सनातनी
जो मैं भी हूँ और तुम भी हो

© मंदार दिलीप जोशी
माघ द्वादशी, शके १९४३



Friday, January 21, 2022

संयुक्त राष्ट्रसंघात भारत पहिल्यांदाच मांडतोय हिंदू धर्माची बाजू

"इतर धर्मांबद्दल असहिष्णुता हा अब्राहमिक धर्मांचा एक सिद्धांत आहे तर हिंदू धर्म सैद्धांतिकदृष्ट्या सहिष्णू आहे."

— अस्तित्वात असलेल्या दहशतवादाकडे दुर्लक्ष करुन emerging म्हणजे येऊ घातलेल्या तथाकथित काल्पनिक हिंसेला झोडपू पाहणार्‍या काही घटकांचा डाव उघड करताना आज संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी श्री टी एस तिरुमूर्ती यांनी या प्रयत्नांच्या चिंधड्या उडवल्या. 


हा राहुल शिवशंकर यांनी टाईम्स नाऊ वाहिनीवरील तुघलकचे संपादक श्री गुरुमूर्ती यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा जो भाग आपल्याला या व्हिडिओत दिसतो त्याचा मराठी भावानुवाद आहे. श्री गुरुमूर्ती यांची इंग्रजी बोलण्याची विशिष्ट म्हणजे दाक्षिणात्य शैली लक्षात घेता पुनरुक्ती टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे हे लक्षात घ्यावं. तसेच, आजवर पंतप्रधान नरेन्द्र मोदी हे हिंदूंच्या बाजूने का बोलत नाहीत असा घोष करणार्‍या लोकांना कदाचित यामुळे उत्तर मिळेल की प्रत्येक बाब ही इंस्टंट पदार्थांसारखी लगेच, आपल्याला हवी तेव्हा होत नसून योग्य वेळी अत्यंत प्रभावी तरीही संवैधानिक पद्धतीने, ज्याआंतरराष्ट्रीय मंचावर मांडली जात आहे त्याचा आदर राखून कशी मांडणे आवश्यक आहे ते कळेल अशी आशा. 

राहुल शिवशंकर: भारताने संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू धर्माची जी बाजू मांडली त्याचे महत्त्व किती यावर आपण आज आपल्या स्टुडियोत उपस्थित असलेले पत्रकारितेतील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, तुघलकचे संपादक श्री गुरुमूर्ती यांच्याकडून जाणून घेणार आहोत. श्री गुरुमूर्ती, टाईम्स नाऊ आणि विशेषतः माझ्याशी संवाद साधल्याबद्दल आपले अनेक आभार.

श्री गुरुमूर्ती: आभार.

राहुल शिवशंकर: जगात प्रचलित असलेल्या काही विशिष्ट प्रकारच्या धार्मिक भेदभावांच्या प्रकारांकडे विशेष लक्ष देऊन हिंदू धर्माबद्दल पसरवला जात असलेला भयगंड (Hinduphobia) या सारख्या इतर प्रकारांकडे संयुक्त राष्ट्रसंघ जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे या गोष्टीकडे भारताने लक्ष वेधलं. ही घटना तुम्हाला किती महत्त्वपूर्ण वाटते?

श्री गुरुमूर्ती: आंतरराष्ट्रीय दहशतवादविरोधी परिषदेत टी एस तिरुमूर्ती यांनी जे केलं ते खूपच थोर कार्य म्हणावे लागेल. एक म्हणजे दहशतवाद या शब्दाची व्याख्या सतत बदलून दहशतवादविरोधी लढा सौम्य करण्याचा जो प्रयत्न चालवला जात होता तोच त्यांनी उध्वस्त केलेला आहे. गेली काही वर्षे दहशतवाद या शब्दाचीच व्याख्या सौम्य करुन खर्‍या दशतवादाला एक प्रकारची क्लीनचिट देण्याचा प्रयत्न सुरु होता. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघात दहशतवादविरोधी चर्चा घडत असताना अब्राहमिकेतर धर्मांच्या विरोधात असलेल्या पूर्वग्रहाला उघडे पाडले, जे याआधी कधीही, कधीही झाले नव्हते. गेल्या सत्तर वर्षात भारतीय प्रतिनिधीने भारतीय संस्कृतीची बाजू घेतल्याचं बघायला मिळालं नव्हतं. हे असं पहिल्यांदाच घडतं आहे की भारताने भारतीय संस्कृतीची बाजू मांडायला तोंड उघडलेलं आहे आणि ते ही अशा आंतरराष्ट्रीय मंचावर जिथे अशा कुठल्याही प्रकारची चर्चा ही अब्राहमिक धर्ममतांना प्रमाण मानत, तेच मानक ठेऊन होत असे अशा मंचावर. दहशतवाद या संज्ञेला सौम्य करण्याच्या प्रयत्नांच्या श्री तिरुमूर्ती यांनी कशा चिंध्या केल्या ते आपण समजून घेऊ. सद्ध्या अस्तित्वात असलेला दहशतवाद व त्या अनुषंगाने घडत असलेल्या घटनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत, राजकीय, धार्मिक, आणि इतर हितसंबंध गुंतलेल्या काही देशांनी "उदय होत असलेले धोके" (emerging threats) नामक नवीन संज्ञा जन्माला घातली. अर्थातच कुठल्याही तात्त्विक किंवा तटस्थ भूमिकेतून या देशांनी ही संज्ञा जन्माला घातलेली नव्हती. आणखी एक गोष्ट म्हणजे दहशतवाद या शब्दाची दाहकता सौम्य करण्याकरता त्यांनी दहशतवादाचे उपप्रकार पाडायला सुरवात केली: 
(१) कट्टरतावाद आणि वांशिक आधार असलेला हिंसक दहशतवाद (Radically and ethnically motivated violent extremism)
(२) अतिरेकी राष्ट्रवाद (Violent nationalism)
(३) उजवा कट्टरतावाद (Right-wing extremism)

बाँब आणि गोळ्यांद्वारे मनुष्यहत्यांसारख्या वास्तवात घडवून आणल्या जाणार्‍या घटनांपासून लक्ष दुसरीकडे वळवत लोकाशाहीचा एक अपरिहार्य भाग असलेल्या राजकीय संघर्षाच्या घटनांना दहशतवादाचा एक प्रकार असल्याचे उपरोल्लेखित देशांकडून भासवले जात होते. श्री तिरुमूर्ती यांनी हा भंपकपणा कसा हे सिद्ध करणारी काही कारणे सांगितली ती अशी: 

श्री तिरुमूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, 
  • असे वर्गीकरण जागतिक दशतवादविरोधी परिषदेच्या स्थापनेमागील तत्त्वांच्या विरोधात जाते. बाँबस्फोट आणि बंदुकांद्वारे मनुष्यहत्यांसारख्या वास्तवात घडवून आणल्या जाणार्‍या घटनांच्या मागे असलेल्या कारणांचा शोध घेणे हे या परिषदेच्या स्थापनेमागील कारण होय. 
  • दुसरं म्हणजे असे वर्गीकरण काही प्रगत राष्ट्रांनी ९-११च्या दहशतवादी हल्ल्याच्या आधी जन्माला घातलेल्या "चांगला अतिरेकी आणि वाईट अतिरेकी" या फसव्या कल्पनेकडे नेणारे आहे. 
  • तिसरं म्हणजे हे समजून घेणं गरजेचं आहे की लोकशाहीत उजवी विचारसरणी आणि डावी विचारसरणी यांच्यापैकी काय निवडायचे ही जनतेच्या निवडणुकीतील निर्णयावर अवलंबून असते. जनता उजव्या किंवा डाव्या दोन्ही विचारसरणीमागील अतिरेकी विचारांना नाकारतही असते. तेव्हा, अशा प्रकारे वैचारिक संघर्षाला  दहशतवादावरील चर्चेत सामील करुन त्याला थेट हिंसक अतिरेकी कारवायांच्या पंगतीला बसवण्याचा अव्यापारेषू व्यापार हा निव्वळ दहशतवादाच्या मुळाच्या अर्थात त्यामागील सत्याच्या शोधाकडे जाण्यापासून लोकांना रोखणे याच उद्देशाने केलेला वाटतो. 
  • चौथा मुद्दा असा की दहशतवाद्यांचे वर्गीकरण करताना तयार केलेली छद्म-लेबले राष्ट्रीय किंवा स्थानिक पातळीवरील मुद्द्यांना लावून संघर्षाच्या स्थानिक मुद्द्यांना दहशतवादाच्या पातळीपर्यंत उंचावणे आणि मग आपोआप प्रत्यक्ष घडत असलेल्या दहशतवादाला सौम्य करणे असा दुहेरी डाव साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परराष्ट्रमंत्री श्री जयशंकर यांचे विधान उद्धृत करताना श्री तिरुमूर्ती  म्हणाले की "दहशतवाद हा दहशतवाद असतो, दहशतवादी हा दहशतवादी असतो, आणि चांगला दहशतवाद आणि वाईट दहशतवाद वगैरे असं काही नसतं." अशा प्रकारे ठामपणे घेतलेली ही भूमिका ही खोडसाळपणे व मुद्दाम दहशतवादाची सौम्य स्वरूपात खोटारडी मांडणी करण्याच्या विरोधात भारताने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.
अब्राहमिकेतर धर्ममतांच्या विरुद्ध असलेल्या पूर्वग्रहदूषित मतांना श्री तिरुमूर्ती यांनी अशा प्रकारे प्रभावी पद्धतीने सुरुंग लावला. या आधी आंतरराष्ट्रीय मंचांवरुन होणार्‍या विचारमंथनात अब्राहमिक धर्ममते आणि अब्राहमिकेतर धर्म यांच्यात फरक करुन कधीही चर्चा झालेली नव्हती. [अपवाद फक्त मूलतत्वावाद अभ्यास प्रकल्प (fundamentalism project study) याचा. यात मात्र अब्राहमिक धर्ममते आणि अब्राहमिकेतर धर्म असे वर्गीकरण करुन त्यावर विवेचन केलेले दिसते.] श्री तिरुमूर्ती म्हणाले की सद्ध्या प्रचलित असलेल्या फोबियांमधे इस्लामोफोबिया, ख्रिती रिलिजन बद्दल द्वेष, व अ‍ॅन्टीसेमिटिझम अर्थात ज्युविरोधवाद हे प्रकार प्रामुख्याने आढळतात. पण या सगळ्याच्या सगळ्या वर्चा या अब्राहमिक धर्ममतांच्या बाबतीतल्या आहेत. पण अब्राहमिकेतर धर्मांबद्दल मोठ्या प्रमाणात असलेला आकस आणि द्वेष हा संयुक्त राष्ट्रसंघाने आजवर विचारातही घेतलेला नाही, त्यावर कधी चर्चाही केलेली नाही. हिंदूद्वेष, शीख समुदायाबद्दलचा द्वेष, बौद्धद्धमताबद्दल असलेला द्वेष हे देखील अस्तित्वात असताना या व अशा अब्राहमिकेतर धर्मांबद्दल असलेल्या द्वेषाकडे आजवर तुम्ही आजवर दुर्लक्ष का केलंत असा सडेतोड प्रश्न श्री तिरुमूर्ती यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला विचारला. यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आंतरराष्ट्रीय पटलावर आपली बाजू लढवली जात आहे अशी भावना एक हिंदू म्हणून आमची प्रथमच झाली. कारण साधारण तीनेक शतकांपासून आजपर्यंत दहशतवाद, धर्ममते, व तत्सम विषयांवर होणार्‍या चर्चांचा सूर हा आम्ही हिंदू म्हणजे कुणीतरी मागासलेले आणि म्हणून टाकून देण्याच्या लायकीचे असाच असायचा, त्याला  भारताचे प्रतिनिधी श्री तिरुमूर्ती यांनी चांगलाच सुरुंग लावला. 

आता श्री तिरुमूर्ती यांच्या युक्तीवादातला सर्वात महत्त्वाचा भाग सांगतो. एक म्हणजे अब्राहमिक धर्ममतांमध्ये सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता आहे आणि हा मुद्दा जगभरात झालेल्या व सुरू असलेल्या विचारमंथनांत मान्य करण्यात आलेला आहे. दुसरीकडे अब्राहमिकेतर धर्मांत सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता अस्तित्वात नाही, आणि हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. व्यक्तीगत पातळीवर आपण सहिष्णू किंवा असहिष्णू असू शकतो. किंबहुना, मनुष्यमात्रांतील असहिष्णुता नियंत्रित करण्याचे काम हे (म्हणजे अब्राहमिकेतर) धर्म करतात. पण जर का धर्मच सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णू असतील तर ते मनुष्यांतील असहिष्णुता अनेक पटींनी वाढवण्याचे काम करतात हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. ही बाब Encyclopedia Britannica या शब्दकोषासकट जागतिक साहित्यात मान्य झालेली आहे. अगदी अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालायाचे न्यायाधीश श्री भरुचा आणि श्री अहमदी यांनीही हेच प्रतिपादन केले की हिंदू धर्म हा सैद्धांतिक पातळीवर सहिष्णूच आहे. हिंदू धर्मीय हे माणूस म्हणून असहिष्णू असू शकतात, पण त्यांचा धर्मसिद्धांत त्यांना सहिष्णू बनवतो व बनवत राहील. हा अब्राहमिकेतर धर्मांचा सर्वात मोठा गुण आहे जो या आधी भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धीजीवी(!) वर्तुळात चर्चिला गेलाच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अब्राहमिकेतर धर्मांत मूलतत्ववाद नामक गोष्टच अस्तित्वात नाही (कारण या धर्मांची मूल तत्त्वेच सहिष्णू आहेत). वस्तुतः मूलतत्ववाद प्रकल्पाचा अब्राहमिक धर्ममतांबाबतचा निष्कर्ष हा लक्षात घेण्यासारखा आहे: "मूलतत्वावाद हा लिखित स्वरूपात उपदेश अस्तित्वात असलेल्या अब्राहमिक धर्मांची वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. या धर्मांत लिखित वचनांचे प्रामाण्य अध्याहृत असून, लिखित वचनांपासून ढळणे किंवा च्युत होणे हे मान्य नाही, ते सहनही केले जात नाही. तसेच, हिंदू, शीख, बौद्ध, ताओइझम (चीनी) आदि पौर्वात्य धर्म हे मूलतत्ववादाने पीडीत नाहीत." 

भारतीय बुद्धीवादी (!) वर्तुळात अशी चर्चा कधी ऐकली आहे काय? मूलतत्वावाद प्रकल्प हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून त्या अंतर्गत १९८० साली सुरू झालेला आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून या अंतर्गत १९९४ सालापर्यंत ५ अहवालवाजा खंड प्रकाशित झालेले आहेत. असा हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प जर त्याच्या प्रकाशनांत म्हणत असेल की अब्राहमिकेतर धर्मांत सैद्धांतिक आणि उपदेशात्मक पातळीवर असहिष्णुता नाही आणि मूलतत्ववाद नाही तर त्याला निश्चितपणे वजन प्राप्त होते. या गोष्टी ज्या आजवर आपण जागतिक पातळीवर सत्य म्हणून स्थापित करु शकत नव्हतो, ज्यांमुळे आपल्याला चर्चेत आणि इतर बाबतीत अब्राहमिक धर्ममतांच्या बरोबरीने स्थान नव्हतं, त्याच गोष्टी श्री तिरुमूर्ती यांनी ठामपणे मांडून निश्चितपणे काही देश व घटकांच्या कारस्थानांना खोटं पाडलं. 



Transcript

Anchor:
We have a very influential voice tonight in the shape of Mr. S. Gurumurthy, the editor of Tughlaq to get a perspective on what monumental step this has actually been. Mr Gurumurthy, thank you for once again speaking with Times Now and me in particular. Thank you very much.

Mr Gurumurthy:
Thank you. Welcome please.

Anchor:
How significant is it that India has called out the United Nations for its selectivism over its emphasis on certain kinds of religious discrimination, but not others like Hinduphobia.

Mr Gurumurthy:
See the International Counterterrorism Conference, what T S Tirumurthi did is something outstanding. He made two great points. One, he demolished the effort to dilute the battle against terror by changing the narrative of what is terror. Over a period the very definition of terror was being diluted to include everything into terror so that the real terror escapes. This is point one he made. The second point was he exposed the bias against non-Abrahamic religions in the UN discourse, which has never, never happened. In 70 years, I have never seen an Indian representative attempting to defend the Indian civilization. This is the first time it has happened that India has opened its mouth to defend the Indian civilization in a world which has been running on the Abrahamic civilisational narratives and discourse. I will just take a minute to explain how he demolished the dilution of the concept of terror. They introduced the concept of “emerging threats”. Instead of dealing with the actual threats, they introduced the concept of emerging threats and began categorizing terror. Who are the people who were doing it? “Some interested Member States”, he says, “driven by political, religious, and other motivations.” It is not that they were driven by any intellectual or motivations of an unbiased nature, so they said they've been trying to label terrorism into categories. You see the categories they were making:
1. Radically and ethnically motivated violent extremism.
2. Violent nationalism
3. Right wing extremism

From the battle against terror, which means throwing bombs and killing people by AK47, the whole concept was diluted into almost what would be a political battle in a democracy. So he cited 4 reasons why this dilution is fraudulent. I mean I am using the word fraudulent, he didn't, but he meant it.

He said it goes against the accepted principle of Global Counter Terrorism Council’s very formulation. It was intended to find the actual terror of someone throwing bombs. Second, it goes back to the pre-911 label of your terror versus my terror. My terror is softer terror, your terror is a harder terror. So this is the second thing. Third thing, he said it is necessary to understand that in a democracy, right wing and left wing ideological battle is a matter of electoral choice of the people. So when people are choosing, there is nothing called right or left wing extreme thought, people will reject the extreme thought. So this whole idea of reducing spectrum of ideological battle into the idea of terror is only to dilute the actual terror.

The 4th point he made was that even such labels were given to so-called threats, which are limited to national or regional context. So they were trying to raise even the local disputes into something like global terror. He quoted the foreign minister Jaishankar’s statement to say “Terrorism is terrorism, terrorists are terrorists, and there is nothing like good terror and a bad terror.” I think this is a very, very major step. India has taken to stop the dilution of terror by intended and deliberate narratives, false narratives. Second thing is he exposed the bias against non-Abrahamic religions. Never in the international discourse the idea of Abrahamic religions and non-Abrahamic religions were ever debated or discourse, though in the intellectual discourse whether it is in the fundamentalism project study or in the intellectual discourse elsewhere, religions were categorized in the world as Abrahamic and non-Abrahamic. And I will tell you what is the impact of this. He said that while the phobia against Abrahamic religions that there is Islamophobia, there is Christian or phobia there is anti-Semitism —all these are Abrahamic religious pools are hurt. But he said there is also bias against non-Abrahamic religions. You have never discussed about it. There is anti-Hindu bias, there is anti-Sikh bias, there is anti-Buddhist bias. Why have you neglected the bias and the phobia against non-Abrahamic religions? This is the question he raised. The most important point is that we feel for the first time that we are defended. We were always, I mean Hinduism itself was taken as something which is backward and all that, it is something which has to go. This is the kind of discourse which has been going on in the world for the last three centuries.

Now I want to mention three facts, three facts Mr Rahul. One is that in Abrahamic religions there is doctrinal intolerance. This is accepted by all intellectual discourses in the world. In non-Abrahamic religions there is no doctrinal intolerance. This is important. Individuals can be tolerant or intolerant. In fact, only to moderate individual intolerance, you have religions, so that religions moderate the individual intolerance. But if the religions themselves are doctrinally intolerant, you can understand how individual intolerance will be multiplied by doctrinal intolerance of religions. It is accepted by all global literature, including the Encyclopedia Britannica and other literature that including the Supreme Court in the Ayodhya case, Justice Bharucha and Ahmedi said, “Hinduism is doctrinally tolerant.” The Hindus may be intolerant, but their doctrine will make them tolerant. That is the virtue of non-Abrahamic religions, which is never debated or discussed in the Indian intellectual scene or in the world. The second thing is there is nothing called fundamentalism in non-Abrahamic religions. In fact I would like to quote what the fundamentalism project said about Abrahamic religions. The fundamentalism project said “The idea of fundamentalism is unique to the Abrahamic religions which are text based. Textual inherency is presumed, and textual deviation is not allowed. And Fundamentalism Project goes on to say that Hinduism, Sikhism, Buddhism, Taoism and the eastern religions do not suffer from the vice of fundamentalism. Have you ever heard it in Indian discourse? This Fundamentalism Project started in 1980 and delivered 5 volumes by 1994, and this is an international research. So first there is no doctrinal intolerance in non-Abrahamic religions and there is no fundamentalism. To these two things taken together, we are not in a position to establish it in the world, we are not even treated on par with the Abrahamic religions — this Tirumurti has demolished.

© मंदार दिलीप जोशी
पौष कृ. ३, शके १९४३, संकष्ट चतुर्थी